जळगाव, (जिमाका) दि. 15 - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात आजपासून माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन नागरीकांची तपासणी करणार आहे. तपासणीसाठी येणाऱ्या पथकास नागरीकांनी सत्य माहिती देऊन कुटूंबातील सदस्यास कोणताही आजार अथवा लक्षणे असल्यास त्याची माहिती द्यावी. जेणेकरुन त्यांचेवर तातडीने उपचार करणे सोईचे होईल. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हावासियांना केले आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 990 बाधित व्यक्तींचा मृत्यु झाला आहे. यापैकी 856 व्यक्ती या 50 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील होत्या. तर त्यातील 470 व्यक्तींना कुठला ना कुठला आजार होता. ही बाब लक्षात घेता ज्येष्ठ नागरीक व इतर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक उद्भवू शकतो असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.
कोरोनावर मात करण्यासाठी राज्य शासनातर्फे आजपासून (15 सप्टेंबर) 25 ऑक्टोबरपर्यंत माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. या नियोजनानुसार सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्या सहभागाने आरोग्य विभागाचे घरोघरी जाऊन नागरीकांचे सर्व्हेक्षण व तपासणी करणार आहे. आरोग्य पथक तपासणीसाठी आल्यानंतर नागरीकांनी त्यांना सत्य माहिती देऊन ही मोहिम यशस्वी करण्यास हातभार लावावा. कुटूंबातील कोणत्याही व्यक्तींस कुठलाही आजार अथवा लक्षणे असल्यास त्याची माहिती तातडीने पथकास द्यावी. जेणेकरुन त्या व्यक्तींवर तातडीने उपचार सुरु करता येतील. त्याचबरोबर ती व्यक्ती बाधित आढळून आली तर त्याच्यापासून पुढे होणारा संसर्ग रोखण्यास मदत होईल.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 39 हजार 287 इतकी झाली असली तरी आतापर्यंत 28 हजार 461 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.44 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे वेळेत उपचार घेतल्याने कोरोनावर मात करता येते हे स्पष्ट होत असल्याने नागरीकांनी कोरोनाला घाबरु नये, मात्र आवश्यक ती काळजी घेऊन लक्षणे दिसताच तपासणी करुन घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment