Tuesday, 30 November 2021

जिल्हा माहिती कार्यालयातील सिनेयंत्रचालक दिलीप खैरनार सेवानिवृत्त

 




           जळगाव, दि. 30 - जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथील सिनेयंत्रचालक दिलीप शिवराम खैरनार हे आज 35 वर्षाच्या प्रदिर्घ शासकीय सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

            सेवानिवृत्ती निमित्ताने श्री. खैरनार यांना जिल्हा माहिती कार्यालयातर्फे स्नेहपुर्ण निरोप देण्यात आला. त्यांना जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आणि माजी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनीही त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्यात.

            याप्रसंगी जिल्हा माहिती कार्यालयातील श्री. विनोद पाटील यांनी श्री. खैरनार यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्यात. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी श्रीमती उषा लोखंडे, श्री. पंकज ठाकूर यांच्यासह कार्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामकृष्ण कोळी उपस्थित होते.

            श्री. खैरनार यांनी डिसेंबर 1985 मध्ये प्रकर्षित प्रसिद्धी पथक, नंदुरबार येथे आपल्या शासकीय सेवेस प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव, नाशिक येथे काम केले.

00000

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन

         जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : अरबी समुद्रात लक्षद्वीपमध्ये येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता व बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) क्षेत्रात भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच 2 डिसेंबर 2021 पर्यंत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिक, शेतकऱ्यांनी सतर्क राहात सुरक्षितस्थळी थांबावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

            जळगाव जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व तापी नदीमधील पाण्याच्या पातळीत वाढ होवून हातनूर धरणाच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी व नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल, तर अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. अवकाळी पावसादरम्यान विजा, गारा व अतिवृष्टीपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. प्रसंगी मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रान्फॉष्र्मर जवळ थांबू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

00000

एक हजार हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहभागाचे ‘महाबीज’च्या व्यवस्थापकांचे आवाहन

 जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात उन्हाळी हंगाम 2021- 22 मध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोलातर्फे (महाबीज) सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन ‘महाबीज’चे जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

            जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्याकरीता प्रती एकर 100 रुपये भरणा करुन आरक्षण करणे आवश्यक आहे. रावेर, अमळनेर, जळगाव, पाचोरा येथील सहाय्यक क्षेत्र अधिकारी तथा जिल्हा व्यवस्थापक, महाबीज यांच्याशी संपर्क साधत सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी व्हावे.

            राज्यातील बहुतांश जिल्ह्यात यावर्षी झालेला सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे सोयाबीन बीजोत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम – 2022 करीता सोयाबीन प्रमाणीत बियाण्याचा तुटवडा येवू नये म्हणून राज्य शासनाच्या निर्देशान्वये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या. अकोला (महाबीज) मार्फत जळगाव जिल्ह्यात रब्बी/  उन्हाळी हंगाम 2021-22 करीता प्रमाणीत सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम एक हजार दहा हेक्टरवर राबविण्यात येत आहे.

            यामध्ये रब्बी / उन्हाळी 2021 या हंगामामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सोयाबीन फुले संगम, फुले किमया, एमएयूएस 612, 2003-2, PKVM-8802 आदी वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एका गावात कमीत कमी 15 एकर क्षेत्रात बीजोत्पादन कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. एका शेतकऱ्याने कमीत कमी 2 एकर क्षेत्र नोंदणी तथा पेरणी करणे अनिवार्य आहे. बीजोत्पादन योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या पायाभूत बियाण्याचा पुरवठा ‘महाबीज’ कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. बियाणे शुल्क शेतकऱ्याने बियाणे उचल करण्यापूर्वी जिल्हा कार्यालयात भरणे अनिवार्य आहे. उत्पादित सोयाबीन बियाण्याकरीता महाबीज मुख्यालयाकडून आकर्षक असे खरेदी धोरण जाहीर करण्यात आलेले आहे. बीजोत्पादन कार्यक्रमाची 100 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पैसे भरुन दहा डिसेंबर 2021 पर्यंत आगाऊ  नोंदणी करण्यात येणार आहे.

            अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा :  जळगाव, जामनेर, बोदवड, पारोळा :  9624128006. रावेर, भुसावळ, यावल, मुक्ताईनगर : 9975930014. अमळनेर, चोपडा, एरंडोल, धरणगाव : 7083569849. पाचोरा, भडगाव, चाळीसगाव : 9922295539.

00000

       

Monday, 29 November 2021

आरोग्य सुविधा मुबलक ठेवा - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 






        जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी आणि लसीकरणाचे नियोजन योग्य रितीने करावे, आरोग्य सुविधा मुबलक असाव्यात यादृष्टीने आरोग्य यंत्रणेने कार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्री.राऊत बोलत होते.  बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक    डॉ. एन.एस. चव्हाण, पोलीस उप अधीक्षक कुमार चिंथा आदी उपस्थित होते.

