Saturday, 29 April 2023

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेशाचे वाटप आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना निराधार योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करावा-पालकमंत्री गुलाबराव पाटील

 



    जळगांव दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपुष्टात येत असली, तरी सामाजिक जबाबदारी कायम राहते. कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटूंब असह्य होते. विशेषत: शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कुटुंबांच्या पाठिशी शासन व प्रशासन खंबीरपणे पाठीशी आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पात्र वारसांना संजय गांधी निराधार योजनेतून लाभ मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.
     पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते येथील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे जळगाव तालुक्यातील २ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये मदतीचा धनादेश तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत धरणगाव तालुक्यातील बांभोरी बु., पिंप्री व बांभोरी प्र.चा. येथील 3 शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाखाप्रमाणे 6 लाखांचे धनादेश वाटप करण्यात आले.  यावेळी तालुका कृषी अधिकारी पी. जे. चव्हाण व कृषी सहाय्यक उपस्थित होते.
50 लाखाचे सानुग्रह अनुदान वाटप
     जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अधिपत्याखालील तहसील कार्यालय, जळगाव यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले कर्मचारी कै. नाना लक्ष्मण वाघ (कोतवाल) राहणार शिरसोली  यांचा कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य पार पाडताना कोरोना विषाणू संसर्गाने २८ मार्च, २०२१ रोजी मृत्यू झाला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने त्यांना शासनाकडून ५० लाखाचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले होते. कै. नाना लक्ष्मण वाघ यांच्या कायदेशीर वारसास ५० लाखाचे सानुग्रह अनुदान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
     या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमन मित्तल, तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नामदेव पाटील यांनी केले.
                                                                    00000

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

 

            जळगाव, दिनांक 29 (जिमाका वृत्तसेवा) :  महाराष्ट्र शासनाने अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

            शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसगिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहीना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातमुळे कुटूंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास/त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता जळगाव जिल्ह्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व विहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य (आई-वडील शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही 1 व्यक्ती) असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 जणांकरीता ‘‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान’’ योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

            या योजनेतअतंर्गत अपघाती मृत्यू करीता- रु.2 लाख, अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 हात किंवा 2 पाय निकामी झाल्यास रु. 2 लाख, अपघातामुळे 1 डोळा व 1 हात किंवा 1 पाय निकामी झालयास रु.2 लाख, अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास रु.1 लाख याप्रमाणे अनुदान देण्यात येते.

            या योजनेच्या लाभासाठी प्रस्तावासोबत तहसिलदार कार्यालयाकडुन 7/12 उतारा, 8-अ, गाव नमुना नंबर 6-ड, गाव नमुना नं 6-क, प्रांत कार्यालयाकडील पोलीस अंतिम अहवाल, जिल्हा पोलीस विभागाकडील प्रथम खबर अहवाल (FIR), घटनास्थळ पंचनामा (SPOT Report), मरणोत्तर पंचनामा अहवाल (INQUEST), पोस्टमाटर्म अहवाल (Postmortem Report), व्हीसेरा रिपोर्ट (Viscera Report) तसेच शेतकऱ्यांचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल. तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी, शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकरी यांचेकडे 30 दिवसाच्या आंत सादर करावा.

            जळगाव जिल्ह्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना शासन निर्णयानुसार 19 एप्रिल, 2023 पासून प्रथम तीन वर्ष राबविण्यात येत आहे. तरी या अपघात योजनेत अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

00000

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई प्रतिबंधित अन्न पदार्थांचा 36 लाख रुपयांचा साठा जप्त

 


 

            जळगाव, दिनांक 29 (जिमाका वृत्तसेवा) : गुटखा विक्री व वाहतुकीविरुध्द अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाने धडक मोहीम सुरु केली असून या मोहिमेअंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, जळगावच्या पथकाने गुरुवार 27 एप्रिल रोजी सायंकाळी मुक्ताईनगर ते ब-हाणपूररोड वरील पूर्णा नदीच्या काठावर सापळा रचला. याठिकाणी संशयित वाहन क्रमांक MH 20-EL-5849 व MH 20- EL-1737 या वाहनांतून प्रतिबंधित अन्न पदार्थांची चोरटी वाहतूक होत असल्याच्या संशयावरुन थांबविले असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये उत्पादन, साठा वितरण, विक्री व वाहतूकीकरीता प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू या अन्न पदार्थाचा साठा आढळून आला. त्यामुळे ही वाहने मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे आणून पानमसाला व सुगंधीत तंबाखू यांचा वाहनासह एकूण साठा रु. 35 लाख 52 हजार 520 जप्त करुन वाहनचालक, क्लीनर, वाहन मालक व साठा मालक यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

            ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रा. मा. भरकड यांनी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री. संतोष कृ. कांबळे, सह आयुक्त, (नाशिक विभाग) सं. भा. नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या गुन्हयामधील मुख्य सुत्रधाराचा शोध घेतला जात असून जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधित अन्न पदार्थ्यांच्या विक्री, वितरण व साठाविरुध्द तीव्र कारवाई करणार असल्याचे श्री. कांबळे, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

शेतकऱ्यांच्या अडचणीचे निरसण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन

 

            जळगाव, दिनांक 29 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ सुरु झाला असून यामध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व विक्रेते यांच्या क्षेत्रीयस्तरावरील अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. तसेच कृषि निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. याबाबत येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांना प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

            या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ८९८३८३९४६८, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२३९०५४ तसेच टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रार saojalgaon@gmail.com  वर सुद्धा ईमेल द्वारे पाठवता/नोंदवता येणार आहे.

            जिल्हास्तरावर बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्यासंबंधी तक्रार निवारण कक्षात अरुण तायडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगांव मो. क्र. ८९८३८३९४६८, संतोष भावसार- वरिष्ठ लिपीक- मो. क्र. ८९८३८३९४६८, समाधान देवरे- कृषि सहाय्यक- मो. क्र. ८९८३८३९४६८ या अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असेही श्री. ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी कटीबध्द - पालकमंत्री गुलाबराव पाटील

 






            जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर व जळगाव तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेत पिकांबरोबरच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावे. शासन नियमानुसार नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

            गेल्या दोन दिवसांपासून जळगाव तालुक्यातील गावांमध्ये होत असलेल्या वादळी पावसाने केळी पिकांबरोबरच इतर पिकांचे, घरांचे तसेच विद्युत पोल व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून माहिती संकलित करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी प्रयत्नशील असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळवून दिली जाईल.

            जळगाव तालुक्यातील नशीराबाद, बेळी, निमगांव, उमाळे, देव्हारी, चिंचोली परिसरात वादळी पाऊस व वाऱ्याने दिलेल्या जोरदार तडाख्यात मोठ्या प्रमाणात केळी, लिंबू, पपई आदि पिकांसोबतच झाडे उन्मळून पडल्यामुळे नागरीकांच्या घरांचे नुकसान झाले असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकाळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानी संदर्भात शेतकरी, ग्रामस्थ यांचेशी चर्चा करून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांचेसमवेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल, तहसिलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, जिल्हा कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे, तालुका कृषि अधिकारी श्री. शिवाजी राऊत, महावितरणचे श्री. आवटे, विस्तार अधिकारी पी. बी. अहिरे, स्थानिक लोकप्रतिनिधींसह संबंधित गावांचे ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक आदि उपस्थित होते.

            यावेळी त्यांनी तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर ज्या नागरीकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यांना निवाऱ्याची व्यवस्था करण्याचीही सुचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली. बेळी, निमगांव व नशिराबाद येथे वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोल व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याची त्वरित दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा. तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत आवश्यकता भासल्यास गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी टॅकरने पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्याचे निर्देश दिले. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी चिंचोली परिसरात वादळी वाऱ्याने कंटेनर पलटी होऊन मृत्युमुखी पडलेल्या ठिकाणी भेट दिली. तसेच या ठिकाणी असलेल्या बिहार येथील कामगारांची भेट घेऊन त्यांना तात्पुरता निवारा व जेवणाची व्यवस्था करण्याबाबतही यंत्रणेला सांगितले.

            यावेळी जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी सांगितले की, ज्या नागरीकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्यात येत असून ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहेत त्यांची   नावे घरकुलांच्या ड यादीत असल्यास त्यांना प्राधान्याने घरकुल मंजूर केले जाईल. तसेच महसुल व कृषि विभागाच्या यंत्रणेमार्फत नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले असून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करुन अहवाल सादर केला जाईल असेही सांगितले.

00000

Friday, 28 April 2023

पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जिल्हा दौऱ्यावर

             जळगाव, दिनांक 28 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शनिवार 29 एप्रिल, 2023 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

            पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : शनिवार 29 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव, जि.जळगाव येथूण प्रयाण. सकाळी 9.30 वा. बेळी, निमगाव व नशिराबाद शिवार येथे चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सकाळी 10.30 वा. चिंचोली परिसर येथे चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, जळगाव (अजिंठा) कडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह, जळगाव (अजिंठा) येथे आगमन व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेश वाटप कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार जळगाव येथून शासकीय वाहनाने पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगावकडे प्रयाण, आगमन व राखीव. 

00000

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत पुरुषांसाठी “सुधारक सन्मान”पुरस्काराचे आयोजन

 

      जळगाव, दिनांक 28 (जिमाका वृत्तसेवा) : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय, जळगावमार्फत नवतेस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत लिंग समभाव, अन्न सुरक्षा, सकस आहार व आरोग्य या घटकांतर्गत महिला सक्षमीकरणाकरीता संवेदनशील व गावपातळीवर महिलांच्या विकासाकरीता पुढाकार घेत असलेल्या पुरूषांचा सुधारक सन्मानपुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी उल्हास पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

            या उपक्रमाचा मूळ हेतू म्हणजे गावस्तरावर Men Gender Sensitive Role Model तयार होणे व महिला सक्षमीकरणाकरीता पुरक वातावरण तयार करणे हा आहे. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांनी महिलांचे हक्क व अधिकार यासाठी लढा दिला. महिलांना माणूस म्हणून जगण्यासाठीचे हक्क व शिक्षणाची संधी मिळवून देण्याचे क्रांतिकारक काम केलेले आहे. या दोन महापुरुषांच्या कार्याची प्रसिध्दी जगभर आहे. महात्मा ज्योतीबा फुले यांची 11 एप्रिल 2023 रोजी 196 वी जयंती व डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल 2023 रोजी 132 वी जयंतीनिमित्ताने एप्रिल महिन्यात महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत असलेल्या पुरुषांचा Gender Sensitive Role Model म्हणून सुधारक सन्मानहा उपक्रम माविममार्फत हाती घेतला आहे.

     जिल्ह्यात माविम स्थापित 5 लोकसंचलित साधन केंद्रांच्या (CMRC) कार्यक्षेत्रातील 125 गावात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम तीन स्तरावर आयोजित करण्यात येत आहे प्रथम गावपातळी वरून पात्र पुरूषांची निवड करण्याकरीता त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात यावी. ज्यामध्ये गावस्तरीय समिती अध्यक्ष, पोलिस पाटील व अंगणवाडी सेविका यांचा समावेश आहे. सहयोगिनी या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून भूमिका बजावेल. या समितीने दोन पात्र पुरूषांची निवड करून CMRC कडे अंतिम निवडीकरीता लोकसंचलित साधनकडे पाठविल. व्दितीय स्तर तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ज्यामध्ये गटविकास अधिकारी, पोलीस निरिक्षक, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा समावेश आहे. CMRC व्यवस्थापक या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून आहेत. ही समिती प्रती गाव एक याप्रमाणे पात्र पुरूषांची निवड अंतिम करेल. म्हणजेच CMRC मध्ये असलेल्या 25 गावामधून एका पुरुषाचा सत्कार करेल. तृतीय स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठीत केली आहे. ज्यामध्ये जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा महिला सल्लागार समिती सदस्य यांचा समावेश आहे.  माविम जिल्हा समन्वय अधिकारी या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून असतील. या समितीकडे तालुकास्तरावरून पात्र पुरुषांची नामनिदर्शन प्राप्त होतील त्यास अनुसरुन जिल्हा स्तरावरून अंतिम 3 पुरुषांची सुधारक सन्मानया पुरस्काराकरीता निवड केली जाणार आहे. महाराष्ट्र दिनी 1 मे, 2023 रोजी जिल्हास्तरावरील तीन निवडलेल्या पुरुषांचा सत्कार पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे. असेही श्री. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000