Tuesday, 31 August 2021

अमेरिकन लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी अनुदानावर मिळणार किटकनाशके

             जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : मका, ज्वारी या पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचा, तर कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनुदानावर किटकनाशके उपलब्ध आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

            सद्य:स्थितीस मका व ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा, तर कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. कपाशीवर अळी पडण्याचा कालावधी हा ठरलेला असतो. तो म्हणजे अमावस्या. सजीव सृष्टीचा मीलन आणि फलन काळ हा आमवस्या असतो. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला एक- दोन दिवस मागे- पुढे म्हणजे महिन्याच्या ज्या चार ते पाच काळ्याकुट्ट रात्री असतात त्या रात्री अळीचे पतंग अंडी घालतात. या पार्श्वभूमीवर अमावस्येच्या दोन दिवस आधी फक्त सिलिकॉन स्टिकर आणि नीम तेल किंवा निंबोळी युक्त अर्काची फवारणी करावी. त्यानंतर चार ते पाच दिवसांनी अंडीनाशक व अळी नाशकांची फवारणी करावी किंवा अळी अति सूक्ष्म अवस्थेत पण कैरीच्या आत जाण्याच्या अगोदरच अळी नाशक फवारा मारुन तिचा बंदोबस्त करावा.

            या पिकांवरील किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप), सन 2021- 22 अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळा मार्फत आपत्कालीन परिस्थितीत कापूस, मका व ज्वारी या पिकांवरील विविध किडींसाठी क्लोरोपायरिफॉस 20% ईसी (रुपये52.50/- प्रति 250 मिली), ॲझाडिरेक्टीन 3000 पीपीएम (रुपये 182/- प्रति 500 मिली) या किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येत आहे. ही किटकनाशके महाराष्ट कृषी उद्योग विकास महामंडळाच्या अधिकृत वितरकांतर्फे करण्यात येणार आहे. या किटकनाशकांचा पुरवठा 50 टक्के अनुदानावर करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषर अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

            उपरोक्त किटकनाशके अनुदानावर प्राप्त करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित पिकांसाठी स्वयंघोषणापत्र सादर करुन तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परमीट प्राप्त करुन घ्यावयाचे आहे. त्यानंतर हा परवाना महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या अधिकृत वितरकाकडे देवून 50 टक्के अनुदानावर किटकनाशकांची उचल करावयाची आहे.

            वितरकांची नावे अशी (अनुक्रमे वितरकाचे नाव व कीटकनाशकांची उपलब्धता लिटरमध्ये) : लक्ष्मी ॲग्रो एजन्सीज, जळगाव – 100. जंगले अँड सन्स,  भुसावळ, 50,  खंडेलवाल के. एस. के., बोदवड -60. खानदेश ट्रेडर्स, यावल – 60. महेश कृषी केंद्र, रावेर, 50. सागर सीडस, मुक्ताईनगर, 60. किरण ॲग्रो एजन्सी, अमळनेर, 140. माऊली ट्रेडर्स, चोपडा, 100. शहा कृषी केंद्र, एरंडोल, 75. व्यंकटेश ॲग्रो एजन्सी, धरणगाव, 85, संदेश कृषी केंद्र, पारोळा, 135. विष्णू कृषी केंद्र, चाळीसगाव, 170-100. शेतकरी सहकारी संघ, जामनेर, 225-100, आदर्श के. एस. के., पाचोरा, 120, 60. भडगाव फ्रुट सेल सोसायटी, 70 उपलब्ध आहेत.

00000

कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर बेरोजगारांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या संकेतस्थळावर बेरोजगारांनी नाव नोंदणी करावी. तसेच विभागातर्फे होणाऱ्या ऑनलाइन रोजगार मेळाव्यांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

            जिल्ह्यातील उमेदवारांची नाव नोंदणी 2013 पासून विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर सुरू झाली आहे. उमेदवार विभागाच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाइन नाव नोंदणी करू शकतात.