            महाविद्यालये, वस्तीगृहे, पेट्रोल पंप, रेल्वेस्टेशन, बस स्थानके, फुले मार्केट या ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात यावीत. या ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात यावी.  मोहाडी रुग्णालयात 100 ऑक्सिजन प्लांट आवश्यक आहे. प्रत्येक रुग्णालयात आयसीयूचे नियोजन करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.  फुले मार्केटमध्ये व्यापारी, नागरिकांनी लस घेतली आहे किंवा नाही त्यासाठी सुद्धा नियोजन करण्यात यावे. ‘कोविशिल्ड’ व्हॅक्सीन लशी जिल्ह्यात सर्वापर्यंत पोहोतील या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचना  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीमध्ये दिल्या.

0000

Friday, 26 November 2021

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन



            जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : संविधान दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात आज सकाळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे (प्रशासन), तहसीलदार सुरेश थोरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

Wednesday, 24 November 2021

बोंडअळी निर्मूलनासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे! जिल्हाधिकारी अभिजित राऊत : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

 







                जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात कापूस हे महत्वाचे पीक आहे. या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळीच्या निर्मूलनासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे असून कृषी विभागाने बांधावर जात शेतकऱ्यांना बोंडअळी निर्मूलनाची माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत.

                जिल्ह्यात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनासाठी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक हेमंत बाहेती, मोहीम अधिकारी पी. एस. महाजन, जिनिंग व प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश काबरा, कापूस बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी सुशील सोनवणे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनाच्या जनजागृतीसाठी मे. राशी सीडस प्रा.लि., कावेरी सीडस कंपनी, मे. महिको लि. यांनी तयार केलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी हिरवा झेंडा दाखविला.

                जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, की जिल्ह्यात यंदा सर्वदूर झालेला व लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांकडून कापूस पिकाचा हंगाम वाढविण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गुलाबी बोंडअळीसाठी अखंडित अन्नपुरवठा होत राहिल्याने या किडीचा प्रादुर्भाव वाढत  जाईल. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. बंगळूर येथील क्रॉपी जीवन ॲग्रो रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटतर्फे शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम देवांग यांनी बोंड अळी नियंत्रणासाठी अद्ययावत नोंद घेण्यात आली आहे. याबाबत कृषी विभाग, कृषी विद्यापीठाने क्षेत्रीयस्तरावर प्रात्यक्षिके घ्यावीत, अशाही सूचना त्यांनी केल्या.

                जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 मध्ये कापूस पिकावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रचार व प्रसार करुन शेतकरी बांधवांमध्ये जनजागृतीसाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र व कापूस बियाणे कंपन्यांतर्फे संयुक्त मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत खरीप हंगाम 2022 मध्ये बोंडअळीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सद्य:स्थितीत कापूस पिकाची फरदड घेण्यापासून शेतकरी बांधवांना परावृत्त करुन रब्बी हंगामात हरभरा, गहु, रब्बी ज्वारी व मका यांची पेरणी करण्याचे आवाहन करण्यात येत असुन यासाठी कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना हरभरा, गहु, रब्बी ज्वारी व मका बियाणे अनुदानावर उपब्ध करुन देण्यात आलेले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.               

                सद्य:स्थितीत शेतकरी बांधवांनी कापूस पिकावर अनावश्यक किटकनाशकांचा वापर न करणे व फरदड न घेता कपाशीच्या पऱ्ह्यांटपासून कंपोस्ट खत तयार करावे व हेच खत जमिनीत टाकल्यास जमिनीची सुपिकता वाढेल, असे आवाहन करण्यात येत असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी श्री. ठाकूर यांनी सांगितले.

00000  


कौशल्य विकास विभागाचे उमेदवारांना आवाहन

           जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांची नाव नोंदणी सन 2013 पासून विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर सुरू झालेली आहे. उमेदवार विभागाच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाइन नाव नोंदणी करीत आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन नाव नोंदणी  केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या यूजर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येतो, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि. जा. मुकणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

अल्पसंख्यांक उमेदवाराना देखील रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधी व सुविधाचा लाभ मिळण्याकरीता जास्तीत जास्त अल्पसंख्यांक उमेदवारानी ऑनलाइन नाव नोंदणी करणे अपेक्षित आहे. कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांना देखील नाव नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन व साहाय्य कार्यालयाकडून करण्यात येते. या कार्यालयामार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी वेळोवेळी होणाऱ्या ऑनलाइन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. अल्पसंख्याक उमेदवारांनीही मेळाव्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. मुकणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 या कालावधीत दूरध्वनी क्रमांक 0257- 2959790 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000                  

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 27 व 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांची माहिती

       जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : मा. भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1  ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.

या कार्यक्रमांतर्गत 16 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 15 हजारांहून अधिक दावे व हरकती प्राप्त झाल्या आहेत. याच धर्तीवर आता महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात प्रभागनिहाय मतदार यादीचे वाचन 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत करण्यात येईल.

