Thursday, 30 November 2023

https://voters.eci.gov.in/ नव मतदार नोंदणीसाठी आता नऊ दिवसच मुदत मोबाईलवरून ही नोंदणी शक्य ; १ जानेवारीला १८ वर्ष पूर्ण होणाऱ्यांना ही संधी

जळगाव, दि.३० नोव्हेंबर (जिमाका) - लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्या १ जानेवारी २०२४ पर्यंत ज्या तरुण-तरुणींना १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांची मतदार नोंदणी सुरू आहे. १८ वर्षे पूर्ण होऊनही ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही, त्यांनाही नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी ९ डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे.

राज्यात आता एप्रिल २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होईल. त्यासाठी १ जानेवारी २०२४ ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बीएलओंनी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर जाऊनही मतदार नोंदणीचे काम केले आहे. आता ज्या तरुण-तरुणींना १ जानेवारी २०२४ पर्यंत १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांनाही मतदार नोंदणीत सहभागी होता येणार आहे. तालुक्यातील तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत किंवा बीएलओंकडे त्यांना अर्ज देता येईल. त्याशिवाय स्वत:च्या मोबाईलवरून किंवा ऑनलाइन केंद्रांवरूनही मतदार नोंदणी शक्य आहे. ज्यांनी नोंदणी केली नाही, त्यांनी मतदार नोंदणी करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्याच्या निवडणूक शाखेने केले आहे.

नवमतदार नोंदणी किंवा दुरुस्ती कशी करायची ?

■ नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व इतर निवडणूकविषयक सुविधा मिळविण्यासाठी वोटर हेल्पलाइन अॅप उपयुक्त आहे. निवडणूक आयोगाने तयार केलेले अॅप डाऊनलोड करून घ्यावे. कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता अॅपद्वारे नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करता येते. त्यासाठी योग्य कागदपत्रे अपलोड करावी लागतात. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या मतदारांना नावात दुरुस्ती व छायाचित्रात बदलही करता येतो. मृत मतदाराचे नाब नातेवाईक वगळू शकतात. तसेच, घरपोच मोफत मतदान ओळखपत्रही मिळविता येते. गुगल प्ले स्टोअरवरील https:// play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen या लिंकच्या माध्यमातून या सुविधेचा लाभ घेता येईल.

०००००००००००००००

Wednesday, 29 November 2023

छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे तृतीयपंथीय, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती जमातींच्या व्यक्तींसाठी २ व ३ डिसेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन

 जळगाव , दि. २९ नोव्हेंबर (जिमाका) :- भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून २७ ऑक्टोबर  ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून तृतीयपंथीय, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती जमातींच्या लक्षित घटकांतील व्यक्तींसाठी शनिवार, २ डिसेंबर २०२३ व रविवार, ३ डिसेंबर , २०२३ या दिवशी विशेष शिबिराचे प्रत्येक मतदान केंद्रावर आयोजनही करण्यात आले आहे. या कालावधीत संबंधित यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांना मदत करण्यासाठी पूर्णवेळ उपस्थित राहणार असून नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन निवडणूक विभागास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रत्येक मतदान केंद्रावर व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात प्रसिध्द करण्यात आली आहे.  प्रारुप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही? याची खात्री मतदारांनी करावी. मतदार यादीत नाव नसल्यास त्यासाठी आपला फॉर्म नमुना-६ म्हणजेच मतदार नांव नोंदणीसाठी आवश्यक नमुना फॉर्म भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करावा.

ज्या व्यक्तीचे १ जानेवारी, २०२४ रोजी वय १८ वर्ष पूर्ण होत आहे, परंतु मतदार यादीत नांव नाही अशा व्यक्तीने आपले नांव मतदार यादीत समाविष्ट करुन घेण्यासाठी फॉर्म नमुना ६ भरुन द्यावा. सदर अर्हता दिनांकाला १८ वर्ष वय पूर्ण करणा-या मतदाराचे नाव त्या - त्या अर्हता दिनांकाला मतदार यादीमध्ये समाविष्ट केले जाईल. तसेच https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर अथवा Voter Help line App द्वारे सुध्दा मतदार आपली नाव नोंदणी करु शकतात.

१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम असल्यामुळे जिल्हयातील सर्व  विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या परिसरात संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन सदर पुनःरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे. असेही आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केले आहे.

                                                             ०००००००००००००००

ग्रामीण भागातील जातीवाचक रस्ते, वाडया, वस्त्यांची सर्व नावे हद्दपार ; विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केले समाधान विभागीय दक्षता व नियंत्रण समितीचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

 





            नाशिक, दि २९  नोव्हेंबर,२०२३ (विमाका वृत्तसेवा) :- राज्यभरातील रस्ते, वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या समाज कल्याण विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागात तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली असून आज अखेर ३०९२ जातीवाचक नावापैकी २९२९ जातीवाचक रस्ते, वाडया, वस्त्यांची नावे बदलण्यात आली असून त्यात ग्रामीण भागातील २ हजार ४९० जातीवाचक रस्ते, वाडया, वस्त्यांची नावे बदलण्यात आली आहे. ग्रामीण भागात शंभर टक्के काम झाल्याबद्दल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी समाधान व्यक्त केले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आला होते, त्यावेळी श्री गमे बोलत होते. विभागीय समितीच्या बैठकीप्रसंगी  जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ तांबे, सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर, तहसीलदार पल्लवी जगताप उपस्थित होते. विभागातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

विभागीय आयुक्त श्री गमे म्हणाले की, अनाधिकृत सुरु असलेल्या वसतिगृहांची तपासणी करुन त्याचा अहवाल पुढील बैठकीत अहवाल सादर करावा, या कामासाठी महिला व बाल विकास विभागाची मदत घ्यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. अनु. जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अधिनियमांतर्गत गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत घडलेल्या गुन्ह्यांचा तपशिलवार आढावा घेण्यात आला. त्या अनुषंगाने पीडितांना देण्यात आलेले अर्थसहाय्य व त्यासंदर्भात करण्यात येत असलेली उपाययोजना याबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे, श्री. गमे यांनी सुचित केले.

विभागीय स्तरावरील तृतीयपंथी कल्याण समितीचा आढावा

विभागीय स्तरावरील तृतीयपंथी कल्याण व त्यांच्या हक्काचे संरक्षण कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले असून या कल्याण मंडळाचा आढावा  घेण्यात आला. विभागीय आयुक्त श्री गमे यांनी तृतीयपंथी व्यक्तीच्या कल्याणासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या . तसेच तृतीयपंथाना हक्काचा निवारा मिळावा यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करुन प्रस्ताव तयार करावा. अतिक्रमणाच्या ठिकाणी जर निवास करत असतील तर ती जागा नियमानूकल करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही श्री. गमे यांनी यावेळी सांगितले.

                                                         00000000

महामार्ग पोलीस केंद्रातर्फे पाळधीत पोलीस चौकीचे ३० नोव्हेंबर रोजी उद्घाटन

             जळगाव,दि.२९ नोव्हेंबर (जिमाका) - येथील महामार्ग पोलीस केंद्रातर्फे पाळधी येथे नवीन महामार्ग पोलीस चौकीचे उद्घाटन तसेच मृत्युंजय‌ दूत गुणगौरव सोहळा ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या हस्ते या महामार्ग पोलीस चौकीचे उद्घाटन होणार असून अपघात झाल्यावर सहकार्य करणाऱ्या मृत्युंजय दूतांचा सत्कारही यावेळी डॉ.सिंघल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहीकर, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, उद्योगपती श्रीकांत मणियार हे उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी. असे आवाहन पोलीस उअधीक्षक प्रदीप मैराळे (नाशिक), पोलीस निरीक्षक हेमंत भामरे (धुळे), प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल शेजवळ यांनी केले आहे.

