Wednesday, 31 May 2023

वाघुर धरण कार्यक्षेत्रातील पाणीवापरासाठी अर्ज करण्याचे आवाहन

                जळगाव, दि. ३१ (जिमाका वृत्तसेवा) :- वाघुर धरण विभाग, जळगाव कार्यक्षेत्रातील वाघुर डावा कालवा व उजवा कालवा तसेच कालवा उपसा व जलाशय उपसा यावरील प्रकल्पावर जेथे शक्य असेल तेथे कालव्याद्वारे (प्रवाही) तसेच अधिसुचीत /अनाधिसुचित लाभक्षेत्रातील नदी, नाला व इतर जलाशयातून उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग घेणा-या सर्व बागायतदारांना कळविण्यात येते की, चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यानुसार खरीप हंगाम मध्ये ३० मे, २०१३ ते ३० जून २०१३ या मुदतीत कपाशी, ज्वारी, गहु, हरभरा, बारमाही इतर बारमाही भाजीपाला इतर तेलबिया कडधान्य व भूसार पिके इत्यादी पिकांसाठी पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरीक्त उपलब्ध साठ्यातुन खालील अटीस अनुसरून पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आले आहे.

          तरी खालील अटींच्या पुर्ततेसह नमुना नं. ७ पाणी अर्जावर मागणी करून पाणी अर्ज संबंधित वाघुर धरण उपविभाग क्र. १ व २ वराडसिम, वाघुर धरण उपविभाग क्र. ३ व ४ नशिराबाद या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष देण्याचे करावे. खरीप हंगाम सन २०१३-२४ अखेर संपुर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहील. पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजुरी दिली जाईल, शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये. पाणी अर्जाच्या निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत/ग्रांमपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल. मुदतीनंतर आलेले पाणी अर्जावर नियमानुसार जादा पाणीपट्टी आकारणी केली जाईल. मंजुर क्षेत्रासच व मंजुर पिकानांच पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देतांना ७/१२ उतारा किंवा खाते पुस्तीका संबंधित उपविभागास दाखवावी लागेल.

          पाटबंधारे अधिनियम (कायदा) १९७६ च्या प्रचलीत धोरणानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार मंजुरी देण्यात येईल.

          उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करुन अन्नधान्याचे अधिक उत्पादन वाढवावे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे ठोक जलप्रशुल्क निर्धारण आदेश दिनांक २९ मार्च, २०२२ नुसार सुधारीत दराप्रमाणे केलेली आकारणी भरणे बंधनकारक राहील, असे आवाहन उप कार्यकारी अभियंता, वाघुर धरण विभाग, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        ०००००

जिल्हाधिकारी कार्यालयात ५ जून रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

        जळगाव, दि. ३१ (जिमाका वृत्तसेवा) :- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जून महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, ५ जून, २०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.       

          तरी जिल्ह्यातील नागरीकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



            जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.

          यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, तहसिलदार (सामान्य शाखा) सुरेश थोरात, अव्वल कारकून गणेश साळी यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000


Tuesday, 30 May 2023

 

डेराबर्डी निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

       जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्त) - सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातंर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील मुलांची शासकीय निवासी शाळा डेराबडी, धुळेरोड, चाळीसगांव, जि. जळगांव मध्ये सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वी ते इयत्ता 10 वी या शैक्षणिक वर्गासाठी (सेमी इंग्रजी) रिक्त जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे.   

शासन निर्णय दिनांक 29 जुन, 2011 नुसार अनुसुचितजाती अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, दिव्यांग या प्रवर्ग निहाय आरक्षण निश्चित केल्यानुसार इयत्ता 6 वी ते इयत्ता 10 वी या शैक्षणिक वर्गात शिकणा-या प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. तसेच प्रवेशित विद्यार्थ्याना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, गणवेश, अनुषंगिक इतर सोयी, सुविधा शासनामार्फत विनामुल्य पुरविण्यात येतात.          

या निवासीशाळेची इमारत प्रशस्त असून विविध इंग्रजी

उपक्रम, स्वतंत्र संगणक कक्ष व स्वतंत्र अभ्यासकक्ष, मनोरंजनासाठी LCD टि.व्ही., भव्य क्रिडांगण, विविध क्रिडा साहित्य, प्रशिक्षित शिक्षक वर्ग व कर्मचारीवृंद आहेत.

पालकांनी या निवासी शाळेत आपल्या पाल्याच्या  प्रवेशासाठी जातीचा दाखला, आधारकार्ड, बँकेचे पासबुक, राहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटो, मागील वर्षांचे गुणपत्रक,  छापील प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

निवासीशाळेत प्रवेशासाठी अर्ज विनामुल्य वाटप सुरु आहेत. प्रवेशासाठी मुख्यध्यापक, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा डेराबर्डी, धुळेरोड, चाळीसगांव, जि. जळगांव यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000

Monday, 29 May 2023

मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

           जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृह, सरस्वती नगर, धात्रक फाटा, पंचवटी, नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी, पुणे यांचेमार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा गटातील 75 मुलींसाठी व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपुर यांचेमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गच्या गटातील 75 मुलींसाठी तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 50 मुलींसाठी अशाप्रकारे एकूण 200 मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात येत आहे.

          सारथी, महाज्योती संस्था व उच्च व तंत्र शिक्षण यांच्या आवश्यक निकष, अटी व शर्ती पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे., सारथी विभागीय कार्यालय, पत्ता- बँरेक नंबर- विभागीय आयुक्त कार्यालय आवार, नाशिकरोड, नाशिक -422101., संपर्क फोन नं.-0253-2993689 ईमेल- sarthinashik@gmail.com संकेतस्थळ https://sarhi-maharashtragov.in महाज्योती विभागीय कार्यालय पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण कार्यालय, नाशिक-पुणे रोड, नाशिक -422011, संपर्क फोन नं.- 8087576393 ईमेल- maliajyotinsk@gmail.com संकेतस्थळ- https://mahajyoti.org.in याप्रमाणे आहे.

          सारथी व महाज्योतीचे संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्यास 30 जून, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे स्वसाक्षांकित करून पोस्टाद्वारे/प्रत्यक्ष सारथी संस्थेचे नाशिक येथील वरील पत्याातवर 30 जून, 2023 पर्यंत सादर करावेत.

          वसतिगृहाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींनी शासनाच्या इतर वसतिगृहाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, वसतिगृहात प्रवेश देण्यात येणाऱ्या पात्र मुलींची यादी सबंधित सारथी/महाज्योती/उच्च व तंत्र शिक्षणविभाग यांनी कागदपत्रांची पडताळणी करुन अंतिम केल्यानंतर सारथीचे संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, पात्र विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रत्यक्ष दाखल (हजर) होण्याचा दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. असे सीमा अहिरे, उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.2) नाशिक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

Thursday, 25 May 2023

जीडीसीए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा 26 मे पासून

        जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्त) - सहकार विभागांतर्गत जीडीसी अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालय, जिल्हापेठ, स्टेट बैंक ऑफ इंडिया मुख्य शाखेजवळ, जळगाव या केंद्रावर 26 ते 28 मे, 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

          ज्या परिक्षार्थीनी या परिक्षेसाठी अर्ज केले आहेत, अशा परिक्षार्थीनी आपले परीक्षा प्रवेशपत्र gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून आपण तयार केलेल्या लॉगिन आयडीवरून उपलब्ध करून घ्यावे. याबाबत परीक्षार्थीना काही अडचण असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव कार्यालयाशी संपर्क करावा. असे आवाहन संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

चोपडा येथे एक लाखाचे बनावट कापूस बियाणे जप्त

           जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्त) - चोपडा तालुक्यातील वड्री येथे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 23 मे, 2023 रोजी मे. अंकुर सिडस, नागपुर या कंपनीचे स्वदेशी 5 या वाणाचे बनावट बियाणे विक्री करणाऱ्या संदीप आधार पाटील, वड्री, ता. चोपडा यांचेकडून चोपडा शहराचे बाहेर मे. अग्रवाल पेट्रोल पंपाचे बाजूस असलेल्या हॉटेल न्यू सुनिता येथून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम तायडे, जळगांव यांनी सापळा रचुन स्वदेशी 5 वाणाचे एकूण 99 हजार 750 रुपये किमतीचे 95 पाकिटे बनावट कापूस बियाणे जप्त केले आहे. ही कारवाई विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांव संभाजी ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

          याबाबत श्री. संदीप आधार पाटील, रा. वड्री, ता. चोपडा यांचे विरुध्द शासनातर्फे बियाणे नियम 1968, बियाणे (नियंत्रण) आदेश 1983. महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा 2009 व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 तसेच भा.द.वि. 1860 चे कलम 420, 465, 468 नुसार चोपड़ा शहर पोलीस स्टेशन येथे क्र. 252/2023, दिनांक 24 मे, 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          खरीप हंगाम 2023 मध्ये अनधिकृत, अवैधरीत्या व बिना बिलाने बियाणे व खतांची खरेदी करू नये. तसेच अशा कृषि निविष्ठांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगांव यांचे मोबाईल क्र. 8983839468 व दुरध्वनी क्र.0257-2239054  वर माहिती द्यावी. असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

जोगलखोरी-वराडसीम-भुसावळ बस सेवा सुरु विद्यार्थी, ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान

        जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्त) - मौजे जोगलखोरी, पोस्ट वराडसीम, ता. भुसावळ येथे आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती आहे. या गावातील लोकांना प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची व्यवस्था नसल्याने गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, गावातील लोकांना बाहेरगावी जाण्यासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी जाण्याकरीता खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत होता.

          मौजे जोगलखोरी येथे एसटी महामंडळाची बससेवा सुरु करावी अशी गावकऱ्यांची मागणी होती. त्याअनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक, जळगाव यांनी या गावाला भेट देवून प्रवासाबाबत असणाऱ्या अडचणीची पाहणी केली. अडचणीचे निवारण करुन 24 मे, 2023 पासून जोगलखोरी वराडसीम मार्गे भुसावळ नियमित बससेवा सुरु करण्यात आली आहे. या बससेवेमुळे विद्यार्थी, गावकरी यांच्या अडचणी दुर झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. गावातील व परिसरातील सर्व नागरिकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, यावल व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे, विभाग नियंत्रक, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

स्वदेशीच्या नकली वाणापासून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी

        जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्त) - खरीप हंगामासाठी काही दिवस शिल्लक असून शेतकरी शेतीची मशागत करण्यात व्यस्त आहे. कोणते बियाणे घ्यावे याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा असून विविध कंपन्यांच्या प्रचार गाडया देखील गावोगावी फिरत आहेत.

          मागील वर्षी अंकुर सिडसच्या स्वदेशी 5 या प्रचलित वाणाच्या नावाखाली बोगस बियाण्याची विक्री होवून शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. यात शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. गुजरात राज्यातील आनंद व वडोदरा याठिकाणी कापसाच्या वाणाचे बिजोत्पादन घेतले जाते, मात्र तेथील शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडे पाठ फिरवली आहे.

          यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असलेली स्वदेशी 5 बियाणे मिळणार नाही. त्यामुळे स्वदेशीच्या नकली वाणांपासून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन कृषि अधिकारी एस. पी. मोरे, मुक्ताईनगर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

00000

Wednesday, 24 May 2023

अंकुर सीडस कंपनीचे स्वदेशी 5 हे वाण खरेदी न करण्याचे आवाहन

  जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्त) : चाळीसगाव तालुक्यात गुणनियंत्रणसाठी तालुकास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. चालू खरीप 2023 या हंगामात अंकुर सीडस कंपनीचे स्वदेशी 5 हे वाण बिजोत्पादन होऊ न शकल्याच्या कारणाने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे स्वदेशी 5 चे बियाणे बाजारात मिळाले तर ते बनावट असेल, त्यामुळे ते खरेदी करू नये. असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आल्याचे चाळीसगाव तालुका कृषि अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

  खरीप हंगामासाठी बी टी संकरित कापसाच्या बीजी-1 वाणांसाठी प्रति पाकीट 635 रुपये तर बीजी-2 वाणासाठी प्रति पाकीट 853 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. खरीप हंगाम 2023 अंतर्गत कापूस बियाण्याचा संभाव्य 63 हजार 724 हेक्टर क्षेत्रासाठी 3 लाख 18हजार 620 कापूस बियाणे पाकिटाची मागणी नोंदविण्यात आली आहे. कापूस बियाणे पुरेस उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना कमतरता भासणार नाही. शेतकरी बांधवानी अधिकृत कृषि केंद्रातून रीतसर पक्के बिल घेऊन बियाणे खरेदी करावे. जादा दराने बियाणे विक्री होत असल्यास तालुका कृषि अधिकारी, चाळीसगाव किंवा कृषि अधिकारी पंचायत समिती, चाळीसगाव यांच्याकडे संपर्क साधून तक्रार करावी. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कापूस बियाणे लागवड 1 जून 2023 पासून करावी, असे आवाहन कृषि अधिकारी, पंचायत समिती, चाळीसगाव यांनी केले आहे. 

