Tuesday, 16 September 2025

जिल्ह्यात अतिवृष्टी भागात मदतीसाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्र्यांचे जनतेला दक्षता घेण्याचे आवाहन

           जळगाव, दिनांक १६ सप्टेंबर,२०२५ (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये १५ सप्टेंबर २०२५  आणि १६ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले असून बाधित नागरिकांसाठी शाळांमध्ये निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना घाबरून न जाता दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे ३५ अधिकारी व जवान यांचे पथक मागवले असून एक पथक जामनेर येथे एक पथक पाचोरा येथे रवाना करण्यात आलेले आहे.

            पालकमंत्री श्री पाटील म्हणाले की, प्रशासन तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. प्रत्येक बाधित कुटुंबापर्यंत मदतीचा हात पोहोचवला जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नदी-नाल्याजवळ जाणे टाळावे तसेच गुरेढोरे, शेतीसाहित्य सुरक्षित स्थळी हलवावे. प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवा आणि संयम बाळगा.

            जामनेर येथील नेरी, जामनेर, वाकडी, शेंदुर्णी आणि तोंडापूर या गावाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मौजे नेरी बु. येथे २१ ते ४० घरांमध्ये पाणी शिरले असून पशुधनाचे नुकसान झाले आहे. नेरी दिगर येथे १५ ते २० घरांमध्ये व ५ दुकानांमध्ये पाणी साचले असून एक कुटुंब शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. माळपिंप्री येथे पिकांचे मोठे नुकसान झाले असून सुनसगाव खुर्द व सुनसगाव बु. या गावांचा संपर्क तुटला आहे.

            पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव व बरखेडी या दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. शिंदाड, गहुले, वडगाव कडे, सातगाव डोंगरी, वाडी, शेवाळे व वाणेगाव या ६ ते ७ गावांमध्ये नदी-नाल्यांना पूर आला आहे. साधारणतः ३५० ते ४०० कुटुंबांना सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. मौजे शिंदाड येथे तब्बल ४०० जनावरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

            मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा व जोधनखेडा गावात घरांमध्ये पाणी शिरले असून पूरपरिस्थिती आहे. काकोडा गावातील किरण मधुकर सावळे वय 28 हे दुर्दैवाने पुराच्या पाण्यात वाहून गेले. संबंधीत तालुक्यांचे प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल व कृषी खात्याचे अधिकारी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करत आहेत. बाधित कुटुंबांसाठी तातडीने अन्न, पिण्याचे पाणी व बिछायतची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने सांगितले की, आपत्तीग्रस्तांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी शांतता व संयम बाळगून प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांसह, जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००००००००००००

Monday, 15 September 2025

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांसाठी मत्स्यव्यवसायाची नवी संधी

             जळगाव, दि. १५ सप्टेंबर, २०२५ (जिमाका वृत्तसेवा) –  आदिवासी क्षेत्रातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा  योजनेअंतर्गत एक महत्वाकांक्षी सहयोजना हाती घेतली आहे. धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DAJGUA) या नावाने सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्य शासनाने ४ सप्टेंबर २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेचा उद्देश आदिवासी समाजाच्या पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व रोजगार क्षेत्रातील असमतोल कमी करून मत्स्यव्यवसाय व अॅक्वाकल्चरद्वारे आर्थिक प्रगती घडवून आणणे हा आहे.

             या  योजनेअंतर्गत साधारणत: १०,००० समुदायातील १,००,००० वैयक्तीक लाभार्थीना अंतर्भूत करण्याबाबतचा केंद्र सरकारचा मानस आहे. या योजना आकांक्षित तालुक्यातील आदिवासी गावातील अनुसूचीत जमातीचे लाभार्थी, आदिवासी जमात लोकसंख्या प्रभावित परंतु अविकसित क्षेत्र व आदिवासी बाहुल्य गावांकरीता असून योजनेमध्ये अर्थसहाय्याचे प्रमाण अनुदान ९०% व लाभार्थी हिस्सा १०% असे राहणार आहे. (यामध्ये ६०% केंद्र हिस्सा व ४०% राज्य हिस्सा या प्रमाणात राहणार आहे)

             केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार व उपलब्ध संसाधनांनुसार गोडया पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना, मत्स्यसंवर्धन तलाव बांधकाम व निविष्ठा अनुदान, नविन मत्स्यसंगोपन तलाव बांधकाम करणे, इन्सुलेटेड वाहन, मोटर सायकल सह आईस बॉक्स, तीनचाकी सह आईस बॉक्स, फिश किऑस्क शितगृह/बर्फ कारखाना, मत्स्यखाद्य कारखाना, पिंजरा मत्स्यसंवर्धन, पारंपारिक मच्छीमारांना नौका (बदली) व जाळे पुरवठा करणे इत्यादी योजनांचा या योजनेमध्ये समावेश असून योजना राबविण्याकरीता जळगाव जिल्ह्यातील १२ आकांक्षित तालुक्यातील ११२ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.

             या योजनेचा लाभ घेण्याकरीता सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, जळगाव, यांनी आवाहन केले असून याकरीता जिल्हा मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                         0000000000

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत बायोचार निर्मितीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. १५ ((जिमाका वृत्तसेवा)-  राष्ट्रीय अन्न्‍ सुरक्षा आणि पोषण अभियान वाणिज्यिक पिके अंतर्गत कापुस विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत बायोचार निर्मीती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश  शेतातील पिकांच्या पऱ्हाटयांचा वापर करुन जमिनीत कार्बनचे प्रमाण वाढवणे व शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे हा आहे.  