०००००००००००००००

जिल्हाधिकारी कार्यालयात 4 डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

         जळगाव, दि.29 नोव्हेंबर (प्रतिनिधी) -  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार डिसेंबर महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 4 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी ११ वाजता अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे.  

जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

                                          00000

Friday, 24 November 2023

जिल्ह्यातील ४५ जणांचे शस्त्र परवाने रद्द ! गैरप्रकारांना बसणार आळा

              जळगाव,दि.२४ नोव्हेंबर (जिमाका) - परवाना मंजूर झाल्यानंतरही मुदतीत शस्त्र न घेणाऱ्या ४५ जणांचे शस्त्र परवाने जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात आले आहेत.  एकाच वेळी ४५ जणांचे शस्त्रपरवाने रद्द करण्याची कारवाई जिल्ह्यात पहिल्यांदाच होत आहे. यामुळे शस्त्र वापराच्या गैरप्रकारास आळा बसणार आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी जिल्ह्यातील शस्त्र परवाना सद्यस्थितीचा नुकताच आढावा घेतला. हा आढावा घेतांना जिल्ह्यातील ७५ जणांनी शस्त्र परवाना‌ घेतला‌ होता. मात्र त्यातील ४५ जणांची जिल्हा प्रशासनाकडे नोंद आढळून येत नव्हती. यात ५ जणांनी परवाना घेऊन‌ही मुदतीत शस्त्र खरेदी न केल्यामुळे त्यांना शस्त्र खरेदीस मुदतवाढ न देता परवाना रद्द करण्यात आला आहे. ७ परवानाधारक मयत झाले आहेत. १९ परवानाधारक त्यांनी दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.  १४ परवानाधारकांनी नोटीस प्राप्त होऊन‌ ही खुलासा सादर केल्यामुळे त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

स्व: संरक्षण,पीक संरक्षण व बॅंकिंग सुरक्षा अशा कारणांसाठी शस्त्र परवाना मंजूर केला जातो. परवाना मंजूर झाल्यानंतर ३ महिन्यांच्या कालावधीत शस्त्र घ्यावे लागते. ते शक्य न झाल्यास प्रशासनाकडून मुदत वाढवूनही घेता येते. ३ ते १८ महिन्यांच्या कालावधीत शस्त्र घेतल्यावर त्याची नोंद प्रशासन घेते. त्याची तपासणीही केली जाते. दर दोन वर्षांनी त्यांची तपासणी व पुननोंदणी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे होते.

शस्त्र परवान्यांना मंजुरीसह सर्वच प्रक्रिया कायद्यानुसार आणि पारदर्शकपणे राबविल्या जातात. तरीही शस्त्र परवाना मुदतवाढ घेतली जात नाही. परवाना घेऊन ही शस्त्र खरेदी केली जात नाहीत. यामुळे गैरप्रकार उद्भवतात. या प्रक्रियेत यापुढे कुणीही कायद्याचे उल्लंघन, दिशाभूल केल्यास संबंधितांवर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे जिल्हा  प्रशासनाने कळविले आहे.

०००००००००००

शिव महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार- पालकमंत्री गुलाबराव पाटील कार्यक्रम स्थळांची पालकमंत्र्यांनी केली पाहणी जळगावकरांनी सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन






जळगाव, दि.२४ नोव्हेंबर (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील वडनगरी फाटा येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. वडनगरी फाटा येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष घटनास्थळावरून पालकमंत्र्यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

वडनगरी फाटा येथे ५ ते ११ डिसेंबरदरम्यान बडे जटाधारी महादेव मंदिर समितीच्या वतीने पंडित प्रदीप मिश्रा यांचा सात दिवसीय श्री शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा पालकमंत्र्यांनी आयोजक संस्था व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. याप्रसंगी उद्योजक अशोक जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता गिरीष सुर्यवंशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, मंदीर समितीचे जगदीश चौधरी, सीए हितेश‌ आगीवाल व पदाधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील व अशोक जैन यांच्या हस्ते मुख्य सभा मंडपाचे उभारणी कामांचे उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले की, शिव महापुराण कथेसाठी जळगाव जिल्ह्यात ६ लाख भाविक येणार आहेत. यासाठी जिल्हावासियांनी आयोजकांना‌ सहकार्य करावे. कार्यक्रमासाठी वाहतूक नियोजन काटेकोरपणे करण्यात यावे. सुसज्ज स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, भोजन, आंघोळीसाठी गरम पाणी याकडे आयोजकांनी लक्ष द्यावे.

चोपडा - जळगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे, साईड पट्ट्या भरण्यात यावे. मंदीर परिसरात रबरचे स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे. पाळधी-आव्हाने रस्त्याची ही दुरूस्ती करण्यात यावी.असे ही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. महावितरणने याठिकाणी स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसवावा. पथदिवे बसविण्यात यावे. स्वतंत्र आरोग्य पथक नेमण्यात यावे. साफसफाईची चोख व्यवस्था ठेवण्यात यावी. वाहतूकीचे चोख नियोजन करण्यात यावे. महावितरण, आरोग्य, पोलीस व बांधकाम विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवत काम करावे. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आयोजक समिती, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००००००००००


Wednesday, 22 November 2023

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा पावसादरम्यान पिकांची काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 जळगाव, दि.२२ नोव्हेंबर (जिमाका) – जिल्ह्यात २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर, २०२३ या कालावधी दरम्यान मध्यम ते हलका स्वरुपाचा पावसाचा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दरम्यान आपल्या पिकांची व शेती पिकांच्या उत्पादनांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. 


जिल्हयातील पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेल्या पिकांची जसे कापूस, मका, ज्वारी इत्यादी सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तसेच उघड्यावरील धान्य योग्यरित्या झाकून ठेवावे, पावसापूर्वी शक्य झाल्यास कापूस बोडांची वेचणी पूर्ण करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे कीड व रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करुन जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर असल्यास विविध योग्य त्या उपाययोजना कराव्यात, हवामान अंदाजावर आधारीत कृषी सल्ला व हवामानाचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल ॲपचा वापर करावा, तसेच शेतकरी बंधूंनी मेघगर्जना व विजेचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

                                                                    ००००००००

Tuesday, 21 November 2023

कंपन्यांमधील १५० रिक्त पदांसाठी २८ व २९ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा

         जळगाव,दि.२१ नोव्हेंबर (जिमाका) - जिल्ह्यातील विविध खासगी कंपन्या, आस्थापनांवरील १५० रिक्त पदांसाठी सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी  २८ व २९ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्याचा तरूणांनी लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी केले आहे.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारण १० वी/ १२ वी/पदवीधर/आय टी आय ट्रेड / डिप्लोमा / बी.ई. डिप्लोमा ही शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांमधून कंपन्यांमधील १५० रिक्तपदांची भरती करण्यात येणार आहे.

या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या ईच्छुक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. उमेदवारांनी मेळाव्यांत सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अॅप्लाय करण्यासाठी 'सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग ईन करून अॅप्लाय करावा. तसेच ज्यांना नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी व तद्नंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-इन करुन अॅप्लाय करावा.

या बाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ९.४५ ते संध्या. ६.१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७ - २९५९७९० वर संपर्क साधावा. असे आवाहन ही श्री. मुकणे यांनी केले आहे. 

