Monday, 28 August 2023

स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले यांचा सार्थ अभिमान - पालकमंत्री गुलाबराव पाटील स्वातंत्र्य सैनिकांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी प्रशासन कटीबध्द – जिल्हाधिकारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त निमित्त जिल्ह्यातील २२४ स्वातंत्र्य सैनिक व कुटुंबीयांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन्मान

 




        जळगाव, दि.२८ ऑगस्ट (जिमाका)- स्वातंत्र्य सैनिकांचा व कुटुंबीयांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील २२४ स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री पाटील म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या कालखंडात अनेक महापुरुषांचे योगदान लाभले आहे. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान फार मोलाचे आहे. त्यांचा सन्मान करतांना मनात देशाविषयी गौरवाची भावना निर्माण होते. स्वातंत्र्य सैनिकांचा आदर्श ठेवत तरूणांनी देशसेवेसाठी पुढे यावे.

जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळे आज आपण मुक्तपणाने जीवन जगत आहोत. स्वातंत्र्य सैनिकांच्या जिल्हापातळीवरील तक्रारींची निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबध्द आहे‌. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी चोपडा येथील स्वातंत्र्य सैनिक मोहनलाल छोटालाल गुजराथी यांनी वयाचे १०० वर्ष पूर्ण केल्याबाबत त्यांना पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, ट्रॉफी व शाल देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते जागेवर जाऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी काही जेष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना प्रकृतीच्या कारणास्तव व्यासपीठावर उपस्थित राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचा ही पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी जागेवर जाऊन सन्मान केला.

कार्याक्रमाच्या यशस्वितेसाठी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, लिपिक अनिल पठाडे,  दिनकर मराठे, चंद्रकांत कुंभार, प्रेमराज वाघ, राजश्री पाचपोळ, जिज्ञा भारंबे, मनिषा राजपूत, सुमती मनोरे व स्मिता महाजन  यांनी परिश्रम घेतले.

०००००००००००


Thursday, 24 August 2023

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ते 29 कालावधीत क्रीडा स्पर्धां सर्व वयोगटासाठी स्पर्धांचे आयोजन

         जळगाव, दि.24 ऑगस्ट (जिमाका) -  राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी व विविध खेळ संघटनामार्फत 27 ते 29 ऑगस्ट कालावधीत विविध  क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धा 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता पुरुष व महिलांकरिता स्पर्धा घेण्यात येतील. यात  18 ते 40 वयोगटात -100 मीटर धावणे, योगा, फुटबॉल, बॅडमिटन कॅरम, आर्म रेसलींग, वयोगट 41 ते 60 करिता - 50 मीटर धावणे, 300 मीटर धावणे, 1 कि. मी. चालणे, खो-खो, योगा, कॅरम, चेस बॅडमीटन, अर्म रेसलींग, लंगडी, लिंबु चमचा तसे 60 पेक्षा जास्त असलेल्या वयोगटासाठी – 300 मीटर चालणे, 1 कि मी चालणे, चेस, कॅरम स्पर्धा घेण्यात येईतील. तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महसूल विभाग, पोलीस विभाग, वित्त विभाग यांनीही विविध खेळाचे आयोजन  करावयाचे आहे. खो-खो स्पर्धा व. वा. वाचनालय, कॅरम व बुध्दिबळ स्पर्धा कांताई हॉल  व  इतर स्पर्धा श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे होतील.

हॉकी खेळाचे खुल्या गटातील मुले व मुलींचे सामने 29 ऑगस्ट रोजी सकाळी  8.30 वाजता होणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 1  वाजेपर्यन्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधून आधारकार्डची झेरॉक्स प्रत जोडून आपल्या नावाची नोंदणी करावी. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा. असे  आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांनी केले.

000000

दुचाकीसाठी पसंतीच्या क्रमाकांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

             जळगाव, दि.24 ऑगस्ट (जिमाका) -  दुचाकी वाहनांच्या क्रमांकाची नवीन नोंदणी एमएच-19/ईएफ - 0001 ते 9999 ची मालिका सुरू करण्यात येणार आहे.  नवीन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास 25 ऑगस्ट 2023 पर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत संपर्क साधावा. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्काचा डीडी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे सादर करावा. वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाचे आहे. त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी सलग्न मोबाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे.

            सदर आकर्षक क्रमांकाचे पावती प्राप्त झाल्यावर सदर पावती ही वितरकाकडे वाहन नोंदणी करणेकामी देणे बंधनकारक असल्याची नोंद घ्यावी.  पावतीची विधीग्राह्यता ही फक्त 30 दिवस नोंद घेण्यात यावी.

            एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास क्रमांकाच्या बाबतीत 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वाढीव शुल्काचा धनाकर्ष/धनादेश स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक बहाल करण्यात येईल. उर्वरित अर्जदारास त्यांचे धनादेश परत करण्यात येतील. असे ही श्री.लोही यांनी कळविले आहे.

0000000

Wednesday, 23 August 2023

निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे अभिव्यक्ती मतांची स्पर्धा १५ सप्टेंबर पर्यंत स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

 जळगाव,दि.२३ ऑगस्ट (जिमाका) - सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करणे, तसेच विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना व सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 'अभिव्यक्ती मताची' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत या स्पर्धामध्ये जनसंज्ञापन, वृत्तपत्रविद्या तसेच सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

याबाबत माहिती देताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर म्हणाले की, या स्पर्धेत ध्वनी चित्रफित, जाहिरात निर्मिती, पोष्टर अर्थात भित्तीपत्रक आणि घोषवाक्य या तीन प्रकारात स्पर्धा होणार आहे. या तीनही स्पर्धाचे विषय आणि नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या स्पर्धेचे विषय युवा वर्ग आणि मताधिकारी, मताधिकार लोकशाहीचा स्तंभ, एका मताचे सामर्थ्य, सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका, लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार असणार आहे. तीनही स्पर्धाचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे. जाहिरात निर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक एक लाख, दुसरे पारितोषिक ७५ हजार, तिसरे पारितोषिक ५० हजार रुपये आहे. दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी दहा हजार रुपयांची असणार आहे. भित्तीपत्रक स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक ५० हजार, दुसरे पारितोषिक २५ हजार, तिसरे पारितोषिक दहा हजार रुपये असणार आहे. दोन उत्तेजनार्थं पारितोषिके प्रत्येकी पाच हजार असणार आहे. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक २५ हजार, दुसरे पारितोषिक १५ हजार, तिसरे पारितोषिक १० हजार आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी पाच हजार रुपयांची आहेत. 

जिल्ह्यातील पत्रकारीता मास मिडिया संबंधित तसेच कला शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

                                                            ००००००००००००

Tuesday, 22 August 2023

जिल्ह्यातील कमी पाऊस झालेल्या मंडळाच्या अधिसूचना महसूल व कृषी विभागाने तात्काळ प्रसिद्ध कराव्यात ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीष महाजन‌ यांच्या सूचना

 जळगाव,दि.22 ऑगस्ट (जिमाका) - जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळांमध्ये सलग 21 दिवस 2.5 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ देण्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील मंडळांबाबत महसूल व कृषी विभागाने अधिसूचना तात्काळ प्रसिद्ध करावी. अशा सूचना राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या आहेत.

जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्यामुळे खरीप पिकांच्या वाढीवर तसेच संभाव्य उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत राज्य सरकारच्या सर्वसमावेशक पीक विमा योजने च्या माध्यमातून प्रतिकूल हवामान परिस्थिती (Mid Season Adversity) च्या निकषांमध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडल्यास (म्हणजे ज्या महसूल मंडळात 2.5 मिलीमीटर पेक्षा कमी पावसाची नोंद झाल्यास) या महसूल मंडळांना 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई विम्याच्या निकषाप्रमाणे देय आहे.

शासन निकषांनुसार जिल्ह्यातील पात्र ठरणाऱ्या मंडळांच्या अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे काम महसूल व कृषी विभागाने तातडीने करावे. असा सूचना ग्रामविकास मंत्री श्री.महाजन यांनी दिल्या आहेत.

००००००००००००

नोंदणीकृत संस्था तपासणी समितीवर अशासकीय सदस्य पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, दि.22 ऑगस्ट (जिमाका) -  नोंदणीकृत संस्थांच्या तपासणी करण्याकरिता जिल्हा स्तरावर तपासणी समिती गठीत करावयाची आहे. या समितीवर अशासकीय सदस्य निवडीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.यासाठी 30 ऑगस्ट 2023 पर्यंत महिला व बालविकास विभागाकडे अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी केले आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या कलम 4 नुसार समितीची स्थापन करण्यात येत असते. बालहक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी समुहाचा एक सदस्य तसेच बालकांसोबत काम करण्याचा अनुभव असलेला मानसोपचार तज्ज्ञ एक सदस्य यांची संस्था तपासणी समितीत निवड करावयासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

प्रस्ताव सादर करणाऱ्या अशासकीय सदस्य किमान पदवीधर असणे आवश्यक असून बाल हक्क, काळजी व संरक्षण आणि कल्याण क्षेत्रातील किमान दहा वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. सदस्यांचे वय 35 वर्षापेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. अशासकीय सदस्यांचा कालावधी नेमणूकीपासून  तीन वर्षाचा राहील.

            तरी इच्छुक व पात्र व्यक्तीनी आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव आपल्या वैयक्त‍िक  माहिती  व फोटोसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला, आकाशवाणी  केंद्राजवळ जळगाव या पत्त्यावर दोन प्रतीत अर्ज सादर करण्यात यावा. असे आवाहन श्रीमती सोनगत यांनी केले आहे.

००००००


 

नगरपरिषदांमध्ये 18 जणांना‌ अनुकंपा नियुक्ती जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप


             जळगाव, दि.22 ऑगस्ट (जिमाका) - जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीकडील दिवंगत अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या १८ वारसांना शासकीय नियुक्ती देण्यात आली आहे‌. नियुक्ती पत्रांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत , पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाटप करण्यात आले. यावेळी नोकरी प्राप्त उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

            जिल्हास्तरीय गट 'क' व 'ड' ची सामायिक प्रतिक्षा सूचीतील १८ उमेदवारांना जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहेत. शिफारस यादीतील या पात्र उमेदवारांना भुसावळ, पाचोरा, रावेर,  चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, जामनेर, फैजपूर या नगरपरिषदेत नियुक्ती देण्यात आली.

            कार्तिक ढाके, जुबेर अब्दुल सत्तार गवळी, ज्ञानेश्वर रिजल, वाजिद खान मुसा खान, शुभम भांडे, जयेश सोनार,‌ आरिफ बेग सरवर बेग, धीरज वारे, गौरव सपकाळे (भुसावळ), भावेश पाटील, मयुर पाटील, शितल कंडारे (पाचोरा), प्रभात बागरे (रावेर), आशितोष राजपूत (चाळीसगाव), धनंजय पाटील (अमळनेर), तुषार साळुंखे (चोपडा), उदय पारधे  (फैजपूर), दिनेश मनोहर दलाल (जामनेर) या उमेदवारांना लिपिक,‌वाहनचालक, शिपाई , फायरमन, पंप‌ ऑपरेटर, प्रयोगशाळा सहायक, व्हॉलमन, फायरमन या पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्यात आली आहे.

०००००००


महसूल अधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनमधून नवीन चारचाकी वाहने

 


जळगाव, दि.२१ ऑगस्ट (जिमाका) – जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून जिल्हा महसूल प्रशासनाला आज चार नवीन वाहने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आल्या. यावेळी आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण ,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थ‍ित होते.

जिल्हा नियोजन समितीच्या मध्यमातून प्रत्येकी ८ लाख रूपये किंमत असलेले चार नवीन महेंद्रा बोलेरा वाहने खरेदी करण्यात आली होती. जळगाव उपविभागीय अधिकारी, तहसीलदार एरंडोल, चाळीसगाव व रावेर यांना महसूली कार्यालयांना वाहने हस्तांतरित करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड,जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, तहसीलदार विजय बनसोडे, संबंधित प्रांतधिकारी व तहसीलदार उपस्थ‍ित होते. 

