Monday, 30 June 2025

रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान; प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे सुरू

 





            जळगाव, दि. 30 जून (जिमाका): रावेर तालुक्यात  रविवारी 29 तारखेस  सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याने आणि पावसाने शेतकऱ्यांना जबरदस्त फटका दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

          वादळामुळे रावेर तालुक्यातील तब्बल ३१ गावे प्रभावित झाली असून, सुमारे ६८६ शेतजमिनींवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ३४२ हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेल्या केळी पिकांचे नुकसान झाल्याचे महसूल व कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.

वादळाची तीव्रता इतकी होती की अनेक ठिकाणी केळीचे झाडे उन्मळून पडले, फळे गळून गेली आणि काही ठिकाणी शेताचे  नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

             या परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने तात्काळ महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांना पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले असून, काही भागांत प्रत्यक्ष पंचनाम्याचे काम सुरूही करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

               दरम्यान, शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्कात राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000000


Thursday, 26 June 2025

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा समता दिंडी, विविध योजना लाभांचे वितरण आणि जनजागृती उपक्रम














            जळगांव, दि. 26 जून ( जिमाका वृत्तसेवा )  - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन जळगांव जिल्हा परिषदेत उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

            या प्रसंगी जळगाव शहराचे आमदार श्री. सुरेश (राजू मामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रभारी समाजकल्याण अधिकारी विनोद चावरिया, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नंदा रायते, उपयुक्त राकेश महाजन, राजेंद्र कांबळे, नाट्य कलावंत शंभु पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

            कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, रमाई आवास योजना, जात वैधता प्रमाणपत्र, वसतिगृह प्रवेश पत्र यांसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासकीय मंजुरी व लाभांचे वाटप करण्यात आले.

            आमदार भोळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सामाजिक न्याय धोरण हे गोरगरीबांना न्याय देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे. शाहू महाराजांनी समाजासमोर आदर्श राज्यकर्त्याचे उदाहरण ठेवले. त्यांनी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार मांडला. याच भावनेने आपण त्यांच्या जयंती निमित्त एकत्र यावे व ‘एक पेड माँ के नाम’ अभियान राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.

            जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, शाहू महाराज हे प्रशासकीय सुधारणांचे जनक होते. शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सुधारणा यावर त्यांचा भर होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जातीमुक्त समाज या स्वप्नाची पायाभरणी शाहू महाराजांनी केली. त्यांनी सांगितले की, मानसिक शक्ती ही यशाचा मुख्य घटक असून व्यसनमुक्त जीवन ही यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना इतिहास समजून घेऊन त्यातून शिकण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमात जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सर्व उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.

            कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून खासदार मा. स्मिता वाघ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून काढण्यात आलेल्या समता दिंडीने झाली. समाजिक समतेचा संदेश देणारी ही रॅली जिल्हा परिषद परिसरात समारोपाला आली.या  वेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन चरित्र्यावर नाट्य कलावंत शंभु पाटील यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. तर विनोद ढगे यांच्या चमुने विविध पथनाट्य या वेळी सादर केले. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.

            या सामाजिक न्याय दिनाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या पुढाकाराने यशस्वीपणे पार पडले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे जिल्हा परिषदेच्या वतीने आभार मानण्यात आले.

समता दिंडीद्वारे सामाजिक समतेचा संदेश

            खासदार श्रीमती स्मिता वाघ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून समता दिंडीची सुरुवात सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. सामाजिक समतेचा संदेश देणारी ही रॅली जिल्हा परिषद परिसरात समारोपाला आली. या दिंडीमध्ये विविध शाळांतील विद्यार्थी, सामाजिक संस्था, अधिकारी-कर्मचारी, व समाजातील विविध घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.                  

                                                                        0000000000000000 

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

मुंबई, दि. २६ जून:  महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे,  विधानसभा सदस्य दीपक केसरकर, भास्कर जाधव, नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, अमीन पटेल, विधानपरिषद सदस्य भाई जगताप,प्रवीण दरेकर,प्रसाद लाड,श्रीकांत भारतीय संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा    करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी  कामकाजाची माहिती दिली.

                                                                     00000000

राजस्थानचे जन स्वास्थ्य अभियांत्रिकी व भू-जल विभागाचे मंत्री कन्हैयालाल यांचा जळगाव दौरा

             जळगाव, दि. २६ जून (जिमाका वृत्तसेवा) -  राजस्थान राज्याचे जन स्वास्थ्य अभियांत्रिकी व भू-जल विभागाचे मंत्री श्री. कन्हैयालाल यांचा आज दिनांक २६ जून २०२५ रोजी जळगाव जिल्ह्याचा शासकीय दौरा पुढील प्रमाणे.

             सकाळी १२.३० वाजता सर्किट हाऊस, मांडव (मध्यप्रदेश) येथून प्रयाण संध्याकाळी ५.३० वाजता अजिंठा विश्रामगृह, जळगाव (महाराष्ट्र) येथे आगमन.

              महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्याशी शिष्टाचार भेट. या भेटीत दोन्ही राज्यांतील पाणी पुरवठा योजनांसंदर्भात चर्चा. रात्रीचा मुक्काम अजिंठा विश्रामगृह, जळगाव येथे.

00000000000

Wednesday, 25 June 2025

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन – नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

                      जळगाव, दि. 25  (जिमाका)-  महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट गतिमान प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण तसेच ग्रामिण भागातील नागरिकांचे विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावणे असा आहे.

                      या अनुषंगाने, जळगाव तालुक्यातील मौजे कानळदा (महर्षी कन्व आश्रम) येथे दिनांक २६ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे.

