Tuesday, 3 October 2017

ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांप्रती शासन अत्यंत संवेदनशील -जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर

              



        जळगाव, दि. 3 :- ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुरक्षित, आरोग्यदायी सुखकर व्हावे यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाप्रती शासन अत्यंत  संवेदनशील असून विविध उपाययोजना व कायदे तयार केले जात असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाकळर यांनी येथील अल्पबचत सभागृहात दिली. समाज कल्याण विभागातर्फे आयोजित जागतिक जेष्ठ दिनानिमित्ताने आयोजित जेष्ठ नागरिकांच्या संदर्भातील कायदे अमंलबजावणी यंत्रणाची एक दिवशीय कार्यशाळेत आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली. यावेळी मंचावर समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, ज्येष्ठ नागरिक संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. डी.टी. चौधरी, खान्देशचे उपाध्यक्ष श्री. जगतराव बारकू पाटील, पोलिस उप अधीक्षक श्री .आर एस तडवी, सरकारी वकील ॲङ स्वाती निकम ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक जी.जी.पाटील, संचालिका सौ. आशा तळेले उपस्थित होते.
      श्री. निंबाळकर पुढे म्हणाले की, भारतासारख्या सुसंस्कृत देशात ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदा करावा लागतो. ही मोठी चिंतनाची बाब आहे. बदलत्या जीवन शैलीमुळे वेगवान जीवनात आपल्या संस्कृतीचा -हास झाल्याचे दिसते. वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. मुलं उच्च शिक्षण घेवून नोकरी निमित्ताने परदेशी जातात. आईवडीलांना पैसे पाठवतात. आधुनिकतंत्राव्दारे संपर्क करतात. पैसे मिळाल्याने जीवन सुसाहाय्य होते असे असले तरी याला भावनिक जोड असावी. सहवासही अत्यंत महत्वाचा असतो. त्यासाठी त्यांनी वेळ काढावा. वयाच्या 50 व्या वर्षी आपले आर्थिक नियोजन केल्यास उतार वयात ही आपण आर्थिक सक्षम राहू व बऱ्याच प्रमाणावर समस्या कमी झालेल्या असतील. एकत्र कुटुंब पद्धतीनष्ट झाल्याने ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न निर्माण झाले. ज्येष्ठांनी आपल्या मुलांच्या संसारात किती हस्तक्षेप करावयाचा हे ठरविल्यास वृध्दाश्रमांची गरज कमी होईल. आपल्या मुला-मुलींनाही आजी-आजोबा हवी असतात. त्याच प्रमाणे त्यांना ही नातवंड हवी असतात. ही भावना जोपासली तर मोठ्या प्रमाणावर प्रश्न मार्गी लागतील. ज्येष्ठ नागरिकांनी मोठया प्रमाणावर जिल्हयातील पतपेढीत ठेवी ठेवल्या आहेत. त्यांना त्या परत मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. यासाठी कोणत्याही भूल थापांना बळी न पडता प्रत्यक्ष माझ्याशी दूरध्वनीवर संपर्क साधा त्याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन् ऐवजी ऑफलाईन देण्यात येईल. तसेच एस.टी. प्रवास सवलतीसाठी वयाची मर्यादा 65 वर्षे वरुन 60 वर्ष करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असे त्यांनी शेवटी सांगितले.
     या कार्यशाळेत सरकारी वकील ॲङ स्वाती निकम यांनी ज्येष्ठ नागरिकां संदर्भात असलेल्या कायदयांची माहिती दिली. कायदयाच्या चौकटीत पालक, कायदेशीर-वारस, मुले-मुली, खावटी वडिलोपार्जित स्वअर्जित संपत्ती  आदि व्याख्या समजावून सांगितल्या. ज्येष्‍ठ नागरिकांचे अधिकाराबाबतही माहिती दिली.
       राज्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री ‍ङि टी. चौधरी  यांनी आपले मनोगतात महाराष्ट्रात 1 कोटी 20 हजार ज्येष्ठ नागरिक असून त्यांच्या सामाजिक, आर्थिक कुटुंबातील सुरक्षा आरोग्य आदि बाबींवर मार्गदर्शन केले.
          जळगाव ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या संचालिका सौ आशा तळेले यांनी आपले विचार मांडले, ते चालवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
     प्रारंभी राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन मान्यवरांनी आदरांजली दिली. कार्यशाळेचे उद्घाटन दीप प्रज्वलीत करुन झाले. समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी प्रास्ताविकांत 1 ऑक्टोंबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो त्यानिमिताने कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगुन त्यामागील शासनाची भूमीका स्पष्ट  केली.
    सहा.आयुक्त समाज कल्याण श्री. खुशाल गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कल्पना भारंबे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सामुहिक पसायदानाने झाली.
०००००

No comments:

Post a Comment