प्रभागसभेत सध्या अस्तित्वातील मतदार यादी प्रभागातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्यांचे वय 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे तसेच ज्यांची नावे अद्याप मतदार यादीत नोंदविलेली नाहीत त्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात येईल. तसेच प्रभागातील सर्व नागरिकांना मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद तपासून दावे व हरकती सादर करता येतील. तसेच प्रभागातील मृत, स्थलांतरीत, दुबार, लग्न होवून बाहेरगावी गेलेल्या महिला मतदारांची नावे वगळणीबाबत कार्यवाही करण्यात येईल. दिव्यांग तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींची नावे मतदार यादीमध्ये चिन्हांकित करण्यात येणार आहेत. शहरी भागातील मतदारांनी प्रभागनिहाय यादी वाचनात सहभागी व्हावे, असेही आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

00000

Tuesday, 23 November 2021

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया रद्द जिल्हा उपनिबंधक यांची माहिती

                 जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द झालेली असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणाकडून आदेश पारीत झाल्यानंतरच बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

                जळगाव जिल्ह्यातील कृषी  उत्पन्न बाजार समिती पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा व रावेर यांच्या मतदारांची मतदार यांदी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव, भुसावळ, बोदवड, जामनेर, धरणगाव व यावल या बाजार समित्यांना  मतदारांची प्राथमिक/तात्पुरती मतदार यादी सादर करण्याबाबत या कार्यालयामार्फत कळविण्यात आले होते.

                मात्र, बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका क्रमांक 11669/2021 व इतर संलग्न याचिका यात मा. उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद यांनी 18 नोव्हेंबर 2021 रोजी  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, असा आदेश पारीत केलेला आहे. या आदेशास अनुसरुन मा. सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील 22 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशान्वये  प्राधिकरणाकडील 6 व 21 ऑक्टोबर 2021 रोजीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. सदर आदेशान्वये कृषी उत्पन्न बाजार समिती मतदार यादीवर आक्षेप/हरकती मागविण्याची प्रक्रिया राबवलेली आहे ती प्रकिया रद्द करण्यात आलेली आहे.

                या आदेशामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द  झालेली असून  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून आदेश पारीत झाल्यांनतरच बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगाव, यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

00000

हरभरा, ज्वारी, मकासह गहू बियाण्याचे अनुदानावर वितरण

         जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात यंदा समाधान कारक पर्जन्यमान झालेले आहे. यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके व बियाणे लागवड उप अभियानांतर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम या दोन योजनेंतर्गत हरभरा, ज्वारी, मका, गहू बियाणे अनुदान तत्वावर वाटप होणार आहे.

                रब्बी हंगामात हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण या बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा पिकाचे 10 वर्षाआतील पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, आरव्हीजी-202 व बीडीएनजीके-798 या वाणांचे एकूण 6291 प्रमाणित बियाणे रक्कम रुपये 2500 प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. भरडधान्य योजनेंतर्गत 354 मका पिकासाठी 750/- रुपये प्रती किलो अनुदान तसेच रब्बी ज्वारी साठी रुपये 30 प्रती किलो 10 वर्षे आतील वाणासाठी 460 क्विंटल व 110 क्विंटल, 10  वर्षे वरील वाणासाठी 15 रुपये प्रती किलो अनुदान तत्वावर बियाणे वितरण होणार आहे.

                तसेच सन 2021-22 बियाणे व लागवड उप अभियानाअंतर्गत ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत 10 वर्षावरील जॉकी -9218 या वाणाचे एकूण 1200 क्विंटल प्रमाणित बियाणे रक्कम रुपये 2500/- प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन आहे. 5373 क्विंटल इतका गहू रुपये 1600/- प्रति क्विंटल अनुदानाने वितरीत केला जाईल. या योजनेत प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत लाभ देय आहे.

                सदर अनुदान तत्वावर बियाणेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेण्यात यावा. अधिक माहितीसाठी जवळच्या उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, जळगाव व महाबीज यांचे अधिकृत वितरक यांच्याशी देखील संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

                                              00000

Monday, 22 November 2021

जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत 37 (3) कलम जारी

           जळगाव, दि. 22 - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 7 डिसेंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम  (3) जारी करण्यात आले आहे.

          या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्ता लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

000

 

लग्नानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांचे आवाहन

           जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात लग्न सराई सुरू झाली आहे. यानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील (अन्न) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

                श्री. पाटील यांनी म्हटले आहे, लग्नानिमित्त जेवणावळीचे कंत्राट हे कॅटरिंग व्यावसायिकास देण्यात येते. लग्नानिमित्त होणाऱ्या जेवणावळीत अनेकजण जेवण करतात. त्यामुळे या अन्नाचा दर्जा तसेच त्याची तयार करण्याच्या कार्यप्रणालीबाबत अन्न व औषध प्रशासनाने आवाहन केले आहे. त्यानुसार लग्नानिमित्त जेवणाचे कंत्राट हे अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत योग्य परवाना असलेल्या कॅटरिंग व्यावसायिकांनाच द्यावे. जेथे कॅटरिंग व्यावसायिक हा अन्न पदार्थ तयार करतो ती जागा आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ व आरोग्यदायी असावी. लग्नामध्ये जेवण तयार करताना कॅटरिंग व्यावसायिकाने अन्न तयार करणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केलेली असावी.

