Thursday, 28 September 2023

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांनी माहिती अधिकाराची माहिती स्वत:हून जाहीर करावी - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना

         जळगाव, दि.२८ सप्टेंबर (जिमाका) - कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने माहिती अधिकार अधिनियम २००५ ची माहिती स्वत:हून जाहीर करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना दिल्या आहेत.

नागरिकांना शासकीय कामकाजाची माहिती सहज व सुलभ पध्दतीने मिळावी. यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ लागू करण्यात आलेला आहे. अधिनियमातील कलम ४ अन्वये नागरिकांना माहितीचा अधिकार मिळणे सोईचे होईल अशा रितीने आणि स्वरुपात सर्व अभिलेख योग्य रितीने सूचिबध्द करील असे निर्देश देण्यात आलेले आहेत. नागरिकांना माहिती सुलभतेने मिळण्यासाठी माहिती स्वयंप्रेरणेने प्रकट करणे आवश्यक आहे.

यासाठी जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक प्राधिकरणांनी (शासकीय कार्यालयांनी) खालील सूचनांचे पालन करावे.

            माहिती अधिकार अधिनियमान्वये स्वयंप्रेरणेने प्रकट करावी अशी माहिती नियमितपणे संकेतस्थळावर प्रसिध्द करावी व ती अद्ययावत करावी.

            एका सार्वजनिक प्राधिकरणाकडे एकाच विषयाबाबत वारंवार माहिती अधिकार अधिनियमान्वये माहिती मिळणेचे अर्ज प्राप्त होत असल्यास अशी माहिती स्वयंप्रेरणेने संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत यावी. (उदा. शाळेचे जनरल रजिष्टर)

            सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेल्या प्रशासकीय विषयांचा सविस्तरपणे अभ्यास करुन स्वयंप्रेरणेने प्रकट करावयाच्या अतिरिक्त माहितीची यादी तयार करणेत यावी, ती नियमितपणे स्वयंप्रेरणेने प्रकट करणेत यावी. त्याबाबत विभागप्रमुख/कार्यालयप्रमुख यांनी त्यांचे स्तरावरुन आदेश निर्गमित करावेत.

            माहिती अधिकार अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी त्या त्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे विभागप्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित असलेल्या समितीने स्वयंप्रेरणेने प्रकट करावयाच्या माहितीचा नियमित आढावा घेऊन माहिती अधिकार अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करणेत याव्यात.

            माहिती अधिकार अधिनियम कलम 4 (1) (ख) नुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने प्रसिध्द करावयाच्या विहीत केलेल्या 17 बाबी प्रसिध्द करणेत याव्यात तसेच वेळोवेळी अद्ययावत करण्याची कार्यवाही करणेत यावी. या बाबीची अंमलबजावणी केल्यानंतर बहुतांश माहिती जनतेसाठी उपलब्ध होईल.

            अधिकाधिक माहिती नागरिकांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सामान्य प्रशासन विभागाचे 26 नोव्हेंबर, 2018 च्या शासन परित्रकानुसार सर्व शासकीय कार्यालयांत प्रत्येक सोमवारी दुपारी ३  ते ५ या वेळेत माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत विहीत प्रक्रियेनुसार, त्यांच्या मागणीनुसार अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करुन द्यावेत.

            माहिती अधिकार अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याचे दृष्टीने परिपत्रकात नमूद कार्यवाही ही तालुका, मंडळ, गाव पातळीवरील विविध शासकीय कार्यालयात होईल, याकडे विभागप्रमुख/कार्यालयप्रमुख यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे.

            माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती मागविणाऱ्या अर्जदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांची नोंदवही सामान्य प्रशासन विभागाचे ७ सप्टेंबर २०१६ च्या शासन परित्रकानुसार सर्व शासकीय कार्यालयांत ठेवण्यात यावी व सर्व अर्जांच्या विहीत पध्दतीने नोंदी घेण्याची कार्यवाही करणेत यावी.

            या परिपत्रकाची अंमलबजावणी करतांना माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ ची पूर्णत: अंमलबजावणी होईल, कायद्यातील, नियमांतील कुठल्याही तरतुदींचे उल्लंघन होणार नाही, याकडे जन माहिती अधिकारी यांनी विशेष लक्ष देण्याचे विभागप्रमुख/कार्यालयप्रमुख यांनी निर्देश द्यावे.

            या संपूर्ण प्रक्रियेचे समन्वयन करण्यासाठी संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यांनी पुढील समन्वय अधिकारी म्हणून कामकाज करावे.  सर्व विभाग प्रमुख यांचेशी समन्वयाचे कामकाज जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेद्वारे करण्यात येईल.

प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि खुलेपणा निर्माण करणे व शासनयंत्रणेमध्ये नागरिकांच्या प्रति उत्तरदायित्व निर्माण करणे हा माहिती अधिकार अधिनियम 2005 चा मूळ उद्देश सफल करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख, जन माहिती अधिकारी यांनी कसोशीने प्रयत्न करावेत.असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

                                                                      000000

तलाठ्यांकडील चकरा टळणार; ई-हक्क प्रणालीद्वारे करा अर्ज दाखल !

      जळगाव, दि.२८ सप्टेंबर (जिमाका) - सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद, मयताचे नाव कमी करणे, बँकेचा कर्जाचा बोजा चढविणे व उतरवणे यांसह इतर महत्त्वाच्या कामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी जमाबंदी आयुक्तालयाने ‘ई-हक्क’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नव्हे तर दाखल अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्या तलाठ्याकडून या पोर्टलवर अर्जदाराच्या लॉगिनमध्ये कळविण्यात येतील आणि त्या त्रुटींची पूर्तताही तेथेच करता येईल.

सध्या फेरफार नोंदीसाठी तलाठ्यांकडे अर्ज दाखल करावा लागतो. परंतु आता तलाठ्याकडे न जाता अर्ज दाखल करण्यासाठी ई- हक्क ही नवीन ऑनलाईन आज्ञावली (PDE Public Data Entry) वापर करता येणार आहे.

असा करा अर्ज

            अर्जदार संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करू शकतो आणि तलाठी अर्ज मंजुरीची प्रक्रिया करू शकतात.

            वारसाची नोंद करण्यासाठी किंवा मयताचे नाव कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागणार नाही.

            संकेतस्थळाला भेट देऊन तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडून फेरफार अर्जाची माहिती भरल्यानंतर हा अर्ज तलाठ्याच्या लॉगिनमध्ये दिसणार.

            संबंधित अर्ज मंजूर करून तलाठी फेरफार नोंद करणार.

एसएमएसद्वारे मिळणार माहिती

एखाद्या अर्जदाराने फेरफारसाठी अर्ज दाखल केला आणि तो स्वीकृत झाला तर त्याचा एसएमएस अर्जदाराला येणार. त्यामध्ये फेरफारचा क्रमांक नमूद असेल. जर अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर त्रुटी पूर्ततेसाठी अर्ज परत केल्याची माहिती एसएमएसद्वारे अर्जदाराने मिळेल. त्यामुळे हे संकेतस्थळ नुसतेच अर्ज दाखल करण्याचे माध्यम नसून यामध्ये अर्जाची प्रगती एसएमएसद्वारे मिळणार. राज्य सरकारने अर्जदारांना अर्ज दाखल करण्यासाठी ई-हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा सातबाऱ्यावरती दुरुस्त्या करायचे आहेत, त्यांनी वापरावी.

नऊ प्रकारचे फेरफार ऑनलाईन – यामध्ये वारसाची नोंद करणे, मयताचे नाव कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे, अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब कर्त्याची नोंद कमी करणे व सातबारा उताऱ्यावरील चुका दुरुस्त करणे या सहा प्रकारच्या नोंदीमध्ये दुरूस्ती सर्वसामान्य नागरिक ऑनलाईन करून शकतो किंवा आपले सरकार व ई-सेवा केंद्राची मदत घेऊ शकतो.

ई-करार नोंदणी करणे, कर्जाचा बोजा चढविणे व कर्जाचा बोजा कमी करणे या तीन प्रकारच्या नोंदीमध्ये बँकांना बदल करता येणार आहे.

नऊ प्रकारच्या फेरफार अर्जांची कार्यवाही जळगाव जिल्ह्यात ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत असून यासाठी अर्जदार किंवा खातेदाराला ई-हक्क प्रणालीतून ऑनलाईन पध्दतीने आपले सरकार किंवा ई-सेवा केंद्रावरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रति अर्ज ५० रूपये फी निश्‍चित करण्यात आली आहे. जास्तीची फी आकारणी झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

00000000

वसतिगृहाबाहेर राहून शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन

             जळगाव, दि. २८ सप्टेंबर (जिमाका) - विभागीय व जिल्हास्तरावर इयत्ता १२ वी नंतर पुढे शिक्षण घेणाऱ्या मात्र वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यासाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी केले आहे.

            सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी नविन ऑनलाईन फॉर्म भरणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी/विद्यार्थीनींनी www.swayam. mahaonline.gov.in या वसतीगृहाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अगोदर ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे. त्यानंतर सदरचा फॉर्म पंडीत दिनदयाल योजनेकडे ऑनलाईन वर्ग होईल. ही योजना तालुकास्तरावरील सर्व मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रक्रियाव्दारे प्रवेश घेवून शिक्षण घेणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.

सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षांपासून योजनेत प्रवेशित आहे अश्या सर्व विद्यार्थीनी देखील सन २०१३-२०१४ या शैक्षणिक वर्षांत देखील (जूने विद्यार्थी म्हणून) Renew Application मध्ये अर्ज भरणे आवश्यक आहे. नविन विद्यार्थ्याना सदर संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरीता प्रथम नोंदणी (registration) करावे. नावनोंदणी प्राप्त युझर आयडी व पासवर्डचा उपयोग करुन ऑनलाईन अर्ज भरावा. योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठी Hostel Addmission हा पर्याय निवडून काळजीपूर्वक ऑनलाईन अर्ज भरावा.

या योजनेसाठी अर्ज करतांना ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे (उदा. मागील शैक्षणिक वर्षात मिळालेले गुणपत्रक / जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र (व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी)/ वडिलांचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/ चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा/ महाविद्यालयाचे कॅप  राऊन्ड सर्टिफिकेट (व्यवसायिक  अभ्यासक्रमासाठी)/ बोनाफाईड/प्रवेश पावती/आधारकार्ड/राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुक झेरॉक्स व इतर आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांनी सोबत बाळगावेत.

योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी), विद्यार्थ्याचे पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे बंधनकारक आहे. सदरचे खाते हे आधार क्रमांकाशी सलंग्न असावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील सदर विद्यार्थ्याचे पालक रहिवासी नसावे. विद्यार्थ्याचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. आदिम जमातीच्या व पारधी व अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना सदर योजनेच  लाभ प्राधान्याने देय राहील. अशी माहिती श्री.पवार यांनी दिली आहे.

0000000

Wednesday, 27 September 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात ३ ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

       जळगाव, दिनांक २७ सप्टेंबर (जिमाका ) :- जिल्हास्तरावर लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. तथापी,ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी २ ऑक्टोबर २०२३ या दिवशी शासकीय सुट्टी असल्यामुळे या महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार ३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

            नागरिकांनी आपल्या वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी आपल्या संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

Tuesday, 26 September 2023

११ विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या याद्या प्रसिद्ध २ ऑक्टोबर पर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत

             जळगाव,दि.२६ सप्टेंबर (जिमाका)- जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघाच्या मतदानः केंद्राचे सुसूत्रीकरण करून तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदान केंद्राच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याद्यांबाबत हरकती व सूचना २ ऑक्टोबर पर्यंत दाखल करता येणार आहेत. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. 

जळगांव जिल्हयातील  चोपडा, रावेर, भुसावळ, जळगांव शहर, जळगांव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगांव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर अशा एकूण ११ विधानसभा मतदारसंघाच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. 

मतदान केंद्राच्या प्रारूप याद्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा, जिल्हयातील सर्व सबंधित विधानसभा मतदार संघाच्या मुख्यालयी तसेच संबंधित विधानसभा मतदार संघाच्या तालुक्याच्या ठिकाणी मतदारांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आलेल्या आहेत. असेही श्री प्रसाद यांनी कळविले आहे.

०००००००००००००

पारोळा नगरपालिकेने आरोग्य, स्वच्छता, रस्ते व पाणीपुरवठाच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा

      




            जळगांव, दि.२६ सप्टेंबर (जिमाका) – पारोळा नगरपालिकेने शहरवासीयांचे आरोग्य, स्वच्छता, रस्ते व पाणीपुरवठा या विषयांवर सर्वोच्च प्राधान्य द्यावे. यासाठी मुख्याधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्ड जाऊन काम करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या. 

पारोळा नगरपालिका सभागृहात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, प्रशासक तथा प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र लांडे, तहसीलदार डॉ.उल्हास देवरे आदी उपस्थ‍ित होते. 

प्रधानमंत्रीआवास योजनेमध्ये नगरपरिषदेमध्ये प्रभागनिहाय बैठका लावण्यात याव्यात‌ असे नमूद करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, अमृत आवास २.० मध्ये झोकून देऊन काम करावे. दिवाळीच्या काळात जास्तीत जास्त वसूली करण्यात यावी.  दिव्यांग व मागासवर्गीय खर्च वाढविण्यात यावा. घनकचरा व्यवस्थापन काय केले. ओला व सुका कचरा विलीनीकरण करण्यात यावे. कचरामुक्त गाव संकल्पना राबविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी वैयक्तीक लक्ष घालावे. ओला-सुका कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. शहरातील स्वच्छतेसाठी लोक सहभाग वाढविण्यात यावा. 

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पारोळा नगरपालिकेने भाग घ्यावा. मुख्य बाजारपेठेत महिलांसाठी शौचालय करावेत. पाऊस थांबल्यावर खड्डे बुजविण्याचे काम करण्यात यावे. नगरपालिका स्वनिधी मधून खड्डे बुजविण्यात यावे. कर वसूली ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

 श्री.प्रसाद म्हणाले, पारोळा नगरपालिकेने देशपातळीवर आपली ओळख निर्माण करावी.  निकृष्ट कामांचे त्रयस्थ पक्षाकडून ऑडिट करून घ्यावे. शहराच्या पाणीपुरवठा लिकेज शोधून काढावा. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या मुख्य लाईनवरील अवैध कनेक्शन तोडण्यात यावे‌. जास्तीत जास्त वेळ फिल्डवर जाऊन काम करा. हद्दवाढीचा प्रस्ताव प्रलंबित त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.  कचराकुंडी बाहेर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

00000000

जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात २३ जणांचा मृत्यु सर्पदंशावर वेळीच घ्या वैद्यकीय उपचार ! अंधश्रध्दा बाळगू नका

         जळगाव, दि.२६ सप्टेंबर (जिमाका) – जिल्ह्यात सर्पदंशामुळे मागील चार महिन्यात 23 जणांचा मृत्यु झाला आहे. तर 13 जण किरकोळ जखमी आहेत. तेव्हा सर्पदंशावर वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे. सर्पदंश झाल्यावर तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते व ती मिळण्यापूर्वी केलेले उपचार म्हणजेच प्रथमोपचार होय. आतापर्यंत बऱ्याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच किती तरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. सर्पदंशावर वैद्यकीय पथकांच्या मदतीने उपचार करावेत. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                             जळगाव जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण संस्था सर्प मानव आणि पर्यावरण या विषयावर शून्य सर्पदंश अभियान राबवित आहे. यातून जनजागृती, सर्पदंश,  प्रथमोपचार, आणि अंधश्रध्दा निर्मुलन यावर कार्य करत आहेत. तर संस्थेचे सर्पमित्र वनविभागाच्या मार्गदर्शनात सर्प रेस्क्युचे काम करत असतात. आतापर्यंत सर्पदंशाच झाल्यावर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. दंश झाल्यावर असे उपचार तात्काळ शक्य होतात असे नाही. अशावेळी डॉक्टरांकडे  जाईपर्यंत प्रथमोचार जीवनावश्यक असतात.  पावसाळा सुरू झाला की शेतकरी शेतीची कामे करायला लागतात, अडगळीत पडलेल्या वस्तू बाहेर काढल्या जातात, जनावरांचे गोठे साफ होतात. जळाऊ सरपण काढले जाते, शेती मशागतीच्या कामांना वेग येतो हाच काळ असा आहे. ज्यात सापांचा वावर वाढतांना दिसून येतो अनेक नागरिक  सापांना मारतात तर काही नागरिक साप वाचवण्यासाठी प्रयत्न करतात अश्यावेळी सापाचा आणि नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सर्पमित्र मोलाची भूमिका बजावतात. 

सर्प घरात येऊ नये, सर्पदंश टाळता यावे म्हणून पंचसूत्री - 

1) परिसर स्वच्छ ठेवा, अडगळ काढून टाका, अनावश्यक झुडुपे वेली काढून टाका किंवा छाटणी करा,  उष्टी खरकटी परिसरात टाकू नका त्या मुळे परिसरात उंदीर येणार नाही .

2) ड्रेनेज पाईप च्या गटाराकडील बाजूला जाळी बसवा जेणेकरून त्या द्वारे साप घरात येणार नाही.

3) खळ्यात ,गोठ्यात, शेतात वावरतांना लांब काठी बाळगा , कडबा ,चाऱ्यात एकदम हात घालू नका गोवऱ्या , लाकडे काढताना सावधानता बाळगा.

4) अंगण, घरातील बिळे दरवाज्यांच्या चौकटीतील फटी व्यवस्थित बुजवून टाका

5) मण्यार सारखे विषारी साप निशाचर आहेत त्यामुळे रात्री जमिनीवर झोपणे टाळा, रात्री बाहेर जातांना , शेतात वावरताना, हातात टॉर्च पायात बूट घालायला विसरू नका.

 सर्पदंश झाल्यास प्रथमोचार 

1) सर्पदंश झाल्यास घाबरून जाऊ नये, सर्वप्रथम वैद्यकीय उपचार लवकरात लवकर कसा मिळेल त्या साठी प्रयत्न करावे. रुग्णास धीर द्यावा त्याला जास्त हालचाल करू देऊ नये

2)जखम स्वच्छ पाण्याने धुवावी सर्पदंश झालेल्या भागाच्या वरच्या बाजूला आवळ पट्टी बांधून दर 5,10 मिनिटांनी ती सैलं करून परत बांधावी.

3) चिरा देऊ नये, सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नये.

4) कोणताही सर्प असो जर त्याचा दंश झाला तर तत्काळ सिव्हील हॉस्पिटल किंवा जवळच्या रुग्णालयात दाखल झाले पाहिजे.

 सर्पदंशाच्या अंधश्रध्दांवर विश्वास ठेवू नये –

 साप कधीही तुम्हाला स्वतःहून पूढे येऊन चावत नाही , साप डूख धरत नाही, सापाला आपल्या सारखी तीक्ष्ण दृष्टी नसते, त्याला हात ,पाय, बाह्यकान देखील नसतात कुणाचा चेहरा लक्षात राहील इतका त्याचा मेंदू तल्लख नाही म्हणून कोणताच साप बदला घेत नाही.

साप चावला म्हणजे मृत्यू नाही प्रत्येक साप विषारी नसतो आणि विषारी सर्पदंश झाला तरी योग्य वेळेत योग्य वैद्यकीय उपचार केले तर रुग्ण 100% वाचतो.

