Thursday, 30 September 2021

जळगाव जिल्ह्यात लसीकरण मोहीम मिशन मोडवर राबवावी! जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश

 

 जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. जळगाव जिल्ह्यात अधिकाधिक पात्र नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण मोहीम मिशन मोडवर राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

              जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आज सायंकाळी कोविड- 19 लसीकरण आढावा बैठक ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.

 जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून पुरेशा प्रमाणात आता लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्राप्त झालेला लस साठा दोन दिवसांच्या आत वापर होईल, असे नियोजन करावे. त्यासाठी अधिकाधिक लसीकरण सत्रांचे आयोजन करावे. लसीकरण करताना ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी रुग्ण, दिव्यांग व्यक्ती, गर्भवती महिला, तरुणांचे प्राधान्याने लसीकरण होईल, अशी दक्षता घ्यावी. त्याच बरोबर ज्या गावांत कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यास त्या संपूर्ण गावांचे लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करावे. ज्या नागरिकांनी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेवून 84 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा नागरिकांची यादी आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तयार करून त्यांना तातडीने दुसरा डोस देण्यात यावा. आरोग्य विभागाने लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जळगाव जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने एकाच दिवशी एक लाख 45 हजार नागरिकांचे लसीकरण केले आहे. ही आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने जमेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे प्राप्त होणारा लस साठा 36 तासांच्या आत पात्र नागरिकांना देण्यात येईल, असे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार लसीकरण सत्र वाढवावेत. भुसावळ तालुक्यात लसीकरण मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी रेल्वेच्या इस्पितळाची मदत घ्यावी. याशिवाय कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी. प्रत्येक तालुक्यातून दररोज किमान पाचशे चाचण्या कराव्यात. त्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वभूमीवर 2 ऑक्टोबर रोजी आयोजित होणाऱ्या लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी,  अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी दिल्या.

 महात्मा गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या ग्रामसभेच्या माध्यमातून लसीकरणाबाबत जनजागृती करावी. त्यासाठी गटविकास अधिकारी यांनी पुढाकार घेवून कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या.

 जळगाव जिल्ह्यास आतापर्यंत 20 लाख 33 हजार 88 कोविशील्डचे, तर दोन लाख 6 हजार 328 कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 16 लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर पाच लाख 47 हजार 807 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी यावेळी दिली. ज्या तालुक्यात कोविड- 19 लस उपलब्ध आहे, अशा तालुक्यांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याची सुचनाही त्यांनी केली.  

 

00000

Wednesday, 29 September 2021

बॉक्सिंग प्रशिक्षकासह खेळाडूंनी 7 ऑक्टोबपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

          जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हास्तरीय खेलो इंडिया केंद्र, जळगाव अंतर्गत बॉक्सिंग खेळाच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक व खेळाडूंची निवड करण्याकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत.

देशात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत म्हणून केंद्र सरकार व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया सेंटरअंतर्गत जिल्ह्यात क्रीडा केंद्र मंजूर केले आहे. त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यात बॉक्सिंग या खेळाकरीता श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे.

 

बॉक्सिंग या खेळाच्या प्रशिक्षण केंद्राकरीता माजी सर्वोत्कृष्ट खेळाडू, अतिउच्च कामगीरी/गुणवत्ता प्रमाणपत्र/अनुभव असलेला 1 क्रीडा प्रशिक्षकाची नियुक्ती बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण देण्याकरीता करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशिक्षकाचे वय 18 ते 45 वर्षे वयोगटातील असावे.

            त्याचबरोबर 30 खेळाडू प्रशिक्षणार्थीची निवड त्यांनी संपादन केलेल्या बॉक्सिंग या खेळाच्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीनुसार करण्यात येणार आहे. खेळाडूचे वय 20 वर्षांआतील असावे. खेळाडूची जन्मतारीख 1 जानेवारी, 2002 नंतरची असावी. इच्छुक पात्रताधारक क्रीडा प्रशिक्षक व खेळाडूंनी आपले अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांच्या नावाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कामकाजाच्या वेळेत 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत सादर करावेत. अर्जासमवेत आधारकार्ड व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित सत्यप्रती जोडाव्यात, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले आहे.

000000

जवाहर नवोदय विद्यालयातील सहावी प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू

             जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. या  प्रक्रियेची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर, 2021 असून ही परीक्षा शनिवार 30 एप्रिल, 2022 रोजी होईल. जिल्ह्यातील निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रांवर 11.30 ते 1.30 या कालावधीत परीक्षा होईल. सदर परीक्षेचे माहिती पत्रक व प्रवेश अर्ज लिंक  www.navodaya.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

            सर्व संबंधितांनी माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचन करून पाचवीमध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी या प्रवेश परीक्षेस ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी आर. पी. पाण्डेय (8668389523), जी.आर. सरनाईक (8208888537) यांच्याशी सपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य श्री. खंडारे यांनी केले आहे.

00000

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये नववीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

             जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : जवाहर नवोदय विद्यालयातील नववीच्या वर्गात प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. या  प्रक्रियेची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर, 2021 आहे. परीक्षा 9 एप्रिल, 2022  रोजी जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, ता. भुसावळ येथे निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रावर 10.00 ते 12.30 या कालावधीत होईल. या परीक्षेचे माहितीपत्रक व प्रवेश अर्ज लिंक  www.navodaya.gov.in  किंवा www.nasadmissionclassnine.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.                                                                                                                         

            सर्व संबंधितांनी माहितीपत्रकाचे काळजीपूर्वक वाचन करून यंदा आठवीमध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी या प्रवेश परीक्षेचा ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत. जिल्ह्यातील आठवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी व संबंधित पालकांनी नोंद घ्यावी, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी आर. पी. पाण्डेय (8668389523), जी.आर. सरनाईक (8208888537) यांच्याशी सपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य श्री. खंडारे यांनी केले आहे.

00000

ऊस तोड कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र वितरीत करावे जिल्हाधिकारी अभिजित राऊत : ऊस तोड कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी समिती

             जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक ऊस कामगाराची नोंदणी करीत त्यांना ओळखपत्र देण्यात यावे. ऊस तोड कामगारांसाठी गठित जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न, समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत.

            जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस तोड कामगारांसाठी गठित जिल्हास्तरीय समितीची सभा नुकतीच झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार,  समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, राज्य शासनाने सर्व ऊसतोड कामगार यांची नोंदणी  करुन  त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्यात आले आहे.  ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्त्यव्याला आहेत व ते सतत मागील 3 वर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम करीत असतील त्यांना संबंधित ग्रामसेवकाने सर्वेक्षण करून ओळखपत्र देणे अपेक्षित आहे. सदरचे काम वेळेत पूर्ण व्हावे, सुलभता यावी तसेच स्थानिक पातळीवर काही समस्या उद्भवल्यास त्याचे तातडीने निराकरण व्हावे म्हणून समिती गठित करण्यात आली आहे.

            तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) यांनी सर्व ग्रामपंचायतीकडुन तसेच प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी कार्यान्वित साखर कारखान्याकडून ऊसतोड कामगारांची माहिती तात्काळ उपलब्ध करुन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे सादर करावी, असेही निर्देश दिले.  समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी ऊस तोड कामगारांसाठी सुरू केलेल्या नोंदणी विषयी व समितीच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती बैठकीत दिली.

00000

ज्येष्ठ नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे जिल्हाधिकारी अभिजित राऊत : ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीची सभा

             जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक महत्वाचे सदस्य आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सुदृढ स्वास्थासाठी येत्या ज्येष्ठ नागरिक दिनी अर्थात 1 ऑक्टोबर, 2021 रोजी ज्येष्ठ नागरिकांचे कोविड-19 लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयात ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीची सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंग परदेशी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले, ज्येष्ठ नागरिक कुटुंबासाठी आधार असतात. त्यांच्या अनुभवाचा कुटुंबीयांनी लाभ घेतला पाहिजे. तसेच ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे ऑनलाइन आयोजन करावे. या दिवशी जिल्ह्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी कोविड – 19 चे लसीकरण करून घ्यावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले.  समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक अधिनियमाविषयीची माहिती बैठकीत दिली.

00000

अन्न परवाना नोंदणीसाठी 1 ऑक्टोबरपासून विशेष मोहिमेचे आयोजन

             जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : अन्न परवाना नोंदणीसाठी 1 ते 7 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यो. कों. बेंडकुळे यांनी दिली आहे.

            अन्न  व्यवसाय करण्यासाठी त्यांनी अन्न सुरक्षा व मानदे अधिनियमांतर्गत परवाना, नोंदणी घेवूनच अन्न व्यवसाय करणे आवश्यक आहे. ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल रूपये 12 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल रूपये 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनी नोंदणी करून घ्यावी. जे अन्न व्यावसायिक विना परवाना, विना नोंदणी  अन्न व्यवसाय करताना आढळून येतील त्यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत न्यायालयीन खटला दाखल करण्याची तजवीज असून त्यामध्ये 5 लाख रूपयांपर्यंत दंड व सहा महिने कारावासाची तरतूद आहे.