            या घटकांतर्गत वैयक्तिक लाभार्थी नोंदणीराष्ट्रीय शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रातील सहाकारी संस्था अर्ज करण्यास पात्र आहेत. गटाने प्राधिकृत सदस्यामार्फत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. लाभार्थी निवड प्रक्रिया प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार असून, पात्र शेतकऱ्यांना प्रतियुनिट रु. १०.००० रुपये किंवा एकूण खर्चाच्या ५० टक्के पैकी जे कमी असेल त्या प्रमाणे अनुदान मिळणार आहे.

            शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना महाडीबीटी पोर्टलवरील फलेक्झी घटक या टॅबमध्ये बायोचार सदर निवडून अर्ज करावा.

            कृषी विभागामार्फत अधिकाधिक शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या घटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्य कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

                       

000000000


 

Friday, 12 September 2025

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्य व पर्यटन विषयक सर्वेक्षणास प्रारंभ

             जळगाव, दि. १२ (जिमाका) : भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत राष्ट्रीय नमुना पाहणी ८० वी फेरी अंतर्गत आरोग्य व पर्यटन विषयक सर्वेक्षण राबविले जात आहे. राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत या पाहणीत सहभाग घेण्यात येत असून, जळगाव जिल्ह्यात देखील हे सर्वेक्षण होणार आहे.

             या पाहणीअंतर्गत राज्यातील नमुना तत्वावर निवड करण्यात आलेल्या कुटुंबांकडून मागील ३६५ दिवसांत झालेल्या आरोग्यविषयक व देशांतर्गत पर्यटन खर्चासंबंधी सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे. या सर्वेक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शासकीय व खाजगी रुग्णालये व दवाखान्यांतून मिळालेल्या उपचारांवरील खर्च, लसीकरण, गर्भवती महिलांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा याबाबत माहिती गोळा करणे होय.

             सदर सर्वेक्षणासाठी अशा कुटुंबांची निवड करण्यात येणार आहे ज्यांच्याकडे एक वर्ष किंवा त्याहून कमी वयाचे मूल आहे, अथवा ज्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती मागील ३६५ दिवसांमध्ये रुग्णालयात दाखल झाली आहे. संकलित माहितीच्या आधारे राज्यातील लोकसंख्येसंदर्भातील विविध अंदाज बांधले जातील, जे शासनाच्या आरोग्य धोरण आखणी व अंमलबजावणीस उपयुक्त ठरणार आहेत.

             सर्वेक्षणाच्या प्रक्रियेत नियुक्त अधिकारी/कर्मचारी घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करतील. या सर्वेक्षणाची वस्तुनिष्ठता आणि गुणवत्तेच्या दृष्टीने नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे,  आरोग्य विषयक खर्चाची योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व नागरीकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक श्री. मनोहर चौधरी यांनी केले आहे.

००००००००००००

Thursday, 11 September 2025

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनांकरीता ऑनलाईन नोंदणी साठी मुदतवाढ

         जळगाव, दि. 11 (जिमाका) - राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये १२ वी नंतरच्या व्यवसायिक अभ्यासक्रमान प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास (बिगर व्यवसायीक अभ्यासक्रम वगळून) प्रवेशीत असलेल्या व या योजनाचा लाभ घेण्यासाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना योजनांकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  १८ सप्टेंबर, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

            या योजनेचे अर्ज https://hmas.mahait.org या सकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यात यावे, असे आवाहन सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण योगेश पाटील यानी केले आहे.

000000000

 

Wednesday, 10 September 2025

जागतिक कौशल्या स्पर्धा २०२६ मध्ये सहभागी होण्याची सुवर्णंसंधी .

         जळगाव दि. १० (जिमाका) – जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा  सन २०२६ मध्ये शांघाई येथे आयोजित करण्यात येणार आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत २३ वर्षांखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

            या पार्श्वभूमीवर जिल्हा व राज्यस्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, विविध औद्योगिक आस्थापना आणि सेक्टर स्किल काउन्सिल यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतून निवड झालेले उमेदवार विभागस्तर, त्यानंतर राज्यस्तर, देशपातळी आणि अखेरीस जागतिक नामांकनाकरिता शिफारस केले जाणार आहेत.

स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा मुख्य निकष ठरविण्यात आला आहे.

            या  स्पर्धेसाठी इच्छुक उमेदवारांनी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

            या स्पर्धेसाठी सर्व  प्रशिक्षण केंद्रांनी आपल्या विद्यार्थ्यांना व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करून यांचा सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव चे सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

            अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९० वर किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकार द्वारे  कळविण्यात आले आहे.

00000000000

झोमॅटो, अमेझोन व इतर प्लॅटफॉर्म डिलीव्हरी बॉय वर्कर्स यांना नांव नोंदविण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 10 (जिमाका) - केंद्र शासनाने नुकताच गिग वर्कर्स कामगारांसाठी ई-श्रम अंतर्गत नोंदणीकरणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यात जे कोणत्याही कंपनीचे कायम कर्मचारी नसून, ते स्वतंत्रपणे काम करतात, जे पारंपारिक नियोक्ता - कर्मचारी या संबंधाबाहेर काम करतात. तसेच ते अल्पकालीन वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात. जसे की, पार्सल डिलीव्हरी करणे, रिक्षा -कॅब चालविणे, झोमॅटो, स्विगी, ओला, उबर, झेप्टो, अर्बन कंपनी आणि इतर ऑनलाईन कामे करणाऱ्या तसेच सेल्यमन, हेल्पर, ऑटो चालक, ड्रायवार, पेपर विक्रेते, ऑनलाईन मार्केटिंग, ग्राफिक डिझाईनिंग इत्यादि सर्व असंघटित कामगारांसाठी ई-श्रम अंतर्गत नोंदणीकरणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यास अनुसरुन ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम वर नोंदणी करुन शासनाच्या विविध योजनांचे जास्तीत जास्त लाभ मिळवून घेण्यासाठी नोंदणी करणे अतिशय गरजेचे आहे. तरी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करुन ओळखपत्र मिळविण्याची संधी या वर्षी पुन्हा तिसऱ्या वेळेस दिलेली आहे. ओळखपत्र मिळाल्यानंतर दुर्दैवाने अपघातासह अन्य कारणास्तव दिव्यांगत्व आल्यानंतर सदर असंघटित कामगारांना कामगार विभागाच्यावतीने १ लाख मदत मिळण्यास मदत होणार आहे.