000000000


कवयित्री बहिणाबाई चौधरी पुतळा व वारकरी भवन उभारण्यास मान्यता ! - पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यातील ६४ ठिकानी क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मान्यता बहिणाबाई स्मारकासाठी 12 कोटी उपलब्ध करून देणार- ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न






जळगाव, दि.21 ऑगस्ट (जिमाका) – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हा नियोजन बैठकीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात  बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा बसविण्यासाठी 1 कोटी रूपये व खेडी येथे अद्यावत वारकरी भवन उभारण्यासाठी  7 कोटी रूपयांच्या ठराव करून या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील ६४ ठिकाणांना क वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मस्थान असोदा येथे बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी ग्रामविकास व पर्यटन विभागाकडून 12 कोंटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याठिकाणी भव्य स्मारक साकारण्याचे काम बांधकाम विभागाने करावे. असे निर्देश यावेळी ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी दिले. केळी विकास महामंडळाला हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्याची घोषणाचे ठराव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी  यावेळी मांडला. या ठरावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. याबैठकीला ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरिष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेश पाटील, आमदार सर्वश्री लता सोनवणे, आ.चिमणराव पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. राजुमामा भोळे, आ. संजय सावकारे, आ. किशोर पाटील, आ.चंद्रकांत पाटील, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख उपस्थ‍ित होते.      

बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वार्ष‍िक योजना 2022-23 चा आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी पालकमंत्री म्हणाले, आगामी काळात विविध निवडणूकांमुळे आचारसंहिता लवकर लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासकामांसाठी कमी दिवस आहेत. तेव्हा जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका व राज्य शासकीय यंत्रणाच्या विभाग प्रमुखांनी योग्य नियोजन करून शंभर दिवसात प्रशासकीय मान्यता, वर्क ऑर्डर आदी प्रक्रिया तात्काळ पार पाडून शंभर टक्के निधी खर्च करण्याची कार्यवाही करावी.

 

महावितरण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध फिडर, सबस्टेशन व मुख्य सौर कृषी वाहिनी योजनेच्या प्रलंबित कामांना गती देण्यात यावी. वीजचोरीला आळा घालण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे. लोकप्रतिनिधी महावितरणकडील प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात यावी. असे निर्देश ही यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

आमदार मंगेश चव्हाण यांनी रस्त्यांबाबत उपस्थ‍ित केलेल्या प्रश्नांवर पालकमंत्री म्हणाले, चाळीसगाव - जळगांव रस्त्यावर खूप खड्डे झाले आहेत. चोपडा - बुन्हानपूर रस्ता रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत. चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात यावे. जिल्ह्यातील प्रलंबित सुमारे एक हजार कोटींच्या रस्ते कामांना तात्काळ वर्क ऑर्डर देण्यात यावी. जल जीवन मिशन मिशन मध्ये पाणी दिलेल्या गावांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोलर बसविण्यात यावेत. भुसावळ, मुक्ताईनगर व जळगाव येथे प्रलंबित सीसीटीव्ही बसविण्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करावी. प्रत्येक जिल्ह्यात अण्णाभाऊ साठे स्मृती भवन (अभ्यासिका व प्रशिक्षण केंद्र सुरु) बांधकामसाठी टाईप प्लान आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्याकडून मंजूर करून महसुली जागा उपलब्ध करून घ्यावी. परिवहन विभागाच्या रस्ता सुरक्षा अंतर्गत सादर प्रस्तावानुसार 70 ठिकाणी अपघात प्रवण भागात सार्वजनिक विभागाने तात्काळ कामे मंजूर करावीत. असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.

प्रलंबित कामांच्या तात्काळ वर्क ऑर्डर द्या - ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन

जिल्हा व शहरात रस्त्यांच्या दुरूस्तीचे कामे प्रलंबित आहेत. या कामांना तात्काळ गती देण्यात यावी.असे निर्देश ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरिष महाजन यांनी या बैठकीत दिले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी महावितरणमधील आऊटसोर्स भरतीतील अनियमतेबाबत विचारलेल्या प्रश्नावर श्री.महाजन म्हणाले, महावितरण आऊटसोर्स भरती मधील संबंधित कंपन्यांनी चौकशी करण्यात येऊन दोषी व्यक्तींवर कार्यवाही करण्यात यावी. जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासणार नाही.याची कृषी विभागाने काळजी घ्यावी. जिल्हा क्रीडा संकुलांची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी. पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च होतो किंवा नाही. याचा आढावा गटविकास अधिकारी यांनी घ्यावा. असे निर्देश ही ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी दिले.

शेतकऱ्यांच्या मदतींसाठी तत्परतेने काम करा - मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून शासन काम करत आहे. केळी पिक क्षेत्राचा शंभर टक्के पीक विमा काढण्यात यावा. पीक विम्यापासून कोणी शेतकरी वंचित राहू नये. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 18 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. वंचित शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्तींचे लाभ देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परतेने काम करावे. असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी यावेळी दिले.

यावेळी अनुकंपा प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना शासकीय नोकरीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. यावेळी नोकरी प्राप्त उमेदवारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. 

बैठकीत मंजूर झालेले ठराव असे

आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध महत्वाचे ठराव करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यात 14 प्राथमिक आरोग्य केंद्र व 109 उपकेंद्र स्थापन करण्यास करण्याच्या ठराव.