 

परवाना नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून विहित नमुन्यात अर्ज करून ऑनलाइन शुल्क भरूनच व्यवसाय करावा. ऑनलाइन परवाना किंवा नोंदणी अर्ज करणेकरीता foscos.fssai.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. तेथे आवश्यक कागदपत्रे   व तत्सम बाबींसाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.     

            अन्न व्यावसायिकांनी परवान्याची, नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी तत्काळ नूतनीकरण करून घ्यावे. तसेच जे अन्न व्यावसायिक परवाना घेण्यासाठी पात्र आहेत. परंतु त्यांनी नोंदणी घेतलेली नाही, अशा अन्न व्यावसायिकांनी त्वरीत परवाना घ्यावा. त्यासाठी जळगाव कार्यालयातर्फे 1 ते 7 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत उपरोक्त बाबी विचारात घेवून अन्न व्यवसायिकांमध्ये अन्न परवाना, नोंदणी घेण्याबाबत अन्न परवाना नोंदणी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.         

तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या विक्री बिलावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत घेण्यात आलेला परवाना, नोंदणी क्रमांक टाकणे बंधनकारक आहे, असेही श्री. बेंडकुळे सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

हृदय विकार टाळण्यासाठी धूम्रपानापासून दूर रहावे! अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील : जागतिक हृदय दिनानिमित्त कार्यक्रम



             जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : बदललेली कार्यशैली आणि धूम्रपानामुळे हृदय विकाराचा धोका बळावतो. तो टाळण्यासाठी नागरिकांनी धूम्रपानापासून दूर राहावे. वेळोवेळी आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी केले. जागतिक हृदय दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.        यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. नाखले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बन्सी (बाह्य संपर्क), जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संपदा बोराडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. किरण सोनटक्के आदी उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ. फुलपाटील म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे धूम्रपानापासून प्रत्येकाने दूर रहावे आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण म्हणाले, ताणतणावामुळे हृदय विकाराचा धोका बळावला आहे. तो टाळण्यासाठी नियमितपणे व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक आहे.  डॉ. नाखले यांनी हृदय रोग होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी, हृदय विकाराची लक्षणे या विषयावर मार्गदर्शन केले. साथरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या समन्वय डॉ. स्वप्नजा तायडे यांनीही मार्गदर्शन केले.  चंद्रशेखर ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

00000

जळगाव जिल्ह्यातील जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची सूचना : जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

             जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे जातीवाचक असल्यास ती बदलून अशी सर्व गावे, वस्ती आणि रस्त्यांना महापुरुष व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

            सामाजिक न्याय विभागाने जातीवाचक नावे बदलण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दीगंत होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे जाती वाचक असल्यास ती बदलावीत. त्याऐवजी थोर महापुरुषांची नावे किंवा लोकशाही मूल्ये वृध्दिंगत होतील, अशी नावे द्यावीत. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी समाजकल्याण विभागाला सहकार्य करावे.

            जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 33 जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्यात आली असून त्यांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी बैठकीत दिली. त्यापैकी भुसावळ तालुका-3, भडगाव-1, एरंडोल-3, पाचोरा-7, रावेर-1, जामनेर-10, अमळनेर-2 या वस्त्यांची माहिती प्राप्त झाली आहे. तर यावल, बोदवड, चाळीसगांव, चोपडा, धरणगांव, जळगांव, मुक्ताईनगर, पारोळा या तालुक्यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.

00000

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदणी करावी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

         जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी केले आहे.

            तृतीय पंथीयांच्या तक्रार निवारणासाठी गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, समितीचे सचिव तथा सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी या बैठकीस उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, तृतीयपंथीयांच्या नोंदणीसाठी NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यावर तृतीयपंथीयांनी नाव नोंदणी करून आपले ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. तृतीयपंथीयांच्या समस्या जिल्हास्तरीय समितीकडे आल्यावर तत्काळ कार्यवाही करावी. या तक्रारी, समस्यांचे विहित कालावधीत निवारण करण्यात यावे. प्राप्त तक्रारींबाबत पडताळणी करून आवश्यकतेनुसार तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाकडे शिफारस करावी. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांना लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे. त्यांच्यासाठी लसीकरण शिबिराचे नियोजन करावे. कामाच्या ठिकाणी तृतीयपंथीयांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात.

