जळगाव
दि. 31 - दर महिन्याच्या पहिल्या
सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या लोकशाही दिनात नागरीक आपली
गाऱ्हाणी, तक्रारी मांडत असतात. या तक्रारींपैकी काही तक्रारींचे निवारण
त्याचठिकाणी करण्यात येते. तर काही तक्रारी संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी
पाठविण्यात येतात. विभागांकडे पाठविण्यात आलेल्या तक्रारींच्या निवारणाबाबत संबंधित
विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबतचा आढावा आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर
यांनी घेतला.
जिल्हास्तरीय
लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवून दिल्या म्हणजे
काम संपले असे न होता या तक्रारींचे निवारण झाले पाहिजे. तक्रारदारास न्याय मिळाला
पाहिजे. या भावनेने आज जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी या आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या
बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी, जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, चिटणीस मंदार कुलकर्णी, महिला व बालविकास
अधिकारी रमेश काटकर, सरस्वती बागूल, सहायक आयुक्त, समाजकल्याण, खुशाल गायकवाड, उप
मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत बी. ए. बोटे आदिंसह विविध विभागांचे अधिकारी
उपस्थित होते.
यावेळी
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर जानेवारी 2017 पासून महिनानिहाय प्राप्त झालेल्या व
प्रलंबित असलेल्या तक्रार अर्जांचा आढावा घेतला. विभागनिहाय प्रलंबित अर्जांची संख्या याप्रमाणे-
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था- 109, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद- 148,
पोलीस अधिक्षक - 23, अधिक्षक भूमि अभिलेख -22, अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य
वीज वितरण कंपनी -3, उपवन संरक्षक -21, आयुक्त, महानगर पालिका- 5, जिल्हा अग्रणी
बॅक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगाव - 6, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा -1, जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी - 4, कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ- 2,
कार्यकारी अभियंता, तापी पाटबंधारे विभाग -1, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक
बांधकाम विभाग - 2, जिल्हा शल्य चिकित्सक -6, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे-3,
नॅशनल हायवे, धुळे -2, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी - 1, बालविकास प्रकल्प
अधिकारी, नागरी -2, महसूल - 75, जिल्हाधिकारी कार्यालय- 159 याप्रमाणे तक्रारी प्रलंबित
असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
सहकार
विभागाकडे प्रलंबित असलेल्या अनेक तक्रारी या विविध पतसंस्थांमधील ठेवण्यात
आलेल्या ठेवी संबंधित असून यासाठी तालुकानिहाय वसुली अधिकारी नेमण्यात आले
असल्याची माहिती सहकार विभागाच्या प्रतिनिधींनी बैठकीत दिली. महसुल यंत्रणा व
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रंलबित असलेल्या तक्रारींपैकी अनेक तक्रारी या
भूसंपादनाविषयीच्या व न्यायप्रविष्ठ असल्याने त्यांचे निवारण करण्यास विलंब लागत
असल्याचे चिटणीस श्री. मंदार कुलकर्णी यांनी बैठकीत सांगितले. यावर तोडगा तातडीने
काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील महसुल यंत्रणेकडे प्रलंबित
असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याच्या सूचनाही यावेळी
जिल्हाधिकारी यांनी चिटणीस श्री. कुलकर्णी यांना दिल्या.
प्रलंबित
तक्रारींवर तातडीने कार्यकाही करुन त्यांचे निवारण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी
यांनी सर्व संबंधित विभागप्रमूखांना दिल्या. तसेच याच कारणासाठी तक्रारदाराला
पुन्हा लोकशाही दिनात येण्याची आवश्यकता भासू नये याप्रमाणे यंत्रणेने काम केले
पाहिजे असेही जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना सांगितले.
०००००