Thursday, 30 April 2020

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न












            जळगाव, (जिमाका) दि. 1 -  महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.
            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, प्रांताधिकारी दिपमाला चौरे, तहसीलदार श्वेता संचेती, गृह शाखेचे नायब तहसीलदार रवि मोरे आदी उपस्थित होते.
            यानिमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या व कोरोनाच्या संकटातून आपण सर्वजण एकजुटीने बाहेर पडू, असा विश्वासही व्यक्त केला.
            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग चे पालन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला हा ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने पण उत्साहात संपन्न झाला.
00000

रास्त भाव दुकानातून धान्य वाटपाचे वेळापत्रक जाहिर नागरीकांनी गर्दी टाळण्यासाठी वेळापत्रकानुसारच धान्य घेण्यास जावे धान्य घेताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन


              जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 30 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाथार्थ्याना तसेच एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांसाठी कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत शासनाने आधी घोषित केल्याप्रमाणे मे आणि जुन, 2020 चे धान्य   सवलतीच्या दराने मासिक नियतन मंजूर करण्यात आलेले आहे. शासनाच्या निर्देशानुसार या दोन महिन्यांचे धान्य त्या-त्या महिन्यातच वितरीत करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली आहे.
         कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानांच्या ठिकाणी गर्दी होवू नये यासाठी मे महिन्यात 1 ते 10 मे, 2020 या कालावधीत एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांसाठी धान्य वाटप होईल. तर 11 ते 20 मे, 2020 या कालावधीत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थ्यांना नियमित धान्य देणेत येईल, त्याचबरोबर 21 ते 31 मे, 2020 या कालावधीत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वाटप करणेत येईल. तसेच 21 ते 31 मे, 2020 या कालावधीत राहिलेले एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक, अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजना लाभार्थी यांना त्यांचे नियमित देय आणि मोफतचे धान्य देणेत येईल.
          दिनांक 1 ते  10 मे, 2020 या कालावधीत एपीएल (केशरी) शिधापत्रिका ज्या रास्त भाव दुकानास जोडली आहे, त्या रास्त भाव दुकानातून सदर अन्नधान्य वितरण होईल. या कालावधीत अन्नधान्य न घेतल्यास दि. 21 ते 31 मे, 2020 या कालावधीत शिधापत्रिकाधारकांनी धान्य प्राप्त करून घ्यावे. असेही श्री सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
