Thursday, 25 August 2022

जिल्हाधिकारी कार्यालयात 5 सप्टेंबरला लोकशाही दिन

जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : - नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 5 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे. सदर लोकशाही दिनी ज्या नागरिकांना अर्ज करावयाचा असेल त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                    ०००००

पोळ्याला बैलांची पूजा गोठ्यातच करण्याचे आवाहन

जळगाव, दि.25 (जिमाका) :  जळगाव जिल्हयात रावेर व यावल तालुक्यात गाई व म्हैसवर्गीय जनावरांत लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी पशुपालकांच्या जिव्हाळ्याचा पोळा सण आहे. मात्र बैलांचे लम्पी स्कीन या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण व्हावे, त्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी पोळा सण सार्वजनिकरित्या साजरा न करता बैलांची पूजा गोठ्यातच करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. 

जळगाव जिल्हयातील सर्व पशुपालकांनी गाई, म्हशींमध्ये लम्पी सदृश लक्षणे दिसुन आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. लम्पी स्कीन आजार संसर्गजन्य असला तरी रोगाचे निदान लवकर झाल्यास व लवकर योग्य उपचार सुरु केल्यास ८ ते १० दिवसात तो बरा होतो. तसेच जळगाव जिल्ह्यात उपचाराअंती रोग बरे होण्याचे प्रमाण ९९ टक्के आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता शासकीय यंत्रणेमार्फत उपचार करुन घ्यावे. त्यासोबतच गोठा स्वच्छता व गोचीड निमुर्लन पशुवैद्यकीय दवाखाने यांच्या सहकार्याने करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

***

फळबाग, फुलशेती लागवड अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

   जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : - महात्मा गांधी राष्ट्रीय गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतामध्ये सलग लागवड, बांधावर लागवड, पडीक जामिनीवर लागवड, रोहयो अंतर्गत फळबाग व इतर वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना 3 वर्षात 100 टक्के अनुदान आहे, या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे. 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,  दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, भू-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजना २००८ नुसार अल्प भूधारक व सिमांत शेतकरी, अनु. जमातीचे व अन्य्‍ परंपरागत वन निवासी अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती या पैकी कोणत्याही एका अटीची पूर्तता करणारा लाभार्थी 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत  या योजनेतील लाभार्थी होऊ शकतात..

  योजनेअंतर्गत आंबा, काजू, चिकू, पेरु,डाळींब, सिताफळ, संत्रा, मोसंवी, लिंबू, नारळ, बोर, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, केळी, ड्रॅगनफ्रूट, अव्हाकॅडा, द्राक्ष इत्यादी फळपीके तसेच बांबू, साग, करंज, गिरीपुष्प, शेवगा, अंजन, खैर, ताड, निलगिरी, तुती, रबर, नीम, महोगुणी, शिसव, महुआ, चिनार, शिरीष, करवंद, गुलमोहर, इत्यादी वृक्षांची तसेच मसाला पिके जसे लवंग, मिरी, जायफळ, दालचिनी व औषधी वनस्पती (अर्जुन, आइन, असन, अशोक, बेल, गुग्गुळ, लोध्रा, शिवन, रक्तचंदन, टेटू, बेहडा, बिब्बा, डिकेमाली, हिरडा, रिठा, वावडींग, करंज, पानपिंपरी) वृक्षांची लागवड करता येते.

फुलपिके लागवड 

  सन 202-21 पासुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर फुलपिके लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेतावर निशिगंध मोगरा, गुलाब, सोनचाफा या फुलपिकाची लागवड करता येईल. फुलपिकांच्या बाबत लाभार्थ्यांना एकाच वर्षात 100% अनुदान देय राहील.

  संपूर्ण लागवड कार्यक्रमासाठी पुर्व हंगाम मशागत करणे, खड्डे खोदणे, झाडांची लागवड करणे, पाणी देणे, किटकनाशके, औषधे फवारणी व झाडाचे संरक्षण करणे इ. कामे लाभधारकाने स्वत: नरेगा अंतर्गत तयार श्रमिक गटद्वारे व जॉब कार्डधारक मंजुरांकडून करुन घ्यावयाची आहे. तसेच 7/12 उताऱ्यावर लागवड केलेल्या फुलपिकांची नोंद घेणे लाभार्थ्यांवर बंधनकारक राहील. सर्व फळपिके व फुलपिके लागवडीचा कालावधी 1 जून ते31 डिसेंबरपर्यंत राहील.  

याबाबत अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.  फळपिकाची  लागवड करुन या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक यांनी केले आहे. 

०००००

मधकेंद्र योजनेच्या लाभासाठी अर्ज करा’

जळगाव, दि.25 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामाद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) राज्यात कार्यान्वित झालेले आहे. याकरीता पात्र व्यक्ती, संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.

‘वैयक्तिक मधपाळा’साठी अर्जदार साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. ‘केंद्र चालक प्रगतशील मधपाळा’मध्ये संस्था किंवा व्यक्ती अर्ज सादर करू शकतात. वैयक्तिक केंद्र चालक (प्रगतशील मधपाळ) असावा. त्यांची शैक्षणिक पात्रता किमान 10 वी पास, वय वर्ष 21 पेक्षा जास्त असावे. त्या व्यक्तीच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन लाभार्थीकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. 

‘केंद्र चालक संस्था’साठी पात्रतामध्ये संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडे तत्त्वावर किमान एक एकर शेतजमीन, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्त्वावर घेतलेली किमान 1000 चौ. फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत. 

या योजनेची वैशिष्ट्ये मधकेंद्र योजनेच्या निकषाप्रमाणे निवडीनंतर 50 टक्के रक्कम भरल्यानंतरच मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक आवश्यक आहे. तर लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंध पत्र लिहून देणे अनिवार्य राहील. 50 टक्के स्वगुंतवणूक ही निवड झाल्यानंतर प्रशिक्षण चालू होण्याआगोदर भरावी लागेल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, अशा अटी व शर्ती आहेत. 

  अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, द्वारा जिल्हा केंद्र, आय. टी. आय. शेजारी, जळगाव, संपर्क श्री. सुरवाडे, मोबाईल क्र. (9623578740),  मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. ५, मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा 412806,  दूरध्वनी (02168-260264) येथे संपर्क साधावा, असेही जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे. 

                                                              ००००

Thursday, 18 August 2022

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा


        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -१८ -येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला.

दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपस्थित अधिकारी कर्मचा-यांना सद्भावनादिनाची शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

 याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन,  उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, तहसिलदार सुरेश थोरात, जितेंद्र कुंवर, पंकज लोखंडे, प्रशांत कुलकर्णी, नायब तहसिलदार सुनील समदाणे, अमित भोईटे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000


Wednesday, 10 August 2022

मत्स्यव्यवासायाशी निगडीत असणा-यांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -१०- केंद्र सरकारच्या कामगार आणी रोजगार विभागाच्या पोर्टलवर देशातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा फायदे देण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या ई-श्रम पोर्टलवर मासेमारी करणारे, मत्स्यविक्रेते व मत्स्यव्यवसाय अनुषंगिक कामांशी प्रत्यक्ष जुळले असलेल्या कामगारांनी नोंद करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय श.र. कुदळे यांनी केले आहे

          मत्स्यव्यवसाय क्षेत्राशी निगडीत कामगारांना http://register.eshram.gov.in/#/user/self या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. सदर पोर्टलमध्ये संबंधित व्यक्तींना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतर्गत अपघाती मृत्यूनंतर दोन लाख व कायमस्वरूपी दिव्यांगत्व आल्यास १ लाख रूपये मदत देणे शक्य होईल, अचानक उदभवणा-या व राष्ट्रीय महामारीसारख्या परिस्थितीत मदत वितरित करताना ही माहिती कामी येणार आहे.

          सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी संबंधीत व्यक्तीची वयोमर्यादा १६ ते ५९ वर्षे आहे. या व्यक्ती कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सभासद नसावेत, कोणत्याही शासकीय वा निमशासकीय सेवेत नसावे, जिल्हयातील मत्स्यकास्तकार स्वतः या पोर्टलवर नोंदणी करू शकतात अथवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे नोंदणी करू शकतात. यासंदर्भात अधिक माहितीसाठी (प्र) सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय जळगांव कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन एका प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आले आहे. 0000

Tuesday, 2 August 2022

सापडलेल्या तीन वर्षीय बालकाच्या पालकाचा शोध सुरू

        जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 2-   कृष्णा (वय, अंदाजे तीन वर्ष ) बालकाचे आजतागायत आई-वडिल, नातेवाईक भेटीस आलेले नाहीत,  बालकाच्या नातेवाईक, पालक यांनी 30 दिवसाच्या आत बाल कल्याण समिती, जळगाव फोन नं 0257-2239851 व जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे बालगृह, निरीक्षण जळगाव 0257-2239851 व  जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव फोन (०२५७-२२२८८२५) येथे संपर्क साधावा, असे आवाहन ‍जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  डॉ. वनिता सोनगत यांनी केले आहे.