जिल्ह्यात रोजगार निर्मिती होण्यासाठी पर्यटन विकास आराखडा तयार करुन शासनास मंजुरीस्तव सादर करण्यासाठी मान्यता,

जळगाव येथे किंवा जळगाव लोकसभा मतदार संघात कुठेही नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करणे, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शासनाच्या  ग्रामविकास विभागाकडून कमीत कमी 10 याप्रमाणे एकूण 150 फर्निचरसह ग्रामपंचायती इमारती बांधकामासाठी प्रत्येकी 25 लक्ष प्रमाणे 40 कोटींचा प्रस्ताव राज्यस्तरावरुन मंजुरी व निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी मान्यता देणे,

 शासन आपल्या दारी उपक्रम 26 जुन 2023 रोजी जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबविल्या बाबत तीनही मंत्र्यांचे, खासदार, आमदार व जिल्हा प्रशासन यांचे अभिनंदन ठराव.,  जिल्ह्यात पोलीस पाटील व कोतवाल भरती प्रक्रिया पारदर्शापणे राबविल्या बद्दल तसेच अवैध धंद्यांवर मोहीम राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन ठराव,

महाऊर्जा (MEDA) विभागामार्फत जिल्ह्यातील ज्या - ज्या शाळांना आजही विजेची सोय नाही किंवा वीज बिल भरु शकत नाही अशा शाळांना सौर उर्जा प्रकल्प बसविणे बाबत ठराव,

जि.प.ची जुनी इमारत जीर्ण झाल्याने जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारत बांधकामास ग्रामविकास विभागाकडून मान्यता मिळणे बाबत  असे महत्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

000000

Friday, 18 August 2023

विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ ची सुरवात शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे

 जळगाव, दि.१८ ऑगस्ट (जिमाका) - राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत 'महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे' आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या  नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळ www.msins.in अथवा स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या  www.schemes.msins.in या पोर्टलला भेट द्यावी. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

या उपक्रमाचे अनावरण १५ जुलै २०२३ रोजी  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथे करण्यात आले. राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी नवउद्योजक व त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे तसेच या नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरवणे हे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातील कोणत्याही महाविद्यालय अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी /विद्यार्थीनी किंवा जास्तीत जास्त ३ विद्यार्थ्यांचा समूह पात्र असेल. तसेच अर्ज करण्यासाठी विद्यार्थी /विद्यार्थिनी /समूहाकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे. या उपक्रमाच्या नोंदणी करिता शैक्षणिक संस्था १५ ऑगस्टपर्यंत  आणि उमेदवार त्यांच्या संबंधित संस्थेच्या नावाखाली ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये अर्ज करु शकतील.

हा उपक्रम ३ टप्प्यात आयोजित करण्यात येणार असून प्रथम टप्प्यात राज्यातील महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इतर शैक्षणिक संस्थांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यानंतर त्या संस्थेतील विद्यार्थी स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये आपल्या नवसंकल्पनांचे अर्ज करू शकतील. संस्थास्तरावर उत्तम दोन संकल्पनांची निवडही प्रथम टप्प्यात करण्यात येईल.

या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्यात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या उत्तम संकल्पनांमधून, सर्वोत्कृष्ट १०० संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल. निवडलेल्या १०० नवउद्योजकांसाठी विशेष एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातून सर्वोत्कृष्ट १० विजेते निवडले जातील. सर्वोत्कृष्ट १० विजेत्यांमध्ये, ३० टक्के महिला, ५० टक्के औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी व One District One Product (ODOP) संबंधित नवसंकल्पनांना प्राधान्य असेल. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी रुपये १ लाख बीज भांडवल देण्यात येणार आहे.

 

या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील १० अशा एकूण ३६० नवउद्योजकांना १२ महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम दिला जाणार असून इन्क्युबेशन प्रोग्रामनंतर या ३६० नवसंकल्पनांचे राज्यस्तरीय  सादरीकरण करण्यात येणार आहे. यातून सर्वोत्कृष्ट १० नवउद्योजकांना प्रत्येकी रूपये ५ लाखांचे बीज भांडवल देण्यात येणार आहे. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे शैक्षणिक संस्था व जिल्ह्यांना या उपक्रमाची व्याप्ती वाढवून राज्याची नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विशेष परितोषिकेही दिले जाणार आहेत. असे ही श्री.मुकणे यांनी सांगितले आहे.

000000

शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष साठी माहिती पाठविण्याचे आवाहन

           जळगाव, दि. १८ ऑगस्ट (जिमाका) - जिल्हा सांख्यिकी कार्यालयातर्फे शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी (DDO) अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी. असे आवाहन जिल्हा सांख्यिकी उपसंचालक रा. पु. बोरसे प्रसिध्दी दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यास विलंब टाळण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी विहीत वेळेत प्रथम प्रमाणपत्र प्राप्त करुन घेत व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला अचूक माहिती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी संगणकीय आज्ञावलीत भरल्याची  खात्री करून घ्यावी.  अधिक माहितीसाठी  समीर भालेराव, (सहायक संशोधन अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय जळगाव) यांचेशी (०२५७)-२९९७०५७ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहनही उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालया मार्फत करण्यात आले आहे.

०००००


 

ऑनलाईन महिला लोकशाही दिनाचे 21 ऑगस्ट रोजी आयोजन ई-मेलद्वारे तक्रारी पाठविण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 18 (जिमाका )- जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

समस्याग्रस्त व पीडित महिलांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, समाजातील पिडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो.

या लोकशाही दिनी ज्या महिलांना अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई- मेलवर पाठवावा. तसेच अर्जामध्ये आपला व्हॉटसॲप क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन या लोकशाही दिनाची लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.

अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल आयडी खालीलप्रमाणे - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव- dwcwjal@gmail.com, तहसीलदार जळगाव - tahasildarjalgaon@gmail.com, तहसीलदार जामनेर- tah.jamner@gmail.com, तहसीलदार एरंडोल- erandoltahsil123@gmail.com, तहसीलदार भुसावळ- tahsilbhusawal@gmail.com, तहसीलदार धरणगाव- dharangaon2014@gmail.com, तहसीलदार बोदवड- tahsilbodwad@gmail.com तहसीलदार यावल- tyawal@gmail.com, तहसीलदार रावेर- tahsilraver@gmail.com, तहसीलदार भडगाव- tahsildarbhadgaon@gmail.com, तहसीलदार चाळीसगाव- tahsildar40gaon@gmail.com, तहसीलदार अमळनेर- amalnertahsil@gmail.com, तहसीलदार पारोळा- parolatahsil@gmail.com, तहसीलदार पाचोरा-  tahsilpachora@gmail.com, तहसीलदार मुक्ताईनगर- tahsilmkt@gmail.com, तहसीलदार चोपडा- tahsildarchopda@gmail.com  तरी संबंधित तालुक्यातील महिलांनी आपल्या तालुक्याचे तहसीलदार यांचे‌ ई- मेलवर अर्ज पाठवावे. असेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

सद्भभावना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ





             जळगाव, दि. 18 (जिमाका)- माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती अर्थात सद्भभावना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

            यावेळी परिविक्षाधिन जिल्हाधिकारी अर्पित चौहान, उपजिल्हाधिकारी (महसूल) गजेंद्र पाटोळे, अप्पर जिल्हाधिकारी (विशेष भूसंपादन) श्रीमती जयश्री माळी, तहसीलदार (सामान्य प्रशासन) विजय बनसोडे, तहसीलदार (संगायो) जितेंद्र कुंवर, तहसीलदार (कुळकायदा) श्रीमती उषाराणी देवगुणे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भभावना दिनानिमित्त शपथ दिली.