अशी करा नोंदणी :-

            eshram.gov.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर ऑन ई-श्रमवर क्लिक करा, आधारकार्डाशी लिंक असलेला मोबाईलवर नंबर आणि कॅप्या कोड टाका. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरांच्या माध्यामातून नोंदणी करा. ओटीपी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आवश्यक असलेल्या माहितीचा अर्ज भरा आणि सबमिट करा. जर असंघटित कामगार ऑनलाईन नोंदणी करु शकत नसेल तर त्यांनी जवळच्या महाई-सेवा केंद्रावरुन अर्ज भरु शकतात.

काय फायदा मिळणार ?

            ई-श्रम कार्ड असलेल्या असंघटित कामगारांना ६० वर्षे पुर्ण झाल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन, २ लाखांचा मृत्यू विमा आणि १ लाखांची आंशिक अपंगत्वापोटी आधिक मदत मिळणार आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीची सुविधा उपलब्ध असुन वयाच्या साठीनंतर पेन्शनही मिळणार, हेल्पलाईन नंबर  ई-श्रम कार्ड हेल्पलाईन टोल फ्री नंबर (सोमवार ते रविवार)- १४४३४ ई-श्रम ईमेल आयडी eshramcare-mole@gov.in  या प्रमाणे आहे. असे सहाय्यक कामगार आयुक्त  डॉ. रा.दे. गुल्हाने  यांनी प्रसिध्द पत्रकान्वये कळविले आहे. 

000000000000


 

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

 जळगाव, दि. 10 (जिमाका) - वर्षानुवर्षे विविध कारणांनी प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक अडचण, वेळेचा अपव्यय या सर्व बाबी टाळण्यासाठी व आप-आपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटवून घेण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात 13 सप्टेंबर, 2025 या एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

            जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यात 13 सप्टेंबर, 2025 रोजी  एकाच वेळी एकाच दिवशी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदातीचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव येथील राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात करण्यात आले असून लोकअदालत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.क्यु.एस. एम. शेख हे राहणार आहेत. लोकअदालतीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा वकील संघ, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे आयुक्त आदि मान्यवरांचे सहाकार्य लाभणार आहे.

            राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन ट्रॉफीक चलान, भुसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले व खटले दाखलपुर्व प्रकरणे तसेच ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते असे संपूर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यात येतील. त्याचप्रमाणे राष्ट्रीयकृत बँका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दुरध्वनी कार्यालय यांनी थकीत रकमेमध्ये सुट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहेत. आद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंचाकडील तडजोडयोग्य प्रकरणेदेखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतींमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत.

            तरी ज्या पक्षकारांना वेळ, पैसा यांचा अपव्यय टाळायचा आहे अशा सर्व पक्षकारांनी आपली प्रकरणे सामोपचार व तडजोडीने निकाली काढण्यासाठी पक्षकार व विधीज्ञ यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून नागरिक हितार्थ आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन सचिव, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी  प्रसिध्दीस दिलेल्या  पत्रकान्वये केले आहे. 

०००००००००००००

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ३० सप्टेंबर पर्यंत शिष्यवृत्ती अर्ज करण्याचे आवाहन

               जळगाव दि. 10 (जिमाका वृत्तसेवा):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्याथ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारतसरकार मंट्रोकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी परिक्षा फी (फ्रीशीप) व इतर योजना राबवण्यात येतात. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता महाडीबीटी प्रणालीवर अर्जाची नोंदणी प्रक्रीया सुरु झालेली आहे तरी या प्रवर्गातील अधिक विद्याथ्यांनी अर्जाची नोंदणी करावी  तसेच सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलबित असलेल्या अर्जाची त्रुटीपूर्तता करून पात्र अर्ज दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मंजूरी करिता सहायक आयुक्त समाज कल्याण जळगांव कार्यालयास ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

            केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (अनुसुचित जाती प्रवर्ग) योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा केंद्र हिस्सा ६० टक्के केंद्र शासनाकडून पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यावर जमा करण्यात येतो. राज्य शासनाकडून शिष्यवृत्तीचा ४० टक्के हिस्सा महाडीबीटी प्रणालीद्वारे संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांना प्रदान करण्यात येतो.

            अनुसूचित जाती प्रवगांतील विद्याथ्यांकरिता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीच्या केंद्र हिश्शाची अदायगी करण्यात आलेल्या बाबतचा तपशिल महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध नसून दुसन्या हप्त्याची अदायगीचों सद्यस्थिती स्वतंत्ररित्या अर्जनिहाय केंद्र शासनाच्या PFMS प्रणालीवरून https://pfms.nic.in/Home.aspx लिंकद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित महाविद्यालयांना उपलब्ध करून घेता येणार आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र हिस्सा ६० टक्के थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यामध्ये वितरीत होत आहे. तथापि केंद्र शासनाची अदायगी प्रलंवित असल्याबाबत विद्यार्थी, पालक, महाविद्यालय व स्थानिक संघटना यांचेकडून मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार/निवेदन तक्रारी प्राप्त होत आहेत. सदर बाब ही केंद्र शासनाशी निगडीत असल्याने, तक्रारदारांनी त्यांची तक्रार थेट पीजी पोर्टलवर (Centralised Public Grievance)(https://pgportal.gov.in/Home/Lodge Grievance) नोंदणी करावे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे बैंक खाते थेट आधारः संलग्नीकृत करण्याकरिता अथवा विद्यार्थ्यांच्या आधार संबंधित अडचणीचे निराकरण करण्याकरिता https://base.npcl.org.in/catalog/homescreen या प्रणालीचा वापर करावा, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

