Wednesday, 31 January 2024

शहर स्वच्छतेकडे जास्तीत जास्त लक्ष द्या - ज‍िल्हाध‍िकाऱ्यांच्या नगरपर‍िषद मुख्याध‍िकाऱ्यांना सूचना नगरपर‍िषद व नगरपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा

 




जळगांव, द‍ि.१ फेब्रुवारी (जिमाका) - माझी वसुंधरा व स्वच्छता अभ‍ियानात नगरपाल‍िकांनी ह‍िरारीने सहभाग घेऊन अंतर्गत रस्ते, प्रभाग स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दयावा, तसेच शहरात फिरुन स्वच्छतेबाबत विविध उपाययोजना राबविण्यात याव्यात व शहरे स्वच्छ होतील याकडे जास्तीत-जास्त लक्ष दयावे. अशा सूचना ज‍िल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे द‍िल्या.

ज‍िल्ह्यातील सर्व नगरपर‍िषद/नगरपंचायत मुख्याध‍िकारी यांच्या प्रशासकीय कामकाजाचा ज‍िल्हाध‍िकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, नगरपाल‍िका शाखा सहायक आयुक्त जनार्दन पवार, समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील तसेच सर्व नगरपर‍िषद, नगरपंचायतीचे मुख्याध‍िकारी बैठकीस उपस्थ‍ित होते.

जिल्हाध‍िकारी श्री.प्रसाद म्हणाले की, मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांचे सर्वेक्षणाबाबत योग्य प्रकारे नियोजन करुन सर्वेक्षणाचे काम मुदतीत पूर्ण करावे, तसेच शहरातील एकही कुटुंबांचे सर्वेक्षण अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हा नियोजन समिती तसेच शासनस्तरावरुन मंजूर निधीच्या अनुषंगाने जी कामे पूर्ण झालेली असतील त्या कामासाठी तात्काळ निधीची मागणी करण्यात यावी. शहरातील ज्या वाडी/ वस्ती यांचे प्रचलित जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही तात्काळ आपल्यास्तरावरुन करण्यात यावी, तसेच सदरची नावे शासन राजपत्रात तात्काळ प्रसिध्द करण्याची दक्षता आपल्या स्तरावरुन घ्यावी.

पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना, शबरी घरकूल योजनाबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती व्हावी यासाठी मेळावे आयोजित करावे, तसेच या योजनाअंतर्गत पात्र लाभार्थ्याच्या बैठकीचे आयोजन करावे. असे ही त्यांनी सांग‍ितले.

श्री.प्रसाद म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची आचार संहिता नजिकच्या काळात लागणार असल्यामुळे जिल्हा नियोजन समिती, पायाभुत योजना, शासनस्तरावरुन मंजूर निधीच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यता मिळणेकामी ५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत, तसेच जास्तीत-जास्त दिनांक १० ते १२ फेब्रुवारी पर्यंत प्रशासकीय मान्यता प्राप्त कामापैकी एकही कामाचा कार्यादेश देण्याचे बाकी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हा नियोजन समिती तसेच शासनस्तरावरुन मंजुर प्रत्येक कामांची स्थळ पाहणी करण्यात यावी या स्थळ निरिक्षणामध्ये कामांच्या प्रगतीबाबतचा आढावा घ्यावा, तसेच मोजमापे तपासावी तसेच स्थळनिरीक्षण केलेल्या कामांच्या प्रगतीबाबतचा संक्षिप्त अहवाल जीओ टॅग फोटोसह जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा.

जळगाव जिल्ह्यातील यावल व भुसावळ नगरपरिषद यांची वसुलीची टक्केवारी खुप कमी आहे. तरी या नगरपरिषदानी विशेष वसुली मोहिम राबवून वसुलीची टक्केवारी वाढवावी. तसेच सर्व नगरपरिषद/ नगरपंचायत यांनी ३१ मार्च पावेतो वसुलीची टक्केवारी ८५ % पावेतो झाली पाहिजे, तसेच कमीतकमी ७५ % पर्यंत वसुली करणे प्रत्येक नगरपरिषद/ नगरपंचायतीना बंधनकारक राहील. आस्थापना विषयक कामे ही १००% पूर्ण झाली पाहिजेत, यामध्ये कुठलेही आस्थापना विषयक प्रकरण प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच आस्थापनाविषयक प्रकरणामध्ये काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्यास त्यामध्ये विहीत मुदतीत परिच्छेदनिहाय अहवाल सादर करण्यात यावा.

0000000000

कर्जमाफी संदेशापासून राहा सावध आरबीआयकडून बँकेच्या ग्राहकांना आवाहन

 जळगाव,दि.१ फेब्रुवारी (जिमाका) - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कर्जमाफीची ऑफर देऊन कर्जदारांना भुरळ घालणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही जाहिराती, संदेशावर विश्वास ठेवू नका, यापासून सावध रहा, असे आवाहन आरबीआयने केले आहे.

प्रसिद्धिपत्रकात म्हटले की, कर्जमाफी संदर्भात काही संस्था समाजमाध्यमाच्या प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब चॅनल आणि बनावट वेबसाइट) यावर अनेक मोहिमांचे सक्रियपणे प्रचार करीत असल्याचे दिसून आले आहे. अशा संस्थांना कोणत्याही अधिकाराशिवाय कर्जमाफी प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी सेवा शुल्क आकारत असल्याच्या बातम्या आहेत. ज्यामुळे बँकांना आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता तारणावर त्यांचे अधिकार लागू करण्यासाठी बँकांच्या कामकाजात अडथळा येतो. बँकांसह इतर वित्तीय संस्थांची थकबाकी भरण्याची गरज नाही, असा चुकीचा अर्थ अशा संस्था देत आहेत. अशा कृतीमुळे वित्तीय संस्थांची स्थिरता आणि सर्वात महत्त्वाचे ठेवीदारांच्या हितास बाधा येत आहे. यामुळे हे देखील लक्षात घेतले जाऊ शकते. अशा संस्थांशी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी संबंध ठेवल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

पोलिस ठाण्यात कळवा माहिती

■ खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या समाजमाध्यमातील बँकाविषयाची खोट्या प्रचार मोहिमांना बळी पडू नये. खोट्या घटना आढळल्यास आपल्या जवळच्या पोलिस स्टेशनला माहिती द्यावी किंवा तक्रार नोंदवावी, असे परिपत्रक आरबीआयमार्फत जारी करण्यात आले आहेत. समाजमाध्यमावरील खोट्या प्रचार मोहिमा करणाऱ्या संस्थेच्या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रणव झा यांनी केले आहे.

००००००००००००००००००

जिल्हाधिकारी कार्यालयात 5 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

   जळगाव, दि.31 जानेवारी (जिमाका) - प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 5 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे.  

जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

                                          00000

अमळनेर येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे परिसंवादाचे आयोजन तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान

 जळगाव, दि.३१ जानेवारी (जिमाका) - भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्त कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे यंदाच्या अमळनेर येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान' या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या प्रकारे सलग चौथ्या वर्षी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय संमेलनात सहभागी होत आहे.

निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो, पण लोकशाही शासन व्यवस्था समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून ती रसरशीत होणेही तितकेच महत्त्वाचे असते. या अनुषंगाने मराठी साहित्यात तृतीयपंथी समुदायाचे चित्रण आले आहे का, ते कशा प्रकारे केले गेले आहे, ते करताना लोकशाही, सांविधानिक मूल्यांचे प्रतिबिंब उमटले आहे का, त्यांच्यापर्यंत लोकशाही पोहोचली आहे का, ती पोहोचण्यासाठी काय करता येईल अशा विविध प्रश्नांची चर्चा या परिसंवादात केली जाणार आहे. या परिसंवादात 'एलजीबीटीआयक्यू समुदायाचे अभ्यासक आणि बिंदू क्वीअर राइट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरे, तृतीयपंथी म्हणजेच पारलिंगी समुदायातील सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील, विजया वसावे, पूनीत्त गौडा, डैनियल्ला मॅक्डोन्सा आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. 

मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार परिसंवादाचे संवादक आहेत. संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता, कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात आयोजित सदर परिसंवादाचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या Chief Electoral Officer, Maharashtra या संकेतस्थळावरून. आणि फेसबुक, ट्विटर, यूट्युब, इन्स्टा या समाजमाध्यमांवरूनही थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

या संमेलनात मतदार जागृतीसंबंधी प्रकाशने, मतदार नोंदणी केंद्र, भारतीय निवडणुकांच्या प्रवासाचे प्रदर्शन, शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मतदार जागृती खेळ आणि मीम्स अशी दालनेही असणार आहेत. त्यामध्ये डिजिटल स्क्रीनवरही मतदार जागृतीचे साहित्य दाखवले जाणार आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पॉइंट ठेवण्यात आलेला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार केलेला मॅस्कॉट दालन - भेटीस आलेल्या नागरिकांशी संवाद साधणार आहे. तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी निवडणूक गीतावर नृत्य आणि मतदार जागृतीपर पथनाट्य सादर करणार आहेत. भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसंबंधी निवडणूक साक्षरता मंडळ, चुनाव पाठशाळा, मतदार जागृती मंच ही व्यासपीठे तयार केली आहेत. ही व्यासपीठे शाळा - महाविद्यालये, गावा-परिसरामध्ये, कार्यालयामध्ये स्थापन करण्यासंबंधीची मार्गदर्शक पुस्तकेही या दालनात उपलब्ध असतील. 

फिरत्या वाहनांमधून ईव्हीएमविषयी जागृती करण्यात येणार आहे. तसेच, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारा प्रकाशित आणि डॉ. दीपक पवार संपादित 'आम्हीही भारताचे लोक', 'लोकशाही समजून घेताना' आणि 'कशासाठी? लिंगभाव समतेसाठी' ही पुस्तके सवलत दरात उपलब्ध असतील. सर्वसामान्य नागरिकांबरोबरीने विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने या दालनांना भेट देऊन लोकशाहीसंबंधीचे लुडो, सापशिडी यांसारखे खेळ तसेच व्यासपीठे समजून घ्यावीत; तसेच नव्याने पात्र तरुणांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

००००००००००००००

गावठाण जागा मालकी हक्क व नकाश वाटप मोहीमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ ज‍िल्ह्यात दोन द‍िवसात ९५० सनदांचे वाटप

 








     जळगांव, द‍ि.३० जानेवारी (जिमाका) - प्रजासत्ताक द‍िन २६ जानेवारी रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महास्वाम‍ित्व योजनेंतर्गत सनद वाटप कार्यक्रमाचा जळगाव ज‍िल्ह्यात शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्र्यांनी शुभारंभ केलेल्या या मोहीमेत जिल्ह्यात गावठाणातील घर जागेच्या मालकी हक्क व नकाशाच्या ९५० सनद वाटप करण्यात आल्या असून यातून ३ लाख ९५ हजार रूपयांचा महसूल शासनाला प्राप्त झाला आहे 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी कलाबाई चिंतामण कोळी,  कमलबाई रमेश गायकवाड व शिवलाल गिरमा सोनवणे या शेतकऱ्यांना पोलीस परेड मैदानावर सनद वाटप करण्यात आले. त्यानंतर ज‍िल्हा अधीक्षक भूमीअभ‍िलेख कार्यालयाने ज‍िल्ह्यात २६ व २७ जानेवारी २०२४ रोजी सनद वाटप मोहीम मोठ्या प्रमाणात राबव‍िली. स्वामीत्व योजनेअंतर्गत गावठाण सर्वे झालेल्या जळगाव जिल्हयातील गावठाणातील घर जागेच्या मालकी हक्क व नकाशाच्या ९५० सनद वाटप करण्यात आल्या असून ३ लाख ९५ हजार २८८ रूपयांची सनद फी वसुल करण्यात आलेली आहे. 

रावेर तालुक्यातील मौजे पिंपरी, पाडले खु., निरूळ, पाडले बु., नेहते, बोरखेडा, मोरगांव खु, चोरवड, कोळोदे, मांगी या १० गावात ३२९ सनद वाटप करण्यात आल्या असून १ लाख ५२ हजार ४३३ रूपये सनद फी वसूल करण्यात आलेली आहे.

जळगाव तालुक्यातील मौजे देवगाव, मोहाडी, खेडी खु, पळसोद, वसंतवाडी, आवार, गाढोदे, आमोदे बु, या ८ गावात २४८ सनद वाटप करण्यात आल्या असून ९७ हजार ८० रूपये सनद फी वसूल करण्यात आलेली आहेत.

पारोळा तालुक्यातील मौजे सोके, हिरापुर, सावखेडे तुर्क, कन्हेरे, मेहु, नेरपाट, सावखेडे होळ, चहुत्रे खोलसर, बाहुटे, या १० गावात २२६ सनद वाटप करण्यात आल्या असून ८७ हजार २६० रूपये सनद फी वसूल करण्यात आलेली आहे.

यावल तालुक्यातील मौजे पथराळे, हरिपुरा, करंजी, भोरटेक, भालशिव, पिंपरी, गिरडगाव, भालशिव या ८ गावात ११२ सनद वाटप करण्यात आल्या असून एकुण ४३ हजार ५७० रूपये सनद फी वसूल करण्यात आलेली आहे.

पाचोरा तालुक्यातील मौजे हडसन, कोकडी, वडगाव जोगे, वडगाव आंबे खु, या ४ गावात ३५ सनद वाटप करण्यात आल्या असून १४ हजार ९४५ रूपये सनद फि वसूल करण्यात आलेल्या आहेत. 

स्वाम‍ित्व योजनेत जळगाव जिल्हयातील सर्व गावांचे गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्यात येणार आहेत. गावातील मालमत्तांचे जी. आय. एस. प्रणालीवर आधारीत मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहेत. ड्रोन व्दारे गावठाण भूमापन योजना पुर्ण झालेनतंर प्रथम टप्यात विशेष स्वरूपात मोहीम घेऊन सनद वाटप व सनद वसूली करून नागरिकांना सनद वाटपाचा कार्यक्रम ज‍िल्ह्यात राबव‍िण्यात येत असल्याची माह‍िती भूमी अभ‍िलेख व‍िभागाचे ज‍िल्हा अधीक्षक एम.पी.मगर यांनी द‍िली आहे. 

०००००००००००००००००

Thursday, 25 January 2024

मराठी साहित्य संमेलन, बालमेळाव्याच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी चिमुकले मैदानात

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर, जि.जळगाव (जिमाका) :  अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्साह संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे. संमेलनपूर्व होत असलेल्या बालमेळाव्याच्या निमित्ताने चिमुकलेही पुढे सरसावले आहेत. बालमेळाव्यात जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत, यासाठी अमळनेर शहरातील काही चिमुकले शाळा व खासगी क्लासेसमध्ये जावून विद्यार्थ्यांना आवाहन करत आहेत.

इयत्ता ७ वीच्या विद्यार्थीनी नेहा राकेश पाटील, हिमानी मिलिंद पाटील, मृणल पंकज पाटील, रीचल संदेश पाटील यांच्यासह इयत्ता ११ वीचे विद्यार्थी अखिलेश मनोज पाटील, चंदन भिका चौधरी, अभय साहेबराव सोनवणे, रितेश विवेक भामरे, जतिन आनंद शेळके या विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य संमेलन व बालमेळाव्याच्या प्रसिध्दीसाठी शाळांमध्ये जावून विद्यार्थी व शिक्षकांच्या भेटी घेतल्या. विद्यार्थ्यांच्या या भुमिकेचे मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर, मुख्याध्यापक बी.एस.पाटील, सीमा सूर्यवंशी, अनिता बोरसे, सुनिल पाटील, मनोहर महाजन यांच्यासह सर्वच शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी कौतूक केले आहे. यावेळी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. या विद्यार्थ्यांना भैय्यासाहेब मगर व मराठी वाड्मय मंडळ संचालकांचे मार्गदर्शन लाभत आहे.

                                                       ०००००००००००००००००

परिवहन विभागाचा जानेवारी महिन्याचा तालुकानिहाय दौरा जाहिर

        जळगाव, (जिमाका) दि. 25 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगावमार्फत जानेवारी महिन्याचा तालुकानिहाय मासिक दौरा आयोजित करण्यात आला असून याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.        

जानेवारी-2024 चे शिबीर कार्यालयाचे वेळापत्रक, दौऱ्याचे ठिकाण

 प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव मार्फत माहे जानेवारी 2024 मध्ये दिनांक 27 जानेवारी, 2024 रोजी पारोळा येथे अतिरिक्त मासिक दौरा घेण्यात येत असुन त्याबाबत सर्व नागरिकांनी नोंद घेवून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.           

                                                            ०००००००

Tuesday, 23 January 2024

एरंडोल येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम

  जळगाव,दि‌.२४ जानेवारी (जिमाका) - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण जिल्हाभरात मतदान केंद्रावर, विधानसभा मतदार संघात व जिल्हास्तरावर राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने, यावर्षीचा जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी जळगांव व मतदार नोंदणी अधिकारी एरंडोल विधानसभा मतदार संघ यांच्या संयुक्त विदयमाने डी.डी.एस.पी. कॉलेज, एरंडोल येथे २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजीत करण्यात आला आहे. अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली आहे. 

                                                           ००००००००००००००

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात होणार 'महासंस्कृती महोत्सव' पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी जिल्हा प्रशासन करणार आयोजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा







 जळगाव,दि.२३ जानेवारी (जिमाका) - जिल्ह्यात फेब्रुवारी २०२४ या महिन्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवात पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची जळगावकरांना मेजवानी लाभणार आहे. जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. तसेच खान्देशमधील स्थानिक कलाकारांना‌ या महोत्सवात व्यासपीठ मिळावे यासाठी स्थानिक‌‌ लोक कलाकारांना या महोत्सवात सहभागी करून घ्यावे. अशा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.‌

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात‌ फेब्रुवारी २०२४ या महिन्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या‌ महोत्सवाच्या नियोजनाची बैठक राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.‌  याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत 'महा संस्कृती' महोत्सवात आयोजित करावयाच्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले की, नागरिकांना सोयीचे ठरतील अशा मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे. साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या १५ ते १९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे.‌ चला हवा येवू द्या, महाराष्ट्राची हास्य जत्रा, सारेगमप, इंडियन आयडॉल मधील कलाकारांना आमंत्रित करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी करावी. 

महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन नीटनेटके व यशस्वी होण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत काम करावे. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा नियोजनाच्या कामांचा आढावा

यावेळी जिल्हा वार्षिक योजनेतील २०२३-२४ मधील मंजूर कामे व प्रलंबित कामांचा आढावा ही पालकमंत्र्यांनी घेतला. आचारसंहितेपूर्वी सर्व कामे पूर्ण होतील या दृष्टीने कामांना गती देण्यात यावी. अशा सूचना पालकमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.

मराठा समाज व खुला प्रवर्ग आरक्षण सर्वेक्षण आढावा

शासनाच्या वतीने आजपासून सुरू असलेल्या मराठा व खुला प्रवर्ग आरक्षण सर्वेक्षणाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचे पालकमंत्र्यांपुढे सादरीकरण केले.  सर्वेक्षणात कोणताही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. यासाठी सर्वेक्षणात सहभागी सर्वेक्षक, प्रगणक व नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 

महावितरणच्या कामांचा आढावा

जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून महावितरण विभागाला देण्यात आलेल्या निधीतून सब-स्टेशन, फिडरच्या कामांना गती देण्यात यावी. कोणत्याही गावांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी‌. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी नंदगाव येथील सब-स्टेशनसाठी शासकीय जागा हस्तांतर आदेश पालकमंत्र्यांच्या हस्ते महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल महाजन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. 

                                                                   ००००००००००००००००


साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात तीन सभामंडपांची उभारणी १० हजार प्रेक्षकांची बैठक व्यवस्था

 



साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर, जि.जळगाव (जिमाका) : -  अमळनेर येथे होत असलेले ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या संमेलनाला भव्यदिव्य करण्यासाठी मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेरतर्फे संमेलनस्थळी तीन सभागृह उभारण्यात आले आहेत. सभामंडप क्र. १ला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृह, सभामंडप क्र. २ ला कविवर्य ना. धों. महानोर सभागृह, तर सभामंडप क्र. ३ ला  बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृह असे नाव देण्यात आले आहे. सभामंडप क्र.१ हे 'जर्मन हँगर' पद्धतीचे भव्य असे सभामंडप असून त्यात सुमारे १० हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. संमेलानाचा उत्साह संपूर्ण अमळनेर शहरात दिसून येत आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहराचा कायापालट करण्यात येत आहे. प्रताप महाविद्यालय परिसरातही रंगरंगोटी, सुशोभिकरणासह जय्यत तयारी सुरु आहे. मंडप उभारणी, प्रवेशद्वारासह इतर कामे पुर्णत्वाकडे आली आहेत. प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर सुमारे सात ते दहा हजार प्रेक्षक बसतील, अशा 'जर्मन हँगर' पद्धतीचा भव्य असा सभामंडप उभारण्यात येत आहे. यामध्ये सुमारे १५० बाय ३२५ फूट अशा भव्य मंडप उभारण्याच्या कामाला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे.

संमेलनस्थळी प्रवेश करण्यासाठी महाविद्यालयासमोर भव्य व आकर्षक प्रवेशव्दार उभारण्यात आले आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज, संत सखाराम महाराज, पूज्य साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी, श्रीमंत प्रताप शेटजी यांच्या प्रतिमा आहेत. याशिवाय संपूर्ण महाविद्यालय परिसरातील भिंतींवर आकर्षक चित्रे काढण्यात आली आहे.

पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत उभारण्यात आलेल्या सभामंडप क्र. १  खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात ७ ते १० हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपात ८० बाय ५० फूटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. त्याची जमिनीपासूनची उंची ६ फूट आहे. हे सभामंडप जर्मन हँगर पद्धतीने उभारण्यात आले आहे. हे संपूर्ण सभामंडप वॉटरप्रूफ आहे. विशेष बाब म्हणजे, इतक्या मोठ्या मंडपात एकही खांब नाही.

सभामंडप क्र. २  कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात अंदाजे ५०० जणांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सभामंडप क्र. ३  बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहातही अंदाजे ५०० जणांची बैठक व्यवस्था असेल. हे संभामंडप प्रताप महाविद्यालयातील जुन्या नाट्यगृहात आहे. बी. फार्मसी महाविद्यालयाजवळ ३०० ग्रंथदालने उभारण्यात आली आहे. यात खवय्यांसाठी काही दालने राखीव ठेवण्यात आली आहे. याच परिसरात प्रकाशन कट्टा व सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आले आहे.

०००००००००

अमळनेर साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर २ फेब्रुवारी रोजी माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा‌ महाजन यांच्या हस्ते उद्घाटन ४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप

 साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर,जि.जळगाव (जिमाका) : - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे भूषविणार आहेत. या संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार असून त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, विशेष अतिथी म्हणून भाषा व शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. तर समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना.दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.

दि. २ रोजी सकाळी ७.३० वा. ग्रंथदिंडीचे उ‌द्घाटन महमंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व अशोक जैन यांच्या हस्ते होईल. १० वाजता प्रा.उषा तांबे ध्वजारोहण करतील. ग्रंथदालनाचे उद्घाटन पूर्व संमेलनाध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर तर प्रकाशनकट्टा उद्घाटन प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते होईल. सभामंडप क्रमांक १  खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर सकाळी १०.३० वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होईल. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष  प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, पूर्व संमेलनाध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, विशेष अतिथी म्हणून भाषा व शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.