            सुरुवातीस सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त समाजकल्याण श्री. पाटील यांनी समितीच्या कामकाजाची आणि विषय पत्रिकेची माहिती देऊन आतापर्यंत समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामकाजाचीही माहिती दिली.

00000

गिरणा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

        जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : गिरणा नदीवरील गिरणा धरण आज सकाळी 11 वाजेपर्यंत 90 टक्के भरले आहे. तसेच धरण क्षेत्रात पुराचे पाणी वेगाने येत असल्याने धरण भरण्याची शक्यता लक्षात घेऊन आज दुपारनंतर गिरणा धरणातून 25 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अग्रवाल यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

            गिरणा नदीच्या उगम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे आज सकाळी 11 वाजेपर्यंत गिरणा धरण 90 टक्यांपर्यंत भरले आहे. धरण क्षेत्रात पूर पाण्याचा येवा पाहता आज दुपारपर्यंत धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा धरणातून आज दुपारनंतर 25 ते 30 हजार क्यूसेक्स या वेगाने पाणी गिरणा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर मन्याड धरणातूनही गिरणा नदीत 19 हजार क्यूसेक्स या वेगाने पाणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा नदी काठावरील गावातील रहिवाशांनी सतर्कता बाळगावी. नागरिकांनी नदीत जावू नये, तसेच जनावरे नदीजवळ जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्यासह कार्यकारी अभियंता श्री. अग्रवाल, उपविभागीय अभियंता हेमंत पाटील, शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी केले आहे.

                                                                           00000

 

Tuesday, 28 September 2021

घोडसगाव बंधाऱ्यांची भिंत वाहून गेली प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन

     जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणारा बहुळा नदीवरील पाचोरा तालुक्यातील घोडसगाव येथील कोल्हापूर पध्दतीच्या (केटीवेअर) बंधाऱ्याची 3 फूट उंचीची भिंत पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली आहे, त्यामुळे नदीचा प्रवाह वाढलेला असून परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत आवश्यक ती कार्यवाही संबंधित यंत्रणा करीत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. 

सोयगाव तालुक्यातील डोंगराळ भागात झालेल्या पावसामुळे बहुळा नदीच्या प्रवाहात वाढ झाली असून घोडसगाव बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे बंधाऱ्याची तीन फूट उंचीची भींत वाहून गेली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपळगाव- हरेश्वर, भोजे, चिंचपुरे, वरखेडी भागात शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. संबंधित गावांचे तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील यांना आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना दिलेल्या आहेत. पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्याबरोबरच आवश्यक तेथे नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पाचोराचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्यासह तहसीदारांना घटनास्थळी भेट देवून आवश्यक ती कार्यवाही करीत आहेत. तसेच ते लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. 

सद्य:स्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झालेली आहे. त्यांच्या माध्यमातून मदत कार्य सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.


                                                                                     00000

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) मंत्रिमंडळ बैठक : दि. 28 सप्टेंबर 2021 एकूण निर्णय-1 उच्च व तंत्रशिक्षण विभागनवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय

       नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे.  कोविडमुळे वर्ष 2021-22 मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ न शकल्याने हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.  या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.

                                                                                   -----०-----

परिवहन विभागाचा ऑक्टोबर महिन्याचा तालुकानिहाय दौरा जाहिर

       जळगाव, (जिमाका) दि. 28 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगावमार्फत ऑक्टोबर महिन्याचा तालुकानिहाय मासिक दौरा आयोजित करण्यात आला असून याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.    

ऑक्टोबर-2021 चे शिबीर कार्यालयाचे वेळापत्रक, दौऱ्याचे ठिकाण

 अमळनेर-पहिला व चौथा मंगळवार, जामनेर-दुसरा बुधवार, पाचोरा-पहिला सोमवार, भुसावळ-पहिला, दुसरा व चौथा गुरुवार, धरणगाव-चौथा सोमवार, चाळीसगाव-पहिला, दुसरा व चौथा शुक्रवार, यावल - तिसरा सोमवार, सावदा - पहिला बुधवार, चोपडा - दुसरा सोमवार, रावेर - दुसरा मंगळवार, बोदवड - तिसरा बुधवार, भडगाव - पाचवा  शुक्रवार, पारोळा - तिसरा गुरुवार, मुक्ताईनगर- चौथा बुधवार याप्रमाणे दौरा राहील.                 