                अन्न पदार्थाचे वितरण करणाऱ्यांना ॲप्रॉन, ग्लोव्हज व डोक्याला टोपी पुरविलेली असावी. जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी ही स्वच्छ असावीत.  अन्नपदार्थ ज्या ठिकाणी तयार केले जातात तेथे वापरण्यात येणारे पाणी हे पिण्यास योग्य असावे. कॅटरिंग व्यावसायिकाने जेवण तयार करताना वापरण्यात येणारे दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर, खवा तसेच गोड पदार्थांचा दर्जाबाबत खात्री करावी व त्याचे वेळेतच सेवन होईल याबाबत लक्ष पुरवावे. तयार अन्न पदार्थामध्ये खाद्यरंग वापरला जावू नये याबाबत देखील खात्री करावी. जेवण तयार करण्याकामी लागणारा कच्चा माल हा दर्जेदार वापरावा. याबाबत देखील लक्ष पुरवावे. लग्नाच्या ठिकाणी वाढणारे जेवण हे कॅटरिंग व्यावसायिकाने नीटनेटके झाकून तसेच योग्य त्या तापमानास ठेवावे. शिल्लक अन्न पदार्थ हे त्याकरीता कार्यरत असलेल्या एजन्सीला देण्यात यावे. तसेच उष्टे/ शिल्लक अन्न पदार्थाची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी. वरील ठळक मुद्यांचे कॅटरिंग व्यावसायिकाने पालन केले आहे किंवा कसे हे लग्ननिमित्त जेवण बनविण्याचे कत्राट देताना नागरिकांनी लक्ष द्यावे. जेणेकरुन अन्न विषबाधासारख्या घटना घडणार नाहीत, असेही सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

00000

निराधार अवस्थेत सापडलेल्या बालकाच्या पालकांना आवाहन

                 जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : जुवार्डी, ता. भडगाव, जि. जळगाव येथील प्लॉट भागात 20 दिवसांचा मुलगा निराधार अवस्थेत आढळून आला आहे. त्याला भडगाव पोलिसांनी ताब्यात घेवून जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. भडगाव पोलिसांनी बालकल्याण समितीच्या अध्यक्षांना याबाबतची माहिती दिली. बालकल्याण समिती, औरंगाबाद यांच्या आदेशाने सदरच्या बालकास 14 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय समाज सेवा केंद्र, औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले. तेथे त्याचे यश असे नामकरण करण्यात आले असून तो भारतीय समाज सेवा केंद्र, औरंगाबाद येथे आहे. यशचे पालक व नातेवाईकांनी 30 दिवसांच्या भारतीय समाज सेवा केंद्र, अनिकेतन, प्लॉट क्रमांक 151, सर्वे क्रमांक 15, बी. एस. जी. एम. शाळेसमोर, गुरू सहानी नगर, एन/4, सिडको, औरंगाबाद, दूरध्वनी : 0240- 2453922, मा.  अध्यक्ष, बालकल्याण समिती, द्वारा, शासकीय मुलांचे निरीक्षण गृह, एन-12, ताज हॉटेलच्या मागे, हडको, औरंगाबाद, मा. अध्यक्ष, बालकल्याण समिती, जिल्हाधिकारी रस्ता, जिल्हा पेठ, जळगाव, दूरध्वनी 0257- 2239550, पोलिस निरीक्षक, भडगाव पोलिस ठाणे, भडगाव, जि. जळगाव, दूरध्वनी : 02562- 213333 येथे संपर्क साधावा.

                या कालावधीत संबंधितांनी संपर्क न साधल्यास यशच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा अन्य निर्णय बाल कल्याण समिती, औरंगाबाद यांच्या आदेशाने घेवू शकेल, असे वनिता सोनगत, सदस्य सचिव, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

00000


 

Friday, 19 November 2021

जळगाव जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीच्या 229 जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित 21‍ डिसेंबर रोजी होणार मतदान

           जळगाव, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) - राज्य निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिकत् झालेल्या जळगाव जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीमधील 229 जागांसाठी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूक कार्यक्रम असा राहील

                नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेच्या सुधारणा करण्याचा सोमवार 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत राहील. तहसिलदार सोमवार, 22 नोव्हेंबर, 2021 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करतील, नमुना ‘अ’ मध्ये नमूद ठिकाणी  30 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)  ते 6 डिसेंबर 2021 (सोमवार) रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविता व सादर करता येतील.

                मंगळवार, 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्र छाननी करण्यात येईल. गुरुवार, 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येईल. गुरुवार, 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. मंगळवार, 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल तर बुधवार 22 डिसेंबर 2021 रोजी (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्येतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) मतमोजणी होणार असून निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना सोमवार, 27 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

                रिक्त सदस्य पदांसाठी 12 नोव्हेंबर, 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात आली असून सदरची मतदार यादी 18 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतींमध्येही प्रसिध्दी केली आहे. जिल्ह्यात पोटनिवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकात म्हटले आहे.