00000

Friday, 11 August 2023

तरसोद येथे माजी सैनिकाच्या हस्ते शिलाफलक अनावरण जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती ग्रामस्थांनी घेतली पंच प्रण प्रतिज्ञा








             जळगाव, दि.११ ऑगस्ट (जिमाका)- तालुक्यातील तरसोद येथील जिल्हा परिषद शाळेत ‘मेरी माटी मेरा देश’ हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. तरसोद येथील जिल्हा परिषद शाळेत स्वतंत्र शिलाफलक उभारण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सैनिक शामराव रामराव पाटील यांच्या हस्ते शिलाफलकावर पुष्पहार अर्पण करून अनावरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित ग्रामस्थांना पंच प्रण प्रतिज्ञा देण्यात आली. माजी सैनिक शामराव पाटील यांचा सत्कार जिल्हाधिकाऱ्यांनी केला. त्याचप्रमाणे ग्रामसेवक नरेंद्र साळुंके, मुख्याध्यापक मिलींद कोल्हे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांनी सत्कार केला.

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग -

या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, मदतनिस, आरोग्य सेविका, आशा वर्कर तसेच बचतगटाच्या सर्व महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याच कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

सेल्फी पॉईंटचे आकर्षण-

याठिकाणी मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत एक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. यात आलेल्या प्रत्येकाने आपापला सेल्फी काढून घेतला. यात जिल्हाधिकारी सुध्दा मागे राहीले नाहीत. एव्हढेच नाही तर प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांसमवेत गप्पा गोष्टी करत सेल्फी काढला.

या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी भरत कोसोदे, गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी आर.एम.सपकाळे, ग्राम पंचायत विस्तार अधिकारी पद्माकर अहिरे, श्री.पठाण, केंद्रप्रमुख अजय शिरसाट, सरपंच संतोष सावकारे, ग्राम पंचायत सदस्य पंकज पाटील, ग्रामसेवक नरेंद्र साळुंके, डॉ.जोशी, जि.प.शाळा तरसोदचे मुख्याध्यापक मिलींद कोल्हे, शिक्षक वृंद, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

००००००००००००००००

बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन ३१ ऑगस्ट अर्ज करण्याची अंतिम मुदत

 जळगांव, दि.११ ऑगस्ट (जिमाका)- केंद्र शासनाच्या वतीने बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बाल शक्ती पुरस्कार २०२४ साठी  www.awards.gov.in हया संकेतस्थळाचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 

ज्या मुलांनी (वय ५ पेक्षा अधिक १८ वर्षापर्यंतच्या)  शिक्षण, कला सांस्कृतिक कार्य खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा  क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे. अशांना बाल शक्ती  पुरस्कार दिला जातो.  

मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्या प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान ७ वर्षे काम करणाऱ्या व्यक्तिस वैयक्तीक गटात बालकल्याण पुरस्कार दिला जातो.  संस्था गटात बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला  पुरस्कार दिला जातो.  संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी . बालकल्याण क्षेत्रात किमान १० वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.असे ही श्रीमती सोनगत यांनी सांगितले.

                                                                     ०००००००

जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

  जळगाव, दि. ११ ऑगस्ट (जिमाका) - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येत आहे. वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळणे, आप-आपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटविण्याकरीता या लोक अदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे. जळगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. क्यु. एस. एम. शेख यांच्या अध्यक्षतेखाली लोक अदालत होणार आहे. या लोक अदालतीसाठी जिल्हा वकिल संघ, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे सहकार्य लाभणार आहे. 

यावेळी मोटार वाहन, ट्रॉफीक चलान, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसिपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटलांचे व खटला दाखलपूर्व प्रकरणे तसेच ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते, असे संपूर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जळगाव येथील औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालय येथील तडजोड योग्य प्रकरणे देखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत. 


 या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आप-आपसांत तडजोडीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून मोठया प्रमाणावर खटले ठेवण्यात आले आहेत. तसेच या राष्ट्रीय लोक अदालतीध्ये राष्ट्रीयकृत बॅका, कंपन्या यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम वसुली होवून मिळण्याची शक्यता आहे. वादपूर्व खटल्यामध्ये बँका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दूरध्वनी कार्यालय यांनी थकीत रक्कमेमध्ये सूट देण्याबबात प्रस्तावित केलेले आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

 ज्या पक्षकारांना तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढायची असतील. अशा संबधित सर्व पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांनी उपस्थित राहून तडजोडीने आप-आपले खटले निकाली काढावेत. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांनी सुद्धा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आलेली आहे. तरी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त खटले या राष्ट्रीय लोक अदालतीत सामोपचाराने निकाली काढावेत. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे.   

                                                                             ००००००

'एक गाव, एक वार्ड, एक गणपती' उत्सव साजरा करण्याचे आवाहन सामाजिक सलोखा वृध्दींगत होण्यास व विधायक कामांना गती मिळणार -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगावं, दि.११ ऑगस्ट (जिमाका) – सामाजिक सलोखा वृध्दींगत होण्यास व विधायक कामांना गती मिळण्यासाठी जिल्हयातील सर्व नागरिक, गणेश मंडळे, सरपंच , नगरसेवक व सर्व पदाधिकारी यांनी ‘एक गाव, एक वॉर्ड,  एक गणपती’ साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. 

