Monday, 21 October 2024

जळगाव येथील राणी लक्ष्मीबाई शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रीयेसाठी मुदतवाढ

 जळगाव दि. 21 ( जिमाका )  इयत्ता १०वी १२वी पुरवणी परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे.  या अनुषंगाने  राणी लक्ष्मीबाई शासकीय औदयोगिक प्रशिक्षण  (महिला) या संस्थेतील विविध व्यवसायाच्या शिल्लक जागांसाठी प्रवेश प्रक्रीयेत मुदवाढ देण्यात आली आहे.  दि.१९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर पर्यंत मुदवाढ मिळाली असून आता उमेदवार राणी लक्ष्मीबाई शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत अर्ज भरुन प्रवेश घेऊ शकतात.  प्रवेश प्रक्रिया सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० पर्यंत कार्यालयीन वेळेत सुरु झाली आहे.

सदरच्या समुपदेशन फेरीसाठी दिनांक ३० ऑक्टोबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याचे वरीष्ठ कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.   दिनांक २४ ऑक्टोबर  ते ३० ऑक्टोबर  या कालावधीत एकत्रित समुपदेशन फेरीमध्ये पूर्वी राहीलेले उमेदवार व नव्याने अर्ज सादर केलेले उमेदवार यांना प्रवेश घेता येणार आहे. 

जास्तीत जास्त उमेदवारांनी आपला प्रवेश अर्ज भरण्यासाठी व निश्चीतसाठी संस्थेत संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

                                                       000000000000

Friday, 18 October 2024

उच्च न्यायालय आणि खंडपीठात विशेष लोकअदालतीचे आयोजन

         जळगाव दि. 18 ( जिमाका ) उच्च न्यायालयातील प्रलंबीत खटले निकाली काढण्यासाठी उच्च मुंबई आणि त्यांचे खंडपीठ नागपुर व औरंगाबाद येथे ३० नोव्हेंबर, २०२४ आणि १ डिसेंबर, २०२४ या कालावधीत विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री. एस.पी. सैय्यद सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जळगाव यांनी दिली आहे.

              जळगाव जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे उच्च न्यायालयातील प्रलंबीत आहेत व ही प्रकरणे तडजोडीने मिटावीत अशी ज्यांची इच्छा आहे. अशा पक्षकारांची प्रकरणे या विशेष लोकअदालतीत ठेवता येणार आहे. त्यासाठी       श्री. एम.क्यु.एस, एम शेख अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व बोलणी बैठक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व बोलणी बैठक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव येथे घेण्यात येणार आहे. संबधीत पक्षकार प्रत्यक्ष अथवा आभासी पध्दतीने यात सहभागी होउ शकतात. तरी अशा पक्षकारांनी जिल्हा विधी सेवा  प्राधिकरण, जळगाव या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन एम.क्यु.एस, एम शेख अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000000

मोठ्या आवाजाचे फटाक वाजविण्यावर नियंत्रण ठेवून ध्वनी व हवा प्रदुषण टाळण्याचे आवाहन

              जळगाव दि. 18 ( जिमाका ) -  सर्वोच्च न्यायालयातील रिट पिटीशन क्र. 72/1998 दि.27 सप्टेंबर, 2001 च्या अंतरिम आदेशानुसार दसरा, दिवाळी इतर सणांच्या वेळी मोठया आवाजाचे फटाके उडविल्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यास निर्बंध घालण्या बाबत अंतरिम आदेश दिलेले आहेत.

             केंद्र शासन, केंद्र शासित प्रदेश आणि राज्य शासन यांनी भारत सरकारच्या राजपत्र क्र. जीएसआर/682/ई दि. ५ ऑक्टोंबर, १९९९ नुसार प्रकाशीत केलेल्या पर्यावरण (संरक्षण) नियमातील तरतूदींचे मुख्यत्वे करुन व नियमातील सुधारित नियम ८९ ची, जे फटाकच्या आवाजाच्या मानांकाबाबत आहेत त्यांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

             त्याबाबी खालीलप्रमाणे -एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मिटर अंतरापर्यंत 125 डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्याचे उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे. जर साखळी फटाक्यात एकूण पन्नास, ते शंभर ते त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागे पासून 4 मिटर अंतरापर्यंत अनुक्रमे 150,110 व 105 डेसीबल एवढी असावी व त्यापेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या तसेच 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या सर्व साखळी फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे.

            फटाक्यांचे दारुकाम किंवा फटाके सायंकाळी 6 ते रात्री 10 या कालावधी व्यतिरिक्त उडविण्यास परवानगी देण्यात येऊ नये. तसेच रात्री 10 ते सकाळी 6 वाजे पर्यंत दारुकाम व फटाके यांचा वापर करण्यात येऊ नये.

            शांतता क्षेत्रामध्ये कोणत्याही फटाक्यांचा वापर कुठल्याही वेळेत करण्यात येऊ नये. शांतता क्षेत्रामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांचे सभोवतालचे 100 मिटर पर्यंतचे क्षेत्र येते.

            राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण संस्थाच्या व्यवस्थापक व मुख्यध्यापक यांना ध्वनी व हवा प्रदुषणाने अपायकारक परिणाम टाळण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याबाबत निर्देश देण्यात यावेत.

            सर्वोच्च न्यायलयाने वरील आदेशाने ध्वनी / हवा प्रदुषणाबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने सर्व स्थानिक वृत्तपत्रात, दुरदर्शन, आकाशवाणी व इतर प्रसिध्दी माध्यमांव्दारे प्रसिध्दी देण्यात यावी. सर्वोच न्यायालयाच्या वरील निर्देशांचे सर्व संबंधीतांना काटेकोरपणे पालन करावे वर उल्लेख केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके / साखळी फटाके जप्त करुन त्यांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यात यावी अशा शासनाच्या सुचना आहेत.

            सणांच्या कालावधीमध्ये अपघात घडणार नाही याची खबरदारी घेण्याची स्थानिक प्रशासन व त्यांचे अधिकारी यांना सुचना देण्यात येत आहे. आवश्यक त्या उपाययोजनेचे नियोजन देखील त्यांनी करुन ठेवण्याची दक्षता घ्यावी असे सुचित करण्यात येत आहे.

            दिवाळी हा आनंदपर्व साजरा करतांना योग्य ती दक्षता जनतेने घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००००

Thursday, 17 October 2024

रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज 31 डिसेंबर पर्यंत पाठविण्याचे आवाहन

             जळगाव, दि.17 -  गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव विभागाच्या अधिपत्याखालील गिरणा प्रकल्पावर जामदा डावा कालवा, जामदा उजवा कालवा, पांझण डावा कालवा, व निम्नगिरणा कालव्यावरुन व मन्याड, बोरी, अंजनी या मध्यम प्रकल्पावर तसचे बोळे, सावरखेडा, शिरसमणी, पिंपळकोठा-भोलाणे, म्हसवा, कंकराज ता- पारोळा निसर्डी, आर्डी ता. अमळनेर मन्यारखेडा, विटनेर ता- जळगाव खडकेसिम ता एरंडोल हातगाव-1, खडकीसिम, पिंप्री-उंबरहोळ, वाघळा-1, वाघळा -2 देवळी भोरस ब्राम्हणशेवगा, पिंपरखेड, राजदेंहरे, कुंझर -2, कृष्णापूरी, वलठाण, ता- चाळीसगाव, पथराड, ता. भडगाव या लघु प्रकल्पावरुन कालवाप्रवाही, कालवाउपसा, जलाशयउपसा, लाभक्षेत्रातील अधिसुचित नदी, नाले, ओढे यावरुन उपसा सिंचनाने तसेच लाभक्षेत्रातील पाण्याचा लाभ घेणा-या सर्व लाभधारकांना कळविण्यात येत आहे. यावर्षी वाघूर प्रकल्पात सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध झालेला असून पिण्याचे पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरीत उपलब्ध पाणीसाठयानुसार रब्बी हंगाम 2024-25 मध्ये दि. 15ऑक्टोंबर,2024  ते  28 फेब्रुवारी, 2025 या मुदतीत  रब्बी कपाशी, गहु, हरबरा, ज्वारी, दादर, हा. दुरी, मका, कडवळ, सुर्यफुल, करडई, भाजीपाला, विहिरीवरील उभे  पिके इ. हंगामी सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आलेले आहे.