चाळीसगांव तालुक्यासाठी खरीप हंगाम 2023 साठी युरिया 12 हजार 188 मे.टन., सिंगल सुपर फॉस्फेट 5 हजार 75 मे.टन, पोटॅश 2 हजार 498 मे.टन, एन.पी.के संयुक्त खते 9 हजार 413 मे.टन या सर्व खतांची एकूण 29 हजार 174 मे.टन याप्रमाणे खतांचा पुरवठा टप्प्याटप्याने खरीप हंगामात होणार आहे. चाळीसगांव तालुक्याचा 1 एप्रिल 2023 रोजीचा शिल्लक खत साठा युरिया 3 हजार 941 मे.टन, सिंगल सुपर फॉस्फेट 1 हजार 293 मे. टन, पोटेंश 70 मे.टन, एन.पी.के. संयुक्त खते 3 हजार 181 मे.टन.आहे. शेतकरी बांधवांनी अधिकृत खत विक्री केंद्रातून आधार कार्ड व अंगठा देऊन ई-पॉस मशीनव्दारे खते खरेदी करावी. तसेच खते खरेदीचे खत विक्री केंद्रातून रीतसर पक्के बिल घ्यावे. असे आवाहन गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कृषि अधिकारी पंचायत समिती, चाळीसगाव यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी निवडीची कार्यवाही मिशन मोडवर करावी - निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे

जळगाव, दिनांक 24 (जिमाका वृत्त): शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’हे अभियान राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागाने लाभार्थ्यांची निवड मिशन मोडवर करावी. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी केले.

  ‘शासन आपल्या दारी’या अभियानातंर्गत जळगाव जिल्ह्यात 75 हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ देण्याचे नियोजन प्रशासनातर्फे सुरु आहे. पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 3 जून, 2023 रोजी जळगाव जिल्हा दौरा नियोजित आहे. शासन आपल्या दारी व मुख्यमंत्री महोदयांचा दौरा यशस्वी करण्यासाठी पूर्वतयारी आढावा बैठक आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भारदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सर्व विभागांचे विभागप्रमुख दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. 

  शासन आपल्या दारी हे अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची निवड तातडीने करुन त्याची यादी जिल्हा प्रशासनास द्यावी. लाभार्थी निवड करतांना पात्रतेचे निकष तपासून त्यांचेकडून अर्ज भरुन घेणे, आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन घेण्याची कार्यवाही येत्या दोन दिवसात पूर्ण करावी. तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागाचे लाभार्थी उपस्थित राहतील याचे नियोजन करावे. लाभार्थी निवड करतांना लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे, कार्यक्रमस्थळी लाभार्थ्यांना व त्यांचे कुटूंबिय यांना आणण्याचे नियोजन करण्याच्याही सूचना दिल्यात. शासन आपल्या दारी या उपक्रम जिल्हा व तालुकास्तरावर 15 जूनपर्यंत सुरु राहणार असल्याने प्रत्येक विभागाने त्यादृष्टिने परिपूर्ण नियोजन करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भारदे यांनी सर्व विभागप्रमुखांना सुचित केले. 

00000

गहाळ धनादेश सापडल्यास जमा करण्याचे आवाहन

  जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्त) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर जि. जळगाव या कार्यालयातील कर्मचारी शासकीय कामकाजाकरिता भारतीय स्टेट बँक, रावेर येथे जात असताना सोबत असलेल्या शासकीय कागदपत्रांपैकी भारतीय स्टेट बैंक, रावेर या शाखेचा जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्या. जळगांव यांना उद्देशून लिहीलेला धनादेश क्र. 015405 दि. 2 मार्च, 2023 (Account Payee असे चिन्हांकित केलेला) हा नजर चुकीने गहाळ झाला आहे. 

  हा धनादेश कोणास आढळून आल्यास/सापडल्यास कार्यालयास कामकाजाच्या वेळेत जमा करावा. अथवा श्री. अ. इ. तडवी, कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्र. 8668817893 वर संपर्क साधावा. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, रावेर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                           00000

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी 20 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्त):  केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2023-24 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता 13 जागा व आर्थिकदृष्या दुर्बल घटकांकरीता 1 जागा तसेच वेंकटगिरी करीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/सोलापूर/मुंबई/औरंगाबाद यांचेमार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज 20 जून, 2023 पर्यंत मागविण्यात येत आहेत.

  इच्छुक उमेदवारांनी याबाबत आपले परिपूर्ण अर्ज 20 जून, 2023 पर्यंत संबंधीत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमूना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमूना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे एम. जे. प्रदिप चंदन, आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                   00000

Tuesday, 23 May 2023

शेतकऱ्याच्या कुटूंबाला सुरक्षा देणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

           जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पुर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक बसणे, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे अनेकदा शेतक-याचा मृत्यु ओढवतो किंवा काहीना अंपगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थीती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतक-यास/त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेल्या शेतक-यांच्या कोणत्याही एक सदस्य (आई, वडील, शेतकरीची पती, पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांपैकी कोणतीही एक असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकुण २ जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही योजना १९ एप्रिल, २०२३ पासून आवश्यकतेनुसार प्रथम ३ वर्षे राबविण्यात येणार आहे. अशी माहिती संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

          या योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या एक सदस्यांमध्ये आई वडील, शेतकरीची पती पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल.

          कृषि गणनेनुसार निर्धारीत केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेले शेतक-याच्या कुटुंबातील कोणत्याही १ सदस्य असे एकुण २ व्यक्तींकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. अपघाती मृत्यु झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा किंवा एक हात अथवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये अनुज्ञेय असतील.

          अपघातांचा समावेश असणा-या बाबी-

          रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडुन मृत्यु, जंतुनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडुन मृत्यु, खुन, उंचावरुन पडुन झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्यांकडुन झालेली हत्या,  जनाव-यांच्या हल्यामुळे/चावण्यामुळे जखमी/मृत्यु,  बाळांतपणातील मृत्यु,  दंगल,  अन्य कोणतेही अपघात या अपघातांचा समावेश असेल.

          अपघातांचा समावेश नसणा-या बाबी-

          नैसर्गिक मृत्यु, विमा कालावधीपुर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असतांना झालेला अपघात, भ्रमिष्ठपना, शरिरातंर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युध्द, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खुन या बाबींचा समावेश नाही.

          लाभासाठी आवश्यक कागदपत्रे - ७/१२ उतारा, मृत्युचा दाखला, शेतक-यांचे वारस म्हणुन गावकामगार तलाठयाकडील गांव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद., वारसदाराचे ओळखपत्र आधारकार्ड/पॅनकार्ड/बँक पासबुक/निवडणुक ओळखपत्र, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला, जन्मदाखला/शाळा सोडल्याचा दाखला/ शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र/ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र/आधार कार्ड/पॅन कार्ड/वाहन चालविण्याचा परवाना/पारपत्र/निवडणुक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र., प्रथम माहिती अहवाल/घटनास्थळ पंचनामा/पोलिसपाटील माहिती अहवाल., अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे आवश्यक आहे.

          जेव्हा शेतक-याचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/शेतक-यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेकडे 30 दिवसाच्या आत सादर करावा. यासाठी कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी यांचे मार्गदर्शन घ्यावे.

          वारसदाराची निवड पध्दत- अपघातग्रस्ताची पत्नी/अपघातग्रस्त स्त्रीचा पती, अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी, अपघातग्रस्ताची आई, अपघातग्रस्ताचा मुलगा, अपघातग्रस्ताचे वडील, अपघातग्रस्ताची सून, अन्य कायदेशीर वारसदार आदि प्रमाणे निवड करण्यात येईल. असे श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

इतर मागासवर्गीय महामंडळाच्या कर्ज रक्कमेच्या थकीत व्याजावर 50 टक्के सवलतीस मुदतवाढ

 

          जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्त): महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्याकडून घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी संपलेला आहे. अशा लाभार्थ्यांनी एकरक्कमी थकीत कर्ज भरुन खाते बंद केल्यास या लाभार्थीस थकीत व्याजात 50 टक्के सवलती देण्यात येते. या योजनेस 30 एप्रिल, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

          थकीत कर्ज असलेल्या लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेवून त्यांचेकडील थकीत कर्ज एकरकमी भरून थकीत व्याजावर 50 टक्के सवलत घेवुन आपले कर्ज खात बंद करावे. तसेच कर्ज थकबाकीदारांनी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ, जळगांव येथे संपर्क साधावा. असे आवाहन दिनेश चव्हाण, जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

Monday, 22 May 2023

‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत प्रत्येक विभागाने लाभार्थ्यांची निवड करावी-जिल्हाधिकारी अमन मित्तल

जळगाव, दिनांक 22 (जिमाका वृत्त): शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत जळगाव जिल्ह्यात 75 हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 3 जून, 2023 रोजी संभाव्य जळगाव जिल्हा दौऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे. याकरीता जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थींची निवड प्राधान्याने करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आज दिल्या आहेत.

‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे हे उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सर्व विभागांचे विभागप्रमुख सहभागी झाले होते. 

यावेळी जिल्हाधिकारी मित्तल म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे ध्येय आहे. या अभियानाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची यादी तयार करावी. या योजनांची माहिती, योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष आदि माहिती सर्वसमान्य नागरीकांपर्यंत पोहचवावी. प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करुन त्यांचेकडून अर्ज भरुन घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन घ्यावी. तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागाच्या 100 लाभार्थ्यांना उपस्थित ठेवण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता लक्षात घेता त्यांचे बैठक व्यवस्थे पिण्याचे पाणी आदि आवश्यक त्या सोईसुविधांचे नियोजन करावे. तसेच लाभार्थी निवड करतांना लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे आदि सूचना दिल्यात. 

शासन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत जिल्हा व तालुकास्तरावर 15 जूनपूर्वी शिबिरांचे आयोजन करुन नागरीकांना योजनांचा थेट लाभ प्रदान करावयाचा असल्याने सर्व विभागांनी त्यादृष्टिने परिपूर्ण नियोजन करुन हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहनही श्री. मित्तल यांनी यावेळी केले. प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. 

00000

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी ३१ मे पर्यत मुदतवाढ

          जळगाव दि. २२ (जिमाका वृत्तसेवा) :- भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनांसाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी अनु.जाती, इतर मागासवर्गीय, विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी ३१ मे, २०२३ पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यानी ऑनलाईन अर्ज भरलेले नाही त्यांनी ३१ मे, २०१३ पर्यत अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

           तसेच महाविद्यालयाने सुध्दा आपल्या महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नसल्यास त्यांना तात्काळ भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क अर्ज भरण्याबाबत अवगत करण्यात यावे. असेही श्री. पाटील यांनी कळविले आहे.

00000

जळगावात २५ व २६ मे रोजी जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

           जळगाव दि. २२ (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयातर्फे दिनांक २५ व २६ मे, २०२३ रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. या मेळाव्यात इयत्ता १० वी, १२ वी, ग्रॅज्युएट/आयटीआय सर्व ट्रेड/डिप्लोमा सर्व ट्रेड या शैक्षणिक पात्रतेची एकूण १५१ रिक्तपदे भरण्याविषयी कंपन्यांनी कळविलेले आहे.          

          या मेळाव्यात पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी लाभ घ्यावा, उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय  करण्यासाठी सेवायोजन   नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगीन करुन अप्लाय करावा. तसेच ज्यांनी  नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद  संकेतस्थळावर जाऊन नांवनोंदणी करावी व त्यानंतर आपल्या युझर आयडी व पासवर्ड ने लॉगीन करुन ॲप्लाय करावा. 

                याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते संध्या ६.१५ या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. असे आवाहन वि.  जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000000

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



          जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.

         यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसिलदार (सामान्य शाखा) सुरेश थोरात, अव्वल कारकून गणेश साळी यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

Friday, 19 May 2023

‘सामाजिक न्याय पर्व’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 7 हजार 859 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप

सामाजिक न्याय पर्व’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 7 हजार 859 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप जळगाव दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 1 ते 30 एप्रिल, 2023 या कालावधीत सामाजिक न्याय पर्व हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी या कालावधीत जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्यावतीने विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशात नारनवरे व बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत जळगाव जिल्ह्यातील 7 हजार 859 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव बी. यु. खरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. या विशेष मोहिमेमध्ये जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून 2 हजार 918 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन निर्गमित करण्यात आले तर जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांचेकडून 4 हजार 941 जात दाखले निर्गमित करण्यात आले. ज्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या विद्यार्थ्यांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रीकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रम आरक्षित जागेवर प्रवेश घ्यावयाचा आहे. व त्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाइन भरलेले नाहीत. अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्याचेही जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्व मुळ कागदपत्रे अपलोड करुन ते अर्ज अपलोड केलेल्या मुळ कागदपत्रांच्या सत्यप्रतींसह (Hard Copy) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्र येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत स्वत: किंवा वडिल/भाऊ/बहिण/आई यांनी समक्ष जमा करावेत. जेणेकरून त्याचे प्रकरणांवर समितीस वेळेत निर्णय घेता येतील. दलालापासून सावध राहण्याचे आवाहन अर्जदारांनी अर्ज भरतांना स्वत:चा ईमेल व मोबाईल क्रमाकांव्दारेच अर्ज नोंदणी करावा. सर्व मूळ कागदपत्र अपलोड करण्यात यावीत व आपला युझर आयडी व पासवर्ड व्यवस्थित जतन करुन ठेवण्यात यावा. समितीने त्यांचे प्रकरणावर निर्णय घेतल्यानंतर निर्णय/ जात वैधता प्रमाणपत्र हे त्यांनी नोंदणी केलेल्या ईमेलवर प्राप्त होत असते. त्यामुळे कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तीकडे संपर्क करु नये व त्रयस्थ व्यक्तीच्या अमिशास बळी पडू नये. अशा त्रयस्थ व्यक्तीकडून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अर्जदारांनी आपले अर्ज स्वतः व्यवस्थितरित्या परिपूर्ण सादर करावे. अन्य कोणत्याही कार्यालयाबाहेरील व्यक्तीशी संपर्क करू नये. असे आवाहनही श्री. खरे, सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 

                                                                         00000

Wednesday, 17 May 2023

विनापरवाना 2 लाख 38 हजारांचा खत साठा जप्त कृषि विभागाच्या पथकाची धडक कारवाई

   जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा) :- विनापरवाना व अनधिकृत गोडावूनमधून रासायनिक खत व सेंद्रीय खताची गावेगावी, घरोघरी बिगर बिलाने विक्री होत असल्याची गुप्त माहिती  समजल्यावरुन सदर प्रकारास आळा घालण्यासाठी विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांव संभाजी ठाकूर यांच्या  मार्गदर्शनाखाली सापळयाचे नियोजन करण्यात आले.

  जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगांव अरुण तायडे यांनी पाचोरा येथे येऊन उपविभागीय कृषि अधिकारी, पाचोरा नंदकिशोर नाईनवाड, कृषि अधिकारी, पंचायत समिती, पाचोरा मारुती भालेराव व कृषि पर्यवेक्षक अविनाश चंदीले यांना सोबत घेऊन पाचोरा तालुक्यातील जारगांव येथील मधुकर शंकर भोकरे यांच्या मालकीच्या गोडावूनची तपासणी केली असता तेथे विनापरवाना अनधिकृत खत साठा आढळून आला. याबाबत गोडावून मालकाची विचारपूस केली असता हे गोडावून काही दिवसांपुर्वी दिपचंद्र श्रीवास यांना भाडयाने दिल्याचे सांगीतले. या विनापरवाना व अनधिकृत खत साठयाबाबत दिपचंद्र श्रीवास यांना मोबाईलद्वारे संपर्क साधुन गोडावून व कंपनीचा परवाना मागीतला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या गोडावून मध्ये रुपये २,३८,६२९/- किमतीचा ६.७८ मे. टन खत साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत रात्री उशीरापर्यंत खत नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार पाचोरा पोलीस स्टेशन येथे क्र.१५४/२०२३ दिनांक १७.०५.२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  खरीप हंगाम २०२३ मध्ये अनधिकृत, अवैधरीत्या व बिना बिलाने बियाणे व खतांची खरेदी करु नये. तसेच अशा कृषि निविष्ठांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय यांचे मोबाईल क्र. ०८९८३८३९४६८ व दुरध्वनी क्र. ०२५७-२२३९०५४ वर माहिती द्यावी. असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                     00000

महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठविण्याचे आवाहन

    जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा):- विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण १०१ हे ५ जून ते १२ ऑगस्ट, २०२३  या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती निलेश राजूरकर, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिली आहे.

             नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याकडील लिपीक वर्गीय कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे. या प्रशिक्षणासाठी इच्छुकांना प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचारी यांना प्रशिक्षण सक्तीचे केले आहे. प्रशिक्षणासाठी संपूर्ण ५० दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. ज्यांना पूर्णवेळ कर्मचारी पाठविणे शक्य नाही त्यांना विशिष्ट मोडयुल्सना प्रवेश घेण्याची अनुमती देण्यात येणार आहे. असेही श्री. राजूरकर, सहसचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

                                                                      000000

रोजगार हमी योजनेतंर्गत केळी पिकाचा समावेश शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

  जळगाव दि. 17 (जिमाका वृत्तसेवा):- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत शासनाने केळी (३ वर्ष) हे पिक नव्याने समाविष्ट केले आहे. त्यानुसार या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांनी अर्ज करण्याचे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

पात्र लाभार्थी :-अनु. जाती, अनु. जमाती, भटक्या जमाती, निरधी सुचित जमाती (विमुक्त जमाती) दारिद्र रेषेखालील कुंटुब, स्त्री कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब, जमीन सुधारणाचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व इतर पारंपारीक वनवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम -2006पात्र लाभार्थी,  या प्रवर्गामधील 1 ते 10 पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर कृषि कर्ज माफी योजना सन 2008 या मध्ये व्याख्या केलेले अल्पभुधारक (5 एकर पर्यंत) सीमांत भुधारक  (2.5 एक पर्यंत) यांना प्राधान्य देण्यात येईल. 

क्षेत्र मर्यादा :-  या योजनेतंर्गत कमीत कमी ०.०५ हेक्टर क्षेत्र व जास्तीत जास्त २.०० हेक्टर क्षेत्र मर्यादा असेल.

आवश्यक कागदपत्रे :- मजुर कार्ड, ग्राम पंचायतीने मान्य केलेली लाभार्थी यादीत  नाव असणे आवश्यक, प्रपत्र अ अर्जाचा नमुना प्रपत्र व संमती पत्र (फळ बागेचे कार्य ग्राम पंचायत किंवा कृषि विभाग यापैकी कोणाकडून राबविण्यात रस आहे याचा स्पष्ट उल्लेख लाभार्थीने करावा), लागवड करावयाच्या जागेचा ७/१२ उतारा, ८ अ खाते उतारा.

देय अनुदान :- केळी पिकाचे लागवड अंतर १.८ X १.५० मीटर

प्रथम वर्ष देय अनुदान प्रति हेक्टर रक्कम रु. १,७३,०८४/- दुसरे वर्ष अनुदान रक्कम रु. ४३,७४८/- तिसरे वर्ष रक्कम रु.३६,२००/- असे एकुण देय अनुदान रक्कम रु.२,५३,०३२/- लाख रुपये ३ वर्षांसाठी देय राहिल.   

  या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकूर यांनी केले आहे.

                                                                00000

Tuesday, 16 May 2023

निश्चित केलेल्या भाडे दरापेक्षा जादा भाडे आकारल्यास तक्रार करा

   जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) :- खाजगी वाहतूकदारांनी स्पर्धात्मक वातावरणात वाजवी भाडे आकारुन प्रवाशांना वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तथापि, गर्दीच्या हंगामात मागणी पुरवठा यामधील तफावतीमुळे मोठया प्रमाणात भाडेवाढ करुन प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होवू नये याउद्देशाने कमाल भाडे निश्चित करण्यात आलेले आहे. कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास संबधित परवानाधारक वाहतूकदाराविरुध्द मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे.

जळगाव शहरातून खाजगी बसेस या पुणे, मुंबई, नागपूर, सुरत अहमदाबाद या ठिकाणी ये-जा करीत असतात. परिवहन कार्यालयाने खाजगी ट्रॅव्हल्स मालकांना प्रवाश्यांकडून किती भाडे आकारावे याबाबतचा तक्ता तयार करुन दिला असून प्रवाशांच्या सोयीकरीता प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात याबाबतचा फलक लावण्याची  सूचनाही दिली आहे. तसेच कमाल भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची तपासणीची विशेष मोहिम 16 मे ते 30 जून, 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहेत. 

  राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांचे संपूर्ण बससाठी प्रति किलोमीटर भाडेदर त्याच स्वरुपाच्या येणा-या भाडेदराच्या 50% पेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर गृह विभागाने 27 एप्रिल, 2018 अन्वये निश्चित केले आहे.

        खाजगी ट्रॅव्हल्स यांनी शासन निर्णयानुसार आकारावयाचे महत्तम प्रति प्रवासी, प्रति किमी दर-नॉन एसी सिटर (निमआराम)-2.56 रुपये, एसी सिटर-4.62 रुपये, नॉन एसी स्लिपर-2.95 रुपये, एसी स्लिपर-5.49 रुपये असे आहेत. त्यानुसार पुणेसाठी अनुक्रमे-999, 1803, 1150, 2141, मुंबईकरीता-1101, 1987, 1268, 2361, नागपूरकरीता-1123, 2033, 1298, 2416, अहमदाबादकरीता-1485, 2380, 1711, 3184, इंदौरकरीता-794, 1432, 914, 1702 तर सुरतकरीता-794, 1478, 944, 1757 याप्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहे.

  कोणत्याही खाजगी वाहतूकदाराने (खाजगी ट्रॅव्हल्स) कंपनीने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादाभाडे आकारणी केल्यास याबाबतची तक्रार dyrto.19-mh@gov.in व dycommr.enf2@gmail.com या संकेतस्थळावर करावी. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                               00000

Monday, 15 May 2023

जिल्ह्यातील 18 मे रोजीचे आठवडे बाजार इतर दिवशी भरवावे

   जळगाव दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) :- मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणुकांकरीता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार जळगाव जिल्हयातील 13 तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीतील 93 सदस्य व 1 थेट सरपंचाच्या रिक्त पदासाठी दिनांक 18 मे, 2023 रोजी मतदान होणार आहे. यादिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीकोनातून दिनांक 18 मे, 2023 या दिवशीचा आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्याचे आदेश ग्रामपंचायत शाखा, जिल्हा कार्यालय जळगाव यांनी निर्गमित केले आहे.

  मुंबई मार्केट ॲण्ड फेअर्स ॲक्ट 1862 चे कलम 5(अ) व (क) अन्वये खालील गावांचे दिनांक 18 मे, 2023 रोजीचा आठवडे बाजार इतर सोयीच्या दिवशी भरविण्यात यावा. याची सर्वांनी नोंद घ्यावी.

मुक्ताईनगर तालुका- हलखेडा, हिवरा, पिंप्री अकराऊत, राजुरा, रुईखेडा, सारोळा. 

जामनेर तालुका- देवडसगाव, रामपुर. 

चाळीसगाव तालुका-दसेगाव, वाघळी, बाणगांव, हातले, ओढरे, तामसवाडी, देशमुखवाडी, आडगांव, कृष्णनगर, धामणगांव, मांदूर्णे, दस्केबर्डी पिंपळवाड निकुभ. 

रावेर तालुका-वाघोड, रसलपुर, रेंभोटा, तासखेडा, कोळोदा, उदळी खुर्द, निभोंरा बु. कुसुबे बु., पिंप्री, ऐनपुर, पाडळे बु.   

जळगाव- कंडारी, धानवड, फुपणी, ममुराबाद, 

भुसावळ - वाजोळा, खंडाळा,

यावल-बोरखेडा बु., बोरावल खु., मारुळ,पिंप्री, पिळोदे खु., कासवा, आडगाव, चिंचोली, बामणोद, सांगवी बु, दहिगांव,

 बोदवड- करंजी, 

पारोळा-तरडी, शिरसोद, 

धरणगाव - बोरगांव बु., चोरगांव, पाष्टाने बु., शेरी, 

पाचोरा- पिंपळगाव खु. प्र. भ, लोहटार, माहिजी, शिंदाड, डोकलखेडा, कुऱ्हाड बु., वडगांव बु. प्र.पा. सावे बु. प्र.ला, 

अंमळनेर-लोण खु., लोणसिम, ढेकु खु, लोणचरम, म्हसले, ब्राम्हणे, मुंगसे, वावडे, नगांव खु. खडके, 

चोपडा-मजरेहोळ, गरताड,उमर्टी, अनवर्दे बु., दोंदवाडे, हातेड बु. 

