Friday, 22 December 2023

तृतीयपंथीयांमध्ये निवडणूक विषयक जनजागृती समाजकल्याण विभागाचा उपक्रम

 







            जळगाव, दि.२२ डिसेंबर (जिमाका) -  समाज कल्याण सहायक आयुक्त व आय. आर. जी. केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मतदान जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.         या कार्यक्रमात जिल्हाभरातील मोठ्या संख्येने तृतीयपंथीय व्यक्तींचा सहभाग होता. मतदार जनजागृतीसाठी उपस्थित तृतीयपंथीय व्यक्तींच्या माध्यमातून 'माझे मत - माझे भविष्य, मतदार राजा जागा हो - लोकशाहीचा धागा हो, नर असो वा नारी‌ - मतदान ही सर्वांची जबाबदारी, आपल्या मताचे दान- आहे लोकशाहीची शान, नवे वारे नवी दिशा -‌मतदानच आहे उद्याची आशा' अशा विविध घोषणांच्या माध्यमातून तृतीयपंथीय व्यक्तींमध्ये  मतदानाप्रती जनजागृती करण्यात आली.

            अॅड. भारती भालेराव, समाज कल्याण तालुका समन्वयक जितेंद्र धनगर, महेंद्र पाटील, तृतीयपंथीय प्रतिनिधी भरत जोगी यांनी तृतीयपंथीयांमध्ये कायदेविषयक जनजागृती केली. तृतीयपंथीय समुदायामध्ये आप-आपल्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी नव्याने मतदान नोंदणी करणे, मतदानाप्रती तृतीयपंथीय व्यक्तींमध्ये उत्साह निर्माण होणे बाबत उपस्थित तृतीयपंथीय व्यक्तींना आवाहन करण्यात आले. तसेच तृतीयपंथीय समुदायाला लोकशाहीच्या परंपरेचे जतन, निष्पक्षपाती , निर्भयपणे व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ दिली.  वय वर्ष १८ पूर्ण केलेल्या भावी मतदारांना मतदार नोंदणीचे आवाहन करण्यात आले.

            या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी, तालुका समन्वयक व आर.जी.केअर सेंटरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले व परिश्रम घेतले.

०००००००००००


नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव सातत्याने हागणदारी मुक्त असावे पाळधी येथे विशेष ग्रामसभेत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व सीईओ अंकित यांची उपस्थिती

 











            जळगाव,दि.२२ डिसेंबर (जिमाका) - पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छता ही काळाची गरज असून लोकसहभाग ही तितकाच  महत्त्वाचा आहे. ग्रामसभा ही केवळ प्रबोधनासाठी उपलब्ध साधन नसुन ती गावाला दिशा देणारी विशेष सभा आहे. तसेच गाव स्वच्छतेसाठी " ग्रामसभा " प्रभावशाली साधन असून नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव सातत्याने हागणदारी मुक्त असावे. त्यासाठी सुंदर, स्वच्छ गावची ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी समाजाप्रती आपले निरंतर कर्तव्य पार पाडावे . असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले.

            राज्यात एकाच वेळेस २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा पार पडत आहेत. जळगाव जिल्ह्यातील ग्रामसभांची सुरूवात  आज पाळधी बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेतून झाली. त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. या विशेष ग्रामसभेला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पाळधी बु. सरपंच विजय पाटील, उपसरपंच राहुल धनगर, पाळधी खुर्द सरपंच लक्ष्मीबाई कोळी, उपसरपंच भारतीताई पाटील,  जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक बी. एस. कोसोदे,  गटविकास अधिकारी सुशांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, महिला बाल विकास अधिकारी संजय धनगर, सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास पाटील,  बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री वंजारी,  पाणीपुरवठ्याचे उप अभियंता श्री बोरकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, संजय महाजन, ग्रामविकास अधिकारी पाठक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य , अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, संपर्ण ग्रामीण महाराष्ट्र सन २०१८ मध्येच हागणदारी मुक्त म्हणून जाहीर करण्यात आला होता. तथापि सन २०१८ नंतर राज्यातील ग्रामीण भागात नवीन कुटुंबाची वाढ झाली असल्याने नव्याने वाढलेल्या ठिकाणी वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय शासन स्तरावरून करून देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांसाठी कार्यशाळा घेण्यात यावी. अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. ग्रामस्थांनी वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने सर्वांनी सहभाग द्यावा. असे आवाहन ही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

            जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, ग्रामसभांना विशेष महत्त्व आहे. या ग्रामसभांच्या माध्यमातून गावातील शौचालयांचा लाभापासून वंचित लाभार्थ्यांना लाभ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाळधी गावला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या काम पूर्णत्वास गेले आहे. दीड महिन्याच्या आत पाळधी ग्रामस्थांना शुध्द पाणी मिळणार आहे. गावाला धूळ, कचरा व हागणदरीमुक्त करण्यासाठी ग्रामसभांनी विशेष प्रयत्न करावेत. आयुष्यमान कार्ड योजनेचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. ग्रामस्वच्छतेसाठी प्रत्येक ग्रामस्थांने श्रमदान करावे‌. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

 

            मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित म्हणाले की, जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक घरात शौचालय असणे गरजेचे आहे. स्वच्छता असणे गरजेचे आहे. सध्या जिल्ह्यात कोवीड केसेस वाढत आहेत. वैयक्तिक आरोग्य व स्वच्छतेवर प्रत्येकाने भर दिला पाहिजे.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे वारस वंदना सुकलाल पाटील (अनोरे), प्रतिभा धोंडू इंगळे, (साळवा), शोभा रमेश पाटील (तरडे) यांना प्रत्येकी एक लाख रूपयांच्या धनादेशाद्वारे शासकीय मदत देण्यात आली. तसेच यावेळी आयुष्यमान कार्डाचे प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील पन्नास पात्र लाभार्थ्यांची (प्रत्येकी तीस हजार रूपयांची)  प्रकरणे यावेळी पालकमंत्र्यांनी मंजूर केली आहेत. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहायक गटविकास अधिकारी कैलास पाटील यांनी केले . आभार पाळधी बुद्रुक सरपंच विजय पाटील, पाळधी खुर्द सरपंच लक्ष्मी कोळी यांनी मानले.

००००००००००००००


Thursday, 21 December 2023

नगरपालिकांची कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण करा - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना जारी केल्या सूचना

             जळगाव, दि.२१ डिसेंबर (जिमाका) - जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कामात गतिमानता व पारदर्शकता आली पाहिजे. यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुख्याधिकाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत. नगरपालिकास्तरावर सुरू असलेली विविध विकासकामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण करण्यावर भर द्याव्यात. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सूचना दिल्या की, पारोळ्यात राष्ट्रीय महामार्गाचे थांबलेले आठ रस्त्यांची कामे पाठपुरावा करून सुरू करण्यात यावीत. धरणगावमध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करून शास्त्री मार्केटचा विषय मार्गी लावावा. शेंदूर्णीमधील विकासकामांचा ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा करून प्रस्ताव पाठविण्यात यावा. नगरपालिका शाखेने नशीराबादमधील २१ कामांच्या प्रशासकीय मान्यता तात्काळ द्याव्यात. यावल व चाळीसगाव मधील घनकचरा प्रकल्पाचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावे. भूसावळ व चाळीसगाव नगरपालिकेतील अनुकंपा भरती ३१ डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी. बोदवड नगरपालिकेने एसटीपी प्रकल्प या महीना अखेर मार्गी लावावा. माझी वसूंधरा अभियानात जिकंण्याच्या ईर्षने सहभागी व्हावा. पाचोऱा शेतकी संघ नियमानुसार सोडविण्यात यावा. नगरपालिकांनी  लिलावाबाबतचे सर्व प्रस्ताव ५ जानेवारीच्या आज पाठवावेत.

नगरपालिका कर वसूलीसाठी प्रभागनिहाय थकबाकीदारांची यादी तयार करण्यात यावी. वार्डनिहाय वसूली मोहीम शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. टुडी बारकोडला प्रसिध्दी देणे, घंडागाडीच्या माध्यमातून प्रसिध्द देण्यात यावी. वसूलीसाठी तृतीयपंथीयांची ही मदत घेण्यात यावी. २८ फेब्रुवारीपर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी वसूली थकीत राहणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाच्या मूल्यमापनासाठी केआरए पध्दत सुरू करण्यात यावी. १५ जानेवारी २०२४ पर्यंत बचतगटांची स्थापना पूर्ण करण्यात यावी. बचतगटांना पैसे देतांना त्यांची सर्व पात्रतासह यादी ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करावी.

बँकाबरोबर समन्वय साधून नगरपालिकांनी १० जानेवारीपर्यंत निधीचे वितरण करणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री/मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम, स्वनिधी, प्रधानमंत्री समृध्दी व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील कर्ज प्रकरणातील प्रस्ताव १५ जानेवारीपर्यात मंजूर करण्यात यावीत. प्रधानमंत्री आवास योजनेत कामे सुरू असलेल्या ठिकाणांना ३१ डिसेंबरपर्यंत भेट द्यावी. २८ फेब्रुवारीपर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेचे काम पूर्ण करण्यात यावे. कर्मचारी संघटनांबरोबर बैठक घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात यावेत. माझी वसुंधरा सारखा स्वच्छ सर्वेक्षणसाठी एक आराखडा तयार करण्यात यावा.