                                                                                   00000

मुला-मुलींचे निरिक्षणगृहातील कंत्राटी पदभरतीची गुणवत्ता यादी जाहीर

         जळगाव, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) - जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे व मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह, जळगाव येथील कंत्राटी पदभरतीकरीता उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली असुन, प्राप्त झालेल्या अर्जातील पात्र उमेदवारांची निवड करुन त्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी Jalgaon.nic.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. अशी माहिती वनिता सोनगत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

                ज्या उमेदवारांनी या पदभरतीसाठी अर्ज केले आहेत व ज्यांना सदरील अर्जावर हरकत घ्यावयाची आहे, अशा उमेदवारांनी dwcwjal@gmail.com या मेलवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी जवळ, जळगाव या कार्यालयात 27 नोव्हेंबर, 2021 पर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळून लेखी हरकत नोंदवावी. या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या लेखी हरकतींचा विचार करण्यात येणार नाही, असेही श्रीमती सोनगत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

                                                                                   ००००

इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



         जळगाव, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) - देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व राष्ट्रीय एकात्मता दिनाचा कार्यक्रम आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा खनीकर्म अधिकारी दीपक चव्हाण, तहसीलदार सुरेश थोरात आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. याप्रसंगी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

 

आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

         जळगाव, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उध्दभवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. या क्षेत्रातील संसाधनांमधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा, याकरिता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारव्दारा प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण 3.0 योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

            या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील एकूण 150 बेरोजगारांना शासकीय आर्युवेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून हे प्रशिक्षण ऑन जॉब ट्रेनिंग स्वरुपाचे असेल. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षित उमेदवारांना शासनातर्फे प्रमाणपत्र प्राप्त होणार असून त्यान्वये त्यांना आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारानी खालील गुगल लिंक वर आपली माहिती/नोंदणी ऑनलाईन सादर करावी. नोंदणी करताना समोर नमूद शैक्षणिक पात्रतेनुसार कोर्स/जॉब रोल निवडावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 0257-2959790 वर संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता श्री. वि. जा. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

गुगल लिंक :-

https://docs.google.com/forms/d/e/IFApQLSf_xxXoWjGQeQeNZIQVD_५uCCnRIVcy६५ruvUsxMBbxy२jL_g/viewform?usp=pp_url

00000

ऑक्सीजन प्लँट अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे आयोजन

       जळगाव, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) - आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोविड-19 साथीच्या रोगाशी संबंधित उध्दभवलेल्या परिस्थितीत Oxygen plant या क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा, याकरीता या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणेकरीता Oxygen plant अभ्यासक्रमाचा मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश करण्यात आला असून एकूण 30 ईच्छूक व प्रशिक्षणास तयार असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षीत करावयाचे आहे.

            प्रशिक्षणास प्रवेश घेणेस इच्छुक असणा-या उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादा पात्रता खालीलप्रमाणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता : NTC (ITI) NAC Passed in Fitter/Welder/MMTM/RAC/Electrician/ Instrument Mechanic, AOCP/MMCP/IMCP Trade

प्रवेशासाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष.

             Oxygen plant या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण घेण्यास ईच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी Google Form भरणेसाठी दिलेल्या गुगल लिंकवर दि. 26 नोव्हेंबर, 2021 पर्यंत नांव नोंदणी करावी व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता श्री. वि. जा. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

गुगल लिंक :-

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe1Ckn3phw029m8Ti88V0Zn37vOPkoO6xIUGHXGixQos3qQ/viewform?usp=pp_url

                                                            00000

जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये 11 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

      जळगाव, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) - वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवुन वाद मिटवुन घेण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपुर्ण देशात 11 डिसेंबर, 2021 रोजी एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी दिली आहे.

            महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय लोकअदालत होईल. जळगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी यांचे अध्यक्षतेखाली लोकअदालतीस प्रारंभ होईल. या लोकअदालतीसाठी जिल्हा वकिल संघ, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे सहकार्य लाभणार आहे.

            यावेळी मोटार वाहन, ट्रॉफीक चलान, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले इ. चे व खटला दाखलपूर्व प्रकरणे तसेच एकूण ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते असे संपुर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे जळगाव येथील औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय तसेच सहा. धर्मदाय आयुक्त कार्यालय येथील तडजोडयोग्य प्रकरणे देखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली केले जाणार आहेत. राष्ट्रीयकृत बँका, कंपन्या यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम वसुली होवुन मिळण्याची  शक्यता आहे. वादपुर्व खटल्यामध्ये बॅंका व कंपन्या यांनी थकित रक्कमेमध्ये सुट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहे. तरी याबाबत नागरीकांनी लाभ घ्यावा.

            ज्या पक्षकारांना तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढायचे असतील अशा संबधित सर्व पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांनी उपस्थित राहुन तडजोडीने आपआपले खटले निकाली काढावे. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांनासुद्धा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यांत आलेली आहे. तरी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त खटले 11 डिसेंबर रोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतीत सामोपचाराने निकाली काढावे. असे आवाहन ए. ए. के. शेख, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी केले आहे.            

