Monday, 5 February 2018

जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न अन्न सुरक्षेतंर्गत जिल्ह्यातील साडेचार हजार कुटूंबांचा नव्याने समावेश तीन महिन्यात जिल्ह्यातील 28 स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित






         जिमाका-जळगाव, दि. 5 :- जिल्हा दक्षता समितीची बैठक आज अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली.
यावेळी जिल्हास्तरीय दक्षता समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, समितीचे शासकीय सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांचेसह अशासकीय सदस्य जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष उत्तम सपकाळे, आत्माराम कोळी, सुनिल जावळे, महेंद्र बोरसे, रामकृष्ण पाटील, श्रीमती मीनाताई तडवी, डॉ. श्रीमती. अर्चना विशाल पाटील आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील नागरीकांना स्वस्त धान्य गावातीलच दुकानांमधून मिळावे. त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी यासाठी यापूर्वी परवाना निलंबित झालेले, राजीनामा दिलेले तसेच इतर कारणांनी गावात रेशन दुकान नसलेल्या जिल्ह्यातील 198 गावांत नव्याने रेशन दुकाने देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या महिन्यापासून जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानामधून अवघ्या 55 रुपये किलो दराने उत्तम दर्जाची तुरदाळ देण्यात येणार असल्याची माहिती सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी बैठकीत दिली. त्याचबरोबर पुरवठा विभागातर्फे ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 या कालावधीत जिल्हयातील 1 हजार 106 स्वस्त धान्य दुकांनाची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत त्रुटी आढळलेल्या 28 स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. तसेच 11 दुकानांची अनामत रक्कम शंभर टक्के तर 1 दुकानाची अनामत रक्कम 50 टक्के जप्त करण्यात आली असून यापोटी 15 हजार 500  रुपये वसुल करण्यात आल्याचेही श्री. जाधव यांनी बैठकीत सांगितले.
            या बैठकीत लाभार्थ्यांचे शिल्लक धान्य त्याच महिन्यात द्यावे, स्वस्त धान्य दुकानदारांनी ग्राहकांशी सौजन्याने वागावे, जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांकासह यादी स्वस्त धान्य दुकानाच्या बाहेर ग्राहकांना दिसेल अशी लावावी. या विषयाबरोबरच सदस्यांनी सुचविलेल्या विषयावर चर्चा करण्यात आली.
000

No comments:

Post a Comment