Tuesday, 16 July 2019

हिरकणी महाराष्ट्राची योजनेत जिल्ह्यातील महिला बचत गटांनी सहभागी होण्याचे आवाहन


            जळगाव, दि. 16 - महाराष्ट्रातील महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, महिला उद्योजकांची संख्या वाढविण्यासाठी ‘हिरकणी-नवउद्योजक महाराष्ट्राची’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. महिलांमध्ये असलेल्या कल्पना, महिलांना आर्थिक स्वातंत्र्य व राज्याच्या विकासात सहभाग देण्यासाठी ‘हिरकणी महाराष्ट्राची’ या स्पर्धेमुळे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. ‘हिरकणी महाराष्ट्राची’ या योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या सदस्यांना, महिलांच्या कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार असून प्रत्येक तालुकास्तरावर कॅम्पचे आयोजन करण्यांत येऊन त्यातून निवड झालेल्या उत्कृष्ट महिला बचत गटांना जिल्हास्तरीय कल्पना सादरीकरण करण्यासाठी संधी मिळणार आहे.
            महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप धोरण 2018 च्या अनुषंगाने राज्यातील महिला बचत गटांना स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योजक बनण्यास प्रोत्साहित करणे हा मुख्य उद्देश आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान (एनआरएलएम) राष्ट्रीय शहरी जीवन्नोती अभियान (एनयूएलएम) व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत किमान एक वर्षापूर्वी स्थापन करण्यांत आलेले व राष्ट्रीय जीवन्नोती अभियानातील पंचसूत्री, दशसूत्रीचे पालन करणारे महिला बचत गट या योजनेचे लाभार्थी असतील.
            तालुकास्तरीय गट निवडतांना आरोग्यसेवा, कृषी, तंत्रज्ञान, सामाजिक प्रभाव, पर्यावरण आणि स्थिरता या क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या गटांची निवड केली जाणार आहे. जेणेकरुन अशा गटांचे सादरीकरण प्रभावीपणे होऊन योजनेचा हेतू साध्य होईल.
            प्रत्येक तालुकानिहाय उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या व प्रभावीपणे सादरीकरण केलेल्या 10 बचत गटांची जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी निवड करुन त्यातून जिल्ह्यातील उत्कृष्ट 10 बचत गटांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती अनिसा तडवी, सहायक संचालक, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग यांनी दिली आहे.
00000

No comments:

Post a Comment