०००००००००००

Tuesday, 9 September 2025

सेवा निवृत्त मयत व्यक्तीच्या वारसांना भुसावळ तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन

             जळगाव दि. 09 (जिमाका वृत्तसेवा):-  तहसिल कार्यालय, भुसावळ येथे कार्यरत असलेले व नियत वयोमाना नुसार  28 फेब्रुवारी, 2025 रोजी सेवानिवृत्त झालेले ज्ञानेश्व्यर राजधर पाटील, सहायक महसूल अधिकारी, तहसील कार्यालय भुसावळ व्दारा - दिनेश मधुकर भामरे, केले नगर भाग 1, प्लॉट नं. 44 एस आर पी कॉलनी, देवपूर धुळे यांचे  26 जुलै, 2025 रोजी निधन झाले आहे.या बाबत समाज माध्यमांव्दारे या कार्यालयास माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या कायदेशीर वारसांना सदरची नोटीस प्रसिध्द  झालेपासून एक महिन्याच्या आत पुढे नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालय, भुसावळ येथे कार्यालयीन दिवशी व वेळी उपस्थित राहावे.

            कार्यालयात येतांना,सोबत अर्जदाराचा (कायदेशिर वारस ) पासपोर्ट आकाराचा फोटो, मयत कर्मचाऱ्याच्या मृत्यूचा दाखल्याची मूळ व छायांकित प्रत, अर्जदाराचा (कायदेशीर वारस) ओळखपत्र आणि पत्याचा पुरावा, वारस प्रमाणपत्र किंवा कुटूंबातील सदस्यांची यादी ( कुटुंब प्रमाणपत्र) व वारसांचे संमतीपत्र, मयत कर्मचाऱ्याचे सेवा मूळ सेवा पुस्तक, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत ( ज्यात खाते क्रमांक आणि IFSC  कोड स्पष्ट दिसेल),अशी कागद पत्र आणावीत, असे भुसावळ तहसीलदार निता लबडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००००००००

फत्तेपूर पोस्ट ऑफिससाठी इमारत भाडेतत्वावर पाहिजे

             जळगाव, दि. 09 (जिमाका) – भारतीय डाक विभागामार्फत फत्तेपूर (पिन–४२४२०८) पोस्ट ऑफिससाठी सुमारे ५०० चौ.फुटांची इमारत भाडेतत्वावर घेण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ही इमारत RCC बांधकामाची असावी तसेच त्यात वीज, पाणी, स्वतंत्र शौचालय, कर्मचाऱ्यांच्या दोनचाकी-चारचाकी वाहनांसह अभ्यागतांसाठीही पार्किंगची सोय असणे बंधनकारक आहे.

            इमारत फत्तेपूर गावाच्या हद्दीत, शक्यतो मध्यवर्ती भागात असावी. विजेच्या बिलाव्यतिरिक्त ग्रामपंचायत कर व पाणी कर भरण्याची जबाबदारी मालकाची असेल.

            इच्छुक मालक, संस्था किंवा कंपन्यांनी जागेचा कच्चा व मंजूर आराखडा, बांधकाम परवाना, बांधकामाचा प्रकार व वर्ष, मालकी/नोंदणी पुरावा, कर पावती व अपेक्षित भाड्याचा तपशील प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. हे प्रस्ताव सीलबंद लिफाफ्यातून अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग, भुसावळ–४२५२०१ या पत्त्यावर पाठवावेत.

            प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ दुपारी ४.०० वाजेपर्यंत असून प्राप्त प्रस्तावांचे मुल्यांकन इमारतीची योग्यता व अपेक्षित भाडे यावर आधारित केले जाईल. प्रस्ताव मंजूर झाल्यास संबंधित मालकाला किमान ५ वर्षांचा करार भारतीय डाक विभागाशी करावा लागेल. तसेच कोणताही किंवा सर्व प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग यांच्याकडे राहील.

०००००००००००

महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठविण्याचे आवाहन

               जळगाव दि. 09 (जिमाका वृत्तसेवा):- विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण  हे 23 सप्टेंबर, 2025 ते 9 डिसेंबर, 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सचिन धस, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिली आहे.

             नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याकडील लिपीक वर्गीय कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे. या प्रशिक्षणासाठी इच्छुकांना प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचारी यांना प्रशिक्षण सक्तीचे केले आहे. प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. ज्यांना पूर्णवेळ कर्मचारी पाठविणे शक्य नाही त्यांना विशिष्ट मोडयुल्सना प्रवेश घेण्याची अनुमती देण्यात येणार आहे. असेही सचिन धस, सहसचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००००००००

Monday, 1 September 2025

शेतकऱ्यांनी वेळेत ई-पिक पाहणी पूर्ण करावी – पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांचे आवाहन

         जळगाव दि. १ (जि मा का वृत्त)-   हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात कडधान्य व तेलबियांची खरेदी करण्यात येणार आहे. नाफेड व NCCF च्या वतीने ही खरेदी प्रक्रिया राज्यातील पणन महासंघामार्फत पार पाडली जाणार असून, यात मुंग, उडिद, सोयाबीन व तुर या पिकांचा समावेश आहे.

            आधारभूत दराने विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणीसह ७/१२ उतारा आवश्यक राहणार आहे. संपूर्ण खरेदी प्रक्रिया ही पारदर्शक, कार्यक्षम आणि पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असल्याचे मंत्री तथा पणन महासंघाचे संचालक नामदार संजय सावकारे ,  उपाध्यक्ष रोहित निकम आणि संचालक संजय पवार यांनी सांगितले आहे .

            केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या कालावधीत आपल्या पिकांची ई-पिक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी केले आहे

.०००००००००००

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ७३ अर्ज प्राप्त

 



















       जळगाव, दि. १ सप्टेंबर, २०२५ (जिमाका वृत्तसेवा) –  जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज  अल्पबचत भवन,  येथे अपर जिल्हाधिकारी विजय कुमार ढगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आजच्या लोकशाही दिनात एकूण 73 अर्ज प्राप्त झाले.

            या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी  जयश्री माळी, तहसीलदार डॉ.उमा ढेकळे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी,

            लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी विविध प्रश्नांसंदर्भात अर्ज सादर केले असून, त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना  या वेळी निर्देश देण्यात आले. प्राप्त अर्जांचा विभागवार आढावा घेऊन अर्जांवर  कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.

                                          000000000

परिवहन कार्यालयातर्फे दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू

             जळगाव दि. १ (जि मा का वृत्त)-   प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांची नविन नोंदणी एमएच-११/ईएस ०००१ ते ९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये कळविले आहे.

            ज्या वाहन धारकांना आपल्या नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी परिवहन कार्यालयात २ व ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज जमा करावेत. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी (DD उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे) तसेच वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाचे आहे. त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी सलग्न मोबाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे.

             आकर्षक क्रमांकाचे पावती प्राप्त झाल्यावर  पावती ही वितरकाकडे वाहन नोंदणी करणेकामी देणे बंधनकारक आहे. या पावतीची विधीग्राह्यता ही फक्त १८० दिवस राहील अधिक माहितीसाठी, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव. येथे संपर्क साधावा.

00000000000

Friday, 29 August 2025

भटके विमुक्त समाज सन्मानार्थ सन्मान दिवस म्हणून 31 ऑगस्ट रोजी आयोजन

             जळगाव, दि. २९ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) सन 1871 साली ब्रिटिश सरकारने Criminal Tribes Act अंतर्गत काही जातींना गुन्हेगार जाती म्हणून घोषित केले. यामुळे या  जातीमधील समाजबांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अत्याचार सहन करावा लागला. स्वातंत्र्यानंतरही हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने भटक्या व विमुक्त समाजाला न्यायासाठी विलंब झाला, पर्यायाने याचे दिर्घकालीन सामाजिक परिणाम या समाजावर झाले.  स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी Criminal Tribes Act हा कायदा रद्द करण्यात आला आणि या जातींना  विमुक्त जाती   ( म्हणजे मुक्त झालेल्या) म्हणून घोषित करण्यात आले.

            भटके विमुक्त समाज महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत आहेत. भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्रउभारणातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट दिवस भटके विमुक्त दिवस  साजरा करण्यात येणार आहे.

            दिनांक ३१ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता के. सी.ई. इंजिनिअरिंग कॉलेज,  नॅशनल हायवे 6 आय एम आर कॉलेज जवळ जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमांस नागरीकांना उपस्थित राहावे,  असे आवाहन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण जळगांव  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000000

Thursday, 28 August 2025

ओबीसी महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणात थकित व्याजावर ५० टक्के सवलत

         जळगाव, दि. २८ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) –"ओबीसी महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणांत संपूर्ण कर्ज रक्कमेच्या एकरकमी भरण करणा-या लाभार्थिस थकित व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (ots) रावाविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार  लाभार्थीनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्ज मुक्त व्हावे"

            महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. मुल यांचे जिल्हा कार्यालय जळगांव यांचे मार्फत विविध कर्ज योजनेतर्गत जळगाव जिल्हयातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थीना कर्ज परतफेडीसाठी विहित मुदत देण्यात येते.  विहित मुदत संपूर्ण गेली असताना थकित कर्ज वसुलीसाठी सर्व वैधानिक प्रयत्न महामंडळाकडुन करण्यात येत आहेत.

            याकरीता, महामंडळाच्या थकित लाभार्थीसाठी संपुण थकित कर्ज रक्मेच्या एकरकमी भरणा करणा-या लाभार्थीस थकित व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याची सुधारीत एकरकमी परतावा (ots) योजना नव्याने राबविण्यात येत आहे. या योजनेत (एक रककमी परतावा - ots) लाभ घेऊन सर्व संबधित लाभार्थीनी थकित मुददल व्याज रक्कम एकरकमी भरणा करून कर्ज खाते बंद करुन कर्ज मुक्त व्हावे व भविष्यात होणारी संभावित कायदेशिर कार्यवाही टाळावी, असे आवाहन मा. जिल्ह व्यवस्थापक, जळगांव यांनी केले आहे.

            अधिक माहिती साठी कार्यालयाचा पत्ता :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ कॉलनी, पहिला मजला, महाबळ रोड, सैनिक हॉल च्या पाठीमागे, जि. जळगांव फोन नं. ०२५७-२२६१९१८

00000000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

             जळगाव, दि. २८ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर ई-प्रशासन मंडळ, पुणे मार्फत नामांक ने सादर करण्यासाठी अर्ज (परीशीष्टे-१) उपलब्ध बाबत (सन २०२५-२६) (जाहीर सूचना)

पाणी वापर संस्थांना आवाहन

            महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा सन सन २०२५/२६ करीता अभियाना बाबत ई-प्रशासन मंडळ, पुणे मार्फत नामांकने सादर करण्यासाठी ऑनलाइन नामांकन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी सर्व कार्यान्वित पाणी वापर संस्था यांनी या पुरस्कार स्पर्धेत सक्रीय सहभाग घ्यावा.

            सदर स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येणार असुन या स्पर्धेसाठी अ) मोठे / मध्यम प्रकल्प आणि ब) लघु प्रकल्प / कोल्हापूर पध्दतीचे बंधारे / साठवण तलाव / कालवा / नदीवरील वैयक्तीक अथवा सहकारी उपसा अशा दोन गटांमध्ये राज्यस्तरीय स्तरावर प्रथम व व्दितीय असे ४ पुरस्कार, तसेच प्रत्यके महामंडळाची भौगोलिक परीस्थती व सिंचन व्यवस्था वेगळी असल्याने पाच महामंडळ स्तरावर वरील दोन गटांमध्ये प्रथम व व्दितीय याप्रमाणे २० पुरस्कार असे एकत्रित २४ पुरस्कार प्रदान करण्यात येतील, यावरील कार्यान्वित असलेल्या पाणी वापर संस्थाकडुन नामांकने मागविण्यात येत आहेत. या स्पर्धेसाठी इच्छुक पाणी वापर संस्थानी सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित कार्यकारी अभियंता यांचेकडे दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ च्या आत नामांकने (प्रस्ताव) दाखल करावीत.

            सदर योजनेअंतर्गत सुधारणा करून राज्यस्तरीय दोन्ही गटामध्ये प्रथम व व्दितीय, प्रथम क्र.-रू ५ लक्ष व प्रशस्ती पत्र व व्दितीय क्र. रू ३ लक्ष व प्रशस्ती पत्र असे एकुण चार पुरस्कार एकुण रक्कम-१६ लक्ष महामंडळ स्तरावर दोन्ही गटामध्ये महामंडळ स्तरावर पुरस्कार प्रत्येकी प्रथम क्र.रू-२ लक्ष व प्रशस्ती पत्र व व्दितीय क्र. रू १ लक्ष व प्रशस्ती पत्र तसेच सिंचन व्यवस्थापन व पाणी वापर संस्था सक्षमीकरणाचे उत्कृष्ट काम करणारे उपअभियंता व त्यांच्या खालिल दर्जाचे अधिकारी व सिंचन कर्मचारी यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील, पुरस्कार वितरण समारंभ दर वर्षी सिंचन दिनी २६ फेब्रुवारी रोजी वितरीत करण्यात येतील स्पर्धा ५ वर्षा साठी राहील.

            तसेच सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त पाणी वापर संस्था यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन              मा. कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव अध्यक्ष (खान्देश प्रदेश) यांनी केले आहे. सदर नामांकनासाठीचे (प्रस्तावासाठीचे) विहीत नमुन्यातील प्रपत्र सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित कार्यकारी अभियंता/उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. असे कार्यकारी अभियंता                 (अ.गि. कुलकर्णी) जळगांव पाटबंधारे विभाग, जळगांव तथा सदस्य सचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा खान्देश प्रदेश स्तरीय समिती  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000000000

इस्राईल देशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी

                 जळगाव, दि. २८ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) – इस्राईल देशामध्ये होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स (Home Based Health Care Giver Workers) या पदासाठी ५००० नोंकरीची संधी उपलब्ध झालेली असून, या पदासाठी पात्रतेचे निकष व जाहिरातीचा तपशील https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामध्ये साधारणतः किमान १० उत्तीर्ण, इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या वय वर्षे २५ ते ४५ वयोगटाचे उमेदवार या रोजगाराच्या संधीसाठी पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजी वाहु (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील सक्षम नियामक प्राधिकरणा द्वारे मान्यता प्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पुर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय सक्षम नियामक प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पुर्ण असणे उपलब्ध, तसेच GDA/ANM/GNM/BSC Nursing/Post BSc Nursing अशाप्रकारची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. अधिक माहिती तसेच नमुद पदासाठी अर्ज करणेसाठी वरिल संकेतस्थळास भेट देणे आवश्यक आहे.

            तरी या संधीचा लाभ जळगाव जिल्हयातील अधिका- अधिक उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२५७ - २९५९७९० यावर किंवा कार्यालयाचा पत्ता -  शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. असे आवाहन  सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव.यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000000

जिल्हाधिकारी कार्यालयात १ सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

             जळगाव, दि. २८ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे.

            या दिवशी विविध विषयांवरील तक्रारींबाबत तक्रारदार प्रत्यक्ष अर्जासह उपस्थित राहणार असून, संबंधित विभागप्रमुखांची उपस्थिती अनिवार्य आहे.

            नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्या घेऊन लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

                                                          000000000000

Tuesday, 26 August 2025

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२४-२५

             जळगाव, दि. 26 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा):-  पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२४-२५ अंतर्गत जळगाव जिल्हयात ७२,५६९ शेतक-यांनी या योजनेत भाग घेवुन ७६,२४२.८५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले असुन शेतकरी हिस्सा पोटी रुपये ६४.५५ कोटी रक्कम भारतीय कृषि विमा कंपनीकडे वर्ग करण्यात आलेले आहे.

         सदर योजनेत कमी तापमान व जादा तापमान या घटकातंर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार शेतक-यांना विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई अदा करण्यात येते. सदर नुकसान भरपाई ठरविण्यासाठी स्कायमेट कंपनीकडून प्राप्त अहवाल व निकषांव्दारे शेतक-यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत अदा करण्यात येत असते. सदर नुकसान भरपाई अदा करण्यासाठी जळगाव जिल्हयासाठी नियुक्त केलेल्या भारतीय कृषि विमा कंपनीला स्कायमेट कंपनीकडून हवामान घटकांची माहे नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ मधील कमी तापमानाची आकडेवारी, माहे एप्रिल, मे २०२५ मधील जादा तापमानाची आकडेवारी ची माहिती अधिकृत/प्रमाणित आकडेवारी अद्यापपावेतो केंद्र शासनाच्या पोर्टलवर प्राप्त झालेली नाही.

