Thursday, 19 June 2025

मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू- शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

 जळगाव दि. 19  जून (जिमाका वृत्तसेवा) :– प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी मृग बहार हंगामाकरिता पुर्नरचित हवामान आधारित फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत चिकू, डाळींब, पेरू, मोसंबी, लिंबू व सिताफळ या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई या संस्थेमार्फत महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबविली जाणार आहे.

                 जिल्ह्यातील हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांना वारंवार नुकसान सहन करावे लागते. अशा स्थितीत हवामानाशी संबंधित धोके , जास्त पाऊस, पावसाचा खंड, तापमानातील चढ-उतार आदी , यांपासून संरक्षण देणारी ही विमा योजना ठरणार आहे. शेतकऱ्यांनी फळपिकांच्या मृग बहारासाठी या योजनेत सहभागी होणे ऐच्छिक असून कर्जदार व बिगरकर्जदार दोघेही यात भाग घेऊ शकतात. 

              या योजनेत पिक कर्ज घेण-या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग होण्यासाठी ऐच्छिक राहील. अधिसुचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज (उदा. मोसंबी व डाळीब) करता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकाकरिता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस आधी पर्यंत संबंधित बँकेस त्याअनुषंगाने विमा हप्ता कपात न करणे बाबत कळविणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी संबंधित बँकेस कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येणार आहे.

            विमा संरक्षित रक्कम व हप्ता यांच्या तपशीलात पेरू पिकासाठी 70,000 रुपये प्रतिहेक्टर इतकी विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना 3,500 रुपये इतका हप्ता भरावा लागेल. या पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 असून वाढीव मुदत 30 जून 2025 पर्यंत आहे. मोसंबी पिकासाठी 100000  रुपये विमा संरक्षित रक्कम असून हप्ता 5000 रुपये आहे, अंतिम मुदत 30 जून 2025 आहे. चिकूसाठी 70000 रुपये रक्कम असून 6300 रुपये हप्ता आकारण्यात आला आहे, अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जून आहे. डाळींब पिकासाठी 160000 रुपये विमा संरक्षण असून हप्ता 8000 रुपये निश्चित करण्यात आला आहे. अंतिम मुदत 14 जुलै 2025.  सिताफळ पिकासाठी सर्वाधिक रुपये विमा संरक्षित रक्कम 70000 असून हप्ता 3500 रुपये आहे. या पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 निश्चित करण्यात आली आहे. लिंबू पिकासाठी सर्वाधिक रुपये विमा संरक्षित रक्कम 80000 असून हप्ता 4000 रुपये आहे. या पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 असून वाढीव मुदत 30 जून 2025 पर्यंत आहे.

         जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  कुरबान तडवी यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे तसेच ई-पिक पाहणी व Agristack नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

                                                                    0000000000000

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा जळगाव दौरा

      जळगाव दि. 19  जून (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा शुक्रवार दिनांक 20 जून, 2025 रोजी जळगाव जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.

रात्री 01.23 वाजता विदर्भ एक्सप्रेसने रेल्वे स्थानक, जळगाव येथे आगमन व मोटारीने खाजगी निवासस्थान, जामनेर, जि. जळगाव कडे प्रयाण.  रात्री 02.00 वाजता जामनेर येथे आगमन व राखीव.

                                                                    000000000

Tuesday, 17 June 2025

मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतिगृह भुसावळ येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भुसावळ जि. जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

             या वसतिगृहात इयत्ता ८ वी ते महाविद्यालयीन तसेच तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या आणि जळगाव शहरात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.-भ.ज., विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील गरजू विद्यार्थिनींना प्रवेश घेता येणार आहे.

              प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा आणि त्याची प्रत वसतिगृह कार्यालयात सादर करावी, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.

               वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य यांसह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी ₹४०००/- रोख रक्कम व दरमहा ₹५००/- निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, शासकीय वसतिगृह भुसावळ यांनी केले आहे.

                                                                 00000000000

शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

             जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा)  शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग समिश्र निवासी केंद्र , जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२५ आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश नोंदणी १५ जुलै २०२५ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात करावी, असे आवाहन केंद्राचे अधीक्षक यांनी केले आहे.

                   या केंद्रात शासनामार्फत मोफत भोजन, निवास, गणवेश, अंथरूण-पांघरूण, पाठ्यपुस्तके, शालेय साहित्य, औषधोपचार, तसेच शालेय व कलाशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. उमेदवार अंध, कर्णबधिर किंवा अस्थिव्यंग पैकी एका प्रकारच्या अपंगत्वाचा असावा. एकापेक्षा अधिक प्रकारचे अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही. उमेदवार संसर्गजन्य आजारमुक्त असावा

                    अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांचे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र (मूकबधिरांसाठी श्रवणालेख आवश्यक), जन्म दाखला, आधार कार्ड, UDIID कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, दिव्यांगत्व स्पष्ट दिसणारे उमेदवाराचे ५ फोटो, बँक पासबुकची झेरॉक्स यांचा सामावेश आहे.  योग्य पात्रता असलेल्या इच्छुकांनी वरील सर्व कागदपत्रांसह लिहून दिलेला अर्ज कार्यालयात सादर करावा, असे आवाहन केंद्राच्या अधीक्षकांनी केले आहे.