                                                   00000

Thursday, 18 November 2021

दुबार मतदार नोंदणी होवू नये यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत

             जळगाव दि. 18 (जिमाका) - कोणताही मतदार दुबार/बोगस नोंदणी होणार नाही याकरीता सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

            भारत निवडणूक आयोगामार्फत 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनाकांवर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम  1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत सुरु आहे. याबाबत राजकीय पक्षांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, मतदार याद्या सुलभ होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपले बुथनिहाय प्रतिनिधी (BLA) नेमावे त्याचबरोबर ज्याप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेण्यात आल्या त्याच धर्तीवर शहरात वार्डनिहाय सभा घेऊन त्यात मतदार याद्यांचे वाचन करावे. तसेच नागरीकांना मतदार याद्यांबाबत काही अडचणी, शंका असल्यास त्यांनी आपल्या भागातील बुथ लेव्हल ऑफिसर (BLO) शी संपर्क साधावा. आपल्या भागातील बुथ लेव्हल ऑफिसरची माहिती www.jalgaon.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध त्याचबरोबर नागरीकांनी वोटर हेल्पलाईन ॲपचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

            यावेळी श्री. हुलवळे यांनी मतदार यादीच्या पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित तयार होणारी मतदार यादी ही आगामी निवडणूकांसाठी वापरण्यात येणार असल्याने सर्व राजकीय पक्षांनी सजग राहून ही मतदार यादी सुलभ होण्यासाठी लक्ष्य गट निश्चित करावे. 13 व 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यात 9632 नवीन फार्म जमा झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या विशेष गा्रमसभेत दावे/ हरकती प्राप्त झाल्याची माहिती दिली. त्याचबरोबर येत्या 27 व 28 नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष मोहिमेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नव मतदारांनी नोंद होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

000000

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी नियंत्रण कक्ष

           जळगाव, दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आठ नोव्हेंबर 2021 पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.

                श्री. लोही यांनी म्हटले आहे, खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या मालकीच्या बस  व मालवाहू वाहनाव्दारे प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने बस उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षकांची बस स्थानकनिहाय नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जळगाव शहर जुने व नवे बसस्थानक, भुसावळ बसस्थानक, चाळीसगाव बसस्थानक व अमळनेर बस स्थानक येथे अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या सर्व बसस्थानकांवर प्रवाशांच्या गरजेनुसार स्थानिक ठिकाणचे स्कूल बस वाहतूकदार, खासगी बस वाहतूकदार किंवा मालवाहू वाहतूकदारांशी संपर्क साधत वाहने उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यवाहीच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

                नऊ नोव्हेंबर 2021 पासून जिल्ह्यातील विविध एस.टी. आगारातून आजपर्यंत एकूण 74 खासगी बस, 12 स्कूल बस व 592 इतर प्रवासी वाहने प्रवाशांच्या गरजेनुसार या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांमार्फत पुरविण्यात आलेली आहेत. संप काळात प्रवाशांच्या सोयीकरीत या कार्यालयात नियंत्रक कक्षाची स्थापना केलेली असून दूरध्वनी क्रमांक  0257-2261819 असा आहे. प्रवाशांना वाहनाची उपलब्धता किंवा मागणी असल्यास त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधून त्यांनी मागणी नोंदवावी.

                जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रवासी वाहतूक संघटना व मालवाहतूक संघटना पदाधिकाऱ्यांनी संप कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहने उपलब्ध करुन देण्याबाबत या कार्यालयास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

Wednesday, 17 November 2021

महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा 30 नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

        जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) :- - शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने येत्या 1 फेब्रुवारी, 2022 पासून सुरु होणाऱ्या बालनाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्था/शाळा/विद्यालयांकडून दिनांक 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

                18 व्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 1 फेब्रुवारी, 2022 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच द्वितीय दिव्यांग बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी, 2022 मध्ये एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.

                बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धेकरीता रु. 1 हजार इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्यसंस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी बालनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका व नियम शासनाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.

                मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-32 (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात. पुणे महसूल विभागातील संस्थांनी, सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक-4, विमानतळ रोड, पुणे (020-20271301) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात. औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर-02, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्डी टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औंरगाबाद-431005 (08788893590) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात. नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, पहिला मजला, सिव्हिल लाईन, नागपूर-440001 (0712-2554211) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

                विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी.

                स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या राज्यातील नाटय संस्थांनी दिव्यांग बालनाटय स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी केले आहे.

00000

 

चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स खो-खो, कबड्डी व बॉस्केटबॉलचा संघ निवडण्यासाठी चाचणीचे आयोजन

        जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) :- केंद्र शासनाच्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स (18 वर्षाखालील मुले व मुली) 2022 चे आयोजन हरियाणा येथे करण्याचे निश्चित झाले आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचे खो-खो व कबड्डी या खेळाच्या मुले व मुली तसेच बास्केटबॉलच्या मुलींचा संघ पात्र ठरला आहेत. त्यानुसार राज्याचा संघ निवड करण्यासाठी अनुक्रमे जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर खो-खो व कबड्डी या खेळाच्या क्रीडा स्पर्धां व निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.

                त्यानुसार जिल्हास्तरावर खो-खो या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन 22 ते 23 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले असुन या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीकरिता सहभागी संघ व खेळाडुनी 22 नोव्हेबर, 2021 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता स्पर्धास्थळी उपस्थित रहावे. तसेच जिल्हास्तरावर कबड्डी या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन 23 व 24 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत ॲड एस. ए. बाहेती महाविद्यालय, जळगाव येथे करण्यात आले असुन या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीकरिता सहभागी संघ व खेळाडुनी 23 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता स्पर्धास्थळी उपस्थित रहावे.

