Saturday, 30 October 2021

दिपावली उत्सवासाठी जिल्हाधिका-यांनी जाहीर केल्या मार्गदर्शक सुचना

            जळगाव (जिमाका) दि. 31 - महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र. आरएलपी-1021/प्र.क्र.247/विशा-१ब, दि. 27 ऑक्टोबर, 2021 अन्वये दिपावली उत्स्व 2021 सादर करणेबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमीत केलेल्या आहेत. कोविड रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षापासून सर्व धर्मीय सण/ उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरीकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करतांना सर्व नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने, जळगाव जिल्ह्यात कोव्हिड-19 मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या असून या सुचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे असे आवाहन केले आहे.

            दीपावली उत्सवा दरम्यान कपडे/फटाके/दागदागिने व इतर वस्तु खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यावर गर्दी होत असते. तथापि, नागरीकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरीक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.

            दीपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणांवर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढुन जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दीपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरीकांना फटाकांच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे ही बाब विचारात घेऊन नागरीकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांचा आरास करुन उत्सव साजरा करावा.

            सार्वजनिक आरोग्य विभाग आदेश क्र. Corona 2021/ C.R.366/Arogya-5, दि. 24/9/021 अन्वये ‘‘ब्रेक दि चेन’’ अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी देखील नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्याचे निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करतांना सदर मार्गदर्शक सुचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा.

            सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा- रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी.

            मा. सर्वोच्च न्यायालय रिट पिटीशन (सिव्हील अपिल) क्र. 728/2015 (निर्णय दि. 23/10/2018) तसेच सिव्हील अपिल क्र. 2865-2867/2021द (निर्णय दि. 23/7/2021) मधील आदेशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

            कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होणाच्या मधल्या कालावधीत अजून काही सुचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करणे आवश्यक राहील.

            या सुचनांचे पालन न केल्यास सबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. असेही  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव अभिजीत राऊत यांनी एका प्रसिद्धी परिपत्रकान्वये कळविले आहे.

00000

Friday, 29 October 2021

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयेाजन

             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 29 - आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र पुणे येथे स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे आकर्षक, सुरेख विषयांशी निगडीत असे बोधचिन्ह, विद्यापीठ बोधचिन्ह असणे आवश्यक आहे. यासाठी संचालनालयामार्फत ऑगस्ट 2021 महिन्यात बोधचिन्ह स्पर्धा घेण्यात आली होती. या बोधचिन्ह स्पर्धेत 400 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. योग्य बोधचिन्ह न आढळल्याने समितीने ही स्पर्धा रद्द करुन पुन्हा नव्याने बोधचिन्ह तयार करण्याची र्स्प्धा आयोजित केली आहे. नव्याने आयोजित स्पर्धेमध्ये यापुर्वी झालेल्या स्पर्धेतील सहभागी स्पर्धेक देखील सहभागी होऊ शकणार आहे.

            क्रीडा विद्यापीठ मिशन (Mission) संशोधन, प्रशिक्षण व कौशल्य विकास यामधील गुणवत्ता गाठण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ तयार करणे, क्रीडा विद्यापीठ दृष्टीकोन (Vision) खेळ व तंदुरुस्तीच्या विकासासाठी पर्यावरणपूरक नैसर्गिक यंत्रणा तयार करणे. क्रीडा विद्यापीठ ध्येय (Motto) क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करुन महाराष्ट्र व भारत हे क्रीडा शिक्षणास प्राधान्य देणारे ठिकाण म्हणून परिचित व्हावे,

क्रीडा विद्यापीठ उद्दीष्ट (Objectives) भारतामधील अव्वल खेळाडूंना अद्ययावत वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवून पाठींबा देणे, क्रीडा कामगिरीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन करणे, प्रशिक्षित क्रीडा व्यावसायिकांचा विकास करणे, क्रीडा क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे, क्रीडा प्रशिक्षक व संबंधितांना नियमित प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे, आधुनिक स्पर्धात्मक खेळांबरोबरच पारंपारिक देशी खेळांचा विकास करणे, समाजातील दुर्बल घटकांना क्रीडा नैपुण्यासाठी विशेष प्राधान्याने संधी उपलब्घ करुन देणे हा आहे. खेळाडू, क्रीडा तज्ञ, क्रीडा वैद्यक तज्ञ, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा प्रशासक इ. च्या सहकार्याने खेळांचा दर्जा उंचावणे, अल्प व मध्यम मुदतीचे अभ्यासक्रम सुरु करुन उतम दर्जाचे क्रीडा मार्गदर्शक तयार करणे, क्रीडा क्षेत्रात कुशल मनुष्ष्यबळ, विज्ञान व तंत्रज्ञान या मध्यामातून क्रीडा क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी विविध अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथे सुरु करण्यात येत आहे.

            आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र हे भारतात प्रथमच होत असल्याने जगभरातुन प्रसिध्दी मिळणार आहे. या सर्व बाबी विचारात घेता आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र या विद्यापीठाचे आकर्षक बोधचिन्ह असणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र साठी बोधचिन्ह स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या सहभगाच्या दृष्टीने नियम व अटीसाठी शासनाच्या  hhtp:// sports.maharashtra.govoin  या संकेतस्थळावर भेट देऊन आपला सहभाग नोंदवावा

 स्पर्धेचे नियम व अटी,

             निवड समितीच्या शिफारशीनुसार प्रथम क्रमांकाचे बोधचिन्ह सादर करणाऱ्या प्रवेशिकेस रु. 1 लाख रुपये मात्र इतके रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल. सर्व बोधचिन्ह ईमेलव्दारे पाठविण्यात यावेत. आंतरराष्ट्रीय  क्रीडा विद्यापीठ बोधचिन्ह पाठवण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर, 2021 राहील त्यानंतर येणारे बोधचिन्ह विचारात घेतले जाणार नाही. सर्व स्पर्धकांचे बोधचिन्ह प्राप्त झाल्यानंतर त्यातून उत्कृष्ठ बोधचिन्हाची निवड समितीमार्फत निवड करण्यात येईल. बोधचिन्ह स्वीकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणे याबाबतचे सर्व अधिकार आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना राहतील.

            बोधचिन्ह पाठवतांना कोरल ड्रॉ pdf.JPEG  स्वरुपात पाठवावे, बोधचिन्हावर कोणत्याही प्रकारे नाव, क्रमांक, किंवा ओळख दिसून येईल अशा कोणत्याही बाबी नमूद केल्यास ती प्रवेशिका अपात्र ठरेल, बोधचिन्ह  तयार करतांना ते मुळ स्वरुपात व स्वत: तयार केलेला असावा, स्पर्धेकाने बोधचिन्ह डिझाईन पाठवतांना त्याचे नाव, निवासाचा संपुर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक आपला ई मेल पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्ये नमूद करावा, बोधचिन्ह पाठवितांना क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या isumaharashtra@gmail.com  या ईमेलवर पाठवावा, क्रीडा संचालनालयाच्या किंवा संकेतस्थळावर दिलेल्या मेल वर पाठवू नये, अन्य ईमेलवर पाठविण्यात आलेल्या प्रवेशिका ग्राह्य असणार नाहीत. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. श्री. उदय पवार 9730200656 तालुका क्रीडा अधिकारी, क्री.यु.से पुणे यांचेशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जाहिरात क्षेत्रात कार्यरत एजन्सीज, डिझाईनिंग क्षेत्रात काम करणाऱ्या एजन्सीज तसेच ग्राफीक क्षेत्रात काम करणाऱ्या एजन्सीज देखील भाग घेऊ शकतील. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा बोधचिन्ह क्रीएटीव्ह असावा, सेल्फ मेड असावा, त्यात रचनात्मकता असावी तसेच त्यातून उद्देश स्पष्ट होणे आवश्यक आहे. केवळ भारतीय व्यक्तीस र्स्प्धेत सहभागी होता येईल. या स्पर्धेत परदेशात राहणारे मुळ भारतीय असणाऱ्या व्यक्तीस देखील सहभगी होता येईल. लोगो (बोधचिन्ह) A/४ साईझ कागदावर असावेत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

000000

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

            जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 29 - प्रधानमंत्री पीक विमा योजनेत रब्बी हंगाम 2021-22 मध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

            केंद्र शासनाने रब्बी हंगाम 2021-22 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. मुंबई (आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इंन्सुरन्स कं. लि.) यांच्यामार्फत जळगाव जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला असून अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.

            प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरिता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस आधीपर्यंत संबधित बँकेस त्याअनुषंगाने विमा हप्ता कपात न करणेबाबत कळविणे आवश्यक राहील. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी संबधित बँकेस कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

योजनेंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व भरावयाचा पिक विमा हप्ता तपशील

            बागायती गहूसाठी विमा संरक्षित रक्कम 30 हजार रुपये असून शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 450 रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत 15 डिसेंबर, 2021 आहे. बागायती व जिरायती ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये तर शेतक-याने भरावयाची विमा संरक्षित रक्कम 360 रुपये प्रति हेक्टर, विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत 30 नोव्हेंबर, 2021 आहे.

            हरभरा विमा संरक्षित रक्कम 27 हजार रुपये असून शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 405 रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत 15 डिसेंबर, 2021 आहे. रब्बी कांदासाठी विमा संरक्षित रक्कम 60 हजार रुपये तर शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 3 हजार रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत 15 डिसेंबर, 2021 आहे, उन्हाळी भुईमुगसाठी विमा संरक्षित रक्कम 35 हजार रुपये, शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 525 रुपये प्रति हेक्टर, विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत 31 मार्च, 2022 अशी आहे.

             जिल्हयात पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत असुन नैसर्गिक आपत्तींपासून नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, शेतकऱ्यांनी दि. 15 डिसेंबर, 2021 या अंतिम मुदतीची वाट न पाहता आजपासुनच पिकाचा विमा काढण्यात यावा, जेणेकरुन शेवटच्या दिवशी घाई होणार नाही.

            अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँक, आपले सरकार सेवा केंद्र, तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुके), उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव, आकाशवाणी शेजारी, प्रशासकीय इमारत येथे संपर्क साधावा. भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. मुंबई (आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इंन्सुरन्स कं. लि.)टोल फ्री क्रं. 1800 103 7712 सामान्य सुविधा केंद्र (सी.एस.सी केंद्र) जळगाव येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी  एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000

शासकीय/निमशासकीय कार्यालयांसह खाजगी आस्थापनांमधील अधिकारी, कर्मचारी व अभ्यागंतासाठी मास्क वापरणे बंधनकारक अन्यथा भरावा लागणार पाचशे रुपये दंड

             जळगाव, (जिमाका) दि. 29 - कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे.

            धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे, नाट्यगृहे, बंदिस्त सभागृहे/मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम व चित्रपटगृहे, अम्युझमेंट पार्क, इंडस्ट्रीज हे सुरु करण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले असून त्यानुसार सुधारीत आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.

            सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील आदेश दिनांक 26 ऑक्टोबर, 2021 अन्वये ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय व खाजगी, औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर करणे व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश लागू करण्यात आलेले आहेत. 

            जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय व खाजगी, औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी/कर्मचारी व कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या सर्व अभ्यांगतांना कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक, तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पध्दतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.

            जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय व खाजगी, औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख/आस्थापना प्रमुख यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतीम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचेकडून प्राप्त करुन घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा आरोग्य विभागात संपर्क साधून कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे, जेणेकरुन सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल, याची खातरजमा करावी.

            सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजाच्या दरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करुन घेणे यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांनी आस्थापना अधिकारी किंवा एका अधिकाऱ्याला नामनिर्देशन करावे.

            सर्व कार्यालय व कार्यालयाच्या आवारात अभ्यांगतांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणारे अभ्यांगत/कर्मचारी/अधिकारी यांना संबंधित अभ्यांगत/कर्मचारी/अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात/आवारात विनामास्क आढळतील त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी (कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेला अधिकारी) रक्कम रुपये 500/- प्रमाणे दंड करण्यास सक्षम प्राधिकारी राहील.

            विनामास्क आढळणारे अभ्यांगत / कर्मचारी / अधिकारी यांना दंडाची आकारणी करुन सक्षम प्राधिकाऱ्याने पावती द्यावी व सदर दंडाची रक्कम कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडेस जमा करावी,     आहरण व संवितरण अधिकारी यांनी अशा प्रकारे जमा झालेल्या दंडाची रक्कम महसूल जमा (सी) इतर कराव्यतिरिक्त महसूल (एक) सर्वसाधारण सेवा, 0070- इतर प्रशासकीय सेवा, 800 इतर जमा रक्कम या लेखाशिर्षाखाली शासनजमा करण्याची कार्यवाही करुन त्याबाबत आवश्यक ती नोंद आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंदवहीत घ्यावी.

            या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्य्वस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदरनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहे. 

00000

सायकलींग खेळाच्या प्रवेशाकरीता 8 नोव्हेंबर रोजी नैपुण्य चाचणीचे आयोजन

             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 29 - आंतराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने (खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर) राज्य निपुणता केंद्रातंर्गत सायकलिंग या खेळाकरिता निपुणता केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या खेळात ज्या खेळाडुंची जन्मतारीख 1 जानेवारी, 2007 ते 31 डिसेबर, 2009 या दरम्यान आहे, अशा खेळाडुंची सायकलिंग या खेळाच्या तज्ञ चाचणी समितीमार्फत समक्ष गुणानुक्रम देवून प्रवेश निश्चित केला जाणार आहे.