राज्यात दरवर्षीप्रमाणे १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होणार आहे. ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेस विरोध करणेसाठी जनतेची एकजुट साधण्याकरीता व सामाजिक ऐक्य व सलोखा वृध्दींगत करणेकरीता लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करणेस सुरूवात केली. आज स्वातंत्र्याच्या अमृतकालामध्ये सामाजिक ऐक्य व सलोखा राखणे ही देशाची आर्थिक व भौतीक प्रगती साधण्याची पूर्व अट झालेली आहे. वर्तमानात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मुळ उद्देशाचा विसर नागरिकांना पडत चालल्याचे दिसून येत आहे. गल्लोगल्ली स्थापन झालेली गणेश मंडळांच्या माध्यमातून बऱ्याचदा राजकीय व सामाजिक तेढ निर्माण झाल्याच्या घटना घडत असतात.

सार्वजनिक स्वरूपात साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवात विदयार्थ्यांसाठी स्पर्धा, चर्चासत्र, महिलांसाठीचे उपक्रम, आरोग्य तपासणी, सांस्कृतीक कार्यक्रम इ. रचनात्मक कामांचे आयोजन करावे व उत्सवास बिभित्सपणा आणणारे फ्लेक्स, पोस्टर्स लावण्यास फाटा देण्यात यावा. सदर उत्सवात उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेश मंडळांना / ग्रामपंचायतीस / वॉर्डास सन्मानित करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.  जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद द्यावे. असे आवाहन ही श्री.प्रसाद यांनी केले आहे. 

                                                                              00000000

१३ ऑगस्ट रोजी ८ केंद्रावर तलाठी, कोतवाल पदांसाठी परीक्षा परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

        जळगाव, दि. ११ ऑगस्ट (जिमाका) :- जिल्हा प्रशासनाच्या वतीने १३ ऑगस्ट २०२३ रोजी पोलीस पाटील व कोतवाल रिक्त पदांसाठी जळगाव जिल्ह्यातील ८ परीक्षा केंद्रावर सकाळी ११ ते दुपारी १२.३० व दुपारी ३ ते ४ यावेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अशी माहिती उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली आहे.

परीक्षा केंद्र परिसरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (२) चे मनाई आदेश जिल्हादंडाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत. परिक्षा केंद्राजवळच्या ५० मीटरच्या आतील परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने हे वर परीक्षा कालावधीत पेपर सुरु झाले पासून ते पेपर संपेपर्यंतच्या बंद ठेवणेत राहतील.

सकाळ सत्रात‌ पोलीस पाटील व दुपार सत्रात कोतवाल या पदासाठी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे.  प्रतिबंधात्मक आदेश परीक्षार्थी, नियुक्ती अधिकारी -कर्मचारी, पोलीस, होमगार्ड यांच्या साठी लागू होणार नाही. असे ही श्री.सुधळकर यांनी कळविले आहे.

                                                               ०००००००००

Thursday, 10 August 2023

३ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव

          जळगांव, दि.१० ऑगस्ट (जिमाका)- प्रकल्प संचालक (आत्मा),  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी जळगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक पा.फ.साळवे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

सकाळी ९ पासून ते  दुपारी ३ वाजेपर्यंत पर्यंत रोटरी क्लब, मायादेवी नगर, महाड रोड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील,  ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील,  खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, महापौर जयश्री महाजन, आमदार राजू भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यावेळी उपस्थित राहणार आहेत.

मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये रान, जंगल तसेच शेत शिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या रानफळांचे महत्त्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे.  रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक असतात. मानवी आरोग्यामध्ये रानभाज्या शरीराला आवश्यक असणारे अन्न घटक, जीवनसत्त्वे, खनिजे व औषधी गुणधर्माबाबत परिपूर्ण असतात. या रानभाज्यांची ओळख, आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व पाककृती इ. बाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी, त्यांना गोडी लागावी. या उद्देशाने महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. तसे झाल्यास या भाज्यांची विक्री व्यवस्था वाढून त्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होईल.‌ महोत्सवा दरम्यान जिल्ह्यातील शेतकरी विविध रानभाज्या उदा. करटोली, आघाडा, पाचरी, घोळ, सांदळा कुई, गुळवेल, शेवगा, तरोटा, फांग इत्यादी रानभाज्या विक्रीसाठी आणणार आहेत. शेतकरी गटांमार्फत अस्सल रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

तालुकास्तरावर ९ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत हा महोत्सव सप्ताह स्वरूपात राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील उपलब्ध मालाच्या तपशीलासह आपल्या जवळच्उ कृषी कार्यालयाशी संपर्क करावा. जास्तीत जास्त नागरिकांना या रानभाज्या महोत्सवात खरेदीचा आनंदासाठी प्रोत्साहित करावे. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व आत्मा प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

०००००००००००००००००००००

जिल्हा प्राणी कलेष प्रतिबंधक सोसायटीमध्ये अशासकीय सदस्य पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

                 जळगांव, दि.१० ऑगस्ट (जिमाका) - जिल्हा प्राणी कलेष प्रतिबंधक  सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांची तीन वर्ष कालावधीसाठी नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी १७ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

गोशाळा, पांजरपोळ संस्थेचे अध्यक्ष, प्राणी विषयक कार्य करणारे सेवाभावी संस्थेचे सदस्य, प्राण्यांवर प्रेम करणारे , मानव हितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींनी विहित नमून्यात अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आधार कार्ड, पासपोर्ट साईज दोन फोटो, प्राणीमात्रांवर उल्लेखनीय काम केले असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र व चारित्र्य पडताळणी दाखला‌ सादर करणे आवश्यक आहे. पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) मार्फत जळगाव जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे १७ ऑगस्ट, २०२३ पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. अर्जासंबंधी व इतर माहितीसाठी तालुक्यातील पंचायत समिती‌ पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याशी संपर्क साधावा. असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त  यांनी कळविले आहे.

०००००००

१४ व १६ ऑगस्ट रोजी सहकार विभाग सरळसेवेची ऑनलाईन परीक्षा संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन

           जळगांव, दि.१० ऑगस्ट (जिमाका)- सहकार विभागातील क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदांसाठी १४ व १६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेचे प्रवेशपत्र https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावेत. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संतोष बिडवई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रवेशपत्राबाबत सूचना अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई - मेल आयडी यावर पाठविण्यात आल्या आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड करावयाची लिंक बाबतच्या सूचना सहकार आयुक्ताच्या  https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्दी करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांना या संकेतस्थळावरुन परिक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे आणि परीक्षेस येतांना त्यांची रंगीत प्रत सोबत ठेवावी. प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे. असे आवाहन ही श्री.बिडवई यांनी केले आहे.