                 कबड्डी खेळासाठी मुलांकरीता वजनगट 70 किलो किंवा त्यापेक्षा कमी व मुलींसाठी वजनगट 65 किलो किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच बास्केटबॉल या खेळाचे मुलींच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन जिल्हास्तरावरुन थेट राज्यस्तरावर करण्यात येणार असून जिल्हास्तरावर 26 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. बास्केटबॉल या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीतील सहभागी खेळाडुमधुन जिल्ह्याचा संघ राज्यस्तरावर सहभागी होण्याकरिता निवडला जाणार आहे. या स्पर्धा संघटनेच्या नियमानुसार होतील व स्पर्धेत सहभागी खेळाडुंना कोणत्याच स्तरावर प्रमाणपत्र दिले जाणार नाही.

                तरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना व क्रीडा मंडळे यांनी जिल्हास्तर खो खो, कबड्डी व बास्केटबॉल या खेळाच्या क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीत सहभागी होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त संघ व खेळाडुना सुचित करावे, या स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या खेळाडुची जन्मतारीख ही 1 जानेवारी, 2003 किंवा त्यानंतरची असावी. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना व क्रीडा मंडळे यांनी खेळाडुंचे संपुर्ण नाव, जन्मदिनांक, आधारकार्ड, शालांत प्रमाणपत्र, 10 वी बोर्ड सर्टिफिकेट, जन्मप्रमाणपत्र (5 वर्षापुर्वी काढलेले) यापैकी दोन कागदपत्रे, पत्रव्यवहाराचा पत्ता व संपर्क क्रमांकासह लेटर हेडवर सही व शिक्क्यासह प्रवेशिका 20 नोव्हेंबर, 2021 पर्यंत संपुर्ण कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे सादर करावे. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात- 8625946709 यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  मिलिंद दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000

विना मीटर प्रवासी वाहतुक करणाऱ्या रिक्षा चालकांवर होणार कारवाई

           जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) - जळगाव शहरातील ज्या ऑटोरिक्षा चालकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांचेकडून प्रवासी वाहतूकीसाठी परवाना घेतला आहे. त्या सर्व ऑटोरिक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करतांना मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे. प्रत्येक परवानाधारक ऑटोरिक्षाला मोटार वाहन नियम 119 व 137 अन्वये इलेक्ट्रॉनिक्स मीटर असणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे ते सुस्थितीत असणे देखील बंधनकारक आहे. कुठल्याही परिस्थितीत परवाना अटींचे उल्लंघन करता येत नाही. अन्यथा ऑटोरिक्षा परवाना धारकावर मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकरी श्याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे.

                एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देवू असे म्हटल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य असून ही बाब कायदेशीर आहे. 1 नोव्हेंबर, 2021 रोजी झालेल्या लोकशाही दिनी जळगाव शहरातील ऑटोरिक्षा परवाना धारक हे त्यांच्या ऑटोरिक्षामध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर न बसविता अवाच्या सव्वा भाडे आकारणी करीत असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली आहे.       जळगाव शहरातील सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांना आवाहन करण्यात येते की, सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांनी लवकरात लवकर आपल्या रिक्षांना फेअर मीटरप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर अद्ययावत करुन मीटरप्रमाणे भाडे आकारणी करावी. असे न झाल्यास संबंधित ऑटोरिक्षा परवाना धारकांवर मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

                विना फेअर मिटर तसेच ना-दुरुस्त फेअर मिटर असतांना प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षाधारकांविरुध्द जिल्हाधिकारी, जळगाव व पोलिस अधिक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव व शहर वाहतूक शाखा, जळगाव यांचे संयुक्त पथकाव्दारे तपासणी मोहिम 9 नोव्हेबर पासून सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत आतापर्यंत एकूण 98 विना फेअर मिटर/ना- दुरुस्त फेअर मिटर असलेल्या ऑटोरिक्षांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचेकडून 67 हजार 400 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहिम अविरतपणे सुरु ठेवण्यात येणार आहे.

                जळगाव शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, जळगाव शहरात ऑटोरिक्षा परवानाधारक मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नसतील तर आपण अशा ऑटोरिक्षा चालकाविरुध्द उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 0257-2261819 किंवा mh19@mahatranscom.in या संकेतस्थळावर तक्रार करावी. तक्रार प्राप्त ऑटोरिक्षा परवानाधारकावर कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही श्री. श्याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

0000

दुचाकी वाहनांसाठी 23 नोव्हेंबरपासून नवीन नोंदणी क्रमांक मालिका

         जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) -  येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी एमएच-19/डीडब्ल्यु-0001 ते 9999 पर्यंतची मालिका 23 नोव्हेंबर, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत अर्ज करावा. अर्जासोबत  शासकीय शुल्काचा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे असलेला धनाकर्ष, ओळखपत्र जमा करावे. त्यानंतर आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करुन घ्यावा.

               तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. ही मालिका चालू असतांना वाहन-4 प्रणाली कार्यान्वयीत झाल्यानंतर बंद करण्यात येईल. एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या क्रमांकाबाबत 22 नोव्हेंबर रोजी वाढीव शुल्काचा धनाकर्ष सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक राहील. दिनांक 22 नोव्हेंबर, 2021 रोजी सायंकाळी 4.30 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येतील. जास्त रक्कमेचे धनाकर्ष सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनाकर्ष परत करण्यात येतील. तरी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या दुचाकी वाहन धारकांनी याची नोद घ्यावी.  असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

दिव्यांगाना साहित्य वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद- बच्चू कडू चाळीसगाव येथे दिव्यांगाना साहित्याचे वाटप






                जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : मानवी सेवेत ताकद असल्याने समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. सामाजिक कार्याने प्रेरित संघटनेने दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य वितरणाचा कार्यक्रम अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले. चाळीसगाव जि. जळगाव येथे आज सायंकाळी वर्धमान धाडीवाल मित्र मंडळातर्फे दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिव्यांग संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम, अनिल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल आदी उपस्थित होते.

                राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले, समाजातील वंचित, दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनी मदतीसाठी पुढे आले पाहिजे. एवढेच नव्हे, तर मानवता धर्म मानून दिव्यांग बांधवांना मदत करावी. विविध मंडळांच्या माध्यमातून गरजू, दिव्यांग, निराधार व्यक्ती, गरीब रुग्णांना वेळोवेळी मदत करण्याचे आवाहन राज्यमंत्री श्री. कडू यांनी केले. श्रीमती निकम म्हणाल्या, की, जळगाव जिल्ह्यात दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आगामी काळात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.  लक्ष्मण शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोना विषाणूच्या काळात बाधित रुग्णांना भोजन दिल्याबद्दल गणेश गवळी, विजय गवळी यांचा तसेच दिव्यांग बांधवांसाठी अहोरात्र झटणा-या मीनाक्षी निकम यांचा  राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्यांग बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000



 

Tuesday, 16 November 2021

कृषी विभागातर्फे आज जळगावला कार्यशाळा

         जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) :-  कृषी विभाग, जळगाव, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद व पाल ( रावेर) यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रब्बी पूर्व हंगामी हरभरा व कांदा उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळा- 2021 चे आयोजन बुधवार 17 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता नियोजन भवन, जळगाव येथे करण्यात येणार आहे. या कार्याशाळेत हरभरा, कांदा  व गहू पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, बीबीएफ यंत्राव्दारे हरभरा लागवड, किडरोग एकात्मिक व्यवस्थापन, बियाणे उत्पादन कार्यक्रम व प्रमाणिकरण व इतर अनुषंगिक घटकांबाबत माहिती देण्यात येणार आहे.

                हरभरा व कांदा पिकांबाबत डॉ.एन.एस. कुटे, कडधान्य पैदासकर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, डॉ. दत्तात्रय वने, प्रगतीशील शेतकरी, राहुरी, डॉ. हेमंत बाहेती, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद, वैभव शिंदे, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद, हितेंद्र सोनवणे, विभागीय बीज प्रमाणिकरण अधिकारी, जळगाव तसेच गहु पिकाबाबत           प्रा.अतुल पाटील, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, पाल (रावेर) व संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

                या कार्यशाळेचे प्रसारण ऑनलाईन प्रणालीव्दारा यु-टयुब चॅनल वर https://youtu.be/tLv६JcUeL८s या लिंकव्दारे सुध्दा करण्यात येणार आहे. जिल्हयातील जास्तीतजास्त शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर व कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

००००

सावखेड्याचे वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 

                जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : सावखेडा बु., ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी (वय 35) यांच्या पार्थिवावर आज सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी परदेशी कुटुंबायांची घरी जाऊन भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

                जवान मंगलसिंह परदेशी यांना 14 नोव्हेंबर, 2021 रोजी पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना छातीत गोळी लागल्याने वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज सकाळी सावखेडा येथे आणण्यात आले. त्यानंतर शोकाकूल वातावरणात आणि 'जवान मंगलसिंह अमर रहे'च्या जयघोषात अंत्ययात्रा काढण्यात आली.

                जवान मंगलसिंग परदेशी यांना त्यांचा सहावीतील 12 वर्षीय मुलगा चंदन याने अग्निडाग दिला. पिंपळगाव (हरे.) येथील पोलीसांनी बंदुकीच्या तीन फैरीची सलामी दिली. जवान मंगलसिंह यांच्यामागे आई-वडील, पत्नी किरण, मुलगा चंदन, मुली चंचल व कांचन असा परिवार आहे.

                जवान मंगलसिंग परदेशी यांना सुमारे 14 वर्षे सेवा केल्यानंतर नाईक पदावर पदोन्नती झाल्याने तीन वर्षं सेवेचे वाढवून मिळाले होते. सेवानिवृत्त होण्यासाठी सहा महिने बाकी होते. जवान मंगलसिंग परदेशी यांच्या पार्थिवाचे आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, जिल्हा सैनिक कार्यालयाचे वेल्फेअर अधिकारी अनुरथ वाकडे, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपूत, मधुकर काटे, सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000