                  शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, ते या शिबीरात सहभागी व्हावे व आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्यांचे निवारण करून घ्यावे. अधिक माहिती व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

००००००००००

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हा जात पडताळणी समितीची विशेष मोहीम

         जळगाव, दि. २५ (जिमाका) –  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २६ जून २०२५ ते ४ जूलै २०२५ या कालावधीत  जयंती पर्व साजरे करण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.

            या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी सीईटी परीक्षा देणारे तसेच डिप्लोमाच्या तृतीय वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थी यांना अर्ज सादर करून जात पडताळणी प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. विज्ञान शाखेतील सर्व प्रवर्गांतील – अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव, विमात्र इ. – विद्यार्थ्यांची माहिती तालुका व महाविद्यालय निहाय संकलित करण्यात येणार आहे.

            विद्यार्थ्यांना अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रांमार्फत विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामार्फत अर्ज प्रक्रिया मार्गदर्शन दिले जाईल.

            सर्व अर्ज प्राप्त केल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करून विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन समितीने केले आहे. यासाठी २६ व २७ जून, तसेच २ व ३ जुलै २०२५ या कालावधीत त्रुटी पुर्तता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

            या विशेष मोहिमेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती एन. एस. रायते यांनी केले आहे.

0000000000

_आणीबाणीत सहभागी असलेल्या 175 जणांचा शासनातर्फे भव्य कार्यक्रमात गौरव_ लोकशाही रक्षणासाठी समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव, ही आमच्याकडूनची कृतज्ञता - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

 





























        जळगाव, दि. २५ जून २०२५ (जिमाका वृत्तसेवा): - लोकशाही रक्षणासाठी आणीबाणी मध्ये समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव, ही आमच्याकडून कृतज्ञता असल्याची भावना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

        देशात २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या १७५ लोकशाही सेनानींचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलते होते.

      याप्रसंगी आमदार श्री.सुरेश भोळे (राजूमामा), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मिनल करनवाल, महापालिका आयुक्त श्री. ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गजेंद्र पाटोळे, मिसा बंदी व सत्याग्रही भारतीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विश्वास कुलकर्णी व श्री. अजित मेंडकी, श्री. उदय भालेराव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

     तुमच्या संघर्षामुळे लोकशाही अधिक मजबूत झाली, देश जगभर लोकशाही राष्ट्र म्हणून आपली छटा उमटवत आहे. आता देशात सर्व सामान्यांच्या कल्याणापासून ते देशात विविध पायाभूत सोयसुविधा उभा करून देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवा भारत घडवीत असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

      यावेळी आ. सुरेश भोळे यांनीही आणीबाणीच्या काळातील सर्वांचा गौरवपूर्ण उल्लेख करून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

     मिसा बंदी व सत्याग्रही भारतीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विश्वास कुलकर्णी व श्री. अजित मेंडकी, श्री. उदय भालेराव यांनी आपल्या मनोगतातून आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा देत शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

    कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील 175 व्यक्ती आणीबाणीच्या लढ्यात होती. यातील हयात असणाऱ्या अनेकांनी मंचावर येऊन गौरव स्विकारला, दिवंगत असलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी हा गौरव स्विकारला.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. त्यात त्यांनी या कार्यक्रमामागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.

000000000


आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण : अल्पबचत भवनमध्ये विशेष प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन_ ▪ प्राचीन काळापासून आज पर्यंतचा देशाचा राजकीय प्रवास समोर ठेवणारे प्रदर्शन














             जळगाव, दि. २५ जून (जिमाका वृत्तसेवा):- भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक टप्पा असलेल्या आणीबाणीला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पबचत भवन, जळगाव येथे "आणीबाणी @५०" हे विशेष माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज उत्साहात पार पडले.

            प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिले आणि त्यावरील मांडणीचे कौतुक केले.

प्राचीन ते वर्तमान – लोकशाहीचा प्रवास

              या विशेष प्रदर्शनात भारतातील प्राचीन लोकशाही संकल्पनांपासून ते १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीपर्यंतचा व त्यानंतरचा प्रवास माहिती फलकांच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. महाजनपद काळातील लोकसहभाग, बुद्धकालीन राजनीती, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य, महात्मा बसवेश्वर यांचा अनुभव मंडप, ईशान्य भारतातील स्वशासन, भारताचे स्वातंत्र्य, संविधान, प्रजासत्ताक भारत आणि त्यानंतरची आणीबाणीतील राजकीय-समाजपरिवर्तन घडामोडी याचे यथार्थ दर्शन या माध्यमातून घडवण्यात आले आहे.

            प्रदर्शनामध्ये आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर देशात आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यात जे बदल घडले, त्या काळात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींच्या आठवणी, दस्तऐवज, छायाचित्रे, वर्तमानपत्र कात्रणे, तसेच आणीबाणीत सहभागी व्यक्तींची नावे व योगदान यांचा समावेश आहे.

दस्ताऐवज आणि दृश्य माध्यमांचा प्रभावी वापर

            या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कालक्रमानुसार मांडणी केलेले घटनाक्रम, त्या काळातील राजकीय निर्णय आणि त्याचे लोकशाहीवर झालेले परिणाम यांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणारे माहिती फलक. त्याशिवाय संविधानिक मूल्ये, मुलभूत अधिकारांचे उल्लंघन, माध्यमांवरची नियंत्रणाची परिस्थिती, अटकसत्रे आणि सामाजिक चळवळींचे दस्तऐवजीकरणही या प्रदर्शनात प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.

            जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी या प्रदर्शनाच्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष मांडणीपर्यंतचे सविस्तर विवेचन उपस्थित मान्यवरांना दिले.

लोकसहभागासाठी खुले निमंत्रण

            या प्रदर्शनाला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व माहिती विभागातर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून पुढील काही दिवस खुले राहणार आहे.

000000000000