 सर्प मित्रांसाठी सूचना -

 सर्पमित्रांनी साप वाचवल्यावर उपस्थित जनसमुदायास सर्प अंधश्रद्धाबद्दल जागृत करून वैद्यकीय उपचाराचे महत्त्व समजावून त्या बाबत मार्गदर्शन करावे. सोशल मीडियावर प्रसिध्दी साठी सपासोबत स्टंट किंवा फोटो सेशन व्हिडिओ बनवू नये. घरात सर्प संग्रह करू नये. जनजागृती करतांना जीवंत सापांचे प्रदर्शन करू नये . नागरिक स्वतःचा आणि सापाचा जीव वाचवण्यासाठी सर्पमित्रांना कॉल करतात. अशावेळी पेट्रोल चार्ज च्या नावाखाली अवास्तव रक्कम मागू नका. सर्प वाचवणे आपले कर्तव्य आहे. पण रिकामे धाडस करू नये स्वतःचा जीव वाचवणार तरच सर्प वाचवता येतील असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेने केले आहे.


0000000000

Monday, 25 September 2023

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन




       जळगाव, दि. २५ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रमाचा संपन्न झाला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

          यावेळी  तहसीलदार विजय बनसोडे, नायब तहसीलदार झांबरे व आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

                                         00000

Thursday, 21 September 2023

जिल्ह्यातील प्रौढ शिक्षणाला नवी उभारी ! महानगरपालिका शाळेत रात्रशाळा सुरू जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची संकल्पना

             जळगाव, दि. 21 सप्टेंबर (जिमाका) - घरातील प्रतिकूल परिस्थिती, शाळेची भीती असो वा शिक्षणात फारशी आवड नसणे असो...अन्‌ त्यात आड आलेले वय (म्हणजे उलटून गेलेले वय) यामुळे शिक्षणाची विस्कटलेली घडी आता पुन्हा एकदा बसण्याची चिन्हे आहेत. होय, ‘मुंबई स्थित टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या नवभारत साक्षरता अभियानांतर्गत शिवाजीनगर येथील महानगरपालिकेच्या मध्यवर्ती शाळा क्रमांक एक येथे प्रौढ शिक्षणासाठी आता रात्रशाळा प्रकल्प सुरू झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील प्रौढ साक्षरता वर्गाला पुन्हा नवी उभारी मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या रात्रशाळा उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी (दि.२० सप्टेंबर) त्यांच्याच हस्ते करण्यात आले.‌ यावेळी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, महानगरपालिका उपायुक्त अभिजीत बाविस्कर, शिक्षणाधिकारी दीपाली पाटील, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे विद्यार्थी मुकेश मुनेश्वर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, प्रौढ साक्षरतेला चालना देण्यासाठी, विशेषत: स्थलांतरित आणि समाजातील दुर्बल घटकांमध्ये शिक्षणाची गंगा आणण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेच्या औपचारिक क्षेत्रात सामील होण्यासाठी शालेय शिक्षणाची पात्रता ही एक महत्त्वाची आवश्यकता आहे. गरिबीतून बाहेर पडण्यास शिक्षण हे महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षण व्यक्तीला फसवणूकीपासून वाचवते. शिक्षणाचे महत्त्व ओळखून प्रत्येक व्यक्ती साक्षर व्हावी. यासाठी जळगाव जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

मुकेश मुनेश्वर म्हणाले,‌‌ रात्रशाळेचा प्राथमिक उद्दिष्ट १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान करणे आहे. ज्यांच्याकडे साक्षरता कौशल्ये नाहीत, त्यांना इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण देणे हे ध्येय आहे.या उपक्रमात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक ४७ जणांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी ३० जण पहिल्या दिवशी उपस्थित होते. २०२७ पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. उपक्रमात स्वेच्छेने सहभागी होवून शिकविण्याचे काम करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा असल्यास  ९५७९९००२८० या क्रमांकावर संपर्क साधावा.‌ असे आवाहन ही श्री मुकेश यांनी केले.

उपक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींनी त्यांना पुन्हा शिक्षणाचे द्वार उघडले झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शिक्षणाच्या माध्यमातून कुटुंबाला पुढे नेण्यासाठी निश्चितच फायदा होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना प्रौढ शिक्षण वर्गात प्रवेशित व्यक्तींनी मत व्यक्त केले.

०००००००००००००००

Monday, 18 September 2023

१७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सेवा महिना राबविण्यात येणार

             जळगाव, दि. १८ : (जिमाका) - राज्यात १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सेवा महिना राबविण्याबाद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सूचना केल्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            राज्य शासनाच्या विविध क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत नागरिकांना मोठ्या प्रमाणावर माहिती प्राप्त करून देणे, त्यांना विविध योजनांचा योग्य लाभ घेता येण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी. यासाठी सेवा महिना अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे.

            या सेवा महिना कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र,सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), विभागाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात येणार आहे.

            यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे. पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. (अपिल वगळून), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, सखी किट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी सेवांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

            सेवा महिन्यामध्ये सर्व शासकीय विभांगाकडील सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करण्याच्या व अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.

००००००

पूरामुळे बाधीत शेती क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करावेत - ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

             जळगाव,दि. 18 सप्टेंबर (जिमाका) - तापी नदीला आलेल्या पुरामुळे व बॅकवॉटरने बाधीत शेतपिकांची तात्काळ स्थळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हा प्रशासनास केल्या आहेत‌.

संततधार पाऊस आणि वादळामुळे शनिवारी, रावेर तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. मध्यप्रदेशातील पावसामुळे तापी नदीच्या जलपातळीत झालेल्या वाढीमुळे हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आल्याने तसेच तापी नदीचे बॅकवॉटर नदीकाठच्या गावातील शेत पिके व घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या गावातील ६७ कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे काम केले. तलाठी, महसूल सहायक यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानीचा पंचनामा करून अहवाल सादर करावा. ‌लोकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात. असा सूचनाही ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी दिलेल्या आहेत.

                                                  ०००००००००

आयुष्यमान भव: योजनेत जळगाव राज्यात अग्रेसर ठरेल – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विश्वास


आयुष्मान कार्डाचे घरोघरी वाटप करा

'आयुष्यमान भव' मोहिमेचा पालकमंत्र्यांचे हस्ते शुभारंभ


जळगाव, दि.१७ सप्टेंबर (जिमाका) : जळगाव जिल्हा विविध योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीत कायम अग्रेसर राहिला आहे. 'आयुष्यमान भव:' या योजनेत ही जिल्ह्याचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देणारे 'आयुष्यमान कार्ड' चे घरोघरी वितरण करण्याचे काम प्रशासनाने करावे. असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

'आयुष्मान भव:' अभियानांचा जळगाव जिल्ह्याचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशासेविका, नागरिक यांच्यांशी फेसबुक लाईव्हद्वारे थेट संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आदी यावेळी उपस्थित होते. 

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्ह्यात चांगले काम होत आहे. उर्वरित नागरिकांनाही या दोन्ही योजनेची ओळखपत्रे काढून द्या. वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. आपली जबाबदारी मानून गोरगरिबांची सेवा प्रामाणिकपणे करा, असेही त्यांनी सांगितले.

