Wednesday, 31 March 2021

मतदार म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी आम्ही केली मतदार नोंदणी आपणही नोंदणी करून आपले कर्तव्य बजवावे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 31 -जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत आणि त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा यांनी जळगाव शहर मतदार संघात मतदार नोंदणी केली असल्याने त्यांना निवडणूक ओळखपत्राचे (EPIC) वाटप जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच करण्यात आले. जिल्हा  निवडणूक अधिकारी पदाचे कर्तव्य बजावत असतांना मतदार म्हणून कर्तव्य बजावणेसाठी मतदार नोंदणी करुन घेतल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. वयाची 18 वर्षे पुर्ण झालेल्या तसेच अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या नागरिकांनी त्वरीत मतदार नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी याप्रसंगी केले,

            सद्यःस्थितीत मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रीया सुरु असुन  या प्रक्रीयेत नमुना क्र. ६ भरुन मतदार नोंदणी, नमुना क्र. 7 भरुन मतदार वगळणी आणि नमुना क्र. 8 भरुन मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती, तसेच नमुना क्र. ८- अ भरुन त्याच विधानसभा मतदारसंघात स्थानांतरण करता येते,

            सध्या बी.एल.ओ मार्फत मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांचे घरोघरी जाऊन फोटो संकलित करणेत येत आहेत. जेणेकरुन 100 % फोटो असलेली मतदार यादी तयार करता येणार आहे. तरी ज्या मतदारांचे मतदार यादीत फोटो नाहीत, अशांनी त्वरीत आपले फोटो संबंधित बी.एल.ओ किंवा तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत जमा करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            यावेळी जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सौ. अनुराधा यांनी मतदार नोंदणीत स्त्रियांनी देखील पुढे यावे आणि मतदार म्हणून नोंदणी करुन घेण्याचे आवाहन केले.

            जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार स्त्री- पुरुष प्रमाण 922 असुन मतदार यादीनुसार स्त्री-पुरुष प्रमाण 921 इतके आहे. ही तफावत भरुन काढण्यासाठी अद्याप ज्या महिलांनी मतदार नोंदणी केलेली नाही त्यांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

००००

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुकानिहाय मासिक दौऱ्यात बदल

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 31-उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगावच्या 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या कालावधीतील तालुकानिहाय पूर्वनियोजित मासिक दौऱ्यात बदल करण्यात आला आहे.

            नव्या वेळापत्रकानुसार पहिला सोमवार 5 एप्रिल रोजी पाचोरा, पहिला मंगळवार 6 एप्रिल  2021 रोजी  अमळनेर,  पहिला बुधवार 7 एप्रिल रोजी सावदा,  दुसरा सोमवार  12 एप्रिल रोजी चोपडा,  तिसरा सोमवार 19  एप्रिल रोजी यावल, तिसरा गुरुवार 15 एप्रिल रोजी जामनेर, दुसरा व पाचवा गुरुवार 8 व 29 एप्रिल रोजी भुसावळ, तिसरा मंगळवार  20  एप्रिल रोजी धरणगाव येथे दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल.

            चौथा सोमवार 26 एप्रिल रोजी भडगाव, चौथा मंगळवार 27 एप्रिल रोजी बोदवड, चौथा बुधवार 28 एप्रिल रोजी मुक्ताईनगर, चौथा गुरुवार 22 एप्रिल रोजी रावेर,  चौथा शुक्रवार 23 एप्रिल रोजी पारोळा, आणि   दुसरा, तिसरा, पाचवा शुक्रवार  9, 16 व 30  एप्रिल रोजी चाळीसगाव येथे दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल. 

             सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द समजण्यात येईल. सर्व संबंधित नागरिकांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले  आहे.

००००

Friday, 26 March 2021

एरंडोल नगरपरिषद क्षेत्रात 28 मार्चपर्यंत जनता कर्फ्यु

          जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 26-  कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधक उपययोजना म्हणून उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी  एरंडोल नगरपरिषद हद्दीत 28 मार्च 2021 रोजी रात्री 12 पर्यंत जनता कर्फ्यु पालन करण्याचे आवाहन केले असून  शहरात कडक निर्बंध  लागू केले आहेत.

                या कालावधीत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील.  किराणे दुकाने,  इतर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने बंद राहतील. अपवादात्मक परिस्थीतीत रेशन दुकानाबाबत काही वेळ तहसिलदार यांनी ठरवून घ्यावी.   किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी विक्री केंद्रे बंद राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालये बंद राहतील.  मान्यता प्राप्त विद्यापीठाची पुर्व नियोजित परिक्षा असल्यास त्याचे तहसिल कार्यालयाकडून पास घेवून आयोजन करता येईल. सर्व  हॉटेल/ रेस्टॉरंट  (अत्यावश्यक सेवेसाठी होम डीलाव्हरी/  पार्सल देणारे हॉटेल वगळता )  बंद राहतील.

 सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील. शॉपींग मॉल, मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप, दारु दुकाने, फेरीवाले व्यवसाय बंद राहतील. गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडास्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील. पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील.

  दुधाची दुकाने, मेडीकल दुकाने वृत्तपत्र सेवा, मिडीया सेवा, कुरिअर, पेट्रोलपंप (अत्यावश्यक व शासकीय सेवेसाठी ) रुग्णाला ने-आण करणारी रिक्षा सेवा सुरू राहील.  दुधाची दुकाने सकाळी 6 ते 9 आणि सध्याकाळी 5 ते 7 या वेळेत सुरु राहतील, अत्यावश्यक सेवेसाठी गॅरेज, शासकीय कार्यालये (50 टक्के उपस्थितीत), पूर्वीचे नियोजीत परिक्षा असणारे शाळेचे केंद्र सुरु राहतील. आंतरराज्य व जिल्हा मान्यताप्राप्त वाहतूक (जसे एस.टी. महामंडळ, पोस्ट विभागाचे वाहने) सुरु राहतील. रेल्वे, विमान बस सेवा सुरु राहतील.