न्यायालयात वेळेत शपथपत्र दाखल करण्यात यावे. कामांवरील स्थगिती उठविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत. जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून नगरपालिकेत सुरू असलेल्या कामांची साईट व्ह‍िजीट करण्यात यावी. या साईट व्ह‍िजीटमध्ये कामांची गुणवत्ता तपासण्यात यावी. २६ जानेवारीपर्यंत कामे पूर्ण करण्यात यावेत. काम पूर्ण झाल्यावर निधी मागणी करण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

००००००००००००००

ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी जिल्ह्यात सुरू होणार शासकीय वसतिगृह! एरंडोल, चाळीसगांव, यावल, तालुक्यात इमारत भाडेतत्त्वावर देण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

             जळगाव,दि.२१ डिसेंबर (जिमाका) - जिल्ह्यातील एरंडोल, चाळीसगाव व यावल याठिकाणी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला - मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह करण्यात येणार आहे. प्रत्येकी १०० क्षमतेची मुले व मुलींचे एक असे एकूण सहा वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. या वसतिगृहासाठी ९२०० क्षेत्रफळाची भाडेतत्त्वावर इमारत देऊ इच्छिणाऱ्या मालकांनी, व्यक्तींनी १५ जानेवारीपर्यंत समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

            सामाजिक न्याय विभागाचा १५ जून २०२१ च्या शासननिर्णयान्वये ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी "संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजना सुरु करण्यात आलेली आहे. यात मुलांसाठी ४१ व मुलींसाठी ४१ अशी एकूण ८२ (प्रत्येकी १०० क्षमतेची) वसतीगृह सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यापैकी प्रथम टप्प्यात मुलांसाठी - १० व मुलींसाठी १० अशी एकूण २० (प्रत्येकी १०० क्षमतेची) वसतीगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ही वसतीगृहे ही औरंगाबाद व नाशिक या विभागातील अहमदनगर, जालना, आणि बीड या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत.

            आता उर्वरीत ३१ मुलांची व ३१ मुलींची अशी एकूण ६२ शासकीय वसतीगृहे सुरु करणेबाबत प्रस्तावित असून त्यापैकी जळगांव जिल्ह्यात तालुक्यांच्या ठिकाणी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह एरंडोल, चाळीसगांव, यावल, या ठिकाणी १ मुलांचे व १ मुलींचे (प्रत्येकी १०० क्षमतेची) असे प्रत्येकी २ वसतीगृह सुरु करणेकरीता (शासन मंजुरीच्या अधिन राहून) इमारत भाडेतत्वावर घेणेसाठी इमारत बांधकाम ९२०० क्षेत्रफळ (चौ.फुट) सर्व सोयी-सुविधायुक्त शहराच्या मध्यवर्ती भागात विद्यालय/महाविद्यालय पासून जवळ असलेली इमारत भाडेतत्वावर देणेसाठी उपलब्ध असल्यास १३ मार्च, २०२३ च्या शासन परिपत्रकातील अटीच्या अधीन विहित नमुन्यात आपले इमारत भाडेतत्वावर देणेबाबतचा प्रस्ताव अर्ज १५ जानेवारी २०२४ पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगांव या कार्यालयास सादर करण्यात यावे.असे आवाहन श्री.पाटील यांनी केले आहे.

०००००००००००


Wednesday, 20 December 2023

तरूणांनी रोजगार, स्वयंरोजगारासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

             जळगाव, दि.२० डिसेंबर (जिमाका) - शासनाने राज्यातील शहरी व ग्रामीण युवक व युवतीची वाढती संख्या व उद्योग , व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकांना चालना देणारी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या नावाने महत्त्वाकांक्षी योजना २०१९-२०२० पासून राबविण्यात येत आहे. जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ही योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पात्र उत्पादन व सेवा उद्योग व्यवसायासाठी योजना राबविण्यात येते. योजनेत कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले महाराष्ट्रातील स्थानिक रहिवासी ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण अधिकतम ४५ वर्ष (अनु.जाती/जमाती/महिला/विमुक्त भटक्या जाती/जमाती/अपंग/अल्पसंख्याक/माजी सैनिक यांचेसाठी ५ वर्ष शिथील) पात्र राहतील. योजनेसाठी शैक्षणिक पात्रता ही‌ दहा लाखांच्या प्रकल्पासाठी इयत्ता ७ वी उत्तीर्ण आहे. पंचवीस लाखांवरील प्रकल्पासाठी इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने यापूर्वी शासनाचे कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वंयरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