००००००००००००००००००

डाक जीवन विमा प्रतिनिधी पदासाठी ३० नोव्हेंबर रोजी थेट मुलाखती

         जळगाव, दि.२१ नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) -  टपाल विभागाच्या टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल योजनांच्या विक्रीसाठी 'डाक जीवन विमा' प्रतिनिधींची थेट नेमणूक केली जाणार आहे. यासाठीच्या मुलाखती ३० नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. अशी माहिती जळगाव विभाग डाकघरचे अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

            किमान इयत्ता १० वी पास असलेले, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी , माजी जीवन सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, बेरोजगार किंवा स्वयंरोजगार असणारे १८ ते ६० वर्षं वयोगटातील उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहू शकतात. अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव, पांडे चौक, पहिला मजला, मुख्य डाकघर, जळगाव -४२५००१ यांच्या कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ३ वाजेच्या कालावधीत मुलाखती होणार आहेत.

            इच्छुक उमेदवारांना विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे. उमेदवारावर कोणताही गुन्हा दाखल नसावा. निवड ही इयत्ता १० वी च्या गुणांवर तसेच उच्च शैक्षणिक पात्रता व मुलाखतीत मिळालेल्या गुणावर केली जाईल.

            मुलाखतीस येताना जन्म तारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रता, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो, ई-मेल आयडी व इतर आवश्यक कागदपत्रे तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्याबाबतची कागदपत्रे घेऊन यावीत. असे आवाहन ही अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

०००००००००००००००००००००

कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख दस्ताऐवज २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

 जळगाव, दि.२१ नोव्हेंबर (जिमाका) - जळगाव शहर व  जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबी, मराठा- कुणबी व कुणबी-मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले उपलब्ध दस्ताऐवज/ पुरावे आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षात २१ ते २४ नाव्हेंबर या कालावधीत सादर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार  यांनी केले आहे.

            मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीद्वारे प्राप्त निर्देशानुसार जळगाव शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले पुरावे, वंशावळ, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे उपलब्ध असल्यास  जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष स्थापित कक्षात २१ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत स्वीकारले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री.कासार यांनी दिली आहे.    

                                                           000000000      

मतदार यादी बाबत 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सोबत बैठक नाशिक विभागीय आयुक्त जिल्ह्यासाठी मतदार यादी निरीक्षक नागरिकांना मतदार याद्या संदर्भात शंका असल्यास उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

             जळगाव, दि.21 नोव्हेंबर (जिमाका) - जिल्ह्यात सध्या 1 जानेवारी, 2024 च्या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (Special Summary Revision) राबविण्यात येत आहे. याबाबत जिल्ह्यातील खासदार, आमदार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासोबत 23नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. मतदार याद्या संदर्भात नागरिकांना शंका असल्यास निवडणूक शाखेशी संपर्क साधावा. असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केले आहे.

            भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जळगांव जिल्ह्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत नाशिक विभागीय आयुक्त किमान तीन भेटी देऊन तपासणी करणार आहेत.

विभागीय आयुक्तांचा प्रथम दौरा 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी जिल्हास्तरावरील तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी विधानसभानिहाय तपासणी करणेत येवून मतदान केंद्रांची भेट घेणार आहेत. मतदार यादीसंदर्भात नागरिकांना कोणत्याही शंका/ समस्या असल्यास ते उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी 92092 84010 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात. असे आवाहन श्री.चिंचकर यांनी केले आहे.

००००००००००००

Friday, 10 November 2023

प्रधानमंत्री आवास योजनेत १९० लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार ग्रामविकासमंत्र्यांच्या निर्देशानुसार उपलब्ध झाली महसूल विभागाच्या ताब्यातील जागा

 जळगाव, दि.१० नोव्हेंबर (जिमाका) रावेर तालुक्यातील पाल येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील १९० भूमीहीन लाभार्थ्यांचे स्वतःच्या मालकीच्या घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे. जागेअभावी पाल येथील पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या पाल येथील सरकारी गुरचरण क्षेत्रात ९५ हजार चौरस फूट जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांचे ५०० चौरस फुटांचे घर साकार होणार आहे ‌.

पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पाल येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या जागेच्या प्रश्नांवर वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रावेर गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या जागा उपलब्धतेच्या प्रस्तावास तात्काळ मान्यता दिली आहे.

पाल येथील गट नंबर २८८ मधील महसूल व वन विभागाच्या ताब्यातील सरकारी गुरचरण ११७.७४ हेक्टर क्षेत्रापैकी ९५ हजार चौरस फूट (८८२९ चौरस मीटर) क्षेत्रास प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र १९० भूमीहीन लाभार्थ्यांकरिता ग्रामीण गृह प्रकल्प राबविण्यास पाल ग्रामपंचायतीस उपलब्ध करून दिली आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित जागेचा प्रश्न ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील,  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी चुटकीसरशी सोडविल्याबद्दल लाभार्थ्यांनी त्यांचे व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहे. 

००००००००००००००

जिल्ह्यात १० नवीन रूग्णवाहिका दाखल होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे एका दिवसात तांत्रिक मान्यता जानेवारी २०२४ पर्यंत रूग्णसेवेत दाखल होणार

जळगाव,दि.१० नोव्हेंबर (जिमाका) - जिल्हा रूग्णालय व अधिनस्त ग्रामीण रूग्णालयांना जिल्हा वार्षिक योजनेतून १० नवीन रूग्णवाहिका खरेदीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पाठपुराव्यामुळे रूग्णवाहिका खरेदीच्या प्रस्तावास आरोग्य सेवा आयुक्तांनी एका दिवसातच तांत्रिक मान्यता दिली आहे. जानेवारी २०२४ पर्यंत या नवीन रूग्णवाहिका रूग्णसेवेत दाखल होणार आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालय, जळगाव व त्यांच्या अधिनस्त ९ ग्रामीण रूग्णालयांना रूग्णवाहिका खरेदी करण्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार जिल्हा सामान्य रूग्णालयाने याबाबतचा तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव ८ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई येथे आरोग्य सेवा आयुक्त कार्यालयास पाठविला‌. एरवी प्रस्ताव पाठविल्यानंतर या प्रस्तावाच्या तांत्रिक मान्यतेस साधारणत: दीड महिना लागतो. मात्र जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. धीरजकुमार यांनी गतिमान प्रशासनाचा वस्तुपाठ घालून देत प्रस्तावाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजी या प्रस्तावास तांत्रिक मान्यता दिली. 

तांत्रिक मान्यतेनंतर आता रूग्णवाहिका खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयास एक रूग्णवाहिका व ग्रामीण रूग्णालय न्हावी (ता.यावल), बोदवड, अमळनेर, एरंडोल, भडगाव, पाचोरा, मेहुणबारे (ता.चाळीसगाव), पहुर (ता.जामनेर) व पिंपळगाव - हरेश्र्वर (ता.पाचोरा) येथे प्रत्येक अशा एकूण १० नवीन रूग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत. रूग्णवाहिका खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेत १ कोटी ८० लाख ६३ हजार रूपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

या रूग्णवाहिकांचा फायदा गर्भवती महिला, लहान मुले, अपघातग्रस्त व अत्यवस्थ रूग्णांना होणार आहे. असे ही श्री.पाटील यांनी सांगितले.

००००००००००००००००००

जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर मदत,पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती

 




 मुंबई/जळगाव,दि.९ नोव्हेंबर (जिमाका) - जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून दुष्काळग्रस्तांना देण्यात येणा-या सर्व सवलती लागू होणार आहेत. अशी माहिती मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. 