 मेडिकल उपचार करणारे नागरिक / रुग्ण, त्यांची ने आण करणारे रिक्षा, मेडीकल दुकानातून औषधी घेणारे नागरिक, शासकीय कामावर असणारे कर्मचारी, रेशन घेण्यासाठी येणारे नागरिक, अपवादात्मक परिस्थीतीत प्रवास करणारे वाहन यांना पोलीस / न.प. पथकाला ओळखपत्र/ उपचाराचे कागद व इतर कागदपत्रे दाखवावे लागतील. मेडीकल दुकाने, दुधाची दुकाने, रुग्ण वाहिका, रुग्णाला उपचारासाठी नेणारी रिक्षा, शासकीय  कर्तव्यावर असणारी वाहने, आपत्ती व्यवस्थापन व तातडीच्या शासकीय सेवेवर असणारे अधिकारी कर्मचारी, शासकीय कामासाठी नेमलेले पथक व त्यांचे मदतनीस यांना या आदेशातून सुट देण्यात येत आहे.

                तसेच इतर शासकीय आस्थापनांना (उदा, कृषिविभाग, महावितरण, टेलिफोन) घरपोच सर्वे, सुविधा कामे करावयाची झाल्यास कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करुनच नागरिकांच्या घरी जाता येईल. यासाठी ओळखपत्र जवळ ठेवणे व तहसिल कार्यालय मधून पास घेणे आवश्यक राहिल.

                एरंडोल क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या निर्बधाचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.  सदर आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रीया संहिता,1973 चे तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

००००

Thursday, 25 March 2021

कोरोना संशयित रुग्ण शोध मोहीमेस नागरिकांनी सहकार्य करावे नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊनचा विचार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा इशारा

 

          

         जळगाव (जिमाका) दि. 25 - जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी टेस्टिंगवर भर दिला जात आहे. त्यामुळे बाधितांची संख्येत वाढू होवू शकते. लॉकडाऊनबाबत विचार सुरु असून हा निर्णय ऐनवेळी घेतला जाणार नाही. सध्या सुरु असलेल्या संशयित रुग्ण शोध मोहिमेस नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करुन शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

            जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर नियत्रंण मिळविण्यासाठी ग्रामीण भागात रुग्ण शोध मोहिम सुरु आहे. शहरी भागातही ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 

कोरोनाचा कामाच्या ठिकाणाहून अधिक प्रसार

            जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्यात बाधित रुग्णांच्या लक्षणांमध्ये अनेक बदल झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आता डोकेदुखी, अंग दुखणे, चव न येणे, वास न येणे, डायरिया अशी लक्षणे आढळत आहे. त्यामुळे यापैकी कोणतेही लक्षणे असल्यास नागरिकांनी स्वतःहून आपली कोरोना चाचणी करुन घेणे. केंद्रीय समितीच्या दौर्‍यातील सूचनेनुसार रुग्णशोध मोहिमेत कंटमेंट झोनमध्ये काळजीपूर्वक सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाचा अधिक प्रसार हा कामाच्या ठिकाणाहून होत असल्याचे निर्देशनास आले आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

 होळी, धुलीवंदन सार्वजनिक ठिकाणी साजरा न करण्याचे आवाहन

            कोरोनाच्या काळात प्रत्येक सण, उत्सवावर बंदी असली तरी होळी आणि धुलीवंदन हा सण सार्वजनिकस्थळी न साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. तसेच याबाबत राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुढील आदेश देण्यात येईल. तीन दिवसाच्या लॉकडाउनबाबत विचार सुरु असून आदेशपूर्वी नागरिकांना पुरेसा वेळ दिला जाईल. लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.

 

दंडात्मक कारवाईवर भर - पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे

            नियमांचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोनाची स्थिती अजून बिकट होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनातर्फे विनामास्क, नियमांचे उलंघन करणार्‍यांवर अजून तीव्र स्वरुपात कारवाई करण्यात येणार आहे. पुन्हा तीन दिवस लॉकडाऊनसाठीसुद्धा पोलीस प्रशासन सज्ज असून प्रत्येकाने मी जबाबदार या अभियानानुसार स्वयंशिस्त पाळावी, असे पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे म्हणाले. पोलीस आणि त्यांचे कुटुंबीयासाठी 40 बेडचे कोविड केअर सेंटर शुक्रवारपासून पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 रूग्ण शोध मोहिमेस सहकार्य करावे डॉ. बी. एन. पाटील

            जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यानिहाय 1 हजार नागरिकांपर्यंत रूग्ण शोध पथक पोहचत आहे. तालुक्यात अंगणवाडी सेविका, अशा वर्कर्स, शिक्षक आदी आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून माहिती गोळा करीत आहे. मोहिमेंदरम्यान आपल्याकडे येणार्‍या आरोग्य कर्मचार्‍याला आजाराबाबत योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी दिली.

 शहरात आजपासून रुग्ण शोध मोहिम- आयुक्त कुलकर्णी

            शहरात कोरोनाची वाढती संख्या बघता मनपा हद्दीत मनपाच्या 10 हेल्थ सेंटर कार्यान्वित असून या माध्यमातून रुग्णशोध मोहीम शुक्रवार, 26 मार्चपासून सुरु करण्यात येत आहे. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करुन योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले.

