Monday, 27 March 2023

उन्हाळी हंगामातील हंगामी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज सादर करावेत

        जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : उन्हाळी हंगामातील हंगामी पिकांसाठी शेतकऱ्यांनी 15 एप्रिल 2023 पर्यंत पाणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे

          धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांच्या अधिपत्याखालील धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेडी, बुराई, कनोली, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी, अनेर, करवंद, अमरावती, सुलवाडे बॅरेज या मध्यम प्रकल्पांसह 12 मध्यम प्रकल्प, 45 लघु प्रकल्प, कोल्हापूर पद्धतीचे 22 व वळण बंधारे 30 असे एकूण 109 प्रकल्प, तसेच नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्पासह एकूण तीन मध्यम प्रकल्प, 33 लघुप्रकल्प, कोल्हापूर पद्धतीचे सहा बंधारे, 20 वळण बंधाऱ्यांसह एकूण 62 तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अधिसूचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या बागायतदारांनी 1 मार्च 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत एक मार्च 2023 पासून सुरू झालेल्या उन्हाळी हंगाम 2022- 23 मध्ये  भुसार/ अन्नधान्ये/ चारा/ डाळी /कपाशी/ भुईमूग व इतर हंगामी पिके इत्यादी पिकांना उन्हाळी हंगामाच्या पिकांना व बिगर सिंचनाचे पाणी वगळून उर्वरित पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

          त्यानुसार बागायतदार शेतकऱ्यांनी आपले नमुना क्रमांक 7, 7 (अ), (ब) चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 15 एप्रिल 2023 पर्यंत देण्याचे करावे.

          पाणी अर्ज स्वीकारण्याच्या शर्ती पुढील प्रमाणे : पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदारांनी आपापल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्वीकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजुरी/ ना मंजुरीचा विचार करण्यात येईल. मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये/ भुसार/ चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेवू नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व दरसाल दर शेकडा दहा टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळी नसताना पाणी घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजवणे, विहीरीवरील पिकास कालत्याचे पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणाऱ्या बागायतदारांचे नियमानुसार पंचनामे करण्यात येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल.

          टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. विहित दिनांकापर्यंत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देवून पोहोच पावती घेतली पाहिजे. लाभ क्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिन अर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल. तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील काही मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आलेला आहे. आरक्षित पाणीसाठी वगळता उपलब्ध पाणी सिंचनासाठी संबंधित उपविभागाद्वारे शेतीसाठी पाणी अर्ज स्वीकारले जातील. असेही कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

No comments:

Post a Comment