दुपारी २ ते ३.३० वाजे दरम्यान बालमेळाव्यातील निवडक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. दुपारी ३.३० ते ५.३० दरम्यान  राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी ५.३० ते ८.३० वाजे दरम्यान कविसंमेलन पार पडेल. रात्री ८.३० ते १०.३० वाजे दरम्यान छंद विठ्ठलाचा - भावसरगम हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडेल.

सभामंडप क्र. २  कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात दि.२ रोजी दुपारी २.०० ते ३.३० दरम्यान कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक, दुपारी ३.३० ते ४.३० सयाजीराव गायकवाड यांचे साहित्यिक व सामाजिक योगदान, दुपारी ४.३० ते ५.३० वा. तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान, सायं. ५.३० ते ७.०० वा स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींचे योगदान या विषयांवर परिसंवाद होतील. सभामंडप क्र. ३  बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात दि.२ रोजी दुपारी ३.०० ते ७.०० कविकट्टा पार पडेल.

दि.३ रोजी सभामंडप क्र १ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर सकाळी ९.३० ते ११.०० वा पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची प्रकट मुलाखत होईल. रवींद्र गोळे (मुंबई), सारंग दर्शन (मुंबई) हे मुलाखत घेतील. सकाळी ११.०० ते १२.३० वा  आजच्या मराठी साहित्यातून जीवन मूल्ये हरवत चालली आहेत का? दुपारी १२.३० ते २ वाजे दरम्यान अलक्षित साने गुरुजी या विषयावर परिसंवाद होईल. यावेळी श्रीमती सुधा साने यांचा सत्कार व मनोगताचा कार्यक्रम पार पडेल. दुपारी २.०० ते ३.३० वा आंतरभारती काल-आज-उद्या, सांय. ४.०० ते ५.३० वा आठवणीतल्या कविता - रसास्वाद या विषयांवर परिसंवाद होतील. सांय. ६.०० ते ८.०० :  कविसंमेलन होईल. रात्री ८.०० ते १० वा "अरे संसार संसार" : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या रचनांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

सभामंडप क्र २ कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात दि. ३ रोजी सकाळी १०.०० ते ११.०० वा ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन विषयावर चैत्राम पवार यांची मुलाखत शशिकांत घासकडबी, नंदुरबार घेतील. सकाळी ११.०० ते १२.३० वा मराठी साहित्यात विनोदाचे गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे, दुपारी १२.३० ते १.३० वा. खान्देशी बोलीभाषा (अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर) या विषयांवर परिसंवाद होतील. दुपारी १.३० ते ३.३० वा. कथाकथन होईल. दुपारी ४.०० ते ५.३० वा. कळ्यांचे निश्वास या विषयावर परिचर्चा होईल.

सभामंडप क्र. ३  बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात दि.३ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० व दुपारी ११.३० ते २ वा. कविकट्टा पार पडेल. दुपारी २.३० ते ४.३० वा लोककला / लोकसंगीताचा कार्यक्रम होईल. दुपारी ४.३० ते ६ वा खान्देशी साहित्यिकांचे वैभव यावर परिसंवाद होईल. सायं. ६.०० ते ८.०० : खान्देशी कविसंमेलन होईल.

दि.४ रोजी सभामंडप क्र १ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर सकाळी ९.०० ते १०वा  चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांची प्रकट मुलाखत दीपाली केळकर (बदलापूर) घेतील. सकाळी १०.३० ते १२ वा अभिरूप न्यायालय होईल. यात अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज आहेत का ? हा विषय असेल. दुपारी १२.०० ते १ वा मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी ३.०० ते ३.३० लेखिका डॉ. मीना प्रभू-पुणे, लेखक डॉ. विश्वास पाटील-शहादा प्रकाशक-चंद्रकांत लाखे नागपूर, अथर्व पब्लिकेशन्स्, जळगांव यांचा सत्कार होईल. दुपारी ४.०० ते ६.०० : खुले अधिवेशन व समारोपाचा कार्यक्रम संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाषा मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.

सभामंडप क्र २ कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात दि.४ रोजी सकाळी ९.३० ते ११.०० : वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी, सकाळी ११.०० ते २ वा साहित्यिकांचे शताब्दिस्मरण, दुपारी २.०० ते ३.३० वा भारतीय तत्त्वज्ञान एक वैभवशाली संस्कृती या विषयांवर परिसंवाद होतील. सभामंडप ३  बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात दि.४ रोजी  सकाळी ९.०० ते २ वा गझलकट्टा होईल. सायं. ७.०० ते ९ वा. मुख्य सभागृहात समारोपाच्या दिवसाचा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य "जाऊ देवाचिया गावा" हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडेल.

संमेलनपूर्व कार्यक्रम

संमेलनपूर्व कार्यक्रमात दि. १ रोजी सकाळी १०.३० वा बालसाहित्य संमेलनाने कार्यक्रमाला सुरुवात होईल. याचे अध्यक्षस्थान अ.भा.मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे भुषवतील. बालमेळावा समन्वयक म्हणून एकनाथ आव्हाड जबाबदारी सांभाळतील. यावेळी बालमेळावा अध्यक्ष शुभम सतीष देशमुख, चाळीसगांव, बालमेळावा उद्घाटक पियुषा गिरीष जाधव, जळगांव व बालमेळावा स्वागताध्यक्ष  दीक्षा राजरत्न सरदार, अमळनेर व्यासपीठावर उपस्थित राहतील. दुपारी १ ते २ वाजेदम्यान कथाकथन सत्र विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. दु. २ ते ३ वाजे दरम्यान काव्यवाचन सत्र आबा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली, दुपारी ३.३०.४.३० वा. बालनाट्य सत्र माया धुप्पड यांच्या अध्यक्षतेखाली तर सायं. ४.३०.५.३० वा. नाट्यछटा सत्र प्रकाश पारखी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल. दुपारी ०४.०० वा. साहित्याची वारी... रसिकांच्या दारी हा कार्यक्रम देखील पार पडेल.

००००००००

आगामी निवडणुकांसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज २३ जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार जिल्ह्यात ३५६४ मतदान केंद्र १७८२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग जिल्ह्यात ९३३९ बॅलेट युनिट, ५४५० कंट्रोल युनिट आणि ५७३३ व्हीव्हीपीएटी मशिन




 जळगाव, दि.२१ जानेवारी (जिमाका) - जिल्हा निवडणूक प्रशासन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. उद्या (दि.२३ जानेवारी) नवीन मतदारांच्या समावेशासह मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सध्या पुरूष व महिला मिळून ३४ लाख ९१ हजार ९८ मतदार आहेत. यात सुमारे ऐंशी हजार नव मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात २०१९ लोकसभा निवडणूकीत ३५५९ मतदान केंद्र होती. या निवडणुकीत ५ मतदान‌ केंद्राची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या ३५६४ झाली आहे.

जिल्ह्यात शहरी भागात १०६९ व  ग्रामीण भागात २४९५ मतदान केंद्र आहेत‌. मतदान केंद्राच्या ठिकाणे शहरी  भागात ४३०, ग्रामीण भागात १६०८ असे एकूण २०३८ ठिकाणे आहेत. याव्यतिरिक्त १४ ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्र असू शकतात कारण त्याठिकाणी मतदारांची संख्या १५०० च्या वर आहे. १७८२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगचे नियोजन करण्यात आले आहे. दुर्गम भागातील १६ मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्क नाही.

सध्याच्या जिल्ह्यात ९३३९ बॅलेट युनिट, ५४५० कंट्रोल युनिट आणि ५७३३ व्हीव्हीपीएटी मशिन उपलब्ध आहेत.जिल्ह्याची लोकसंख्या ४७,४०,८८२ इतकी आहे. यात ३४,९१,०९८ मतदार संख्या आहे. मतदारांमध्ये १८,१२,००७ पुरूष तर १६,७८,९५६ महिला मतदार आहेत. तृतीयपंथी १३५ मतदार आहेत. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग १९२११ मतदार आहेत. ८० वर्षांवरील वयोमान असलेले १,०३,१२९ मतदार आहेत. 

पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू इच्छिणाऱ्या गैरहजर मतदाराने सर्व तपशील भरून फॉर्म १२डी द्वारे संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी (RO) कडे अर्ज करावा लागेल. पोस्टल बॅलेट सुविधेची मागणी करणारे असे अर्ज निवडणुकीच्या घोषणेच्या तारखेपासून संबंधित निवडणुकीच्या अधिसूचनेच्या तारखेपासून पाच दिवसांच्या कालावधीत आरओकडे पोहोचले पाहिजेत.असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केले आहे. 

 दोन मतदान अधिकार्‍यांचा समावेश असलेले मतदान पथक, एक व्हिडिओग्राफर आणि एक सुरक्षा व्यक्ती, मतदाराच्या घरी भेट देतात आणि मतदानाची संपूर्ण गुप्तता राखून मतदाराला पोस्टल बॅलेटवर मतदान करण्यास सांगतात. असे मतदार घरबसल्या मतदान करू शकतात. असे श्री.चिंचकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत, पुरुषांपेक्षा ७२ टक्क्यांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. लिंग गुणोत्तर दर १००० पुरुषांमागे ९२७ महिला असे आहे. यात सुधारणा झाली आहे. 

२७ ऑक्टोबर २०२३ ते १७ जानेवारी २०२४ या कालावधीत १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या १६२२९  वरून ३८२९६ झाली आहे. २०२२ पासून जिल्ह्यात एकूण ६३७११ मतदारांची वाढ झाली आहे. २४३०१५ मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत, तर ३,०६,७२६ मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. २३ जानेवारी २०२४ रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

 नवीन निवडणूक फोटो ओळखपत्र २,९१,१७१ छापण्यात आले आहेत. टपाल विभागाकडून २,३६,०११ निवडणूक छायाचित्र ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ५५,१६० कार्डचे लवकरच वितरण केले जाणार आहे. असे श्री.चिंचकर यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोग व राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यातील आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी व मतदार जागृती कार्यक्रमाचा दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तयारीबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

००००००००००००००००००००

मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची २९ पासून मेजवानी

 साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) :  ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने २९ जानेवारीपासून संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कथ्थक नृत्य, तबला वादन, भरतनाट्यम्‌ आदी कार्यक्रम प्रताप महाविद्यालयातील राणे सभागृहात दररोज दुपारी ४ ते ६ वाजेदरम्यान होतील.

दि.२९ रोजी  आर्या शेंदुर्णीकर कथ्थक नृत्य, तेजल जगताप एकल तबला वादन तर सुनिल वाघ व त्यांचे सहकारी 'मराठी पाऊल पडते पुढे' हा कार्यक्रम सादर करतील. दि. ३० रोजी नयना कुलकर्णी आणि समूह 'आमची माती आमची संस्कृती', अमळनेर महिला मंच 'सूर तेच छेडीता' तर कानुश्री संगीत विद्यालय, धुळे येथील चमू भरतनाट्यम्‌ सादर करतील. दि. ३१ रोजी मुद्रा स्कूल ऑफ भरतनाट्यम्‌, जळगाव येथील नेहा जोशी यांचा शिष्य परिवार भरतनाट्यम्‌ सादर करतील. यज्ञेश जेऊरकर एकल तबला वादन तर स्वरांजली, अमळनेरचा चमू 'अशी पाखरे येती' या कार्यक्रमाचे सादरीकरण करतील.

दि. १ फेब्रुवारीला बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बालमेळाव्याचे अध्यक्षस्थान तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगांवचा विद्यार्थी शुभम सतीश देशमुख भुषविणार आहे. बाल मेळाव्याचे उद्घाटन रावसाहेब रुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगावची विद्यार्थीनी पियुषा गिरीष जाधव हिच्या हस्ते होईल. तर बाल स्वागताध्यक्ष पद डि.आर.कन्या हायस्कूल, अमळनेरची विद्यार्थीनी दिक्षा राजरत्न सरदार भुषविणार आहे. बालमेळाव्यात शालेय विद्यार्थी काव्यवाचन, समुहगीत, नाट्यछटा, कथाकथन आदि कलाविष्कार सादर करणार असल्याची माहिती सांस्कृतिक समिती व बालमेळावा प्रमुख संदीप घोरपडे, भैय्यासाहेब मगर, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे यांनी दिली.

                                                                   000000

Friday, 19 January 2024

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा मार्च अखेर एकही अपील प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्या - आयुक्त चित्रा कुलकर्णी

 






        जळगाव,दि.१९ जानेवारी (जिमाका):- महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा आहे. या माध्यमातून प्रशासन नागरिकांच्या दारात पोहोचावे, जनतेला पारदर्शकपणे व दिलेल्या विहित कालावधीमध्ये सेवा मिळावी यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन मार्च २०२४ अखेर एकही अपील प्रलंबित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना राज्य सेवा हक्क आयोगाच्या नाशिक आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी‌ आज येथे दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्रीमती कुलकर्णी बोलत होत्या.

 यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, आयोगाचे कक्ष अधिकारी उदय कांनंव, सहायक कक्ष अधिकारी प्रशांत घोडके आदी उपस्थित होते.

 श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या की, जनतेला पारदर्शक, गतीमान आणि दिलेल्या कालमर्यादेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक प्रभावीपणे सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा करण्यात आला आहे.  जनतेला सेवा देताना शासकीय अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवावी. हा कायदा जनतेसाठी अत्यंत उपयुक्त असून या कायद्याची माहिती जनतेला होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कार्यालयात दर्शनी भागात या कायद्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सेवांची व त्यासाठीच्या कालमर्यादेची माहिती लावणे बंधनकारक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीने प्रशासन अधिक गतीमान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. दिलेल्या कालमर्यादेत जनतेला सेवा देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांपर्यंत कायदा पोहोचविण्याची गरज असल्याचे सांगत आपल्या कार्यालयामध्ये सेवांच्या मागणी अर्जाच्या संख्येत वाढ झाली पाहिजे. अर्ज कमी येत असल्यास आपण कायद्याच्या जनजागृती कमी पडत आहोत काय याचा अधिकाऱ्यांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात ज्या ज्या विभागांची संकेतस्थळे आहेत त्या प्रत्येक संकेतस्थळावर आरटीएस या पोर्टलची लिंक उपलब्ध करुन देण्यात यावी. त्याचबरोबर प्रत्येक विभागाने आपले सरकार पोर्टलचे युजर आयडी व पासवर्डची उपलब्ध असतील याची खातरजमा करण्याच्या सुचनाही श्रीमती कुलकर्णी यांनी यावेळी दिल्या.

 श्री.पिनाटे म्हणाले की, आपली सेवा, आमचे कर्तव्य हे ब्रीदवाक्य घेऊन आयोगामार्फत काम करण्यात येते. सर्वसामान्यांना ऑनलाईन पद्धतीने कमी वेळेत  सेवा मिळण्यासाठी कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीस सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 ०००००००००००००००००


Thursday, 18 January 2024

निवडणूक प्रक्रियेत माहितीची शुद्धता महत्वपूर्ण घटक : उपायुक्त रमेश काळे

 









नाशिक, दिनांक 18 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा): आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी  नवीन मतदार नोंदणी पासून ते दुबार नावे वगळणे, माहिती अद्ययावत करणे ही कामे प्रशासकीय पातळीवर केली जात आहेत. संकलित करण्यात आलेली माहितीची शुद्धता ही निवडणूक प्रक्रियेत अत्यंत महत्वपूर्ण घटक असून यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी त्रूटी टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचना उपायुक्त सामान्य प्रशासन नाशिक विभाग रमेश काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजित आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा नोडल अधिकारी यांच्या प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे,  उपजिल्हाधिकारी (राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्प) शर्मिला भोसले, रवींद्र भारदे (भुसंपादन), शाहूराज मोरे (पूनर्वसन), अतुल चोरमारे (अहमदनगर),  उपविभागीय अधिकारी शिरपूर प्रमोद भामरे, उपविभागीय अधिकारी बबन काकडे (बागलाण), आप्पासाहेब शिंदे (दिंडोरी), महेश सुधळकर (जळगाव), नितिन सदगीर (मालेगाव), तहसिलदार मंजुषा घाटगे (निवडणूक शाखा), नायब  तहसिलदार राजेश अहिरे यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

उपायुक्त रमेश काळे म्हणाले, नोडल अधिकारी हे प्रादेशिक अधिकाऱ्यांना सहाय्य करणार आहेत त्यादृष्टीने एकमेकांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीन फेब्रुवारी महिना हा महत्वाचा असून सर्वानी निवडणूकीच्या अधिसूचना, निवडणूक संदर्भातील मार्गदर्शक सूचना, कायदे व नियम यांचे वाचन करून त्यासंदर्भात आवश्यक नोंदी काढल्यास निश्चितच त्याचा उपयोग येणाऱ्या काळात होणार आहे. नवनवीन ऑनलाईन ॲप्लीकेशनबाबत माहिती करून त्यांचा उपयोग  अधिकाऱ्यांनी करावा. आदर्श आचार संहिताबाबत नोडल  अधिकाऱ्यांनी आपल्या टिमचे प्रशिक्षण घेतल्यास आवश्यक नियम, सूचना  याबाबात दक्ष राहून कामकाज होईल. निविदा प्रक्रियाही  अधिकाऱ्यांनी वेळेत करून घ्यावी. उमेदवारांचे नॉमिनेशन फॉर्म ऑनलाईन अपलोड करतांना सर्व बाबी  व आवश्यक पूर्तता अचूक पाहूनच अपलोड करावेत अशा सूचनाही नोडल अधिकारी यांनी 

संबधित यंत्रणेला द्याव्यात. आजच्या प्रशिक्षणातील 16 विषय अत्यंत महत्वाचे आहेत. सर्व अधिकाऱ्यांना आजच्या प्रशिक्षण हे निश्चितच माहितीपर व शंका निरसण करणारे ठरेल. असे सांगत उपायुक्त रमेश काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक डॉ शशिकांत मंगरूळे प्रास्ताविकात म्हणाले, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. यात निवडणूक आचारसंहिता हा महत्वाचा भाग सुरू झाला असून निवडणूक केंद्रीय अधिकारी यांना मदत करण्यासाठी 16 प्रकारचे निवडणूक अधिकारी नियुक्त करण्याचे भारतीय निवडणूक आयोगाने सूचित केले आहे. त्याप्रमाणे या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांचे प्रशिक्षण आज सुरू करीत आहोत. त्यादृष्टीने नोडल अधिकारी यांनी  निवडणूक संदर्भातील नवनवीन बदल,नवीन ॲप्सची माहिती अवगत करून घ्यावी  यासोबतच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अभ्यासासाठी माहिती उपलब्ध करून दिली आहे त्याचेही अधिकाऱ्यांनी अवलोकन करून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे  डॉ. मंगरूळे यांनी यावेळी प्रास्ताविकात सांगितले.

आज आयोजित करण्यात आलेल्या प्रथम सत्रात विविध विषयांवर खालीलप्रमाणे अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शक: उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे (शिरपूर)

▪️Manpower staff Management

▪️EVM/ VVPAT Management

मार्गदर्शक: उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले

▪️Material procurement and Management

▪️Training Management

मार्गदर्शक: उपविभागीय अधिकारी बबन काकडे

▪️Transport Management

▪️DEMP and Transportation Plan

मार्गदर्शक: उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे

▪️Ballot paper/ Demmy Ballot/ Postal Ballot/ ETBps

मार्गदर्शक: उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे

▪️SVEEP Management

▪️Electrol Roll

▪️Health and Handling Emergency situations

▪️Polling staff Welfare

द्वितीय सत्रात विविध विषयांवर खालीलप्रमाणे अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शक: उपविभागीय अधिकारी बबन काकडे

▪️Mode code of Conduct

▪️Expenditure Monitoring

▪️Media and press briefing

मार्गदर्शक: उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे

▪️Helpline and complaint redressal

▪️SMS Monitoring, Grievance redressal and communication plan

मार्गदर्शक: उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे

▪️Law related issues

मार्गदर्शक: उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर

▪️Observer Arrangements

▪️Law, order and vulnerability

▪️Mapping and District Secuirity plan

मार्गदर्शक: उपविभागीय अधिकारी नितिन सदगीर

▪️Computerization, Cyber security and IT

000000

आपत्तीग्रस्तांच्या कुटुंबांना शासनातर्फे मदतीचा हात आपदग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : पालकमंत्री गुलाबराव पाटील नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आपदग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते १५ लाखाचे धनादेश वाटप

जळगाव दि. १८ जानेवारी (जिमाका) : कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटूंब असह्य होते. विशेषत: शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. घरातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूची पोकळी कुणी भरून काढू शकत नाही. मात्र या आपत्तीच्या काळातही आपादग्रस्तांना  मदतीचा हात देण्यासाठी शासन कटिबद्ध असून आपण आयुष्यात नव्या उमेदीने वाटचाल करावी. आपल्या पाठिशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे  असल्याचे सांगून  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  कुटुंबियांना धीर दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना, नैसर्गिक आपत्तीत मयत व्यक्तींच्या वारसांना  व  नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्याना  मदतीचा धनादेश शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे प्रदान करण्यात आला. तसेच पशुहानी झालेल्या ६ व्यक्तीना  शासकीय अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले.

यांना वाटप करण्यात आला धनादेश

आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांचे वारस सोनाली रविंद्र पाटील (नशिराबाद), कल्पना अरुण पाटील (देव्हारी),तसेच नैसर्गिक आपत्तीत मयत व्यक्तींचे वारस श्रीमती कुसुम ज्ञानदेव पाटील (आसोदा), प्रितम चंद्रकांत वाबळे (चाळीसगाव) या वारसांना प्रत्येकी ४ लाखाचे धनादेश वाटप करण्यात आले . नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्या सविता रविंद्र नारखेडे (बेळी), यांना २ लाख ५० हजाराचा धनादेश तर पशुहानी  झालेल्या तालुक्यातील रमेश विष्णू सोनवणे (सुजदे), संगिता वसंत भोई (सुभाषवाडी), अशोक नागो पाटील (ममुराबाद), श्रीराम महादू चौधरी (पाथरी), निशीगंधा सुहास नेमाडे (मोहाडी), राजेश प्रकाश पाटील (वावडदे) या ६ पात्र धारकांना पशुधन खरेदीसाठी  २ लाख ३१ हजार २०० असे एकूण  १५ लाखाचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अव्वल कारकून सुभाष तायडे यांनी केले. प्रास्ताविक तहसिलदार तथा प्रोबेशनरी भाप्रसे अर्पित चव्हाण, तहसीलदार यांनी केले तर आभार महसूल सहायक रेखा राठोड यांनी मानले. सदर धनादेश वाटप प्रसंगी जळगाव तहसिलदार तथा प्रोबेशनरी भाप्रसे अर्पित चव्हाण, अव्वल कारकून सुभाष तायडे, महसूल सहायक श्रीमती रेखा राठोड , महिला आघाडी जिल्हाप्रमुख सरीता ताई कोल्हे - माळी, तालुका प्रमुख शिवराज पाटील, जितेंद्र पाटील, स्वप्नील  परदेशी , माजी सभापती नंदलाल पाटील, आशुतोष पाटील, उपतालुका प्रमुख राजू पाटील, अर्जुन पाटील, उपस्थित होते.

०००००००००००००००००

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी 'अमृत'च्या योजनांचा लाभ घ्यावा! - 'अमृत' संस्थेच्या अधिकार्‍यांचे आवाहन; 'अमृत'च्या अधिकार्‍यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद



जळगा,दि.१८ जानेवारी (जिमाका) - खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाच्या इतर कोणत्याही विभाग, महामंडळ, संस्था यांच्याकडून लाभ मिळत नाही, अशा आर्थिक दुर्बल घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. 'अमृत' हा राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे, या संस्थेच्या लाभार्थ्यांनी संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे, व आपली उन्नती करावी, असे आवाहन 'अमृत' संस्थेचे अधिकारी व जळगाव, धुळे-नंदूरबार जिल्ह्यांचे पालक अधिकारी हरिष भामरे यांनी येथे केले. 'अमृत'च्या विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती घेऊन स्वतंत्र अर्ज दाखल करावेत, असेही भामरे म्हणालेत.

जळगाव येथे बुधवारी (दि.१७) विविध सामाजिक मान्यवर व लाभार्थ्यांसोबत महत्वपूर्ण बैठक, विविध प्रशासकीय अधिकार्‍यांशी चर्चा आदींचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भामरे यांनी लाभार्थ्यांना 'अमृत'च्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भामरे म्हणालेत, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, आर्थिक विकासाकरिता प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी बनविणे, स्वयंरोजगारासाठी या घटकाला प्रोत्साहन देणे व लघुउद्योग निर्मितीस चालना देणे, कृषी उत्पन्न आधारित लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे, कौशल्यविकास प्रशिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधणे, आदी 'अमृत'च्या योजना आहेत. या सर्व योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही हरिष भामरे यांनी याप्रसंगी केले.

खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ज्या लाभार्थ्यांना सरकारच्या इतर संस्था, महामंडळ अथवा योजनांचा लाभ मिळत नाही, अशा लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेत असताना अधिक माहितीसाठी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे, असेही भामरे यांनी सांगितले. मार्गदर्शन सत्रानंतर उपस्थित लाभार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भामरे यांनी शहर व जिल्ह्यातील विविध मान्यवरांसह लाभार्थ्यांच्या भेटीगाठी घेतल्या व त्यांना 'अमृत'च्या योजनांच्या प्रसार-प्रचारासाठी सहाय्य करण्याचे आवाहन केले. त्याला सर्व मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याप्रसंगी संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक द्वारकाधीश जोशी यांच्यासह विभागीय समन्वयक दीपक जोशी, जळगाव जिल्हा समन्वयक राजेंद्र कानडे, शामकात कलभंडे, कमलाकर फडणीस, नीलेश राव, उदय खेडकर, प्रविण  कुलकर्णी, अशोक वाघ आदींसह जळगाव, भुसावळ, फैजपूर येथील लाभार्थ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

--------

Wednesday, 17 January 2024

जिल्ह्यात ११९२० जणांवर प्रत‍िबंधात्मक कारवाईचा बडगा पोलीस विभागाची २०२३ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी मागील दोन‌ वर्षाच्या तुलनेत यावर्षी कारवाईत वाढ

 जळगाव, द‍ि.१८ जानेवारी (ज‍िमाका) - समाजात शांतता प्रस्थाप‍ित करणे, कायदा - सुव्यवस्था राखणे व गुन्हेगारांवर वचक बसावा. हातभट्टी वरील अनधिकृत दारूविक्रीला पायबंद बसवा यासाठी दारूबंदी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा पोलीस विभागाकडून उगारण्यात येतो. यासाठी पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यात २०२३ या वर्षात ११९२० जणांवर प्रत‍िबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना वचक बसला आहे. २०२१ व २०२२ या वर्षाच्या तुलनेत ही प्रतिबंधात्मक कारवाईत यावर्षी वाढ झाली आहे. 

गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी पोलीस व महसूल यंत्रणेकडून सीआरपीसी १०७, १०९ व‌ ११० अन्वये तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असते. 

२०२१ या वर्षात ८८०६ व २०२२ या वर्षात ९०८३ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर‌ या‌ कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे ‌.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रतिबंधात्मक कारवाई बाबत घ्यावयाच्या दक्षता याविषयावर संयुक्त कार्यशाळा ही नुकतीच घेण्यात आली आहे. सीआरपीसी १०७, १०९ व ११० मध्ये पोलीस विभागाने पर‍िपूर्ण प्रस्ताव कसे सादर करावे. कार्यकारी दंडाध‍िकारी यांनी पहिला बाँड कसा घ्यावा, रोजनामा कसा ल‍िहावा, नोटीसा कशा काढाव्यात, शेवटाचा बाँड किती द‍िवसात काढावा. याबाबत या कार्यशाळेत सव‍िस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. 

शासकीय कामात अडथळा आणून सरकारी अध‍िकारी - कर्मचारी व पोलीसांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कडक प्रत‍िबंधात्मक कारवाई झाली पाह‍िजे. न‍िवडणूक तसेच आंदोलनाच्या काळात महसूल व‍िभागाचे कार्यकारी दंडाध‍िकारी व पोलीसांच्या स्थान‍िक गुन्हे शाखेकडून प्रतिबंधात्मक कारवाई करतांना महसूल व पोलीस व‍िभागाने समन्वय ठेवत काम करावे. अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली आहे. 

००००००००००००००००००

अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यास सुरुवात

 साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) :- अमळनेर येथे २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. संमेलनाचा उत्साह संपूर्ण खान्देशात दिसून येत आहे. प्रताप महाविद्यालयात उभारण्यात येत असलेल्या ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ चे काम देखील वेगाने सुरु आहे. संमेलनासाठी तीन भव्य सभागृह उभारण्यात येत आहेत.

पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या प्रताप महाविद्यालयाच्या परिसरात भव्य अशी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यात येत आहे. साहित्य संमेलनासाठी तीन सभागृह उभारण्यात येत असून सभामंडप क्र.१ ला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठ नाव देण्यात आले आहे तर सभामंडप क्र.२ ला कविवर्य ना.धो.महानोर सभागृह व  सभामंडप क्र.३ बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृह असे नामकरण करण्यात आले आहे.

प्रताप महाविद्यालयाच्या परिसरात तीन सभागृहांची उभारणी, व्यासपीठ, ग्रंथप्रदर्शन दालन उभारणी जागेचे सपाटीकरण, परिसरातील अंतर्गत रस्ते बांधकाम, स्वच्छतागृह उभारणी, पार्किंग व्यवस्था आदी कामे जोमाने सुरु असल्याची माहिती मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी दिली. साहित्य संमेलनासाठी देशभरातून येणाऱ्या मंडळीची निवास व्यवस्था ज्या-ज्या ठिकाणी करण्यात येणार आहे, त्याचीही स्वच्छता, रंगरंगोटी आदी कामे हाती घेण्यात आले असल्याचे डॉ.जोशी यांनी सांगितले.

संमेलनाचे उद्घाटन सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलन समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित राहणार आहेत. तसेच संमेलानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहणार आहेत, यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने देखील काही तयारी करण्यात आली असल्याचे डॉ.जोशी यांनी नमूद केले.

प्रशासनाचा सक्रिय सहभाग

साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, प्रमुख संरक्षक व सल्लागार तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे मदत व  पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतीच संमेलनाच्या विविध ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांनी पीडब्लूडी, तहसील, पोलीस, एमएसईबी, नगरपालिकेसह संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत जबाबदाऱ्या निश्चित केल्या असून संमेलनासाठी प्रशासनातर्फे प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

-------------------

सदर बातमीचे व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा : https://drive.google.com/drive/folders/1QlrJiYKExd-bYxX8B_WCBs3jzqBmDz2J?usp=drive_link

-------------------

Tuesday, 16 January 2024

ग्रंथ प्रदर्शन नोंदणीला २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : - अमळनेर येथे २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होत असलेल्या ग्रंथ प्रदर्शन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वितरक, प्रकाशकांच्या मागणीनुसार नोंदणीसाठी २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ३० जानेवारी रोजी सोडत काढण्यात येणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे, वाचक, साहित्यिक आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांच्या आनंदाचा वार्षिक सोहळा. संमेलनादरम्यान, ग्रंथ, पुस्तके, साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. यासाठी संमेलनस्थळी ग्रंथ दालनासाठी प्रकाशक, ग्रंथ वितरक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ग्रंथ दालन मागणीचा अर्ज. अटी व शर्ती याबाबतची सविस्तर माहिती संमेलनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच म.वा.मंडळ, अमळनेर कार्यालयातही ग्रंथदालन नोंदणी करता येवू शकते. नोंदणीसाठी २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून अधिक माहितीसाठी श्यामकांत भदाणे ९४२३९०३०४४ यांच्याशी संपर्क साधावा.

संमेलन सर्व वाचक, साहित्यिक व नागरिकांसाठी खुले आहे. यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. मात्र ज्यांना निवास व भोजनाची व्यवस्था हवी असल्यास त्यांनी चार हजार रुपये भरुन प्रतिनिधी म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. ही व्यवस्था २, ३ व ४ फेब्रुवारी दरम्यान असेल. अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.पी.बी.भराटे ९४२३९३४७९७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

०००००००००००००००

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या उपक्रमांतून विदेशामध्ये रोजगार मिळविण्याची सुवर्ण संधी

जळगाव, दि.१६ जानेवारी (जिमाका) - महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अंतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनल या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रशिक्षित उमेदवारांना विदेशामध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोशल मिडीया चॅनलची स्थापना करण्यात आली आहे. या सोशल मिडीया चॅनलवर महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत विदेशामध्ये असणाऱ्या विविध रोजगाराच्या संधीची सविस्तर माहिती प्रसारीत करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत इस्त्राईलमध्ये बांधकाम क्षेत्रातील 10,000 पदांसाठी, यु.के.मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अधिपरिचारिकेच्या 120 पदांसाठी तर फिनलॅंडमध्ये काळजीवाहकच्या 50 पदांसाठी भरती होणार आहे. याबाबतचीही माहिती या चॅनलच्या माध्यमातून घेता येणार आहे.

महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सोशल मिडीया चॅनलमध्ये जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक युवतींनी सहभागी होऊन विदेशामध्ये रोजगारांच्या संधीचा लाभ घ्यावा. सदर चॅनलमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी खालील व्हॉटसॲप, टेलीग्राम व लिंक्डइन पेज ला सबस्क्राईब करावे.

WhatsApp Channel:

https://whatsapp.com/channel/0029VaFSFjiKmCPXrP0ncr38

Telegram Channel:

https://t.me/maharashtrainternational

LinkedIn Page:

https://shorturl.at/hpwQW

या लिंकला भेट द्यावी व आजच आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त वि. रा. रिसे यांनी केले आहे.

०००००००००००००००

चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ जिल्ह्यातील १५ तालुक्यात फिरणार चित्ररथ

 



जळगाव,दि.१६ जानेवारी (जिमाका वृत्तसेवा)-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसार करणाऱ्या एलईडी चित्ररथास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील , अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.   

              सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी  योजना समाजातील‌ तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन चित्ररथाद्वारे करण्यात आले आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये विविध योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या चित्ररथाच्या माध्यमातून गावागावात दाखविण्यात येणार आहेत.  जिल्ह्यातील १५ तालुक्यामध्ये हा चित्ररथ फिरून माहिती देणार असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले.

चित्ररथामध्ये सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती उपायोजना, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करून देणे, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरवणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, मुला मुलींसाठी शासकीय वसतीगृह, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला - मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वस्तीगृह योजना, अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत गाय गट वाटप योजना, शेळी गट वाटप योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन देणे, अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांना शालांतपूर्व शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलींसाठी इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातींच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य ,मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा प्रतिकृती योजना यासह इतर योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती  या एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहेत.

०००००००००००००००००

रस्ता सुरक्षा ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी - पालकमंत्री गुलाबराव पाटील रस्ता सप्ताह हा फक्त सात द‍िवसासाठीचा सप्ताह नसून जीवन सप्ताह 33 व्या रस्ता सुरक्षा अभ‍ियानाचे उद्घाटन

 











जळगाव, दि.१५ जानेवारी (जिमाका) - रस्ता सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी आहे. रस्ता सुरक्षा हे केवळ अभियान काळापुरते मर्यादित न ठेवता नेहमीसाठी याची अंमलबजावणी करा. रस्ता सुरक्षा  ही काळाची गरज असून  यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारून रस्ता सुरक्षा अभियान ही लोक चळवळ निर्माण करून जास्तीत जास्त जनजागृती करून रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करा. रस्ता सप्ताह हा फक्त सात द‍िवसासाठीचा सप्ताह नसून जीवन सप्ताह आहे. असे प्रत‍िप्रादन प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. 

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गाव‍ित, उप प्रादेश‍िक परिवहन अध‍िकारी श्याम लोही, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक श‍िवाजी पवार,  एसटीचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर‌ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, रस्ते अपघाताच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा ६ वा क्रमांक आहे. देशातील एकूण अपघातापैकी 7.2 टक्के रस्ता अपघात महाराष्ट्रात होतात. देशातील एकूण अपघातापैकी 55% अपघात हे राष्ट्रीय व राज्य महामार्गावर होत असताना दिसून येते. रस्ता अपघातामध्ये सर्वाधिक मृत्यू हे 18 ते 45 या वयोगटातील म्हणजे तरुणांचे 66.5% इतके आहे. आपण स्वतःच्या मनावर ताबा ठेवला तर अपघात थांबवू शकतो. रस्ता सुरक्षा ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने मर्यादित‌ वेगाने वाहन चालवावे. प्रत्येकाने रस्ते नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. 

प्रादेश‍िक पर‍िवहन कार्यालयाच्या बळकटीकरणासाठी ज‍िल्हा न‍ियोजनाच्या माध्यमातून १० लाखांचा निधी वितरित करण्यात यावा. अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. 

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, अपघात होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. रस्ता सुरक्षा म्हणजे आपल्या कुटुंबाची सुरक्षा आहे. सहा ते सात पेक्षा जास्त वाहन चालविण्यात येऊ नये.‌ महसूल‌ विभागानंतर परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान व डिजिटलचा वापर करण्यात आला‌. परिवहन विभागाने सर्व परवाने ऑनलाईन केले आहे. त्यामुळे कामांत पारदर्शकता व गतिमानता आली आहे. आपल्या कुटुंबासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. 

श्री.नखाते म्हणाले की, रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती करण्याचे काम पोलीस व परिवहन विभाग करत आहे. नागरिकांनी ही स्वयंस्फूर्तीने वाहतूकीचे नियम पाळावेत.

यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते रस्ता सुरक्षा पुस्त‍िकेचे प्रकाशन करण्यात आले. सेल्फी पॉईंट, रस्ते व‍िषयक न‍ियम फलकांचे उद्घाटन ही पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताव‍िक श्याम लोही यांनी केले. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.

पालकमंत्री व ज‍िल्हाध‍िकाऱ्यांचा र‍िक्षातून प्रवास

रस्ता सुरक्षा कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील व ज‍िल्हाध‍िकाऱ्यांच्या हस्ते शहरातील ७ गुलाबी र‍िक्षा मह‍िला चालकांना तीळगुळ वाटप करत मकरसंक्रातीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम संपल्यानंतर मह‍िला चालकांच्या एका गुलाबी र‍िक्षेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील व ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय ते ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयापर्यंत सोबत प्रवास केला.

०००००००००००००००