      एपीएल केशरी शिधापत्रिकाधारका पात्र लाभार्थ्यांची यादी असलेले डी-1 रजिष्टरनुसार शिधापत्रिकेत नमुद सदस्यांकरीता सवलतीच्या दराने अन्नधान्य देय राहील. डी-1रजिष्टरला नोंद नसल्यास धान्य मिळणार नाही. अशा कार्डधारकांनी जुने कार्ड तहसिल कार्यालयात जमा करावे. अशा कार्डांची चौकशी करणेत येऊन कडक कारवाई करणेत येईल. या लाभार्थ्यांनी नवीन पुरावे देऊन रिसर नवीन कार्ड काढून घ्यावे. ज्या एपीएल शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा या शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसेल आणि संबंधित शिधापत्रीकाधारकांनी मुळ शिधापत्रीका सादर केल्यास अशा शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिणापत्रिका तपासून विहीत दराने अन्नधान्य देण्यात येईल. अन्नधान्य वाटप करतांना दुकानदाराकडून त्या शिधापत्रिकेचा क्रमांक, त्यातील पात्र सदस्यांची संख्या शिधापत्रिकेवरील संपुर्ण तपशिल याची नोंद घेतली जाईल. नोंदवहीमध्ये धान्य घ्यावयास आलेल्या सदस्याची स्वाक्षरी अथवा डाव्या हाताचा अंगठयाचा ठसा न घेता शिधापत्रिमेमधील कुटूंबप्रमुखाचा अथवा अन्य सदस्याचा आधार क्रमांक उपलब्ध असल्यास नमुद करावा.
 जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांकडून या योजनेंतर्गत जेवढया लाभार्थ्यांना सवलतीचा लाभ दिला याबाबतचा तपशिल दररोज संकलित करणेत यावा. एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना धान्य दिल्यानंतर त्यांचे शिधापत्रिकेवर धान्य दिल्याची पोहच म्हणून शिधापत्रिकेच्या शेवटच्या पानावर शिक्का मारणेत येईल.              मे आणि जुन मध्ये 8 रुपये प्रति किलो दराने गहू, प्रती सदस्य 3 किलो आणि 12 रुपये प्रति किलो दराने तांदूळ, प्रती सदस्य 2 किलो असे एकूण 5 किलो धान्य प्रति सदस्यास मिळणार आहे. सदरचे धान्य हे मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात संबंधित रास्त भाव दुकानातून उपलब्ध होणार आहे. तसेच माहे जुनमध्ये देखील याचप्रमाणे अन्नधान्य मिळणार आहे.       
           एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना धान्य दिल्याबाबत दिलेल्या नमुन्यात स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात येईल. तालुक्यात योग्यरितीने एपीएल (केशरी) साठी अन्नधान्याचे वाटप करण्याची जबाबदारी रास्तभाव दुकानदार तसेच पुरवठा ग्राम दक्षता समिती यांची राहील. जिल्हा प्रशानाकडून शिक्षकांच्या सेवा या कामी घेणेत आल्या असुन शिक्षकांकडे 50 ते 60 कुटूंबांच्या पालकत्वाची जबाबदारी देणेत आली आहे.
           नियुक्त पालक शिक्षक लाभार्थी प्रमाण, धान्याचा प्रकार, देय असलेले धान्य, त्याचा दर, प्रत्येक लाभार्थ्यास तो समाविष्ट असलेल्या योजनेनुसार किती धान्य देय आहे. स्वस्त धान्य दुकान कोठे आहे. दुकानाची वेळ या बाबींची कुटुंबामध्ये जनजागृती करतील. पालक शिक्षक त्यांना नेमुन दिलेल्या लाभार्थ्यांना त्यांना देय असलेले धान्य सुरळीत मिळाले किंवा कसे याबाबतचा अहवाल संबंधीत तलाठी यांना सादर करतील.
            ग्रामस्तरीय दक्षता समिती, सदस्य व पालक शिक्षक लाभार्थ्यांना सोशन डिस्टन्सिंगचे महत्व समजावून सांगतील. पात्र लाभार्थी, कार्डधारक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता याकामी नियुक्त सर्व यंत्रणांनी घ्यावयाची आहे. अशाच पध्दतीचे नियोजन माहे जुन 2020 मध्ये देखील करणेत आलेले असून माहे जुन मध्ये देखिल ग्रामस्तरीय दक्षता समिती व पालक शिक्षक पर्यवेक्षण करतील व अहवाल सादर करतील. तहसिल स्तरावर नायब तहसिलदार/अवल कारकून/मंडळ अधिकारी/पुरवठा निरीक्षण अधिकारी/पुरवठा निरिक्षक त्यांना नेमून देणेत आलेल्या रास्त भाव दुकानांची तपासणी करतील. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव सुनिल सुर्यंवशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 
00000

स्नेहाची शिदोरी, थेट गरजूंच्या दारी...


       

          एक तीळ सात जणांनी वाटून खाण्याची, आपल्याकडे असलेल्या एक भाकरीतील अर्धी भाकरी समोरच्या उपाशी माणसाला देण्याची आपली भारतीय संस्कृती. आपण ज्या सामाजात राहतो त्या समाजाचे आपल्यावर अनंत उपकार असतात. या समाजाचे आपण काही देणे लागतो ही आपली शिकवण. या भावनेतूनच जळगाव येथील भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्यावतीने लॉकडाऊनच्या काळात गरीब व गरजू नागरीकांसाठी ‘स्नेहाची शिदोरी’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
            कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहिर केला आहे. लॉकडाऊनचे राज्यात तंतोतंत पालन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन, शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विविध उपाययोजना राबवित आहे. हे करीत असतांना जिल्ह्यातील कोणीही नागरीक उपाशी राहणार नाही याकडेही प्रशासन विशेष लक्ष देत आहेत. जिल्ह्यातील गरीब व गरजू नागरीकांना अवघ्या पाच रुपयात शासनाच्या शिवभोजन थाळीचा लाभ देण्यात येत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे ज्यांचा रोजगारच बंद झाला आहे अशा नागरीकांना दोनवेळेचे जेवण उपलब्ध व्हावे. याकरीता जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांना आवाहन केले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोणीही नागरीक उपाशीपोटी राहू नये याकरीता उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. प्रशासनाच्या आवाहनास जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती भरभरुन प्रतिसाद देत असून दररोज सुमारे 10 हजारपेक्षा अधिक गरजूंना मोफत जेवण उपलब्ध करुन देण्यात आले. त्यातील एक म्हणजे जैन इरिगेशन होय.
            लॉकडाऊनच्या काळात समाजातील तळागाळातील कुटुंबांना उपाशी झोपण्याची वेळ येऊ नये, त्यांना आपल्याकडून काही मदत व्हावी हा उदात्त विचार जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन व जैन बांधवांनी केला. गोरगरीबांसाठी काही भोजनाची व्यवस्था व्हावी त्यादृष्टीने जैन इरिगेशन ‘स्नेहाची शिदोरी, थेट गरजूंच्या दारी’ हा आगळावेगळा उपक्रम 2 एप्रिलपासून राबवित आहे. या उपक्रमातंर्गत सकाळच्या जेवणात कडधान्याची भाजी, चार चपाती असे सुमारे 5500 अन्नाची पाकीटे तर सायंकाळी मसाला भाताची सुमारे 3500 पाकिटे गरजवंतांपर्यंत संस्थेच्या माध्यमातून पोहोचविले जात आहेत. आजमितीस सुमारे दोन लाख जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे जे कोरोना वॉरियर्स आहेत त्यातले पोलीस, नर्स, डॉक्टर व अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांपर्यंत जैन कंपनीचे हेल्थ ड्रिंक, विविध फळांचा ज्युस देखील पाठविला जात आहे. अन्नाची पाकीटे पोहोचविण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवक शहरातील झोपडपट्टी, अनाथालये, वृद्धाश्रम आदि ठिकाणी दुपारच्या व रात्रीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत ही पाकिटे पोहोचवितात. शहराच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गरजवंतापर्यंत अवघ्या तास दीड तासात ही ‘स्नेहाची शिदोरी’ संस्थेमार्फत पोहोचविली जात आहे.
            याशिवाय जिल्ह्यात व शहरातही अनेक संस्था गरजूंना मदत करीत आहे. नाथ फाऊंडेशनच्यावतीने शहरातील निवारागृहातील मजूरांना जेवण व इतर मदत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच रेडक्रॉस सोसायटी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, व्यंकटेश देवस्थान, रोटरी क्लब, भरारी फाऊंडेशन, संपर्क फाऊंडेशन, रॉबिनहूड फाऊंडेशन, मणियार बिरादरी, विश्व मानव रुहानी केंद्र, अमर शहीद संत कवरराम ट्रस्ट, शिवसह्याद्री प्रतिष्ठाण, नाशिराबाद, अलफैज फाऊंडेशन या व इतरही अनेक सेवाभावी संस्था, सामजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी हे शंभर ते एक हजारापर्यंत जेवणाची पाकिटे गरजूंना दररोज वाटप करीत आहे. या विविध संस्थांच्या माध्यमातून जळगाव शहरात दररोज दहा हजारपेक्षा अधिक गरजू व गरीबांना जेवणाच्या पाकिटाचे वाटप करुन त्यांची भूक भागविली जात आहे.
            तसेच लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये याकरीता शहरातील ज्या भागात गरजू व गरीबांना जेवणाची आवश्यकता असेल तेथील दैनंदिन माहिती घेऊन त्याठिकाणी सामाजिक संस्थामार्फत जेवण पाठविण्याचे नियोजन नोडल अधिकारी प्रसाद मते हे या संस्थांशी संपर्क करुन करीत आहेत. तसेच त्याठिकाणी वेळेवर जेवण पाठविण्यासाठी त्यांची टिम झटत आहे.
            याचबरोबर जिल्ह्यातील गरजवंताना जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप करुन अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आपले योगदान देऊन सेवाभाव जपत आहे. हे सर्व करीत असताना लॉकडाऊनच्या नियमांचा कुठलाही भंग होणार नाही किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे त्यांचेही पालन करण्यावर या संस्थांचा भर आहे. या संस्थांचा सेवाभाव तसेच जेवण बनविण्याची पध्दत, जेवणाचा दर्जा, स्वच्छता, वाटपाची पध्दत जाणून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन या संस्थांच्या कार्याचे कौतूक केले आहे.
विलास बोडके
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव
00000

