जळगांव, दि. 2 (जिमाका वृत्तसेवा) - कोरोना आजारामुळे सर्वत्र भीतीचे सावट असतांना व लॉकडाऊन पुर्णपणे उठले नसताना देखील या कठीण काळामध्ये डाक विभागाने AePS (आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम) सेवेच्या माध्यमातून गत एक महिन्यामध्ये 14 हजार 903 व्यवहार करुन 3 कोटी 42 लाख इतकी रक्कम ग्राहकांना वितरित करण्याची कामगिरी केली आहे. डाक विभागाच्या जीडीएस पोस्टमन तथा कांऊंटरवर काम करणारे कर्मचारी यांनी ही कामगिरी फत्ते केली आहे. या कामासाठी विभागास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचेअमूल्य सहकार्य लाभले आहे. अशी माहिती जळगाव विभागाचे डाक अधिक्षक श्री. पी. बी. सेलुकर यांनी दिली आहे.
संपूर्ण देशात कडक लॉकडाऊन असताना देखील डाक विभाग अत्यावश्यक सेवा प्रदाता या प्रवर्गात असल्याने ग्राहकांच्या हितासाठी आपली सेवा अविरत सुरु ठेवलेली होती. सुरुवातीला फक्त अत्यावश्यक सेवा देत गेल्या 2 ते 3 महिन्यपासून डाक विभागाने आपल्या संपूर्ण सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यातीलच एक महत्वाची सेवा म्हणजे AePS ही आहे. या सेवेत ग्राहकांना त्यांच्या आधारक्रमांक लिंक असलेल्या बँक खात्यातून सहज पैसे काढता येतात. त्यासाठी फक्त आपला आधारक्रमांक, बोटांचे ठसे आणि मोबाईल असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे सदरील सेवा पुर्णपणे ऑनलाइन असून पैसे काढण्यासाठी कुठलीही पावती भरण्याची आवश्यकता नाही, त्याचप्रमाणे ग्राहक पोस्टमनच्या माध्यमातून सदरील सेवेचा घरपोच देखील लाभ घेऊ शकतात. त्यासाठी ग्राहक आपल्या मोबाइल मध्ये postinfo या ॲप्लिकेशनमार्फत अथवा www.indiapost.gov.in या संकेतस्थळावरुन घरपोच सेवेसाठी विनंती करु शकतात. वयोवृध्द ग्राहक, पेन्शनर यांना ही सेवा अत्यंत उपयोगी आहे.
या सेवेच्या व्यतिरिक्त डाक विभागाकडे ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक सेवा उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ बचत खाते (सर्वसामान्य व्यक्तींसाठी) सुकन्या समृदधी योजना (दहा वर्षाखालील मुलींसाठी) आवर्ती ठेव योजना, मुदत ठेव योजना (1, 2, 3 व 5 वर्षांसाठी) मासिक प्राप्ती योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पीपीएफ इ. उपलब्ध असून सर्व ग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा. असे आवाहनही श्री. पी. बी. सेलुकर यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment