Monday, 31 May 2021

जिल्ह्यात संचारबंदीसह विशेष निर्बंधात १५ जूनपर्यंत वाढ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आदेश


 

अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने दररोज सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या वेळेत सुरु राहतील.

स्वतंत्र ठिकाणी असलेली इतर प्रकारचे सर्व दुकाने ही केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत सुरु राहतील.

अत्यावश्यक वस्तू व सेवांबाबत घरपोच वितरण सुविधा ह्या दररोज सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत देता येतील.

सर्व प्रकारची केश कर्तनालये (सलून), स्पा सेंटर्स, जिम पूर्णपणे बंद राहतील.

अत्यावश्यक कारणांव्यतिरीक्त दुपारी 2.00 वाजेनंतर नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास बंदी राहील. 

कृषी संबंधित सेवा पुरविणारी दुकाने ही दररोज सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत सुरु ठेवता येतील.

मॉर्निंग वॉक, सायकलींग, खुल्या मैदानातील व्यायाम याकरीता केवळ सकाळी 4.00 ते 8.00 यावेळेतच सुट राहील.

दुकानांच्या प्रवेशाच्या ठिकाणी/काऊंटर समोर एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही.

नियमांचे उल्लंघन करणारे दुकान मालक/चालक व घटक यांचेकडून रुपये 10 हजार दंड आकारण्यात येईल

आस्थापनांच्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी/कामगार यांचे भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (वय वर्षे 45 वरील) लसीकरण करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच सदर कर्मचारी/कामगार यांची साप्ताहिक RTPCR चाचणी करुन घेणे बंधनकारक राहील.

  जळगाव, दि. 31 (जिमाका) - जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडील 15 मे, 2021 च्या आदेशान्वये संपूर्ण जळगाव जिल्ह्यात 1 जून, 2021 रोजी सकाळी 07.00 वाजेपावेतो संचारबंदीसह सुधारीत विशेष निर्बंध लागू करण्यात आलेले होते. सदरचे निर्बंध 15 जून 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपावेतो वाढविण्यात आलेले आहे. याबाबतचे आदेश अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी आज निर्गमित केले आहे.

a) अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने दररोज सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या वेळेत सुरु राहतील.

b) स्वतंत्र ठिकाणी असलेली (Standalone Single shops) इतर प्रकारचे सर्व दुकाने हे केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत सुरु राहतील. सदरची Non-Essential दुकाने दर शनिवार व रविवार या दोनही दिवशी पूर्ण वेळ बंद राहतील. सर्व Essential व Non-Essential प्रकारच्या दुकानांच्या प्रवेशाच्या ठिकाणी /काऊंटर समोर एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही. 

c) दुकान मालक/चालक यांनी दुकानांच्या दर्शनी भागात बँक काऊंटर प्रमाणे काच/प्लास्टीकचे पारदर्शक शीट किंवा कमी खर्चात करावयाचे असल्यास पारदर्शक प्लास्टीक पडदा यांचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच सदर पडद्यातून केवळ ग्राहकास वस्तूंची देवाण-घेवाण करता येईल एवढीच मोकळी जागा ठेवण्यात यावी.

d) अत्यावश्यक वस्तू व सेवांबाबत घरपोच वितरण सुविधा (Home deliveries) ह्या दररोज सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत देता येतील. ई कॉमर्स सुविधेद्वारे Non-Essential वस्तूंची सुविधा सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत देता येतील.

e) सर्व प्रकारची केश कर्तनालये (सलून), स्पा सेंटर्स, जिम पूर्णपणे बंद राहतील.

f) अत्यावश्यक कारणांव्यतिरीक्त दुपारी 2.00 वाजेनंतर नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास बंदी राहील. 

g) सर्व शासकीय कार्यालयात (आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालये, पोलीस विभाग, अत्यावश्यक सेवा संबंधित कार्यालये वगळून) 25% कार्यालयीन उपस्थिती राहील.  तथापि, कार्यालयीन उपस्थिती वाढविण्याबाबत कार्यालय प्रमुखांनी निर्णय घ्यावा.

h) जळगाव जिल्हा हा कृषीप्रधान असल्याने व मान्सूनपूर्व शेती विषयक कामे, पेरणी हंगाम सुरु असल्याने कृषी संबंधित सेवा पुरविणारी दुकाने हे दररोज सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत सुरु ठेवता येतील.  

i) माल वाहतूक /कार्गो वाहतूक सुरळीतपणे सुरु राहील. तसेच सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या वेळेनंतर देखील दुकानात केवळ माल भरण्याकरीता सुट राहील. तथापि सुट दिलेल्या वेळेनंतर दुकानातून ग्राहकास सेवा पुरविता येणार नाही. शासन आदेश दिनांक 12 मे, 2021 अन्वये नियमांचे उल्लंघन करणारे दुकान मालक/चालक व घटक यांचेकडून रुपये 10 हजार मात्र दंड आकारण्यात येईल व पुन्हा चूक केल्याचे आढळून आल्यास कोविड-19 चा संसर्ग कमी होईपावेतो सदचे दुकाने बंद ठेवण्यात येतील.

j) वरील नमूद आस्थापनांच्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी / कामगार यांचे भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (वय वर्षे 45 वरील) लसीकरण करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच सदर कर्मचारी/कामगार यांची साप्ताहिक RTPCR चाचणी करुन घेणे बंधनकारक राहील.

k) मॉर्निंग वॉक, सायकलींग, खुल्या मैदानातील व्यायाम याकरीता केवळ सकाळी 4.00 ते 8.00 यावेळेतच सुट राहील.

               भविष्यात जळगाव जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10 % किंवा अधिक झाल्यास व ऑक्सिजन बेडची उपलब्धता 40 % पेक्षा कमी झाल्यास सदरच्या आदेशात नव्याने सुधारणा करण्यात येईल.

                     जळगांव शहर महानगरपालिका व जळगांव जिल्हयातील सर्व नगरपालिका/नगर पंचायत भागातील गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर, हातगाडीवर वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची (वेंडर्स/ हॉकर्स) व त्या ठिकाणी खरेदी साठी नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याने शहरातील गर्दी होणाऱ्या अशा ठिकाणी रस्त्यांवर, हातगाडीवर वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना (वेंडर्स/ हॉकर्स) संबंधित वस्तूंची विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात यावी. तथापि जे वेंडर्स/हॉकर्स सदर निर्देशाचे उल्लंघन करतील त्यांचेवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. 

            वरील सुचनांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरित्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.        

            सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही श्री. राऊत यांनी आदेशात म्हटले आहे. 

000000

‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ अंतर्गत ऑक्सिजन निर्मिती उद्योगांना विशेष प्रोत्साहन मिळणार

 

   जळगाव, दि. 31 (जिमाका) - महाराष्ट्रासह भारत देश कोरोना महामारीचा सामना करीत आहे. राज्यामध्ये कोविड-19 महामारीमुळे प्राणवायु (मेडिकल ऑक्सिजन) तुटवडा वाढला आहे. भविष्यात राज्यासाठी प्रतिदिन 2300 मे. टन प्राणवायु पुरवठ्याची आवश्यकता राहणार आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाने “मिशन ऑक्सिजन स्वावलंबन” अंतर्गत ऑक्सीजन निर्मिती उद्योगांसाठी विशेष प्रोत्साहने अनुज्ञेय करणेबाबत २१ मे, २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
     या शासन निर्णयानुसार प्राणवायु निर्मिती उद्योजकांना नवीन तसेच विस्तारीकरण प्रकल्प उभारणीस शासन विशेष प्रोत्साहन देणार आहेत. याचा लाभ प्राणवायू निर्मिती उद्योजकांनी घ्यावा. असे आवाहन उमेशचंद्र दंडगव्हाळ, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                          0000

शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची माहिती कळविण्याचे कृषि विभागाचे आवाहन


 जळगाव, दि. 31 (जिमाका) - जिल्ह्यात सन 2020-21 करीता पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार करीता अधिसुचित फळपिकांना लागु करण्यात आली आहे. या योजनेत आता अंबिया बहारा करीता मोसंबी, डाळींब, केळी व आंबा यापिकांसाठी अधिसुचित क्षेत्रात राबविण्यात येत आहे.
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (अंबिया बहार) आता केळी व आंबा यापिकांसाठी लागू आहे. तेव्हा नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची माहिती विमा कंपनी व कृषि विभागास (तालुकास्तरावर) त्वरीत कळविणे (Intimition) आवश्यक आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन/तीन दिवसांपासून वेगाचा वारा/अवेळी पाऊसामुळे फळपिकांचे नुकसान झालेले आहे. अशा नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधीत विमा कंपनी, महसुल विभाग व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तीक पातळीवर नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन घ्यावेत. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                         000000

जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्या निम्म्यावर जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना यश • जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 94 टक्क्यांवर

 जळगाव, (जिमाका) दि. 31 - कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्याने जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11 हजार 813 वरुन 5 हजार 915 पर्यत म्हणजेच निम्म्याने घटली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे सतत वाढते आहे. ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब असली तरी नागरीकांनी गाफील न राहता यापुढेही कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्ह्यात पहिल्या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या 12 हजारांच्या आसपास गेली होती. मात्र राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने लावलेले कडक निर्बध, जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना, माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान व संशयित रुग्ण शोध माहिमेसह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांचे सहकार्य यामुळे जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आले होते. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 12 हजारांवरुन 304 (6 फेब्रुवारी, 2021 रोजी) पर्यंत खाली आणण्यात यंत्रणेला यश आले होते. मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्यास सुरुवात झाली होती. या लाटेत जिल्ह्यात दररोज हजारो बाधित रुग्ण आढळून येत होते. 1 एप्रिल, 2021 रोजी जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या 11 हजार 813 या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. मात्र शासनाच्या ब्रेक द चेन अतंर्गत जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बध अधिक कडक करण्यात आले. शिवाय बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्णांचा शोध घेऊन कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेत उपचार झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तर वाढलेच शिवाय मृत्युदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश आले. सध्या जिल्ह्यात 5 हजार 915 इतके सक्रीय रुग्ण आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 11 लाख 50 हजार 783 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. असून त्यापैकी 1 लाख 39 हजार 827 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर 10 लाख 7 हजार 925 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या 4 हजार 722 रुग्ण होम क्वारंटाईन असून 212 रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 5 हजार 915 सक्रीय रुग्णांपैकी 4 हजार 906 रुग्ण लक्षणे नसलेले तर 1 हजार 9 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत, अशी माहिती कोविड-19 चे नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

                                                                 00000

वाघूर धरण पाणी मागणी अर्ज 5 जूनपूर्वी करण्याचे आवाहन


    जळगाव, दि. 31 (जिमाका) - वाघुर धरण विभाग, जळगाव कार्यक्षेत्रातील वाघुर डावा कालवा व उजवा कालवा तसेच कालवा उपसा यावरील प्रकल्पावर जेथे शक्य असेल तेथे कालव्याव्दारे (प्रवाही) तसेच अधिसुचीत/अनधिसुचित लाभक्षेत्रातील नदी-नालामधून उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग घेणाऱ्या सर्व बागायतदारांना कळविण्यात येते की, चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यानुसार उन्हाळी हंगामामध्ये 1 ते 30 जून 2021 या मुदतीत कपाशी, ज्वारी, गहु, हरभरा बारमाही, इतर बारमाही भाजीपाला, इतर तेलबिया, कडधान्य व भूसार पिके इत्यादी पिकांसाठी पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरिक्त उपलब्ध साठ्यातून खालील अटीस अनुसरुन पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
       तरी खालील अटींच्या पुर्ततेसह नमुना नं. 7 पाणी अर्जावर मागणी करुन पाणी अर्ज दिनांक 5 जून, 2021 चे आत संबंधित वाघुर धरण उपविभाग क्र. 2, वराडसिम, वाघुर धरण उपविभाग क्र. 3 व 4 नशिराबाद या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष देण्याचे करावे,
सिंचनाच्या पाणी पुरविण्यासाठी अटी व शर्ती
     खरीप हंगाम सन 2021-22 अखेर संपुर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहील, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजुरी दिली जाईल, शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये, पाणी अर्जाच्या निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत/ग्रामपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल, मुदतीनंतर आलेले पाणी अर्जावर नियमानुसार जादा पाणीपट्टी आकारणी केली जाईल, मंजुर क्षेत्रासच व मंजुर पिकानांच पाणी घ्यावे लागेल, पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा किवा खातेपुस्तीका उपविभागास दाखवावी लागेल, पाटबंधारे अधिनियम (कायदा) 1976 च्या प्रचलीत धोरणानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन अदेशानुसारच मंजुरी देण्यात येईल. उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करुन अन्नधान्याचे अधिक उत्पादन वाढवावे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे आदेश क्र. 1/2018 दि. 11 जानेवारी 2018 नुसार सुधारीत दराप्रमाणे केलेली आकारणी भरणे बंधनकारक राहील. असे कार्यकारी अभियंता, वाघुर धरण विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                         00000

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन




     जळगाव, दि. 31 (जिमाका) - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
     याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, तहसीलदार सुरेश थोरात, नायब तहसीलदार अमित भोईटे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                                                                             00000

