Tuesday, 16 September 2025

जिल्ह्यात अतिवृष्टी भागात मदतीसाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्र्यांचे जनतेला दक्षता घेण्याचे आवाहन

           जळगाव, दिनांक १६ सप्टेंबर,२०२५ (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये १५ सप्टेंबर २०२५  आणि १६ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले असून बाधित नागरिकांसाठी शाळांमध्ये निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना घाबरून न जाता दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे ३५ अधिकारी व जवान यांचे पथक मागवले असून एक पथक जामनेर येथे एक पथक पाचोरा येथे रवाना करण्यात आलेले आहे.

            पालकमंत्री श्री पाटील म्हणाले की, प्रशासन तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. प्रत्येक बाधित कुटुंबापर्यंत मदतीचा हात पोहोचवला जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नदी-नाल्याजवळ जाणे टाळावे तसेच गुरेढोरे, शेतीसाहित्य सुरक्षित स्थळी हलवावे. प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवा आणि संयम बाळगा.

            जामनेर येथील नेरी, जामनेर, वाकडी, शेंदुर्णी आणि तोंडापूर या गावाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मौजे नेरी बु. येथे २१ ते ४० घरांमध्ये पाणी शिरले असून पशुधनाचे नुकसान झाले आहे. नेरी दिगर येथे १५ ते २० घरांमध्ये व ५ दुकानांमध्ये पाणी साचले असून एक कुटुंब शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. माळपिंप्री येथे पिकांचे मोठे नुकसान झाले असून सुनसगाव खुर्द व सुनसगाव बु. या गावांचा संपर्क तुटला आहे.

            पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव व बरखेडी या दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. शिंदाड, गहुले, वडगाव कडे, सातगाव डोंगरी, वाडी, शेवाळे व वाणेगाव या ६ ते ७ गावांमध्ये नदी-नाल्यांना पूर आला आहे. साधारणतः ३५० ते ४०० कुटुंबांना सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. मौजे शिंदाड येथे तब्बल ४०० जनावरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

            मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा व जोधनखेडा गावात घरांमध्ये पाणी शिरले असून पूरपरिस्थिती आहे. काकोडा गावातील किरण मधुकर सावळे वय 28 हे दुर्दैवाने पुराच्या पाण्यात वाहून गेले. संबंधीत तालुक्यांचे प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल व कृषी खात्याचे अधिकारी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करत आहेत. बाधित कुटुंबांसाठी तातडीने अन्न, पिण्याचे पाणी व बिछायतची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने सांगितले की, आपत्तीग्रस्तांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी शांतता व संयम बाळगून प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांसह, जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००००००००००००

Monday, 15 September 2025

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांसाठी मत्स्यव्यवसायाची नवी संधी

             जळगाव, दि. १५ सप्टेंबर, २०२५ (जिमाका वृत्तसेवा) –  आदिवासी क्षेत्रातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा  योजनेअंतर्गत एक महत्वाकांक्षी सहयोजना हाती घेतली आहे. धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DAJGUA) या नावाने सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्य शासनाने ४ सप्टेंबर २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेचा उद्देश आदिवासी समाजाच्या पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व रोजगार क्षेत्रातील असमतोल कमी करून मत्स्यव्यवसाय व अॅक्वाकल्चरद्वारे आर्थिक प्रगती घडवून आणणे हा आहे.

             या  योजनेअंतर्गत साधारणत: १०,००० समुदायातील १,००,००० वैयक्तीक लाभार्थीना अंतर्भूत करण्याबाबतचा केंद्र सरकारचा मानस आहे. या योजना आकांक्षित तालुक्यातील आदिवासी गावातील अनुसूचीत जमातीचे लाभार्थी, आदिवासी जमात लोकसंख्या प्रभावित परंतु अविकसित क्षेत्र व आदिवासी बाहुल्य गावांकरीता असून योजनेमध्ये अर्थसहाय्याचे प्रमाण अनुदान ९०% व लाभार्थी हिस्सा १०% असे राहणार आहे. (यामध्ये ६०% केंद्र हिस्सा व ४०% राज्य हिस्सा या प्रमाणात राहणार आहे)

             केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार व उपलब्ध संसाधनांनुसार गोडया पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना, मत्स्यसंवर्धन तलाव बांधकाम व निविष्ठा अनुदान, नविन मत्स्यसंगोपन तलाव बांधकाम करणे, इन्सुलेटेड वाहन, मोटर सायकल सह आईस बॉक्स, तीनचाकी सह आईस बॉक्स, फिश किऑस्क शितगृह/बर्फ कारखाना, मत्स्यखाद्य कारखाना, पिंजरा मत्स्यसंवर्धन, पारंपारिक मच्छीमारांना नौका (बदली) व जाळे पुरवठा करणे इत्यादी योजनांचा या योजनेमध्ये समावेश असून योजना राबविण्याकरीता जळगाव जिल्ह्यातील १२ आकांक्षित तालुक्यातील ११२ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.

             या योजनेचा लाभ घेण्याकरीता सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, जळगाव, यांनी आवाहन केले असून याकरीता जिल्हा मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                         0000000000

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत बायोचार निर्मितीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. १५ ((जिमाका वृत्तसेवा)-  राष्ट्रीय अन्न्‍ सुरक्षा आणि पोषण अभियान वाणिज्यिक पिके अंतर्गत कापुस विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत बायोचार निर्मीती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश  शेतातील पिकांच्या पऱ्हाटयांचा वापर करुन जमिनीत कार्बनचे प्रमाण वाढवणे व शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे हा आहे.  

            या घटकांतर्गत वैयक्तिक लाभार्थी नोंदणीराष्ट्रीय शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रातील सहाकारी संस्था अर्ज करण्यास पात्र आहेत. गटाने प्राधिकृत सदस्यामार्फत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. लाभार्थी निवड प्रक्रिया प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार असून, पात्र शेतकऱ्यांना प्रतियुनिट रु. १०.००० रुपये किंवा एकूण खर्चाच्या ५० टक्के पैकी जे कमी असेल त्या प्रमाणे अनुदान मिळणार आहे.

            शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना महाडीबीटी पोर्टलवरील फलेक्झी घटक या टॅबमध्ये बायोचार सदर निवडून अर्ज करावा.

            कृषी विभागामार्फत अधिकाधिक शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या घटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्य कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

                       

000000000


 

Friday, 12 September 2025

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्य व पर्यटन विषयक सर्वेक्षणास प्रारंभ

             जळगाव, दि. १२ (जिमाका) : भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत राष्ट्रीय नमुना पाहणी ८० वी फेरी अंतर्गत आरोग्य व पर्यटन विषयक सर्वेक्षण राबविले जात आहे. राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत या पाहणीत सहभाग घेण्यात येत असून, जळगाव जिल्ह्यात देखील हे सर्वेक्षण होणार आहे.

             या पाहणीअंतर्गत राज्यातील नमुना तत्वावर निवड करण्यात आलेल्या कुटुंबांकडून मागील ३६५ दिवसांत झालेल्या आरोग्यविषयक व देशांतर्गत पर्यटन खर्चासंबंधी सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे. या सर्वेक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शासकीय व खाजगी रुग्णालये व दवाखान्यांतून मिळालेल्या उपचारांवरील खर्च, लसीकरण, गर्भवती महिलांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा याबाबत माहिती गोळा करणे होय.

             सदर सर्वेक्षणासाठी अशा कुटुंबांची निवड करण्यात येणार आहे ज्यांच्याकडे एक वर्ष किंवा त्याहून कमी वयाचे मूल आहे, अथवा ज्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती मागील ३६५ दिवसांमध्ये रुग्णालयात दाखल झाली आहे. संकलित माहितीच्या आधारे राज्यातील लोकसंख्येसंदर्भातील विविध अंदाज बांधले जातील, जे शासनाच्या आरोग्य धोरण आखणी व अंमलबजावणीस उपयुक्त ठरणार आहेत.

             सर्वेक्षणाच्या प्रक्रियेत नियुक्त अधिकारी/कर्मचारी घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करतील. या सर्वेक्षणाची वस्तुनिष्ठता आणि गुणवत्तेच्या दृष्टीने नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे,  आरोग्य विषयक खर्चाची योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व नागरीकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक श्री. मनोहर चौधरी यांनी केले आहे.

००००००००००००

Thursday, 11 September 2025

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनांकरीता ऑनलाईन नोंदणी साठी मुदतवाढ

         जळगाव, दि. 11 (जिमाका) - राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये १२ वी नंतरच्या व्यवसायिक अभ्यासक्रमान प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास (बिगर व्यवसायीक अभ्यासक्रम वगळून) प्रवेशीत असलेल्या व या योजनाचा लाभ घेण्यासाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना योजनांकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  १८ सप्टेंबर, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

            या योजनेचे अर्ज https://hmas.mahait.org या सकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यात यावे, असे आवाहन सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण योगेश पाटील यानी केले आहे.