            शहरात अनेक नागरिक मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग  पाळत नसल्याचे दिसत आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईसाठी मनपाची चार पथक असून सुभाष चौक परिसरासाठी स्पेशल टीम तयार करून पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली जाणार आहे.

            शहरात पिंप्राळा, खोटेनगर, कांचननगर, अयोध्यानगर, गणेश कॉलनी, शिवकॉलनी भाग हॉटस्पॉट आहे. वाढती रुग्णसंख्या बघता गृह विलगीकरणाच्या नियमात बदल केले असून परवानगीसाठी मनपाच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. तर नॉन कोविडसाठी पिंप्राळा, मेहरुण आणि शिवाजीनगर येथील स्मशासनभूमीत अंत्यविधी करता येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

            शहरात लवकरच कोरोना रुग्ण शोध मोहिम सुरू होणार आहे. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळणे आवश्यक असून ज्यांना लक्षणे वाटतात त्यांनी लगेच कोरोनाची चाचणी करूण घेणे आवश्यक आहे. शोध मोहिमेला आलेल्या पथकाला माहिती न लपवता योग्य माहिती देवून सहाकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी

 केले.

00000

31 मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिने दस्त नोंदणीस राहणार सवलत

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 - राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत 31 मार्च, 2021 रोजी संपत असल्याने जिल्ह्यातील नोंदणी कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गर्दी टाळण्याचे आवाहन पोलीस व प्रशासनाकडून केले जात असून दुसरीकडे सवलतीची मुदत संपत असल्याने गर्दी होऊ नये व लोकांना सवलतीचा फायदा घेता यावा, यासाठी 31 मार्च, 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क भरा आणि पुढील चार महिन्यात कधीही दस्त नोंदणी करण्याचा पर्याय नागरिकांना देण्यात आला आहे.

            राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गतवषी खरेदीदारांना मालमत्तांच्या व्यवहारांसाठी प्रोत्साहन देऊन रिअल इस्टेटलाही चालना देण्यासाठी 1 सप्टेंबरपासून 31 डिसेंबर पर्यंत मुद्रांक शुल्कात 3 टक्के तर 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत 2 टक्के सवलत दिली आहे.

            पहिल्या टप्यातील सवलत योजनेला संपुर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यातही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. सवलतीचा दुसरा टप्पा 31 मार्चला संपत असल्याने नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासुन दस्त नोंदणीसाठी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. कोरोना परिस्थिती असल्याने गर्दी टाळण्यासाठी शासनाकडून वारंवार आवाहन केले जात असतांना केवळ सवलत योजनेची मुदत संपत असल्याने दस्त नोंदणी कार्यालये दस्त नोंदणीसाठी गजबजलेली पाहायला मिळत आहे.

            या सवलतीचा आता खरेदी–विक्री तसेच बक्षीसपत्र करु इच्छिणाऱ्यांना लाभ होणार असुन 31 मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरुन ज्या दिवशी मुद्रांक शुल्क भरले आहे तेथुन पुढील 4 महिन्यांमध्ये दस्तनोंदणी करता येणार असल्याने याचा विशेषत्वाने फायदा घ्यावा. तसेच नागरिकांनी आता मुद्रांक शुल्काचा भरणा केल्यास पुढील चार महिन्यात त्यांना दस्त नोंदणी करताना सध्याच्या सवलतीचा फायदा घेता येऊ शकेल.

            तरी नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी गर्दी करु नये व कोव्हीडपासून आपले तसेच इतराचेही संरक्षण करावे, सुचनांचे पालन करावे. असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा, मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

Wednesday, 24 March 2021

बंद पडलेल्या अनुदानित दिव्यांग विशेष शाळेतील मान्यताप्राप्त कर्मचा-यांची माहिती 31 मार्चपूर्वी अपलोड करण्याचे आवाहन

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 24 – राज्यातील  30 जून, 2020 पर्यंत बंद पडलेल्या/ रद्द केलेल्या दिव्यांगाच्या अनुदानित विशेषशाळा / कार्यशाळा मधील मान्यताप्राप्त शिक्षक, शिक्षकेत्तर  कर्मचारी यांचे नावे आयुक्तालयात ठेवण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीत सामाविष्ठ करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार आयुक्तालयाचे  Google forms  मध्ये  http://bit.ly/Absorptionapplication  अशी लिक तयार करुन कार्यान्वित करण्यात आली असून त्याव्दारे संबधित मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आवश्यक त्या प्रमाणित कागदपत्रांच्या प्रती अपलोड करुन माहिती 31 मार्च, 2021 पर्यंत भरण्यात यावी.

            सदर दिनांकापर्यंत संपूर्ण माहिती प्रमाणित कागदपत्रांसह परिपूर्ण माहिती उपरोक्त लिंकमध्ये न भरल्यास संबधित समायोजनबाबत कार्यवाही करणे शक्य होणार नाही. तसेच समायोजनासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव तात्काळ कार्यालयास सादर करावे. याची नोंद जिल्हयातील बंद पडलेल्या / रद्द केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घ्यावी. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यानी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

Monday, 22 March 2021

कोरोनावर लसीकरण प्रभावी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जमादार

            जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 22- लसीकरणानंतर कोरोना होऊ शकतो, पण लसीकरणानंतर झालेल्या कोरोनाची तीव्रता कमी असते. ताप, खोकला किंवा कोरोनामुळे शरीराच्या इतर अवयवांवर कोरोनाचा परिणाम होत नाही. कोरोना  लसीकरणुळे 94 टक्के लोकांना संरक्षण मिळते. त्यामुळे लसीकरण महत्वाचे आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी कळविले आहे.