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री गुलाबराव पाटील









जळगाव (जिमाका) दि.२९ मे दोन दिवसापूर्वी मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे  मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी करणार असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

गुरुवारी दुपारी मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील तापी नदीकाठच्या गावांमध्ये वादळी पावसाने केळी पिकांबरोबरच इतर पिकांचे, घरांचे तसेच विद्युत पोल व तारांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून माहिती संकलित करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी  स्वतः राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी करणार असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे भरपाई त्यांना मिळवून दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढला असेल त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत त्याचबरोबर विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अधिकाधिक मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहील असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

तालुक्यातील अंतुर्ली ते उचंदे परिसरातील ३१ गावांना वादळी पाऊस व वाऱ्याने दिलेल्या जोरदार तडाख्यात मोठ्या प्रमाणात केळीचे व घरांचे नुकसान झाले असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे उचंदा, मेंढोदे, नायगाव तर रावेर तालुक्यातील निंभोरासीम, विटवा, निंबोल, ऐनपूर, वाघाडी, धामोडी, सुलवाडी व इतर ठीकाणी झालेल्या वादळी वार्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना धीर दिला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, डॉ.जगदीश पाटील, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन शुभांगी भारदे, तहसीलदार श्वेता संचेती, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी संतोष नागटिळक, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, श्री.भामरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता महेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देत विमा कंपन्यांना देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच मेंढोदे गावातील १८० घरांचे नुकसान झाल्याने गावकर्यां ना मोफत अन्नधान्य तत्काळ देण्याच्या सुचनाहि प्रांताधिकारी यांना पालकमंत्र्यांनी दिल्या.

मेंढोदे गावाचे पुनर्वसना संदर्भात पुनर्वसन मंत्र्यांची आमदार श्री.पाटील व गावातील सरपंच यांचेसह येत्या पंधरा दिवसात बैठक घेण्यात येईल तसेच कब्जेसाठी आकारणी कमी करण्यासाठी पुनर्वसनमंत्री यांचेकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. पिक विमा भरलेले शेतकरी व पीक विमा न भरलेले शेतकरी असे वर्गीकरण करून सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी देता येईल या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच राज्य शासनातर्फे देखील यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जास्तीत जास्त मिळण्यासाठी प्रयत्न करेल असेही पालकमंत्री श्री.पाटील यांनी सांगितले. तसेच वादळी वार्यामुळे विद्युत पोल व तारांची मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे त्याची त्वरित दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयास भेट



जळगाव (जिमाका) दि. 29 -  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आज मुक्ताईनगर तालुका दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे भेट देऊन रुग्णांची चौकशी केली. त्याचबरोबर त्यांच्यावर होत असलेल्या उपचारांची माहिती आरोग्य यंत्रणेकडे घेतली. तसेच रुग्णांवर आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागास दिल्या.

यावेळी त्यांच्यासमवेत आमदार चंद्रकांत पाटील, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शुभांगी भारदे, तहसीलदार श्वेता संचेती यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोणाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी म्युकरमायकोसीसचे रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर रुग्णांवर आवश्यक ते उपचार  शासकीय रुग्णालयातच उपलब्ध होतील याचे नियोजन यंत्रणेने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Friday, 28 May 2021

म्युकर मायकोसीसच्या रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध करुन देणार - पालकमंत्री गुलाबराव पाटील

 


            जळगाव, दि. 28 (जिमाका) - जिल्ह्यात आढळून येणाऱ्या म्युकर मासकोसीसच्या रुग्णांवर उपचारासाठी लागणारी साधनसामुग्री व औषधे जिल्ह्यातच उपलब्ध करुन देण्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करुन देण्यात येईल. असे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सांगितले.

            पालकमंत्री श्री. पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील म्युकर मासकोसीस वॉर्डास आज भेट देऊन तेथील पाहणी केली तसेच रुग्णांशीही संवाद साधला. त्यांनतर झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा रुग्णालयाचे प्रशासन डॉ. बी. एन. पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचेसह महाविद्यालय व सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात म्युकर मायकोसीस आजाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून याठिकाणी 50 खाटा ठेवण्यात आल्या आहेत. सद्यपरिस्थितीत याठिकाणी 15 रुग्ण उपचार घेत असून पैकी 2 रुग्णांवर आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या रुग्णांवर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया या अतिशय किचकट आणि जोखमीच्या असतात. यासाठी लागणारी साधनसामुग्री महाविद्यालयात उपलब्ध असणे आवश्यक असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी यावेळी दिली असता यासाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्यात. त्याचबरोबर जिल्ह्यातील म्युकर मासकोसीसच्या कोणत्याही रुग्णांस उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागणार नाही याची दक्षात प्रशासनाने घ्यावी. आवश्यक त्या सुविधांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            म्युकर मासकोसीसच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या टिमचे यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

            यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कोविड, नॉन कोविड रुग्णांच्याउपचाराचाही आढावा घेतला.