या योजनेमध्ये उत्पादन व्यवसायासाठी (उदा. बेकरी उत्पादन, पशुखाद्य निर्मिती, फॅब्रिकेशन इत्यादी) ५० लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल व सेवा व्यवसायासाठी (सलुन, हॉटेल, दुरुस्ती सेंटर इत्यादी) २० लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल. या योजनेत अनुसूचित जाती- जमाती, महिला, विमुक्त भटक्या जाती, जमाती, दिव्यांग, अल्पसंख्याक, माजी सैनिक या प्रवर्गातील शहरी भागासाठी बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किमतीच्या २५ टक्के अनुदान व ग्रामीण भागासाठी ३५ टक्के अनुदान पात्र असेल. त्यासाठी अर्जदाराची स्वगुंतवणूक ५ टक्के करावी लागेल. उर्वरीत सर्व प्रवर्गासाठी अर्जदार हा शहरी असेल तर १५ टक्के व ग्रामीण असेल तर २५ टक्के अनुदानासाठी पात्र असेल. या लाभार्थीना १० टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने https://maha-cmegp.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज वेबसाईटवर करतांना अर्जदारास स्वतःचा पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, रहिवास दाखला/शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला, मार्कशीट, पॅन कार्ड, प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, दिव्यांग दाखला तसेच वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन पुर्ण भरलेले हमीपत्र (undertaking form) ही कागदपत्रे अपलोड upload करावी लागतात.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती ज्यांना नवीन उद्योग/व्यवसाय सुरु करावयाचा असेल त्यांनी वरील वेबसाईटवर अर्ज ऑनलाईन करावा. या योजनेबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यालय, शासकीय आयटीआयजवळ, जळगांव येथे कार्यालयीन वेळेत भेट द्यावी. (Tel No. 0257- 2252832 Email – didic.jalgaon@maharashtra.gov.in) ही योजना राबविण्यासाठी या कार्यालयाकडून कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणूक केली जात नाही तसेच सदर बाबतीत खाजगी व्यक्तींकडून फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त अर्जदारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज पोर्टलवर परिपूर्ण आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. असे आवाहन श्री.पाटील यांनी केले आहे.

00000000

‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती’ची जनजागृती जिल्हा उद्योग केंद्राचा पुढाकार ; गतिमानता पंधरवडा घोषित

           


            जळगाव, दि.२० डिसेंबर (जिमाका) -  उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र कुशवाह यांनी १८ ते २ जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवडा घोषित केला आहे. या पंधरा दिवसांमध्ये जिल्हा उद्योग केंद्रातर्फे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

            मुख्यमंत्री रोजगार निर्मिती  पंधरवडा १८ डिसेंबरपासून सुरू झाला आहे. या योजनेचे जास्तीत जास्त प्रस्ताव या माध्यमातून गोळा करणे, ते ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पोर्टल भरणे, माहिती देणे आणि प्रचार करणे आदी नियोजन करण्यात येणार आहे. सर्व महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, खाजगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व्यावसायिक प्रशिक्षण संस्था व अशासकीय संस्था येथे योजनेचे जनजागृती मेळावे, प्रचार व प्रसिध्दी आयोजित करुन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जागेवर भरुन घेण्याची कार्यवाही करावी. तसेच उद्योजकता प्रशिक्षण देणा-या संस्था जसे की महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन, आरसेटी या संस्थाकडील प्रशिक्षित तरुण-तरुणींची यादी घेवुन त्यांना योजनेची माहिती द्यावी. महिला मेळावे घेणे ज्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, महिला बचत गट यांना संपर्क साधुन महिलांना या योजनेत प्राधान्याने सहभागी होण्यासाठी कृती आराखडा तयार करुन काम करणे. जिल्हयातील सर्व महामंडळे आणि एनजीओ यांना संपर्क साधून लाभार्थी योजनेत सहभागी करुन घेणे. एक बँक - एक प्रकरण यासाठी बँक मॅनेजर यांनी संपर्क साधुन योजनेत सहभाग वाढविणे. एक गाव किमान एक प्रकरण या प्रमाणे काम करणे. एक जिल्हा एक वस्तु याप्रमाणे जिल्ह्यातील उद्योगांना प्राधान्य देणे. औद्योगिक समुह योजनेतील लाभार्थीना लाभ देणे. मासिक त्रैमासिक मिटींगसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठका आयोजित करणे व विस्तृत पाठपुरावा/समन्वय करणे, बँकेत प्रलंबीत असलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करुन जास्तीत जास्त प्रकरणे मंजुर करुन घेणे.

जिल्हा उद्योग केंद्रात नाशिक विभाग उद्योग सहसंचालक सतीष शेळके यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. याबैठकीला जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळ, महिला आर्थ‍िक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ, जिल्हा विकास ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक व कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे अधिकारी उपस्थ‍ित होते. या बैठकीत जास्तीत जास्त कर्ज प्रकरणे मंजुर करुन घेवुन वाटपाची कार्यवाही करावी. नवउद्योजकांनी सदर पंधरवाडयात सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन श्री.शेळके यांनी केले.