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द करण्यात येईल. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी     श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 

00000

माहिती अधिकारातंर्गत अधिसूचित माहिती सर्वसामान्यांना अवलोकनासाठी उपलब्ध करून द्यावी जिल्हाधिकारी अभिजित राऊतांची माहिती अधिकार दिवसाच्या कार्यक्रमात सूचना

      जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येण्यासाठी माहिती


अधिकार अधिनियमातंर्गत अधिसूचित केलेली माहिती विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करून ती नियमितपणे अद्ययावत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या.

     माहिती अधिकार दिवसानिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, सौ. शुभांगी भारदे, प्रसाद मते, किरण सावंत-पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार जितेंद्र कुवर, पंकज लोखंडे, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी आदींसह कर्मचारी उपस्थित होते. 

      जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो, तर 6 ते 12 ऑक्टोबर हा कालावधी माहिती अधिकार सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील विभागप्रमुखांनी आपापल्या कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. त्याचबरोबर माहिती अधिकार अर्जांची संख्या कमी होण्यासाठी दर सोमवारी दुपारी तीन ते पाच या कालावधीत कार्यालयातील अधिसूचित केलेले अभिलेख सर्वसामान्यांना अवलोकनासाठी उपलब्ध करून द्यावेत. या उपक्रमाची आपापल्या कार्यालयात अंमलबजावणी करीत शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करावे. 

त्याचबरोबर या सप्ताहनिमित्त शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठासंह अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये माहिती अधिकार अधिनियमावर आधारित वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यानमालेचे आयोजन करावे. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय सामाजिक संस्थांच्या मदतीने भित्तीचित्र स्पर्धेसह विविध उपक्रम आयोजित करावेत, असेही त्यांनी सांगितले.

                                                                                  00000

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 4 ऑक्टोबरला होणार ऑनलाइन

       जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार 4 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता लोकशाही दिन ऑनलाइन होणार आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. 

सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. त्याचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीयस्तरावर लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. 

त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन 4 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) होणार आहे. ज्या नागरिकांच्या काही तक्रारी असतील त्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात उपस्थित राहून तक्रारी मांडाव्यात, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                                00000

Monday, 27 September 2021

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फिट इंडिया मुव्हमेंटवर कार्यशाळेचे आयोजन

        जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व ऑलिम्पिक  अवरनेस कमिटी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने फिट इंडिया मुव्हमेंट या विषयावर एक आठवड्याची कार्यशाळा आजपासून 2 ऑक्टोबर, 2021 पर्यंत सकाळी 11 ते 1 या दरम्यान Zoom ॲपव्दारे, यू ट्यूब लाइव्ह व फेसबुक लाइव्हव्दारे आयोजित करण्यात येत आहे.           

            या कार्यशाळेत मंगळवार, 28 सप्टेंबर, 2021 रोजी डॉ. अपर्णा अष्टपुत्रे-शिसोदे (औरंगाबाद) या स्पोर्टस सायकालॉजी, 29 सप्टेंबर, 2021 रोजी सुयश बुरकूल (नाशिक) हे ट्रेनिंग ऑफ फिटनेस, 30 सप्टेंबर 2021 रोजी डॉ. सचिन पाटील (बऱ्हाणपूर) हे योगा, एक ऑक्टोबर, 2021 रोजी डॉ. अनिल करवंदे (नागपूर) हे फिजिओथेरपी, 2 ऑक्टोबर, 2021 रोजी संजय मिसर, डॉ. अजयपाल उपाध्याय, राजेश जाधव, डॉ. एस. एच. बेलोरकर डीबेट ऑन स्पोर्टसमध्ये सहभागी होतील. या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी लिंक, मिटींग आयडी आणि पासवर्ड खालीलप्रमाणे आहेत.

Join Zoom Meeting

https://us02web.zoom.us/j/85418466888?pwd=MW1ubzFISHdGUnFZU2dvZkFNb25HQT09

Meeting ID: 854 1846 6888

Passcode: 123456

00000        

नेहरू युवा केंद्राचे पुरस्कारांसाठी 19 ऑक्टोबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : विकासात्मक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा मंडळांना पुरस्कार देण्याची योजना केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातर्फे राबविण्यात येत आहे. त्यानुसार नेहरू युवा केंद्र, जळगावतर्फे यावर्षी पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

            केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय संचलित नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी युवा मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप जिल्हा स्तरावर रुपये 25 हजार, राज्य स्तरावर रुपये 75 हजार, तर राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे 3 लाख, 2 लाख आणि पन्नास हजार व प्रमाणपत्र असे आहे. विविध विषयांवर कार्य करणाऱ्या आणि नेहरु युवा केंद्र, जळगावशी संलग्न  असलेल्या युवा मंडळानी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत, असे आवाहन नेहरु युवा केंद्र, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी श्री. नरेंद्र डागर यांनी केले आहे.