            या खेळाच्या प्रवेशाकरिता जिल्हास्तरावर 8 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हास्तरावर मुलांकरिता 1600 मीटर धावणे व मुलीसाठी 800 मीटर धावणे तसेच दोघांकरिता उभी लांब उडी, उभी उंच उडी व खेळाडुंची उंची अशा चाचण्यामधून गुणानुक्रमे प्रथम 2 मुले व 2मुलींची निवड करुन राज्यस्तरावर चाचणीकरिता पात्र ठरतील.

            त्याचप्रमाणे जे खेळाडू सायकलिंग या खेळात आपल्या जिल्हाकडून राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले आहेत. अशा खेळाडूंना थेट राज्यस्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांकरिता पाठविण्यात येणार आहे. सदर खेळाडुंनी राज्यस्तरावर जातांना सायकलिंग या खेळाचे राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रांची छायांकित प्रत व मुळ प्रत सोबत न्यावयाची आहे. राज्यस्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांकरिता पात्र ठरणाऱ्या व थेट निवड झालेल्या खेळाडुंनी 10 नोव्हेंबर, 2021 रोजी सायंकाळी ठिक 5.00 वाजेपर्यंत निवासस्थान, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे उपस्थित रहावे. त्यांच्या चाचण्या 11 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता सायकलिंग वेलोड्रॉम, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे येथे घेण्यात येतील.

            तरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शाळा, विविध क्रीडा संघटना व क्रीडा मंडळे यांनी जिल्हास्तरावर सायकलिंग या खेळाच्या क्रीडा नैपुण्य चाचण्यांकरिता इच्छुक सहभागी मुलांमुली खेळाडुंनी आपले नाव, जन्मदिनांक (आधारकार्ड/जन्मदाखला सह) इयत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता, संपर्क क्रमांकसह व खेळात क्रीडा कामगिरी असेल तर (क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रांवर छायांकित प्रतसह) इ. माहितीसह चाचणी कार्यक्रमानुसार उपस्थित रहाण्याबाबत सुचित करावे. अधिक माहितीसाठी श्री. मिनल थोरात (राज्य क्रीडा मार्गदर्शक) 8625946709 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी भरती

             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 29 - रोजगारासाठी पात्र असलेल्या (45 वर्षाच्या आतील) माजी सैनिकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये माजी सैनिक प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात सुरक्षा रक्षक (Security Guard) च्या जागा भरावयाच्या आहेत.

            या पदासाठी दिनांक 1 ऑक्टोबर, 2021 रोजी वय 45 वर्षापेक्षा कमी असावे, शिक्षण 8 वी किंवा समकक्ष पास पण 12 वी पास नसावा, सैन्यसेवा कमीत कमी 15 वर्ष झालेली असावी, सैन्य दलातील हुद्दा हवलदार पदापेक्षा कमी अथवा समकक्ष असावा, चारित्र्य कमीत कमी चांगले असावे, मेडीकल कॅटेगरी  AYE/SHAPE-1 असावा.

            तरी या पदाकरीता इच्छुक व पात्र असलेल्या माजी सैनिकांनी डिसचार्ज बुक, पी.पी.ओ. एम्पलॉयमेंट कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र व इतर सैन्य कागदांपत्रासह कार्यालयीन वेळेत 8 नोव्हेंबर, 2021 पर्यंत आपले नांव नोदवावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0257-2241414 वर संपर्क साधावा. असे आवाहन राहूल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीस मिळणार स्वत:ची इमारत जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रयोगशाळा उभारण्याचे प्रस्ताव सादर करा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

 




            जळगाव (जिमाका) दि. 29 - जिल्ह्यातील प्रत्येक गावात अंगणवाडीसाठी स्वत:ची इमारत त्याचबरोबर प्रत्येक गावात स्मशानभूमी असावी, यासाठीचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी तातडीने सादर करावे. जिल्ह्याला वित्त विभागाकडून मिळणारा आव्हान निधी मिळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियमांचे पालन करुन विहित कालावधीत विकास कामांचे नियोजन करावे. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज दिलेत.

            जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन भवनात पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, आमदार सर्वश्री. शिरीष चौधरी, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

            यावेळी पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, ज्या गावांमध्ये अंगणवाड्या ओट्यांवर, सेविकांच्या घरी, समाजमंदिरात भरतात त्या गावांमध्ये अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या इयत्ता 5 ते 8 वी पर्यंतच्या शाळांमध्ये प्रयोगशाळा उभारणे, ज्या शाळांमध्ये वीज कनेक्शन नाही त्या शाळांमध्ये वीज कनेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणांच्या बळकटीकरणासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना मोठ्या प्रमाणात जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा निधी विहित कालावधीत खर्च होणे अपेक्षित आहे. निधी खर्च होणार नसेल तर समर्पित करावा जेणेकरुन इतर यंत्रणांना उपलब्ध करुन देण्यात येईल. आरोग्य केंद्र, शाळा खोल्या बांधकाम, अंगणवाडी बांधकामास प्राधान्य द्यावे,

            याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेच्या यावर्षीच्या पुनर्वियोजनात स्माशनभूमी, शाळा खोल्या बांधकाम, अंगणवाडी बांधकामासाठी 5 कोटी रुपयांची, जिल्ह्यात वारकरी भवन बांधण्यासाठी 1 कोटी, लोककला भवनासाठी 1 कोटी, ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 11 कोटी, जिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयास यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी 1 कोटी 90 लाख, मातोश्री शेत रस्त्यांसाठी 15 कोटी शिवाय महिला बचतगटांमार्फत उत्पादित वस्तुंना हक्कांची बाजारपेठ उभारण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन ठिकाणी महिला बचतगट भवन उभारण्यास 7 कोटी रुपयांची तरतुद करण्याचा विचार असल्याचेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी जिल्हा वार्षिक योजनेतून आतापर्यंत झालेल्या तसेच खासदार/आमदार निधीतील कामांचा व खर्चाचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेसह इतर विभागांकडील स्पील, नवीन कामांचे नियोजन व पुढील वर्षाचा प्रारुप आराखडा याचाही आढावा घेण्यात आला.

            कार्यान्वयीन यंत्रणांनी यावर्षीचे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावे. आरोग्य यंत्रणांनी बळकटीकरणासाठी दिलेला निधीचा योग्य विनियोग होईल याची दक्षता घ्यावी, तसेच प्रारुप आराखडा तयार करतांना पायाभूत सुविधांचा समावेश करावा. अशी सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली.

            दिव्यांगाना अपंगत्वाचे प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयात यावे लागते. यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेऊन यापुढे अपंगत्वाच्या दाखल्यासाठी तालुकानिहाय शिबिराचे अयोजन करावे. सुरुवातीस मुक्ताईनगर आणि पाचोरा तालुका येथे शिबिर घ्यावे. अशी  सुचना आमदार चंद्रकांत पाटील, किशोर पाटील यांनी मांडली असता यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

            बैठकीचे सुत्रसंचलन करतांना जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी जिल्हा वार्षिक योनजेतंर्गत करण्यात आलेली तरतुद, यंत्रणानिहाय निधीचे वितरण, यंत्रणानिहाय देण्यात आलेली प्रशासकीय मान्यता, झालेला खर्च आदिंची माहिती बैठकीत दिली. यावेळी लोकप्रतिनिधींनी विकास कामांवर आधारित विविध उपाययोजना सुचविल्या. या बैठकीस विविध यंत्रणांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

00000

 


            नाशिक दिनांक 29 ऑक्टोबर 2021 (जिमाका वृत्तसेवा) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित राज्यभर विविध कार्यक्रम सुरू आहेत. केंद्र सरकार व आणि राज्य शासनाच्या वतीने करावयाच्या विविध उपक्रमांबाबत जिल्हास्तरावर कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित होणाऱ्या विविध शासकीय कार्यक्रमांच्या तसेच शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने विभागीय व जिल्हास्तरावरून प्रसिद्धीचे व्यापक नियोजन करण्याच्या सूचना माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महांसचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्या आहेत.

            नाशिक येथील विभागीय माहिती कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे बोलत होते. या बैठकीस नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत (नाशिक), विलास बोडके (धुळे), माहिती अधिकारी अर्चना देशमुख, सहायक संचालक मोहिनी राणे, माहिती सहायक जयश्री कोल्हे, मनोहर पाटील, किरण डोळस, प्रविण बावा आदि उपस्थित होते.

            यावेळी सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरेपट्टे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यात होणाऱ्या विविध शासकीय कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी द्यावी, त्या अनुषंगाने  होणाऱ्या बैठकांनाही उपस्थित रहावे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासकीय पत्र व्यवहार आणि बातम्या, लेख प्रसिद्ध करतांना तयार करण्यात आलेल्या लोगोचा वापर प्राधान्याने करण्यात यावा. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांवर लेख लिहीणे, स्वातंत्र्य सैनिकांच्या कामगिरीवर आधारीत पुस्तिका अथवा कॉफीटेबल बुक तयार करण्याबाबत जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करण्यात यावी, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांबाबत लेख लिहून प्रसिद्धी देतांना जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनांचे सहकार्य घ्यावे. तसेच जिल्ह्यात स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत काही घटना, आंदोलने, मेळावे अथवा लढे उभारले असतील त्याविषयीचा इतिहास जाणून घेवून त्याबाबत देखील लेखांना व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देण्याचे नियोजन ऑगस्ट 2023 पर्यंत   करण्यात यावे, असेही सचिव तथा महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले.

            त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त गेल्या दोन वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त करून त्याबाबत यशकथा, लेख तयार करण्यात यावेत. त्यांची वृत्तपत्रे व विविध समाजमाध्यमांद्वारे त्यांस व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी, अशा सूचनाही सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी यावेळी दिल्या आहेत.

            यावेळी विभागातील तसेच आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. तसेच भविष्यातील प्रसिद्धीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या नियोजनाचे सादरीकरण विभागाचे उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे यांनी केले. तसेच सचिव तथा महासंचालक यांचे स्वागत व बैठकीचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी केले.

00000

Thursday, 28 October 2021

मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर 13 व 14 आणि 27 व 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहीमेचे आयोजन जिल्ह्यातील तरूणांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

                            

                 जळगाव, (जिमाका) दि. 28 - मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचेकडील दि. 20 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या पत्रानुसार जळगाव जिल्ह्यामध्ये दिनांक 01/01/2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे. जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणा-या या कार्यक्रमाची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे :

1.एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी : दि. 1 नोव्हेंबर, 2021 (सोमवार)

2.दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी : दि. 1 नोव्हेंबर (सोमवार) ते दि. 30 नोव्हेबर, 2021 (मंगळवार)

3.विशेष मोहिमांचा कालावधी : 1) दि.13  नोव्हेंबर, (शनिवार) व  दि.14 नोव्हेंबर, 2021  (रविवार) आणि

    दि.27 नोव्हेंबर, 2021 (शनिवार) व  दि. 28 नोव्हेंबर, 2021 (रविवार)

4.दावे व हरकती निकालात काढणे : दि. 20 डिसेंबर, 2021 (सोमवार) पर्यंत.

5.मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे : दि. 5 जानेवारी, 2022 (बुधवार)

        जिल्ह्यातील रहिवाश्यांनी दि. 1 नोंव्हेबर, 2021 ते दि. 30 नोव्हेंबर, 2021 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे योग्य तो फॉर्म - नमुना नोंदविण्याचे आवाहन श्री. राऊत यांनी यावेळी केले.

1) फॉर्म - नमूना नं. 6 - नव्याने मतदार नोंदणी करणे.

2) फॉर्म - नमूना नं. 7 - मयत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार यांचे मतदार यादीतील नाव वगळणेकामी.

3) फॉर्म - नमूना नं. 8 - मतदार यादीतील नावांची किंवा तपशीलाची दुरुस्ती करण्याकरिता.

4) फॉर्म - नमूना नं. 8 अ - मतदार संघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणीकरिता

            दि.1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित नव्यांने नाव नोंदणी करण्याचे शिल्लक असल्यास अशा नवतरुण मतदारांना भारत निवडणूक आयोग यांनी पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे अशा मतदारांनी तसेच इतर काही मतदार आहेत ज्यांची नावातील दुरुस्ती/कायमस्वरुपी स्थानात बदल/मयत मतदार असे अर्ज संबंधित तहसिलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांना नियुक्त केलेल्या ठिकाणी सादर करता येतील.

            मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

00000


प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत 27 कोटी रुपयांची भरपाई मंजूर

जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :  प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2021-22 खरीप हंगाम करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात आली होती. याअंतर्गत विमा कंपनीकडून 27 कोटी 7 लाख 29 हजार रुपयांची (2707.29 लाख रुपये) भरपाई मंजूर झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. 

        या योजनेअंतर्गत अमळनेर, पारोळा व चोपडा या तालुक्यातील उडीद, मूग आणि अमळनेर तालुक्यासाठी, बाजरी/कापूस या पिकांसाठी खरीप हंगामातील पावसाच्या खंडामुळे प्रतिकूल परिस्थिती (Mid season Adversity) निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या पिकांची अधिसूचना काढून विमा कंपनीला 25 टक्के आगाऊ नुकसान भरपाई रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेशित केले होते. तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनीही याबाबत शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे आयसीआयसीआय लोबार्ड (भारती एक्सा) विमा कंपनीकडून एकूण २७०७.२९ लाख रक्कम मंजूर झालेली आहे.

    सदर नुकसान भरपाई अमळनेर, पारोळा, चोपडा तालुक्यातील २० मंडळामध्ये मूग पिकांसाठी ०.४४ लाख, तर उडीद पिकाकरीता ०.०६ लाख रुपये, अमळनेर तालुक्यातील ८ मंडळामध्ये बाजरी पिकासाठी ०.०३ लाख, तर कापुस पिकाकरिता २७०६.७६ लाख रक्कम मंजूर झालेली आहे. सदरची रक्कम विमा कंपनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचेही श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहेत. 

                                                                      00000

Wednesday, 27 October 2021

कोरोनापश्चात व्यवसायाच्या संधी गुरूवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

             जळगाव, (जिमाका) दि. 27 - जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालमार्फत गुरुवार, 28 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 3.30 ते 4.30 या वेळेत  कोरोनापश्चात व्यवसायाच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.   

            या मार्गदर्शन शिबिरात श्री. गिरीश कुलकर्णी, समुपदेशक, विद्यार्थी मित्र व संवादक, जळगाव हे मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिटवर करण्यात आलेले आहे.            

            तरी या मागदर्शन सत्रात जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.

गुगल मिट लिंक –https://meet.google.com/txe-uins-twd

00000

 

 

Tuesday, 26 October 2021

प्रत्येक महाविद्यालयात कोविड-19 लसीकरण केंद्र कार्यान्वित करावे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण

       जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या सहकार्याने प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण केंद्र कार्यान्वित करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी दिले आहेत.

उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे ‘मिशन युवा स्वास्थ्य कोविड-19’ हे अभियान राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार उच्च शिक्षण विभागातर्फे या अभियानाच्या यशस्वितेसाठी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तसेच विद्यार्थी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीव्दारे बैठक आयोजित करीत लसीकरणासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे लसीकरण करुन घेण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण केंद्र आरोग्य विभागाच्या सहकार्याने उभारावे. त्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाची मदत घ्यावी. महाविद्यालयात प्रवेशित बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने त्यांना लस घेण्याचे सोयीचे होणार आहे. तसेच ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कमध्ये अडचण येत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य होत नाही, अशा विद्यार्थ्याना महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात आपली नोंद व लसीकरण करुन घेणे शक्य होणार आहे. शासनाच्या मिशन युवा स्वास्थ्य अभियानाच्या उदिष्ट पूर्तीसाठी महाविद्यालयांनी जनजागृती करीत एकही विद्यार्थी लस घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी विद्यार्थ्यांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून लसीकरणाबाबत जागृत करावे, असेही सहसंचालक डॉ. चव्हाण यांनी म्हटले आहे.

00000

 

खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे मधपाळ प्रशिक्षण वर्ग

                 जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. मध केंद्र योजनेंतर्गत 2021-22 करीता वैयक्तिक मधपाळ लाभार्थ्यांना दहा दिवसांचे निवासी प्रशिक्षण (मधमाशापालन) कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद रोड, जळगाव येथे 9 ते 18  नोव्हेंबर 2021 या कालावधीत होणार आहे. या प्रशिक्षणामध्ये योजनेनुसार एकूण प्रकल्पाच्या 50 टक्के स्व- गुंतवणुक करणारे आणि 18 वर्षांवरील होतकरु शेतकरी, उद्योजकांनी  सहभागी होण्यासाठी पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे, शाळा सोडल्याचा दाखला, गुण पत्रक, जातीचा दाखला, सातबारा उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र आदी आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, आय.टी.आय. जवळ जळगाव (संपर्क क्रमांक 9623578740 व 7058315110) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

00000

वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांनी तीन नोव्हेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करावेत : वस्त्रोद्योग आयुक्त शीतल उगले यांचे आवाहन

           जळगाव (जिमाका) दि. 26 –:  वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीज अनुदान योजनेचा लाभ घेणारे वस्त्रोद्योग आणि 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेले यंत्रमाग सोडून अन्य सर्व वस्त्रोद्योग प्रकल्प ज्यांची वीज सवलत सुरु आहे. त्याच प्रमाणे वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करीत असलेले वस्त्रोद्योग प्रकल्पांनी 22 ऑक्टोबर 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यवाही करावी. त्यासाठी 3 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली- उगले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

ज्या वस्त्रोद्योग घटकांची वीज सवलत सुरु असेल किंवा बंद आहे. अथवा वीज सवलत मागणीसाठी प्रस्ताव सादर करीत आहे. त्या उद्योगांनी शासन निर्णय, सहकार पणन, व वस्त्रोद्योग विभाग 22 ऑक्टोंबर 2021 शासन निर्णयातील परिशिष्टानुसार प्रस्ताव आयुक्त (वस्त्रेाद्योग) यांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत. सदर प्रस्ताव मागील 6 महिन्याचे वीज देयक तसेच प्रकल्पाचा एकूण वीज वापर जसे औद्योगिक, कामगार, वसाहत त्यांचे कार्यालय व अन्य वापर यांच्या माहिती तसेच त्यासाठीच्या वीज मिटर याची माहिती देखील सादर करावी.

                ज्या वस्त्रोद्योग घटकांची वीज सवलत नियमित सुरु आहे त्या प्रकल्पांना प्रस्ताव सादर करण्यासाठी शासन निर्णयानुसार 10 दिवसाची मुदत देण्यात येत आहे. सदर प्रकल्पांनी 3 नोव्हेंबर 2021 पर्यत प्रस्ताव सादर करावा. या मुदतीत ज्या प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त होणार नाहीत त्यांची वीज सवलत बंद करण्यात येईल. तसेच सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्या प्रस्तावांची सखोल तपासणी केल्यानंतर शासनाच्या मान्यतेने सदर प्रकल्पांना वीज लागू करण्यात येईल. शासन निर्णयात दिलेल्या सुचनानुसार शासनास प्राप्त होणाऱ्या वीज सवलतींच्या प्रस्तावात प्रकल्पांनी सादर केलेली माहिती तसेच प्रकल्पात प्रत्यक्षात असलेली माहिती तीच आहे किंवा कसे याची विभागाच्या दक्षता व नियंत्रण पथकाकडून नियमित तपासणी करण्यात येईल. जर पथकाच्या तपासणीत निदर्शनात आले की, प्रकल्पाने सादर केलेली माहिती तसेच प्रत्यक्षात असलेली माहिती यामध्ये तफावत आहे किंवा प्रकल्पाने चुकीची अथवा खोटी माहिती सादर केली आहे. तर त्या प्रकल्पाची वीज सवलत तसेच अन्य सवलती तात्काळ बंद करण्यात येतील.  तसेच यापूर्वी दिलेल्या सर्व अनुदानाची व्याजासह वसुली करण्यात येईल.

                ज्या प्रकल्पांनी शासन निर्णसोबतच्या परिशिष्टाप्रमाणे नमूद केलेल्या माहितीपैकी जी माहिती यापूर्वी सादर केलेली आहे. ती माहिती वगळून उर्वरित माहिती सादर करावी. तसेच ज्या प्रकल्पांनी वीज सवलत स्वघोषणापत्र न सादर केल्यामुळे बंद आहे व त्यांनी प्रस्ताव सादर केलेला नाहीत त्यांनी देखील त्वरीत प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन  वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती तेली- उगले यांनी केले आहे.

00000

रब्बी हंगामातील हंगामी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज सादर करावेत

                 जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) :  रब्बी हंगामातील हंगामी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एम. व्हट्टे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

कार्यकारी अभियंता श्री. व्हट्टे यांनी म्हटले आहे, त्यांच्या अधिपत्याखालील धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेडी, बुराई, कनोली, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी, अनेर, करवंद, अमरावती, सुलवाडे बॅरेज असे मध्यम प्रकल्प, 45 लघु प्रकल्प, कोल्हापूर पध्दतीचे 22 बंधारे, 30 वळण बंधारे असे 109 प्रकल्प तसेच नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्प असे 3, लघुप्रकल्प 33, कोल्हापूर पध्दतीचे सहा बंधारे आणि 20 वळण बंधारे मिळून 62 तसेच धुळे व नंदुरबार अधिसूचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या बागायतदारांनी 14/10/2021 ते 28/2/2022 या कालावधीकरीता सुरू झालेला रब्बी हंगाम 2021- 2022 मध्ये भुसार/ अन्नधान्ये/ चारा/ डाळी /कपाशी/ भुईमूग व इतर हंगामी पिके इत्यादी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

                बागायतदार शेतकऱ्यांनी आपले नमुना क्रमांक 7, 7 (अ), (ब) चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 31/12/2021 रोजी सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत देण्याचे करावे.

पाणी अर्ज स्वीकारण्याच्या शर्ती पुढील प्रमाणे : पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदारांनी आपापल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्वीकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजुरी/ ना मंजुरीचा विचार करण्यात येईल. मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये/ भुसार/ चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेवू नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व दरसाल दर शेकडा 10 टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळी नसताना पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणाऱ्या बागायतदारांचे नियमानुसार पंचनामे करण्यात येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल.

                टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. विहित दिनांकापर्यंत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देवून पोहोच पावती घेतली पाहिजे. लाभ क्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिन अर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल, असेही कार्यकारी अभियंता श्री. व्हट्टे  यांनी म्हटले आहे.

00000

तुरीवरील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कराव्यात उपाययोजना

         जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) :  तूर हे जिल्ह्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे आंतरपीक आहे. तुरीवर शेंगा पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी व पिसारा पतंगआदींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असतो.  त्यासाठी वेळीच फुलकळी लागताना पहिली फवारणी निंबोळी अर्क  5 टक्के, दुसरी फवारणी  12 ते 15 दिवसांनी हेलिओकिल  500 मिली / हेक्टर गरजेनुसार, तिसरी फवारणी क्लोरोपायरीफॉस 25 मिली अथवा पॉलिट्रीन 20 मिली प्रोफेनोफॉस 50 टक्के ई.सी. 15 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. अळीचे प्रमाण सुरुवातीस जास्त असेल तर 45 टक्के स्पिनोसॅड 162 मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के  दाणेदार 220 ग्रॅम / हेक्टर 500 लिटर पाण्यातून फवारावे. तसेच क्रॉपसॅप योजनेतंर्गत क्लोरोपायरिफॉस 20 टक्के  व ॲझाडिरेक्टिन 3000 पीपीएम 50 टक्के अनुदानावर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये परमिटव्दारा तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याव्दारे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

००००

कोविड 19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानासाठी तक्रार निवारण समिती गठित

       जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘कोविड 19’ या साथरोगामुळे मृत्यू पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

‘कोविड 19’मुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून प्रती मृत  व्यक्तीसाठी रक्कम रुपये 50,000/- अर्थ सहाय्य् देणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. सदरचे अर्थसाहाय्य वितरणासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडील 4 ऑक्टोबर 2021 रोजीच्या निकालपत्रात ‘कोविड 19’मुळे होणाऱ्या मृत्यूचा विचार करण्याचे निकष ठरविले आहेत.

 मा. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, जर’ कोविड -19’ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या  कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा नातेवाईकाला 50,000/- एक्स ग्रेशिया न मिळाल्याबद्दल काही तक्रार असल्यास मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करुन राज्य शासनाने तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.  

जिल्हादंडाधिकारी श्री. राऊत यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेरील क्षेत्रासाठी पुढील प्रमाणे जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठित केली आहे. तक्रार निवारण समिती अशी :  जिल्हाधिकारी- अध्यक्ष, सदस्य- अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, प्राध्यापक व विभागप्रमुख, औषध वैद्यकशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  सदस्य सचिव- जिल्हा शल्य चिकित्सक.

सदर तक्रार निवारण समितीला पुढील अटी, शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा चिकित्सकांनी प्राप्त तक्रारींच्या नोंदी स्वतंत्र नोंदवहीमध्ये घेवून पुढील  निर्णयास्तव योग्य त्या कागदपत्रांसह समितीकडे सादर करतील. ‘कोविड -19’ मृत्यूच्या प्रमाणपत्रासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास, व्यथीत व्यक्ती वरील समितीकडे तक्रार दाखल करु शकतात. ‘कोविड -19’ मृत्यूसाठी आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणी केल्यानंतर मृत्यू कोविड 19 मुळेच झाला किंवा कसे ? ही बाब स्पष्ट करावी.  सर्व संबंधित रुग्णालय जेथे रुग्णाला दाखल केले गेले आणि उपचार दिले गेले, त्या रुग्णालयाचे आवश्यकतेनुसार मृत व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्या मार्फत किंवा रुग्णालयाकडून कागदपत्रांची पडताळणी करतील. तक्रार निवारण समिती मृत रुग्णाच्या समकालीन वैद्यकीय नोंदीची तपासणी करेल आणि समितीकडे दाखल तक्रारी अर्जावर समिती 30 दिवसांच्या आत निर्णय घेईल.  संबंधित नोंदणी प्राधिकरण तक्रार निवारण समितीच्या निर्देशानुसार मृत्यू प्रमाणपत्राला मान्यता / सुधारणा करेल, जर समितीचा निर्णय तक्रारदाराच्या बाजूने नसेल, तर त्याचे स्पष्ट कारण समितीने नोंदविले पाहिजे, सदर उपरोल्लेखीत कार्य समितीचे सदस्य सचिव  तथा जिल्हा शल्यचिकित्सकांनी पार पाडावे. याबाबतचा सर्व पत्रव्यवहार जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव यांनी करावा, तसेच याबाबतचे सर्व रेकॉर्ड सुस्थितीत जतन करावे, दिलेल्या सर्व सूचनांप्रमाणे समितीचे कामकाज चालेल याची दक्षता सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य् चिकित्सकांनी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

00000

Monday, 25 October 2021

मुलीची ओळख पटविण्याचे आवाहन

 
            जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 - जिल्हा बाल कल्याण समिती, जळगाव यांच्या आदेशान्वये दिनांक 11 सप्टेंबर, 2021 रोजी धुळे येथील शिशुगृहात पुढील पुनर्वसनाकरीता बालिकेला दाखल करण्यात आलेले आहे.

            या मुलीस कोणी ओळखत असेल तर त्यांनी बाल कल्याण समिती, जळगाव  या पत्त्यावर व दुरध्वनी क्रमांक- 0257/ 2239851 तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव 0257/2228825 वर संपर्क साधावा. असे योगेश मुक्कावार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

             जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे बहुजन कल्याण, खार जमीन विकास, मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार हे मंगळवार, 26 ऑक्टोबर, 2021 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

             मंत्री श्री. वडेट्टीवार यांचा दौरा असा : मंगळवार, 26 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 9.00 वा जळगाव विमानतळ येथे विशेष विमानाने आगमन. सकाळी 9.30 वाजता बऱ्हाणपूरकडे (मध्य प्रदेश) प्रयाण (मार्गे – जळगाव-भुसावळ- मुक्ताईनगर-हतनूर), दुपारी 1.30 वाजता जळगावकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता जळगाव येथे आगमन व अजिंठा विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3.45 वाजता जळगाव विमानतळकडे प्रस्थान, दुपारी 4 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व विशेष विमानाने  (CJ२) मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 1 नोव्हेंबरला होणार ऑनलाइन

             जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचा लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, 1 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता ऑनलाइन होणार आहे.

            सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. त्याचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीयस्तरावर लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन 1 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) होणार आहे. ज्या नागरिकांच्या काही तक्रारी असतील त्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात उपस्थित राहून तक्रारी मांडाव्यात, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

00000

Friday, 22 October 2021

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूकांसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी

             जळगाव, (जिमाका) दि. 22 - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उध्दभवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा याकरिता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारव्दारा प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण 3.0 योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

            या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील एकूण 450 बेरोजगारांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण ऑन जॉब ट्रेनिंग स्वरुपाचे असेल, प्रशिक्षणानंतर प्रशिक्षित उमेदवारांना शासनातर्फे प्रमाणपत्र प्राप्त देण्यात येईल तसेच त्यांना आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी गुगल लिंक वर आपली माहिती/नोंदणी ऑनलाईन सादर करावी. नोंदणी करताना समोर नमूद शैक्षणिक पात्रतेनुसार कोर्स/जॉब रोल निवडावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 0257-2959790 वर संपर्क साधावा. असे वि. जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

गूगल लिंक :-

https://docs.google.com/forms/d/e/१FAlpQLSeWOam६q-९D-wedbHbknkC७RZ४oOoz५३Lx१IbqOyfmfYKuuONQ/viewform?usp=pp_url

00000

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र व जळगाव मनपातर्फे शहरात स्वच्छता मोहीम

 
            जळगाव, (जिमाका) दि. 22 - केंद्र सरकारने यंदाचे वर्ष आजादी का अमृत वर्ष साजरे करायचे निश्चित केले आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र व जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे आज जळगाव शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील 5 व्यापारी संकुलातील सिंगल युस प्लास्टिकचा 1.5 टन कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, मनपा उपआयुक्त शाम गोसावी, कवियत्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. पंकज ननावरे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, रासेयो जिल्हा नोडल अधिकारी डॉ. दिनेश पाटील, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर आदि उपस्थित होते.

            सकाळी  7  वाजेपासून शहरातील महात्मा गांधी मार्केट, महात्मा फुले मार्केट, जुने बी.जे.मार्केट, नवीन बी.जे.मार्केट, गोलाणी मार्केटमध्ये कोरोना नियमांचे पालन करून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. स्वच्छता अभियानाचा समारोप गोलाणी व्यापारी संकुलात करण्यात आला.

या संस्थांनी घेतला सहभाग

            स्वच्छता अभियानात जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव आकाशवाणी, रेडक्रॉस सोसायटी, सोशल लॅब, गोलाणी मार्केट सिंधी संगत आणि व्यापारी संघटना, मू.जे.महाविद्यालय, एसएनडीटी महिला महाविद्यालय, ॲड.एस.ए.बाहेती महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, राष्ट्रीय सेवा योजना, नूतन मराठा महाविद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.

 

प्लॅस्टिकऐवजी पर्यायांचा उपयोग करा : महापौर जयश्री महाजन

            प्लॅस्टिक पर्यावरणाला घातक असल्याने नागरीकांनी प्लॅस्टिकऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा. आज जळगाव शहरातील व्यापारी संकुल स्वच्छतेसाठी युवकांनी पुढाकार घेतला ही चांगली बाब आहे. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवक घडत आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या जल संवर्धन मोहिमेत देखील सर्वांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केले.

सर्व तरुणांनी स्वच्छतादूत म्हणून पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

            नेहरू युवा केंद्र, जळगाव स्वयंसेवक यांच्यामार्फत जिल्हाभरात राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता अभियानाची प्रशंसा करुन युवकांनी स्वच्छतादूत म्हणून पुढे येऊन कार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. तसेच प्लॅस्टिक उपवास करण्याचे आवाहनही त्यांनी जिल्हावासियांना केले.

            गोलाणी मार्केट सिंधी संगत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जवाहरलाल ललवाणी, सचिव महेश चावला, गिरधर धाबी. मोहिमेसाठी चाय शायचे साहिल मनवाणी, दीपेश रुपानी आदींनी सहकार्य केले. यावेळी नेहरू युवा केंद्र युथ लीडर तेजस पाटील, पल्लवी तायडे, दुर्गेश आंबेकर, मुकेश भालेराव, नेहा पवार, परेश पवार, राहुल जाधव, सागर नगाने, शंकर पगारे, दीपक खिरोडकर, मनोज पाटील, कोमल महाजन, रवींद्र बोरसे, हिरालाल पाटील, उमेश पाटील, अनिल बाविस्कर, रोहन अवचारे, दिगंबर चौधरी या नेहरु युवा केंद्र तालुका समन्वयकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

            सूत्रसंचालन गिरीश पाटील, प्रास्ताविक नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, आभार अजिंक्य गवळी यांनी मानले.

00000

Thursday, 21 October 2021

नवीन शिधावाटप दुकान मंजूरीसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित

  जळगाव, दि. 21 (जिमाका) - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील शासन निर्णय 6 जुलै, 2017 व दि. 16 सप्टेंबर, 2021 अन्वये जळगाव जिल्ह्यात आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची, मयताचे वारस नसल्याने/वारसांने विहीत मुदतीत अर्ज सादर न केल्याने, नवीन तसेच विविध कारणांमुळे अकार्यान्वित रास्तभाव दुकानांचा जाहिरनामा प्रसिध्द करणेबाबत निर्देश दिले आहे. त्यानुसार 1 ऑगस्ट, 2017 व 16 सप्टेंबर, 2021 अन्वये जळगाव जिल्ह्यात शहरी, ग्रामीण भागात अकार्यान्वित रास्तभाव दुकाने तसेच इतर कारणास्तव नवीन शिधावाटप दुकाने मंजूर करणेसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

  नवीन रास्तभाव/ शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजुर करण्याकरीता जाहिरनामा काढणे व प्रसिध्द करणे (स्थगनादेश नसल्यास) दिनांक 10 ऑक्टोबर, 2021, संस्थांना अर्ज करण्याकरीता मुदत (30 दिवस) दिनांक 10 नोव्हेंबर, 2021 पर्यंत, नवीन दुकानाकरीता प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक तपासणी छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पुर्ण करणे (30 दिवस) दिनांक 10 डिसेंबर, 2021 पर्यंत, नवीन दुकाने मंजुर करणे (15 दिवस) दिनांक 25 डिसेंबर, 2021 पर्यंत याप्रमाणे राहील,

  जिल्हा पुरवठा कार्यालयाच्यावतीने जळगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, पारोळा, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल, रावेर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या तालुक्यातील नवीन रास्तभाव दुकाने मंजुरीसाठी जाहिरनामा प्रसिध्द केलेला असून जाहिरनामा संबंधित तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरही प्रसिध्द केला आहे. शासन निर्णयानुसार पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था),  नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था,  महिला स्वंयसहाय्य्ता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या रास्तभाव/शिधावाटप दुकानसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. 

जिल्हाधिकारी यांचे सुचनेनुसार रास्त भाव दुकानांसाठी अर्ज सादर करणेची प्रक्रिया ऑनलाईन करणेत येत आहे. इच्छुक संस्था/गट इ. यांनी आपल्या तालुक्याच्या तहसिल कार्यालयाशी संपर्क साधुन प्रक्रियेविषयी अधिक माहिती प्राप्त करुन घ्यावी. असे जिल्हा पुरव्ठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        00000

कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

   जळगाव, दि. 21 (जिमाका) - कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 30 जून, 2021 रोजी आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिनांक 11 सप्टेंबर, 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती महाराष्ट्र शासनाकडून लवकरच अधिसूचित करण्यात येणार असून त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

  त्यानुसार प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी त्यांचे पत्र दिनांक 12 ऑक्टोबर, 2021 अन्वये निर्देशित केलेनुसार जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्यासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता याप्रमाणे आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव टंचाई शाखा, आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, संपर्क क्रमांक-0257-2217193/2223180, ई-मेल- scy.jalgaon@gmail.com असा आहे.

तक्रार निवारणासाठी समिती स्थापन

  ‘कोविड-19’ मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला सानुग्रह अनुदानाबाबत काही तक्रार असल्यास त्यासाठी जिल्हास्तरीय आणि महानगरपालिका क्षेत्र अशा दोन तक्रार निवारण समिती गठित करण्यात आल्या आहेत.  जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती ही महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रासाठी असून या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, जळगाव तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक हे राहतील. तसेच महानगरपालिका क्षेत्राकरीताही तक्रार निवारण समिती राहील. ही समिती मनपा प्रशासकीय क्षेत्रनिहाय असून या समितीचे अध्यक्ष हे मनपा उपायुक्त दर्जाचे अधिकारी असतील तर मनपाचे वैद्यकीय अधिकारी तथा त्यांचे प्रतिनिधी हे समितीचे सदस्य सचिव असतील. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे. 

                                                                        00000

Wednesday, 20 October 2021

विभागीय आयुक्त गमेंनी केली दहीवद येथील विविध विकास कामांची पाहणी

 

            

         जळगाव, (जिमाका) दि. 20 - दहीवद, ता. अमळनेर ग्रामपंचायतीस आज विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भेट देऊन तेथील विविध विकास कामांची पाहणी केली. या भेटीदरम्यान आयुक्त गमे यांनी माझी वसुधंरा अभियानातंर्गत झालेल्या वृक्षरोपण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या कामांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. तसेच ग्रामस्थांनी या अभियानामध्ये अधिकाधिक सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

            त्याचबरोबर गावात रोजगार हमी योजनेतंर्गत सुरु असलेले वृक्षरोपण, घरकुल योजना, शोषखड्डे आदि कामे लवकर लवकर पूर्ण करण्याची सुचना केली. महसूल विभागामार्फत मोफत सातबारा व खाते उताऱ्याचे वाटप केले. शेतकऱ्यांना सातबारा व खातेउतारा घरपोच देण्याबाबत तहसिलदार व तलाठी यांना सुचना दिल्या. यावेळी आयुक्त श्री. गमे यांनी रोजगार हमी योजनेतंर्गत काम करणाऱ्या मजूरांशी संवाद साधून नवीन मजूर नोंदणीबाबतचाही आढावा घेतला. ग्रामस्थांकडून गावांत सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती जाणून घेतली तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

             यावेळी त्यांचेसमवेत विभागीय आयुक्त कार्यालयातील श्रीमती नाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) श्री. दिगंबर लोखंडे, अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती सीमा अहिरे, यांच्यासह तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, सरपंच श्रीमती सुषमा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

00000