Saturday, 19 September 2020

सोयाबीन बीयाणे जतन करुन ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) - पुढील वर्षी सोयाबीन पेऱ्याचा अंदाज घेऊन आवश्यक सोयाबीन बियाणे याच वर्षी राखुन ठेवावे. चालू वर्षी सोयाबीन पेरणी केलेल्या बीजोत्पादन क्षेत्र हे इतर सोयाबीन पिक वाणापासून 3 मीटर अंतरावर असावे. उच्च प्रतीचे बियाणे तयार करण्यासाठी बीजोत्पादन क्षेत्रात आढळून येणारे भेसळ/इतर वाणाचे पिक वेळच्यावेळी काढणे, बुरशीच्या प्रादुर्भावामुळे बियाण्याचे नुकसान होते, हे टाळण्यासाठी बीजोत्पादन करतांना दाणे पक्व झाल्यावर मेन्कोझेब 2 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास बियाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. शेवटच्या फवारणीमध्ये वरील बुरशीनाशकाचा वापर अवश्यक करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

मळणी यंत्राचा वापर करतांना मळणी यंत्राचे फेरे (आरपीएम) 350 ते 450 पेक्षा अधिक असू नये. यामुळे बियाण्यास इजा होणार नाही व बियाण्याची गुणवत्ता चांगली राहील. तसेच साठवणुक करतांना सोयाबिन बियाणे थप्पीची उंची 7 फुटापेक्षा जास्त ठेऊ नये. सोयाबिन बियाण्याचे कवच नाजुक असल्यामुळे त्याची कमीत कमी हाताळणी करावी. पुढील खरीप हंगाम 2021 मध्ये सोयाबीन ग्रामबीजोत्पादनामध्ये स्वयंपूर्णता प्राप्त होईल, या दिशेने सर्व शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
00000

No comments:

Post a Comment