            अर्ज करण्याची मुदत 19 ऑक्टोबर, 2021 पर्यत असून अर्जाचा नमुना नेहरु युवा केंद्र, जळगाव जिल्हा कार्यालय (जयहिंद कॉलनी, द्रौपदीनगर, जळगाव) येथे विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी  https://nyks.nic.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी.

00000

माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करावे

        जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : सर्वसामान्य  नागरिकांमध्ये माहिती अधिकाराबाबत जनजागृती होण्यासाठी मंगळवार 28 सप्टेंबर 2021 रोजी माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.        

            त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिनानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करावे. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

00000

Saturday, 25 September 2021

पंडित दीनदयाळ यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

            जळगाव, (जिमाका) दि. 25 - पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रमाचा संपन्न झाला. याप्रंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पंडित दीनदयाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार जितेंद्र कुंवर, सुरेश थोरात आदिंसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000



Friday, 24 September 2021

प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्याने रेशनकार्ड उपलब्ध करुन द्या - ना. छगन भुजबळ

             जळगाव (जिमाका) दि. 25 - राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्याने रेशनकार्ड उपलब्ध करुन देणेसाठी नियोजनबध्द कार्यक्रम राबविण्याचे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी आज दिलेत.

 

येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात मंत्री श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक बी. जी. जाधव, जिल्हा मार्केटींग अधिकारी एन. डी. मगरे, विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार साहेबराव शिंदे, वैधमापनशास्त्र विभागाचे निरिक्षक सी. डी. पालीवाल, रविंद्रभैय्या पाटील आदि उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले की, अंत्योदय योजनेत जिल्ह्यातील दिव्यांग, विधवा, परितक्त्‌या, भुमीहीन शेतमजूर, अल्पभुधारक शेतकरी, दुर्धर आजारग्रस्त, आदिवासी व्यक्ती, 60 वर्षावरील वृध्द ज्यांना कुठलाही आधार नाही तसेच दारिद्रय रेषेखालील नागरीकांचा समावेश करुन त्यांना या योजनेतंर्गत धान्याचा लाभ द्यावा. ज्या लाभार्थींनी गेल्या वर्षभरात धान्य घेतलेल नाही त्यांची यादी तयार करावी. तसेच गरजूंना धान्याचा लाभ देण्यासाठी धोरण आखावे, रेशनच्या मालाची अफरातफर होत असल्याचे आढळून आल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सुचनांही त्यांनी यावेळी दिल्यात.

 

शिवभोजन केद्राच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. शिवभोजन केंद्रांना नियमितपणे भेट देऊन तेथील तपासणी करावी. गरजू नागरीकांची शिवभोजनची गरज लक्षात घेऊन केंद्र वाढविण्यात यावेत. प्रत्येक केंद्रासाठी इष्टांक एकसारखा राहील याची दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

 

भरडधान्य केंद्रावर नावनोंदणीची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपत आहेत. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही मंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

 

 यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 57 टक्के लाभार्थी प्राधान्य कुटूंब योजनेत समाविष्ठ आहेत. आगामी काळात तीन महिन्याच्या धान्याची उचल करावयाची असल्याने पाळधी येथील गोडावून भाड्याने घेणे आवश्यक असून त्याबाबतचा तसेच अमळनेर व पाचोरा येथे गोडावून बांधण्याचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे त्यास मंजूरी मिळावी तर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना दिलेले ई-पॉस मशीन हे जुने झालेले आहेत ते बदलून मिळावे, तसेच सध्या जिल्ह्यात 48 शिवभोजन केंद्र सुरु असून त्यामध्ये दररोज 4600 थाळ्यांचे वाटप करण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सुर्यंवशी यांनी सांगितले. तर जिल्ह्यात सध्या 17 भरडधान्य खरेदी केंद्र सुरु असून नांवनोंदणीसाठी मुदत वाढून मिळण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत असल्याचे जिल्हा मार्केटींग अधिकारी श्री. मगर यांनी बैठकीत सांगितले.