०००००००००००००००००००००

जिल्हा समितीवर अध्यक्ष व सदस्य पदासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण जिल्हा स्थानिक तक्रार समिती

 जळगांव, दि.१० ऑगस्ट (जिमाका)-  कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा स्थानिक तक्रार समितीवर अध्यक्ष व सदस्य या पदासाठी १८ ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांना काम करण्यास पोषक आणि लैंगिक छळापासून मुक्त वातावरण मिळावे. या हेतूने कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ आणि ११ सप्टेंबर २०१४ च्या शासननिर्णयान्वये जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याची तरतूद आहे. या समितीच्या‌ अध्यक्ष पदासाठी  सामाजिक कार्याचा ५ वर्षांचा अनुभव असावा. महिलांच्या न्याय हक्कासाठी प्रतिबद्ध असलेली महिला अध्यक्ष म्हणून नेमण्यात येईल.

सदस्य पदांच्या दोन सदस्यांपैकी महिलांच्या न्याय हक्कासाठी प्रतिबध्द असलेली अशासकीय संघटन / संघ किंवा  लैंगिक छळाच्या विषयाशी परिचित असलेले स्त्री असावी, किमान एक सदस्यांची पार्श्वभूमी प्राधान्यतः कायदयाची असावी. तसेच कायदयाची पदवी घेतलेली असावी. व महिला व बालकांच्या क्षेत्रात कार्य केलेले असावे. तसेच किमान एक नामनिर्देशित सदस्य अनुसूचित जाती, जमाती, किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी. सदर स्थानिक तक्रार समितीचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा राहील. कोणत्याही अपराधासाठी दोशी ठरविलेल्या, कोणत्याही कायदयान्वये त्याच्या विरुद्ध अपराधी चौकशी प्रलंबित असेल तर सदर उमेदवार हे अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत.

पात्र उमेदवारांनी १८ ऑगस्ट पर्यंत जिल्हा व महिला बाल विकास कार्यालयात अर्ज सादर करावेत. असे आवाहनही श्रीमती सोनगत यांनी केले आहे.

००००००००००००००००००

जिल्ह्यात कंजक्टिव्हायटीस रूग्ण वाढले डोळ्यांची काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

 जळगांव, दि.10 ऑगस्ट (जिमाका)-  जिल्ह्यात कंजक्टिव्हायटीस (Conjunctivitis) हा डोळ्यांचा संसर्गजन्य रोग बळावला आहे. याबाबत नागरिकांनी जागरूक राहावे व स्वतःच्या डोळ्यांची काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

कंजक्टिव्हायटीस हा विषाणूजन्य संसर्ग रोग आहे. डोळयांचा विषाणूजन्य संसर्ग हा मुख्यत्वे ॲडिनो वायरस मुळे होतो. जो विशेषतः पावसाळयात होतो.  कधी कधी दोन्ही डोळयांवर त्याचा संसर्ग होतो. डोळे येणे हा सौम्य प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग असला तरी देखील याबाबत सर्व विभागाने दक्ष रहाणे आणि जनतेने आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.

कंजक्टिव्हायटीस आजाराची लक्षणे :-

डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांना खाज येणे चिकटपण येणे, डोळ्यांना सूज येणे,  डोळे लालसर होणे डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

डोळे आल्यास काय काळजी घ्यावी-

डोळे स्वच्छ पाण्याने सतत धुवावे, रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादी स्वतंत्र ठेवावेत.  इतर व्यक्तीच्या रुमाल टॉवलने डोळे पुसू नयेत. डोळ्यांना सतत स्पर्श करू नये. उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्म्याचा वापर करावा. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळयांची साथ पसरवतात. डॉक्टरांच्या सल्यानुसारच औषधी डोळयात टाकावीत. डोळयातून पाणी गळणे, डोळ्याला सूज येणे अशी लक्षण आढळतात अशा व्यक्तींनी आपला जनसंपर्क कमी करणे तसेच  नियमित हात धुणे आवश्यक आहे.  एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो,  त्यामुळे नियमित हात धुणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.

आरेाग्य विभागामार्फत सुरु असलेल्या उपाययोजना  -

वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत बाह्य रुग्ण स्तरावर रुग्णाची तपासणी व उपचार, समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविकांच्या मदतीने घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. आवश्यकता असल्यास रुग्णांना संदर्भ सेवा देण्यात येते, शाळा, अंगणवाडी, हायस्कूल, वसतिगृह, इ. ठिकाणी भेटी देऊन मुलांची तपासणी करण्यात येत आहे, आरोग्य शिक्षण व जनजागृती करणे सुरु आहे. RBSK पथकामार्फत शाळांमध्ये दैनदिन रुग्ण तपासणी करण्यात येत आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे.

००००००००००००००००००००

Wednesday, 9 August 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात माझी माती माझा देश अभियानात पंच प्रण प्रतिज्ञा



             जळगांव, दि.9 ऑगस्ट (जिमाका)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या सांगता कार्यक्रमाची आजपासून जिल्ह्यात ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमात पंच प्रण प्रतिज्ञा घेऊन सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उप जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात माती घेऊन पंच प्रण प्रतिज्ञा घेतली.

            यावेळी जळगाव उपविभागीय अधिकारी महेश सुधलकर, तहसीलदार पंकज लोखंडे, जितेंद्र कुंवर, विजय बनसोडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मी अशी शपथ घेतली आहे की, भारताला विकसित देश बनवायचे आहे तसेच २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृध्द वारसाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकाचे कर्तव्य बजावयाचे आहे, तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे. अशी पंच प्रण प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर सेल्फी व फोटो काढून https://merimaatimeradesh.gov.in/ प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यात आले.