00000

Friday, 12 May 2023

जळगाव एसटी च्या ताफ्यात 10 नवीन बस दाखल पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण “बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान” यशस्वीपणे राबवा -पालकमंत्री गुलाबराव पाटील

 






            जळगाव, दि.12 (जिमाका) - गाव, वाड्या आणि वस्त्यांना शहराशी जोडणारी, सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेली जिल्ह्यातील बससेवा अधिक सक्षम करण्यावर भर आहे. महिलांना बस प्रवासात 50% सवलतीचा निर्णय हा यशस्वी झाला आहे. उन्हाळी सुट्टी व लग्नसराई मध्ये जळगाव विभाग 10 दिवसात तब्बल 10 कोटी उत्पन्न मिळवून राज्यात प्रथम आला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 मे ला केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने  हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान ही यशस्वीपणे राबून जळगाव विभाग राज्यात अव्वलस्थानी येण्यासाठी सांघिक प्रयत्न करावे. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सागर पार्क येथे 10 नवीन साध्या बसेसचे लोकार्पण प्रसंगी बोलत होते.

साध्या व इलेक्ट्रिक बसेस महामंडळाच्या ताफ्यात टप्या टप्याने दाखल होणार

            जळगाव विभागांमध्ये माहे नोव्हेंबर 2019 मध्ये 839 वाहने होती तर सध्या 723 वाहने उपलब्ध आहेत.  त्यापैकी साधारणतः 57  वाहने (बसेस)  ही मोडकळीस निघालेली आहे. विभागात बऱ्याचशा बसेस जुन्या झालेल्या असून त्या वारंवार नादुरुस्त होत असल्याने रस्त्यात ब्रेक डाऊन होत असतात.  त्यामुळे बऱ्याचश्या उशिरा धावतात व काही वेळेस फेऱ्या रद्द कराव्या लागत आहे. त्यामुळे रा.प.  महामंडळाकडे लोकप्रतिनिधी, विध्यार्थी व प्रवाश्यांच्या वारंवार तक्रार उद्भवत असतात.  आगामी काळात लग्नसराई असून महिलांना 50 % सवलतीमुळे प्रवासी संख्येत  मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार विभाग नियंत्रक बी.सी. जगनोर यांनी साध्या नवीन 100  बसेचा मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून नवीन 100  साध्या बसेस व 141 इलेक्ट्रिक बसेस मिळाव्या अशी मागणी केली होती. त्यानुसार 10 नवीन साध्या बसेस प्राप्त झाल्या असून ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.  

            राज्यात लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस ही आता नव्या रूपात सर्वांसमोर येत आहे. वातावरणातील प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पर्यावरणपूरक पाचोरा 21, मुक्ताईनगर 17, चोपडा 21 तर जिल्ह्यातील इतर भागांसाठी 62 अश्या 141  इलेक्ट्रिक बसेसला पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने मान्यता दिली असून लवकरच जिल्ह्यातील प्रवाश्यांच्या सेवेसाठी टप्याटप्याने दाखल होणार आहे. जळगाव, पाचोरा , चोपडा व मुक्ताईनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात  येणार असल्याचेही श्री. जगनोर यांनी सांगितले.

उत्पन्न वाढीत जळगाव विभाग महाराष्ट्रात प्रथम

            पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय नियंत्रक बी एस जगनोर यांच्या नेतृत्वाखाली विभागातील चालक, वाहक, यांत्रिक व इतर कर्मचारी तसेच पर्यवेक्षकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या सांघिक प्रयत्नाने दिवाळी -2022 या कालावधीत उत्पन्न व प्रवास कि.मी. मध्ये वाढ करून विभागाला महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर ठेवण्यात यश प्राप्त झाले होते. तसेच सध्या लग्नसराई असून महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलतीमुळे प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यामुळे उन्हाळी गर्दी हंगाम -2023 मध्ये जळगाव विभाग उत्पन्नवाढी मध्ये  राज्यात प्रथम क्रमांकावर आल्याने विभाग नियंत्रक यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महिलांच्या प्रवासवारीने एसटी महामंडळ झाले मालामाल

            शासनाने महिलांना बस भाड्यात 50% सवलत दिल्याने जळगाव जिल्ह्यात दररोज तब्बल 1 लाख महिला प्रवास करीत आहे. एकूण प्रवासी संख्येपैकी 40% प्रवासी या महिला आहेत. 1 मे ते 10 मे या 10 दिवसाच्या कालावधीत मंडळाला 10 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाल्याने जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रात प्रथम आला आहे. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्न वाढीत महिलांची प्रवासवारी लाभदायक ठरत आहे.

            लोकार्पण सोहळ्याला आमदार चिमणराव पाटील, विभाग नियंत्रक बी. सी. जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, कामगार अधिकारी कमलेश भावसार, उपअभियंता अजय पाटील, अर्चना भदाणे, डेपो मॅनेजर संदीप पाटील, विजय पाटील, आर. के. पाटील, राहुल पाटील, एस टी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग नियंत्रक बी सी जगनोर  यांनी केले. त्यांनी विभागातील सांघिक प्रयत्न॔बाबत माहिती विशद केली. सूत्रसंचालन कामगार अधिकारी कमलेश भावसार  यांनी तर आभार डेपो मॅनेजर संदीप पाटील यांनी मानले.

00000

शेतकऱ्यांना पीक कर्जासह खते, बि-बीयाणे वेळेत उपलब्ध करून द्यावेत पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न

 






            जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) :  मोसमी पावसाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागतीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज, बि- बियाणे, रासायनिक खतांचा साठा वेळेत उपलब्ध करून द्यावा. शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरीत करताना सी-बिलचा निकष लावणाऱ्या बँकावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

            जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अजिंठा विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार एकनाथ खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी वैभव शिंदे आदी उपस्थित होते.

विविध योजनांचा घेतला आढावा

            या बैठकीत पालकमंत्री श्री. पाटील यांनी कापूस बियाणे मागणी व नियोजन, रासायनिक खतांचा वापर, प्रधानमंत्री पीक विमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना, मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया योजना, कृषी यांत्रिकीकरण योजनेतंर्गत कृषी औजारे वाटप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा), चाऱ्याची आवश्यकता व उपलब्धता, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, नैसर्गिक आपत्ती नुकसानाबाबत जिल्हास्तरीय हंगामपूर्व आढावा बैठकीत आढावा घेऊन सविस्तर माहिती जाणून घेत आढावा घेतला. खरीप हंगामपूर्व माहितीचे सादरीकरण जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी केले.

