Wednesday, 30 June 2021

जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सातपुड्यातील आदिवासी गावांना भेट, ग्रामस्थांशी साधला संवाद पाल ग्रामीण रुगणालयातील लसीकरण केंद्रास भेट, वनपट्टयांचे केले वाटप तर घरकुलांची केली पाहणी

 





            जळगाव, (जिमाका) दि. 30 - कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सातपुड्यातील पाल, निमड्या, गारबर्डी, धरणपाडा या आदिवासी बहुल गावांना आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी संयुक्तरित्‍या भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.

            यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पाल, ता. रावेर येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. त्यांनी रुग्णालयातील रुग्णांना मिळणारे उपचार, आरोग्य सुविधा, उपलब्ध मनुष्यबळ, औषधी आदिंची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांचेकडून जाणून घेतली. तर लसीकरण कक्षाची पाहणी करुन तेथील सोयीसुविधा, उपलब्ध लस, झालेले लसीकरण आदिंबाबतची माहिती मुख्य अधिपरिचारीका सौ. कल्पना नगरे यांचेकडून जाणून घेतली.  लसीकरण कक्ष आणि तेथील व्यवस्था बघून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

            भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता घ्यावयाची खबरदारी व काळजी याबाबत काही मार्गदर्शक सूचना देखील त्यांनी केल्यात. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी पाल ग्रामीण रुग्णालयात दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांच्या मदतीने ऑक्सिजन पाईपलाईन काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केली. ग्रामीण भागात लसीकरण वाढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी सर्व संबंधितांना केल्यात.

            आदिवासी बहुल भागातील जास्तीत जास्त नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावे. तसेच त्यांच्यामध्ये लसीकरणाविषयी जागृती व्हावी याकरीता डॉ. बारेला यांनी स्थानिक बोलीभाषेत तयार केलेली व्हिडिओ क्लिप बघून जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी जिल्हाधिका-यांसमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी. एन. पाटील, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील, डॉ सचिन पाटील, डॉ स्वप्नीशा पाटील, डॉ मिलिंद जावळे यांच्यासह आरोग्य व महसुल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

            त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पालसह गारबर्डी, निमड्या, धरणपाडा आदि गावांना भेट देऊन तेथील पाहणी केली. गारबर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत आणि नरेगा अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांची पाहणी केली तसेच नरेगा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकेचीही पाहणी केली. तर निमड्या, गारबर्डी ग्रुप ग्राम पंचायत अंतर्गत लाभार्थ्यांना वनपट्ट्यांचे आणि रेशनकार्डचे वाटपही जिल्हाधिकारी श्री. राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

धरणपाडा येथील ग्रामस्थांशी साधला संवाद

            सुकी धरणपाडा येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. तेथील पात्र लाभार्थींना जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, सामाजिक अर्थ सहाय्य योजना यांचे अर्ज भरून घेऊन लाभ देण्याची प्रक्रिया राबविण्यास सांगितले आहे. तसेच याठिकाणी गावठाण नसल्याने या ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध करुन देण्यास अडचणी येत असल्याने वन विभाग आणि सिंचन विभागाने समन्वय साधून याठिकाणी गावठाण निर्माण करुन त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी महसुल, वन विभाग, आदिवासी विकास विभाग, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.

            कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या गावातील नागरीकांना कोणत्याही प्रकारची अडचणी येवू नये याकरीता आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी संबंधित यंत्रणांना दिल्यात.

00000

ज्येष्ठ नागरीकांच्या मदतीसाठी आता हेल्पलाईन सामाजिक न्याय विभाग व जनसेवा फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम • 14567 हा टोल फ्री क्रमांक

             जळगाव, (जिमाका) दि. 30 - ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन लवकरच सुरु होणार असून या हेल्पलाईनचा क्रमांक 14567 असा राहणार असून ही राष्ट्रीय हेल्पलाईन असणार आहे. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकारमार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यात हेल्पलाईन सुरु करण्यात येत आहे. राज्य शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जनसेवा फाउंडेशन पुणे व राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये ज्येष्ठांसाठी ही राष्ट्रीय हेल्पलाईन चालविली जाणार आहे.