'आयुष्यमान भव: 'एक देशव्यापी अभियान आहे. प्रत्येक गाव आणि शहरात आरोग्य सेवा प्रदान करणे. हा या अभियानाचा उद्देश असून या माध्यमातून स्वच्छता अभियान, आयुष्यमान सभा, अवयव दान मोहीम, रक्तदान शिबिर, अंगणवाडी मधील मुलांची तपासणी यासारखे उपक्रम राबवून जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारचे आरोग्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे. जिल्ह्यातील प्रत्येकाने सहभागी होऊन 'आयुष्यमान भव:' ही मोहीम लोक चळवळ म्हणून उभी करावी. शंभर टक्के ही मोहीम यशस्वी करावी. असा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.‌

राज्यात आजपासून १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम राबवली जाणार आहे. असे नमूद जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, आयुष्यमान कार्डसाठी आपल्या जिल्ह्याचे उद्दिष्ट १४ लक्ष ६८ हजार ६२५ आहे. त्यापैकी चार लक्ष ९१ हजार ६७४ कार्ड वितरित करण्यात आलेले आहेत. उर्वरित कार्डधारकांना या मोहिमे दरम्यान आयुष्यमान कार्ड काढून देण्यासाठी सर्व आशा स्वयंसेविका कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करत  स्वच्छता अभियान, आयुष्यमान मेळावा, रक्तदान मोहीम, अवयवदान मोहीम, आयुष्यमान सभा,  "आयुष्यमान आपल्या दारी " अंगणवाडी, प्राथमिक शाळांमध्ये मुलांची तपासणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून सदर अभियान यशस्वीपणे राबवण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित म्हणाले. 'आयुष्मान भव:' ही केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेमध्ये आयुष्मान आपल्या दारी , आयुष्मान मेळावा, आयुष्यमान सभा, अंगणवाडी व शाळेतील मुलांची तपासणी या योजनाच समावेश आहे. आयुष्मान मेळाव्यात रक्तदान व शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केले जाणार आहेत. आयुष्मान सभा अंतर्गत २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने गाव पातळीवर आयुष्मान सभांचे आयोजन केल्या जाणार असून सर्व आजाराची माहिती देणे तसेच आयुष्मान बाबत जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

००००००००००००००००००००

मराठा समाजातील लक्षीत गटासाठी सारथी मार्फत उच्च कृषी तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन



छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक  प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम, योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत.


त्यानुसार (सारथी ) पुणे मार्फत राज्यातील लक्षित गटातील शेतकऱ्यांना सारथी संस्थेच्या खर्चाने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे, पुणे यांच्यामार्फत हरितगृहातील व्यवस्थापन व अन्य ९ प्रकारची कृषी उच्च तंत्रज्ञानावर आधारित विनामुल्य प्रशिक्षणासाठी राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रवर्गातील शेतकरी, युवक, युवतींकडून उच्च कृषी तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.


असे असेल प्रशिक्षण


फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणा अंतर्गत हरितगृह व्यवस्थापन, शेड नेट हाऊस व्यवस्थापन, रोपाची अभिवृद्धी आणि भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापनाचे ५ दिवसाचे प्रशिक्षण ४० प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल. 

फलोत्पादन व्यवस्थापन प्रशिक्षणात लॅडस्केप व्यवस्थापन, ऊति संवर्धन तंत्रज्ञान, ड्रायफ्लॉवर, प्लँट पार्टस् ५ दिवसाचे प्रशिक्षण ४० प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल. आणि पुष्प रचनाचे ३ दिवसाचे प्रशिक्षण ४० प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल. 

फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण अंतर्गत पीक निहाय प्रशिक्षण कार्यक्रम त्यात फुल पिके, गुलाब, जरबेरा, कार्नेशन, प्रक्षेत्रावरील फुलांची, फिलरची लागवड तसेच पीक निहाय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत भाजीपाला, शिमला मिरची, चेरी टोमॅटो, काकडीचे ५ दिवसाचे प्रशिक्षण ४० प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल. त्याचप्रमाणे काढणी पश्चात प्रशिक्षणातंर्गत फळ पिके व भाजीपाला यांचे काढणीपश्चात व्यवस्थापन व पुरवठा साखळी व्यवस्थापनाचे ३ दिवसाचे प्रशिक्षण ४० प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल.


लाभार्थी निवड अटी व शर्ती


प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. तसेच मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. उमेदवाराचे वय १८ ते ५० दरम्यान असावे. यासाठी लाभार्थ्यांचे मागील ३ वर्षांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असावे. प्रशिक्षण हे मराठी माध्यमात देण्यात येईल. क्षमता बांधणी प्रशिक्षणे ही पूर्णकालीन निवासी असून प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च सारथी, पुणे यांच्यामार्फत करण्यात येईल. सदर क्षमता बांधणी प्रशिक्षण राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था मार्फत तळेगाव (दाभाडे) जि. पुणे येथे देण्यात येईल. प्राप्त अर्जामधून निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करुन क्रमवार निवडक पात्र उमेदवारांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यासाठी येणारा प्रवास खर्च संबंधित प्रशिक्षणार्थीना स्वत करावा लागेल. उर्वरीत पात्र प्रशिक्षणार्थीचा विचार पुढील बॅचसाठी केला जाईल. याबाबतची सूचना सारथीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर उमेदवारास प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही.  प्रशिक्षण हे राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, सर्व्हे क्रमांक ३९८/४०० सीआरपीएफ कॅम्प जवळ, जुना पुणे-मुंबई महामार्ग तळेगाव-दाभाडे, पुणे येथे राहील. 


तरी इच्छुकांनी योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्जासाठी https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर अथवा थेट एनआयपीएचटी च्या https://www.nipht.org   वरील लिंक https://sarthi.nipht.org   द्वारे ३१ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत सादर करावे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर कागदपत्रे हार्ड कॉपी १० दिवसांच्या आत किंवा १० नोव्हेंबर, २०२३ पूर्वी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, पुणे यांचेकडे पाठविण्यात यावे. 


00000

Wednesday, 13 September 2023

१८ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

जळगाव, दि.१३ सप्टेंबर (जिमाका) – जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिली आहे. 

समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो.असे श्रीमती सोनगत यांनी सांगितले.