            उमेदवारांनी ऑनलाइन नाव नोंदणी केल्यानंतर मिळालेल्या यूजर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता यावा म्हणून अल्पसंख्यांक उमेदवारानी देखील रोजगार / स्वयंरोजगांराच्या संधी व सुविधांचा लाभ मिळण्यासाठी जास्तीत जास्त अल्पसंख्यांक उमेदवारानी ऑनलाइन नाव नोंदणी करणे अपेक्षित आहे.

            कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांना देखील नाव नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन व साहाय्य कार्यालयाकडून करण्यात येते. या कार्यालयामार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच अल्पसंख्याक उमेदवारांसाठी देखील आयोजित होणाऱ्या मेळाव्याचा लाभ घ्यावा.

            याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15) यावेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 यावर संपर्क साधावा.

00000

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सहा सप्टेंबरला होणार ऑनलाइन

             जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार 6 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही दिन ऑनलाइन होणार आहे.  नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भावआहे. त्याचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीयस्तरावर लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

            त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन 6 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) होणार आहे. ज्या नागरिकांच्या काही तक्रारी असतील त्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात उपस्थित राहून तक्रारी मांडाव्यात, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                               00000

चाळीसगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पूर परिस्थितीच्या पाहणीनंतर महसूल यंत्रणेला निर्देश

 







            जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : चाळीसगाव शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला. यामध्ये शेती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रारंभीच्या माहितीनुसार वाकडी येथील 60 वर्षीय महिला पुरात वाहून गेली आहे. याबरोबरच शेकडो जनावरे वाहून गेली असून अनेक जनावरे जागेवरच मृत्यूमुखी पडले आहेत. या नुकसानीचे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. तसेच धुळे- औरंगाबाद महामार्गावरील औट्रम (कन्नडचा) घाटातील अडथळे दूर करीत महामार्ग वाहतुकीसाठी तातडीने मोकळा करावा, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज दिले.

            सोमवारी रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यात ढगफुटी सदृश परिस्थिती होवून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे परिसरातील तितूर, डोंगरी या नद्यांना पूर आला. या पुराचे पाणी नदी काठावरील गावांमध्ये व  घरांमध्ये शिरले. त्यामुळे या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज दुपारी चाळीसगाव शहरासह वाकडी या गावाला भेट देवून पाहणी केली. यावेळी येत्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याची माहिती देऊन नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांचेसोबत खासदार उन्मेष पाटील, माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन,  मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्र्यांनी घेतली नुकसानीची माहिती

            पालकमंत्री वाकडी येथे नुकसानीची पाहणी करीत असतानाच चाळीसगाव

तालुक्यातील अतिवृष्टीची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेशी दूरध्वनीवर संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश देऊन शासन नुकसानग्रस्तांच्या पाठिशी असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजीमंत्री गिरीश महाजन यांचेशीही संवाद साधला.

 

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत

            पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, सोमवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटीसारख्या परिस्थितीमुळे तितूर व डोंगरी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तितूर नदीच्या तीनही पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वीज पुरवठा खंडित झाला आहे. तो सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मदत कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे. या तुकडीच्या माध्यमातून औट्रम घाटात मदतकार्य सुरू आहे. चाळीसगाव शहरासह वाकडी, वाघडू, हिंगोणे, खेर्डे, मुंदखेडे, रोकडे, बोरखेडा खुर्द, पातोंडा, ओझर, टाकळी आदी गावांतील नदी काठावरील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच या गावांमधील पशुधनही मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे. याबाबत मुख्यमंत्री महोदयांना अवगत करण्यात आले आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत या विषयी माहिती सादर करण्यात येईल. तसेच नुकसानीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

 

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतर्कता बाळगावी

            पूर परिस्थितीनंतर साथीचे आजार पसरू नयेत याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावयाची आहे. त्यासाठी जल शुध्दीकरण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. पूरग्रस्त भागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके तैनात करून नागरिकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असेही निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले.