मंत्रालयातील वॉर रूम येथे आज मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री  यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी या बैठकीला मंत्रीमंडळ उपसमितीचे सदस्य सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपानराव भुमरे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधानसचिव सोनिया सेठी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, कृषी  विभागाचे सचिव सुनिल चव्हाण, वित्त विभागाचे सहसचिववि.र.दहिफळे, पाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख,मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जलसपंदा विभागाचे सहसचिव संजय टाटू यावेळी उपस्थित होते.

     जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून जळगाव तालुक्यातील जळगाव,भोकर,म्हसावाद,नशिराबाद,असोदा,पिंप्राळा महसूली मंडळामध्ये,तालुका जामनेर महसूली मंडळामध्ये जामनेर,पहुर,शेंदुर्णी,वाकडी,मालदाभाडी,नेरी,तोंडापूर महसूली मंडळामध्ये,तालुका एंरडोल मध्ये एरंडोल,उमरदे (रिंगणगाव),कासोदा, उत्राण महसूली मंडळामध्ये, तालुका धरणगाव मध्ये धरणगाव,सोनवंद,पाळधी, पिंपरी खुर्द,साळवा, नवनिर्मित पद महसूली मंडळामध्ये,चांदसर तालुका भुसावळमध्ये भुसावळ,वरणगाव,कु-हे प्र.नृ,पिंपळगाव महसूली मंडळामध्ये, तालुका बोदवड मध्ये बोधवड,करंजी नवनिर्मित पद महसूली मंडळामध्ये, तालुका यावल मधील भालोद, किनगाव,साकळी,फैजपूर,बामणूद महसूली मंडळामध्ये,तालुका रावेळ मधील खिरडी,निभोंरा बुद्रुक महसूली मंडळामध्ये,तालुका मुक्ताईनगर मधील मुक्ताईनगर,अंतुर्ली,घोडसगाव महसूली मंडळामध्ये,तालुका पाचोरा मधील पाचोरा, नगरदेवळा,गाळण,पिंपळगाव हरेश्वर,कु-हाड,वरखेड बुद्रूक महसूली मंडळामध्ये, तालुका भडगांव मधील  भडगांव,कांजगाव (गोंडगाव),आमडदे,कोळगाव महसूली मंडळामध्ये, तालुका अमळनेर मधील अमळनेर,पातोंडा,भरवस,मारवड,अंमळगाव,शिरूड,वावडे महसूली मंडळामध्ये, तालुका चोपाडा मधील चोपडा,आडावत,गोरगावल बु,चाहाडा,धानोरा प्र.य.,लासुर महसूली मंडळामध्ये, तालुका पारोळा मध्ये बहादरपुर,घोरवड,शेवाळे बुद्रुक महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून आगामी कालावधीतही दुष्काळसदृश्य परिस्थिती  लक्षात घेवून उर्वरीत भागासाठी निर्णय घेण्यात येईल असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

                                                                    00000000


जिल्ह्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना वायू प्रदुषण सूचनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके प्रदुषणमुक्त जळगाव या उद्देशाने मोहीम स्वरुपात काम करावे

 जळगाव, दि.९ नोव्हेंबर (जिमाका):- राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी  जिल्ह्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठीच्या उपाय योजना राबविण्याचे आवाहन केले‌ आहे. या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके नियुक्त करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 

जिल्ह्यातील बांधकाम स्थळे धुळमुक्त आणि स्वच्छ करावीत. अण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा. जळगाव शहर व जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महापालिका आयुक्त व जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी. नागरिकांना प्रदुषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे.

बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावीत त्याचबरोबर साचलेली धुळे साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 

बांधकाम ठिकाणांवर धुळ रोखण्यासाठी पत्रे लावतानाच ही सर्व ठिकाण धुळमुक्त करण्यात यावेत.  कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पत्र्यांमुळे रस्त्यांवरून जाताना नागरिकांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतानाच शहरातील सर्वाधिक प्रदुषण होणारी ठिकाणांवर संनियंत्रण करण्यात यावे. वाहनांमधून रस्त्यांवरील माती, डेब्रीज वाहून नेताना ती झाकून वाहतूक करावी तसे न करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी दिल्या आहेत.

रात्री उशिरा बांधकाम आणि विध्वंस  कचरा / मलबाची अवैध डम्पिंग रोखण्यासाठी विशेष पथके काम करणार आहेत. पथकाने संबंधित परिसराला भेट देऊन, कार्यस्थळाची चित्रफित (व्हिडिओ ग्राफ) काढावी व सदर अंमलबजावणी करीत असताना तरतुदींचे पालन न झाल्याचे निदर्शनास आल्यास, बांधकाम कार्यस्थळ यांच्यावर बांधकाम थांबविण्याच्या नोटीस / कार्यस्थळ सील करणे यासारखी कठोर कारवाई तात्काळ करावी. परिपत्रक जारी केल्यापासून सर्व प्रकल्प प्रस्तावक / कंत्राटदारांना स्प्रिंकलरच्या खरेदीसाठी १५ दिवसांची आणि स्मॉग गनच्या खरेदीसाठी ३० दिवसांची मुदत असेल व सदर वेळेचे न चुकता वरीलप्रमाणे पालन करावे. बांधकाम साहित्य किंवा C & D साहित्य वाहून नेणारी वाहनांवर वाहन ट्रॅकिंग यंत्रणा बसवावी, जर वर नमूद केलेल्या तरतुदींचे पालन होत नसेल तर प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) / पोलीस विभागाकडून यांच्याकडून जप्तीची कारवाई करण्यात यावी. ओव्हरलोड वाहने, न उघडलेली वाहने रस्त्यांवर बांधकाम साहित्य सांडणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाने योग्य ती कारवाई करावी. जुन्या (End of Life Vehicles )वाहनांसाठी वाहन स्क्रॅपेज धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन दिले जावे. साहित्य वाहून नेणाऱ्या सर्व वाहनांकडे वैध PUC प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे आणि ते सक्षम अधिकाऱ्यांने विचारल्यास उपलब्ध करावे. प्रदुषण नियंत्रण मंडळाने उद्योगांमधून उत्सर्जित होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवावे.

मोकळया जागेमध्ये पालापाचोळा किंवा घरगुती घनकचरा जाळण्यास निर्बंध असतील. महानगरपालिका / नगरपरिषद क्षेत्रातील सर्व रस्त्यांना पक्के फूटपाथ करावेत. बेकरीमध्ये वापरात जीवाश्म प्रदूषणकारी इंधनाच्या ऐवजी स्वच्छ पर्यायी इंधन, जसे की इलेक्ट्रिक ओव्हन, पीएनजी किंवा इतर पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी दिशानिर्देश जारी करावे, विद्युत किंवा इतर पर्यावरणास अनुकूल इंधनाचा वापर करुन, स्मशानभूमीच्या अंत्यसंस्काराच्या सुविधा रुपांतरीत करण्यासाठी संबंधित आस्थापनाने सक्रिय पावले उचलावीत. प्रदुषण मंडळाने स्थापित केलेल्या सतत हवा गुणवत्ता देखरेख केंद्रांची नियमितपणे महापालिका प्राधिकरणाद्वारे तपासणी/निरीक्षण करावेत. जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे प्रदुषण नियंत्रणाच्या मोहीमेत सहभाग घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व प्रदुषण नियंत्रण मंडळाने केले आहे. 

