Thursday, 31 August 2017

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला लोकशाही दिनी प्राप्त तक्रार अर्जांचा आढावा




        जळगाव दि. 31 - दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या लोकशाही दिनात नागरीक आपली गाऱ्हाणी, तक्रारी मांडत असतात. या तक्रारींपैकी काही तक्रारींचे निवारण त्याचठिकाणी करण्यात येते. तर काही तक्रारी संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. विभागांकडे पाठविण्यात आलेल्या तक्रारींच्या निवारणाबाबत संबंधित विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबतचा आढावा आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी घेतला.
            जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवून दिल्या म्हणजे काम संपले असे न होता या तक्रारींचे निवारण झाले पाहिजे. तक्रारदारास न्याय मिळाला पाहिजे. या भावनेने आज जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी  या आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, चिटणीस मंदार कुलकर्णी, महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, सरस्वती बागूल, सहायक आयुक्त, समाजकल्याण, खुशाल गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत बी. ए. बोटे आदिंसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर जानेवारी 2017 पासून महिनानिहाय प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या तक्रार अर्जांचा आढावा घेतला. विभागनिहाय प्रलंबित अर्जांची संख्या याप्रमाणे- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था- 109, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद- 148, पोलीस अधिक्षक - 23, अधिक्षक भूमि अभिलेख -22, अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी -3, उपवन संरक्षक -21, आयुक्त, महानगर पालिका- 5, जिल्हा अग्रणी बॅक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगाव - 6, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा -1, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी - 4, कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ- 2, कार्यकारी अभियंता, तापी पाटबंधारे विभाग -1, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग - 2, जिल्हा शल्य चिकित्सक -6, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे-3, नॅशनल हायवे, धुळे -2, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी - 1, बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी -2, महसूल - 75, जिल्हाधिकारी  कार्यालय- 159 याप्रमाणे तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
            सहकार विभागाकडे प्रलंबित असलेल्या अनेक तक्रारी या विविध पतसंस्थांमधील ठेवण्यात आलेल्या ठेवी संबंधित असून यासाठी तालुकानिहाय वसुली अधिकारी नेमण्यात आले असल्याची माहिती सहकार विभागाच्या प्रतिनिधींनी बैठकीत दिली. महसुल यंत्रणा व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रंलबित असलेल्या तक्रारींपैकी अनेक तक्रारी या भूसंपादनाविषयीच्या व न्यायप्रविष्ठ असल्याने त्यांचे निवारण करण्यास विलंब लागत असल्याचे चिटणीस श्री. मंदार कुलकर्णी यांनी बैठकीत सांगितले. यावर तोडगा तातडीने काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील महसुल यंत्रणेकडे प्रलंबित असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी यांनी चिटणीस श्री. कुलकर्णी यांना दिल्या.
            प्रलंबित तक्रारींवर तातडीने कार्यकाही करुन त्यांचे निवारण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित विभागप्रमूखांना दिल्या. तसेच याच कारणासाठी तक्रारदाराला पुन्हा लोकशाही दिनात येण्याची आवश्यकता भासू नये याप्रमाणे यंत्रणेने काम केले पाहिजे असेही जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना सांगितले.
०००००

सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे यांचा जिल्हादौरा



जळगाव, दि. 31:- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे हे शनिवार दि. 2 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-
 शनिवार 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. 15 मि.नी.  महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. सकाळी 8 वा. 20 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. सामाजिक न्याय विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक (स्थळ:- अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव), सकाळी 11 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथून शासकीय वाहनाने मुक्ताईनगर, जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी 12 वा. 30 मि.नी. मुक्ताईनगर जि. जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. 30 मि.नी. मुक्ताईनगर जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने, जामनेर-पहुर मार्गे औरंगाबादकडे प्रयाण.
                                                                   00000

बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरची जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक संयुक्तपणे तपासणी करणार



·         प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात लागणार गर्भलिंगनिदान करणे कायद्याने गुन्हा असल्याचे फलक
·         सोनोग्राफी सेंटरमध्ये पीसीपीएनडीटी कायद्याची पुस्तके व मशीनची माहिती ठेवणे आवश्यक
·         स्त्री-पुरुष समानतेबाबत जनजागृतीसाठी प्रत्येक महाविद्यालयात एका स्वयंसेवकाची नेमणूक
·         मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयाने राबविली जाणार जनजागृती मोहिम