            या हेल्पलाईनचा उद्देश हा ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे हा राहणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे, अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळोवेळी हेल्पलाईनचा उपयोग होणार आहे. हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 14567 हा असून हेल्पलाईन ची ही वेळ सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत असणार आहे.  हेल्पलाईन केवळ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर व 1 मे हे दिवस वगळता वर्षातील सर्व दिवशी सुरु राहणार आहे. हेल्पलाईनमार्फत आरोग्य जागरुकता, निदान, उपचार, निवारा, घरे, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, अध्यात्मिक, कला व करमणूक माहिती दिली जाणार आहे. तसेच कायदेविषयक मार्गदर्शन, विवाद निराकारण, पेन्शन संबंधित मार्गदर्शन व योजनांची माहितीही दिली जाणार आहे. तसेच चिंता निराकरण, नातेसंबंध व जीवन व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधीत शोक, वेळ, ताणतणाव, राग व्यवस्थापन, मृत्युपूर्वीचे दस्तऐवजीकरण आदी मार्गदर्शनही केले जाणार आहे.

            या हेल्पलाईनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर क्षेत्रीय प्रतिनिधी नियुक्त केले आहे. या हेल्पलाईन बाबत जनसेवा फाउंडेशनच्या मीनाक्षी कोळी यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन त्यांना याबाबत अवगत केले आहे. ज्येष्ठ नागरीकांच्या मदतीसाठी या हेल्पलाईन ची माहिती जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरीकांना होण्यासाठी इतरांनी त्यांना अवगत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

00000

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

     जळगाव, (जिमाका) दि. 30 - राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्यादृष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत. यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायभूत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख याबाबी विचारात घेवून क्रीडा धोरण-2012 तयार करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
     या शासन निर्णयानुसार अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इ. देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकाचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, आधुनिक क्रीडा साहित्य आयात/ खरेदी करणे, गणवेश इत्यादी बाबींसाठी अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे.
या योजनेसाठी या स्पर्धांना अधिकृत स्पर्धा म्हणून राहील मान्यता
     ऑलिम्पिंक गेम्स, विश्व अजिक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, युथ ऑलिम्पिक, ज्यु विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप, वर्ल्ड कप  या स्पर्धांना या योजनेसाठी अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता राहील.
      ऑलिंम्पिक स्पर्धामध्ये ज्या खेळ/क्रीडा प्रकाराचा समावेश असेल तेच खेळ/क्रीडा प्रकार या स्पर्धामध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय राहतील. कबड्डी, खोखो, मल्लखांब या देशी खेळांचा यास अपवाद राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यतील अर्ज परिपुर्ण भरुन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.
     अर्जाचा नमुना क्रीडा विभागाच्या sports.maharashra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, ए विंग, श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, किंवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथील कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन मिलींद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                                  00000

परिवहन विभागामार्फत जुलै महिन्यात तालुकानिहाय शिबिराचे आयोजन

      जळगाव, (जिमाका) दि. 30 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव मार्फत जिल्ह्यातील नागरीकांसाठी दरमहा तालुकानिहाय मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येते. माहे जुलै 2021 पासून प्रशासकीय कारणास्तव या शिबिर दौऱ्यात बदल करण्यात आला असून याची नागरीकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन माहिती श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.  
    जुलै, 2021 चे मासिक शिबीराचे कामकाज याप्रमाणे राहील. अमळनेर - पहिला मंगळवार, जामनेर- दुसरा बुधवार, पाचोरा- पहिला सोमवार व चौथा सोमवार, भुसावळ- पहिला, तिसरा व चौथा गुरुवार, चाळीसगाव- पहिला, दुसरा, चौथा व पाचवा शुक्रवार, यावल - तिसरा सोमवार, सावदा - पहिला बुधवार, चोपडा-  दुसरा सोमवार, रावेर - दुसरा मंगळवार, बोदवड - चौथा मंगळवार, भडगाव - चौथा बुधवार, पारोळा - तिसरा  शुक्रवार व पाचवा गुरुवार, मुक्ताईनगर - तिसरा मंगळवार, वरणगाव - दुसरा गुरुवार याप्रमाणे दौरा राहील.
        सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द करण्यात येईल. असेही श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.  
                                                                        00000

