Thursday, 19 June 2025

मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू- शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

 जळगाव दि. 19  जून (जिमाका वृत्तसेवा) :– प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी मृग बहार हंगामाकरिता पुर्नरचित हवामान आधारित फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत चिकू, डाळींब, पेरू, मोसंबी, लिंबू व सिताफळ या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई या संस्थेमार्फत महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबविली जाणार आहे.

                 जिल्ह्यातील हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांना वारंवार नुकसान सहन करावे लागते. अशा स्थितीत हवामानाशी संबंधित धोके , जास्त पाऊस, पावसाचा खंड, तापमानातील चढ-उतार आदी , यांपासून संरक्षण देणारी ही विमा योजना ठरणार आहे. शेतकऱ्यांनी फळपिकांच्या मृग बहारासाठी या योजनेत सहभागी होणे ऐच्छिक असून कर्जदार व बिगरकर्जदार दोघेही यात भाग घेऊ शकतात. 

              या योजनेत पिक कर्ज घेण-या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग होण्यासाठी ऐच्छिक राहील. अधिसुचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज (उदा. मोसंबी व डाळीब) करता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकाकरिता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस आधी पर्यंत संबंधित बँकेस त्याअनुषंगाने विमा हप्ता कपात न करणे बाबत कळविणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी संबंधित बँकेस कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येणार आहे.

            विमा संरक्षित रक्कम व हप्ता यांच्या तपशीलात पेरू पिकासाठी 70,000 रुपये प्रतिहेक्टर इतकी विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना 3,500 रुपये इतका हप्ता भरावा लागेल. या पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 असून वाढीव मुदत 30 जून 2025 पर्यंत आहे. मोसंबी पिकासाठी 100000  रुपये विमा संरक्षित रक्कम असून हप्ता 5000 रुपये आहे, अंतिम मुदत 30 जून 2025 आहे. चिकूसाठी 70000 रुपये रक्कम असून 6300 रुपये हप्ता आकारण्यात आला आहे, अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जून आहे. डाळींब पिकासाठी 160000 रुपये विमा संरक्षण असून हप्ता 8000 रुपये निश्चित करण्यात आला आहे. अंतिम मुदत 14 जुलै 2025.  सिताफळ पिकासाठी सर्वाधिक रुपये विमा संरक्षित रक्कम 70000 असून हप्ता 3500 रुपये आहे. या पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 निश्चित करण्यात आली आहे. लिंबू पिकासाठी सर्वाधिक रुपये विमा संरक्षित रक्कम 80000 असून हप्ता 4000 रुपये आहे. या पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 असून वाढीव मुदत 30 जून 2025 पर्यंत आहे.

         जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  कुरबान तडवी यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे तसेच ई-पिक पाहणी व Agristack नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

                                                                    0000000000000

No comments:

Post a Comment