            जळगाव, दि : 31:- बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरची जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संयुक्त पथकाद्वारे तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली.
            बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्या जिल्हास्तरीय कृतीदलाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, उपवनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, सरस्वती बागूल, सहायक आयुक्त, समाजकल्याण, खुशाल गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. आर. पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत बी. ए. बोटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयकर, शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील, उपशिक्षणाधिकारी विकास पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी तसेच संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
            बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हयात पीसीपीनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. त्यानुसार प्रत्येक सोनोग्राफी सेंटरमध्ये या कायद्याची माहिती देणारी पुस्तके, येथे गर्भलिंग निदान केले जात नसल्याचा फलक आणि तेथील मशीनची माहिती असणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी सांगितले. तसेच सोनोग्राफी करण्यापूर्वी संबंधित महिलेचे संमतीपत्र घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 12 ते 20 आठवडयांच्या गर्भवती महिलांची सोनोग्राफी होत असल्यास ती गर्भलिंगनिदानासाठी केली आहे काय, एक किंवा दोन  मुलीनंतर सोनोग्राफी केली जात असेल तर यावरही लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. तसेच गर्भवती महिलांची नोंदणी आशा सेविकांसाठी असते. या  महिला वारंवार राज्याबाहेर जात असल्यास त्यांची माहिती रेल्वे प्रशासनाकडून घेण्याची सुचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी संबंधित विभागास दिली. तसेच यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरची जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संयुक्त पथकाद्वारे अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
            त्याचबरोबर स्त्री पुरुष समानतेसाठी प्रत्येक महाविद्यालयात एका स्वयंसेकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती उत्तर महाराष्ट विद्यापीठाचे प्रतिनीधींनी दिली. तसेच प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी  स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. आदिवासी व समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळांमध्ये मुलींना पुरविण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. मुलींना वसतीगृहात प्रवेश देताना त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची माहिती सहायक आयुक्त खुशाल गायकवाड यांनी दिली. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मुलींचे हिमोग्लोबीन तपासणे, महिला जागरुकता व सक्षमीकरणाबाबत रॅली, किशोरवयीन मुलींमध्ये जनजागृती करणे आदि बाबींचा आढावा घेण्यात आला.
         सध्या जिल्हयात मुलींचा जन्मदर दर हजारी 899 असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यामध्ये वाढ होण्यासाठी समाजात जनजागृती होणे आवश्यक असून यासाठी संबंधित विभागाच्या समन्वयाने जनजागृती मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मुलींची शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा त्यांच्या खात्यात जमा करणे, गर्भवती मातांसाठी डोहाळे जेवण, मुलीच्या जन्माचे स्वागत, मुलींना शिक्षणासाठी प्रवास सुविधा उपलब्ध करणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाची स्थापना, सर्व शिक्षा अभियानात बेटी बचाओ, बेटी  पढाओ संकल्प सभांचे आयोजन आदि विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
00000

Wednesday, 30 August 2017

महा अवयवदान अभियानानिमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा माहिती कार्यालय व जी. एम. फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम जिल्हा कारागृहातील बंदीनी केला अवयवदानाचा संकल्प