Tuesday, 29 June 2021

नोंदणीकृत घरेलू कामगारांनी त्यांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर अद्यावत करण्याचे कामगार विभागाचे आवाहन

जळगाव, (जिमाका) दि. 30 - सहाय्यक कामगार आयुक्त, जळगांव यांचेमार्फत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाचे नोंदणी व लाभवाटपाचे कामकाज करण्यात येते. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सर्व नोंदीत घरेलू कामगारांना 1 हजार 500 रुपये अर्थसहाय्य देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
सहाय्यक कामगार आयुक्त, जळगांव कार्यालयातंर्गत सन 2011 ते 31 मार्च, 2021 या कालावधीत सुमारे 14 हजार घरेलू कामगारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. मात्र बहूतांश घरेलू कामगारांचा बँक तपशील नसल्यामुळे अर्थसहाय्य वाटप करणे शक्य होत नाही.
तरी सहाय्यक कामगार आयुक्त, जळगांव कार्यालयाकडे नोंदीत सर्व घरेलू कामगारांनी त्यांची वैयक्तिक माहिती व बँकेचा तपशिल https://public.mlwb.in/public या लिंकचा वापर करुन अद्यावत करावा. याबाबत काही अडचण असल्यास सहाय्यक कामगार आयुक्त, जळगांव यांचे कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन चद्रकांत बिरार, सहाय्यक कामगार आयुक्त, जळगांव यांनी केले आहे.
                                                                                    00000

जिल्ह्यात आतापर्यंत देण्यात आले 6 लाख 85 हजार कोरोना लसीचे डोस

             जळगाव, (जिमाका) दि. 29 - जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना राबविण्यात येत असून नागरीकांच्या लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 38 हजार 778 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 1 लाख 46 हजार 581 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 6 लाख 85 हजार 359 लाभार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

            जिल्ह्यात 16 जानेवारी, 2021 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयातूनही नागरीकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर 1 मे ते 11 मेपर्यंत जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले. त्यानंतर 21 जूनपासून जिल्ह्यातील 18 वर्षापुढील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तसेच कोरोना पासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी पुढे येत आहे.

            कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांचे सहज व सुलभ लसीकरण व्हावे याकरीता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 38 हजार 778 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 1 लाख 46 हजार 581 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 6 लाख 85 हजार 359 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. पैकी सर्वाधिक 2 लाख 35 हजार 747 लसीकरणाचे डोस हे प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आले आहे तर 49 हजार 275 लाभार्थ्यांचे लसीकरण प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सुविधा असलेल्या खाजगी रुग्णालयामार्फत करण्यात आले असून जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात 8 हजार 73 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस तर 2 हजार 137 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आल्याचेही या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.   

00000

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

         जळगाव, (जिमाका) दि. 29 - राज्यातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेची वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन नवीन उमेदीने अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्याचबरोबर कृषि उत्पादकतेमध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकुण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

            पिक स्पर्धेत खरीप हंगामात तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफूल (11 पिके) अशी 11 पिके समाविष्ठ आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख खरीप हंगामासाठी मुग व उडीद या पिकांसाठी 31 जुलै, 2021 असून भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तुर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकांसाठी सहभागाची अंतिम तारीख 31 ऑगस्ट, 2021 अशी आहे.

            पिक स्पर्धेत पिकाची निवड करताना पिकनिहाय तालुक्यातील संबधित पिकाखालील क्षेत्र किमान 1 हजार हेक्टर असावे. स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 असावी. पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखालील किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

बक्षिसाचे स्वरुप

            तालुका पातळीवर पहिले बक्षिस रुपये 5 हजार, दुसरे बक्षिस रुपये 3 हजार तर तिसरे बक्षिस रुपये 2 हजार आहे. जिल्हा पातळीवर पहिले बक्षिस रुपये 10 हजार, दुसरे बक्षिस रुपये 7 हजार तर तिसरे बक्षिस रुपये 5 हजार असून विभाग पातळीवर पहिले बक्षिस रुपये 25 हजार, दुसरे बक्षिस रुपये 20 हजार तर तिसरे बक्षिस रुपये 15 हजार रुपये आहे. राज्य पातळीवर पहिले बक्षिस रुपये 50 हजार, दुसरे बक्षिस रुपये 40 हजार तर तिसरे बक्षिस रुपये 30 हजार रुपये आहे.

            तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिक स्पर्धेत सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क करण्यात यावा. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

Monday, 28 June 2021

कोविडमुळे निधन झालेल्या अनुसूचित जातीतील व्यक्तीच्या कुटूंबाला व्यवसायासाठी कर्ज योजना

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 28 - राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली (National Scheduled Castes and Development Corporation) हे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यामार्फत कोविडमुळे निधन झालेल्या अनुसूचित जातीसाठी Support for Marginalized Individuats for Livelihoods and Enterprise (SMILE) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. कोविड -19 या महामारीमुळे ज्या कुटूंबातील प्रमुख व्यक्ती (Breadearner) मृत्यू पावली आहे, अशा कुटूंबातील प्रमुख वारसदारास एन. एस.एफ.डी. सी, नवी दिल्ली यांचेमार्फत रु. 5 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे.

            वारसदारास एन.एस.एफ.डी.सी मार्फत प्रकल्प किंमतीच्या 80 टक्के, भांडवल अनुदान 20 टक्के रक्कम देणार असून असून कर्जासाठी 6 टक्के व्याजदर राहणार असून परतफेडीचा कालावधी 6 वर्षे रहाणार आहेत.

            अर्जदार हा अनुसूचित जातीतील असावा. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या कुटूंब प्रमुखाच्या कुटूंबातील सदस्य असावा. (कुटूंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत असावे. मृत्यु पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यु पावलेल्या कुटूंब प्रमुखाची मिळकत कुटूंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तीकरीता पुढील पैकी एक दस्तावेज आवश्यक आहेत. महानगरपालिका/नगरपालिका यांनी दिलेले मृत्यु प्रमाणपत्र/ स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेले मृत्यु प्रमाणपत्र/ एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यु प्रमाणपत्र यापैकी एक असावे.

            आवश्यक असणारी कागदपत्रे-मयत व्यक्तीचे संपूर्ण नाव व पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, मृत्युचा दाखला, रेशनकार्ड, वयाचा पुरावा सोबत जोडणे अनिवार्य आहे.

            कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 15 जून, 2021 पर्यंत मृत्यु झालेल्या अनुसूचित जातीतील कुटूंबातील व्यक्तीने उपरोक्त माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी, अथवा https://forms.gle/७mG८CMecLKnWGt६k७ या लिंकवर 30 जून, 2021 पर्यंत भरण्यात यावी. असे के. जी. जोपळे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 5 जुलै रोजी ऑनलाईन होणार तहसील कार्यालयात उपस्थित राहून नागरीकांना दाखल करता येणार तक्रार

             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 28 - नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीयस्तरावर लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

            त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नागरीकांसाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन 5 जुलै, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) होणार आहे. ज्या नागरीकांच्या काही तक्रारी असतील त्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात उपस्थित राहून तक्रारी मांडाव्यात. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

Saturday, 26 June 2021

खेडगाव येथील वीर जवानाच्या कुटुंबाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सात्वंन

 


             जळगाव (जिमाका) दि. 26 - खेडगाव (ता. भडगाव) येथील आयटीबीपी अर्थात इंडो तिबेटियन पोलीस सेनेत कार्यरत असलेल्या सुनील यशवंत हिरे (वय ४०) या जवानाला मंगळवारी सेवा बजावताना वीरमरण आले होते. गुरुवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

            राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज त्यांच्या मुळगावी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन सात्वंन केले. यावेळी आमदार किशोर पाटील उपस्थित होते.