 

खासदार, आमदारांसह वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

            तत्पूर्वी चाळीसगाव शहरातील अतिवृष्टीची आज सकाळी खासदार उन्मेष पाटील, आमदार गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी श्री. राऊत, पोलिस अधीक्षक श्री. मुंडे यांनी पाहणी केली. त्यांनी औट्रम घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणी भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे अनेक वाहने अडकली आहेत. त्यातच पाऊस सुरू आहे. या घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत. असे असले, तरी औट्रम घाटातील राडारोडा तातडीने दूर करीत घाट मार्ग वाहतुकीसाठी तातडीने खुला करण्यात येईल, असे महामार्ग विभागाने सांगितले.

 

नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

            हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्याने नागरिक सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

00000

Monday, 30 August 2021

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर उंचावण्यासाठी 16 कलमी कार्यक्रम राबविण्यास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी

 


            जळगाव, (जिमाका) दि. 30 - जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा व विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर उंचावण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने तयार केलेल्या 16 कलमी कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत राबविण्यास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. 

            जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील जिल्हा नियोजन भवनात संपन्न झाली. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, खासदार रक्षाताई खडसे, माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदि उपस्थित होते.

            यावेळी बोलतांना पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याच्या विकासात्मक कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. मात्र जिल्हा परिषदेकडील निधी अखर्चित राहतो. त्यामुळे विकास कामे उशीरा होतात. यापुढे प्रशासकीय बाबी वेळेत न करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. जळगाव शहरातील 20 किमोमीटर लांबीच्या रस्त्यांबाबत महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. जिल्ह्यात यापूर्वी राबविलेल्या पालकमंत्री सुरक्षा कवच योजनेच्या धर्तीवर जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर उंचावण्यासाठी 16 कलमी कार्यक्रम राबविण्यात येईल. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. महावितरणमार्फत वीजबीलाच्या थकबाकीपोटी शेतकऱ्यांचे वीज कनेक्श्यन खंडित करण्यात येत असल्याची बाब लोकप्रतिनिधींना निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबतचा प्रश्न आगामी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल. तसेच स्ट्रीट लाईट व नळपाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन खंडित करु नये यासाठी शासनास विनंती करणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची 5 वर्षापर्यंत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असल्याने जे रस्ते खराब झाले आहे ते त्वरीत दुरुस्त करुन घेण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम बॅकेकडे जमा करुनही ज्या बँकांनी विमा कंपनीकडे रक्कम जमा केली नाही. त्या बँकावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी बैठकीत दिल्यात.

            जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणारा वीजेचा प्रश्न मार्गी लागावा याकरीता प्रथमच जिल्हा वार्षिक योजनेतून 435 ट्रान्सफार्मरसाठी निधी उपलब्ध करुन दिला असून या आर्थिक वर्षातही 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी बैठकीत दिली. जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे सांगतानाच प्रशासकीय यंत्रणांनी विकासात्मक कामे करतांना लोकप्रतिनिधीशी समन्वय ठेवून कामे वेळेवर व चांगल्या दर्जाची होतील याची दक्षता घेण्याचे निर्देशही दिलेत. 

            बैठकीच्या प्रास्तविकात नियोजन समितीचे सदसय सचिव तथा जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले की, केलेल्या नियोजनानुसार सर्व विभागांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे सूचना केली. 

            जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 या वर्षासाठी मंजूर नियतव्यय 536 कोटी 5 लाख 51 हजार रुपयांचा असून आतापर्यंत 217 कोटी 50 लाख रुपये बीडीएसवर प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी यांचेकडून आतापर्यंत 42 कोटी 64 लाख 8 हजार रुपयांचा निधी विविध यंत्रणांना वितरीत केला असून आतापर्यंत 36 कोटी 92 लाख 45 हजार रुपये खर्च झाल्याची माहिती बैठकीच्या सुत्रसंचलनात जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनीदिली.