                                                          ००००००००००

जिल्हा वार्षिक योजनेतील आदिवासी घटक कार्यक्रमात निधी खर्चात यावल प्रकल्प कार्यालय राज्यात प्रथम उपलब्ध निधीशी खर्चाची ५४.१७ टक्केवारी अर्थसंकल्पीत निधीशी खर्चाची २९.३९ टक्केवारी पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन व जिल्हाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित

      जळगाव,दि.९ नोव्हेंबर (जिमाका) – जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी घटक कार्यक्रम) अंतर्गत सन २०२३-२४ करिता अर्थसंकल्पीय निधी ५५ कोटी ९१ लाख रूपये निधीमधून ३० कोटी ३४ लाख रूपये निधी बीडीएसवर शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापैकी दि. ६ नोव्हेंबर पर्यंत १६ कोटी ४३ लाख रूपये निधी बीडीएसवर खर्च झाला आहे. उपलब्ध निधीशी खर्च झालेल्या निधीची टक्केवारी ५४.१७ टक्के तसेच अर्थसंकल्पीत निधीशी खर्चाची टक्केवारी २९.३९ टक्के असून निधी खर्चामध्ये जळगाव जिल्ह्यातील यावल आदिवासी विकास प्रकल्प राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. 

यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन,मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व आमदार लता सोनवणे यांच्या सूचना, लोकप्रतिनिधींचे सहकार्य, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांचे नियोजन, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, यावल आदिवासी प्रकल्प कार्यालय, जिल्हा नियोजन समितीच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणेच्या उत्कृष्ट कामामुळे निधी खर्चात जिल्हा राज्यात प्रथम आहे‌. 

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी कालमर्यादेत खर्च करण्यासाठी नियोजन समितीने १ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२३ असा १०० दिवसांचा कालबध्द कार्यक्रम आखला. या कालबध्द कार्यक्रमात प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश व निधी प्राप्त करून खर्च करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी वेळोवेळी दिल्या होत्या यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजात गतिमानता आली. 

प्राप्त निधी व अर्थसंकल्पीत निधीचे खर्चाच्या टक्केवारीच्या रॅंक मध्ये जळगाव राज्यात प्रथम आहे. 

निधी वितरित कामांचे कार्यारंभ आदेश काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. कार्यान्वयन यंत्रणांनी वेळेत गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर द्यावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. 

                                                  ०००००००००००००

Monday, 6 November 2023

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 57 तक्रार अर्ज प्राप्त





            जळगाव,दि.6 नोव्हेंबर (जिमाका) - जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज ५७ तक्रार अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. आज जिल्हास्तरीय लोकशाही दिनात महसुल विभाग - १२, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था - ३५ ,जिल्हा पोलीस अधिक्षक - १,जिल्हा परिषद - ५ , जिल्हा भूमी अभिलेख - ३, जिल्हा जात पडताळणी विभाग - १ अशा एकूण ५७ तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.

            जळगाव जिल्ह्यात तालुका स्तरावर दर महिन्याला तिस-या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजीत करणे आवश्यक असून तालुका स्तवरावर लोकशाही दिनाचे आयोजन होत नसल्यामुळे जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात तालुकास्तरावरील तक्रारी मोठया प्रमाणात प्राप्त होत आहेत. तेव्हा नागरिकांनी तालुक्याशी संबंधित तक्रारीबाबत तालुकास्तरीय लोकशाही दिन दर महिन्याला तिस-या सोमवारी आयोजित करण्यात येणा-या लोकशाही दिनात प्रथमतः संबधित तहसिलदार यांचेकडेस तक्रार दाखल करावी व सदर तक्रारी बाबत एक महिन्याच्या आत निपटारा न झाल्यास जिल्हा लोकशाही दिनात तक्रार दाखल करतांना तालुका स्तरावर दाखल केलेल्या अर्जाची प्रत जोडण्यात यावी. त्याशिवाय जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज स्विकारले जाणार नाहीत. असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

                                       ०००००००००००००                                                                                                                                                                                                                                                                                                 

Thursday, 2 November 2023

राष्ट्रीय महामार्ग लवादाची जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली कार्यपध्दती कामकाजात पारदर्शकता व खटल्यांचा जलद निपटारा लवाद प्रशासन होणार गतिमान

            जळगाव,दि.२ नोव्हेंबर (जिमाका) - जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग लवादाची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कामकाजाची कार्यपध्दती जाहीर केली आहे. अशा प्रकारची कार्यपध्दती जळगाव जिल्हा लवादासाठी  प्रथमच जाहीर झाली आहे. यामुळे कामकाजात पारदर्शकता येऊन खटल्यांचा जलद निपटारा होणार असून लवाद प्रशासन गतिमान होणार आहे.

            राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, १९५६ अन्वये जिल्हाधिकारी जळगाव यांची लवाद, राष्ट्रीय महामार्ग म्हणून नियुक्ती केलेली आहे. लवाद आणि सामंजस्य कायदा 1996 (Arbitration and Conciliation Act 1996) मधील तरतुदीनुसार लवादास त्यांच्यासमक्ष चालविण्यात येणाऱ्या लवाद प्रकरणी स्वतःची कार्यपद्धती निश्चित करण्यासंबंधीचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. या अधिकारांचा वापर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कार्यपध्दती जाहीर केली आहे.

लवाद कक्ष :-

१.राष्ट्रीय महामार्गासाठीच्या भूसंपादनासंदर्भात लवाद अर्ज दाखल करावयाचा असल्यास

तो अर्ज जिल्हाधिकारी जळगाव तथा लवाद, राष्ट्रीय महामार्ग यांच्या कार्यालय कार्यान्वित असलेल्या लवाद कक्षामध्ये टपाल शाखेमार्फत दाखल करून घेण्यात येईल.

२.लवाद कक्षाचे कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय परीसरातील इमारतीतील लवाद

कक्षामधून चालविण्यात येईल.

३.राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणे लवाद अर्ज दाखल करून घेणे, त्या अर्जाची छाननी करून नोंदवून घेणे व त्यास नोंदणी क्रमांक देणे, लवाद अर्ज वेळोवेळी लवाद तथा जिल्हाधिकारी राष्ट्रीय महामार्ग यांच्या समक्ष सुनावणीसाठी सादर करणे व लवाद, राष्ट्रीय महामार्ग यांच्या आदेशाप्रमाणे सर्व लवाद अर्जामध्ये वेळोवेळी यथायोग्य कायदेशीर कार्यवाही पार पडण्याची जबाबदारी लवाद कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर राहील.

लवादाच्या सुनावणीचे ठिकाण व वेळ

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील न्यायदालनात सदर परिपत्रकाच्या क्र.४ मधील xi आणि xil मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रकरणी तशी सुनावणीची नोटीस दिल्यानंतर दर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी सकाळी ११ वाजता लवाद प्रकरणी सुनावणीची कार्यवाही करण्यात येईल.

कामकाजाची भाषा

लवाद अर्जाचे कामकाज प्राधान्याने मराठी भाषेतून चालविण्यात येईल.

कार्यपद्धती

 

१.सर्व लवाद अर्ज विहित नमुन्यात व विहित मुदतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टपाल शाखेमार्फत दाखल करण्यात यावे.

२.सर्व वकीलपत्रास, शपथपत्रास आवश्यकतेनुसार विहित केलेली कोर्ट फी स्टॅम्पच्या स्वरूपात जोडण्यात यावी.

३.लवाद अर्ज लवाद कक्षामध्ये प्राप्त झाल्यानंतर सदर अर्जाची छाननी लवाद कक्षातील अधिकारी व कर्मचारी हे करतील व छाननीनंतर लवाद अर्जामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास सदरच्या त्रुटी लवाद अर्जदार किंवा त्यांचे विधीज्ञ यांना समक्ष तीन दिवसांत कळविण्यात येतील व सदर त्रुटींची पूर्तता सर्व संबंधित अर्जदारांनी पुढील सात दिवसांत करावी.