            आयटीबीपीच्या आसाम बटालियनमधे कार्यरत असलेले सुनील यशवंत हिरे यांना मंगळवारी सेवा बजावत असताना वीर मरण आले ते सध्या आसाम येथे कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी (ता. 24 ) रोजी शासकीय इतमामात सकाळी १० वाजता खेडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सायंकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खेडगाव येथे जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची पत्नी, आई, वडील व दोन मुलांचे सात्वंन करीत त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तर जवान सुनील हिरे यांच्या निधनाबद्दल दुख: व्यक्त केले. यावेळी आमदार किशोर पाटील, डाॅ. विलास पाटील, संजय पाटील यांच्यासह  गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

00000

Friday, 25 June 2021

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

 


 

जळगाव, दि. 26 (जिमाका) - थोर कल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

 

अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

याप्रसंगी तहसिलदार सुरेश थोरात, आर. एस. पाटील,  नम्रता नेवे, प्रकाश शेळके आदि उपस्थित होते.

00000

जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध - कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे

            जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 - खरीप हंगाम-2021 साठी जिल्ह्यात खते व बियाण्यांची उपलब्धता मुबलक प्रमाणात असून खत पुरवठा सुरळीत सुरु आहे. खरीप हंगाम 2021 साठी युरीया खताचे माहे जुनअखेर 55.972 मे.टन पुरवठयाचे आवंटन होते. जिल्ह्यात मागील रब्बी हंगामातील युरीया या मुख्य खताचा 26.070 मे. टन एवढा साठा या खरिप हंगामात विक्रीसाठी उपलब्ध होता. तसेच माहे एप्रिल, मे व 21 जुन, 2021 अखेर युरीया खताचा 46.198 मे. टन पुरवठा झालेला आहे. मागील व आत्ताचे असे एकुण 72.268 मे. टन युरीया खत विक्रीसाठी या खरिप हंगामात उपलब्ध झालेले आहे.

           तसेच जुन महिनाअखेर आर.सी.एफ या कंपनीमार्फत 5 हजार मे. टन. एन.एफ.एल मार्फत 2600 मे. टन. इफकोमार्फत 2600 व आयपीएलमार्फत 4800 असे एकुण 15 हजार मे. टन युरीया खत पुरवठयाचे नियोजन आहे. एसएसपी खताचा देखील 22.044 मे. टन एमओपी खताचा 19.386 मे. टन डीएपी चा 3329 व इतर संयुक्त खते जसे 10.26.26., 15.15.15., 20.20.0 व 16.16.16 या खतांचा पुरवठा 31031 मे.टन एवढा झालेला आहे. एकंदरीतच जिल्ह्यात पुरेश्या प्रमाणात सर्व खते उपलब्ध असुन दरमहा खतांच्या उपलब्धतेचे नियोजन केलेले असून त्याप्रमाणे पुरवठा सुरळीत होत आहे.

          जळगाव जिल्ह्यात कापुस हे प्रमुख पिक आहे. जास्त प्रमाणात युरीया खत दिल्यास पिकाची कायीक वाढ जास्त प्रमाणात होऊन रसशोषक (मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरीमाशी) या किडींचा प्रादुर्भाव होवून कापुस पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. या रसशोषक किडींचे नियंत्रण करण्यासाठी किटकनाशक फवारणीचा खर्च वाढतो तसेच उत्पन्नात घट येते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी फक्त युरीया खताचा वापर न करता इतर उपलब्ध सरळ, मिश्र व संयुक्त खतांचा वापर संतुलीत प्रमाणात करावा. तसेच पुरेश्या प्रमाणात पाऊस व पुर्ण ओल असल्याशिवाय, सोयाबीन, उडीद, मुग यासारख्या उष्णतेस संवेदनशील पिकांची व इतर पिकांची देखील लागवड करु नये. कृषि निवीष्ठा विक्रेते यांनी कृत्रीम खत टंचाई निर्माण करुन जादा दराने विक्री करु नये म्हणुन जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांमार्फत तपासणी सुरु आहे.