            या बैठकीत समितीच्या 29 जानेवारी 2021 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास व अनुपालन अहवालास मान्यता देण्यात आली.  तसेच जिल्हा वार्षिक योजना 2020-21 मध्ये माहे मार्च-21 अखेर झालेल्या (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) खर्चास मंजुरी देण्यात आली. शिवाय जिल्हा वार्षिक योजना 2021-22 मध्ये माहे जुलै-21 अखेर (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहय क्षेत्र) झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. तर नियोजन विभाग, शासन निर्णय दि. 28 एप्रिल, 2020 नुसार सन 2020-21 मध्ये मंजुर नियतव्यय रु. 375 कोटीच्या 25 टक्केच्या मर्यादेत कोविड-19 उपाययोजनांसाठी खर्च करण्यात आलेल्या 44 कोटी 9 लाख 16 हजार रुपयांच्या निधीस कार्योत्तर मंजुरी व नियोजन विभाग, शासन निर्णय, दिनांक 19 एप्रिल 2021 नुसार सन 2021-22 साठी एकूण मंजुर नियतव्यय रुपये 400 कोटीच्या 30 टक्के रक्कम रुपये 120 कोटी निधी कोविड-19 उपययोजनांसाठी खर्च करण्याच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

            या बैठकीत उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या विविध विकासात्मक सुचना तसेच सुचविलेल्या कामांवरही चर्चा करुन त्यांचा आढावाही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला.

            या बैठकीस आमदार सर्वश्री. संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, शिरीष चौधरी, चिमणराव पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, मंगेश चव्हाण, श्रीमती लताताई सोनवणे यांचेसह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हा नियोजन समितीवर नव्याने नियुक्त झालेले विशेष निमंत्रित सदस्य व नामनिर्देशित सदस्यांसह जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

00000

Sunday, 29 August 2021

जळगाव जिल्ह्यात 14 गावांनी पूर्ण केली 100 टक्के ई पीक पाहणी ई पीक पाहणीत जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांची माहिती

जळगाव (जिमाका) दि. 29 - माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार, माझा पीकपेरा या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःचा पेरा स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलमधून भरता यावा, याकरीता राज्य शासनाने 15 ऑगस्ट, 2021 पासून ई पीक पाहणी प्रकल्प सुरू केला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांनी यासाठी आवश्यक ते नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील तहसिलदार यांच्या अथक प्रयत्नामुळे सहा तालुक्यातील 14 गावामध्ये 100 टक्के ई पीक पाहणीचे काम पूर्ण झाले असून या 14 गावांचे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
जळगांव जिल्हयात 15 ऑगस्टपासून खातेदाराने प्रत्यक्ष ई पीक पाहणी करण्यास सुरवात झाली असून तलाठी यांचे सक्रीय सहभागामुळे सुरवातीपासूनच जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. २८ ऑगस्टअखेर सर्व गावांमध्ये ई पीक पाहणी ॲप पोहचले असून आतापर्यंत जिल्ह्यातील 72 हजार 867 शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. तर 42 हजार 289 शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पीक पाहणी भरली आहे. या कामगिरीमुळे जळगांव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) शुभांगी भारदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शिंगायत, रामपूर येथील तलाठी -अजय गवते, टाकळी खु.- दिपाली महाजन, गंगापुरी- मीनाक्षी पडागळे, हिंगणे बु. - फिरोज खान, चोपडा तालुक्यातील मालापुर, सलीम तडवी, मोरचिडा- अमीन अरमान तडवी, मुळ्यवतार- अजय लोका पावरा, एरंडोल तालुक्यांतील हनुमंतखेडे, यावल तालुक्यातील चिंचोली- निखिल मिसाळ, वाघोदे- पी एन नेहते, वाघझिरा -टी सी बारेला, चाळीसगांव तालुक्यातील कोंगानगर- वैशाली केकान, विसापूर- वृषाली सोनवणे, धरणगाव तालुक्यातील निशाणे खु. बसवेश्वर मजगे यांनी विशेष परिश्रम करुन गावात 100% ई पीक पाहणी पूर्ण केली आहे. याबद्दल जिल्हाधिकारी यांनी या गावांचे व महसूल यंत्रणेचे कौतुक केले असून ई पिक पाहणी यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील इतर गावे देखील यापासून प्रेरणा घेऊन सहभाग नोंदवतील व ई पीक पेरा स्वतः भरतील. असा आशावादही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केल्याचे उपजिल्हाकारी (महसुल प्रशासन) श्रीमती भारदे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहेत.
00000

