Tuesday, 15 May 2018

हवामान आधारीत फळपिक विम्याचे दर जाहिर ६ हजारात मिळणार १ लाख २१ हजार रुपयांच्या विम्याचा लाभ



       जळगाव, दि. 15 - पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित केलेली हवामान आधारीत फळपीक विमा योजना मृग बहारासाठी यंदा नाशिक विभागातील 37 तालुक्यातील 180 महसुल मंडळात राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत डाळींब पिकासाठी शेतकऱ्यांने प्रति हेक्टर करीता 6050 रुपये विमा हप्ता रक्कम भरल्यास या पिकास 1 लाख 21 हजार 100 रुपयांचे विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती विभागीय कृषि सह संचालक, नाशिक विभाग, नाशिक यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
            कृषि क्षेत्रास उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमुल्य अधिक असल्याने शेतक-यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपिकाचे अपेक्षीत उत्पन्न न झाल्यास येणारा तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेवुन प्रतिकुल हवामान घटकापासून विमा संरक्षण देण्यासाठी विविध वित्तीलय संस्थांकडे पिक कर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्यांची अधिसुचित फळपिकांसाठी पिक कर्ज मर्यादा मंजुर आहे. अशा सर्व शेतक-यांना ही योजना सक्तीची राहील तर बिगर कर्जदार शेतक-यांना ही ऐच्छिक स्वरुपाची आहे. लाभ घेणा-या इच्छुक फळबाग उत्पादक शेतक-यांनी बँकेशी तसेच कृषि विभागाशी संपर्क साधण्याचे आवहन कृषि विभागाने केले आहे.
            संत्रा व मोसंबी पिकासाठी शेतकऱ्यांने प्रति हेक्टर करीता 3850 रुपये विमा हप्ता रक्कम भरल्यास या पिकास 77 हजार  रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. तर पेरु व चिक्कु पिकासाठी शेतकऱ्यांने प्रति हेक्टर करीता 2750 रुपये विमा हप्ता रक्कम भरल्यास या पिकास 55 हजार  रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे
०००





















No comments:

Post a Comment