            देशभर लसीकरणाची मोहीम सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातही 60 वर्षावरील आणि 45 वर्षावरील इतर आजार असणाऱ्या नागरीकांचे लसीकरण केले जात आहे. दरम्यान लसीकरणामुळे कोरोना होणार नाही, अशी अनेकांची समजूत आहे. वास्तविक लसीकरणानंतरही  काही लोकांना कोरोना होऊ शकतो. मात्र कोरोना संसर्ग झाल्यानंतर एखाद्याच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामाला निश्चितपणे लगाम बसणार आहे. लस  घेतल्यानंतरही सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. कोरोनाच्या आधी लस घेणे गरजेचे आहे. मास्क वापरणे बंधनकारक आहे. सध्या कोरोनामुळे 100 पैकी 2 ते 3 लोकांचा मृत्यू होत आहे. हे मृत्यूचे प्रमाण रोखण्यात शासनाकडून दिली जाणारी लस प्रभावीपणे काम करते. मृत्यूदर कमी करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. सध्या कोविशिल्ड व कोवॅक्सिन ह्या लस दिली जात आहे. दोन्ही लस प्रभावी आणि सुरक्षित आहे. 60 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर, किडनीचे आजार असणाऱ्यांनाही ही लस घेता येते.

            जळगाव जिल्हयात पहिल्या टप्प्यात आरेाग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सला तर तिसऱ्या टप्यात 60 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 86 हजार 677 व्य्क्तींना पहिला डोस तर 11 हजार 698 व्यक्तींना  दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणासाठी जिल्हयात 77 प्राथमिक आरोग्य केंद्र, 22 ग्रामीण रुग्णालये, 23 खाजगी रुग्णालये ह्या ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरु आहेत.

 लस घेतल्यानंतर हे जाणवेल

            लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे सामान्य परिणाम दिसतात ते 1 ते 2 दिवस राहतात. सध्या पॅरासिटमॉल या औषधाने बरे वाटते. काहीला ते जाणवत नाहीत. इतर त्रास झाला तर घाबरण्याचे कारण नाही, लसीमुळे प्रतिकारशक्ती वाढते.

लस घेण्यासाठी जाताना

            लस घेण्याआधी जेवण करुन जावे तसेच आधारकार्ड व पॅनकार्ड  अथवा ओळखपत्र घेऊन जावे. दोन वेळा लस घ्यावी लागते, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घेतला पाहिजे, हदयरोग, किडनी विकार, प्रत्यारोपण, संधिवात, स्टिरॉईड घेणाऱ्यांनी लस घ्यावीच. धोका नसला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास उपयुक्त ठरते.

कोणी लस घेऊ नये

 

गर्भवती महिला आणि 16 वर्षाखालील मुलांनी लस घेऊ नये,

 

लसीकरणानंतर काय खबरदारी घ्यावी

            लसीकरणानंतरही मास्क, सॅनिटायझरचा वापर, तसेच सुरक्षित अंतर ठेवलेच पाहिजे, लसीकरणामुळे मृत्यूदर कमी करण्यास मदत होणार आहे. गभीर रुग्णांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा व त्यानंतर 14 दिवसात  शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद डॉ. जमादार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

००००

कोरोना संशयित/बाधितांवर रूग्णालयात करावयाच्या औषधोपचाराबाबत

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 22 -  कोविड -19 च्या विषाणूमुळे बाधित / संशयित  रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. त्यामुळे काही गरजू रुग्णांना बेड (खाट) उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन ऑक्सीजन बेडची जास्तीत जास्त सुविधा सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यरत आहे.

            सद्यस्थितीत गरजू रुग्णांना औषधोपचार मिळणे ही प्राधान्याची बाब असून त्यांना पुढे गंभीर स्थितीत रुगणालयात भरती करण्याची वेळ येऊ नये यासाठी खालील उपाययोजना / आवाहन करण्यात येत आहे.

            लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णास ऑक्सीजन व अत्यावश्यक उपचाराची आवश्यकता नसल्याने त्यांना बाह्यरुग्ण विभागातून (OPD) योग्य समुपदेशन करुन उपचार करावा व वेळोवेळी तपासणी (गरज भासल्यास) करावी, मध्यम स्वरुपाचा छातीचा सी.टी. स्कॅन मूल्यामापन ( CT Severity Score Moderate  8 to 15/25) असलेल्या व इतर आजार ( मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा व हदयविकार) असलेल्या रुग्णांना जरी आज ऑक्सिजनची गरज भासत नसली, तरी अशा रुग्णांवर  injection – Remdesivir / Heparin / Dexamethasone  यासारखे औषधोपचार  Clinical Judgement व  Protocol  नुसार वेळीच करण्यात यावेत, वरील प्रमाणे औषधोपचार केल्यास सदर रुग्ण पुढील काळात गंभीर अवस्थेत भरती करण्याची वेळ येणार नाही. असे तज्ञ डॉक्टरांचे मत असेल व केवळ बेडसच्या उपलब्धता नसल्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास अडचण येत असेल तर  DCH ( Dedicated Covid Hospital )  यांनी रुग्णांच्या संमतीने त्या रुग्णांवर  Day Care  उपचार करावेत. रुग्णांस वरील प्रमाणे  Injection /  औषधोपचार  करुन  काही काळ निरीक्षणाखाली ठेवून  Isolation  केलेल्या ठिकाणाहून  Ambulance  व्दारे ने – आण करण्यात यावी.

            वरील नमूद बाबींचा अवलंब केवळ बेडस उपलब्ध होत नसेल तरच करावा, जेणेकरुन मध्यम  CT Severity Score  असलेले इतर आजाराचे  (Comorbid Condition) रुग्णांना वेळीच योग्य औषधोपचार मिळून त्यांना पुढील काळात गंभीर होण्याचा धोका काही प्रमाणात टाळता येईल. तसेच अशा रुग्णांना पुढील काळात बेडस उपलब्ध झाल्यास भरती करणे आवश्यक असल्यास भरती करण्यात यावे किंवा इतर रुग्णालयात जिथे बेडस उपलब्ध आहेत त्याठिकाणी संदर्भित करण्यात यावेत. असे अभिजीत राउत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव  यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.

००००

खाजगी कोविड रुग्णालयास वेळेवर व नियमित मेडीकल ऑक्सीजन पुरवठा न केल्यास होणार कारवाई

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 22 –  जळगाव जिल्हयात कोविड -19 विषाणूमुळे बाधित रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने खाजगी कोविड -19 रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना वेळेवर व नियमित मेडीकल ऑक्सीजन पुरवठा होणे आवश्यक आहे.

            खाजगी कोविड–19 रुग्णालयांना त्यांचे मागणी व आवश्यकतेनुसार नियमित व तात्काळ मेडीकल ऑक्सीजन पुरवठा केला जात नसलेबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. वेळेवर ऑक्सीजन न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने खाजगी कोविड -19 रुग्णालयांना नियमित व तात्काळ मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात यावा. सदर कामात टाळाटाळ व दिरंगाई आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

जळगाव जिल्ह्यात 6 एप्रिलपर्यंत 37 (1) व (3) कलम लागू

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 22 :- सध्या संपुर्ण जगात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरु असून सदर संसर्ग रोगावर भारतात लस उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी देखील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्वे निर्गमित केलेले आहे. त्याचे तंतोतंत पालन होण्यासाठी त्याचप्रमाणे नागरीकांनी सण,उत्सव, थोरामोठ्याच्या जयंती, पुण्यतिथी, धार्मिक दिंडी अशा स्वरुपांचे कार्यक्रम घेवु नये याकरीता प्रतिबंधात्मक आदेशाची आवश्यकता आहे.

त्याकरीता खालील कृत्यांना बंदी घालण्यात येत आहे.

            शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया व काठया किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तु घेऊन फिरणे, अंग भाजुन टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे, दगड अगर इ. अस्त्र किंवा शस्त्र सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे, साधने इ. जमा करणे आणि बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्रांचे प्रतिकात्मक, प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सार्वजनिकरित्या ओरडणे, किंवा विक्षिप्तपणे हावभाव करणे, सभ्यता अगर नितीमता विरुध्द असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे आणि तशी चिन्हे, चित्रे, फलकइ. लावणे किंवा इतर कोणतेही असे जिन्नस अगर वस्तु तयार करणे अगर त्यांचा प्रसार करणे या कृत्यांना बंदी घालीत आहे. 

            वरील कलम 37 (1) अंतर्गतचा हा आदेश ज्यांना हातात लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही, अशा वृध्द अथवा अपंग इसमांना लागू असणार नाही.

            त्याचप्रमाणे  मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पांच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यांस सबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची  पुर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास  किंवा मिरवणुका काढण्यास या आदेशान्वये बंदी घालीत आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेत यात्रा यांना लागु असणार नाही. परंतु जिल्हादंडाकारी, जळगाव यांचेकडील आदेश क्र. दंडप्र -01/ कावि/2021/605 दि. 14 मार्च, 2021 मधील अटी लागु राहतील. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. हा आदेश दिनांक 23 मार्च, 2021 चे रात्री 1 वाजेपासून ते दिनांक 6 एप्रिल, 2021 चे रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

Friday, 19 March 2021

पिक विमा योजनेसाठी शेतक-यांची माहिती पोर्टलवर भरण्याचे आवाहन

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 19 – पिक विमा योजना रब्बी हंगाम 2020-21 अंतर्गत जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची माहिती बँकेमार्फत विहीत मुदतीत विमा पोर्टलवर भरलेली नाही. यामुळे भविष्यात पिक विमा मंजुर झाल्यास शेतकरी लाभार्थी पिक विम्याच्या नुकसान भरपाई पासुन वंचित राहू नये. यास्तव उपायुक्त, (पत), कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, कृषि भवन, नवी दिल्ली यांनी सर्व बँकाना ज्या शेतकऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया अपुर्ण राहीली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती भरण्याची शेवटची संधी दिली आहे. त्यानुसार दि. 22  ते 26 मार्च, 2021 दरम्यान पोर्टल पुन:श्च सुरु करण्यात येणार आहे.

            जिल्हयातील सर्व बँकांना जिल्हा अग्रणी बँक, जळगाव यांचेमार्फत याबाबतच्या सुचना दिल्या आहे. तरी शेतकरी बांधवांनाही आवाहन करण्यात येते की, त्यांची माहिती अपुर्ण भरली गेल्याने पिक विमा हप्ता भरला गेला नसल्यास संबंधित बँकांशी  संपर्क साधुन विमा पोर्टलवर विहीत मुदतीत माहिती भरण्याची प्रक्रिया पुर्ण करण्याबाबत सुचित करावे.