Friday, 27 August 2021

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 27 - साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60% किंवा त्यापेक्षा जास्त टक्के गुण प्राप्त झाले असतील. अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुणक्रमाकांनुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी 15 सप्टेंबर, 2021 च्या आत संपूर्ण कागदपत्रांसह मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी जिल्हा कार्यालयात संर्पक करावा, उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. असे ताराचंद कसबे, जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे

            अर्जासोबत मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेटसह जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रांसह कार्यालयात संपर्क साधावा. अधिक माहिती 0257-2263294 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असेही जिल्हा व्यवस्थापक श्री. कसबे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्यास 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

             जळगाव, (जिमाका) दि. 27 - राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2021-22 साठी दिनांक 2 जुलै, 2021 अन्वये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 1 ऑगस्ट, 2021 पर्यंत देण्यात आलेली होती.

            तथापि, राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची मुदत आता 31 ऑगस्ट, 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

             जळगाव, (जिमाका) दि. 27 - जिल्हा नियेाजन समितीची बैठक राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 30 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

            या बैठकीत समितीच्या 29 जानेवारी 2021 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मान्य करणे, जिल्हा वार्षिक योजना 2020-21 मध्ये माहे मार्च-21 अखेर झालेल्या खर्चास मंजुरी देणे (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र), जिल्हा वार्षिक योजना 2021-22 मध्ये माहे जुलै-21 अखेर खर्चाचा आढावा घेणे, (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहय क्षेत्र), नियोजन विभाग, शासन निर्णय दि. 28 एप्रिल, 2020 नुसार सन 2020-21 मध्ये मंजुर नियतव्यय रु. 375 कोटीच्या 25 टक्केच्या मर्यादेत कोविड-19 उपाययोजनांसाठी खर्च करण्यात आलेल्या 44 कोटी 9 लाख 16 हजार रुपयांच्या निधीस कार्योत्तर मंजुरी देणे, नियोजन विभाग, शासन निर्णय, दिनांक 19 एप्रिल 2021 नुसार सन 2021-22 साठी एकूण मंजुर नियतव्यय रुपये 400 कोटीच्या 30 टक्के रक्कम रुपये 120 कोटी निधी कोविड-19 उपययोजनांसाठी खर्च करण्याच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याचेही जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवारी जिल्हा दौऱ्यावर

             जळगाव, (जिमाका) दि. 27 - राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.        

            शनिवार, दि. 28 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता पाळधी येथे राखीव, सकाळी 10.15 वाजता पाळधी येथून धरणगावकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता स्वामी समर्थ नगर व गणाप्पा नगर येथील रस्त्याच्या भूमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता पिंपळे, ता. धरणगावकडे प्रयाण, सकाळी 11.45 वाजता पिंपळे, ता. धरणगाव येथे वृक्षरोपण कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव, दुपारी 4.30 वाजता जळगाव तालुक्यातील विविध कार्यक्रमास उपस्थिती, रात्री 11.40 वाजता रेल्वे क्र. 02112 अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

                                                                           00000

जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयातून विकासात्मक कामांचे नियोजन करावे -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 
            जळगाव, (जिमाका) दि. 27 - जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त होणाऱ्या निधीच्या खर्चाचे नियोजन करतांना प्रशासकीय यंत्रणानी एकमेकांमध्ये समन्वय राखून विकासात्मक कामांचे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिले.

            जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग, यावल वन विभागाचे उप वनसंरक्षक श्री. पद्मनाभा, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्हा नियोजनच्या निधीतून मागील वर्षी केलेल्या कामांचे फोटो जीपीएस प्रणालीवर अपलोड करावेत. चालू वर्षी कामांचे नियोजन करतांना त्या कामाची आवश्यकता, उपयोगिता व जनहित लक्षात घेऊनच प्रस्ताव सादर करावेत. विकास कामे सुचवितांना बहुउपयोगी कामांवर भर देण्यात यावा. कामे सुचविताना दोन यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक आहे. सुचविलेली कामे चांगल्या दर्जाची व गुणवत्तेची असावी. कामे विहित वेळेत पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची राहणार असल्याने त्यानुसार कामांचे नियोजन करावे. ज्या विभागांना कामांसाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यांनी तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन वर्क ऑर्डर द्यावी तसेच निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावेत. त्याचप्रमाणे यंत्रणांनी आयपास प्रणालीचा वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेला मागील आर्थिक वर्षात देण्यात आलेला निधी यावर्षी पूर्ण खर्च होणे आवश्यक आहे. मागील वर्षीच्या स्पीलमधून करावयाची कामे तातडीने पूर्ण होतील याकडे संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांनी लक्ष देण्याचेही त्यांनी सूचित केले. 

            यावेळी मागील बैठकीच्या इतिवृत्तातील अनुपालनावर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 मध्ये मार्चअखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. तर सन 2021-22 मधील सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र योजनांचा ऑगस्टपर्यंच्या खर्चाचाही आढावा घेण्यात आला.

            जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 या वर्षासाठी मंजूर नियतव्यय 536 कोटी 5 लाख 51 हजार रुपयांचा असून आतापर्यंत 217 कोटी 50 लाख रुपये बीडीएसवर प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी यांचेकडून आतापर्यंत 41 कोटी 41 लाख 11 हजार रुपयांचा निधी विविध यंत्रणांना वितरीत केला असून आतापर्यंत 36 कोटी 92 लाख 45 हजार रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी बैठकीत दिली.

            या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, डिगंबर लोखंडे, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे, जिल्हा नियोजन कार्यालयाचे डी. एस. पाटील, श्री. सुर्यवंशी यांचेसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

00000

Thursday, 26 August 2021

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 27 - प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत शेतकरी उत्पादक संघ/शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था/स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक किंवा विशेष उद्देश वाहन (S.P.V) यांना ब्रँडींग व मार्केटींग या घटकातंर्गत कच्चामालाची खरेदी ते विक्रीपर्यंत टप्याटप्पयाने हाती घ्यावयाच्या उपक्रमाचा तपशील, महत्वाचा नियंत्रणाच्या बाबी, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादनाच्या जाहिरात व प्रचार संबंधित राबवयाचे उपक्रम, सहभागी होणाऱ्या उत्पादकांची संख्या व आर्थिक उलाढाल वाढविण्याचा तपशील असणे अपेक्षीत आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी सदर घटकाच्या खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय राहील त्यात अंदाजे रक्कम 50 लाख रुपयांपर्यंतचा प्रस्ताव अपेक्षीत आहे.

            या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील उदयोजक, स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, सहकारी उत्पादक, सहकारी संघ यांसाठी अन्न प्रक्रीया उदयोगांना चालना देणे, प्रशिक्षण देणे याबाबींसाठी उभारणी करावयाची आहे. इन्क्युबेशन सेंटर हे स्टार्टअप्स आणि लहान अन्न प्रक्रीया युनिटसाठी नाममात्र भाडे तत्वावर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. इन्क्युबेशन केंद्रामध्ये निर्जलीकरण/पिकवण गृह/बेकरी/ फळ प्रक्रिया युनिट इत्यादी घटकांचा इन्क्युबेशन केंद्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. अन्न प्रक्रीया उद्योगांच्या मानक निकषानुसार पुर्ण प्रक्रीया सुविधा आणि कमीत कमी 7 हजार चौ. फुट जागा असणे आवश्यक असून जळगाव जिल्ह्यासाठी भौतिक लक्षांक एक चा प्राप्त आहे.