कृष्णा (वय, अंदाजे तीन वर्ष ) हा बालक 8 जुलै, 2022 रोजी रावसाहेब पाटील यांच्या नाष्टा सेंटर, शिवकॉलनी जवळ, गणेश कॉलनी येथे गेले 3 दिवसांपासून एकटाच पालकाविना दिसला. त्याला त्याच्या आईचे नाव विचारले तर तो कमला, वडिलांचे नाव संतोष सांगत आहे. या बालकास अपंग कुष्टरोगी स्वावलंबन संस्था संचलित, शिशुगृह जि धुळे 72, उत्कर्ष कॉलनी  साक्री रोड, जि. धुळे येथे दाखल केले आहे, असेही त्यांनी कळविले आहे.

                                                             000000

पालक गमावलेल्या बालकांनी समस्या असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

           जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 2 –कोविड -19 दरम्यान दोन्ही पालक, एक पालक गमावलेले अनाथ आहेत. अशा बालकांच्या मालमत्ता अधिकार, हक्क संरक्षण, इतर समस्या असल्यास  संबंधित बालक अथवा पालकांनी समस्या निराकरणासाठी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हास्तरीय मालमत्ता हक्क संरक्षण समिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, आकाशवाणी जवळ, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा येथे संपर्क (0257-2228828) करावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी कळवले आहे.

                                                            ०००००

आणीबाणी लढ्यातील सहभागींनी अर्ज करण्याचे आवाहन

 q2       जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 2 -  आणीबाणी लढ्यात सहभागी व्यक्तींनी यापूर्वी मानधन मिळण्यासाठी अर्ज केलेले नाहीत, अशा व्यक्तींनी विहित नमुन्यात अर्ज व शपथपत्रासह नव्याने अर्ज 31 ऑक्टोबरपर्यंत करावेत, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी केले. धोरणांतर्गत लाभार्थी, जोडीदार हयात असेपर्यंत मानधनास पात्र आहेत. वारसदार मात्र मानधनास पात्र नाहीत, असेही त्यांनी कळविले आहे.

                                                                    0000

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र भरण्याचे आवाहन

           जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 2-  सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यावसायिक, कारखाने, कंपनी इ. यांनी त्यांच्याकडील माहे  30 जून,2022 या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) दि 30 ऑगस्ट, 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https;//rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे, असे  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी कळविले आहे.

सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, 1959 व नियमावली, 1960 अन्वये त्रैमासिक विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने माहे 30 जून,2022 अखेर आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरील नियोक्ता  (Employer) या ऑप्शनवर क्लिक करुन आपल्या  नियोक्ता लॉग –इन आयडी (Employer Login ID) व पासवर्डच्या सहाय्याने 30 ऑगस्ट, 2022 पर्यंत भरावे.याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 0257-2959790 वर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

००००

         

मातंग समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार

           जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 2 -  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी झाली. कार्यालयातर्फे मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थी, कर्जधारक लाभार्थी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे अरुण प्रकाश, जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

00000

ई पीक पाहणी मोबाईल ॲप सुरु

           जळगाव (जिमाका वृत्त सेवा) दि. 02 :- महाराष्ट्र शासनाच्या ई-पीक पाहणी हा महत्वकांक्षी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. गत वर्षी पासून ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी ॲपद्वारे आतापर्यंत सुमारे 4,82,816 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी भ्रमणध्वनी ॲपमध्ये नोंदणी केली आहे. मागील खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करुन या प्रकल्पास उत्तम प्रतिसाद दिला आहे.

          जळगाव जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामाध्ये 4,57,857 हेक्टर, रब्बी हंगामामध्ये 2,94,208 हेक्टर, शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे ई-पीक पाहणी ॲपद्वारे 400 च्या वर वेगवेगळ्या पिकांच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत.

          खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे नोंदविण्याची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे. मागील वर्षभराच्या अनुभवावरुन व स्थानिक पातळीवरुन आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये काही महत्वाचे बदल करुन शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत मोबाईल ॲप व्हर्जन- 2 विकसित करण्यात आलेले आहे.  सदरचे सुधारित मोबाईल ॲप 1 ऑगस्ट 2022 पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करुन देत आहे.

ई- पीक पाहणी व्हर्जन -2 ॲप मधील नवीन सुधारणा

          सुधारित मोबाईल ॲपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षास व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करतांना पिकाचा फोटो घेतील त्यावेळेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदू पर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा संदेश मोबाईल ॲपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधांमुळे पिकाचा अचूक फोटो घेतला आहे किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.

शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयं प्रमाणीत मानण्यात येणार

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयं घोषणापत्र घेतले जाणार असून अशारीतीने शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयं प्रमाणित मानण्यात येऊन ती गाव नमुना नंबर 12 मध्ये प्रतिबिंबित होणार आहे.

किमान 10% तपासणी तलाठी यांचेमार्फत होणार

वरीलप्रमाणे शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी 10% नोंदीची पडताळणी तलाठी यांचेमार्फत करण्यात येणार असून त्यामध्ये पिकाचा फोटो नसलेल्या नोंदी, चुकीचा फोटो असलेल्या नोंदी अंती विहित अंतराच्या बाहेरुन घेतलेले फोटो अशा नोंदीचा समावेश असणार आहे. तलाठी हे पडताळणी अंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करुन त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर 12 मध्ये प्रतिबिंबित होतील.

48 तासात खातेदारास स्वत: पीक पाहणी दुरुस्तीची सुविधा

          शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदविलेली पीक पाहणी अशी पीक पाहणी नोंदविल्यापासून 48 तासामध्ये स्वत:हून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल.

किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत पिकाच्या विक्रीसाठी संमती नोंदविण्याची सुविधा

किमान आधारभूत योजनेंतर्गत येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास ई-पीक पाहणी ॲपमध्येच शेतकऱ्याला आपणास किमान आधारभूत किमान योजने अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करावयाची आहे काय? असा प्रश्न विचारला जाणार आहे. शेतकऱ्याने होय असा पर्याय निवडल्यास अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार असून त्याआधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.

मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकांसह तीन घटक पिके नोंदविण्याची सुविधा

यापूर्वीच्या मोबाईल ॲपमध्ये मुख्य पीक व दोन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मागणीप्रमाणे एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिके नोंदविण्याची उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक, हंगाम व क्षेत्र नोंदविण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

संपूर्ण गावाची पिक पाहणी पाहण्याची सुविधा

          ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्येच त्या गावातील खातेदारांनी नोंदविलेल्या पीक पाहणीची माहिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याद्वारे खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास वेळेत तलाठी यांचेकडे अर्ज करणे शक्य होणार आहे.

ॲपबाबत अभिप्राय व रेटिंग नोंदविण्याची सुविधा

ई-पीक पाहणी व्हर्जन-2 मध्ये वापरकर्त्यांना ॲपबाबत त्यांचे अभिप्राय नोंदविण्याची सुविधा उपलबध करुन देण्यात आलेली आहे.

ई-पीक पाहणी ॲपमध्येच मदत बटन देण्यात आलेले आहे.

          वापरकर्त्याला ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी ॲपमध्ये मदत हे बटन देण्यात आलेले आहे. या बटणवर क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत. तसेच ई-पीक पाहणी ॲपमधील कायम पड क्षेत्र नोंदविणे, बांधावरील झाडे नोंदविणे, पिकांची माहिती नोंदविणे, गावची पीक पाहणी पाहणे इत्यादी बाबतची माहिती देणाऱ्या दृकश्राव्य क्लीपच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. याचा वापर करुन शेतकरी ॲप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील. प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा या ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदविणे गरजेचे आहे कारण ई पीक पाहणीच्या नोंदी या पीक विमा व पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्यप्रकारे मदत करणे इत्यादी बाबींसाठी आवश्यक असणार आहेत.

          खरीप हंगाम 2022 चे पीक पाहणीची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे. यासाठी  नमूद केल्याप्रमाणे सुधारित ई पीक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी हे सुधारित मोबाईल ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन खरीप हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांना केलेले आहे.

00000