          नमूना नं. 7 व 7 अ 7 ब  चे पाणीअर्जावर  मागणी  करुन पाणी अर्ज दिनांक 31 डिसेंबर, 2024 च्या आत संबंधीत उपविभागीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अगर पोस्टाने देण्याचे करावे. पुरेशी पाणी मागणी अर्ज प्राप्त झाल्याशिवाय आवर्तन सोडण्यात येणार नाही. असे कार्यकारी अभियंता वाघूर धरण विभाग जळगाव यांनी कळविले आहे. 

सिंचनाच्या पाणीपुरवठ्यासाठी खालील अटी व शर्ती राहतील.

खरप हगाम 2023-24 पर्यंतची संपुर्ण पाणीपट्टी थकबाकी भरणा केलेली असावी, भरणा उडाफयाचा नसावा, पाटमोट संबध नसावा, प्रत्येक चारीच्या मुखाजवळच्या क्षेत्रासच मंजूरी देण्यात येईल. उडाप्याचे व चारीच्या अथवा कालव्याच्या पुच्छ भागांतील क्षेत्रास मंजुरी देण्यात येणार नाही. प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रास मंजुरी दिली जाईल. प्रत्यक्ष पास मिळाल्या शिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये. पाणी अर्जाचा निर्णय संबंधित  पाटशाखेत / ग्रामपंचायतीत नोटीस बोर्डावर जाहीर केला जाईल. मंजुरी क्षेत्रावर मंजुर पिकासच पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा अथवा खाते पुस्तीका संबधीत पाटशाखेत दाखवावी लागेल. पाणी अर्ज स्विकारणेची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2024 नंतर वाढविली जाणार नाही. पाणीपुरवठा व्यवस्थित व सुरळीत होण्यासाठी शेतचाऱ्या स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. शेतचाऱ्या स्वच्छ ठेवणे व त्यांची देखभाल करणे ही शेतकऱ्यांची जबाबदारी आहे.

पिण्याचे पाण्याचे आरक्षण अथवा काही अपरिहार्य कारणास्तव मंजुरी पिकास पाणी पुरवठा न करता आल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यास हे खाते जबाबदार रहाणार नाही. रब्बी हंगाम व उन्हाळी हंगाम 2024-24 व त्या अगोदरची थकबाकी भरावी लागेल. असे कार्यकारी अभियंता, दे.पु.अग्रवाल  गिरणा पाटबंधारे  विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००००००००

Wednesday, 16 October 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -2024 जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू ; काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

                     जळगाव दि.17 ( जिमाका ) - भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 15 ऑक्टोंबर,  2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जळगाव जिल्हयात सुरु झालेली आहे. त्यामुळे या आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

            दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 व भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्देश यानुसार विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुपित करण्यावर बंदी घातलेली आहे.

        अशा प्रकारे ज्या राजकीय पक्ष उमेदवाराने खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स, भित्ती पत्रके, घोषणा, झेंडे, कापडी फलक, व चिन्ह इ. काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी.

       दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेन्ट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 अन्वये अशा प्रकारे मालमत्ता विद्रुपित केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीही शिक्षेस संबंधित इसम पात्र राहील.

                                                  00000000




00000000

दुचाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका

           जळगाव दि. 16 ( जिमाका )- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी

एमएच 19/ईएल-0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येत आहे.

ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी दि. 17 18 या दोन दिवसांपर्यंत दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज करावेत.या अर्जासोबत शासकीय शुल्काचा डीडी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे द्यावा शुल्क भरल्यावर 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी केल्यास भरलेले शुल्क हस्तांतरीत होणार नाही.नवीन मालिका दि. 22 ऑक्टोंबर, 2024 पासून नियमित सुरु करण्यात येईल. अधिक माहितीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

Tuesday, 15 October 2024

महिला व बालकल्याणकडून बालगृहातील बालकांच्या जैविक पालकाचा शोध ;मदतीचे आवाहन






        जळगाव दि. 15 ( जिमाका) –   बालगृहात दाखल झालेल्या सहा बालकांच्या पालकांचा शोध जिल्हा बालसंरक्षण कक्षामार्फत घेण्यात येत असून, पालक, नातेवाईक, माहितगारांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            जळगाव येथील मुला-मुलींचे बालगृहात दाखल बालके 1) मुस्कान अनिस अली (दाखल २३ जून, २०२३ रोजी भुसावळ रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत आढळून आली, 2) अफसाना राजू पठाण दाखल  2 मे, 2023 रोजी सुरत रेल्वे चाईल्ड लाईनला सुरत येथे बेवारस अवस्थेत आढळून आली, बालिका जळगाव जिल्ह्यातील असल्याने सुरतहून जळगाव येथे लोकेशनवर दाखल, 3) राधा देवा गायकवाड 4) रेश्मा देवा गायकवाड 5) अर्जुन देवा गायकवाड 6) करण देवा गायकवाड. हि बालके  अमळनेर पोलिस स्टेशन मार्फत 28 जुलै, 2022 रोजी बालगृहात दाखल झाली आहेत,

            हि बालके  जिल्हा महिला व बाल विकास काळजी आणि संरक्षणासाठी बालगृहात दाखल आहेत. या मुलांच्या पालक, नातेवाईक, व माहितगारांनी  आवाहन करण्यात आले आहे. त्यांनी बाल संरक्षण कक्ष जळगाव (भ्रमण ध्वनी क्र.- ७३५०४१४७६८) तसेच मुला- मुलींचे बालगृह जळगाव (भ्रमण ध्वनी क्र.८३०८४६२५९२) या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा प्रत्यक्ष भेट देऊन संपर्क साधण्याचे आवाहन, जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून करण्यात आले आहे.

००००००००


 

Monday, 14 October 2024

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडाळाच्या थकित कर्जदारांनी एकरक्कमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

                 जळगाव दि. 14 ( जिमाका ) –   महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, मर्यादितच्या जळगाव जिल्हा कार्यालयामार्फत विविध योजनेतंर्गत लाभार्थ्यांना व्यवसायाकरीता कर्ज वाटप करण्यात आले आहे. बहुतांश लाभार्थ्यांचा कर्ज परतफेडीचा कालावधी संपला असून कर्ज रक्कम थकीत आहे. अशा लाभार्थ्यांसाठी थकित कर्जाच्या व्याज दरात 50 टक्के सूट देवून कर्जखाते बंद करण्याची एकरकमी परतावा (One Time Settlement) राबविण्यात आली आहे. याचा अधिकाधिक थकबाकीदारांनी लाभ घ्यावा,

            असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, मर्यादित जळगाव कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

                                                                 0000000000

Friday, 11 October 2024

पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामामध्ये बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके

 जळगाव दि. ११ (जिमाका): राज्यात दरवर्षी बीजप्रक्रिया मोहीम क्षेत्रीय स्तरावर विना अनुदानित तत्वावर लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर राबविली जाते. या बीजप्रक्रिया मोहीमेस शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःकडील/घरगुती वापरण्यात येणाऱ्या बियाण्यास बीजप्रक्रिया करण्यास प्रोत्साहित करून बीजप्रक्रियायुक्त बियाण्याची जास्त प्रमाणावर पेरणी करणे व बियाण्याव्दारे पसरणारे जीवाणूजन्य/विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडींच्या प्रादुर्भावाला आळा घालणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

येत्या रब्बी हंगामामध्ये देखील क्रॉपसॅप सन २०२४-२५ प्रकल्पांतर्गत हरभरा, रब्बी ज्वारी, रब्बी मका, तसेच गहू, करडई, तीळ जवस या पिकांसाठी बीजप्रक्रिया प्रात्याक्षिके मोहीम राबविण्यात येत आहे.

 या मोहिमेंतर्गत बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके कृषी सहाय्यक यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये, प्रामुख्याने मागील ३ वर्षातील कीड रोग प्रवण क्षेत्रात (हॉटस्पॉट) राबविल्या जाणाऱ्या शेतीशाळेमध्ये राबविले जाणार आहेत.

गावाच्या संपूर्ण पिक क्षेत्रावर प्रक्रियायुक्त बियाणे लावण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे तसेच कृषी सहाय्याकांमार्फत त्यांच्या अधिनस्त असलेल्या गावांमध्ये बीजप्रक्रिया मोहीम यशस्वीपणे राबविली जाईल. याबाबत योग्य ते नियोजन व अंमलबजावणी करावी. बीजप्रक्रियेसाठी लागणारी रासायनिक व जैविक औषधे तसेच जैविक खते याबाबतच्या शिफारसी करतांना सहपत्र द्यावे, त्यानुसार बीजप्रक्रियेकरीता लागणाऱ्या निविष्ठांची गरज निश्चित करावी व लागणारी औषधे स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील याची खातरजमा करावी.

 या कार्यक्रमाच्या प्रगतीबाबतचा अहवाल दर आठवड्यास बीजप्रक्रिया मोहीम २०२४-२५ या नावाने उपलब्ध करून दिलेल्या गुगल स्प्रेडशीटवर अद्यावत करावा अशा सूचनाही कृषी सहायकांना देण्यात आल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

0000000

सर्व समावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना

             जळगाव दि. ११ (जिमाका):  महाराष्ट्र शासनाने राज्यातील शहरी व ग्रामीण युवक / युवतीसाठी वाढती संख्या व उद्योग/ व्यवसाय विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वंयरोजगार/रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवुन उद्योजकांना चालना देणारी सर्व समावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना 2019 सुरु केली आहे. ही योजना जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळ या कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे.

            कोणतेही स्थायी उत्पन्न नसलेले 18 ते 45 वर्ष वय असलेले अर्जदार यासाठी पात्र असणार आहे. यामध्ये अनु.जाती/जमाती/महिला/इतर मागास वर्ग/दिव्यांग/माजी सैनिक/विमुक्त व भटक्या जमाती/अल्पसंख्याक यांच्यासाठी 5 वर्ष शिथील करण्यात आले आहेत. 10 लाखावरील प्रकल्पासाठी 7 वी उत्तीर्ण , रु.25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने यापुर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वंयरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा ही अट बंधणकारक असणार आहे. यामध्ये उत्पादन उद्योगासाठी रु.50 लाख व सेवा उद्योगासाठी  रु.20 लाख पर्यंत अर्ज करता येणार आहे.

            या योजनेत अनु. जाती/जमाती/महिला/इतर मागास वर्ग/दिव्यांग/माजी सैनिक/विमुक्त व भटक्या जमाती/ अल्पसंख्याक या प्रवर्गातील अर्जदार शहरी भागासाठी बँकेने मंजुर केलेल्या प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के अनुदान व ग्रामीण भागासाठी 35 टक्के अनुदान त्यासाठी लाभार्थींना 5 टक्के स्वगुंतवणूक करावी लागणार आहे. उर्वरीत सर्व प्रवर्गातील अर्जदार हा शहरी भागासाठी 15 टक्के व ग्रामीण भागासाठी 25 टक्के अनुदानासाठी पात्र असेल. या लाभार्थींना 10 टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.

            या योजनेसाठी http://maha-cmegp.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करतांना अर्जदारास स्वत:चा फोटो, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला/डोमीसाईल प्रमाणपत्र, मार्कशीट, पॅन कार्ड, उद्योगाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, हमीपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र इ. कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.

            जिल्हयातील जास्तीत जास्त अर्जदारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगांव यांनी केले आहे.

00000

अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील 1760 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

 
















             जळगाव, दिनांक 11 ऑक्टोबर, 2024 (जिमाका वृत्त) : राज्य शासनाने अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मंजूर केला असून या निधीच्या माध्यमातून अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात केले.

 

            महिला व बाल विकास कार्यालयामार्फत आयोजित महिला मेळावा आज अमळनेर येथील प्रताप कॉलेज येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच महिला उपस्थित होत्या.

 

            मंत्री अनिल पाटील म्हणाले की,  राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. या योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेतून काही महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु केले असून त्यामधून रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

 

            आज अमळनेर येथे 1760 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन होत आहे. राज्य शासनाने पाडळसरे धरणाकरीता 4890 कोटी रूपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे येथील शेतीला बारामाही पाणी उपलब्ध होणार आहे. लोअर तापी प्रकल्प पाडळसरे अंतर्गत  उपसा सिचन योजना क्रमांक 1 ते 5 चे भूमीपूजन आज होत असून यामुळे 25 हजार 657 हेक्टर  जमीनीस पाईपद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे येथील  शेती सुजलाम सुभलाम होणार आहे.राज्य शासनाने अमळनेरच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला असून गावागावात रस्ते, सिंचन,बंधा-याचे काम होत आहे. पुर्वी अमळनेर मध्ये दहा  दिवसांनी पाणी पुरवठा होत होता. नगरोत्थान महाअभियान योजनेतंर्गत अमळनेर शहरवासीयांना आता 24 तास पाणीपुरवठा होणार आहे. असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

 

            खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, राज्य शासनाने महिलांना एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळ हे नफ्यात आले आहे. शेतीसाठी साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला असून त्यांचे वीज बिल शून्य झाले आहे. पाडळसरे धरणासाठी केंद्र सरकारमार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच येत्या एक दोन महिन्यात पाडळसरे प्रकल्प हा बळीराजा जलसंजिवनी योजनेत समाविष्ठ करण्यात येईल. गत दोन वर्षांत राज्य सरकारने अनेक विकास कामे केली असून जनसामान्यांच्या पाठीशी ऊभे राहणारे सरकार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

या विकास कामांचे झाले भूमिपूजन

 

        लोअर तापी प्रकल्प पाडळसरे, ता.अमळनेर जि.जळगाव अंतर्गत उपसा सिंचन योजना 1 ते 5 मध्ये 25 हजार 657 हेक्टर जमीन सिंचनासाठी पाईपद्वारे पाणी पुरवठा वितरण नेटवर्कचे पंप हाऊससह बांधकाम करणे रु. 1010.19 कोटी.

 

            नगरोत्थान महाअभियान योजनेतर्गत अमळनेर शहरवासियांना 24 तास पाणीपुरवठा योजना 197.00 कोटी

 

            राष्ट्रीय महामार्ग 39 ते जांभोरा ढेकू सारबेटे हेडावे अमळनेर शिरसाळे तरवाडे वावडे मांडळ रस्ता प्रजिमा 51 कि.मी  47.68 कोटी

 

            हायब्रीड अन्युटी अंतर्गत आमलाड- मोड- शहादा- सांगवी – हातेड अमळनेर पारोळा रस्ता  सुधारणा करणे 206.00 कोटी

 

            वावडे जानवे बहादरपूर पारोळा कासोदा रोड प्रजिमा 46 मि 14 ते 38/900 ची सुधारणा करणे 130 कोटी

 

            आपत्ती सौम्यीकरण कामे पूर प्रतिबंधक कामे, आर्च पुलाचे बांधकाम करणे, दुष्काळ प्रतिबंधक कामे अंतर्गत 110.54 कोटी

 

            मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास अंतर्गत 58.99 कोटी रस्ता कामांचे अशी एकूण 1760.40 कोटी रुपयांच्या कामांच्या भूमिपूजन श्री.पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

00000

Friday, 4 October 2024

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी असमान निधी योजनेसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

           जळगाव, (जिमाका) दि. 4 - भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील परिपूर्ण  प्रस्ताव 30 नोव्हेंबर, 2024 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन ग्रंथालय संचालक, अशोक गाडेकर यांनी  शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

             सन 2024-25 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक  ग्रंथालयांच्य सर्वांगिण विकासासाठी अर्थसहायच्या विविध योजना राबविण्यात येत असून, समान निधी योजनेत  इमारत बांधकाम व विस्तार,  तसेच असमान निधी  योजनेत ग्रंथालय सेवा देण्याऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ , साधन सामग्री, फर्निचर, इमारत बाधकाम व विस्तार, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी व आधुनिकीकरण करण्यासाठी, महोत्सवी वर्ष जसे 50, 60,75,100,125,150 वर्ष साजरे करण्यासाठी, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रमासाठी तसेच बाल ग्रंथालय व  राजा राममोहन रॉय ग्रंथालय   बाल कोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते.

          या योजनांचा लाभ घेण्यासंबंधीची माहिती, नियम अटी व अर्जाचा नमुना  प्रतिष्ठानच्या  www.rrrlf.gov.in या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  तसेच अधिक माहितीसाठी जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कार्यालय, येथे संपर्क साधून ग्रंथालयांनी वरील पैकी एका योजनेसाठीचा प्रस्ताव इंग्रजी व हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित  जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या  कार्यालयात 30 नोव्हेंबर, 2024 पर्यंत सादर करावे. असेही ग्रंथालय संचालक श्री अशोक गाडेकर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                   ००००००००००

जवाहर नवोदय विद्यालयातील नववी व अकरावीच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू

              जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : जवाहर नवोदय विद्यालयातील  नववी व अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. या  प्रक्रियेची शेवटची तारीख 30 ऑक्टोंबर, 2024 असून ही परीक्षा शनिवार 8 फेब्रुवारी, 2025 रोजी होईल. जिल्ह्यातील निर्धारित केलेल्या परीक्षा सदर परीक्षेचे माहिती पत्रक व प्रवेश अर्ज लिंक  https://cbseitms.nic.in/2024/nvsix. व 11 वी साठी https://cbseitms.nic.in/2024/nvsix.11/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

            सर्व संबंधितांनी माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचन करून नववी ते अकरावीमध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी या प्रवेश परीक्षेस ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी बी. आर. त्रिवेदी (9422797110), हर्षद पवार (9921297951) तसेच रामकुमार वर्मा संगणक शिक्षक  (8720062152) यांच्याशी सपर्क साधण्याचे आवाहन, प्राचार्य श्री. खंडारे यांनी केले आहे.

0000000000

जिल्हाधिकारी कार्यालयात 7 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

       जळगाव दि. 4 ( जिमाका ) –  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ऑक्टोंबर महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 7 ऑक्टोंबर, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे.  

            जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

0000000

Thursday, 3 October 2024

जळगाव एमआयडीसीला डी प्लस दर्जा देणार ; उद्योग भवनसाठी 23 कोटी तर ट्रक टर्मिनन्ससाठी 13 कोटी मंजूर - उद्योगमंत्री उदय सामंत ▪ "चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठीची प्रक्रिया सुरु करणार ▪ उद्योगमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांच्या सर्व मागण्या पूर्ण

 










       जळगाव दि. 3 ( जिमाका ) जळगाव एमआयडीसीचा 'डी'दर्जा उन्नत करून 'डी प्लस' दर्जा तात्काळ देण्यात येणार असून उद्योग भवनसाठी 23 रुपये तर ट्रक टर्मिनन्ससाठी 13 कोटी रुपये मंजूर केले असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्याचेही उद्योगमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

             छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे आयोजित खान्देश विभागस्तरीय 'महाराष्ट्राची उद्योग भरारी ' या कार्यक्रमात बोलत होते.

             यावेळी राज्याचे ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ.सुरेश (राजूमामा ) भोळे, आ. किशोर पाटील, आ. लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, मुख्य अभियंता राजेंद्र गावडे, प्रादेशिक अधिकारी, धुळे दिगंबर पारधी, प्रादेशिक अधिकारी, जळगाव सुनील घाटे उपस्थित होते.

            जळगाव मध्ये जे उद्योग भवन उभं राहणार आहे, त्यात एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय असावे ही पालकमंत्री यांची मागणी मान्य केली असून दोन दिवसात त्याचा लेखी आदेश निघेल. हे प्रादेशिक कार्यालय आठवड्यातले दोन दिवस जळगाव जिल्ह्यातील उद्योग, उद्योजक यांच्या अडीअडचणी जाणून त्याची सोडवणूक करेल अशी माहिती उद्योगमंत्र्यांनी यावेळी दिली.

             चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे सांगून जळगाव जिल्ह्यात चोपडा आणि पाचोरा या दोन तालुक्याला नवीन एमआयडीसी, जळगावला विस्तारीत एमआयडीसीला मंजूरी दिल्याचे सांगितले.त्याच बरोबर आपण उद्योग मंत्री झाल्याबरोबर राज्यात उद्योजकांचे थकलेल्या प्रोत्साहन निधी पोटी 2 हजार 400 कोटी रुपये दिले असून आज पर्यंत जवळपास 3 हजार कोटी पेक्षा अधिकचा प्रोत्साहन निधी दिल्याचे सांगितले.

स्थानिक उद्योगजकांची 96 हजार कोटीची गुंतवणूक

 राज्यात गेल्या दोन वर्षात उद्योगात 4.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आहे. राज्यात स्थानिक उद्योजकांनी त्यांच्या उद्योग विस्तारासाठी 96 हजार कोटी रुपये एवढी गुंतवणूक केली आहे. त्यातून 85 हजार रोजगार निर्माण झाले असल्याचे उद्योगमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली विश्वकर्मा ही अत्यंत महत्वाकांक्षी योजनेचा कार्यक्रम पंतप्रधानांच्या उपस्थित झाला. त्यावेळी संपूर्ण देशातून सर्वात अधिक 11 लाख 50 हजार नोंद आपल्याला राज्यातून झाली.

             उद्योगमंत्र्यांनी आपण कलेल्या मागण्या मान्य केल्याचे    सांगून जळगाव जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासाठी टेक्सटाईल पार्क द्यावा जेणे करून इथल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्याच बरोबर केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग इथं व्हावेत अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. चोपडा, पाचोरा, आणि जळगावला विस्तारित एमआयडीसी दिल्या बद्दल जळगाव जिल्ह्याच्या वतीने उद्योगमंत्र्यांचे आभार मानले.

             उप मुख्यकार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांनी  'महाराष्ट्राची उद्योग भरारी ' या कार्यक्रमा मागची भूमिका विशद करुन. राज्यातील उद्योग विभागाच्या कामकाजाचा आढावा आपल्या प्रास्ताविकात दिला. यावेळी स्थानिक उद्योगात चमकदार कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा गौरवही करण्यात आला.

000000000