               शेतकरी बांधवांनी खताच्या बॅगवरील निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खते खरेदी करु नये. जादा दराने खत विक्री होत असल्याचे निदर्शनात आल्यास संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे त्वरीत तक्रार करावी. एकाच वेळी जास्त खत खरेदी करुन साठा करुन ठेवू नये. सर्व खते उपलब्ध असल्याने जसे लागेल तसेच खत उचल करावी. खत खरेदी पक्क्या बिलाने व अधिकृत दुकानातुनच करावी, शेतकरी बांधवांनी जमिनीचे आरोग्य व पर्यायाने स्वत:चे आरोग्य देखील सांभाळावे व खर्चात बचत करावी, असे कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद वैभव शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

लॉकडाऊनमुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात मिळणार सुट दस्त नोंदणीसाठी शनिवारी कार्यालये राहणार सुरु

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 - माहे एप्रिल व मे, 2021 या महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात सुट देण्याचे शासनाने निश्चित केले आहे. माहे डिसेंबर, 2020 मध्ये शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीमुळे निष्पादीत झालेले म्हणजेच स्वाक्षरी व अंगठ्याचे ठसे दस्तावर पुर्ण झाले परंतु लॉकडाऊनमुळे माहे एप्रिल 2021 व माहे मे-2021 या महिन्यामध्ये नोंदणी न झालेली हस्तांतरण व विक्री करारनामा या दस्तावरील नोंदणी फीच्या दस्तांमध्ये प्रथम दोन महिन्यासाठी आणि जानेवारी, 2021 मध्ये निष्पादीत झालेले परंतु नोंदणी न झालेले दस्त व अशा दस्तांवरील नोंदणी फी चा दंड जो नोंदणी फी रक्कमेच्या कमीतकमी 2.5 पट व जास्तीत जास्त 10 पट इतका आहे, तो कमी करुन शासनाने एक हजार रुपये इतका निश्चित केला आहे.

            या कालावधीत यापूर्वी दंडाचा भरणा करुन दस्त नोंदणी केली असल्यास दंडाचा परतावा मिळणार नाही. असे महसुल व वन विभागाचे सहसचिव श्रीधर डुबे पाटील यांनी गुरुवार, दिनांक 24 जून, 2021 रोजी जारी केलेल्या शासकीय परिपत्रकात म्हटले आहे. 

            शनिवार, दिनांक 26 जून, 2021 रोजी फक्त अशाच प्रकारचे दस्त नोंदणीसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये उघडी ठेवण्यात येणार आहे. तरी संबंधीतांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे सह जिल्हा निबंधक वर्ग - 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑलिंपिक दिन साजरा

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत 23 जुन हा जागतिक ऑलिंपिक दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्वप्रथम भारताचे सुविख्यात धावपटू पद्मश्री मिल्खा सिंग यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू सुमेध तळवेलकर, प्रितेश पाटील, कल्पेश कोल्हे, अक्षय येवले, नेहा देशमुख, प्राची नाईक, शिवानी देशमुख, रचना म्हस्के या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            23 जुलै ते 5 सप्टेंबर, 2021 या कालावधीत टोकीयो येथे आयोजित होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धे‍त राही सरनोबत (पिस्तुल शुटींग), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), विष्णू सरवानन (सेलींग) तेजस्विनी सावंत (रायफल शुटींग), प्रविण जाधव (आर्चरी रिकर्व्ह), स्वरुप उन्हाळकर (पॅरा शुटींग 10 मी. रायफल), सुयश जाधव (पॅरा स्विमिंग) हे महाराष्ट्राचे आठ खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्याकरीता तसेच जिल्ह्यामध्ये खेळाविषयी वातावरण निर्मिती व्हावी, याकरिता जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे महाराष्ट्र राज्याचे ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूचे छायाचित्र असलेले बॅनर लाऊन राष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले. अशाप्रकारचे बॅनर पूर्ण जिल्ह्यात लावण्यात येऊन समाजामध्ये खेळाविषयी वातावरण निर्माण करण्यात येणार आहे.

            याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवेलकर, क्रीडा अधिकारी एम. के. पाटील, रेखा पाटील, क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, मिनल थोरात, भरत देशमुख, गोविद सोनवणे, विनोद माने, विनोद कुलकर्णी, सुरज पवार हे उपस्थित होते.

            सदर कार्यक्रमात शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवेलकर व जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले व ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्याचे  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                 000000