                शेतक-यांना नुकसान भरपाई देय होण्यासाठी स्कायमेट कंपनीकडून हवमान धोके घटकांतर्गत नुकसानी संदर्भात प्राप्त होणारी प्रमाणित केलेली माहिती व आकडेवारी ग्राहय धरली जात असल्याचे कृषि विभागाकडुन प्रसिध्द करण्यात येत आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

000000000000

केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृध्दापकाळ, विधवा, दिव्यांग लाभार्थ्यांचे (DLC) हयाती बाबतचे प्रमाणपत्र सत्यापन ॲपस व्दारे जनरेट करणे बाबत

        जळगाव, दि. 26 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा):-  विशेष सहाय्य योजने अंतर्गत केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृध्दापकाळ, विधवा, दिव्यांग लाभार्थ्यांचे (DLC) हयाती बाबतचे प्रमाणपत्र सत्यापन ॲपस व्दारे ऑनलाईन जनरेट करणे कामी भुसावळ शहर येथील लाभार्थी यांनी तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत आधार कार्ड, बॅकेचे पासबुक, मोबाईल घेऊन कार्यालयामध्ये इत्यादी कागदपत्रे सादर करावे, असे  नायब तहसीलदार, संजय गांधी योजना शहर  भुसावळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले  केले आहे.

०००००००००००

Monday, 25 August 2025

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य श्री. अहमद देशमुख व श्री. वसीम शेख यांचा जळगाव जिल्हा दौरा

             जळगाव दि. २५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) –महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य श्री. अहमद देशमुख आणि श्री. वसीम शेख हे मंगळवार, दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी जामनेर, जि. जळगाव येथे दौऱ्यावर येत आहेत.

            सकाळी १०.०० वाजता छत्रपती संभाजीनगर येथून खासगी वाहनाने ते जामनेरकडे प्रयाण करतील. दुपारी १२.०० वाजता जामनेर येथे पोहोचून तेथील घटनेतील मयताच्या कुटुंबीयांची भेट घेतील. त्यानंतर दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेऊन मौजे जामनेर येथे झालेल्या घटनेसंदर्भात चर्चा करतील.

दुपारी २.०० वाजता जळगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करणार आहेत.

                                                          00000000000

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याचे आवाहन

             जळगाव, दि. २५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा): - महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास साधावा, जनतेला दर्जेदार ग्रंथालयीन सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तसेच भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

            राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून अ, ब, क आणि ड वर्गात अनुक्रमे एक लाख, पंच्याहत्तर हजार, पन्नास हजार आणि पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय, राज्यस्तरावर एका उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि एका उत्कृष्ट ग्रंथालय सेवकाला प्रत्येकी पन्नास हजार रुपये, तर प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एका कार्यकर्ता आणि एका सेवकाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट प्रदान करण्यात येईल.

            सन २०२४-२५ या वर्षासाठी या पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक ग्रंथालये, ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवकांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतीत आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

            या पुरस्कारामुळे राज्यातील वाचन संस्कृतीचा प्रसार होत असून ग्रंथालयीन सेवांच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ होत असल्याचे गाडेकर यांनी नमूद केले आहे.

00000000000

शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद, जळगावकडून ‘स्लरी फिल्टर युनिट योजना’

             जळगाव, दि. २५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा):- जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्यासाठी जिल्हा परिषद, जळगावच्या कृषी विभागामार्फत एक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि सुलभ पद्धतीने सेंद्रिय शेती करता यावी, यासाठी ‘स्लरी फिल्टर युनिट योजना’ हाती घेण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शेतकऱ्यांना या युनिटच्या खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

            स्लरी फिल्टर युनिट हे उपकरण सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. हे उपकरण मुख्यत्वे ड्रिप किंवा स्प्रिंकलर सिंचन प्रणालीशी जोडले जाते. या यंत्राद्वारे शेण, गोमूत्र आणि इतर सेंद्रिय घटकांचा वापर करून तयार करण्यात आलेले जीवामृत फिल्टर केले जाते आणि पिकांपर्यंत समान प्रमाणात पोहोचवले जाते. या प्रक्रियेमुळे केवळ पिकांची उत्पादनक्षमता वाढत नाही तर जमिनीची सुपीकताही सुधारते. तसेच, रासायनिक खतांवरील खर्चातही लक्षणीय घट होते. पशुधनातून निर्माण होणारी स्लरी योग्य पद्धतीने गाळून या यंत्राद्वारे उच्च प्रतीचे सेंद्रिय द्रवरूप खत तयार करता येते, ज्यामुळे पिकांच्या गुणवत्तेतही सुधारणा होते.

            कृषी विकास अधिकारी श्री. पद्मनाभ म्हस्के यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत स्लरी फिल्टर युनिटच्या क्षमतेनुसार शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. ५०० लिटर क्षमतेच्या युनिटसाठी ₹१०,७५०, ५०१ ते ११०० लिटर क्षमतेसाठी ₹१४,००० तर १३०० ते १५०० लिटर क्षमतेच्या युनिटसाठी ₹१८,००० इतके अनुदान मिळणार आहे.

            या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्याची मुदत २५ ऑगस्ट २०२५ ते ५ सप्टेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पंचायत समिती स्तरावरील कृषी विभागाकडे अर्ज दाखल करावा, असे आवाहन कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे. अर्ज करताना शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, ८अ उतारा, जनावरे असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षकांचे प्रमाणपत्र, अग्रीस्टॅंक नोंदणी पत्र, बँक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, जात प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. 

            सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होत असून जमिनीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मोठी मदत मिळते. त्यामुळे जिल्हा परिषदेने सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद, जळगावच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

0000000000000

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा

        जळगाव, दि. 25 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा):महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांचा आज, सोमवार दिनांक  25 ऑगस्ट, 2025  रोजी जळगाव जिल्हा दौरा होत आहे.