            या योजनेतंर्गत सामाईक पायाभुत सुविधा या घटकातंर्गत शेतकरी उत्पादन कंपनी/शेतकरी उत्पादन संघ/सहकारी उद्योजक संघ/सहकारी उत्पादक संस्था/शासन यंत्रणा/खाजगी उद्योग यासाठी इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी सामाईक पायाभूत सुविधा जसे- शेती उत्पादनाचे वर्गीकरण, ग्रेडींग, कोठार आणि कोल्डस्टोरज, केळी पिकाच्या प्रक्रियेसाठी सामान्य प्रक्रिया सुविधा इत्यादीसाठी या घटकातंर्गत प्रस्ताव सादर करावयाचे आहे. या घटकाच्या कर्जाशी निगडीत 35 टक्के अनुदान देय राहील. अधिक माहितीसाठी प्रशांत पाटील-९४०४०४८९१२, अजय पाटील-८२७५०५४३९३, सागर धनाड-९४२२२८२९८२, सचिन धुमाळ-९४०४४००५५५, गोसावी- ९८८१८०८६९८, बोरसे-९९६००५०१०१, स्वाती राठोड-७७१८८१२७१८, नवनाथ पवार-८८५५८११०६११ यांचेशी संपर्क साधवा. असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        00000

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास 10 सप्टेंबरपर्यंत मुदत

             जळगाव, (जिमाका) दि. 27 - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत सन 2021-22 मध्ये अन्नधान्य पिके व गळीतधान्यातंर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीव्दारे अर्ज मागविण्यात येत आहेत. पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क करुन 10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 10 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुदत देण्यात येत असून विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी कळविले आहे.

            राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत हरभरा बियाणासाठी 10 वर्षाआतील वाणास 25 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 12 रुपये प्रती किलो, संकरीत मका 95 रुपये प्रती किलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास 30 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 15 रुपये प्रती किलो याप्रमाणे एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

            पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्म मूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार 2 ते 4 हजार रुपये प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.  शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होणार असल्याचेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

जिल्ह्यात 50030 कोविशिल्ड तर 2840 कोव्हॅक्सीन लसीची मात्रा उपलब्ध

 

            जळगाव (जिमाका) दि. 26 - कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असून राज्य शासनातर्फे नागरीकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाला आज नव्याने 50 हजार 30 कोविशिल्ड तर 2 हजार 840 कोव्हॅक्सीन लसीची मात्रा उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

            गेल्या सप्ताहात जिल्ह्याला कोविड प्रतिबंधात्मक लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला होता. त्यानुसार शनिवारी एकाच दिवसांत 49 हजाराहून अधिक नागरिकांना लसीकरण लाभ देण्यात आला होता. त्यानंतर आज गुरूवार, 26 ऑगस्ट रोजी जिल्हा आरोग्य प्रशासनाला नव्याने 50 हजार 30 कोविशिल्ड तर 2840 कोव्हॅक्सीन लसीची मात्रा उपलब्ध झाली आहे.

            जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यत सुमारे 12 लाख 12 हजार 854 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. प्राप्त लसीनुसार जिल्ह्यातील 118 लसीकरण केंद्राना प्रत्येकी 300 ते 800 या दरम्यान लसीचे वितरण करण्यात आले आहे. तर सर्वात जास्त वितरण शाहू महाराज हॉस्पिटल, जळगाव येथे 2 हजार, जिल्हा सामान्य रूग्णालय (रेडक्रॉस सोसायटी) 1500, जळगाव तालुक्यात म्हसावद व नशिराबाद येथे प्रत्येकी 1 हजार, भुसावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वराडसीम येथे प्रत्येकी 1000, कठोरा येथे 1100 तर पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे 1 हजार याप्रमाणे लसीचा साठा उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही डॉ. जमादार यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000