४.परिपूर्ण असलेल्या लवाद अर्जाची रितसर नोंदणी लवाद कक्षामार्फत करण्यात येईल व प्रत्यके लवाद अर्जास स्वतंत्र नोंदणी क्रमांक देण्यात येईल.

५.लवाद राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या व भविष्यात दाखल करण्यात येणाऱ्या सर्व लवाद अर्जासंबंधीची नोंद स्वतंत्ररित्या लवाद कक्षामध्ये घेण्यात येईल.

६.परिपूर्ण लवाद अर्ज सुनावणी प्रक्रियेमध्ये लवाद कक्षातर्फे, लवाद तथा जिल्हाधिकारी राष्ट्रीय महामार्ग यांच्या समक्ष सादर करण्यात येईल. सदर प्रक्रियेदरम्यान लवाद यांच्या आदेशानुसार प्रथमतः सर्व संबंधितांना व प्रतिवादींना लेखी म्हणणे दाखल कण्यासाठी नोटीस बजाविण्यात येईल.

७.लवाद अर्जाचे प्रतिवादी, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग किंवा इतर संबंधित यंत्रणा हे लवाद प्रकरणात स्वतः किंवा विधीज्ञामार्फत हजर झाल्यानंतर लवाद अर्जाची व त्यासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची प्रत प्रतिवादीस व प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग किंवा इतर संबंधित यंत्रणा यांना पुरविण्यात येईल.

८.तद्नंतर लवाद अर्जातील सर्व प्रतिवादींनी त्यांचे लेखी म्हणणे व आवश्यकतेनुसार अनुषंगिक सर्व कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती लवाद कक्षामध्ये दाखल कराव्यात व त्याची प्रत संबंधित लवाद अर्जदारास किंवा त्यांच्या विधीज्ञांस पुरविण्यात यावी व त्याची पोच लवाद कक्षातील कर्मचाऱ्यांनी मूळ संचिकेमध्ये समाविष्ट करावी.

९.प्रतिवादींनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केल्यानंतर अर्जदार यांनी त्यांचे Claim Affidavit शीघ्रतेने दाखल करावे. अर्जदारांनी त्यांचा पुरावा बंद करण्यासंबंधीची पुरसिस दाखल करावी.

१०.तद्नंतर प्रतिवादीतर्फे त्यांचे Counter Affidvait दाखल करून घेण्यात येईल व प्रतिवादींनी पुरावा बंद करण्यासंबंधीची पुरसिस दाखल केल्यानंतर प्रतिवादींचा पुरावा बंद करण्यात येईल.

११.प्रत्येक लवाद अर्जामध्ये सर्व संबंधितांचे प्राथमिक लेखी म्हणणे प्राप्त झाल्यानंतर ते एक तक्ता स्वरुपात वादी व प्रतिवादी यांना समक्ष दाखविण्यात येईल. याबाबत वादी अगर प्रतिवादी यांना कोणत्याही प्रकारचा आक्षेप असल्यास त्याबाबतचे अतिरिक्त लेखी म्हणणे सादर करण्याकामी १५ दिवसांची मुदत देण्यात येईल. अशी प्रक्रिया जोपर्यंत वादी व प्रतिवादी यांची कोणत्याही प्रकारची हरकत राहणार नाही तोपर्यंत अवलंबण्यात येईल व अंतिमतः समाधानकारकपणे पूर्तता झाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल.

१२.यानंतर अशी कार्यवाही पूर्ण झालेल्या प्रकरणांची उक्त अधिनियमाच्या कलम 19 व 24 नुसार प्रकरणपरत्वे आवश्यकतेनुसार किंवा वादी / प्रतिवादी यांनी तशी मागणी केल्यास सुनावणी आयोजित करण्यात येईल. सुनावणीवेळी वादी व प्रतिवादी यांचे विधी अधिकारी यांचे तोंडी युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर गुणवत्तेनुसार प्रकरण निकालासाठी राखून ठेवण्यात येतील व अर्जदार व प्रतिवादीच्या लेखी पुराव्यांचे अवलोकन करून प्रकरणपरत्वे निर्णय पारित करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

१३.वाद प्रकरणात कोणताही तोंडी पुरावा नोंदवून घेतला जाणार नाही. केवळ अर्जदार व प्रतिवादी यांनी दाखल केलेले Claim Affidavit व counter Affidavit तसेच संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित अथवा प्रमाणित प्रती दाखल करून घेतल्या जातील.

१४.लवाद प्रकरणात आवश्यकतेनुसार प्रकरणाधीन मिळकतीचे फेरपाहणी फेरमूल्यांकन, फेरमोजणी व इतर अनुषंगिक अंतरिम आदेश प्रकरणपरत्वे लवाद, राष्ट्रीय महामार्ग हे पारित करतील. सदरचे अंतरिम आदेश दोन्ही पक्षकारांवर बंधनकारक राहतील.

१५.राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणासाठी लवाद म्हणून जिल्हाधिकारी जळगाव यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने जर विद्यमान जिल्हाधिकारी यांची इतरत्र बदली झाल्यास सर्व लवाद प्रकरणांची नूतन जिल्हाधिकारी यांच्या समक्ष प्रकरणपरत्वे सुनावणी घेण्यात येईल.

१६. लवादाचे कामकाज जिल्हाधिकारी जळगाव हे शासकीय अधिकारी या नात्याने न करता स्वतंत्र लवाद म्हणून कामकाज पार पाडतील.

१७.जिल्हाधिकारी जळगाव तथा लवाद, राष्ट्रीय महामार्ग यांचा लवाद अर्जातील कोणत्याही पक्षकाराशी हितसंबंध नाही. लवाद प्रकरणातील कार्यवाहीसंबंधी कोणत्याही पक्षकारास अथवा विधीज्ञास प्रकरणाशी संबंधित कोणत्याही कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतीची आवश्यकता असल्यास Attendance Certificate किंवा रोजनाम्याच्या प्रमाणित प्रतीची आवश्यकता भासल्यास त्यांनी त्यासंबंधीचा अर्ज लवाद कक्षामध्ये (जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टपाल शाखेमार्फत दाखल करावा व विहित शुल्क भरून प्रमाणित प्रत अथवा प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.

१८.सर्व लवाद प्रकरणांची सुनावणी आवश्यकतेनुसार आणि तशी नोटीस दिल्यानंतर दर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी सकाळी ११.०० वा. सुरु करण्यात येईल व शक्यतो प्रत्येक लवाद अर्जावर साधारणपणे एका वर्षात यथायोग्य निर्णय घेवून 'लवाद निर्णय' घोषित करण्यात येईल.

१९. न्यायालयीन आदेशांव्यतिरिक्त इतर वेळी सर्वसामान्य परीस्थितीत सर्व प्रकरणांच्या बाबतीत केस बोर्ड तयार करताना Chronological order नुसार तयार करून म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात येईल आणि ज्या क्रमाने क्र.xi मध्ये नमुद प्रक्रिया किंवा प्रकरणपरत्वे क्र.xii मध्ये नमुद प्रमाणे लवादाची सुनावणीची प्रक्रिया पुर्ण होईल त्या क्रमाने आदेश पारित करण्याची कारवाई करण्यात येईल.

