Saturday, 5 September 2020

लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन, जिल्ह्यात 30 लाख 51 हजार रुपयांचा दंड वसूल

 


            जळगाव, (जिमाका) दि. 5 - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुकाने उघडी ठेवणे, गर्दी करणे तसेच इतर कारणांसाठी केलेल्या कारवाईपोटी आतापर्यंत 30 लाख 51 हजार 560 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहे.

             जिल्ह्यात कोरोनाचा साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मास्क लावणे बंधनकारक असल्याचे आदेश निर्गमित केले होते. असे असूनही जे नागरीक मास्क लावत नाही. त्यांना पाचशे रुपये दंड करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मास्क न लावणाऱ्या 1950 व्यक्तींकडून 6 लाख 73 हजार 290 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 341 व्यक्तींकडून 1 लाख 19 हजार रुपये, दुकाने उघडी ठेवणाऱ्या 415 दुकानदारांना 2 लाख 28 हजार 100 रुपये, गर्दी करणाऱ्या 576 व्यक्तींकडून 1 लाख 54 हजार 800 रुपये, दुकाने सील केल्यापोटी 317 दुकानदारांना 17 लाख 90 हजार 500 रुपये, उप प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या 16 कारवाईत 1800 रुपये तर इतर कारणांसाठी 203 व्यक्तींकडून 84 हजार 70 रुपये असे एकूण 30 लाख 51 हजार 560 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

            लॉकडाऊनच्या काळात जळगाव शहर महानगर पालिका क्षेत्रात 310 दुकाने सील करण्यात येऊन त्यांना 17 लाख 85 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तर उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांच्या कार्यक्षेत्रात मास्क न लावणाऱ्या 686 व्यक्तींना 1 लाख 28 हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याचेही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment