जळगाव, दि. २० जून (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या वतीने संचालित सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेश प्रक्रिया दिनांक २३ जून २०२५ पासून सुरू होत आहे. जळगाव शहर व जिल्ह्यातील जवळील तालुक्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना या वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे.
Friday, 20 June 2025
सैनिकी वसतिगृहात प्रवेशासाठी २३ जूनपासून प्रक्रिया सुरू; युद्धविधवा व माजी सैनिकांच्या पाल्यांना मोफत प्रवेशाची सुविधा
या
वसतिगृहात युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा तसेच सैनिकांच्या अनाथ पाल्यांसाठी प्रवेश
पूर्णपणे मोफत असून, अन्य आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना सवलतीच्या दरात प्रवेश देण्यात
येणार आहे. तसेच अतिरिक्त जागा उपलब्ध असल्यास इतर नागरी विद्यार्थ्यांनाही प्रवेश
देण्यात येणार आहे.
जेवण
व निवासाची उत्तम व्यवस्था, स्वतंत्र अभ्यासिका, शारीरिक प्रशिक्षण, गरम पाण्यासाठी
सोलर सिस्टीम, उत्कृष्ट खेळाचे मैदान, सांस्कृतिक कार्यक्रम व सण-उत्सवांचे आयोजन तसेच
वेळोवेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अशी विविध सोयी वसतिगृहात उपलब्ध
आहेत.
दरपत्रक (प्रति महिना) –
अधिकारी व ऑननरी रँक : ₹ ३,०००
जे.सी.ओ. : ₹ २,८००
शिपाई / एनसीओ : ₹ २,५००
युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा व अनाथ पाल्य : मोफत
इतर नागरी विद्यार्थी : ₹ ३,५०० (भोजन, निवास व सेवा करासह)
वसतिगृह
प्रवेश अर्ज सैनिक कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी
लवकरात लवकर संबंधित वसतिगृहात अर्ज सादर करावेत. प्रवेशासाठी "प्रथम अर्ज, प्रथम
प्राधान्य" हे धोरण अवलंबले जाणार असल्याने इच्छुकांनी विलंब न करता अर्ज करावेत,
असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) निलेश प्रकाश पाटील (नि.) यांनी
केले आहे.
अधिक माहितीसाठी संजय रा. गायकवाड – मो.
८४५९६ ८७३८८ / दूरध्वनी ०२५७-२२४१४१४, समाधान धनगर – मो. ७३७८९ ४२३२७ / दूरध्वनी ०२५७-२२३३०८८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000000000000
आग्रहाचे निमंत्रण आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळ – रेल्वे मैदान | शनिवार, २१ जून २०२५ | सकाळी ६ .०० वा.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळ येथील रेल्वे मैदानावर दहा हजार लोकांच्या सामूहिक योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमासाठी माननीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या विशेष प्रसंगी सर्व दैनिकांचे मा. संपादक, उपसंपादक, बातमीदार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच सर्व पत्रकार बंधू-भगिनींना मन:पूर्वक आमंत्रित करण्यात येत आहे.
आपली उपस्थिती आम्हाला निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
आपण शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी सकाळी ६ वाजता रेल्वे मैदान, भुसावळ येथे उपस्थित राहावे, ही विनंती.
आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत!
– जिल्हा प्रशासन, जळगाव
000000000000
शनिवार २१ जून रोजी दहा हजार नागरिकांच्या सहभागाने ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन भुसावळ येथे साजरा होणार ▪️ नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव दि. २० जून (जिमाका वृत्तसेवा) – आंतरराष्ट्रीय योग दिनाचा यंदा ११ वा वर्धापनदिन आहे. "एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग" या संकल्पनेनुसार, शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता रेल्वे क्रीडांगण, भुसावळ रेल्वे स्थानकासमोर, येथे भव्य योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रमात केंद्र शासन निर्देशित कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार सामूहिक योगाभ्यास होणार आहे.
कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे , जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून, सर्व शासकीय विभागांतील वर्ग १ व वर्ग २ अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे १०,००० नागरिकांच्या सहभागाची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उपस्थित राहणाऱ्यांचे वय किमान १० वर्षे व कमाल ६० वर्षे वयोगटातील असावे. योगाभ्यासासाठी सैल, आरामदायक पोशाख परिधान करावा आणि स्वतःची योगा मॅट किंवा चटई सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची आणि प्राथमिक उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे.
योग ही प्राचीन भारतीय परंपरेची देणगी असून, सर्वांनी मिळून या उपक्रमात सहभाग घ्यावा व जनसामान्यांमध्ये योगाचे महत्त्व पोहोचवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0000000000
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन ▪ आरोग्य सुविधांसाठी ३९ कोटी ४६ लाखांचा प्रकल्प – पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश
धरणगाव, दि. २० जून (जिमाका वृत्तसेवा):
- धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा
रुग्णालयात श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या
कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाला. यावेळी
रुग्णालयाच्या मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन
करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे
पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील होते. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती
रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री श्री.गिरीश
महाजन, खासदार श्रीमती स्मिता वाघ, आ. श्री.सुरेश भोळे, आ. श्री मंगेश चव्हाण, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी
आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. किरण पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत
यांच्यासह
विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी शासनाकडून ३९ कोटी ४६ लाख
७५ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, २.५ एकर क्षेत्रात या उपजिल्हा
रुग्णालयासह ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यामुळे धरणगाव तालुक्यातील आरोग्य
सेवा अधिक सक्षम होणार असून परिसरातील नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासह
शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, बधिरीकरण आदी सुविधा मिळणार आहेत.
या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण आणि
आंतररुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह,
शवविच्छेदन, रुग्णवाहिका सेवा, नवजात अर्भक काळजी, क्ष-किरण, न्यायवैद्यकीय सेवा, नेत्र
तपासणी, कुटुंबकल्याण, लसीकरण, रक्तपुरवठा केंद्र आणि संक्रमण प्रतिबंध केंद्र अशा
सुविधा उपलब्ध राहणार आहेत.
“धरणगाव हे
ऐतिहासिक शहर असून, बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या शेजारी ही सुविधा उभारली जात
आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणे हा तालुक्यासाठी गौरवाचा
क्षण आहे. एकही रुग्ण आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी ही सुविधा उपयुक्त
ठरणार आहे,”
असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री,
दोन्ही उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचे आभाराची प्रतिक्रिया दिली.
नवीन पोलीस
ठाण्यांची मागणी
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री
गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे धरणगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पाळधी दूरक्षेत्र
आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत म्हसावद दूरक्षेत्र यांना स्वतंत्र पोलीस ठाण्याचा
दर्जा देण्याची मागणी केली. तसेच धरणगाव येथील जुने पोलिस ठाणे आवार हे जीर्ण झाल्याने
त्याठिकाणी ५० शासकीय निवासस्थानांच्या बांधकामासाठी अंदाजे १५ कोटी रुपये निधी मंजूर
करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
000000000000
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन_ ▪ स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार ‘ धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ▪ गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन
जळगाव, दि. २० जून (जिमाका वृत्तसेवा) :- ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा कायापालट केला जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
धरणगाव येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याजी
नाईक स्मारकाचे उद्घाटन व जामनेर तालुक्यातील गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि
लबाना कुंभ स्मृतीस्थळी पाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री
फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धरणगाव येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री
बोलत होते.
कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई
खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव
पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, खासदार
स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण,पद्मश्री चैत्राम पवार, अनिल भालेराव,
शरदराव ढोले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी
उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, क्रांतिकारी खाज्याजी
नाईक स्मृतीस्मारक अत्यंत सुंदर झाले आहे. राणी दुर्गावती, भगवान बिरसा मुंडा, सिद्धू-कान्हू,
तंट्या मामा, झलकारी बाई, राघोजी भांगरे, भिमा नाईक, रुमाल्या नाईक, राणा पुंजा भिल,
यांच्यासारख्या अनेक नायकांचे दर्शन या स्मारकात घडते. हे स्मारक केवळ ऐतिहासिक नाही,
तर येथे आश्रमशाळा असून अस्मिता जागवण्याचे कार्यही केले जाते. भविष्यात येथे महिलांसाठी
कौशल्य विकास व फळप्रक्रिया प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल. संस्कृती संवर्धनाचाही उपक्रम
येथे राबविण्यात येईल.
छत्रपती
शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा लढा सुरू केला आणि त्यानंतर जनजाती समाजातील अनेक
नायकांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. परंतु त्यांचा इतिहास दुर्लक्षित राहिला. स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अशा नायकांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न
होत आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे श्री. फडणवीस म्हणाले.
खाज्याजी नाईक यांनी १८५७ च्या समरात भिल्ल
जमातीचे ३० हजार लढवय्ये उभे करून महाराष्ट्र व मध्यप्रदेशात मोठा लढा दिला. त्यांच्या
लढ्यामुळे इंग्रजांची सत्ता हादरली. इंग्लंडहून त्यांना ठार करण्याचे आदेश आले. त्यांच्यावर
त्या काळी दोन हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्यांनी इंग्रजांचा खजिना लुटून शस्त्र
खरेदी केली. ‘जिथे अन्याय, तिथे खाज्याजी नाईक’ हे समीकरण बनले होते. अंबापाणीच्या
लढाईत महिलांनीही शौर्य दाखवले. खाज्याजी नाईक अधिक काळ जगले असते तर कदाचित इंग्रजांना
भारत सोडावा लागला असता, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने
सुरू झालेल्या 'धरती आबा' योजनेंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या
योजनांची अंमलबजावणी होणार आहे. केंद्र शासनाने यासाठी ८० हजार कोटी रुपये मंजूर केले
असून, पुढील ५ वर्षांत एकही आदिवासी बांधव बेघर राहणार नाही. त्यांना शिक्षण, आरोग्य,
पोषण, रोजगार व रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल," अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी
दिली.
गोर बंजारा समाजाने देशभरात बावड्या, तलाव
व पाणवठे उभारून समाजसेवा केली आहे. अशा समाजाच्या प्रेरणास्थळी गोद्री येथे सरकारकडून
सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल," असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
कार्यक्रमात
शरदराव ढोले, अनिल भालेराव, पद्मश्री पवार
यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीस्मारक समितीचे
सचिव विलास महाजन यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.
मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस यांना गोद्री येथील प्रसंगांवर आधारित पुस्तक भेट देण्यात आले.
खाज्याजी नाईक
स्मृतीस्थळाचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाची कोनशिला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर
सर्व मान्यवरांनी स्मृतीस्थळाची पाहणी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खाज्याजी
नाईक यांच्या स्मृती मंदिराला भेट देऊन अभिवादन केले.
---
Thursday, 19 June 2025
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव दि-19 (जिमका):- राज्याचे आदिवासी विकास, मंत्री डॉ. अशोक उईके यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे,
गुरुवार,
दिनांक 19 जून, 2025 रोजी सायंकाळी 06.15 वाज ता राळेगाव येथुन यवतमाळ मार्गे
कारंजा मुर्तीजापूर अकोला खामगाव मलकापुर भुसावळ मार्गे जळगावकडे प्रयाण. रात्री
12.15 वाजता शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव.
शुक्रवार, दिनांक 20 जून, 2025 रोजी
सकाळी 09.30 वाजता शासकीय विश्रामगृह जळगाव येथुन धरणगावकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता धरणगाव येथे क्रांतीकारी
खाज्याजी नाईक यांचे भव्य स्मारक उदघाटन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 02.30 वाजता
जळगाव वरुन भुसावळ मलकापुर खामगाव अकोला कारंजा यवतमाळ राळेगा वडकी वणी वरोरा
भद्रावती मार्गे चंद्रपुरकडे प्रयाण.
०००००००००००
वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव दि - 19 ( जिमाका ) : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा पुढील प्रमाणे,
शुक्रवार दिनांक 20 जून, 2025 रोजी रात्री 12.10
वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेने भुसावळकडे प्रयाण. सकाळी 06.45
वाजता भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व निवासस्थानाकडे रवाना. सकाळी 07.15 वाजता
भुसावळ निवासस्थान येथे आगमन व राखीव.
००००००००००००
एकदिवसीय पणनविषयक कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न : बाजार समित्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव, दि. १९ जून (जिमाका) – महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे आणि राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील सर्व १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव यांच्यासाठी एकदिवसीय पणनविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत एकूण ९२ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.
राज्यात अलीकडेच बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या असून नविन संचालक मंडळ
कार्यरत झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर नूतन पदाधिकाऱ्यांना बाजार समितीचे कार्य प्रभावीपणे
पार पाडता यावे, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत बाजार समितीचा कारभार,
कलम ३७ अंतर्गत बाजार फीचा उपयोग, बाजार समिती गुणांकन, शासकीय योजनांची माहिती, कृषी
उत्पादने व नियमन, तसेच खाजगी क्षेत्रातील आव्हाने व उपाय यावर तज्ज्ञांनी सखोल माहिती
दिली.
या उपक्रमामागे राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची संकल्पना असून, कार्यकारी
संचालक, कृषी पणन मंडळ आणि संचालक, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था यांच्या
मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या वेळी
कृषी पणन मंडळ नाशिक विभागाचे उपसरव्यवस्थापक शिवपुरी पुरी यांनी बाजार समित्यांनी
उत्पन्न वाढीसाठी विविध मार्गांचा शोध घेण्याचे आणि शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे
घेण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थितांची शंका समाधानही केले.
कार्यशाळेस जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील
विशाल ठाकरे, डीएमआय कार्यालयाचे बुद्धी विलास, कृषी पणन मंडळ कार्यालयाचे बहादुर देशमुख
यांनीही मार्गदर्शन केले. याशिवाय, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुधीर वाघ, दीपक
साळुंखे, नितीन शेवाळे आणि नारायण टापसे यांचे विशेष योगदान लाभले.
0000000000
मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू- शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
जळगाव दि. 19 जून (जिमाका वृत्तसेवा) :– प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी मृग बहार हंगामाकरिता पुर्नरचित हवामान आधारित फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत चिकू, डाळींब, पेरू, मोसंबी, लिंबू व सिताफळ या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई या संस्थेमार्फत महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबविली जाणार आहे.
जिल्ह्यातील हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांना वारंवार नुकसान सहन करावे लागते. अशा स्थितीत हवामानाशी संबंधित धोके , जास्त पाऊस, पावसाचा खंड, तापमानातील चढ-उतार आदी , यांपासून संरक्षण देणारी ही विमा योजना ठरणार आहे. शेतकऱ्यांनी फळपिकांच्या मृग बहारासाठी या योजनेत सहभागी होणे ऐच्छिक असून कर्जदार व बिगरकर्जदार दोघेही यात भाग घेऊ शकतात.
या योजनेत पिक कर्ज घेण-या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग होण्यासाठी ऐच्छिक राहील. अधिसुचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज (उदा. मोसंबी व डाळीब) करता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकाकरिता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस आधी पर्यंत संबंधित बँकेस त्याअनुषंगाने विमा हप्ता कपात न करणे बाबत कळविणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी संबंधित बँकेस कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येणार आहे.
विमा संरक्षित रक्कम व हप्ता यांच्या तपशीलात पेरू पिकासाठी 70,000 रुपये प्रतिहेक्टर इतकी विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना 3,500 रुपये इतका हप्ता भरावा लागेल. या पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 असून वाढीव मुदत 30 जून 2025 पर्यंत आहे. मोसंबी पिकासाठी 100000 रुपये विमा संरक्षित रक्कम असून हप्ता 5000 रुपये आहे, अंतिम मुदत 30 जून 2025 आहे. चिकूसाठी 70000 रुपये रक्कम असून 6300 रुपये हप्ता आकारण्यात आला आहे, अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जून आहे. डाळींब पिकासाठी 160000 रुपये विमा संरक्षण असून हप्ता 8000 रुपये निश्चित करण्यात आला आहे. अंतिम मुदत 14 जुलै 2025. सिताफळ पिकासाठी सर्वाधिक रुपये विमा संरक्षित रक्कम 70000 असून हप्ता 3500 रुपये आहे. या पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 निश्चित करण्यात आली आहे. लिंबू पिकासाठी सर्वाधिक रुपये विमा संरक्षित रक्कम 80000 असून हप्ता 4000 रुपये आहे. या पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 असून वाढीव मुदत 30 जून 2025 पर्यंत आहे.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे तसेच ई-पिक पाहणी व Agristack नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
0000000000000
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा जळगाव दौरा
जळगाव दि. 19 जून (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा शुक्रवार दिनांक 20 जून, 2025 रोजी जळगाव जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.
रात्री 01.23 वाजता विदर्भ एक्सप्रेसने रेल्वे स्थानक, जळगाव येथे आगमन व मोटारीने खाजगी निवासस्थान, जामनेर, जि. जळगाव कडे प्रयाण. रात्री 02.00 वाजता जामनेर येथे आगमन व राखीव.
000000000
Tuesday, 17 June 2025
मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतिगृह भुसावळ येथे प्रवेश प्रक्रिया सुरू
जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भुसावळ जि. जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
या वसतिगृहात इयत्ता ८ वी ते महाविद्यालयीन तसेच तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या आणि जळगाव शहरात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.-भ.ज., विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील गरजू विद्यार्थिनींना प्रवेश घेता येणार आहे.
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा आणि त्याची प्रत वसतिगृह कार्यालयात सादर करावी, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.
वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य यांसह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी ₹४०००/- रोख रक्कम व दरमहा ₹५००/- निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, शासकीय वसतिगृह भुसावळ यांनी केले आहे.
00000000000
शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू
जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग समिश्र निवासी केंद्र , जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२५ आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश नोंदणी १५ जुलै २०२५ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात करावी, असे आवाहन केंद्राचे अधीक्षक यांनी केले आहे.
या केंद्रात शासनामार्फत मोफत भोजन, निवास, गणवेश, अंथरूण-पांघरूण,
पाठ्यपुस्तके, शालेय साहित्य, औषधोपचार, तसेच शालेय व कलाशिक्षणाची सुविधा उपलब्ध
करून देण्यात येते. उमेदवार अंध, कर्णबधिर किंवा अस्थिव्यंग पैकी एका प्रकारच्या
अपंगत्वाचा असावा. एकापेक्षा अधिक प्रकारचे अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना
प्रवेश नाही. उमेदवार संसर्गजन्य आजारमुक्त असावा
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांचे ऑनलाईन दिव्यांगत्व
प्रमाणपत्र (मूकबधिरांसाठी श्रवणालेख आवश्यक), जन्म दाखला, आधार कार्ड, UDIID
कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, दिव्यांगत्व स्पष्ट दिसणारे उमेदवाराचे ५
फोटो, बँक पासबुकची झेरॉक्स यांचा सामावेश आहे.
योग्य पात्रता असलेल्या इच्छुकांनी वरील सर्व कागदपत्रांसह लिहून दिलेला
अर्ज कार्यालयात सादर करावा, असे आवाहन केंद्राच्या अधीक्षकांनी केले आहे.
00000000000
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह भुसावळ येथे प्रवेश प्रक्रिया सुरू
जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संचलित मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह भुसावळ जि. जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
या वसतिगृहात इयत्ता ८ वी ते महाविद्यालयीन तसेच तंत्रनिकेतन व इतर
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या आणि जळगाव शहरात शिक्षण
घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.-भ.ज., विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या
मागास वर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील गरजू विद्यार्थिनींना प्रवेश घेता येणार
आहे.
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या अधिकृत
संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा आणि त्याची प्रत वसतिगृह कार्यालयात सादर करावी,
असे आवाहन गृहपालांनी केले आहे.
वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत मोफत निवास, भोजन,
निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य यांसह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी ₹४०००/- रोख रक्कम व दरमहा
₹६००/- निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.
त्यामुळे विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,
असे आवाहन गृहपाल, शासकीय वसतिगृह भुसावळ यांनी केले आहे.
00000000000
मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतिगृह बोदवड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू
जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बोदवड (जळगाव) येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
या वसतिगृहात इयत्ता ८ वी ते महाविद्यालयीन तसेच तंत्रनिकेतन व इतर
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या आणि जळगाव शहरात शिक्षण
घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.-भ.ज., विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या
मागास वर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील गरजू विद्यार्थिनींना प्रवेश घेता येणार
आहे.
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या अधिकृत
संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा आणि त्याची प्रत वसतिगृह कार्यालयात सादर करावी,
असे आवाहन गृहपालांनी केले आहे.
वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत मोफत निवास, भोजन,
निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य यांसह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी ₹४०००/- रोख रक्कम व दरमहा ₹५००/- निर्वाह
भत्ता देण्यात येणार आहे.
त्यामुळे विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,
असे आवाहन गृहपाल, शासकीय वसतिगृह बोदवड यांनी केले आहे.
0000000000
शाळा प्रवेश उत्सव: आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणास नवीन चालना
जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय अशोक उईके यांच्या ‘शिक्षणाद्वारे सक्षमीकरण’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना, आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत दिनांक १६ जून रोजी भव्य शाळा प्रवेश उत्सव आयोजित करण्यात आला. हा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नव्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.
५१ आश्रमशाळांमध्ये एकाच दिवशी उत्सवाचे आयोजन
यावल प्रकल्पाअंतर्गत एकूण १७ शासकीय व ३४ अनुदानित आश्रमशाळांमध्ये एकाच
दिवशी हा उत्सव साजरा करण्यात आला. एकूण २६,६४० विद्यार्थ्यांपैकी १४,६३६
विद्यार्थी (५४.९४%) शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित राहिले. यामध्ये शाळांतील
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग
घेतला.
उत्सवाच्या दिवशी चोपड्याचे आमदार
चंद्रकांत सोनवणे यांनी शासकीय आश्रमशाळा, विष्णपूर (ता. चोपडा) येथे भेट दिली.
तसेच रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी डोंगरकठोरा (ता. यावल) येथील आश्रमशाळेला भेट
देत पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत पालकांना
मुलांना सतत शाळेत उपस्थित ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रधानमंत्री
धरती अबा जनजाती उन्नतग्राम अभियानाचा शुभारंभ
याच दिवशी प्रधानमंत्री धरती आबा
जनजाती उन्नतग्राम अभियान योजनेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने
प्रत्येक शाळेत लोकप्रतिनिधी व पालकांच्या उपस्थितीत माहिती व प्रचार-प्रसाराचे
कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच 'मुलांच्या शिक्षणात पालकांची सहभागिता' या
विषयावर चर्चा सत्र घेण्यात आले. यामध्ये पालकांना विभागाच्या योजनांची माहिती
देण्यात आली.
विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे फुलांचा
हार, मिठाई, भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पाठ्यपुस्तक, गणवेश व
शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शाळेचा परिसर फुलांनी सजवून रंगीत पताका,
रांगोळ्या व स्वागत फलकांनी सजविण्यात आला होता. विविध ठिकाणी सांस्कृतिक
कार्यक्रम, पारंपरिक गाणी, स्वागत गीत यांचीही रंगतदार मेजवानी अनुभवायला मिळाली.
प्रशासकीय
यंत्रणेचा काटेकोर समन्वय
प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी या
कार्यक्रमाचे नेतृत्व करताना सांगितले की, "हा उत्सव केवळ एक औपचारिक उपक्रम
नसून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षणाची ग्वाही देणारा एक
महत्त्वपूर्ण टप्पा आहे." यावेळी विशेष उपस्थिती वाढवण्यासाठी पुढील काळात
व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची घोषणा करण्यात आली.
या शाळा प्रवेश उत्सवाच्या यशामध्ये प्रत्येक स्तरावरील कर्मचाऱ्यांचे
योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) यांनी संपूर्ण
कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडली, तर शिक्षण विस्तार
अधिकारी यांनी विविध शाळांमध्ये समन्वय साधून आवश्यक बाबींची पूर्तता केली.
मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांतील कार्यक्रमांचे नेतृत्व करत संपूर्ण आयोजनाची
जबाबदारी सक्षमपणे सांभाळली. याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत,
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व पालकांशी संवाद साधण्यामध्ये सक्रिय सहभाग
नोंदवला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छता, शैक्षणिक साहित्य वितरण व
व्यवस्थापनाची शिस्तबद्ध जबाबदारी अत्यंत कौशल्याने पार पाडली. या सर्वांच्या
एकत्रित प्रयत्नांमुळेच हा उत्सव प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला. शिक्षकेत्तर
कर्मचाऱ्यांनी स्वच्छता, साहित्य वाटप व शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे कार्य
उत्तमरीत्या पार पाडले.
आगामी
नियोजन
शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी विशेष
प्रवेश अभियान, नियमित पालक-शिक्षक संवाद, आणि शैक्षणिक साधनांची उपलब्धता
वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळा प्रवेश उत्सवाच्या माध्यमातून आदिवासी
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दिशेने एक सकारात्मक आणि
शक्तिशाली सुरुवात झाली आहे.
00000000000
जळगावमध्ये योग मास्टर ट्रेनिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४० क्रीडा शिक्षकांचा सहभाग ▪ 21 जूनला जागतिक योगा दिनाची तयारी सुरु
जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – आंतरराष्ट्रीय योग दिन (२१ जून) निमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आज योगा मास्टर ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील विविध भागांतील सुमारे ४० क्रीडा शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
या प्रशिक्षणामध्ये केंद्रीय
आयुष मंत्रालयाने प्रसारित केलेल्या योगा प्रोटोकॉलनुसार शाळांमध्ये योग सत्र कसे राबवावे,
याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष योगासनांचे प्रात्यक्षिक आणि सराव
सत्र घेण्यात आले.
या प्रशिक्षण सत्राचे मार्गदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयाच्या योग क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी यांनी केले. प्रशिक्षणादरम्यान उपस्थित
शिक्षकांनी योगाचे महत्त्व, त्याचे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम
आणि नियमित सरावाचे फायदे यावर चर्चा केली.
०००००००००००
Monday, 16 June 2025
राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये
मुंबई, दि 16 : 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते.
1
जून ते 16 जून दरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस
पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 1 टक्का कमी, मराठवाड्यात 26 टक्के
कमी, आणि विदर्भात 61 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 134 तालुक्यांमध्ये एकूण
पाऊस 65 मिलीमीटर हून अधिक पडला आहे आणि 84 तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून
अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली,
अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट
लक्षणीय आहे.
22 जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांमध्ये 22 तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही.
अद्यापि
ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील
कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू
नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
००००००००००
दिव्यांग सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार 2025 करिता अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, दि. १६ जून (जिमाका वृत्तसेवा): भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली यांच्यातर्फे वर्ष २०२५ करिता दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी १५ मे २०२५ ते १५ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून, www.awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
या पुरस्कारांकरिता अर्ज सादर करताना पोर्टलवर उपलब्ध असलेल्या
नमुन्यानुसार सर्व आवश्यक माहिती सादर करणे बंधनकारक आहे. अर्जामध्ये संबंधित
व्यक्ती किंवा संस्थेच्या उल्लेखनीय, प्रेरणादायी कार्याचा तपशील स्पष्टपणे नमूद
करावा. त्याचप्रमाणे, कामगिरीशी संबंधित सहाय्यक दस्तऐवजही ऑनलाईन स्वरूपात अपलोड
करणे आवश्यक आहे.
पात्रता निकष, कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती www.awards.gov.in किंवा
www.depwd.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. भौतिक स्वरूपात किंवा इतर
कोणत्याही माध्यमातून प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
या राष्ट्रीय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्तींनी,
संस्था, स्वयंसेवी संघटनांनी वेळेत अर्ज सादर करून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
0000000000
जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात...!! विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ व टाळ्याच्या गजरात स्वागत; खासदार, आमदार यांचा उत्स्फूर्त सहभाग ▪ जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यासह अधिकारी सहभागी
जळगाव दि. १६ जून (जिमाका वृत्तसेवा):- राज्य शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६’ उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील १८६० जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगर परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ आज उत्साहात झाला. सर्व शाळांमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ देऊन, टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. खा. स्मिता वाघ, आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवत वातावरण आनंदमय केले.
अमळनेर
तालुक्यातील जवखेडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खासदार स्मिता वाघ यांच्या
हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. गणवेश, शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण
यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे
यांच्या उपस्थितीत अडावद कन्या व अडावद मुले शाळांमध्ये तर पारोळा तालुक्यातील
कन्हेरे शाळेत आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत
करून गणवेश पाठयपुस्तकं देण्यात आली.
जिल्हाधिकारी
आयुष प्रसाद यांनी जामनेर तालुक्यातील भराडी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना
गणवेश व पाठ्यपुस्तके वितरित केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल
यांनी नांद्राबु. व पिलखेडे शाळांमध्ये गुलाबपुष्पांनी स्वागत करून पाठ्यपुस्तके
वाटप केले. पिलखेड येथे "ग्रंथ दिंडी" चे आयोजनही करण्यात आले.
भुसावळ येथे तहसीलदार नीता लबडे यांनी विद्यार्थ्यांशी
संवाद साधला.
निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे
यांनी शिरसोली प्र. बो. येथील शाळेला भेट दिली, नगर प्रशासनाचे सहायक आयुक्त
जनार्दन पवार वडगाव लांबे (चाळीसगाव) शाळेत, तर सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी
भुषण वर्मा पी.एम. श्री नानासाहेब विष्णु हरी पाटील विद्यामंदिरात सहभागी झाले.
चोपड्याचे मुख्याधिकारी राहुल पाटील व जामनेरचे विवेक धांडे, जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी कुर्बान तडवी (उर्दू शाळा, चोपडा ), उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा
पवार (जिराळी), जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील विदगाव (ता. जळगाव),नायब
तहसीलदार रविंद्र उगले (महिंदळे), मुख्याधिकारी रविंद्र लांडे (गिरड), निवासी नायब
तहसीलदार सुधीर सोनवणे (भडगाव शाळा क्र. २), जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक
(गारखेडे खु.) आणि तहसीलदार विजय बनसोड (पाचोरा) यांच्या सह जिल्ह्यातील
अधिकाऱ्यांनी विविध शाळांना उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत
केले,विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
या
शाळा भेटींमुळे ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण झाले असून, गुणवत्तापूर्ण
शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि शाळेविषयी आकर्षण निर्माण झाले
आहे.