सदर योजनेची अधिक माहितीसाठी जळगांव जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा. असे आवाहन महाव्यवस्थापक चेतन पाटील व व्यवस्थापक आर.आर.डोंगरे यांनी केले आहे.

00000000

Tuesday, 19 December 2023

विजाभज प्रवर्गातील १०४९ लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार ! यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत घरकुल प्रस्तावास शासनाची मान्यता

         जळगाव, दि.१९ डिसेंबर (जिमाका) - जिल्ह्यात विमुक्त जाती , भटक्या जमाती (विजाभज) प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल ‌योजनेत २०२३-२४ या वर्षासाठी १०४९ लाभार्थ्यांच्या घरकुल प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे विजाभज प्रवर्गातील या लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे.

            शासनाच्या इतर मागास बहुजन विभागाच्या वतीने विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजनेच्या धर्तीवर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना राबविण्यात येते. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजना जिल्हास्तरीय स्थापन करण्यात आलेली असते. या समितीचे सदस्य सचिव म्हणून समाजकल्याण साहाय्यक आयुक्त हे काम पाहतात. या समितीने जिल्ह्यात घरकुल योजनेसाठी प्राप्त प्रस्तावांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देत कार्योत्तर मान्यतेसाठी मुंबई येथे इतर मागास बहुजन विभागाकडे प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावास शासनाने कार्योत्तर मान्यता दिली आहे. घरकुल बांधकामासाठी प्रति लाभार्थी १ लाख २० याप्रमाणे १०४९ लाभार्थ्यांसाठी १२ कोटी ५८ लाख ८० रूपयांच्या निधीस ही मान्यता दिली आहे. यापैकी ३ कोटी २८ लाख रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला आहे.

            यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेच्या लाभासाठी  जळगांव जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त शासननिर्णय दि.१८ डिसेंबर २०२३ रोजी जोडण्यात आलेल्या "परिशिष्ट-अ" मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ दिला जाणार आहे. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ दिला राहील. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहील दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या / वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील. नाव/आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही केली जाणार आहे.

००००००००००००००००

महिला सन्मान योजनेत ज‍िल्ह्यात 2 कोटी 25 लाख महिलांचा एसटी प्रवास ! शासनाकडून महामंडळाला सवलतीचे म‍िळाले 59 कोटी 31 लाख मह‍िला सन्मान योजनेमुळे महामंडळाला मिळाली नवसंजीवनी

जळगाव, दि 19 डिसेंबर (जिमाका) – राज्य पर‍िवहन महामंडळाच्या बसेसमध्ये मह‍िलांना त‍िक‍िटात पन्नास टक्के सवलत देणाऱ्या मह‍िला सन्मान योजनेने एसटी महामंडळाला तारले असून भरघोस उत्पन्नाच्या रूपाने महामंडळाची  भरभराट झाली आहे. जळगाव ज‍िल्ह्यात योजना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या 8 मह‍िने 14 दिवसात 2 कोटी 25 लाख 31 हजार 406 मह‍िलांनी प्रवास केला आहे. यातून महामंडळाने प्रवासभाड्या पोटी 59 कोटी 31 लाख 47 हजार 845 रूपये वसूल केले आहेत. तेवढेच पैसे शासनाकडून महामंडळाला सवलतीपोटी उपलब्ध झाले आहेत. 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत असलेली “महिला सन्मान” ही योजना 17 मार्च 2023 रोजी सुरू केली. या योजनेला संपूर्ण ज‍िल्ह्यात अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे राज्य परिवहन महामंडळाला जणू नवसंजीवनीच मिळाली आहे. या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महामंडळाच्या तिजोरीत भरमसाठ वाढ होताना दिसून येत आहे. 

जळगाव ज‍िल्ह्यातील 11 डेपोंनी मह‍िला सन्मान योजनेत भरीव कामग‍िरी केली आहे.  ज‍िल्ह्यात योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2,25,31,406 मह‍िलांनी एसटी प्रवास केला आहे. यातून एसटी महामंडळाला 118,62,95,690 रूपयांचे उत्पन्न म‍िळाले आहे. यात महामंडळाने प्रवासभाड्या पोटी 59 कोटी 31 लाख 47 हजार 845 रूपये वसूल केले आहेत. तेवढेच पैसे शासनाकडून महामंडळाला सवलतीपोटी उपलब्ध झाले आहेत. 

"समाजाचा एक महत्वाचा घटक असलेल्या महिलांच्या सन्मानार्थ सुरु केलेल्या “महिला सन्मान” योजनेमुळे एस. टी.महामंडळाची प्रवासी वाहतूक बस पूर्ण क्षमतेने भरली जाते तसेच शासनाकडून मिळणाऱ्या परताव्यामुळे एस. टी. महामंडळाचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे. यातून एस. टी. महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही उत्साह वृद्धींगत होत असून एस.टी. प्रवाशांना अधिकाधिक उत्तम सेवा देण्यासाठी त्यांनाही मानसिक बळ मिळत आहे. यातून एक सकारात्मक उर्जा निर्माण होवून एस.टी. महामंडळ आणि प्रवासी यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळत आहे." अशी प्रत‍िक्र‍िया एसटी महामंडळाचे विभाग न‍ियंत्रक भगवान जगनोर यांनी व्यक्त केली आहे.