            यासंबधी काही अडचणी आल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                     ००००

महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा परीक्षार्थीसाठी मार्गदर्शक सूचना

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 19 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत राज्य सेवा पुर्व परिक्षा 2020 ही दिनांक 21 मार्च, 2021 रोजी प्रथम सत्र सकाळ 10 ते दुपार 12 व व्दितीय सत्र दुपारी 3 ते सायंकाळी 5 या कालावधीत जळगाव शहरातील 16 उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेकरीता जिल्ह्यातून 6 हजार 264 परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. सदर परीक्षेकामी जिल्ह्यातील एकूण 489 इतका अधिकारी / कर्मचारी वर्ग यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

            परीक्षार्थी यांना सकाळ सत्रासाठी सकाळी 8.30  पासून ते 9.30 पर्यंत व दुपार सत्रासाठी दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाईल. उपस्थित सर्व उमेदवारांची तपासणी / झडती (Frisking) केली जाणार आहे.

           

उमेदवारांना विशेष सुचना

            प्रत्येक परीक्षेच्या उमेदवाराने सबंधित परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र ( डाऊनलोड करुन प्रिंट केलेले) आणने सक्तीचे आहे, उमेदवाराच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान एक मुळ ओळखपत्र तसेच त्याच्या दोन  छायांकित प्रती सोबत आणणे अनिवार्य आाहे, स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लटुथ, दुरसंचार साधने वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू तसेच पुस्तके, बॅग्स, पॅड, पाऊच, कॅल्क्युलेटर ई. साधने परीक्षा केंद्राच्या परीसरात वापरण्यास सक्त मनाई आहे, आयोगाने परवानगी नाकारलेली कोणत्याही प्रकारचे अनधिकृत साधन/ साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित उपकेंद्राच्य मुख्य प्रवेशव्दाराजवळ ठेवावे लागेल व त्या साधन / साहित्याची सुरक्षिततेची जबाबदारी संबंधिताची राहील,  उमेदवाराला स्वत:चा जेवणाचा डबा / अल्पोपहार व पाण्याची बाटली आणण्याची परवानगी आहे. तसेच दोन पेपरच्या मधल्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे.

            परीक्षा केंद्रात काळ्या शाईचे बॉल पॉईट पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र, मुळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत तसेच ओळखीच्या पुराव्याचे मुळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत अथवा प्रवेश  पत्रावरील सूचनेनुसार आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यसह उमेदवाराला परीक्षा कक्षेत प्रवेश देण्यात येईल.

            ताप, खोकला, थंडी इत्यादी प्रकारची लक्षणे असलेल्या अथवा 38 डिग्री सेल्सिअस अथवा 100.4 डिग्री फॅरेनहाईट पेक्षा जास्त तापमान असलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था स्वतंत्र करण्यात येणार आहे, कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच परीक्षार्थी यांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. तसेच सदर परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच उमेदवार यांना खालीलप्रमाणे साहित्य पुरविण्यात येणार आहे. 

            A Besic Covid Kit (bck) – परीक्षेकरीता उपस्थित प्रत्येक उमेदवाराकरीता एक  B. Extra Protective Kit        ( EPK)  - परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता नियुक्त प्रत्येक अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी एक  C. Personal Protective Equipment Kit (ppek)  फक्त कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत असलेल्या उमेदवारांकरीता प्रत्येक 50 उमेदवारामागे 1 या सख्येने तसेच लक्षणे दिसून येत असलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या पर्यवेक्षणाकरीता नियुक्त समवेक्षकासाठी 1, परीक्षार्थी यांनी परीक्षेच्या दिवशी प्रवास करतांना  परीक्षेचे हॉल टिकीट सोबत बाळगणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेकरीता नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांनी परीक्षेचे आदेश व शासकीय ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे,

            जळगाव शहरात परीक्षेच्या दिवशी परीक्षेकामीचे शाळा / महाविद्यालय सुरु राहतील, तसेच परीक्षार्थीसाठी जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक प्रवासासाठी सुरु राहतील, परीक्षार्थी यांना परीक्षेस सोडणेसाठी त्यांचेसोबत एक व्यक्तीस सुट राहील,

            परीक्षा केंद्रावर प्रवेशाच्या आधी प्रत्येक उमेदवाराची थर्मल गनव्दारे तापमान तपासणी घेण्यात येणार आहे. त्याकरीता आयोगामार्फत पुरवठादार संस्था नेमण्यात आलेली आहे. सर्व उमेदवारांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात परीक्षा केंद्रावर आवश्यक ती खबरदारी घेऊन त्यासंदर्भातील नियम पाळणे बंधनकारक आहे. सदर परीक्षेदरम्यान उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे निदेर्शनास आल्यास त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे केंद्रप्रमुख महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा 2021 तथा निवासी उपजिल्हाधिकारी, राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

मागासवर्गीय विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 19 – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्ष शुल्क योजनेचे अर्ज भरण्याकरिता महाडीबीटी हे ऑनलाईन पोर्टल दि. 3 डिसेंबर, 2020 पासून सुरु झाले आहे. तथापि गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अद्यापपर्यंत अनु.जाती प्रवर्गाचे 66% तर विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गाचे  69% अर्ज भरण्यात आलेले आहेत.

            तरी सर्व  मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज तत्काळ भरण्यात यावेत तसेच महाविद्यालयाच्या लॉग-इन वर प्रलंबित असलेले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव कार्यालयाच्या  लॉग-इन वर त्वरित पाठवावे.

महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी  स्वत: वैयक्तिक लक्ष घालून एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                               ००००

Wednesday, 17 March 2021

ऑलनाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

         जळगाव (जिमाका) दि. 17 -   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगावतर्फे  22 व 23 मार्च 2021 या कालावधीत कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडुन  www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेब पोर्टलवर विविध शैक्षणिक पात्रतेची एकूण 115 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आलेली आहेत. यासाठी विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि ऑनलाईन आवेदन केलेल्या पात्र उमेदवारांच्या मुलाखती उद्योजकांच्या सोईनुसार शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील.

            उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा महास्वयंम ॲप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे.   एम्प्लॉयमेंट  पेजवरील  जॉब सीकर हा पर्याय निवडून आपला नोंदणी किंवा  आधार क्रमांक व पासवर्डने लॉग ईन करावे आणि नियोजित दिवसाच्या रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करावी.  या संधीचा अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा. नोंदणी करण्यास समस्या असल्यास कार्यालयीन वेळेत  ( दूरध्वनी क्रमांक-0257-2239605)  संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त डॉ. रा.म. कोल्हे  यांनी केले आहे. 

००००

नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 16 मे रोजी

         जळगाव, (जिमाका) दिनांक 17 :- केंद्र सरकार संचालित जवाहर नवोदय विद्यालय साकेगाव (भुसावळ) जिल्हा जळगाव येथील इयत्ता 6 वी च्या सन 2021-22 प्रवेशा करीता होणारी निवड चाचणी परीक्षा 10 एप्रिल ऐवजी 16 मे 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.  सर्व संबधीत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, अध्यापक, पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षेचे प्रवेश पत्र त्याच वेबसाईट navodaya.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करुन घ्यावे. अधीक माहितीसाठी 9404900916 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. खंडारे यांनी केले आहे.

००००

कृषी योजनांच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दिनांक 17 :- कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी महाडीबीटी फार्मर  पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जा|द्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे.  सन 2021-22 करिता अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  सन  2020-21 मध्ये महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करणारे परंतू कोणत्याही योजनेसाठी  निवड न झालेले  शेतकरी त्यांच्या अर्जातील बाबींमध्ये बदल करू शकतील. असे अर्ज सन 2021-22 करिता ग्राह्य धरले जातील त्याकरिता त्यांच्याकडून पुन्हा शुल्क आकारले जाणार नाही.

                        शेतकऱ्यांनी  https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावरील  ‘ शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा.  शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट किंवा सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.  ‘वैयक्तिक लाभार्थी’   म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. आधार क्रमांक नसल्यास प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

            या कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेता येईल. यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com  या ई- मेल वर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे संचालक, विस्तार व प्रशिक्षण कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका कळविले आहे.

००००

परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

             जळगाव, (जिमाका) दिनांक 17 :-   जळगाव शहरातील एकूण 16 उपकेंद्रावर  सकाळी 10 ते दुपारी  12 व दुपारी 3 ते 5 या वेळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पुर्व परक्षा 2021  घेण्यात येणार  आहे. परीक्षेच्यावेळी गैरप्रकार  होऊ नये यासाठी शहरातील एकूण 16 परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रवेशास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेशान्वये  बंदी घातली आहे. सदर आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही.

                                                                         ०००० 

Tuesday, 16 March 2021

रोहयोसाठी नोंदणीकृत सामाजिक संस्थांना सहयोगी संस्था म्हणून अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दिनांक 16 :- महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत मृदा व जलसंधारण, वृक्ष संगोपन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक लाभाची कामे तसेच मूलभूत सुविधांचा विकास आदी कामांना अधिकाधिक लोकांपर्यंत  पोहोचविण्यासाठी नोंदणीकृत सामाजिक संस्थांना मग्रारोहयोची सहायोगी संस्था म्हणून सहभागी करून घेण्यात येणार आहे.

वरील कामांशी संबंधित अशासकीय संस्थांना सामावून घेतल्यास निर्माण होणाऱ्या मत्तांची गुणवत्ता वाढण्यास तसेच योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थेस शासकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा. जलसंधारण किंवा सामुदायिक विकासाचे नियोजन क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.  स्वयंसेवी  संस्थाचे प्रशासकीय संघटन जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असावे. सदर स्वयंसेवी संस्था निती आयोगाच्या एनजीओ पीएस पोर्टलवर नोंदणीकृत असावी, नसल्यास नोंदणी करुन घ्यावी.

            निवड होणाऱ्या सामाजिक संस्थेला मग्रारोहयोच्या अंमलबजावणीत जिल्हास्तरावर किंवा तालुकास्तरावर प्रशिक्षण, संवाद, श्रमदान, नियोजनात सहभाग, सामाजिक अंकेक्षण, गुणवत्ता मोजमापच्या कामात सहभाग घेता येईल. या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मग्रारोहयो अंतर्गत विविध प्रकारची कामे हाती घेण्यात येतील. निकष पूर्ण करीत असलेल्या जिल्ह्यातील नोंदणीकृत सामाजिक संस्थांनी शेतकरी, गाव, तालुका, जिल्ह्याला समृद्धीकडे नेणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

००००

गुणवंत खेळाडुंसाठी आर्थिक सेवावृत्ती

         जळगाव (जिमाका) दि. 16 - भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालयातर्फे गुणवंत खेळाडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे आणि सक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना आहे.

            ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि जागतिक स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे.  योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्याने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार)  स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त / गुणवंत खेळाडूस मानधन देण्याची तरतूद केली आहे. तसेच 30 वर्षे किंवा सक्रिय क्रीडा पासून सेवानिवृत्तीची तारीख यापैकी नंतरच्या दिवसापासून पेन्शन देय असेल आणि त्याच्या / तिच्या आयुष्यादरम्यान कायम राहील, परंतु अशी पेन्शन लागू करतांना खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधून निवृत्त झाले असतील.