जिल्ह्यातील विविध संस्थांकडून प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आतापर्यंत 53 लाख 65 हजार रुपयांची मदत


            जळगाव, दि. 30 (जिमाका) - कोरोना विषाणू संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध सहकारी तसेच शैक्षणिक संस्थांनी प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एकूण 53 लाख 64 हजार 933 रुपयांची मदत केली. देणगी देणाऱ्या संस्था आणि त्यांच्याकडून प्राप्त रकमा पुढील प्रमाणे..
            राजाभाऊ मंत्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,मर्या.कासोदा ता.एरंडोल रक्कम रुपये 2 लाख 11 हजार 111, जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सावदा, ता. रावेर रक्कम रुपये 21 हजार, सरदार वल्लभभाई पटेल नागरी सहकारी संस्था मर्या.रावेर रक्कम रुपये 11 हजार, नायगाव विविध कार्य.सेवा सह.संस्था मर्या.नायगाव, ता.यावल रक्कम रुपये 5 हजार, श्री. संतसेना महाराज नागरी सह.पतसंस्था,मर्या. भडगाव रक्कम रुपये 5 हजार, भडगाव तालुका सरकारी व निमसरकारी नोकरांची सहकारी पतसंस्था,मर्या.भडगाव रक्कम रुपये 5 हजार, सावित्रीबाई फुले नागरी सह. पतसंस्था,मर्या. भडगाव, ता. भडगाव रक्कम रुपये 1 हजार 500, आबासो. दत्ता पवार नागरी बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.भडगाव रक्कम रुपये 1 हजार 100, कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील शिक्षण संस्थेतील नोकरांची सह.पतसंस्था मर्या. भडगाव रक्कम रुपये 3 हजार 11, जयदुर्गा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.भडगाव रक्कम रुपये 2 हजार 100, दादासो. एस के पाटील नागरी पतसंस्था मर्या.जळगाव 5 हजार यांनी मदतीचे धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केले आहेत. याप्रमाणे जिल्ह्यातून विविध संस्थांकडून आतापर्यंत एकूण 53 लाख 64 हजार 933 रुपयांची मदत प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्राप्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
                                                                   00000

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी नागरीकांनी तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा - जिल्हाधिकारी डॉ ढाकणे


            जळगाव, (जिमाका) दि. 28 - लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातून ज्या नागरीकांना परराज्यात अथवा इतर जिल्ह्यांमध्ये जायचे असेल त्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
             जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.
            लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरीकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार गेल्या दिड महिन्यापासून अडकून पडलेल्या नागरीकांचा आपल्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी ज्या नागरीकांना जिल्ह्याबाहेर जायचे असेल त्यांनी  संबंधित तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा. या अर्जात नागरीकांनी आपले पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, कोणत्या ठिकाणी जायचे त्याची माहिती, आधारकार्डची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट साईज दोन छायाचित्रे, वाहन नेणार असल्यास वाहनाचा क्रमांक, वाहनचालकाचे नाव, प्रवासाचा मार्ग आदि माहिती असणे आवश्यक आहे. सदरची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकत्रित केली जाईल. त्यानंतर ती यादी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवतील. त्यानंतर जिल्हाधिकारी या नागरीकांना जाण्यासाठी पत्र देणार आहे. जिल्हाधिकारी यांचे पत्र असल्याशिवाय लोकांच्या कोणत्याही गटाला स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तीना कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नाहीत त्यानांच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाईल. लक्षणे असल्यास निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे त्यांचेवर वैद्यकीय उपचार करण्यात येतील.
            वाहतुकीला वापरण्यात येणारी वाहने जंतुनाशकांनी फवारलेली असावी तसेच वाहनात देखील सोशल डिस्टेंसिंग पाळावे लागणार आहे. त्यानुसार किती लोक वाहनाने जाणार आहे त्याप्रमाणे परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात इतर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन कालावधीत राहावे लागणार आहे. जिल्ह्यात आलेल्या सर्व प्रवाशांची प्रथम वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर सबंधित व्यक्तीस घरीच क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल तसेच त्यांना केंद्र शासनाचे आरोग्यसेतू मोबाईल एप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येईल जेणे करून त्यांना कायम संपर्कात ठेवता येईल. असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे सांगितले आहे.
00000