000000

Monday, 18 December 2023

जिल्ह्यात २७ नवीन रूग्णवाहिका दाखल होणार प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १९ रूग्णवाहिका खरेदी करण्यास पालकमंत्र्यांची मान्यता आरोग्य व्यवस्था सक्षम होणार

             जळगाव, दि.१८ डिसेंबर (जिमाका) - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन १९ रूग्णवाहिका खरेदीस काल मंजुरी दिली. मागील महिन्यात ग्रामीण रूग्णालयांसाठी मंजूर केलेल्या ८ रूग्णवाहिका व आज प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर केलेल्या १९ रूग्णवाहिका अश्या एकूण २७ रूग्णवाहिका जिल्ह्यात फेब्रुवारी पर्यंत दाखल होतील. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

जिल्हा वार्षिक योजना २०२३ - २४ (सर्वसाधारण) निधीच्या माध्यमातून रूग्णवाहिका खरेदी करण्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी परवानगी दिली आहे.   जिल्ह्यातील  प्राथमिक आरोग्य केंद्र जानवे (ता.अमळनेर), तामसवाडी (पारोळा), लोंढे, तरवाडे, खेडगाव (चाळीसगाव) 

वरखेडी, लोहटार (पाचोरा),

कठोरा, वराडसिंम, पिंपळगाव (भुसावळ), अंतुर्ली (मुक्ताईनगर), भालोद, सावखेडा (यावल), नशिराबाद (जळगाव), भालोद (रावेर), गारखेडा, वाकडी (जामनेर),  चांदसर,  पाळधी (धरणगाव) साठी १९ नवीन रूग्णवाहिकांना पालकमंत्र्यांनी तातडीने मंजुरी दिली आहे. लवकरच याबाबत तांत्रिक मंजुरी साठी नाशिक उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात येऊन दोन दिवसांत मान्यता घेतली जाईल. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर टेंडर प्रक्रिया राबविण्यात येऊन फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन १९ अद्यावत रूग्णवाहिका खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी दिली आहे.

जिल्हा रूग्णालय व अधिनस्त ग्रामीण रूग्णालयांना ८ नवीन रूग्णवाहिका खरेदीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नोव्हेंबर २०२३ महिन्यात मंजुरी दिली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पाठपुराव्यामुळे रूग्णवाहिका खरेदीच्या प्रस्तावास आरोग्य सेवा आयुक्तांनी एका दिवसातच तांत्रिक मान्यता दिली होती. या रूग्णवाहिकांची सध्या टेंडर  प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जानेवारी २०२४ पर्यंत या नवीन ८ रूग्णवाहिका ग्रामीण रूग्णालयात रूग्णसेवेत दाखल होणार आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालय व त्यांच्या अधिनस्त ७ ग्रामीण रूग्णालयांमध्ये न्हावी (यावल) अमळगांव (अमळनेर),  मेहुणबारे (चाळीसगांव), पिंपळगांव हरेश्वर (पाचोरा), बोदवड, एरंडोल, भडगांव या ८ रुग्णालयांसाठी प्रत्येकी १ (रुपये १८,०६,३००/- प्रति रुग्णवाहिकाप्रमाणे) अशा एकूण ८ पेशंट ट्रान्सपोर्ट टाईप बी एसी रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत.

"जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून वेळोवळी मदत करण्यात येत असते. नवीन रूग्णवाहिकांचा जिल्ह्यातील सर्वसामान्य रूग्णांना फायदा होणार आहे. भविष्यात ही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. " अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

०००००००००००००००

Friday, 15 December 2023

जलजीवन मिशनच्या कामांसाठी देखरेख समिती – मंत्री गुलाबराव पाटील

             नागपूर, दि. १५ : - जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामांवर देखरेखीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख समिती नेमणार असल्याची घोषणा पाणीपुरवठा व  स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत केली.

सदस्य सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यातील जलजीवन मिशनची कामे निकृष्ट दर्जाची केल्यासंदर्भात लक्षवेधीद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यात ३४ हजार पाणीपुरवठा योजना पूर्ण करायच्या आहेत. या योजनांचे काम प्रगतीपथावर आहे. ज्या ठेकेदाराने काम संथगतीने केले आहे, त्यांना दंड ठोठावला जात आहे. या कामांच्या तटस्थ लेखापरीक्षणासाठी खासगी कंपनी नेमली आहे.  तटस्थ लेखापरीक्षण आणि २५ टक्के काम झाल्याशिवाय ठेकेदाराला बिले अदा करायची नाहीत, असे निर्देश दिले आहेत. जलजीवन मिशनची कामे आणि त्यांचे तटस्थ लेखापरीक्षण व्यवस्थित होत आहे की नाही यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख समिती नेमण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील यांनी दिली. 

