Sunday, 23 September 2018

‘आयुष्यमान भारत’ योजनेचा लाभ तळागाळातील गरजूंपर्यंत पोहचवून जिल्हा व्याधीमुक्त करावा --- खासदार रक्षाताई खडसे





जळगाव, दि. 23 -  आयुष्यमान भारत योजना केंद्र शासनाची कल्याणकारी महत्वपूर्ण योजना असून या योजनेचा लाभ तळागाळातील गरजूंपर्यंत  पोहचवून जिल्हा व्याधीमुक्त करावा. असे आवाहन  खासदार रक्षाताई खडसे यांनी केले.
कोणतीही व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, गरीबांना वेळेत उपचार मिळावे यासाठी मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी सुरु केलेली आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लोकार्पणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत पात्र लाभार्थ्यांना गोल्ड कार्ड देऊन करण्यात आला.  यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर  जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे म्हणाल्या की, देशातील गरीब लोकांचे आरोग्य चांगले रहावे,  गरीबांना आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाव्यात. यासाठी मा. प्रधानमंत्र्यांनी आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना  सुरु केली आहे. देशातील 10 कोटी तर राज्यातील 83.72 लाख लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.  या योजनेच्या माध्यमातून गोरगरिब रुग्णांना लाभ मिळणार असून रुग्णालयांचेही अद्ययावतीकरण होण्यास मदत होणार आहे.  देशातील गरिबांच्या आरोग्याची काळजी घेणारी ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून  शेवटच्या घटकातील लोकांना लाभ देण्यात यावा. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी सांगितले की, ज्या लोकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत नव्हता अशा लोकांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे. या योजनेत प्रत्येक कुटुंबाला प्रती वर्षी  पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहे. ही योजना पूर्णपणे नि:शुल्क असून या योजनेत सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या कर्करोगाचे उपचार, मानसिक आजार यांचा समावेश आहे.  या योजनेत शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा देण्यात येणार आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करुन घेतले जाणार असून राज्यात आयुष्यमान भारत योजनेसोबतच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एकत्रितरित्या राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डाॅ चव्हाण,  डाॅ कमलापूरकर यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमात अशोक कदम, सोमनाथ भंडगर, भाग्यश्री कदम ,संदीप भंडगर, विलास कदम, प्रभाकर पवार, सरला पवार, सारिका कदम, समाबाई कदम, सुजाता कदम, सत्यभामा भंडगर यांना प्रातिनिधिक स्वरूपात आयुष्मान भारत योजनेचे गोल्ड कार्ड मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस झारखंड राची येथून देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आयुष्यमान भारत योजनेच्या लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.
यावेळी डॉ. प्रमोद पांढरे, डॉ. बाबूलाल बारेला, महात्मा फुले जन आरोग्यचे समन्वयक डॉ. चेतन पाटील, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, आरोग्यमित्र, जळगाव शहरातील पात्र लाभार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment