जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय अशोक उईके यांच्या ‘शिक्षणाद्वारे सक्षमीकरण’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना, आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत दिनांक १६ जून रोजी भव्य शाळा प्रवेश उत्सव आयोजित करण्यात आला. हा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नव्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.
५१ आश्रमशाळांमध्ये एकाच दिवशी उत्सवाचे आयोजन
यावल प्रकल्पाअंतर्गत एकूण १७ शासकीय व ३४ अनुदानित आश्रमशाळांमध्ये एकाच
दिवशी हा उत्सव साजरा करण्यात आला. एकूण २६,६४० विद्यार्थ्यांपैकी १४,६३६
विद्यार्थी (५४.९४%) शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित राहिले. यामध्ये शाळांतील
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग
घेतला.
उत्सवाच्या दिवशी चोपड्याचे आमदार
चंद्रकांत सोनवणे यांनी शासकीय आश्रमशाळा, विष्णपूर (ता. चोपडा) येथे भेट दिली.
तसेच रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी डोंगरकठोरा (ता. यावल) येथील आश्रमशाळेला भेट
देत पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत पालकांना
मुलांना सतत शाळेत उपस्थित ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रधानमंत्री
धरती अबा जनजाती उन्नतग्राम अभियानाचा शुभारंभ
याच दिवशी प्रधानमंत्री धरती आबा
जनजाती उन्नतग्राम अभियान योजनेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने
प्रत्येक शाळेत लोकप्रतिनिधी व पालकांच्या उपस्थितीत माहिती व प्रचार-प्रसाराचे
कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच 'मुलांच्या शिक्षणात पालकांची सहभागिता' या
विषयावर चर्चा सत्र घेण्यात आले. यामध्ये पालकांना विभागाच्या योजनांची माहिती
देण्यात आली.
विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे फुलांचा
हार, मिठाई, भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पाठ्यपुस्तक, गणवेश व
शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शाळेचा परिसर फुलांनी सजवून रंगीत पताका,
रांगोळ्या व स्वागत फलकांनी सजविण्यात आला होता. विविध ठिकाणी सांस्कृतिक
कार्यक्रम, पारंपरिक गाणी, स्वागत गीत यांचीही रंगतदार मेजवानी अनुभवायला मिळाली.
प्रशासकीय
यंत्रणेचा काटेकोर समन्वय
प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी या
कार्यक्रमाचे नेतृत्व करताना सांगितले की, "हा उत्सव केवळ एक औपचारिक उपक्रम
नसून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षणाची ग्वाही देणारा एक
महत्त्वपूर्ण टप्पा आहे." यावेळी विशेष उपस्थिती वाढवण्यासाठी पुढील काळात
व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची घोषणा करण्यात आली.
या शाळा प्रवेश उत्सवाच्या यशामध्ये प्रत्येक स्तरावरील कर्मचाऱ्यांचे
योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) यांनी संपूर्ण
कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडली, तर शिक्षण विस्तार
अधिकारी यांनी विविध शाळांमध्ये समन्वय साधून आवश्यक बाबींची पूर्तता केली.
मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांतील कार्यक्रमांचे नेतृत्व करत संपूर्ण आयोजनाची
जबाबदारी सक्षमपणे सांभाळली. याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत,
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व पालकांशी संवाद साधण्यामध्ये सक्रिय सहभाग
नोंदवला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छता, शैक्षणिक साहित्य वितरण व
व्यवस्थापनाची शिस्तबद्ध जबाबदारी अत्यंत कौशल्याने पार पाडली. या सर्वांच्या
एकत्रित प्रयत्नांमुळेच हा उत्सव प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला. शिक्षकेत्तर
कर्मचाऱ्यांनी स्वच्छता, साहित्य वाटप व शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे कार्य
उत्तमरीत्या पार पाडले.
आगामी
नियोजन
शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी विशेष
प्रवेश अभियान, नियमित पालक-शिक्षक संवाद, आणि शैक्षणिक साधनांची उपलब्धता
वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळा प्रवेश उत्सवाच्या माध्यमातून आदिवासी
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दिशेने एक सकारात्मक आणि
शक्तिशाली सुरुवात झाली आहे.
00000000000
No comments:
Post a Comment