००००००००
पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल "मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या!"– पालकमंत्री गुलाबराव पाटील ▪पुष्पवृष्टी, स्वागतगीत, पुस्तके-वह्यांचे व दप्तरांचे वाटप ▪इयत्ता पहिलीच्या वर्गाच्या उद्घटनाने पहिला दिवस स्मरणीय
जळगाव दि. १६ जून ( जिमाका वृत्तसेवा ) – "माझ्यासह माझी मुलेही याच शाळेत शिकलेली आहेत, हे सांगताना मला अभिमान वाटतो. शाळेचा पहिला दिवस फक्त वह्या-पुस्तकांचा नसतो, तर तो नव्या स्वप्नांचा शुभारंभ असतो. मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या. शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून ती संस्कारांची पाठशाळाही आहे. शिक्षक, पालक आणि अधिकारी यांनी समन्वयाने मुलांमध्ये विश्वास व स्वाभिमान रुजवायला हवा. मी बैलगाडीतून आलो कारण शिक्षणाच्या प्रवासाला मातीचा गंध असतो... आणि त्या गंधातच खरी समृद्धी असते," अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हा परिषद केंद्र शाळा, पाळधी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या भावस्पर्शी आणि प्रेरणादायी उपस्थितीने एक वेगळीच शैक्षणिक आठवण विद्यार्थ्यांच्या मनात कोरली.
इयत्ता
पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खुद्द पालकमंत्र्यांनी बैलगाडी
चालवत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत मिरवणूक काढली.
त्यांनी जुन्या शाळेतील आठवणींना स्नेहपूर्वक उजाळा दिला. पुष्पवृष्टीत आणि
ढोल-ताशांच्या गजरात त्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात हात घालून शाळेत प्रवेश
केला. शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन त्यांनी विद्यार्थ्यांच्या
उपस्थितीत केले, हे विशेष!
या शाळा
प्रवेशोत्सवाचे ठळक वैशिष्ट्ये
▪बैलगाडीतून आगमन – शिक्षणाच्या प्रवासाला ग्रामीण
मातीचा गंध देणारा अनोखा उपक्रम
▪पहिलीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश,
बूट, दप्तर, गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत
▪पालकमंत्री तब्बल दोन तास विद्यार्थ्यांमध्ये रमले
– जीवनदृष्टीचे बळ दिले
▪पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन – विद्यार्थ्यांच्या
उपस्थितीत नव्या पर्वाला सुरुवात
▪पालकमंत्र्यांतर्फे दीड लाख वह्यांच्या वितरणाचा –
औपचारिक शुभारंभ
गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी नवीन
शैक्षणिक धोरणावर आधारित होत असलेले बदल व त्या अनुषंगाने असलेली जबाबदारी यांची
जाणीव करून दिली आणि नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख
प्रमोद सोनवणे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, नवीन सीबीएसई अभ्यासक्रमावर
आधारित इयत्ता पहिलीचा वर्ग सुरू झालेला असून, ही शाळा एक मॉडेल शाळा आहे.
सूत्रसंचालन उपशिक्षक झाकीर सर आणि
उपशिक्षिका ज्योती राणे यांनी केले. आभार सरपंच विजय पाटील आणि मुख्याध्यापक एन.
के. देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने
झाली. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे औपचारिक
उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तीनही शाळांचे मुख्याध्यापक,
शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अथक परिश्रम घेतले.
मान्यवरांची
उपस्थिती
माजी सभापती मुकुंदजी नन्नवरे, सरपंच विजय
पाटील, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, प्रकल्प अधिकारी सुरेखा तायडे, उपसरपंच
वंदना साळुंखे, मच्छिंद्र कोळी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सचिन पवार, माजी सरपंच
आलिम देशमुख, माजी जि.प. सदस्य श्रीकृष्ण साळुंखे, निसार देशमुख, यासीन हाजी, जमील
बेग, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय महाजन, सुनील झंवर, केंद्रप्रमुख प्रमोद
सोनवणे, ग्राम विकास अधिकारी शरद धनगर, सुलतान पठाण, तसेच तीनही शाळांचे
मुख्याध्यापक – एन. के. देशमुख, अकिल सर, श्रीमती पटेल जहाआरा, मधु साळुंखे, अकबर
शेख, यांच्यासह शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक व विद्यार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
००००००००००