00000

नागरी दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना 31.61 कोटींच्या निधी वितरणास पालकमंत्र्यांची मान्यता

 



            जळगाव, दि. 28 (जिमाका) - अनुसूचित जाती उपयोजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका/ नगरपंचायतींसाठी (नागरी स्थानिक स्वराज्य संस्था) सन 2021-22 मधील प्रस्तावित 31.61 कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

            येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात समितीची जिल्हास्तरीय बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीस आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) सतीश दिघे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.

            लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्तीत सुविधा पुरविण्यासाठी जळगव शहर महानगरपालिकेस 5 कोटी रुपयांचा तर जिल्ह्यातील 18 नगरपालिका/नगरपंचायतींना 26.61 कोटी रुपये असा एकूण 31.31 कोटी रुपयांचा निधी अनुसूचित जाती उपयोजनेतून मंजूर झाला आहे.

            त्यानुसार भुसावळ नगरपालिकेस 8 कोटी 95 लाख, अमळनेर 2 कोटी 25 लाख, चाळीसगाव 3 कोटी 20 लाख, चोपडा 1 कोटी 70 लाख, पाचोरा 1 कोटी 85 लाख, जामनेर 1 कोटी 15 लाख, पारोळा 52 लाख, धरणगाव 62 लाख, एरंडोल 65 लाख, यावल 85 लाख, रावेर 65 लाख, फैजपूर 53 लाख, भडगाव 60 लाख, वरणगाव 1 कोटी 15 लाख, बोदवड नगरपंचायत 65 लाख, मुक्ताईनगर नगरपंचायत 80 लाख, शेंदूर्णी नवनिर्मित नगरपंचायत 49 लाख 91 हजार 225 रुपये असा एकूण 26 कोटी 61 लाख 91 हजार 225 रुपयांचा निधी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील अनुसूचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणातवितरीत करण्यास आजच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.या निधीतून नागरी क्षेत्रात नागरीकांसाठी चांगल्या दर्जाच्या मुलभूत सोयीसुविधा उभारण्याच्या सूचनांही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्यात.

 

जळगाव शहरात 4 कोटी 17 लाखांच्या कामास मान्यता

            महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोईसुविधांच्या विकास योजनेत जळगाव शहर महानगरपालिकेस सन 2016-17 या वर्षात प्राप्त झालेल्या 25 कोटी रुपयांच्या अनुदानातून शिल्लक राहिलेल्या 4.17 कोटी रुपयांच्या अनुदानातून महासभा ठराव क्र. 365 दि. 3 फेब्रुवारी, 2021 व महासभा ठराव क्र. 488, दि. 15 मे, 2021 नुसार नवीन विकास कामे प्रस्तावित केलेली आहेत. यात वार्ड क्रं. 19 अंतर्गत येत असलेल्या सुप्रिम कॉलनीत व आजुबाजुच्या परिसरात अस्तित्वात असलेल्या पोलांवर स्ट्रिट लाईट फेज वायर ओढून पथदिव्याची व्यवस्था करणे, जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूलाच्या (रेल्वे लेव्हल क्रॉसिंग 420 -9/11) जोडरस्त्याच्या संरेखेच्या मार्गातील उच्चदाब/लघुदाब वीज वाहिनी स्थलांतरीत करणे, प्रभाग क्र. 2 कांचन नगर, चौघुले प्लॉट परिसरातील रस्ते डांबरीकरण करणे, जळगाव  शहरात आवश्यक ठिकाणी स्त्री व पुरुषांकरीता स्वच्छतागृह/ युरिनल्सची व्यवस्था करणे, डी मार्ट ते रामेश्वर कॉलनीतील आदित्य चौक पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, पिंप्राळा स्मशानभुमी सुशोभीकरण करुन विकसित करणे, प्रभाग क्र. 12 मधील रामदास कॉलनी ओपनस्पेस येथे संरक्षण भिंत बांधणे आदि कामांना आजच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी मान्यता दिली.

00000