            जळगाव, दि : 30 - राज्यात महा अवयवदान महोत्सव सुरु असून या महोत्सवाच्या निमित्ताने येथील जिल्हा कारागृहातील बंदी सचिन गुमानसिंग जाधव याने मृत्युपाश्चात अवयवनदान करण्याचे संमती पत्र जिल्हा कारागृह अधिक्षक सुनिल कुवर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचेकडे भरुन दिले. आणि उपस्थितांनी टाळयांच्या कडकडाटात त्याच्या या धाडसाचे कौतूक केले.
            निमित्त होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून राज्यात सुरु असलेल्या महा अवयवदान जनजागृती अभियानाचे. जिल्हा सामान्य रुग्णालय, व जी. एम. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा कारागृहातील बंदीजनांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
            यावेळी व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा कारागृह अधिक्षक सुनिल कुवर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जी. एम फाऊडेशनचे अरविंद देशमुख, आरोग्य दीप किडनी फाउंडेशनचे डॉ. शशिकांत गाजरे, अयाज मोहसीन, सागर महाजन आदि उपस्थित होते.
            अवयवदानाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  चव्हाण म्हणाले की, शरीर हे नष्ट होणारे आहे. मृत्युनंतरही अवयवरुपी जिवंत रहायचे असेल तर अवयवदान केले पाहिजे. यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. अनेक नागरीकांना आपण शरीराचे कोणते अवयव कधी दान करु शकतो हेच माहिती नसते. यासाठी शासनाने जनजागृती अभियान सुरु केले आहे. या अभियानाची जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात जनजागृती होत असल्याचे सांगून अवयवदानाबाबत सविस्तर माहिती दिली.
            बंद्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोण वेगळा आहे. असे सांगून जिल्हा कारागृह अधिक्षक सुनिल कुवर म्हणाले की, बंदी हा कधीही वाईट नसतो तर त्यांला परिस्थिती वाईट बनवित असते. कारागृहाच्या माध्यमातून बंद्यांमध्ये समाजातील जीवन शिकविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्याला समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी याठिकाणी प्रयत्न केले जातात. कारागृहात येताना बंदी हा गुन्हेगार म्हणून जरी येत असला तरी येथून बाहेर जाताना तो समाजाचा जबाबदार घटक म्हणून बाहेर जात असतो. त्यामुळे बंद्यांनी कोणताही न्युनगंड न ठेवता आपणही समाजाचेच घटक आहोत असे समजून वागावे. कारागृहात आल्यानंतर त्यांच्यात निश्चित बदल होत असतो. याचे उदाहरण म्हणजे बंद्यांनी आज केलेला अवयवदान संकल्प होय. आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी आज हा संकल्प करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला असल्याचेही श्री. कुवर यांनी सांगितले.
            जी. एम. फाउडेशन जिल्हयात विविध आजारांच्या रुग्णांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करीत असते. समाजात सध्या अनेक रुग्ण अवयवाअभावी व्याधीग्रस्त जीवन जगत आहे. त्यांना नवीन जीवन मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून जी. एम. फाऊडेशनच्या माध्यमातून अवयवदानाची जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आज बंद्यांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. हे या अभियानाचे यश असल्याचे प्रतिपादन जी. एम. फाऊंडेशनचे अरविंद देशमुख यांनी व्यक्त केले.
            अवयवदानाचे महत्व, अवयवदानाबद्दलची कारणमिमांसा आणि अवयवदानाच्या सविस्तर माहितीचे सादरीकरण डॉ. शशिकांत गाजरे यांनी केले. तसेच बंदीजनांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी अयाज मोहसीम यांनी बंदीजनाना अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
            अवयवदान जनजागृती कार्यक्रमानंतर अनेक बंद्यांनी अवदान करण्याचा संकल्प केला. प्रातिनिधीक स्वरुपात बंदी सचिन गुमानसिंग जाधव याने अवयवनदान संमती पत्र भरुन दिले.
            यावेळी उपस्थित बंद्यांनी अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली. प्रतिज्ञेचे वाचन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले. यावेळी बंद्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ज्ञानेश्वर पांढरे, आनंदा पाटील यांच्यासह जिल्हा कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व बंदी मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सागर महाजन यांनी मानले.
000

औदयोगिक प्रशिक्षण संस्था बोदवड येथील निदेशक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन



            जळगाव, दि. 30- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोदवड  येथे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर निदेशकांची  नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोदवड यांनी दिली आहे.
            या प्रशिक्षण संस्थेत सुतारकाम, यांत्रिक मोटारगाडी, विजतंत्री आणि एनटप्रिनरशिप ॲण्ड कम्युनिकेशन स्किल या पदांसाठी नेमणूक करावयाची आहे. इच्छुकांनी प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोदवड यांचेकडे 10 दिवसाचे आत आपले अर्ज शैक्षणिक, अनुभवाचे प्रमाणपत्र व वैयक्तीक ईमे, फोन नंबर, ओळखपत्राच्या प्रतींसह पाठवावेत. तसेच दूरध्वनी क्रमांक- 02582-275700, ईमेल आयडी iti.bodwad@dvet.gov.in, iti_bwd@yahoo.com. येथे संपर्क करण्याचे प्राचार्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००