00000





स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय अभासी रन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

             ळगाव, (जिमाका) दि. 24 - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, कवियत्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि ऑलिम्पिक जागरण समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन राष्ट्रीय आभासी रन तथा ऑलिंपिक जागरण चळवळ आयोजित करण्यात आली आहे.

            या स्पर्धेत दिनांक 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर, 2021 या कालावधीत केव्हाही स्पर्धक सहभाग नोंदवू शकतात, या उपक्रमात धावणे या बाबीचा समावेश केलेला आहे, स्पर्धक आभासी पध्दतीने धावून या स्पर्धत सहभागी होवू शकतात, धावण्यासाठी स्पर्धक आपल्या आवडीच्या मार्गाची निवड करु शकतात, आपले धावणे पूर्ण केल्यानंतर त्याची नोद घेण्यासाठी Googal Fit, Strava यासारखे कोणत्याही फिटनेस ॲपचा वापर करावा, आपल्या मोबाईलवरील ॲपच्या नोंदणीचा स्क्रीनशॉट काढावा, त्यानंतर सर्व माहिती स्क्रीनशॉटसह दिलेल्या लिंकवर क्लिक करावी. आपली वैयक्तीक माहिती भरुन उपक्रमात सहभागी होवून स्पर्धकाने सहभाग प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करुन घ्यावयाचे आहे.

            आयोजन समितीची लिंक:-

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpqLScef4wrdDIWXnPxRahhwD8eOgMriL7b25xp8nvzhAalkik-A/viewform?sf-link

इंडियाची लिंक :- https://fitindia.gov.in/freedom.run-2.0

            वरील दोन्ही लिंकवर आपली माहिती भरावयाची असुन दोन प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावयाचे आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा/ महाविद्यालय/ नागरीक/ खेळाडू/ संघटनेचे पदाधिकारी/खेळाडू यांनी govermment of India व कोविंड संदर्भात सर्व मार्गदर्शक तत्वाचे पालन करुन स्पर्धेत सहभागी व्हावे,

            तसेच आपल्या परीसरातील, कुटूंबातील, शाळेतील व संघटनेतील पदाधिकारी, खेळाडू व पालक यांनाही यात सहभागी करुन घ्यावे. असे आवाहन मिलींद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी केले आहे. काही अडचण आल्यास अधिक माहितीकरीता सतिष वाघ, मो.नं. 9545090006 वर संपर्क साधावा, असेही श्री. दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

000000

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील शनिवारी जिल्हा दौऱ्यावर

             ळगाव, (जिमाका) दि. 24 - राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.          

            शुक्रवार, दि.24 सप्टेंबर, 2021 रोजी रात्री 11.30 वाजता सी.एस.एम.टी. मुंबई रेल्वे स्टेशन येथे आगमन व अमृतसर एक्सप्रेसने जळगाव कडे प्रयाण.

            शनिवार] दि. 25 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 6.20 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व पाळधी] ता. धरणगावकडे शासकीय वाहनाने प्रयाण. सकाळी 6.50 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.. सकाळी 10.30 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून जळगावकडे प्रयाण, सकाळी 11.00 वाजता जळगाव येथे आगमन व ओबीसी परीषद कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ-राजे संभाजी नाट्यगृह, जळगाव. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव, दुपारी 3.45 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून जळगावकडे प्रयाण, दुपारी 4.15 वाजता दैनिक दिव्य भास्कर आयोजित फन्टास्टिक फार्मर्स अवॉर्ड कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- हॉटेल प्रेसिडेन्ट कॉटेज, जळगाव. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.

00000

अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने पूर्ण करा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

             जळगाव (जिमाका) दि. 24 - पिडीतांना जलदगतीने न्याय देण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने पूर्ण करावा. अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.  

            जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, जिल्हा सरकारी अभियोक्ता केतन ढाके,  नागरी हक्क संरक्षण विभागाच्या श्रीमती कल्याणी पाटील, आदिवासी विकास विभागाचे डी. बी. चौधरी, जिप समाज कल्याण विभागाचे आर. आर. बारी, सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदि उपस्थित होते. 

            पिडीतांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहू नये याकरीता पोलीस विभागाने आवश्यक ते नियोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी दिल्या होत्या. या बैठकीमध्ये श्री. राऊत यांनी न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती घेऊन पिडितांना नियमानुसार अर्थसहाय्य तातडीने मंजूर करण्याच्याही सूचना दिल्यात.