२०.जिल्हाधिकारी तथा लवाद हे लवाद अर्ज प्रकरणांच्या सुनावणी किंवा इतर कोणत्याही टप्प्यावर न्यायालयीन आदेश किंवा प्रकरणांची गरज म्हणून आवश्यकतेनुसार विशेष बाब म्हणून प्रकरणांच्या छाननीकामी / तपासणीकामी / स्थळ निरीक्षणकामी किंवा अन्य कोणत्याही कामकाजाकरीता जिल्ह्यातील कोणत्याही महसूल अधिकारी यांची मदत घेतील.

०००००००००००००००

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन २०२२-२३ व २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे आवाहन

         जळगाव, दि. २ नोव्हेंबर (जिमाका) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, यांच्या कार्याचे,  योगादानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा, प्रोत्साहन मिळावे व क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी. या उद्देशाने देण्यात येणारा जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ व २०२३ -२४ साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

 जिल्हा क्रीडा पुरस्कार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार नियमावली, शासन निर्णय- दि. २ मार्च, २०२३ www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार – एक, पुरस्कार वर्ष – २०२२-२३, व २०२३-२४, कालावधीतील कामगीरी ग्राह्य धरली जाईल- दि. १ जुलै, २०११ ते दि. ३० जुन, २०२१ व दि. १ जुलै, २०१२ ते दि. ३० जुन, २०२२ , गुणवंत खेळाडू पुरस्कार – तीन जणांना दिला जाणार आहे. यात महिला, पुरुष व दिव्यांग खेळाडूंना दिला जाणार आहे. पुरस्कार वर्ष – २०२२-२३, व २०२३-२४ दि. १ जुलै, २०१७ ते दि. ३० जून, २०२२ आहे.

या व्यतिरीक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना शासन निर्णयानुसार थेटचे पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कारार्थी यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख  रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सन २०२२-२३ व २०२३-२४ च्या पुरस्काराकरिता दि. १ जुलै ते दि. ३० जुन पर्यन्त कामगिरी, कार्य ग्राह्य धरण्यात येईल.  जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२२ -२३ व २०२३ -२४ अर्ज भरण्याचा कालावधी ४ ते २० नोव्हेंबर, २०२३, अर्जदाराने ऑनलाईन हार्ड कॉपी कार्यालयात २० नोव्हेंबर,२०२३ पर्यंत सादर करावी‌ अर्जाबाबत अधिक व माहिती करीता श्रीमती सुजाता गुल्हाने - ९७६३२३११४६ संपर्क साधावा. विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयातून प्राप्त करुन घेण्याकरीता व पुरस्काराच्या अटी व शर्ती इतर माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, विहित मुदतीत प्रस्ताव अर्जदाराने या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सादर करावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

०००००००

आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्ह्यातील ४९ आश्रमशाळेतील १२१२ स्पर्धेकांचा समावेश


         जळगाव, दि.२ नोव्हेंबर (जिमाका) - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जिल्हा जळगाव अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ अनुदानित आश्रमशाळा सत्रासेन तालुका चोपडा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. सदर क्रीडा स्पर्धेसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून १७ शासकीय व ३२ अनुदानित आश्रमशाळेतील एकूण ६८१ मुले व ५३१‌ मुली असे एकूण १२१२ स्पर्धक खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले.

या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत दिनांक २९ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत यावल, चोपडा, चाळीसगाव, अमळनेर या चारही बीट मधील सर्व सांघिक साखळी सामने पार पडले. खो-खो, कबड्डी, हँडबॉल, हॉलीबॉल, रिले या खेळ प्रकारांचा समावेश होता. सकाळच्या सत्रात वयवर्ष १४, १७, १९ वयोगटातील मुली तसेच दुपारच्या सत्रात मुलांच्या धावणे (१००मीटर २०० मीटर ४०० मीटर ६०० मीटर ८००मीटर १५०० मीटर, ३०००मीटर ) तसेच फेकी (गोळा)थाळी व भाला) स्पर्धा घेण्यात आल्या.

दिनांक ३१ रोजी सर्व सांघिक स्पर्धांचे अंतिम सामने पार पडले. यात सर्वसाधारण जेतेपद प्रथम क्रमांक चोपडा बीट, द्वितीय चाळीसगाव, तृतीय यावल व चौथा अमळनेर बीट यांनी पटकावला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे कार्यक्रमास येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी न आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत भ्रमणध्वनी द्वारे मुलांना मार्गदर्शन केले. नाशिक अप्पर आयुक्त संदीपजी गोलाईत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे रवींद्र नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव, निलय राठोड जात प्रमाणपत्र पडताळणी समिती धुळे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच प्रकल्पाधिकारी यावल अरुण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धांच्या बक्षीस वितरण व समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सर्व प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. नाशिक येथील अपर आयुक्त संदीप गोलाईत म्हणाले की, क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंनी आपआपले नावलौकिक करावे. शासनाच्या विविध योजनांचा फायदा घ्यावा. देशसेवेकडे कल असणाऱ्यांनी यातून धडे घ्यावेत. असे प्रतिपादित केले.

००००००००

Wednesday, 1 November 2023

जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी विशेष मोहीम राबवावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कुत्रा व मांजरींचे पालकत्व घेण्याचे आवाहन प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठक संपन्न

 



            जळगाव, दि. ०१ नोव्हेंबर (जिमाका) - जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे विशेष मोहिम राबवावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या. त्याचबरोबर प्राणीप्रेमी नागरिकांनी कुत्रा व मांजरींचे पालकत्व घ्यावे. असे आवाहन  जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

जिल्हा प्राणी क्रूरता क्लेष प्रतिबंधक सोसायटीची बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्यामकांत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे तसेच जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, शहर पातळीवर मनपा, नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणबाबतची विशेष मोहीम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करावी. गावपातळीवर ही मोहीम ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध निधीतून राबविण्यात यावी. कत्तलखान्यामधे कत्तलीकरिता येणाऱ्या जनावरांचे स्टिंग करुन कत्तल करावेत. नागरिकांनी मुक्या प्राण्यांवर प्रेम व दया भावना दाखवावी. वाहतुकीकरिता येणारे जाणारे जनावरांना मारहाण, चटके देणे, जखमा किंवा कुठल्याही प्रकारची छळवणूक होत असेल तर संबधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

बैलगाडीला टायरचे चाके लावल्यास बैलांना कष्ट कमी होतील. जळगाव शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने बैलगाडी बनविणाऱ्या कारागीरांना अशाप्रकारचे मॉडेल तयार करुन द्यावे. असे ही त्यांनी सांगितले. श्री.प्रसाद म्हणाले की, पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यात पेट शॉप तसेच डॉग ब्रिडर यांची अधिकृत नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे. पशुकल्याणा बाबत जनजागृती करण्यात यावी. जिल्ह्यात मांजरी दत्तक घेणेबाबत आवाहन करुन पालकत्व स्विकारण्यास प्रोत्साहित करावे. जिल्हयातील २१ गोशाळेंचा आढावा घेण्यात आला.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी संयुक्तपणे जिल्ह्यातील तालुकानिहाय उपलब्ध असलेला चारा आवश्यकता व उपलब्धता याबाबतचा अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील सर्व गुरे व म्हैस बाजारात खरेदी विक्री करतांना शासन अधिकृत बारा अंकी बिल्ला ( जनावरांचे आधार कार्ड ) मारुनच खरेदी विक्री व्यवहार करावेत. अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी यावेळी दिल्या.