काही ठिकाणी योजना का थांबल्या त्याचा आढावा घेतला जात आहे. याशिवाय राज्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी विभागनिहाय बैठका घेतल्या जातील, असेही मंत्री श्री. पाटील यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले. एका जिल्ह्यात सुमारे सातशे पाणीपुरवठा योजनेची कामे असतात. ठेकेदार कमी आहेत. बीड कॅपॅसिटी ज्यात आहे त्यांनाच काम दिले जाते. मिस्त्री, मजूर मिळत नाहीत. म्हणून ही कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता, ग्रामपंचायती आणि मजीप्राच्या कामाचा अनुभव असलेल्या निवृत्ताना काम दिले जात आहे. असे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेचा चर्चेत सदस्य अशोक चव्हाण, नितेश राणे, प्रशांत बंब यांनी सहभाग घेतला.

००००००

जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध

        जळगाव, दि. १५ डिसेंबर (जिमाका) :- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल) नियम १९६४ मधील नियम ९ अन्वये जळगाव जिल्हा परिषदेचा सन २०२२-२३ चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद, ठराव क्रमांक ४१५, दि.४ ऑक्टोंबर, २०२३ रोजी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कामुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे.

                                     ००००००००००००००००००

गर्भपेशवीची अवघड शस्त्रक्रिया जिल्हा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी केली यशस्वी ! रूग्णांची प्रकृती उत्तम






         जळगाव, दि. १५ डिसेंबर (जिमाका) :- मोहाडी येथील शासकीय महिला व बाल रुग्णालयात दोन महिला रूग्णांची गर्भ पिशवीची अवघड शस्त्रक्रिया जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पाडली.

गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी तपासणीसाठी आलेल्या पहिल्या महिला रुग्णाची गर्भ पिशवीतील सूजेने आतडी चरबीमध्ये इन्फेक्शन झाले होते. गर्भपिशवीत गुंतागुंत निर्माण झाली होती. दुसऱ्या महिला रुग्णाची गर्भपिशवीत १० गाठी झालेल्या होत्या.  दोन्ही गर्भपिशवीचा आकार मोठा असून वजन अनुक्रमे ४ व ५ किलो ग्रम होते. त्यांना खासगी रुग्णालयात अंदाजे दीड ते दोन लाखापर्यंत खर्च सांगण्यात आला होता. या रुग्णांची परिस्थिती गरिबीची असून हे रुग्ण महिला रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनावणे यांना भेटले असता त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांना ही माहिती दिली. श्री.पाटील यांनी स्वतः शस्रक्रिया करण्यास तयारी दर्शवली. रुग्णांना दाखल करून गर्भ पिशवीची अवघड शस्त्रक्रिया अथक प्रयत्नानंतर यशस्वी केली. यावेळी ६ रुग्णांची कुटुंब नियोजन शस्रक्रिया ही करण्यात आली.

या शस्त्रक्रियांसाठी डॉ.किरण पाटील यांना  डॉ. किरण सोनवणे (भूलतज) डॉ, गुरुप्रसाद वाघ, डॉ. रुपाली कळसकर, डॉ. प्राची सुरतवाला व नर्सिंग स्टाफ रुपाली पाटील, नजमा शैख, मीना चव्हाण, सविता बिऱ्हाडे, दिपाली बढ़े, दिपाली किरगे व शस्रक्रिया विभागातील कर्मचारी यांचे सहाय्य लाभले.

गर्भ पिशवी व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची प्रकृती चांगली आहे. रुग्णालयात नियमित बाह्य व आंतररुग्ण महिला व बाल तपासणी मोफत केली जाते.

महिला रुग्णालयात गर्भपिशवी शस्रक्रिया, कुटुंब नियोजन शसक्रिया, नॉर्मल प्रसुती, सिझेरियन प्रसुती लहान मुलांवरील उपचार व रुग्णांची व नातेवाईकाची जेवणाची सोय मोफत आहे. सदर योजनाचा रुग्णांनी लाभ घ्यावा, तरी संपर्कासाठी चेतन परदेशी (९३६७५३१९२३) राहुल पारचा (९६७३६३९७४१) दिपक घ्यार (७०३०३९००२७) असे आवाहन  महिला व बाल रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांनी केले आहे.

000000


मुदत संपूनही मिळणार मतदार नोंदणीची संधी !