            सोमवार दिनांक 25 ऑगस्ट, 2025  रोजी सकाळी 10.00 वाजता  पाळधी येथून शासकीय वाहनाने वरगव्हाण ता. चोपडा कडे प्रयाण, सकाळी 10.45 वाजता वरगव्हाण येथे शाम मास्तर यांचेकडे सात्वंनपर भेट, सकाळी 11.00 वाजता धरणगाव येथे नियोजित कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11.45 वाजता पाळधी ता. धरणगाव कडे प्रयाण व राखीव, दुपारी 1.00 वाजता पाळधी ता. धरणगाव येथुन जळगाव विमानतळाकडे प्रयाण, दुपारी 2.15 वाजता जळगाव येथुन आय.सी. 5606 या प्लाय 91 विमानाने पुणे कडे प्रयाण,

000000000000

Thursday, 21 August 2025

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने उपाय योजना बाबत बैठक

             मुंबई, दि. २१: अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या मालावर टॅरीफ लावून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिकेने निर्माण केलेल्या आव्हानांना न घाबरता आपली पावले टाकत आहे. आपल्या मालासाठी पर्यायी बाजारपेठ शोधून अमेरिकेने लादलेल्या टॅरीफ आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

            या आपत्तीला संधी मानून राज्याच्या ' इज ऑफ डूईंग बिझनेस' मध्ये १०० बदल करण्यात यावेत. ' इज ऑफ डूइंग बिजनेस' धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र ' वॉर रूम' ची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.

            मुख्यमंत्री म्हणाले, ' इज ऑफ डूईंग बिझनेस' साठी निर्माण करण्यात येणाऱ्या वॉर रूमचा दर महिन्याला आढावाही घेण्यात येईल. राज्यामध्ये खाजगी औद्योगिक पार्कसाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक वसाहतींच्या बाहेर असे औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी स्पष्ट धोरण आणावे. यामध्ये लघु आणि मध्यम उद्योगांचा प्राधान्याने अंतर्भाव असावा.  त्यातून उद्योजकांना उद्योगासाठी लागणारे परवाने तातडीने मिळतील, अशी व्यवस्था असावी.   यामुळे राज्यात निश्चितच उद्योगांच्या माध्यमातून समृद्धी येऊन रोजगार निर्मितीमध्ये वाढ होईल.

नवीन उद्योगांबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांच्या विकासासाठी शासन निश्चितच सकारात्मक आहे. उद्योगांच्या परवानग्यांसाठी असलेल्या सिंगल विंडो पोर्टलला अधिक सक्षम करण्यात यावे. जेणेकरून परवानग्यांना वेळ लागणार नाही.  राज्यात पाच हेक्टर क्षेत्रावरील कृषी प्रक्रिया किंवा कृषीवर आधारित उद्योगांसाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता असू नये, यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी. ' इज ऑफ डूइंग बिजनेस'साठी वेळोवेळी कायद्यात सुधारणा करण्यात येतात. या सुधारणांबाबत खालील यंत्रणांना अवगत करावे. उद्योग येण्यासाठी व सद्यस्थितीत असलेल्या उद्योगांना विकसित होण्यासाठी प्रत्यक्षात बदल होतील, असेच ' रिफॉर्म' करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

शहराजवळ स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना विविध परवानगी घ्याव्या लागतात. परवानग्या मिळण्याचा कालावधी कमीत कमी करून सदर परवानग्या सुलभरीत्या मिळतील याची व्यवस्था करावी. उद्योगासाठी लागणाऱ्या जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया वेगाने करण्यात यावी. पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या उद्योगांचे प्रदूषणाबाबतच्या दंडाची फेर आकारणी करून कुठेही अतिरिक्त दंड आकारला जात नाही, याची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यावेळी म्हणाले.

            बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमार, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंग परदेशी, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्य सल्लागार (निवृत्त) अपूर्व चंद्रा, मा. मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी गुप्ता, राज्य कर, वस्तू आणि सेवा कर आयुक्त आशिष शर्मा, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव अंशू सिन्हा, कामगार विभागाच्या प्रधान सचिव  आय. ए. कुंदन, उद्योग विभागाचे सचिव डॉ . पी. अनबलगन, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज,  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरसु, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, आयआयटी मुंबईचे अध्यक्ष डॉ. शरद कुमार सराफ आदी उपस्थित होते.

' इज ऑफ डूइंग बिजनेस' साठी राज्याने केलेल्या सुधारणा

            उद्योगांना उद्योग सुरू करण्यासाठी अग्निशमन परवाना बारमाही कालावधीसाठी देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य, उद्योगाच्या सुसूत्रीकरणासाठी मैत्री कायदा 2023 पारित, उद्योगांच्या वीज जोडणी साठी मैत्री सिंगल विंडो सिस्टीम कार्यान्वित, केवळ दोन कागदपत्रे नवीन वीज जोडणीसाठी आवश्यक, उद्योगांना बांधकामासाठी बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित, एमआयडीसीकडून भूखंड मिळवण्यासाठी मिलाप (इंडस्ट्रियल लँड अप्लिकेशन अँड अलॉटमेंट पोर्टल) पोर्टल कार्यान्वित.

या करण्यात येणार सुधारणा

            उद्योग स्थापण्यास भूखंडांची तातडीने व्यवस्था करण्यासाठी लँड बँकेची निर्मिती, भूखंड वितरण प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान करणार, पर्यावरणीय परवानगी 60 दिवसांमध्ये देण्याची व्यवस्था करणार, जिल्हास्तरावर गुंतवणूक वाढविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करून सक्षम करणार, निर्यात वाढविण्यासाठी ' डेडिकेटेड एक्सपोर्ट पोर्टल' तयार करणार, समूह विकासातून उद्योगांच्या निर्माण सठी एक तालुका एक समूह विकास उपक्रम राबविणार.

0000000000000