ऑलिम्पिक  किंवा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील प्राविण्यधारक खेळाडूस 20 हजार, सुवर्ण पदक विश्वचषक किंवा विश्व अजिक्यपद स्पर्धेसाठी (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) 16 हजार, रौप्य व कास्य पदक विश्वचषक स्पर्धेसाठी (ऑलिम्पिंक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार 14 हजार,  कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकासाठी 14 हजार आणि कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्समधील रौप्य व कास्य पदकासाठी 12 हजार रुपये दरमाह मानधन रक्कम असेल.

            दर चार वर्षानी आयोजित होणाऱ्या विश्वचषक / विश्व अजिक्यंपद स्पर्धाकरिता सदरची योजना लागू राहील. याबाबत संबधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा आहे. विहित नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष किंवा सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव अथवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचे स्वाक्षरी आवश्यक आहे.  याबाबत अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे.   https://www.yas.nic.in/sports/scheme-sport-fund-pension-meritorious-sportspersons राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

००००

Monday, 15 March 2021

जागरूक ग्राहक बना.... जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

 

             जळगाव (जिमाका) दि. 15 - जागतिक ग्राहक दिनानिमित्ताने मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. कोरोना विषाणू प्रादुर्भाव असल्याने सदर कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. त्यानुसार जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते. तर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी आणि सदस्य हे ऑनलाईन उपस्थित होते.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी जागतिक ग्राहक दिनाचे वैशिष्ट्य सांगून ग्राहक ही संकल्पना केवळ स्थानिक नसून वैश्विक असल्याने जगभरात ग्राहक संरक्षण , ग्राहकांचे हक्क अबाधित राखणे, त्याबाबत जनजागृती आणि प्रबोधन करणे सुरू असते, ग्राहक दिनाच्या माध्यमातून याबाबत ग्राहकांना मार्गदर्शन करणेत येत असल्याचे सांगितले. यावर्षी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक ग्राहक दिनाचे निमित्ताने ग्राहक संरक्षण कायदा, 2019 बाबत ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी सविस्तर माहिती दिली. ग्राहक आयोगात दाखल करावयाच्या तक्रारीच्या खर्च मर्यादेत झालेली वाढ, ऑनलाईन फसवणूक झाल्यास करता येणारी तक्रार, ऑनलाईन तक्रार दाखल करणे आणि ऑनलाईन सुनावणी याबाबत तपशीलवार माहिती दिली. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 आणि ग्राहक संरक्षण कायदा,2019 यातील महत्वाचे बदल याबाबतही त्यांनी मार्गदर्शनात केले.

            या कार्यक्रमात सहाय्यक नियंत्रक, वैध मापनशास्त्र विभाग श्री. जाधव तसेच अन्न  आणि औषध विभागाचे सहा. आयुक्त श्री.यो. को. बेंडकुळे यांनी आपल्या विभागाकडून ग्राहक संरक्षण बाबत करणेत येत असलेल्या बाबींची माहिती दिली.

            जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या कार्यक्रमात सर्व ग्राहकांना शुभेच्छा देताना जागरूक ग्राहक बनण्याचे आवाहन केले. ग्राहकाच्या अधिकाराची जपणूक झाली पाहिजे, ग्राहक आयोगाची भूमिका यात अत्यंत महत्वाची आहे. ऑनलाइन खरेदीचे वेळी फसवणूक होण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. ग्राहकांनी याबाबत अधिक खबरदारी घ्यावी. कुठल्याही ऑनलाइन लिंक वर खात्री करूनच क्लिक करावे, लॉटरी किंवा बक्षीस मिळाल्याचे प्रलोभन दाखवून ग्राहकांना अनोळखी लिंक देऊन जाळ्यात ओढले जाते. कुठलीही बँक ग्राहकांना OTP साठी फोन करत नसते. तेव्हा ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रसिध्द कंपनीचे नावात किरकोळ बदल करून देखील ग्राहकांना फसवले जाते. अशा स्वरूपाचे फसवे व्यवहार केवळ जागरूक ग्राहकच रोखू शकतात म्हणून ग्राहकाने आता जागरूक ग्राहक होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री. राऊत यांनी केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमती मनोरे यांनी तर आभार रेखा सावंत यांनी मानले.

00000

Friday, 12 March 2021

यावल वन विभागाच्या कारवाईत 13 घनमीटर लाकूड व आरायंत्र जप्त

 

           

         जळगाव, दि. 12 (जिमाका) – यावल वन विभागाच्यावतीने 10 मार्च, 2021 रोजी वनसंरक्षक, धुळे (प्रादेशिक), डी. डब्लु. पगार व उप वनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव पद्मनाभा एच.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा व्ही.एच.पवार यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व्ही. व्ही. कुटे व वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा (प्रादेशिक) डी. एच. लोंढे व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासह शेख मुखतार शेख युसुफ रा. मन्यार मळी, हमीद नगर, चोपडा येथे गोपनीय पद्धतीने अचानक सकाळी 10 वाजता वरीष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जावून आकस्मित धाडसत्र राबिवले.

            या धाडसत्रात बाभूळ, निलगीरी, निम व इतर असे एकूण 13 घनमीटर माल आढळून आल्याने  तो जप्त करुन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे जमा केला. तसेच 18 इंच व्यासाचे विना परवाना उभे आरायंत्र आढल्याने सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या समक्ष व वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व वनपरिक्षेत्र अधिकारी, चोपडा (प्रादेशिक) यांच्या उपस्थितीत नियमांनुसार पंचनामा करुन ते जप्त करण्यात येऊन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

            सदरची कार्यवाही केल्याने अवैध लाकूड व्यापारी तथा व्यवसायीकांमध्ये दहशत तयार झालेली असून या कार्यवाहीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आली. या कार्यवाहीनुसार वनगुन्हाची नोंद घेत पुढील तपास सुरु आहे. असे यावल वन विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

00000