00000000000

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह भुसावळ येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

             जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संचलित मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह भुसावळ जि. जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

             या वसतिगृहात इयत्ता ८ वी ते महाविद्यालयीन तसेच तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या आणि जळगाव शहरात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.-भ.ज., विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील गरजू विद्यार्थिनींना प्रवेश घेता येणार आहे.

              प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा आणि त्याची प्रत वसतिगृह कार्यालयात सादर करावी, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.

               वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य यांसह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी ₹४०००/- रोख रक्कम व दरमहा ₹६००/- निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.

त्यामुळे विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, शासकीय वसतिगृह भुसावळ यांनी केले आहे.

00000000000

मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतिगृह बोदवड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

         जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) –  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बोदवड (जळगाव) येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

             या वसतिगृहात इयत्ता ८ वी ते महाविद्यालयीन तसेच तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या आणि जळगाव शहरात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.-भ.ज., विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील गरजू विद्यार्थिनींना प्रवेश घेता येणार आहे.

              प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा आणि त्याची प्रत वसतिगृह कार्यालयात सादर करावी, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.

               वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य यांसह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी ₹४०००/- रोख रक्कम व दरमहा ₹५००/- निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.

त्यामुळे विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, शासकीय वसतिगृह बोदवड यांनी केले आहे.

0000000000

शाळा प्रवेश उत्सव: आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणास नवीन चालना

 



            जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय अशोक उईके यांच्या ‘शिक्षणाद्वारे सक्षमीकरण’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना, आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत दिनांक १६ जून रोजी भव्य शाळा प्रवेश उत्सव आयोजित करण्यात आला. हा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नव्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.

५१ आश्रमशाळांमध्ये एकाच दिवशी उत्सवाचे आयोजन

                  यावल प्रकल्पाअंतर्गत एकूण १७ शासकीय व ३४ अनुदानित आश्रमशाळांमध्ये एकाच दिवशी हा उत्सव साजरा करण्यात आला. एकूण २६,६४० विद्यार्थ्यांपैकी १४,६३६ विद्यार्थी (५४.९४%) शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित राहिले. यामध्ये शाळांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

                 उत्सवाच्या दिवशी चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी शासकीय आश्रमशाळा, विष्णपूर (ता. चोपडा) येथे भेट दिली. तसेच रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी डोंगरकठोरा (ता. यावल) येथील आश्रमशाळेला भेट देत पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत पालकांना मुलांना सतत शाळेत उपस्थित ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

  प्रधानमंत्री  धरती अबा जनजाती उन्नतग्राम अभियानाचा शुभारंभ

            याच दिवशी प्रधानमंत्री धरती आबा जनजाती उन्नतग्राम अभियान योजनेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने प्रत्येक शाळेत लोकप्रतिनिधी व पालकांच्या उपस्थितीत माहिती व प्रचार-प्रसाराचे कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच 'मुलांच्या शिक्षणात पालकांची सहभागिता' या विषयावर चर्चा सत्र घेण्यात आले. यामध्ये पालकांना विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

 विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

            शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे फुलांचा हार, मिठाई, भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पाठ्यपुस्तक, गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शाळेचा परिसर फुलांनी सजवून रंगीत पताका, रांगोळ्या व स्वागत फलकांनी सजविण्यात आला होता. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक गाणी, स्वागत गीत यांचीही रंगतदार मेजवानी अनुभवायला मिळाली.

प्रशासकीय यंत्रणेचा काटेकोर समन्वय

            प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी या कार्यक्रमाचे नेतृत्व करताना सांगितले की, "हा उत्सव केवळ एक औपचारिक उपक्रम नसून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षणाची ग्वाही देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे." यावेळी विशेष उपस्थिती वाढवण्यासाठी पुढील काळात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची घोषणा करण्यात आली.

             या शाळा प्रवेश उत्सवाच्या यशामध्ये प्रत्येक स्तरावरील कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडली, तर शिक्षण विस्तार अधिकारी यांनी विविध शाळांमध्ये समन्वय साधून आवश्यक बाबींची पूर्तता केली. मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांतील कार्यक्रमांचे नेतृत्व करत संपूर्ण आयोजनाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली. याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व पालकांशी संवाद साधण्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छता, शैक्षणिक साहित्य वितरण व व्यवस्थापनाची शिस्तबद्ध जबाबदारी अत्यंत कौशल्याने पार पाडली. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हा उत्सव प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्वच्छता, साहित्य वाटप व शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे कार्य उत्तमरीत्या पार पाडले.

आगामी नियोजन

            शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी विशेष प्रवेश अभियान, नियमित पालक-शिक्षक संवाद, आणि शैक्षणिक साधनांची उपलब्धता वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळा प्रवेश उत्सवाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दिशेने एक सकारात्मक आणि शक्तिशाली सुरुवात झाली आहे.

                                                                         00000000000

जळगावमध्ये योग मास्टर ट्रेनिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४० क्रीडा शिक्षकांचा सहभाग ▪ 21 जूनला जागतिक योगा दिनाची तयारी सुरु





         जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा)आंतरराष्ट्रीय योग दिन (२१ जून) निमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आज योगा मास्टर ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील विविध भागांतील सुमारे ४० क्रीडा शिक्षकांनी सहभाग नोंदवला.

                    या प्रशिक्षणामध्ये केंद्रीय आयुष मंत्रालयाने प्रसारित केलेल्या योगा प्रोटोकॉलनुसार शाळांमध्ये योग सत्र कसे राबवावे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष योगासनांचे प्रात्यक्षिक आणि सराव सत्र घेण्यात आले.

                 या  प्रशिक्षण सत्राचे मार्गदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या योग क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी यांनी केले. प्रशिक्षणादरम्यान उपस्थित शिक्षकांनी योगाचे महत्त्व, त्याचे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम आणि नियमित सरावाचे फायदे यावर चर्चा केली.

०००००००००००

Monday, 16 June 2025

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

             मुंबई, दि 16 : 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते.

            1 जून ते 16 जून दरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 1 टक्का कमी, मराठवाड्यात 26 टक्के कमी, आणि विदर्भात 61 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 134 तालुक्यांमध्ये एकूण पाऊस 65 मिलीमीटर हून अधिक पडला आहे आणि 84 तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट लक्षणीय आहे.

            22 जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांमध्ये 22 तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही. 

अद्यापि ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

००००००००००

दिव्यांग सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार 2025 करिता अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. १६ जून (जिमाका वृत्तसेवा): भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली यांच्यातर्फे वर्ष २०२५ करिता दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी १५ मे २०२५ ते १५ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून, www.awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

             या पुरस्कारांकरिता अर्ज सादर करताना पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यानुसार सर्व आवश्यक माहिती सादर करणे बंधनकारक आहे. अर्जामध्ये संबंधित व्यक्ती किंवा संस्थेच्या उल्लेखनीय, प्रेरणादायी कार्याचा तपशील स्पष्टपणे नमूद करावा. त्याचप्रमाणे, कामगिरीशी संबंधित सहाय्यक दस्तऐवजही ऑनलाईन स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे.

              पात्रता निकष, कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती www.awards.gov.in किंवा www.depwd.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. भौतिक स्वरूपात किंवा इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

                या राष्ट्रीय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्तींनी, संस्था, स्वयंसेवी संघटनांनी वेळेत अर्ज सादर करून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000000000

 

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात...!! विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ व टाळ्याच्या गजरात स्वागत; खासदार, आमदार यांचा उत्स्फूर्त सहभाग ▪ जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यासह अधिकारी सहभागी










             जळगाव दि. १६ जून (जिमाका वृत्तसेवा):- राज्य शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६’ उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील १८६० जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगर परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ आज उत्साहात झाला. सर्व शाळांमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ देऊन, टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. खा. स्मिता वाघ, आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवत वातावरण आनंदमय केले.

            अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. गणवेश, शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

            चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत अडावद कन्या व अडावद मुले शाळांमध्ये तर पारोळा तालुक्यातील कन्हेरे शाळेत आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून गणवेश पाठयपुस्तकं देण्यात आली.

            जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जामनेर तालुक्यातील भराडी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके वितरित केली.

            मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी नांद्राबु. व पिलखेडे शाळांमध्ये गुलाबपुष्पांनी स्वागत करून पाठ्यपुस्तके वाटप केले. पिलखेड येथे "ग्रंथ दिंडी" चे आयोजनही करण्यात आले.

भुसावळ येथे तहसीलदार नीता लबडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

            निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी शिरसोली प्र. बो. येथील शाळेला भेट दिली, नगर प्रशासनाचे सहायक आयुक्त जनार्दन पवार वडगाव लांबे (चाळीसगाव) शाळेत, तर सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भुषण वर्मा पी.एम. श्री नानासाहेब विष्णु हरी पाटील विद्यामंदिरात सहभागी झाले. चोपड्याचे मुख्याधिकारी राहुल पाटील व जामनेरचे विवेक धांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी (उर्दू शाळा, चोपडा ), उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार (जिराळी), जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील विदगाव (ता. जळगाव),नायब तहसीलदार रविंद्र उगले (महिंदळे), मुख्याधिकारी रविंद्र लांडे (गिरड), निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनवणे (भडगाव शाळा क्र. २), जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक (गारखेडे खु.) आणि तहसीलदार विजय बनसोड (पाचोरा) यांच्या सह जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी  विविध शाळांना  उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले,विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

            या शाळा भेटींमुळे ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण झाले असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि शाळेविषयी आकर्षण निर्माण झाले आहे.

००००००००

पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल "मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या!"– पालकमंत्री गुलाबराव पाटील ▪पुष्पवृष्टी, स्वागतगीत, पुस्तके-वह्यांचे व दप्तरांचे वाटप ▪इयत्ता पहिलीच्या वर्गाच्या उद्घटनाने पहिला दिवस स्मरणीय












             जळगाव दि. १६ जून ( जिमाका वृत्तसेवा ) – "माझ्यासह माझी मुलेही याच शाळेत शिकलेली आहेत, हे सांगताना मला अभिमान वाटतो. शाळेचा पहिला दिवस फक्त वह्या-पुस्तकांचा नसतो, तर तो नव्या स्वप्नांचा शुभारंभ असतो. मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या. शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून ती संस्कारांची पाठशाळाही आहे. शिक्षक, पालक आणि अधिकारी यांनी समन्वयाने मुलांमध्ये विश्वास व स्वाभिमान रुजवायला हवा. मी बैलगाडीतून आलो कारण शिक्षणाच्या प्रवासाला मातीचा गंध असतो... आणि त्या गंधातच खरी समृद्धी असते," अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हा परिषद केंद्र शाळा, पाळधी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या भावस्पर्शी आणि प्रेरणादायी उपस्थितीने एक वेगळीच शैक्षणिक आठवण विद्यार्थ्यांच्या मनात कोरली.

            इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खुद्द पालकमंत्र्यांनी बैलगाडी चालवत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत मिरवणूक काढली. त्यांनी जुन्या शाळेतील आठवणींना स्नेहपूर्वक उजाळा दिला. पुष्पवृष्टीत आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात हात घालून शाळेत प्रवेश केला. शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केले, हे विशेष!

या शाळा प्रवेशोत्सवाचे ठळक वैशिष्ट्ये

बैलगाडीतून आगमन – शिक्षणाच्या प्रवासाला ग्रामीण मातीचा गंध देणारा अनोखा उपक्रम

पहिलीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट, दप्तर, गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत

पालकमंत्री तब्बल दोन तास विद्यार्थ्यांमध्ये रमले – जीवनदृष्टीचे बळ दिले

पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन – विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नव्या पर्वाला सुरुवात

पालकमंत्र्यांतर्फे दीड लाख वह्यांच्या वितरणाचा – औपचारिक शुभारंभ

     गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित होत असलेले बदल व त्या अनुषंगाने असलेली जबाबदारी यांची जाणीव करून दिली आणि नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, नवीन सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता पहिलीचा वर्ग सुरू झालेला असून, ही शाळा एक मॉडेल शाळा आहे.

     सूत्रसंचालन उपशिक्षक झाकीर सर आणि उपशिक्षिका ज्योती राणे यांनी केले. आभार सरपंच विजय पाटील आणि मुख्याध्यापक एन. के. देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने झाली. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तीनही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अथक परिश्रम घेतले.

मान्यवरांची उपस्थिती

    माजी सभापती मुकुंदजी नन्नवरे, सरपंच विजय पाटील, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, प्रकल्प अधिकारी सुरेखा तायडे, उपसरपंच वंदना साळुंखे, मच्छिंद्र कोळी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सचिन पवार, माजी सरपंच आलिम देशमुख, माजी जि.प. सदस्य श्रीकृष्ण साळुंखे, निसार देशमुख, यासीन हाजी, जमील बेग, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय महाजन, सुनील झंवर, केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, ग्राम विकास अधिकारी शरद धनगर, सुलतान पठाण, तसेच तीनही शाळांचे मुख्याध्यापक – एन. के. देशमुख, अकिल सर, श्रीमती पटेल जहाआरा, मधु साळुंखे, अकबर शेख, यांच्यासह शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००००००

Tuesday, 3 June 2025

मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या उपस्थितीत ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’चा पारितोषिक वितरण संपन्न कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणे गरजेचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'क्लिन प्लांट’कार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्र महाराष्ट्रात उभारणार- केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान


            पुणे, दि. : वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रासमोर अनेक समस्या असताना शेतकऱ्याला साहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एकमात्र उपाय आहे. पुणे ॲग्री हॅकॅथॉनमधील उपयुक्त तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन करणे आणि हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            पहिल्या ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’च्या पारितोषिक वितरण आणि समारोप सभारंभात ते बोलत होते. कृषी महाविद्यालय येथील सिंचन नगर मैदानावर आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आदी उपस्थित होते.

             मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शेतीचा उत्पादन खर्च वाढतो आहे आणि त्यासोबत शेतीसाठी आवश्यक पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत उन्नत तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्वाचे आहे. हॅकॅथॉनमध्ये मांडलेले तंत्रज्ञान  शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जलसिंचन, पीक काढणी, पिकांवर फवारणीचे तंत्रज्ञान, एआय कंन्ट्रोल रोव्हर्स, कीड व्यवस्थापनात मशिन लर्निंगचा उपयोग, शेल्फ लाईफ वाढविणारे ड्रायर्स, शेतमालाचे प्राण्यांपासून संरक्षण, काढणी पश्चात प्रक्रियेचे तंत्रज्ञान आदी उत्कृष्ट प्रकारचे तंत्रज्ञान इथे मांडण्यात आले आहे. हे उपाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचे उत्तम उत्पादनात रुपांतर करून ते बाजारापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन कृषी महाविद्यालयांमध्ये इन्क्युबेशन केंद्रे तयार करावीत आणि या तंत्रज्ञानांचे व्यावसायिक उत्पादनाच्या रुपात विकसीत करून शेतकऱ्याला लाभ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

'क्लिन प्लांट' इनिशिएटीव्ह आणि क्रॉप कव्हरसाठी प्रयत्न

            मुख्यमंत्री म्हणाले, देशाच्या फलोत्पादन निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या क्लिन प्लांट इनिशिएटीव्हमधील अधिकधिक केंद्र महाराष्ट्राला द्यावे. वातावरण बदलामुळे कृषी क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने असे केंद्र शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर भाज्या आणि फळांच्या नुकसानीपासून शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी क्रॉप कव्हर असणे गरजेचे आहे. केंद्र आणि राज्य शासन मिळून क्रॉप कव्हरच्या क्षेत्रात योजना आणता आली तर राज्य सरकारची सकारात्मक भूमिका राहील.

हॅकॅथॉनमधील तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

            कृषी विभागाने राज्यातील विविध भागात असे हॅकॅथॉन आयोजित करावे अशी सूचना करून श्री.फडणवीस म्हणाले, देशातील सर्वाधिक ३० ते ३२ टक्के स्टार्टअप्स कृषी क्षेत्राशी निगडीत आहे आणि त्यातील सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. विविध कृषी आधारित स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी ॲग्री हॅकॅथॉनसारख्या उपक्रमाची गरज आहे. कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील ही क्रांती अशाचप्रकारे पुढे नेली तर शेती क्षेत्रातील प्रश्न दूर करून शेती उत्पादकता वाढवून शेतकऱ्याच्या फायद्याची शेती करता येईल. पुणे ॲग्री हॅकॅथॉनमध्ये प्रदर्शित शेती क्षेत्रातील बदल परिसरातील शेतकऱ्यांना दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले.

’क्लिन प्लांट’ कार्यक्रमांतर्गत सर्वाधिक केंद्र महाराष्ट्रात-केंद्रीय कृषी मंत्री श्री.चौहान

            केंद्रीय कृषीमंत्री श्री.चौहान म्हणाले,  महाराष्ट्र हे देशातील फलोत्पादनाचे मुख्य केंद्र आहे. इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या परिश्रमाने आणि नाविन्यपूर्ण कल्पना राबवून या क्षेत्रात प्रगती केली आहे. फलोत्पादनासाठी रोपवाटीकेतून मिळणारे रोप रोगमुक्त असावे आणि शेतकऱ्यांना लाभ देणारे असावे यासाठी ‘क्लिन प्लांट’ कार्यक्रम देशात राबविण्यात येईल. शेतकऱ्यांची गरज आणि क्षमता लक्षात घेवून देशात यासाठी ९ केंद्रे उभारण्यात येतील आणि त्यातील ३ केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यात येतील. द्राक्षाचे केंद्र पुणे येथे, संत्र्यासाठी नागपूर येथे आणि डाळींबासाठी सोलापूर येथे सुरू करण्यात येईल. त्यासाठी एकूण ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येतील. या कार्यक्रमांतर्गत आधुनिक रोपवाटीका उभारण्यात येतील आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना चालविण्यासाठी या रोपवाटिका देण्यात येतील. मोठ्या रोपवाटिकेसाठी ३ कोटी रुपये आणि मध्यम आकाराच्या रोपवाटिकेसाठी दीड कोटी रुपये देण्यात येतील. यातून दरवर्षी ८ कोटी रोगमुक्त रोपे शेतकऱ्यांना मिळतील. या केंद्राच्या आधारे महाराष्ट्राचे फलोत्पादन क्षेत्र जगात आघाडी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृषी वैज्ञानिक आणि शेतकऱ्यांच्या समन्वयातून नवी कृषी क्रांती शक्य

            शेतकऱ्याची शेती लाभाची शेती करण्यासाठी उत्पादन वाढवावे लागेल, उत्पादन खर्च कमी करावा लागेल. नैसर्गिक आपत्तीत कृषी मालाच्या संरक्षणासाठी उपाय करावे लागतील. देशातील अनेक प्रयोगशाळेत या संदर्भात संशोधन करण्यात येत आहे. हे संशोधन शेतीच्या बांधापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. देशातील १६ हजार कृषी वैज्ञानिक आणि शेतकरी यांचा समन्वय झाल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. अनेक शेतकरी स्वत: नवे प्रयोग करून उत्पादकता वाढवित आहे. अशा शेतकऱ्यांचा देशपातळीवर सन्मान करण्यात येईल. उपक्रमशील, प्रगत शेतकरी आणि कृषी महाविद्यालय एकत्र आल्यास शेती क्षेत्रात वेगाने प्रगती होऊ शकेल. ॲग्री हॅकॅथॉनच्या माध्यमातून या दिशेने चांगला प्रयत्न करण्यात आला आहे. शेतीत अनेक नव्या संधी असून नव्या पिढीने नवतंत्रज्ञान आणि स्वत:च्या बुद्धीमत्तेचा उपयोग करीत या क्षेत्रात नवे स्टार्ट अप सुरू करावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांनी वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर चांगले उत्पादन देणारे वाण उपयोगात आणण्याचा विचार करावा, असेही श्री.चौहान म्हणाले.

अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान शेताच्या बांधापर्यंत पोहोचवा-उपमुख्यमंत्री श्री.पवार

            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले,  देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे कार्य शेती क्षेत्राने केले. त्यामुळे या क्षेत्राला बळ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अलिकडच्या काळात निसर्गाचा असमतोल, मनुष्यबळाची कमतरता, वाढता खर्च, पाण्याची उपलब्धता आदी कृषी क्षेत्रासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे कमी खर्चात आणि वेळेत जास्त उत्पादन देणारे तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवावे लागेल. शेतकऱ्यांच्या फायदेशीर शेतीला दिशा देण्याचे कार्य पुणे ॲग्री हॅकॅथॉनने केले आहे. यापुढील काळात विविध ठिकाणी असे उपक्रम राबविण्यात येतील. हॅकॅथॉनमध्ये नवे तंत्रज्ञान, नव्या कल्पना मांडण्यात आल्या. हे नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचे कार्य शासन, कृषी विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, शेती सर्वांनी मिळून करायचे आहे. हॅकॅथॉनमध्ये विजेत्यांनी सादर केलेल्या तंत्रज्ञानाच्या वापरात सातत्य ठेवावे, शेतकऱ्यांशी नाते जोडून नवनवे प्रयोग करावे, असे आवाहन त्यांनी केले.

            पुणे महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी आहे. कृषी क्षेत्रालाही गती आणि दिशा देण्याचे कार्य पुण्याने केले आहे. अनेक संशोधक आणि नव्या कल्पना राबविणारे शेतकरी या परिसरात आहेत, त्यांचा राज्याच्या कृषी प्रगतीत मोठा वाटा आहे. पुण्याच्या कृषी प्रगतीचा पाया चारशे वर्षापूर्वी राजमाता जिजाऊ यांनी बाल शिवाजी महाराजांच्या हस्ते सोन्याचा नांगर चालवून घातला. तिथून सुरू झालेला कृषी प्रगतीचा प्रवास कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरापर्यंत पोहोचला आहे. यात अनेकांचे योगदान आहे. पुणे ॲग्री हॅकॅथॉन हा त्यातील महत्वाचा टप्पा आहे. या उपक्रमात देशाच्या विविध भागातून प्रतिनिधी आले आहेत. साडेपाचशे स्पर्धकांनी अर्ज केले होते, त्यापैकी सव्वाशे स्पर्धकांना संधी देण्यात आला. यापुढे सर्व स्पर्धकांना संधी देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

            प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डुडी यांनी आयोजनामागची भूमिका मांडली. ॲग्री हॅकॅथॉन अंतर्गत कृषी क्षेत्रातील निगडीत विविध विषयांचा समावेश करण्यात आला. हा उपक्रम राबविताना नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी विविध संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले विद्यार्थी, नवउद्यमी या उपक्रमात सहभागी झाले आणि शेती क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधण्यात आले आहे. या माध्यमातून एक लाख शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. कृषी क्षेत्रातील हा अभिनव उपक्रम असून कृषी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी हे उत्तम व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            यावेळी सुपर ज्युरी, ज्युरी टीम आणि नॉलेज पार्टनर संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुणे ॲग्री हॅकॅथॉन मध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप, नवोद्योजक आणि उपक्रमशील शेतकरी यांना कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता,  मृदा, सिंचन आणि मृदा आरोग्य व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, फर्टीगेशन आणि रोग कीड व्यवस्थापन, पीक काढणी उत्तर तंत्रज्ञान आणि अवशेष व्यवस्थापन, कृषी अर्थशास्त्र बाजार जोडणी, इतर कोणतीही नवकल्पना या विभागातील विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.

            कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबाने, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक संदीप खोसला, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक संजय वाघ, नेचर ग्रुप इस्रायलचे चेतन डेडिया आदी उपस्थित होते.

0000000000

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्याकडून कृषी फीडर प्रकल्पाचा आढावा : कामांना गती देण्याचे दिले निर्देश


            जळगाव, दि. ३ जून (जिमाका वृत्तसेवा): - केंद्र शासनाच्या पुनर्रचना वितरण क्षेत्र योजना (RDSS) अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कृषी फीडर विभक्तीकरण प्रकल्प प्रगतीचा आढावा आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला.

            या बैठकीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महावितरणचे मुख्य अभियंता विनोद पाटील, पायाभूत आराखडा विभागाचे मुख्य अभियंता मनोज विश्वासे, सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश महाजन तसेच विविध जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

 

            या वेळी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा, कामांची टक्केवारी, अंमलबजावणीत येणाऱ्या अडथळ्यांबाबत तसेच तालुकानिहाय कामांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा झाली.

प्रगतीस गती द्या, अडथळ्यांवर तात्काळ उपाय करा

 राज्यमंत्री खडसे यांनी स्पष्ट शब्दांत निर्देश दिले की, चालू कामांना अधिक गती द्यावी,

            अंमलबजावणीतील अडथळ्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात,स्थानिक प्रशासन, महावितरण व जनप्रतिनिधी यांच्यात समन्वय वाढवावा,आणि निश्चित वेळेत प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा. त्यांनी नमूद केले की, या योजनेमुळे शेतीसाठी वेळेवर आणि योग्य दाबाने वीज मिळाल्याने उत्पादनात वाढ होईल आणि शेती फायदेशीर ठरेल.

            यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले.

     बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रगती अहवाल सादर करत उर्वरित कामांसाठी कालबद्ध आराखडा मांडला. प्रत्येक तालुक्यातील अडथळ्यांवर उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.

    या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना निश्चित वेळेत आणि अखंड वीजपुरवठा शक्य होणार असून शेतीला चालना मिळेल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

00000000

"छत्रपती शिवाजी महाराज सर्किट"द्वारे इतिहास, श्रद्धा आणि शौर्याचा संगम – एक प्रेरणादायी पर्यटन अनुभव - केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे

 




           जळगाव, दि. ३ जून २०२५ (जिमाका वृत्तसेवा): - भारतीय पर्यटन रेल्वे च्या 'भारत गौरव टुरिस्ट ट्रेन' अंतर्गत "छत्रपती शिवाजी महाराज सर्किट" ही विशेष रेल्वे यात्रा ९ जून २०२५ पासून सुरू होत असून, स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासात डोकावण्याची ही एक अद्वितीय संधी आहे. सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले आहे.

    या ऐतिहासिक उपक्रमाच्या नियोजनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

    मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून या सहलीस प्रारंभ होणार असून, ५ रात्री ६ दिवसांच्या कालावधीत रायगड, लाल महाल, शिवनेरी, भीमाशंकर, प्रतापगड, कोल्हापूर आणि पन्हाळा ही ऐतिहासिक स्थळे पाहता येणार आहेत. जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, भारतीय रेल्वे व पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी या नियोजन बैठकीस उपस्थित होते.

   ही विशेष टूर केवळ पर्यटन नसून शिवप्रेमी व इतिहासप्रेमींना शिवचरित्राशी नाळ जोडण्याचा एक अध्यात्मिक अनुभव देणारी ठरणार आहे. "शिवचरित्राच्या पवित्र ठिकाणी एकदा तरी अवश्य जा!" असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

            या टूरचे ऑनलाईन बुकिंग सुरू असून www.irctctourism.com या संकेतस्थळावर इच्छुक प्रवाशांना नोंदणी करता येईल. IRCTC मार्फत भोजन, निवास, वाहतूक व मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जागा मर्यादित असल्याने लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000000


द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, दिनांक  3 (जिमाका वृत्त ):  – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अर्थकारण समृद्ध करणाऱ्या द्राक्ष पिकासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत प्लास्टिक कव्हर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानापासून द्राक्ष बागांचे संरक्षण व्हावे यासाठी शासनाकडून प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाचा लाभ देण्यात येणार आहे.

           या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 4,81,344 रुपये प्रति एकर खर्चाच्या 50 टक्के अनुदान म्हणजेच 2,40,672 रुपये प्रती एकर इतके अनुदान देण्यात येणार आहे. हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागू असून, क्षेत्रमर्यादा प्रति लाभार्थी 20 गुंटे ते 1 एकरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

          योजनेचा उद्देश गारपीट आणि अवकाळी पावसापासून द्राक्ष बागांचे संरक्षण करणे, उच्च दर्जाच्या व निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, फळबागांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि ग्रामीण भागातील युवकांना कृषि क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे असा आहे.

            योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये अंग्रीस्टँक फार्मर आयडी, 7/12 उतारा (द्राक्ष पिकाच्या नोंदीसह), 8-अ, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकचा पहिला पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र आणि चतुःसीमा नकाशा यांचा समावेश आहे.

           या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक सुभाष काटकर यांनी केले आहे. योजनेची सविस्तर माहिती कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर तसेच नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयातून मिळवता येईल.

00000000

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत डाळिंब पिकासाठी अॅन्टी हेलनेट कव्हर तंत्रज्ञानाच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

         जळगाव, दिनांक  3 (जिमाका वृत्त ):  - महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात डाळिंब पिकाचे उत्पादन खूपच महत्त्वाचे ठरते. परंतु, यासाठी कीटक व फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत डाळिंब पिकासाठी अॅन्टी हेलनेट कव्हर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे.

                    राज्यात नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरासाठी अनुदानावर देण्यात येणार असून, क्षेत्र मर्यादा 20 गुंटे ते 1 एकर दरम्यान प्रति लाभार्थी लाभ देय राहील.  खर्चाचे मापदंड रु.4,24,640/- प्रती एकर व अनुदान मर्यादा रु.2,12,320/- प्रती एकर (खर्चाच्या 50 टक्के) इतकी आहे.

           याकरिता आवश्यक कागदपत्रे अॅग्रीस्टॅक फार्मर आय डी, 7/12 (डाळिंब पिकाच्या नोंदीसह), 8-अ. आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु.जमाती शेतक-यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतुःसीमा नकाशा. या योजनेंतर्गत अॅन्टी हेलनेट कव्हर प्रकल्पासाठी अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

              सर्व प्रवर्गातील शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेस्थळावर जास्तीत जास्त शेतक-यांनी या घटकासाठी अर्ज करावेत असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक सुभाष काटकर यांनी केले आहे.

0000000000

Monday, 2 June 2025

वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात पार

 










   जळगाव, दिनांक  2 (जिमाका वृत्त ):  – :  जामनेर तालुक्यातील महसूल मंडळ वाकडी अंतर्गत  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकडी येथे दिनांक ०२ जून २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

           शिबिराचे उद्घाटन तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या प्रास्ताविकाने झाले. त्यांनी आपल्या भाषणात शिबिराच्या उद्देशाविषयी माहिती देताना सांगितले की, नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवणे व शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ गावातच उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य हेतू आहे.

या शिबिरात विविध विभागांनी आपापल्या सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांना थेट दिला.

            संजय गांधी निराधार योजना (DBT प्रक्रिया) – ७८ लाभार्थी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय – ६८ शेतकऱ्यांना सेवा, पुरवठा विभाग – शिधापत्रिका वाटप – ६४ लाभार्थी, सेतू केंद्रमार्फत प्रमाणपत्रे वाटप,  उत्पन्न दाखले – ३२,  जातीचे दाखले – ३८,  अधिवास व रहिवास दाखले – ४०, ग्रामपंचायत विभाग – मनरेगा जॉब कार्ड वाटप – १४ लाभार्थी. या शिबिरातून एकूण ३२० नागरिकांना थेट सेवा व लाभ देण्यात आले.

                  शिबिरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, पूर्वी प्रमाणपत्रे, शिधापत्रिका किंवा योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागत होते. मात्र या शिबिरामुळे सर्व सेवा गावातच मिळाल्याने वेळ व पैसा वाचला. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे तातडीने निरसन केले आणि अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन दिले.

                या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावपातळीवर त्वरित मिळाल्याने नागरिकांचा शासनावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. यापुढेही अशा उपक्रमांद्वारे नागरिकांना सेवा देण्यात येईल, असा विश्वास तहसील कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आला.

000000000