Tuesday, 11 May 2021

खत बचतीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 11 - राज्यामध्ये रासायनिक खतांचा कमीत कमी व संतुलित वापर होण्याच्या उद्देशाने खरिप 2021 मध्ये खत बचतीची विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. यामध्ये किमान 10 टक्के रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी मे महिन्याच्या चालु सप्ताहात या मोहीमेच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी विशेष प्रयत्न कृषि विभागामार्फत क्षेत्रियस्तरावर करण्यात येत आहे.

या मोहिमेंतर्गत शेतक-यांना विविध पिकांसाठी विशेषत: भात, सोयाबीन, कापुस, ऊस इत्यादीकरीता खत वापराचे विविध फायदेशीर पर्याय उपलब्ध करून देणे, प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर जमिन सुपिकता निर्देशांक दर्शविणारा फलक प्रदर्शित करणे व त्याचे सामुहीक वाचन करणे, जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर करणे, जैविक खतांची बीज प्रक्रीया करणे, हिरवळीच्या खतांच्या बियाणाचे अनुदानावर वितरण करणे, भात पिकाकरीता युरीया ब्रिकेटचा वापर वाढविण्यासाठी त्याचे उत्पादन व वितरण करणे, कृषि सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षण देणे, जमिनीत सेंद्रिय कर्बाची वाढ होण्यासाठी उसाची पाचट जागेवर कुजविणे, व्हर्मीकंपोस्ट, गांडुळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर वाढवुन रासायनिक खतांची मागणी कमी करणे. तसेच विविध पिक योजनांतर्गत प्रशिक्षण वर्ग व प्रात्यक्षिकांचे आयोजन करणे इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी होण्यासाठी कृषि विभागाने आवाहन केले आहे.

000000


 

No comments:

Post a Comment