            प्रारंभी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी माहे जुलैअखेर अनुसूचित जातीची 7 तर अनुसूचित जमातीची 6 असे एकूण 13 गुन्हे पोलीस तपासावर असल्याची माहिती बैठकीत दिली. त्यापैकी 7 गुन्ह्यांची निर्गती पोलीस विभागाने केली आहे. उर्वरित 6 व ऑगस्टमध्ये नव्याने दाखल झालेले 6 असे एकूण 12 गुन्हे पोलीस तपासावर असल्याचे सांगितले. ऑगस्ट महिन्यात 11 पिडीतांना 15 लाख 43 हजार 750 रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती श्री. पाटील यांनी बैठकीत दिली. 

00000

जिल्ह्यात 8 ऑक्टोबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

             जळगाव, (जिमाका) दि. 24 - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 8 ऑक्टोंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे.

            या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

00000

आरोग्य विभागाच्या 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

             जळगाव, (जिमाका) दि. 24 - जिल्हा शल्य चिकीत्सक, जळगाव यांचेमार्फत आरोग्य विभागातील गट-ड संवर्गाची परिक्षा रविवार, 26 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत जळगाव शहरातील एकुण 43 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परिक्षेच्यावेळी गैरप्रकार होवू नये तसेच परिक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा उत्पन्न होवू नये याकरीता 26 सप्टेंबर, 2021 रोजी पेपर सुरु झालेपासून ते संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जळगाव शहरातील एकूण 43 उपकेद्राचे 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये.

            सदर आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही, तसेच परिक्षा केद्राजवळच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन/एस.टी.डी/आय.एस.डी/फॅक्स केंद्र/ झेरॉक्स दुकाने, कॉम्प्यूटर दुकाने व ध्वनीक्षेपक पेपर सुरु असलेल्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत.

            सर्व संबंधितांवर वैयक्तिकरित्या नोटीस बजविण्यास पुरेसा कालावधी नसल्याने फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार हा आदेश एकतर्फी काढण्यात येत आहे. असे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000


 

Thursday, 23 September 2021

प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

           जळगाव (जिमाका) दि. 23 – सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका  (D.EI.Ed) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. तथापि, अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.maa.ac.in संकेत स्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.           

                प्रवेशाची शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण (खुला) संवर्ग 49% व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 45 % गुणांसह), प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी दिनांक 24 ते 28 सप्टेंबर, 2021, पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पाडताळणी करणे 24 ते 30 सप्टेंबर, 2021, प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन भरणे)–खुला संवर्ग रुपये 200 खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग रुपये 100 इतके आहे.          

यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन Approve करुन घेतला आहे. परंतू प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती (Correction) मध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले असे सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन Approve केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे.      

                प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरी नंतर (D.EI.Ed) प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे अध्यक्ष, राज्यस्तरीय डी.एल.एड प्रवेश निवड, निर्णय व संनियत्रण समिती, पुणे तथा संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

        00000

पीक विमाधारक शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

         जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री पीक विमा योजना सन – 2021-22 खरीप हंगाम करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत  काढणी पश्चात नुकसान या बाबीकरीता ज्या पिकांची कापणी, काढणीनंतर सुकवणीसाठी  शेतात  पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर  दोन आठवड्यांच्या आत  (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन निकषांच्या अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाते. पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या अधिसूचित  पिकांचे काढणीनंतर नुकसान झाले असल्यास 72 तासांच्या आत झालेल्या नुकसानीची सूचना प्रथम विमा कंपनीस टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप, ई – मेलव्दारे किंवा तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईनव्दारे देणे आवश्यक आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

00000

जिल्हा कौशल्य विकास विभागातर्फे आज ‘स्वयंरोजगार’बाबत मार्गदर्शन

        जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : युवक – युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयातर्फे स्वयंरोजगार सुरू करताना कोणती काळजी घ्याल? या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे शुक्रवार 24 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 3 ते 4.30 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.

                स्वयंरोजगार सुरु करताना कोणती काळजी घ्याल ? या मार्गदर्शन सत्रात प्रशिक्षक, लेखक विनोद अनंत मेस्त्री मार्गदर्शन करतील. आरसेटी उस्मानाबादचे विकास गोफणे  दुपारी 3.30 ते 3.55 वाजता मार्गदर्शन करतील. दुपारी 4 ते 4.30 या कालावधीत प्रश्नोत्तरे होतील. या मागदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.

फेसबुक - https://www.facebook.com/MaharashtraSDEED

युट्युब - https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A 

00000