Thursday, 14 March 2024

जिल्ह्यातील बँकांनी कृषी आणि कृषीपूरक व्यवसायाला अर्थपुरवठा करावा त्यातून रोजगार निर्मिती व जिल्ह्याच्या विकासाला चालना - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद_ ▪️ मजुरांच्या समुहाला यांत्रिकी साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य पुरविणे ▪️ महिला बचत गटांना फुल शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे

 






जळगाव दि.14 ( जिमाका ) जिल्ह्यात कृषी व पूरक व्यवसायाकडे जिल्ह्याच्या आर्थिक परिवर्तनाची ताकत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील बँकांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून त्यातून रोजगार आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. पशुपालन,मत्स्य व्यवसायाच्या प्रक्रिया उद्योगात खुप मोठी संधी आहे. त्या दृष्टीने सर्व बँकांनी काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

   जिल्ह्यातील सर्व बँकांच्या क्षेत्रीय व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक यांच्याकडून दिनांक 13/3/24 व 14/3/24 रोजी आयोजित बैठकांमध्ये त्यांनी मागील वर्षाचा कामकाजाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

    या बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील , जिल्हा व्यवस्थापक अग्रणी बँक प्रणवकुमार झा , नाबार्ड जिल्हा समन्वयक, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक, संचालक आत्मा, 'एमएसएमई'चे नोडल अधिकारी, उद्योजक यांची उपस्थिती होती.

    जिल्हाधिकारी म्हणाले, जामनेरला सुमारे 4000 शेततळे मंजूर आहेत, त्यापैकी बाराशे शेततळे यावर्षी तयार होतील. तेथे मत्स्य व्यवसायाला संधी निर्माण होईल, त्यासाठी विविध सहकारी संस्थांना लक्ष्य करून रोजगार निर्मितीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा तसेच ओमेगा थ्री फॅटी ऍसिड उद्योग देखील तेथे उभारता येईल व त्यासाठी विशिष्ट बचत गट किंवा शेतकरी ऑर्गनायझेशन यांच्या सहाय्याने ओमेगा थ्री फॅटी ऍसिड उद्योगाची चाचपणी करण्यात येईल.

    मत्स्यपालन बरोबर पशुपालन व्यवसायाचे देखील लक्ष पूर्ण करण्याचे सांगितले. पशुधनाच्या लसीकरण शिबिरात सामील होऊन पशुधन योजना ची प्रचार प्रसिद्धी आणि केसीसी हे दोन्ही लक्ष साध्य करण्याचे

जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

    रेशीम उत्पादनासाठी जामनेर तालुका हा योग्य असल्याचे सांगून जामनेर येथून छत्रपती संभाजीनगर मार्गे जालना मार्केट पोहोचणे सोपे असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले.

     बैठकीत पुढील आर्थिक वर्षासाठी बँकांचा क्षेत्रनिहाय, योजना निहाय कृती आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. कृषीसाठी केसीसी करण्यात शंभर टक्के लक्ष साध्य करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले. 


जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितलेले ठळक मुद्दे

▪️महिला बचत गटांना फुलांची शेती करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येईल 

▪️अस्तित्वात असलेल्या दूध शीतकरण केंद्राना दूध प्रक्रिया उद्योगाला जोडण्यासाठी बँक आर्थिक सहाय्यक करेल

▪️मजुरांच्या समुहाला यांत्रिकी साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य पुरवणे आणि हेच मजुरांचे समुह  शेतीसंबंधी कामाला सेवा पुरविण्याचे काम करेल त्यातून शेतीचे कामे जलद होतील आणि त्यांना त्यातून रोजगार मिळेल. 

▪️केळीच्या खोडापासून धागा, सेंद्रिय खत तसेच कोळसा निर्मिती शक्य आहे म्हणून क्षमता असलेल्या प्रत्येक गावात प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी बँकांनी सहाय्य करावे

No comments:

Post a Comment