खरिपासाठी सात लाख 70 हजार हेक्टर क्षेत्र

            पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, जिल्ह्यात एकूण वहितीखालील क्षेत्र 8.48 लाख हेक्टर असून खरिप क्षेत्र 7.70 लाख हेक्टर आहे. जिल्ह्यातील प्रमुख पिकांत कापसाचे प्रस्तावित क्षेत्र 5.50 लाख हेक्टर, व इतर 2.13 लाख हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. यानुसार एकूण प्रस्तावित क्षेत्र 6.63 लाख हेक्टर आहे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केलल्या बियाणे, खतांचे पक्के बिल विक्रेत्याकडून घ्यावे. जिल्हा व तालुकास्तरावरील भरारी पथकांमार्फत दुकांनाची तपासणी करावी.

शेतकऱ्यांना योजनांची माहिती द्या

            बियाणे व खतांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देत तक्रार घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून द्यावा. ‘मनेरगा’सह शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. शेतीसाठी अखंड वीज पुरवठा होईल, असे वीज वितरण कंपनीने नियोजन करावे. पावसाची अनिश्चितता लक्षात घेता जलयुक्त शिवार योजना, ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ यासारख्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईसाठी पहिल्या टप्प्याचा निधी वितरित होत आहे. उर्वरित दोन टप्प्यातील निधीही तत्काळ वितरित करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने वेळोवेळी तातडीने मदत जाहीर केली आहे. मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळीचा जळगाव जिल्ह्यातील 18 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना 20 कोटी 42 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

पीक कर्ज वितरणाला गती द्या

            जिल्ह्यात खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत 728 कोटी 94 लक्ष पीक कर्ज वाटप उदिष्टापैकी 48 टक्के म्हणजे 348 कोटी 86 लक्ष पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे, तर राष्ट्रीयकृत बँक (860 कोटी 96 लक्ष), ग्रामीण बँक (26 कोटी 32 लक्ष)   व खासगी बँक (323 कोटी 35 लक्ष) असे पीक कर्ज वितरणाचे उदिष्ट असताना पीक कर्ज वितरण समाधानकारक झाले नाही. एकूण 1939 कोटी 58 लक्ष उदिष्ट असून त्यापैकी केवळ 348 कोटी 86 लक्ष पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व बँकांनी पीक कर्ज वितरणाला गती द्यावी. मागील वर्षी सर्व बँकांमिळून 2 लक्ष 42 हजार 204 शेतकऱ्यांना 2149 कोटी उद्दिष्टापैकी 1794 कोटी 39 लक्ष म्हणजे 84% पिक कर्ज वाटप करण्यात आले होते.

विविध पथकांची स्थापना

            पालकमंत्री श्री. पाटील यांच्या सूचनेनुसार यावर्षी गुणवत्ता नियंत्रण कार्यवाहीसाठी निरिक्षक निहाय व महिना निहाय नियोजन केलेले असून जिल्ह्यातील बियाणे खते व कीटकनाशके उत्पादन स्थळ व साठवणूक स्थळ तपासणी तसेच जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील उत्पादकांचे साठवणूक स्थळ यांची तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण 16 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे, असे श्री. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

विविध कामांचे झाले उद्घाटन

            पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते बांधावर 10 टन खताच्या वितरणासाठी हिरवी झेंडी दाखविण्यात आली. कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत जिल्ह्यातील 5 हजार 45 लाभार्थ्यांना 31 कोटी 24 लाख रुपयांचे ट्रक, तर, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, नांगर व अनुषंगिक औजारे अनुदान प्रातनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकाची पाहणीही मान्यवरांनी केली. खरीप हंगाम सन 2022 राज्यस्तरीय ज्वारी पिक अंतर्गत शासनाने निवड केलेल्या ज्ञानेश्वर चिंतामण पाटील गहुखेडे ता. रावेर व अर्जुन दामू पाटील वडगाव ता, रावेर या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला.

‘पोकरा’ योजना शेतकऱ्यांसाठी वरदान

            पालकमंत्री श्री. पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पोकरा’प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात एकूण ४६० गावांची निवड करण्यात आली असून आतापर्यंत जिल्ह्यातील १ लक्ष ४ हजार ३९५ शेतकऱ्यांची नोंदणी केलेली असून त्यापैकी आज पावेतो ७० हजार ३०१ शेतकरी बांधवांना रक्कम रुपये ४९९ कोटी ८८ लक्ष इतका रकमेचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. तसेच ६२१३ लाभार्थ्यांचे ५७ कोटी २१ लक्ष चे अनुदान वितरण अंतिम टप्यात आहे. यात ठिबक सिंचन संच, शेळी पालन, शेडनेट गृह, शेततळे, पॉली हाऊस, इलेक्ट्रिक मोटारपंप, फळबाग व वनिका आधारित शेती, पाईप, रेशीम उद्योग अश्या 22 प्रकारच्या बाबींवर रुपये ४९९ कोटी ८८ लक्ष इतके अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलेले आहे.  त्यामुळे पोकरा योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे, असे यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

            यावेळी आमदार श्री. खडसे, श्री. सावकारे, श्री. पाटील यांनी महत्वपूर्ण सुचना केल्यात. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. ठाकूर यांनी प्रास्तावित केले. त्यांनी सन 2022-23 व सन 2023-24 मधील योजनानिहाय उदिष्ट व सद्यस्थितीची माहिती विशद केली. जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. शिंदे यांनी आभार मानले. 

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणतात…

*  बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या दुकानांचा परवाना रद्द करावा

* शेतकऱ्यांनी खरीप पूर्व मशागतीची कामे करताना स्वत:ची काळजी घ्यावी

* शक्यतोवर सकाळीच शेतशिवारातील कामे उरकून घ्यावी

* शेतकऱ्यांनी एक जूननंतरच पेरणी करावी

* एकाच पिकावर अवलंबून न राहता मुख्य पिकाबरोबर आतंर पिके घ्यावीत

* अत्याधुनिक शेतीसाठी कृषी विभागाने शेती शाळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे

* खरिपासाठी उत्कृष्ट दर्जाचे बियाणे, खते व पीक कर्ज वेळेत उपलब्धतेसाठी नियोजन करावे

* पावसाविषयीचे अंदाज, माहिती बांधापर्यंत पोहोचवावी

* वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत

* वीज वितरण कंपनीने दुरुस्ती, विस्ताराची कामे वेळेत पूर्ण करावीत

00000