                                                      ००००००००

आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांची १७ सप्टेंबरला क्षमता चाचणी परीक्षा जिल्ह्यातील ६८१ शिक्षक चोपडा केंद्रावर देणार परीक्षा

 जळगाव, दि.१३ सप्टेंबर (जिमाका) – आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांनाही परीक्षा द्यावी लागणार आहे. इयत्ता १ ली ते १२ वीच्या शिक्षकांची १७ सप्टेंबर रोजी क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. चोपडा येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय या केंद्रावर जिल्ह्यातील ६८१ शिक्षक क्षमता चाचणी देणार आहेत. अशी माहिती यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात येत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. शिक्षकांचे विषयज्ञान वृध्दींगत व्हावे, त्यांना स्व:अध्ययनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळावी, ह्या उद्देशाने क्षमता चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. क्षमता  चाचणी एससीईआरटी/एनसीईआरटी (SCERT / NCERT) च्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. क्षमता चाचणी करिता कला व विज्ञान शाखेचे तीन गट करण्यात आले आहेत. पहिला गट इयत्ता १ ली ते ७ वी, दुसरा गट - ८ वी ते १० वी, तिसरा गट - इयत्ता ११ वी व १२ वी असे आहेत. क्षमता चाचणी १०० गुणांची असणार असून त्यामध्ये एकूण ५० बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. त्यापैकी ७० टक्के प्रश्न हे विषयावर आधारित असतील व ३० टक्के प्रश्न हे सामान्य ज्ञान, मानसिक क्षमता व चालू घडामोडी यावर आधारित असतील.

यावल प्रकल्प कार्यालयातर्गंत येणाऱ्या १७ शासकीय व ३२ अनुदानित आश्रमशाळा मध्ये कार्यरत ६८१ शिक्षक क्षमता चाचणी परिक्षेसाठी बसणार आहेत. क्षमता चाचणी परिक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचा इतर शिक्षकांसाठी अवलंब करण्यात येणार आहे,  शिक्षकांना अद्ययावत विषय ज्ञानाबाबत प्रशिक्षणाची आवश्यकता आहे किंवा कसे हे या माध्यमातून ठरवण्यात येणार आहे. यावल प्रकल्पातील सर्व शिक्षकांनी कोणतीही भीती न बाळगता क्षमता चाचणी परीक्षा मोठ्या संख्येने द्यावी. असे आवाहन श्री पवार यांनी केले आहे.

00000

लम्पीच्या पार्श्वभूमीवर बैल पोळा गोठ्यातच साजरा करा पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

 जळगाव, दि.१३ सप्टेंबर (जिमाका)- जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गाय व बैल या जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज या साथ रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या साजरा केला जाणारा बैल पोळा सण पशुपालकांनी सार्वजनिकरित्या मिरवणूक काढून साजरा न करता बैलांची गोठ्यातच पूजा करून साजरा करावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्यामकांत पाटील यांनी केले आहे.

पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पीवर उपचार व प्रतिबंधात्मक उपाय व्यापक प्रमाणावर राबविण्यात येत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात लम्पीमुळे बैल मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जवळपास ६० टक्के असल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बैलपोळा पशुपालकाच्या जिव्हाळयाचा सण आहे. मात्र आपल्या बैलाचे लम्पी स्कीन या संसर्ग आजारापासून संरक्षण व्हावे, आजाराची लक्षणे होवू नये यासाठी पशुपालकांनी पोळा हा सण सार्वजनिकरित्या मिरवणूक काढून साजरा न करता बैलांची पुजा गोठयातच करून साजरा करावा.

जनावरांमध्ये लम्पी सदृश लक्षणे दिसून आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. लम्पी स्किन आजार जरी संसर्गजन्य असला तरी रोगाचे लवकर निदान झाल्यास व योग्य उपचार त्वरीत सुरू केल्यास आजार ८ ते १० दिवसात बरा होतो. सद्यस्थितीत जळगाव जिल्हयात उपचाराअंती आजार बरा होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाता शासकीय यंत्रणे मार्फत उपचार करून घ्यावे. त्यासोबतच जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सहकार्याने गोठा स्वच्छता व गोचिड निर्मूलन करून घ्यावे.असे आवाहन ही श्री पाटील यांनी केले आहे.

                                                        0000000

कृषी विभागाच्या योजनांचा लाभार्थ्यांना मिळाला लाभ ! कृषी सहसंचालक लाथार्थ्याच्या भेटीसाठी थेट शेतशिवारात शासन आपल्या दारी उपक्रमात कृषी विभागाची कामगिरी

         जळगांव,दि.१३ सप्टेंबर (जिमाका) – पाचोरा येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात कृषी विभागाच्या वतीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध लाभार्थ्याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आला. यानिमित्ताने कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन लाभार्थी शेतकऱ्यांशी शेतशिवारात जाऊन थेट संवाद साधला.

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारे अनुदानावर पुरवठार करण्यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत महाडिबीटी प्रणालीव्दारे अनुदान दिले जाते. शासन आपल्या दारी कार्यक्रमात भडगांव व पाचोरा तालुक्यातील लाभार्थ्यांना कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारे यांचे वाटप करण्यात आले.  यामध्ये भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील चेतन रवींद्र ठाकरे यांना रूपये ८ लाख अनुदानाचे स्वयंचलित कम्बाईंड हॉर्वेस्टर यंत्राची चावी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली.

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजनेत  पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील रमेश वाघ या लाभार्थ्यास दुध उत्पादक सुगरण डेअरीसाठी १० लाख रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले. यावेळी ग्रामविकास व पचायतराज, पर्यटन मंत्री गिरिष महाजन, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, पाचोरा उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव आदी उपस्थित होते.

कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे लाभार्थी सुनील संतोष पाटील यांच्या दोन हेक्टर क्षेत्रावरील मोसंबी लागवड व एक हेक्टर कापूर क्षेत्रावरील ठिंबक सिंचनाची प्रत्यक्ष शेतावर जावून पाहणी केली.  नवल संतोष पाटील यांच्या दीड हेक्टरवरील पेरू लागवड क्षेत्राची पाहणी केली. नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेतंर्गत कैलास विश्वनाथ पाटील यांचे ट्रक्टर, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत नांगर-रोटाव्हेटरची पाहणी करून  गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतील कुटुंबीयांची भेट घेतली मोजें-नांद्रा येथील गिरणाई प्लास्टिक कंपनीस भेट देवून पहाणी व चर्चा केली.

 

या क्षेत्र भेटीप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंक चलवदे,पाचोरा उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव, मंडळ कृषि अधिकारी कैलास घोंगडे, कृषी पर्यवेक्षक यु. आर. जाधव,  आर. बी. चौधरी,  आर. ए. पाटील, चेतन बागुल, व श्रीमती एस. ए. पाटील, कृषी सहाय्यक व स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

00000000

Tuesday, 12 September 2023

जळगाव जिल्ह्यातील लोकहितांच्या प्रकल्पांना गती देण्यात येईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नारपार -गिरणा नदी जोड प्रकल्प राबविण्यात येईल - उपमुख्यमंत्री अजित पवार पाचोरा येथे शासन आपल्या दारी पाचोरा व भडगाव तालुकास्तरीय कार्यक्रम संपन्न

 















            जळगाव, दि.१२ सप्टेंबर (जिमाका) - शासनाने अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे काम केले आहे. जळगाव जिल्ह्यात लोकहितांचे नवीन प्रकल्प सुरू करण्याबरोबरच प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यात येईल. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोरा येथील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात दिली.

            पाचोरा येथील एम.एम.कॉलेज ग्राऊंड येथे  'शासन आपल्या दारी' या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री‌ एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते‌. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटनमंत्री मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, आ.सुरेश भोळे, आ.जयकुमार रावल, आ.किशोर पाटील,आ.लता सोनवणे, आ.चंद्रकांत पाटिल , आ.संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

            'शासन आपल्या दारी' अभियानात पाचोरा - भडगाव तालुक्यातील ५० हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे‌. असे नमूद करून मुख्यमंत्री श्री शिदे म्हणाले, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात आतापर्यंतच्या १४ कार्यक्रमातून १ कोटी ६१ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. राज्य शासनाला केंद्र शासनाचे नेहमीच पाठबळ असते. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना दहा हजार कोटींचा करमाफी देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. 'शासन आपल्या दारी' अभियानाच्या माध्यमातून शासन गतिमान झाले आहे. महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक उपक्रम, योजना राबविल्या आहेत. शासनाने अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे काम केले.असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, महिलांना एसटीत ५० टक्के सवलत, ज्येष्ठांना मोफत प्रवास , शेतकऱ्यांना नमो सन्मान योजनेत वर्षाला १२ हजार रूपयांची मदत दिली जात आहे. एक रूपयात पीक विमा क्रांतीकारी योजना आहे. शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना दिली आहे. नैसर्गिक आपत्ती पूर्व सूचना देणारे सॅटेलाईट शासन उभारणार आहे. यावर्षी पाऊस कमी पडला ही वस्तुस्थिती आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. जी-२० परिषदेत भारताचा ठसा उमटविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शासनाने ३५ जल सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यामुळे ८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

 

नारपार -गिरणा नदी जोड प्रकल्प राबविण्यात येईल- उपमुख्यमंत्री अजित पवार

            नारपार - गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी राज्यसरकार ८ हजार कोटी खर्च करणार आहे. यामुळे ५८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. गिरणा खोऱ्यातील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. निम्न पाडळसे प्रकल्पाच्या कामास निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

            नागरिकांचे प्रश्न जागेवर सुटावेत यासाठी 'शासन आपल्या दारी' उपक्रम राबविला जात आहे. प्रशासन व नागरिक यांच्यामध्ये दुवा साधणारा हा उपक्रम आहे.  शासन आपले आहे‌ ही भावना जनतेत निर्माण करण्याचे काम केले जात आहे‌ . महाराष्ट्रातील सर्वाधिक ठिंबक सिंचन वापर करणारा जळगाव जिल्हा आहे. नैसर्गिक संकटात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जळगाव जिल्हा केळी व कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यात केळी व कापूस प्रक्रिया उद्योग आणण्याचा शासन प्रयत्न करत आहे. जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही.

            राज्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सहकार्याने रस्त्यांची कामे करणे सहज शक्य झाले आहे. केळी पिकांचा समावेश मनरेगा योजनेत समाविष्ट करण्याचा तसेच जळगाव येथे केळी विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

            ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन म्हणाले की, वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा. त्यांना शासकीय कार्यालयांच्या चकरा माराव्या लागू नये यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहेत‌.

यावेळी आमदार किशोर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

            यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रातिनिधिक स्वरूपात पाचोरा व भडगाव तालुक्यातील ११ लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. यामध्ये शामकांत शामकांत गणपत जोशी (सातडोंगरी, ता. पाचोरा), गणेश गजानन खोदरे (पाचोरा) , रेखा संदीप मोरे,(टोणगाव, ता. भडगाव) सचिन कैलास पाटील,(पाचोरा) साबेरा बी अहमद (भडगाव),  दुर्वास जगन्नाथ पाटील (अंजनविहिरी, ता.भडगाव) समर्पित महेश वाघ (गोराडखेडा, ता. पाचोरा),  आकाश हिम्मत भिल्ल, (तारखेडा, ता. पाचोरा), भागवत सखाराम बोरसे (आसनखेडा, ता. पाचोरा),  पल्लवी मनोहर पाटील (गुढे, ता.भडगाव),  प्रविण गंगाराम राठोड (गाळण,ता.पाचोरा) यांचा समावेश होता. या सर्व लाभार्थ्यांचा लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

            यावेळी पाचोरा व भडगाव तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आली. व्यासपीठावर याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर,  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक एम राजकुमार आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी केले‌.

            यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार विभागाच्या लाभार्थीना कामगार किट, ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील सरपंचाशी मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यासपीठावरून खाली येत प्रत्यक्ष संवाद साधला.

            कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी,  अमोल शिंदे यांनी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या कामांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रत्येक  जिल्ह्यात जिल्हा जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आले‌ आहेत‌. त्यामाध्यमातून जनकल्याण योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना दिला जात आहे.

 एका छताखाली २५ शासकीय विभागांचे माहितीचे स्टॉल

            शासन आपल्या दारी अभियानाच्या पाचोरा येथील कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे २५ हून अधिक स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत मिळाल्यामुळे या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री तक्रार कक्षांच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारी दाखल करून घेऊन त्यांना टोकन नंबर देण्यात आले. यावेळी जिल्हा कौशल्य व उद्योजकता रोजगार मेळाव्यास तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

0000000

Sunday, 10 September 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

             जळगाव,दि.9 ऑगस्ट (जिमाका)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            मंगळवार दि. 12 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता शासकिय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळ येथे आगमन व हॅलिकॉप्टरने मौजे हडसन शिवार हेलीपॅड, ता. पाचोरा, जि.जळगावकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व मोटारीने एम.एम.कॉलेज मैदान पाचोराकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ – एम.एम.कॉलेज मैदान पाचोरा) दुपारी 2.30 वा. मोटारीने मौजे नांद्रा ता. पाचोराकडे प्रयाण. दुपारी 2.50 वा. नर्मदा ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट या कंपनीचे उद्घाटन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मौजे निंभोरा (नगरदेवळा रेल्वेस्टेशन जवळ), ता. भडगाव, जि.जळगाव व पाचोरा येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नविन मुख्य इमारत बांधकामाचे ई-भुमीपुजन (स्थळ- नांद्रा ता. पाचोरा, जि.जळगाव), दुपारी 3.30 वा. मोटारीने मौजे हडसन शिवार हेलीपॅडकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व हेलीकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