000000000

 

Wednesday, 10 September 2025

जागतिक कौशल्या स्पर्धा २०२६ मध्ये सहभागी होण्याची सुवर्णंसंधी .

         जळगाव दि. १० (जिमाका) – जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा  सन २०२६ मध्ये शांघाई येथे आयोजित करण्यात येणार आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत २३ वर्षांखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

            या पार्श्वभूमीवर जिल्हा व राज्यस्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, विविध औद्योगिक आस्थापना आणि सेक्टर स्किल काउन्सिल यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतून निवड झालेले उमेदवार विभागस्तर, त्यानंतर राज्यस्तर, देशपातळी आणि अखेरीस जागतिक नामांकनाकरिता शिफारस केले जाणार आहेत.

स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा मुख्य निकष ठरविण्यात आला आहे.

            या  स्पर्धेसाठी इच्छुक उमेदवारांनी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

            या स्पर्धेसाठी सर्व  प्रशिक्षण केंद्रांनी आपल्या विद्यार्थ्यांना व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करून यांचा सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव चे सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

            अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९० वर किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकार द्वारे  कळविण्यात आले आहे.

00000000000

झोमॅटो, अमेझोन व इतर प्लॅटफॉर्म डिलीव्हरी बॉय वर्कर्स यांना नांव नोंदविण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 10 (जिमाका) - केंद्र शासनाने नुकताच गिग वर्कर्स कामगारांसाठी ई-श्रम अंतर्गत नोंदणीकरणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यात जे कोणत्याही कंपनीचे कायम कर्मचारी नसून, ते स्वतंत्रपणे काम करतात, जे पारंपारिक नियोक्ता - कर्मचारी या संबंधाबाहेर काम करतात. तसेच ते अल्पकालीन वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात. जसे की, पार्सल डिलीव्हरी करणे, रिक्षा -कॅब चालविणे, झोमॅटो, स्विगी, ओला, उबर, झेप्टो, अर्बन कंपनी आणि इतर ऑनलाईन कामे करणाऱ्या तसेच सेल्यमन, हेल्पर, ऑटो चालक, ड्रायवार, पेपर विक्रेते, ऑनलाईन मार्केटिंग, ग्राफिक डिझाईनिंग इत्यादि सर्व असंघटित कामगारांसाठी ई-श्रम अंतर्गत नोंदणीकरणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यास अनुसरुन ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम वर नोंदणी करुन शासनाच्या विविध योजनांचे जास्तीत जास्त लाभ मिळवून घेण्यासाठी नोंदणी करणे अतिशय गरजेचे आहे. तरी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करुन ओळखपत्र मिळविण्याची संधी या वर्षी पुन्हा तिसऱ्या वेळेस दिलेली आहे. ओळखपत्र मिळाल्यानंतर दुर्दैवाने अपघातासह अन्य कारणास्तव दिव्यांगत्व आल्यानंतर सदर असंघटित कामगारांना कामगार विभागाच्यावतीने १ लाख मदत मिळण्यास मदत होणार आहे.

अशी करा नोंदणी :-

            eshram.gov.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर ऑन ई-श्रमवर क्लिक करा, आधारकार्डाशी लिंक असलेला मोबाईलवर नंबर आणि कॅप्या कोड टाका. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरांच्या माध्यामातून नोंदणी करा. ओटीपी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आवश्यक असलेल्या माहितीचा अर्ज भरा आणि सबमिट करा. जर असंघटित कामगार ऑनलाईन नोंदणी करु शकत नसेल तर त्यांनी जवळच्या महाई-सेवा केंद्रावरुन अर्ज भरु शकतात.

काय फायदा मिळणार ?

            ई-श्रम कार्ड असलेल्या असंघटित कामगारांना ६० वर्षे पुर्ण झाल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन, २ लाखांचा मृत्यू विमा आणि १ लाखांची आंशिक अपंगत्वापोटी आधिक मदत मिळणार आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीची सुविधा उपलब्ध असुन वयाच्या साठीनंतर पेन्शनही मिळणार, हेल्पलाईन नंबर  ई-श्रम कार्ड हेल्पलाईन टोल फ्री नंबर (सोमवार ते रविवार)- १४४३४ ई-श्रम ईमेल आयडी eshramcare-mole@gov.in  या प्रमाणे आहे. असे सहाय्यक कामगार आयुक्त  डॉ. रा.दे. गुल्हाने  यांनी प्रसिध्द पत्रकान्वये कळविले आहे. 

000000000000