         जळगाव, दि.१५ डिसेंबर (जिमाका) - मुदत संपूनही नवमतदारांसह इतरांना मतदार नोंदणी करता येणार आहे. राज्य निवडणूक विभागाने नोंदणी राहिलेल्यांना पुन्हा संधी देऊ केली आहे. मुदत संपल्यानंतरही अनेकांना आता मतदार नोंदणी, पत्ता बदलणे, नाव बदलणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करता येणार असून, निवडणुकीत मतदानाचा हक्कही बजावता येईल.

राज्यात नऊ डिसेंबरला मतदारनोंदणीची मुदत संपली. त्यामुळे अनेकांना तांत्रिक कारणास्तव किंवा अन्य कारणांसाठी अर्ज भरता आला नाही. अशांना निवडणूक विभागाने पुन्हा संधी देऊ केली आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी नवमतदार; तसेच नाव दुरुस्तीचे अर्ज करण्यात आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता पुन्हा मतदान नोंदणीची संधी मिळेल, की नाही याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.

 'राज्यात नऊ डिसेंबरला मुदत संपली. मात्र, नऊ डिसेंबरनंतरही अर्ज ऑनलाइन, ऑफलाइन भरता येणार आहेत. नऊ डिसेंबरपर्यत भरलेले अर्ज आणि त्यानुसार अंतिम केलेली यादी पाच जानेवारीला प्रसिद्ध होईल,' अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

००००००००००००००००००

Wednesday, 13 December 2023

आपत्कालीन सेवेने नऊ वर्षांत वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण ! १०८ सेवा अधिक जलद व तत्पर करावी, मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

             जळगाव,दि.१३ डिसेंबर (जिमाका) - रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या - १०८ रुग्णवाहिके मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील  लाख ७८ हजार ४२० नागरिकांचे प्राण वाचले आहेत‌. हृदयविकाराचे रूग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती ते गर्भवती महिला अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे. ५२ हजार ३७६ महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात हलविण्यात यश आले आहे .

 

            जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी '१०८' या आपत्कालीन रूग्णसेवेचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला असून रूग्णांना जलद तत्पर सेवा देण्याचे काम रूग्णवाहिकांनी करावे. या मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी‌. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, बीव्हीजी इंडिया कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.राहूल जैन, जिल्हा समन्वयक आतिष सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर '१०८' रूग्णवाहिकेच्या रूग्णसेवेची आकडेवारी सादर करण्यात आली.

 

रूग्णांना मिळाली संजीवनी

            जळगाव जिल्ह्यात 2014 पासून ते नोव्हेंबर 2023 पर्यंत अपघातग्रस्त 20 हजार 778 रूग्ण तसेच हाणामारीचे 4 हजार 476 रुग्णांना तर, 1 हजार 56 जळीत रूग्णांना, त्याच प्रमाणे छातीत दुखण्याचे 1 हजार 622 रुग्ण, उंचावरून पडणे 4 हजार 550 रुग्ण, विषबाधा झालेले 12 हजार 860 रुग्णांना, इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या 329 रुग्णांना, 795 मोठ्या अपघातातील रुग्णांना सेवा दिली आहे. 1 लाख 47 हजार 56 रूग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यात आली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 334 रूग्णांना सेवा मिळाली आहे. पॉली ट्रॉमातील 5 हजार 411 रूग्णांना मदत देण्यात आली.

रूग्णसेवेचा संख्येत वाढत होत आहे. 2023 या वर्षात मागील तीन महिन्यापैकी सप्टेंबर महिन्यात 2 हजार 134 रूग्ण, ऑक्टोंबर मध्ये 2 हजार 888 रूग्ण नोव्हेंबर मध्ये 3 हजार 657 रूग्णांना आपत्कालीन सेवेचा लाभ देण्यात आला.

वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन रुग्णाला तात्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था एनएचएम महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने '१०८' रुग्णवाहिका सुरू केली असून आपातकालीन वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी '१०८' रुग्णवाहिकेचा मोठा आधार मिळत आहे. असे डॉ. राहुल जैन यांनी सांगितले.

 

रुग्णवाहिका कशी उपलब्ध होते ?

 

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत  - १०८ रुग्णवाहिकासेवा ही तातडीच्या उपचारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १०८ या मोफत मदत क्रमांकावर (टोल फ्री क्रमांकावर) संपर्क साधून ही रुग्णवाहिका मागवणे शक्य आहे. १०८ च्या सुसज्ज आणि अद्ययावत नियंत्रणकक्षाद्वारे नजीकच्या रुग्णवाहिकेला रुग्णापर्यंत पोहोचण्यास मदत केली जाते. त्यामुळे कमीत कमी वेळात प्राथमिक, तसेच अनेकदा अगदी तातडीचे उपचारही १०८ मध्ये उपलब्ध झाल्याने रुग्णांचा जीव वाचतो.

००००००००००००