00000

Friday, 8 September 2023

निराधारांसाठी शासन आपल्या दारी जिल्ह्यातील निराधारांना ३४५ कोटी ५६ लाखांचे वितरण ! अर्थसहाय्य वितरणासाठी 'आपली पेन्शन आपल्या दारी' मोहीमेची जोड

         जळगाव, दि.८ सप्टेंबर (जिमाका) – जिल्ह्यात सामाजिक विशेष सहाय्य योजनेत विधवा, दिव्यांग, परित्यक्ता,  निराधार, घटस्फोटित, वयोवृध्द घटकांना दर महिन्याला देण्यात येणाऱ्या आर्थ‍िक मदतीपोटी वर्षभरात ३४५ कोटी ५६ लाख ४४ हजार ४८० रूपयांची मदत करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना थेट अर्थसहाय्य वितरणासाठी 'आपली पेन्शन आपल्या दारी' या मोहीमेची जोड देण्यात आल्याने मदत वाटपात पारदर्शकता व गतिमानता प्राप्त झाली आहे.  अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी दिली आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य आदी योजना समाजातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येत असते.  जिल्ह्यात १ ऑगस्ट २०२२ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत एकूण ३ लाख ८७ हजार ९१५ लाभार्थ्यांना ३४५ कोटी ५६ लाख ४४ हजार ४८० रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. 

संजय गांधी निराधार अनुदान या योजनेतंर्गत ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, एचआयव्ही, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,  ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजारापर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५० हजार रूपयांची कौटुंबिक उत्पन्नाची अट आहे‌‌. या योजनेत ९०१७५ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १०१ कोटी ८५ लाख १६ हजार ३०० रूपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेंतर्गंत ६५ वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या अथवा रूपये २१ हजारापर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीना निवृत्ती वेतन देण्यात येत असते. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५० हजार रूपयांची कौटुंबिक उत्पन्नाची अट आहे‌‌. या योजनेतील १९००७१ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २२० कोटी ९७ लाख ६३ हजार ९८० रूपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.

 

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन या योजनेंतर्गंत दारिद्रय रेषेखालील ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती या योजनेत पात्र ठरतात. या योजनेत ८८७४६ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १६ कोटी १६ लाख ८४ हजार २०० रूपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या ४० ते ७९ वर्षाखालील वयोगटातील विधवा या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. या योजनेत १७३७० लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ३ कोटी ७९ लाख रूपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेत ६०३ लाभार्थ्यांना २३ लाख ६० हजार रूपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.  राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत ९५० लाभार्थ्याना २ कोटी ५४ लाख २० हजार रूपयांचा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३ लाख ८७ हजार ९१५ लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनांचा लाभ मिळत आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना एक हजार रुपये देण्यात येत होते. जुलै महिन्यापासून आता दीड हजार रुपये अनुदान मिळत आहे.

0000000

Tuesday, 5 September 2023

बाल स्वास्थ्य योजना ठरली संजीवनी श्रवण शक्ती मिळाल्यानं आयुष्य पालटलं…!


 

        साडेपाच वर्षाच्या रूदुराज गांगुर्डेला जन्मत: दोन्ही कानानी ऐकू येत नव्हते. खासगी रुग्णालयात त्याच्या कानाच्या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे सहा लाखापर्यंत होता. त्याच्या उपचाराची आम्हाला चिंता सतत सतावत होती. मात्र आमच्या मदतीला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाची योजना देवदूतासारखी धावून आली. या योजनेच्या माध्यमातून पुण्याच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये काँक्रिलियर इम्प्लांटची अवघड शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. यामुळे माझ्या रुदुराजला आता चांगलं ऐकू येत आहे. तो हसतखेळत जगत आहे. त्याचं आयुष्य  पालटून गेलं आहे. अशी भावना रुदुराज चे वडील वसंत गांगुर्डे, आई सरिता गांगुर्डे यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात जन्मतःच व्यंग, पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासास विलंब व इतर आजार यांचे निदान व उपचार केले जातात. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येत असलेल्या या योजनेत रूदूराज गांगुर्डेची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर पुण्याच्या खासगी रूग्णालयांत कॉक्रिलियर इम्प्लांटची अवघड शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याने ही योजना रूदूराजसाठी नवसंजीवनीच ठरली आहे.

जामनेर तालुक्यातील नांद्रा या गावातील वसंत व सरिता गांगुर्डे हे दाम्पत्याला दोन मुलींच्या पाठीवर रूदूराज या मुलाचा जन्म झाला. तो एक वर्षाचा झाल्यानंतर त्याला बोलता ही येत नाही, तसेच त्याला ऐकायला ही येत नसल्याचे त्याच्या आई-वडीलांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडली. त्याच्या उपचारासाठी त्यांनी जळगाव, नाशिक, पुणे, मुंबई याठिकाणाच्या विविध खासगी रूग्णालयात तपासण्या केल्या. या तपासण्यातून त्यांना काँक्रिलियर इम्प्लांटची अवघड शस्त्रक्रीया करण्याचा सल्ला देण्यात आला. या शस्त्रक्रीयेसाठी येणारा आठ ते दहा लाख रूपयांच्या खर्च त्यांच्या आर्थ‍िक परिस्थ‍ितीला परवडणारा नव्हता. त्यामुळे रूदूराजच्या पालकांनी शासकीय योजनेचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाच्या वर्षा वाघमारे यांनी आरोग्य तपासणी व काँक्रिलियर इम्प्लांट शस्त्रक्रीयेच्या पूर्ततसाठी असलेल्या असलेल्या कागदपत्रांची पूर्ततेसाठी सर्वातोपरी मदत केली. त्यामुळे त्यांना या योजनेतून पाच लाख पर्यंतचा संपूर्ण शासकीय खर्चातून मोफत शस्त्रक्रीया करण्यात आली.

अशी होते अंमलबजावणी -

प्रत्येक शैक्षणिक वर्षात अंगणवाडी बालकांसाठी दोनदा तर शालेय विद्यार्थ्यांसाठी एकदा आरोग्य तपासणीचे आयोजन केले जाते. यातील किरकोळ आजाराचे निदान झालेल्या बालकांवर शाळेतच उपचार केले जातात तर गंभीर आजाराचे निदान झालेल्या बालकांवर जिल्हा रुग्णालय अथवा महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांत पुढील उपचार करून त्यांचा पाठपुरावा केला जातो.

जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जातो. ज्या बालकांमध्ये आजारांचे निदान होते त्यांच्यावर पालकांच्या परवानगीने मोफत वैद्यकीय उपचार केले जातात. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी दिली.

0000