जळगाव, (जिमाका) दि. 1 - कापुस पिकावर येणा-या चार अळयांपैकी गुलाबी बोंड अळी मध्ये गेल्या 4-5 वर्षात बीटी साठी प्रतिकार शक्ती निर्माण झाली असून गुलाबी बोंडअळी ही कोणत्याही वाणाची बीटी कपाशी सहजरित्या पचऊ शकते. एकदा अळी बोंडात शिरली की कोणत्याही औषधाने मरत नाही म्हणून त्या अळीस बोंडात जाण्याच्या आधीच रोखणे गरजेचे आहे. यासाठीच शेतक-यांमध्ये कृषि विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी ही जबाबदारी रासी सीडस् ला देण्यात आली आहे. यासाठी तीन चित्ररथांद्वारे जळगाव जिल्ह्यात जनजागृती सुरु करण्यात आली आहे. हे चित्ररथ 25 दिवसासाठी फिरणार आहेत व गावोगावी जाऊन चित्ररथाव्दारे व ध्वनीफितीव्दारे जनजागृती करणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाचे कर्मचारी या चित्ररथासोबत जनजागृती करुन प्रत्येक गावात पोस्टर बॅनर लावण्यात येत आहे.
यासोबतच मास ऑडिओ ब्रीज या तंत्रज्ञानाचा वापर करुन एकाच वेळी 2358 दुकानदार व 4500 शेतकरी यांच्याशी संपर्क साधला. यामध्ये 1-2 व्यक्ती बोलू शकतात व 10 हजार लोकांना एकाच फोन मध्ये ऐकू जाते. या उपक्रमातंर्गत 29 ऑगस्ट रोजी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी गुलाबी बोंडअळीबद्दल मार्गदर्शन केले. तसेच जळगाव जिल्ह्यात पाच हजार कामगंध सापळयांचे वाटप करुन त्यांच्या निरीक्षणावरुन शेतक-यांनी वेळेत फवारणी घेण्यासाठी उदयुक्त केते जात असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment