Monday, 30 December 2024

जळगाव जिल्हयातील अवैध वाळु उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी ग्रामदक्षता समितीची बैठक संपन्न






      जळगाव, दिनांक 30 डिसेंबर (जिमाका वृत्त ) :  महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर होणारे हल्ले व अवैध वाळु वाहतुकीदरम्यान होणा-या अपघांतावर नियंत्रण आणण्यासाठी   ग्रामदक्षता समितीच्या  सदस्यांची बैठक  30 डिसेंबर  रोजी जळगाव येथील जिल्हा नियोजन समिती  येथे संपन्न झाली. यात ग्राम दक्षता समितीने अवैध उत्खनन रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचा जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले असून प्रशासनाकडून ग्राम दक्षता समितीस पूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले.

   या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर    जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे, उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे उपस्थित होते.

              जळगाव जिल्हयात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकामी स्थापन करण्यात आलेल्या महसुल विभागातील पथकातील अधिकारी / कर्मचारी यांच्यावर मोठ्याप्रमाणात हल्ले होत आहेत. तसेच अवैध बाळु उत्खनन व वाहतुकीदरम्यान महामार्ग व इतर रस्त्यावर अवैध वाळूचे डंपर, ट्रॅक्टर यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावरील उपयोजनाकरिता या बैठकित चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्राम दक्षता समितीने  गौणखनिज रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनीही पोलिसांना याबाबत कारवाई करण्याबाबत तसेच ग्रामदक्षता समितीला मदत करण्याबाबतच्या सूचना दिल्या.

            जळगाव जिल्हयातील जळगाव, एरंडोल, धरणगाव, मुक्ताईनगर, अमळनेर,  पाचोरा, भडगाव, चाळिसगाव या तालुक्यातील  गावांच्या तलाठी व पोलिस पाटील,  तहसिलदार,  ग्रामसेवक व सरपंच तसेच  संबंधित तहसिलदार, गटविकास अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव, पोलिस निरीक्षक या बैठकीला उपस्थित होते. याप्रसंगी सर्व गावातील सरपंच यांना सुचना देण्यात आल्या. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली.

000000000000

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेचे ऑनलाईन प्रस्ताव स्विकारण्यासाठी 5 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

           जळगाव, दिनांक 30 डिसेंबर (जिमाका वृत्त ) :     राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन 2024-25 सर्व स्तरांवर राबविण्यात येत आहेत. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करणे तसेच अभियान व स्पर्धेशी संबंधित सर्व बाबीवर कार्यवाही करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या संकेतस्थळाची लिंक "pragatiabhiyan.maharashtra.gov.in"  ही आहे.  या पोर्टलवर सर्व स्तरावरील स्पर्धेचे प्रस्ताव सादर करणे, प्रस्तावांची छाननी तसेच स्पर्धेशी संबंधित कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे.

            तसेच या योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पेर्धेसाठी सर्व स्तरावर प्रस्ताव स्विकारण्याची मुदत दि. 16 ते 31 ऑक्टोबर 2024 अशी होती. मात्र आता स्पेर्धेसाठी ऑनलाईन प्रस्ताव स्विकारण्यासाठी दि. 05 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे 5 जानेवारी पर्यंत  "राजीव गांधी प्रशासकीय गतिमान (प्रगती) अभियान व स्पर्धा" या योजनेत सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

००००००००००

जळगावच्या एमआयडीसीतील चटई कंपनीस लागलेली आग आटोक्यात ; जिल्हाधिकारींनी पाहणी करत दिल्या सूचना

 





            जळगाव, दिनांक 30 डिसेंबर (जिमाका वृत्त ) :  जळगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील सिद्धिविनायक इंडस्ट्रियल डी 66/1 येथील प्लास्टिक चटई कंपनी व सूर्यफूल बियाणे असलेल्या कंपनीला रविवार (दि.29) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास  भीषण आगीत लागली. घटनेची  माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटना स्थळी पाचारण केले. घटना स्थळी पोहचताच  आगेवर फोम व पाणीचा मारा करत अग्निशमन कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणली.   जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांच्या तीन गाड्या, जामनेर नगरपालिका ,भुसावळ नगरपालिका ,वरणगाव नगरपालिका, वरणगाव ऑडनस फॅक्टरी, भुसावळ ऑडनस फॅक्टरी व जैन इरिगेशन दोन गाड्याच्या साह्याने (फायर फायटर)आगेवर नियंत्रण मिळवणे लवकर शक्य झाले. सकाळी 5 वाजेपर्यंत अग्निशमन कार्य सुरू होते. या आगीत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

            जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी,श्री.भीमराज दराडे, उपअधीक्षक (गृह) श्री  संदीप,  अग्नीशमन अधिकारी  मनपा श्री.शशिकांत बारी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.नरवीर रावळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली व कर्मचाऱ्यांना सुचना केल्या.  जिल्हाधिकारी यांनी   स्वतः पाहणी करून सुप्रीम कंपनीच्या क्रेन द्वारे कंपनीच्या दोन्ही बाजूच्या भिंती पाडून आतील सूर्यफुल बियाणे आणि चटईसाठी लागणाऱ्या  प्लास्टिकच्या कच्च्या मालाला व ग्रँन्यूअलला लागलेल्या आगीवर  नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले.

             आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी  /कर्मचारी श्री. शशिकांत बारी सर अग्निशमन अधिकारी, श्री. अश्वजीत घरडे , वाहन चालक निवांत इंगळे , वाहन चालक देविदास सुरवाडे, वाहन चालक नंदकिशोर खडके, वाहन चालक नासिर अलीदादा , वाहन चालक संजय भोईटे,भारत बारी ,विजय पाटील, पन्नालाल सोनवणे, तेजस जोशी,मनोज तिरवड, हर्ष शिंदे ,नितीन ससाने, निलेश सुर्वे,  गिरीश खडके, सरदार पाटील, योगेश कोल्हे या सर्वांनी आग विझवण्यास मदत केली.

0000000000


Friday, 27 December 2024

बांधकाम कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी आता जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु तालुका कामगार सुविधा केंद्रात कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज स्वीकारले जाणार

         जळगाव, दिनांक 27 डिसेंबर (जिमाका वृत्त ) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभवाटपाचे कामकाज करण्यात येते. ही बांधकाम कामगार नोंदणीची प्रक्रिया फक्त १ रूपयात होत असतानाही ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली एजेंट बांधकाम कामगारांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या फसवणूक प्रकरणाला आला बसावा यासाठी आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन नोंदणीचे सर्व अधिकार स्वत:कडे घेतले आहेत.

                  प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता कामगाराला तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात स्वतः जाऊन नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज सादर करावे लागणार आहे. यामुळे फसवणुकीच्या प्रकरणाला आळा बसणार आहे.

                 तालुका कामगार सुविधा केंद्रात कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तालुका कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित कामगाराचे अंगठ्याचे ठसे व प्रत्यक्ष फोटो घेऊन तो कामगार पात्र ठरला की अपात्र हे त्याच ठिकाणी सांगितले जाणार आहे.

              ही सर्व नोंदणी प्रकिया मोफत असून एजंट/त्रयस्थ व्यक्ती यांच्या अमिषाला अथवा भूलथापांना बळी न पडता थेट कामगारांनी तालुका कार्यालयात जाऊन १/- रूपया नोंदणी फी भरुन नोंदणी करावी. व एजंट/त्रयस्थ व्यक्तींनी पैशाची मागणी केल्यास त्यांच्या विरोधात जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त डॉ. रा.दे. गुल्हाने यांनी एका प्रसिद्धीपत्रद्वारे केले आहे.

0000000000

Thursday, 26 December 2024

जळगाव जिल्ह्यात स्वामीत्व योजने अंतर्गत २७ डिसेंबर रोजी सनद वाटप कार्यक्रमाचे आयोजन

                 जळगाव दि. 26 ( जिमाका ): - मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे  ५० लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करताना लाभाथ्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात जळगाव जिल्हयात स्वामित्व योजने अंतर्गत ६० गांवामध्ये सनद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

          राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांचे वतीने स्वामित्व (SVAMITVA) योजनेची अमंलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेद्वारे गावातील मिळकत धारकाला मालमत्ता पत्रक उपलब्ध करून देतांना संबधित मिळकत धारकाला दस्तऐवजाचा हक्क प्रदान करण्यात येणार आहे.

       जळगाव जिल्हयातील सर्व गावांचे गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करणे,गावातील मालमत्तांचे जी.आय.एस. प्रणालीवर आधारीत मालमत्ता पत्रक तयार करणे, हे स्वामीत्व योजनेचे स्वरूप आहे.

      जळगाव जिल्हयात स्वामीत्व योजने अंतर्गत चोपडा तालुक्यातील २ गावे, यावल तालुक्यातील ५ गावे, मुक्ताईनगर तालुक्यातील ६ गावे, बोदवड तालुक्यातील १६ गावे, भुसावळ तालुक्यातील ३ गावे, जळगाव तालुक्यातील १ गावे, पाचोरा तालुक्यात २७ गावे, असे एकुण ६० गावांमध्ये सनद वाटप करण्यात येणार आहे. तरी गावातील जास्तीत जास्त नागरीकांना स्वामीत्व योजने अंतर्गतचे मालकी हक्काचे सनद प्राप्त करून घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख  एम. पी. मगर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

०००००००००

5 जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या MPSC परिक्षेचे आता 2 फेब्रुवारी रोजी आयोजन

                  जळगाव दि. 26 ( जिमाका ):- महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 दि. 05 जानेवारी, 2025  रोजी घेण्यात येणार होती. मात्र ही परिक्षा आयोगाच्या प्रसिध्दीपत्रकानुसार दिनांक 02 फेब्रुवारी, 2025 रोजी घेण्यात येणार आहे. 05 जानेवारी रोजी घेण्यात येणारी परिक्षा आता  पुढे ढकलण्यात आली आहे.

        महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2024 निर्गमित करण्यात आलेल्या पत्रानुसार जळगाव मुख्यालयात खालील सर्व परीक्षा उपकेंद्रावर दि. 02 फेब्रुवारी, 2025 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

मूळजी जेठा महाविदयालय, स्वामी विवेकानंद भवन, 1 ला व तळ मजला, जळगाव, केंद्र क्र. 1 8888085383/9021552949,

मुळजी जेठा महाविदयालय, स्वामी विवेकानंद भवन, 2 रा मजला, जळगाव, केंद्र क्र.2 8888085383/9021552949,

विवेकानंद प्रतिष्ठान इग्लिश मेडीयम स्कुल, ग. न. 176, वाघ नगर, जळगाव. 7350827370,

ओरीयन सीबीएससी इग्लिश मेडीयम स्कुल, एम.जे. कॉलेज कॅम्पस, प्रभात कॉलनी, जळगाव. 9834243675,

रावसाहेब रुपचंद माध्यमिक विद्यालय, जिल्हा पेठ, स्टेट बँक मुख्य शाखेजवळ, जिल्हापेठ, जळगांव. 8830258244, 9423974751, 

सेंट लॉरेन्स हायस्कुल, 515, ढाकेवाडी, पंचमुखी हनुमान मंदिर जवळ, लाठी शाळेच्या मागे, जळगाव 9970895317,

यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालय, स्मशान भूमि जवळ, मेहरुण, जळगांव 9923289974,

काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, एस.टी. वर्कशॉप जवळ, विठ्ठल पेठ, जळगाव. 9823318080,

मिल्लत हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, रीलायन्स पेट्रोल पंप जवळ, NH-6, मेहरुण, जळगांव. 8793568631,

पी.एन. लुंकड कन्या शाळा, चैतन्य नगर, गणेश कॉलनी जवळ, जळगाव. 9158332396,

महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय, प्रेम नगर, पिंप्राळा रोड, जळगाव. 9423487916,

ओ.टी. झांबरे माध्यमिक विदयालय, एम जे कॉलेज जवळ, जळगाव. 9890171542,

डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविदयालय, जिल्हा पेठ, जिल्हा रोड, जळगाव. 9850824370,

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडीअम स्कुल, ख्वॉजामियाँ चौक, जळगांव. 0257-2252455/2251747/9840905610,

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट सिनीअर सेकंडरी स्कुल, सुयोग कॉलनी, एम.जे. कॉलेज जवळ, जळगाव. 8983933848,

शासकीय अभियांत्रिकी महाविदयाल, नॅशनल हायवे नं.6, जळगाव. 8554887653,

एम.ऐ. आर. अँग्लो उर्दू हायस्कुल अॅड हाजी नूर मोहम्मद चाचा ज्यु. कॉलेज, प्रताप नगर, जळगाव. 7020399700,

जी एच रायसोनी इन्स्टिटयूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट, गट न 57/1, शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव. 9657724181/9604010444,

विदया इग्लिश मेडीअम हायस्कुल, डि मार्ट जवळ, मेहरूण, जळगांव 0257-22633330/9561832453/8380877311,

रोझलँड इग्लिश मेडीयम स्कुल, 238, ख्वॉजामिया रोड, जळगाव. 8605049758/8554036455,

इकरा शाहीन उर्दू हायस्कुल, ममता हॉस्पिटल जवळ, मेहरूण, जळगाव. 8087513183/7276742180,

बहिणाबाई माध्यमिक विदयालय, गट नं. 104, भगवान नगर, जळगाव. 7588813316/9403942943,

सेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विदयालय, जिल्हा पेठ, स्टेट बँक मुख्य शाखे जवळ, जळगाव, 9860503324. 

            सदर परीक्षेकरीता जळगाव मुख्यालयातील नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचारी तसेच सदरहू परीक्षा उपकेंद्रातील कर्मचारी यांनी परिक्षेसंदर्भात सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन जळगावच्या तहसिलदार डॉ. ज्योती गुंजाळ यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

००००००००

जळगाव जिल्ह्यात येत्या २७ व २८ डिसेंबर रोजी पावसाचा यलो अलर्ट ! नागरिकांना सतर्कतेचा इशारा

         जळगाव दि. 26 ( जिमाका ):   भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या ईशाऱ्यानुसार जळगाव जिल्ह्यात येत्या २७ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२४ दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

           तसेच दिनांक २७ व २८ डिसेंबर रोजी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक २७ डिसेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह वादळीवारा आणि गारपीटीसह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

          दरम्यान जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून कृतीशिल उपाययोजना कराव्यात. हवामानाबाबत अधिकृत अपडेट्सद्वारे माहिती घ्यावी, आपत्तीत मदतीची गरज भासल्यास जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात टोल फ्री १०७७ किंवा ०२५७-२२१७१९३ किंवा ०२५७-२२२३१८० या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

0000000

Friday, 20 December 2024

नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

                 जळगाव दि. 20 ( जिमाका ) - येथील नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार व एन.सी.सी. युनिट, एम. जे. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा एम.जे. कॉलेज, एन.सी.सी. युनिट येथे 20 डिसेंबर  रोजी संपन्न झाला.

                कार्यक्रमाचे अध्यक्ष कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे यांनी सर्व उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला जिल्हा युवा अधिकारी श्री. नरेंद्र डागर ' माय भारत पोर्टल 'विषयी एन.सी.सी. छात्र सैनिकांना माहिती दिली.

                नशामुक्ती फक्त व्यक्तिशः नाही तर देशाला कसे हानिकारक ठरू शकते तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे नुकसान याविषयी छात्रसैनिक व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून हा संदेश समाजात पोहचवण्याचे आवाहन सी.टी.ओ सोनल उप्लपवार यांनी प्रस्ताविकात केले.

                 एम.जे. कॉलेज मधील मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक प्रा. बालाजी राऊत यांनी 'मोबाईल एडीक्शन ' या विषयावर सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली.

                या कार्यक्रमास 110 छात्रसैनिक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लेखा अधिकारी  श्री अजिंक्य गवळी केले व सूत्रसंचालन सी.टी.ओ. गोविंद पवार यांनी केले.

०००००००००

महाऊर्जास ऊर्जा संवर्धनासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आणि देशात राज्याला प्रथम स्थान


           जळगाव, दि. 20 (जिमाका)  - राज्यात ऊर्जा संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेस ऊर्जा दक्षता ब्यूरो, भारत सरकार, विद्युत मंत्रालय यांच्या मार्फत दि.१४ डिसेंबर रोजी आयोजित "राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२४"

 मधील "राज्य ऊर्जा कार्यक्षमता कामगिरी पुरस्कार" (गट-1)

या वर्गवारीमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त मिळाला आहे.

                ऊर्जा संवर्धन क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी देश पातळीवर हा पुरस्कार देण्यात येतो.  हा पुरस्कार विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून दि. १४ डिसेंबर, २०२४ रोजी झालेल्या एका विशेष कार्यक्रमात उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड़ यांच्या उपस्थितीत नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्या शुभहस्ते महासंचालिका डॉ. श्रीमती कादंबरी बलकवडे, हा पुरस्कार स्विकारला.

                 राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली राज्या मध्ये ऊर्जा संवर्धन व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यात येत आहे.

०००००००००

सोयाबीन व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीसाठी शासनाकडून ३१ डिसेबरपर्यंत मुदतवाढ

                 जळगाव, दि. 20 (जिमाका)- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२४-२५ ज्वारी, मका व बाजरी (भरडधान्य) खरेदी करीता जळगाव जिल्ह्यात पणन महासंघाअंतर्गत एकूण १८ खरेदी केंद्र कार्यरत आहे.  यात अमळनेर, पारोळा, चोपडा, एरंडोल, धरणगांव, पाळधी, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुणीं, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव  याठिकाणी खरेदी केंद्र कार्यरत आहे.

                मंत्री सर्वश्री, गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील,मंत्री संजय सावकारे, जिल्ह्यातील सर्व आमदार,विभागीय संचालक,  उपाध्यक्ष श्री. रोहित दिलीपराव निकम, तसेच संचालक श्री. संजय मुरलीधर पवार यांच्या प्रयत्नाने सोयाबीन व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीसाठी शासनाकडून मुदतवाढ प्राप्त झालेली आहे.

                  भरडधान्य व सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी ३१ डिसेबरपर्यंत शेतकरी नोंदणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ऑनलाईन नोंदणी करीता शेतकऱ्यांना आधारकार्ड, बँक पासबूक व ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, ८अ इ कागदपत्रे आवश्यक आहे.

२०२४-२५ चे हमीभाव  ज्वारी (हायब्रीड) ३३७१ रुपये, मका २२२५ रुपये,  बाजरी २६२५ रुपये,  सोयाबीन ४८९२ रुपये आहेत.

                 भरडधान्य खरेदीसाठी संबंधीत शेतक-यांनी खरेदी केंद्रावर लाईव्ह फोटो देवून नोंदणी पूर्ण करावी आणि शेतकरी बंधुंनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी केले आहे.

०००००००००

तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश

                जळगाव, दि. 20 (जिमाका)-  धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर गुरुवारी  मध्यरात्री अडीचच्या सुमारास  वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आरोपी आबा ईश्वर कोळी, योगेश ईश्वर कोळी, दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी यांनी तलाठी दत्तात्रय पाटील यांच्यावर हल्ला चढवला ज्यात त्यांच्या पायावर फावड्याने वार केल्यामुळे फॅक्चर झाले आहे. या घटनेत तलाठी दत्तात्रय पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

           याप्रकरणी नायब तहसीलदार संदीप मोरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून कलम 109, 132, 121(2), 303(2) 112(2), 189(2), 191, 190 प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

             गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सुचना जिल्हा पोलिस अधिक्षक मा. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व पाळधी दुरक्षेत्र धरणगाव पोलीसांनी चोविस तासाच्या आत गुन्हयातील आरोपी आबा ईश्वर कोळी, योगेश ईश्वर कोळी, दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी यांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच गुन्ह्यात वापरलेले 2 ट्रॅक्टर सुद्धा जप्त करण्यात आले आहे.

प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत वाळू माफियांन विरोधात प्रशासन अधिक कठोर पावले उचलणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील सर्व मंत्री, विभागीय आयुक्त यांनी या घटनेची गंभीर दखल घेत योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

००००००००

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार ;पोलीस अधिकारी निलंबित बीड, परभणीतील मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत

           नागपूर, दि. 20:-बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

                बीड, परभणी घटनांमधील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार बीड मध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणी मधील घटनाक्रमात मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ही दहा लाखांची मदत देण्यात येणार आहे.

                बीड मधील प्रकरणाची न्यायालयीन व एसआयटी मार्फत चौकशी करण्याबरोबर जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करून बीड जिल्ह्यांतील भूमाफिया, वाळूमाफियांस गुन्हेगारीची पाळेमुळे खणू काढू, अशी स्पष्ट भूमिकाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभेत मांडली. परभणीत पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून त्यांनी वाजवी पेक्षा अधिक पोलीस बळाचा  वापर केला आहे काय, याची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

                बीड, परभणी येथील घटनेसंदर्भात विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भारताच्या संविधानाचा अपमान हा सर्व भारतीयांचा अपमान आहे. त्यामुळे हा अपमान सहन केला जाणार नाही. परभणी येथील कृत्य एका मनोरूग्णाने केले आहे. तो मनोरुग्ण असल्याचा स्पष्ट वैद्यकीय अहवालही उपलब्ध आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. या प्रकरणात कोंबिंग ऑपरेशन झाले नाही. परंतु पोलीसांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केला आहे काय याची चौकशी केली जाईल. ही चौकशी पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून करण्यात येईल. परभणीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा हा सर्वपक्षीय होता. या मोर्चात बांग्लादेशमधील हिंदूंसंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ही हिंदू विरूद्ध दलित अशी दंगल नाही. परभणीत झालेल्या तोडफोडीत दुकान, वाहन, सरकारी कार्यालयांचे नुकसान झाले आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

                मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीड येथील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेणार असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. बीडमध्ये आवाडा ग्रीन एनर्जी कंपनीने गुंतवणूक केली आहे. या कंपनीची कामे आम्हालाच द्या किंवा खंडणी द्या अशी मानसिकता काहींची तयार झाली आहे. त्यामुळे बीड प्रकरणातील मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यांवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. बीड जिल्ह्यातील पोलीसांनी देखील योग्य कारवाई करावी. गुन्हे दाखल करताना वस्तुस्थिती तपासावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

000000000

सुशासन सप्ताह “प्रशासन गाव की और” मोहीमेतंर्गत तालुका स्तरावरील लोकशाही दिनाचे 23 डिसेंबर रोजी आयोजन

           

        जळगाव, दि. 20 (जिमाका)- प्रशासकीय सुधार एवं लोक शिकायत विभाग कार्मिक, लोक शिकायत और पेंशन मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत सुशासन सप्ताह (Good Governance Week) अंतर्गत प्रशासन गाव की ओर मोहीम  दि. 19 डिसेंबर 2024 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान लोकशाही दिन राबविण्यात येत आहे.

            या मोहिमे दरम्यान तालुक्यातील मंडळ स्तरावर लोकांच्या तक्रारी, विविध प्रश्न, समस्या सोडविण्याच्या दृष्टीने तसेच ग्रामीण भागातील लोकांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी मंडळ स्तरावर तालुका स्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.

            येत्या सोमवारी म्हणजे दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली अल्प बचत सभागृह तालुका स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेला आहे.

             लोकशाही दिनासाठी अधिनस्त कार्यालय प्रमुखांनी आणि समस्याग्रस्तांनी न चुकता उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार राहूल वाघ यांनी केले आहे.

00000000

Thursday, 19 December 2024

तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही विकसित भारताला महाराष्ट्राची भक्कम जोड एकत्रित मिशन समृध्द महाराष्ट्र





·       


·       नागपूर, दि. १९ : महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतानाच  विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. मागील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरूवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचं. आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

      राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, मागील अडीच वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऐतिहासिक काम केले.  मागील अडीच वर्षात विक्रमी कामे झाली. एकही दिवस सुटी न घेता आम्ही काम केलं. त्यामुळे या राज्याच्या निवडणूक निकालांत इतिहास घडला.

अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचे वचन

मागील अडीच वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केले. त्यामुळेच आमचे सरकार हे जनतेचे लाडकं सरकार झाले. जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन आम्ही देतोय. मुख्यमंत्री म्हणून काम करताना माझे धोरण गतिमान विकास हेच होते तिथे पक्षभेद, द्वेषाला कधी थारा दिला नाही.

विकासकामांचा स्ट्राईक रेट वाढतच राहणार

मागील अडीच वर्षात महायुती सरकारच्या विकासकामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक होता. यापुढे हा स्ट्राईक रेट वाढतच राहणार आहे. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य बनविण्यासाठी आम्ही सगळे दिवस-रात्र चोवीस तास काम करत होतोच यापुढेही करू अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

विदर्भ विकासासाठी ठोस पावले

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, माझे विदर्भाशी माझे वेगळे नाते आहे ते इथल्या प्रेम करणाऱ्या जनतेमुळे. मुख्यमंत्री असतांना मलाही विदर्भासाठी काहीतरी भरीव करण्याची संधी मिळाली याचा निश्चितच आनंद आहे. मागील दोन्हीही अधिवेशनात आम्ही विदर्भाच्या विकासासाठी ठोस पाऊलं उचलली आहेत आणि त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. समृध्दी महामार्ग आपण गोंदिया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पुढे नेत आहोत. विदर्भातल्या ५ लाख शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी हेक्टरी १५ हजार रुपये बोनसची घोषणा मुख्यमंत्री म्हणून पहिल्याच अधिवेशनात मी केली होती. या बोनसची रक्कम आम्ही २० हजार केली आहे. विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करायचा आहे.

विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. सुरजागड येथे दोन नवीन प्रकल्प माझ्या कार्यकाळात सुरू झाले. मागील अडीच वर्षात आम्ही ८६ कॅबिनेट बैठका घेतल्या आणि ८५० महत्त्वाचे निर्णय घेतले. छोटे मोठे निर्णय सांगायला बसले तर एक अधिवेशन कमी पडेल, असेही ते म्हणाले.

अग्रेसर महाराष्ट्र...

मागील अडीच वर्षात ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या. विक्रमी विकासकामे झाली. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला आहे, महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र पहिला आहे, जीएसटीत पहिले आहोत, उद्योगांमध्ये पहिला क्रमांक, पाच लाखांचा आरोग्य विमा देणारे पहिले राज्य, शेतकऱ्यांना मोफत वीज देणारे पहिले राज्य, १० लाख तरुणांना स्टायपेंड देणारे पहिले राज्य, देशातला सर्वाधिक लांबीचा सागरीसेतू करणारे पहिले राज्य आणि सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क असलेले राज्य, अशी महाराष्ट्राची देशभरात ओळख झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची काम महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामं सुरु आहेत. महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. मुंबई, एमएमआर, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरांत साडेचारशे किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्ग सुरु करणार आहोत. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मंजुरी दिली आहे. पुणे रिंग रोड, अलिबाग-विरार मल्टीमोडल कॉरिडोर ही कामे वेगाने सुरु आहेत. सात हजार किमी अॅक्सेस कंट्रोल रस्ते आपण तयार करत आहेत. राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये असे आमचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एकाही पात्र बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींना पाच हप्ते आम्ही दिले. यापुढेही ते मिळत राहतील. आत्ताच्या पुरवणी मागण्यात १४०० कोटींची तरतूदही केली आहे. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली. ८९ लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देत आहोत.  मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेत ३४ हजार जणांना लाभ दिला आहे. साडे तीन लाखापेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ सव्वा लाख लाडक्या भावांना झालाय. ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली असून १२३ कोटींचे अनुदान वाटप केले त्याचा सव्वा चार लाख ज्येष्ठांना लाभ झाला आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. आत्तापर्यंत विशेष रेल्वेने मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरहून आणि इतर ९ शहरांतून तीर्थयात्रा सुरु झाली आहे. ६ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला आहे. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे. खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता करण्याचा रोडमॅप आखलेला आहे. त्या दिशेनेच काम करून राज्याला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावरचे राज्य करायचे आहे.  विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. प्रधानमंत्र्यांसह गृहमंत्री अमित शाह यांचे भक्कम पाठबळ आहे आणि यापुढेही राहिल याची मला खात्री आहे. आता आमचे एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचे. आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

                                                                00000

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त

 





नागपूर,दि. 18 : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’  ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह  यांनी केले.

नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर - अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते.   

श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोक-या कमी होतील, अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोक-या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरतांना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वत:ला सिध्द करावे लागेल. एआयच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल, त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रृट्या दुरूस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागते, याची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजुला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतो, त्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत ‘एआय’ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पुर्वी या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून एआय मार्फत मिळणा-या माहितीकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रीम बुध्दीमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारत विरोधी कृत्य करण्यासाठी एआय चा वापर होणार नाही, यासाठी एआय ची माहिती भारतीय पध्दतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुध्दा एआय शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, धमेंद्र झोरे, भुपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने व्याख्यानाचा लाभ घेतला.

००००००


जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत अशासकिय कर्मचारी पद भरती; जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे अर्ज करण्याचे आवाहन

     जळगाव, दि. 19 (जिमाका)-  जळगावातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे/मुलींचे वसतिगृह , माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह जळगाव तसेच माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह रावेर येथे तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने वसतिगृह सहायक अधिक्षक, पहारेकरी कम एमटीएस ही पदे माजी सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत. २७ डिसेंबर पर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज  करायचा आहे.

यात वसतिगृह सहाय्यक अधिक्षक पदासाठी एक जागा असून यासाठी माजी सैनिक प्रवर्गातील हवालदार, नायब सुभेदार किंवा त्यापेक्षा मोठ्या पदावरून निवृत्त झालेले JCOs अर्ज दाखल करु शकतात. मराठी व इंग्रजी टाईपिंग येत असलेल्या JCOs ला प्राधान्य  देण्यात येणार आहे.

तसेच पहारेकरी कम एमटीएस पदासाठी मुलांचे वसतीगृह जळगाव, मुलींचे वसतीगृह जळगाव, माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह, जळगाव आणि माजी सैनिक बहुउद्येशिय सभागृह, रावेर येथे प्रत्येकी एक पुरुष अशा ४ जागा भरायच्या आहेत. या पदाकरिता माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार अथवा माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे. या उमेदवारास २४ तास कामकाजासाठी उपलब्ध असावे लागणार आहे. सदर पद हे निवासी आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी आधारकार्ड, बँक पासबूक, रहिवाशी दाखला, (I Card & Discharge book for Ex servicemen only) दोन फोटो व Police verification certificate आवश्यक असणार आहे.

निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी राखून ठेवले आहेत. अधिक माहितीसाठी ०२५७-२२४१४१४. या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अन्य आवश्यक कागदपत्रांसह २७ डिसेंबर पर्यंत जळगाव येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश प्रकाश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

०००००००

आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात केल्यास कृषि व कृषि प्रक्रिया क्षेत्रात रोजगाराच्या भरीव संधी उपलब्ध होतील -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ▪ "प्रशासन गाव की ओर" सप्ताह निमित्त ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक, नैसर्गिक निविष्ठा प्रक्षेत्र व प्राथमिक प्रक्रिया केंद्राची पाहणी करत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत साधला संवाद










             जळगाव, दि. 19 (जिमाका)- शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात केल्यास कृषि व कृषि प्रक्रिया क्षेत्रात रोजगाराच्या भरीव संधी उपलब्ध होतील असे  जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद यांनी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले 

            सुशासन सप्ताह निमित्त ' प्रशासन गाव की ओर मोहिमेअंतर्गत ' जळगाव तालुक्यातील भादली बु. येथे उच्चशिक्षित तरुण शेतकरी श्री. योगेश झांबरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत उभारलेल्या आटा प्लांट व प्राथमिक प्रक्रिया केंद्राची पाहणी वेळी जिल्हाधिकारी यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी  ग्राम पातळीवर उपलब्ध झालेल्या सुविधांबाबत चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.

            शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांनी व सुशिक्षित बेरोजगारांनी प्राथमिक प्रक्रिया केंद्र गाव पातळीवर स्थापन केल्यास शेतकऱ्यांची सोय होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याकरिता जिल्हा प्रशासन व कृषि विभाग कटिबद्ध असून खंबीरपणे शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी अश्वस्त केले. 

 आसोदा येथे इफको कंपनी मार्फत शेतकऱ्यांना ड्रोन द्वारे नॅनो युरिया व नॅनो डीएपी फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी शेतकऱ्यांना ड्रोन वापरा बाबतची माहिती, सुशिक्षित तरुणांना उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी बाबत चर्चा करण्यात आली तसेच इफको मार्फत जळगाव जिल्ह्यात 12 ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले असून या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या प्रक्षेत्रात फवारणी करता सदरचे ड्रोन उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या ठिकाणी नवनिर्मिती शेतकरी मंडळ, आसोदा मार्फत भौगोलिक मानांकन प्राप्त भरीताची वांगी प्रक्षेत्राची पाहणी करून पारंपारिक पद्धतीने जतन केलेल्या भरीताच्या वांगी वाणाची माहिती घेऊन या ठिकाणी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या प्रक्षेत्रात तयार केलेल्या जैविक निविष्ठाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री.अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भीमराज दराडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.कुर्बान तडवी, इफको महाराष्ट्र विपणन मॅनेजर श्री. उदय तिजारे, विषय विशेषज्ञ श्री. वैभव सूर्यवंशी, इफकोचे श्री. संदीप रोकडे, मंडळ कृषी अधिकारी शरद पाटील, अमित भामरे, विनोद झवर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.मिलिंद चौधरी, भादली बू. सरपंच श्री. मनोज चौधरी, नवनिर्मिती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष श्री. किशोर चौधरी, श्री . अरुण सपकाळे, श्री.प्रभाकर चिरमाडे, श्री.महेश भोळे, श्री. संजय ढाके व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००००

जी.डी.सी अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा 2024 चा निकाल घोषित! फेरगुण तपासणीच्या अर्जासाठी ५ जानेवारी पर्यंत अर्ज करण्याची मुदत

             जळगाव, दि. 19 (जिमाका)-  सहकार विभागांतर्गत जळगाव केंद्रावर दिनांक २४ मे, २५ मे व २६ मे २०२४ रोजी  जी.डी.सी अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे. परिक्षार्थ्यांना सदर परिक्षेचा निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन व पासवर्ड वापरुन पाहता येणार आहे. तसेच पीडीएफ फॉरमॅटमध्ये https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर महत्त्वाचे दुवे मधील जी.डी.सी.ॲण्ड ए. मंडळ येथे पहावयास उपलब्ध राहील.

               जानेवारीपर्यंत फेरगुण मोजणी करण्यासाठी परिक्षार्थीना https://gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉगइन पासवर्डद्वारे अर्ज करता येईल. फेरगुण मोजणी करण्यासाठी परिक्षार्थींना फेरगुणमोजणी शुल्क भरावे लागणार आहे. भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी ७५ रुपये फि आणि अधिक बँक चार्जेस या प्रमाणे परिक्षार्थींनी  चलनाव्दारे शुल्क भरायचे आहे.

            बँकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याची मुदत ५ जानेवारी पर्यंत राहणार आहे. सदर चलन बँकेत ५ जानेवारी पर्यंत (बँकेच्या कामकाजाच्या वेळेत) या कालावधीत भरणा करावे आवश्यक आहे आणि विहीत तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर विचार करण्यात येणार नाही अशी माहिती सहाय्यक निबंधक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

००००००००

Wednesday, 18 December 2024

"अंतर्गत तक्रार समिती" मार्फत "महिला लैंगिक छळ विरोधी कायदा" या विषयावर कार्यक्रम संपन्न

         जळगाव, दि. 18 (जिमाका)-  जळगाव येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयाच्या अनुषंगाने "अंतर्गत तक्रार समिती" गठीत करण्यांत आलेली आहे. या समितीमार्फत "महिला लैंगिक छळ विरोधी कायदा" आणि "कायदयाच्या अनुशंगाने कार्यालयीन वर्तवणूक व व्यवस्थापन" या दोन विषयावर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन नुकतेच  करण्यात आले होते.

              अॅड. मंजुळा मुंदडा आणि श्रीमती सुचित्रा महाजन यांनी कार्यालयातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना या विषयावर मार्गदर्शन केले.

             अँड. मुंदडा यांनी कार्यालयातील उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महिला लैंगिक छळ विरोधी कायदयाबाबत मार्गदर्शन करुन कायदयाची जाणीव करुन दिली. तसेच कायदयाच्या तरतूदी व कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शन केले.

                  तसेच श्रीमती महाजन यांनी कायदयाचे अनुषंगाने कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात कार्यरत असतांना आपली वर्तवणूक/शिस्त कशी असावी, कार्यालयीन वातावरण चांगले कसे राहील आणि त्यासाठी कशा पध्दतीने नियोजन/व्यवस्थापन ठेवावे याबाबत सोप्या भाषेत माहिती दिली.

००००००००

Tuesday, 17 December 2024

सुशासन सप्ताह निमित्त ' प्रशासन गाव की ओर मोहिमेअंतर्गत 19 ते 24 डिसेंबर लोकशाही दिन

         जळगाव, दि. 17 (जिमाका)-      प्रशासकीय सुधार एवं लोक शिकायत विभाग कार्मिक, लोक शिकायत और पेंशन मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत सुशासन सप्ताह (Good Governance Week) अंतर्गत प्रशासन गाव की ओर मोहीम  दि. 19 डिसेंबर 2024 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान लोकशाही दिन राबविण्यात येणार आहे.

            सदर मोहिमे दरम्यान लोकांच्या तक्रारी, विविध प्रश्न समस्या सोडविण्याच्या दृष्टीने लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. उपविभागीय अधिकारी (सर्व व तहसिलदार सर्व यांच्या स्तरावर लोकशाही दिन आयोजित केला आहे. तसेच उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे मंडळ स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करणार आहेत.

            तरी या लोकशाही दिनाच्या दिवशी लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000000

Friday, 13 December 2024

एकलव्य रेसिडेन्सी स्कूलच्या 1,257 जागांसाठी 23 फेब्रुवारीला प्रवेश पूर्वपरीक्षा

           जळगाव, दि. 13 (जिमाका)-    नाशिक अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या एकलव्य रेसिडेन्सी स्कूलच्या 1,257 जागांसाठी 23 फेब्रुवारी 2025 रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावीत नवीन विद्यार्थ्यांना तर इयत्ता सातवी ते नववीसाठी रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येणार आहे.

         सदस्य सचिव महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी मार्फत राज्यात इंग्रजी माध्यमाच्या 37 एकलव्य रेसिडेंशियल स्कूल चालविल्या जातात. नाशिक अपर आयुक्त कार्यालय नाशिक अंतर्गत 17 एकलव्य शाळा आहे. त्यामध्ये नाशिक प्रकल्पाच्या 5, कळवण, नंदूरबार आणि तळोदा प्रकल्पाच्या प्रत्येकी 3, धुळे प्रकल्पाच्या 2 तर राजूर प्रकल्पाच्या एका शाळेचा समावेश आहे.

           इयत्ता सहावीच्या 1020 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.  त्यात मुलांच्या 510 तर मुलींच्या 510 जागांचा समावेश आहे. इयत्ता सातवीच्या 152, आठवीच्या 47 तर नववीच्या 38 रिक्त जागा प्रवेश पूर्वपरीक्षेद्वारे भरण्यात येणार आहे. सातवी ते नववीच्या प्रवेशासाठी अनुसूचित जमातीचे विद्यार्थी पात्र आहे. तर इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी हा एसटी, डीएनटी, एनटी, एसएनटी प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.

              प्रत्येक एकलव्य स्कूलमध्ये इयत्ता सहावीसाठी 30 मुले व 30 मुली अशी 60 प्रवेश क्षमता असणार आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सातवी, आठवी, नववीसाठी रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे व त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाईल. अशी माहिती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली आहे.

000000000