००००००००००००००


जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

             मुंबई दि. 1 : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करणारा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांतदादा पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, गिरीश महाजन, दादाजी भुसे, विधान परिषदेचे  विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार,  विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री जयंत पाटील, नाना पटोले, सुनील तटकरे, अनिल परब, सुनिल प्रभू, आशिष शेलार, राजेश टोपे, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे, बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, राजू पाटील, कपिल पाटील, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, डॉ प्रशांत इंगळे, कुमार सुशील, बाळकृष्ण  लेंगरे, आदी उपस्थित होते. याशिवाय मुख्य सचिव मनोज सौनिक, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या ठरावात पुढे असे म्हटले आहे की, मराठा आरक्षणाविषयी कायदेशीर कार्यवाही  शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे, हे आंदोलकांनीही समजून घ्यावे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून आम्ही त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कुणबी प्रमाणपत्रांबाबत तातडीने अंमलबजावणी सुरु - मुख्यमंत्री श्री. शिंदे

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विषयक घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, सरकार प्राधान्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकडे लक्ष देत असून, महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये सलोख्याची संस्कृती टिकवणे महत्वाचे आहे. आपल्या सगळ्यांचा उद्देश मराठा समाजाला आरक्षण देण्याचा असून, सर्व पक्ष संघटनांनी आपआपल्या भागात या विषयी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितले पाहिजे. एकीकडे आपण सर्वोच्च न्यायालयात क्युरिएटेव्ह याचिकेद्वारे राज्य शासनाची भूमिका भक्कमपणे मांडत आहोत. त्यासाठी न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ नियुक्त केले आहे. दुसरीकडे आपण मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे निर्देशही दिले आहेत.

पूर्वीच्या त्रुटी दूर करून टिकणारे आरक्षण देणार

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने पुर्वी ज्या कारणांमुळे आणि त्रुटींमुळे रद्द केले होते, तसेच जी निरिक्षणे नोंदविली होती. त्या त्रुटी आता नव्याने डाटा गोळा करताना होणार नाहीत, याची संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. या पावलांमुळे न्यायालयात टिकणारे असे आरक्षण मराठा समाजाला मिळू शकेल, अशी खात्री आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर तत्काळ या संदर्भातील शासन आदेश काढण्यात आला असून सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना कालच व्हिसीद्वारे कुणबी नोंदी असलेल्यांना तातडीने प्रमाणपत्रे देण्याचे निर्देश दिले आहेत. मोडी लिपीतील आणि उर्दू भाषेतील कागदपत्रांचे भाषांतर करून, डिजीटाईझ करण्यासाठी व पब्लिक डोमेनवर आणून त्याआधारे कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी देखील न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्यात येतील तसेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून त्रुटी नसलेला, परिपूर्ण डाटा विहित कालावधीत गोळा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी देखील न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती दिली. प्रारंभी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. भांगे यांनी न्या. संदीप शिंदे समितीने आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच जिल्हाधिकारी व सर्व तहसीलदार यांना कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे सांगितले.

बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते श्री. दानवे, विधान सभेतील विरोधी पक्ष नेते श्री. वड्डेटीवार तसेच इतर उपस्थित पक्षांच्या प्रतिनिधींनी आपल्या सूचना मांडल्या.

00000

 











एरंडोल शहरात साकारतोय 'पुस्तकांचा बगीचा'

राज्यातील पहिलाच उपक्रम :

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पालिकेकडून उभारणी

       जळगाव,‌दि.१ नोव्हेंबर (जिमाका) - आपण वनस्पतीचे गार्डन पाहतो, फुलांचा बगीचा पाहिला असेल. मात्र एरंडोल नगरपरिषदेने तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगीचा साकारला आहे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी हा प्रयोग आदर्श ठरू शकणार आहे. राज्यातला अशा प्रकारचा पुस्तकांचा एकमेव बगीचा आहे हे विशेष !

आपण विविध प्रकारचे गार्डन पाहता, मात्र एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून वाचन संस्कृती टिकून राहावी, त्यात वाढ व्हावी या उद्देशाने शहरात पुस्तकांच्या बगीच्याची निर्मिती केली आहे. हा बगीचा एरंडोल शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

३३ गुठ्यांत साकारणार पुस्तक बगीचा

शहरातील आनंद नगर भागात 33 गुंठे  म्हणजेच बीघा भर जागेत पुस्तकांचा बगीचा साकारला जातो आहे. या नाविन्यपूर्ण गार्डनमधे विविध प्रकारचे पुस्तक उपलध्द असणार आहेत. ठिकठिकाणी पुस्तकांचे बाॅक्स आहेत.  पुस्तक वाचनासाठी आठ वाचन कट्टे बांधले आहेत. बगीच्यात पुर्णत: निसर्गरम्य वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. गार्डन मधे प्रत्येक मोठ्या झाडाखाली पुस्तकाचा बॉक्स आहेत. तेथून पुस्तक काढून तुम्हांला ते झाडाखाली बांधण्यात आलेल्या ओट्यावर बसून पुस्तक वाचता येणार आहे.

बगीच्यात सर्वकाही

या पुस्तकांच्या बगीच्यात ग्रीन लॉन व विविध सुगंधीत फुलझाड आहेत. त्यातुन वातावरण सुगंधीमय होणार आहे. भिंतीवर विचारवंताचे पुस्तकात व्यक्त केलेले विचार चित्रीत करण्यात आले आहेत. तर ठिकठिकाणी कवितांचे पोर्ट्रेट करण्यात आले आहे. ग्रीन जीमची ही व्यवस्था करण्यात आली आहे. पुस्तक व वृक्ष यावर आधारीत भितीचित्र रंगविण्यात आले आहे. कवयित्री बहीणाबाईच्या कवितेसह पुस्तकांचे भव्य शिल्प उभारण्यात आले आहे. याबरोबरच पुस्तक प्रेमी वाचक प्रतीत करणारे पुतळे करण्यात आले आहे.

जेष्ठासाठी विशेष सोयी

म्हातारपणात माणस ही बगीच्यातच अधिक रमतात. त्यादृष्टीने पालिकेने नाना-नानी पार्क ची व्यवस्था करण्यात आली आहे. या गार्डन मधे लहानपासुन वयोवृद्धापर्यंत सर्वांच्या गरजा लक्षात घेण्यात आले आहे हे विशेष. कथा, कादंबरी, विविध चरित्र, कवितासंग्रह, विविध स्पर्धा परीक्षांचे पुस्तक येथे उपलध्द असणार आहे. याबरोबरच पुस्तकाचे सेल्फी पॉईंट ही तयार करण्यात आला आहे.

राज्यातला पहीलाच प्रयोग

            एरंडोल नगरपरीषदेने साकारलेला पुस्तकांचा बगीचा हा राज्यातला पहीलाच प्रयोग आहे. हा नाविन्यपूर्ण बगीचा निश्चितच वाचन संस्कृती व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. या बागेची रचना ही सगळ्याच घटकांचा विचार करून करण्यात आली आहे. हा बगीचा राज्यासाठी आदर्श ठरणार आहे हे निश्चित! एरंडोल वासीयांसाठी हे गार्डन पर्वणीच ठरणार आहे. या बगीच्याचीच सर्वत्र चर्चा सध्या कानी पडत आहे.

"शहरातील नागरीकांमधे वाचन संस्कृती वृध्दिगंत व्हावी या उद्देशाने या पुस्तक बागेची निर्मिती करण्यात येत आहे. लहानांपासून वृध्दांपर्यंत सर्व जण पुस्तक वाचन करू शकतील अशी पुस्तक व व्यवस्था करण्यात आलेली आहे. लवकरच हा बगीचा नागरिकांसाठी हे गार्डन खुले होणार आहे" - विकास नवाळे, मुख्याधिकारी एरंडोल नगरपरीषद

०००००००००