000000000

 

Tuesday, 8 August 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 जळगाव, दि.८ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) - महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह १५ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महिला व बालविकास क्षेत्रात किमान २५ वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. यापूर्वी जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलितमित्र व सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त महिला पुढील पाच वर्षासाठी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत. विभागीय पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान ७ वर्ष काम केलेले असावे.यापूर्वी दलितमित्र पुरस्कार प्राप्त झालेला नसाव. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान १० वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्या महिला जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत. 

जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी अर्जदाराच्या कार्याचा तपशिल, वृत्तपत्र, छायाचित्रे, सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहे. यापूर्वी पुरस्कार मिळाले आहेत काय ? असल्यास तपशिल आवश्यक आहे. विभागीयस्तरीय पुरस्कारासाठी संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल, वृत्तपत्र, छायाचित्रे, संस्थेस यापूर्वी पुरस्कार मिळाले आहे काय ? असल्यास तपशिल आवश्यक आहे. संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत आवश्यक आहे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी दहा हजार एक रूपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ तसेच विभागीयस्तरीय पुरस्कारासाठी पंचवीस हजार एक रूपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे स्वरूप आहे. 

सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२३ या वर्षाकरिता या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव ( दूरध्वनी-०२५७-२२२८८२८) या पत्त्यावर संपर्क साधावा. असे आवाहन श्री.सोनगत यांनी केले आहे.

                                                               00000000000

उमेदवारी प्रशिक्षणासाठी १४ रोजी आयटीआय मध्ये मेळावा

जळगाव दि.८ ऑगस्ट (जिमाका)  :-  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर योजनेतील व्यवसायातील प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींसाठी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी  योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेण्याकरिता १४ ऑगस्ट रोजी मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.  

सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र (BTRI) संस्थेच्या वतीने  शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास शिकाऊ उमेदवारी योजनेत प्रशिक्षणास इच्छूक उमेदवारांनी १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उपस्थित रहावे.

  पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती  मेळाव्यस भाग घेण्यासाठी संबंधित आस्थापना तसेच [ITI] उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी Apprenticeshipindia.org या वेबपोर्टलवर नाव नोंदणी करावी. असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. 

                                                                      00000

Monday, 7 August 2023

साडेचार लाख शेतकऱ्यांनी घेतला एक रुपयात पीक विमा ! कापूस पिकासाठी सर्वाधिक शेतकऱ्यांचा पिक विमा

     जळगाव, दि.०७ ऑगस्ट (जिमाका) - यावर्षी महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिली आहे. एक रुपयात पीक विमा योजनेत जिल्ह्यात ४ लाख ५४ हजार २७७ शेतकरी सहभागी झाले आहेत. ४ लाख ५९ हजार ८८८ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. सर्वाधिक कापूस पिकांसाठी ३ लाख ९२ हजार ५४६ शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला आहे.

अतिवृष्टी, अवकाळ, दुष्काळ या नैसर्गिक संकटाशी मुकाबला करत अन्नदाता शेतकरी अन्नधान्याचे उत्पादन घेतो, आपत्तीच्या काळात शेतकऱ्याच्या पिकाला संरक्षण मिळावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली. केंद्र, राज्य सरकार आणि शेतकरी यांचा समायीक हिस्सा पीक विमा योजनेसाठी होता. मात्र २०२३ च्या खरीप हंगामापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रथम ३१ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, काही भागात अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना वीजपुरवठा खंडित होणे, वेबसाईट सर्व्हर डाऊनसह इतर समस्या आल्या होत्या. त्यामुळे तीन ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित शेतकरीही यामध्ये सहभागी झाले. एक रूपयात पीक विमा योजनेला जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.  

     मागील वर्षी प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम योजनेत जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ५८६ शेतकरी सहभागी झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे खरीप हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण दोन पट आहे. जिल्ह्यातील एक रूपयात पीक विमा पोटी १७७६ कोटी ९४ लाख ४६ हजार २३० रूपये रक्कम संरक्षित करण्यात आली आहे. सर्वाधिक कापूस त्याखालोखाल मका, सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, उडीद, बाजरी, भुईमूग व तीळ या पिकांचा विमा काढण्यात आला आहे. 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी कृषी, महसूल विभागाने जिल्हाभर मोठया प्रमाणावर जनजागृती केली. यामध्ये गावागावात जाऊन शेतकऱ्यांना पीकविम्याचे फायदे सांगण्यात आले होते. पीक पेरणी ते काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती, आग, गारपीठ, वादळ, चक्रीवादळ यामुळे होणारे पिकांचे नुकसानीत शेतकऱ्यांना परतावा मिळणार आहे.

०००००००००

 

 

गोंडगाव घटना जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल- पालकमंत्री गुलाबराव पाटील आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी शासन प्रयत्नशील पिडित बालिकेच्या कुटुंबाची सात्वंनपर भेट




             जळगाव, दि.७ ऑगस्ट (जिमाका)- गोंडगाव येथील घटना माणूसकीला काळीमा फासणारी  आहे. या घटनेतील पिडीत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी ही केस जलद गती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याची अमानवी घटना ३० जुलै रोजी घडली होती. स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याने घटनेची कबुलीही दिली आहे. या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही शनिवारी, दि.५ ऑगस्ट रोजी बालिकेच्या कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता‌. आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गोंडगाव येथे पिडिताच्या कुटुंबीयांची सात्वंनपर भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, स्थानिक गावकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पीडिताच्या कुटुंबाचे शासनाच्या वतीने पुनर्वसन तर करण्यातच येईल मात्र त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन बांधील आहे. आठ दिवसांच्या आत या घटनेत चार्जसीट दाखल करत हा गुन्हा फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून महिनाभरात निकाल लावण्यात येईल.

शासन या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या कुटुंबास लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभ ही देण्यात येईल. असे ही पालकमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.  पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या घटनेनंतर आरोपीला अटक करून घेऊन जाताना गावकऱ्यांकडून उत्स्फूर्तपणे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. पोलीस व्हॅनवर अनावधानाने दगडफेकीची घटना झालेली होती‌ यावर पोलीस विभागाने चार ते पाच गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गावकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत. अशा सूचना पालकमंत्री श्री‌.पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना यावेळी दिले.

००००००००००००