Wednesday, 30 September 2020

अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाठी भरडधान्याचे वाटप

            जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) - जिल्ह्यातील पणन हंगाम 2019-20 (रब्बी) अंतर्गत खरेदी केलेले भरडधान्य (ज्वारी व मका) सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत वाटप करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. सदरचे भरडधान्य गव्हाचे परिमाण कमी करुन त्याच प्रमाणात भरडधान्य (ज्वारी व मका) वाटप करण्याच्या सुचना आहेत.

          त्यानुसार माहे ऑक्टोबर 2020 च्या नियतनात भरडधान्य (ज्वारी व मका) अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांना वितरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांसाठी  गहू 10 कि.ग्रॅ.  दोन रुपये  प्रती किलोप्रमाणे, ज्वारी 5 कि.ग्रॅ. एक रुपये प्रती किलोप्रमाणे व मका 10 कि.ग्रॅ. एक रुपये प्रती किलो प्रमाणे व तांदुळ 10 कि.ग्रॅ. तीन रुपये प्रती किलोप्रमाणे या दराने प्रति कार्ड ऑक्टोबर 2020 करिता रेशन दुकानातुन लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे याचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

सामुदायिक शौचालय अभियानातंर्गत जळगाव जिल्ह्याला देशपातळीवरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहिर 2 ऑक्टोबर रोजी व्हर्चुअल कार्यक्रमात होणार पुरस्काराचे वितरण

           जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) - केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्यावतीने सामुदायिक शैचालय अभियानात (SSA) उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याला देशपातळीवरील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे. दिनांक 2 ऑक्टोबर, 2020 (स्वच्छ भारत दिवस) रोजी स्वच्छ सुंदर शौचालय अभियान (SSSS) आणि सामुदायिक शैचालय अभियानात (SSA) उत्कृष्ट  काम केलेल्या ग्रामपंचायत, जिल्हा आणि राज्य यांना व्हर्चुअल कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. असे राज्य समन्वयक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना पत्रान्वये कळविले आहे.          

            जळगाव जिल्हा परिषदेने सामुदायिक शौचालय अभियानात (SSA) उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याला प्रथमच देशपातळीवरील पुरस्कार जाहिर झाला आहे. याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचे विशेष अभिनंदन केले आहे. 2 ऑक्टोबर, 2020 (स्वच्छ भारत दिवस) रोजी राष्ट्रीय सुचना व विज्ञान केंद्र (NIC) जळगाव येथील सभागृहात होणाऱ्या व्हर्चुअल कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी हा पुरस्कार स्वीकारणार आहे.

           केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्यावतीने स्वच्छ, सुंदर शौचालय अभियान (SSSS) आणि सामुदायिक शैचालय अभियानात (SSA) उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राला तीन पुरस्कार जाहिर झाले आहे. यामध्ये कन्हाळगाव, जि. भंडारा या ग्रामपंचायतीस स्वच्छ  सुंदर  शौचालय अभियान (SSSS) मधील व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे. तर बोरी खुर्द, जि. यवतमाळ या ग्रामपंचायतीस सामुदायिक शौचालय अभियानतंर्गत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दलही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे व पुरस्कार प्राप्त गावांतील ग्रामस्थांचेही अभिनंदन करुन कौतूक केले आहे.

00000

प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना भरडधान्याचे वाटप

           जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) - जिल्ह्यातील पणन हंगाम 2019-20 (रब्बी) अंतर्गत खरेदी केलेले भरडधान्य (मका) सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत वाटप करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. सदरचे भरडधान्य गव्हाचे परिमाण कमी करुन त्याच प्रमाणात भरडधान्य (मका) वाटप करण्याच्या सुचना आहेत.

             त्यानुसार  माहे ऑक्टोबर 2020 च्या नियतनात भरडधान्य (मका) प्राधान्य कुटूंब योजना लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राधान्य कुटूंब योजना प्रति लाभार्थी कार्डधारकांना गहू 1 कि.ग्रॅ.  दोन रुपये प्रती किलोप्रमाणे, मका 2 कि.ग्रॅ. एक रुपया प्रती किलोप्रमाणे व तांदुळ 2 कि.ग्रॅ. तीन रुपये  प्रती किलोप्रमाणे ऑक्टोबर 2020 करीता रेशन दुकानातुन लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000

गावातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत स्तरावर होणार ग्राम कृषि विकास समितीची स्थापना

             जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) -  शेती व्यवसाय हा ग्रामीण भागातील अत्यंत महत्वाचा व्यवसाय आहे. ग्रामीण भागातील सर्वच अर्थव्यवस्था ही शेती व्यवसयाशी निगडीत आहे. हवामानातील बदल, लहरी पर्जन्यमान, किड व रोग, सुधारीत जातीचे बियाणे उपलब्ध न होणे. शेती मालाच्या दरामध्ये अचानक घसरण इत्यादी कारणांमुळे शेतीमधुन शाश्वत उत्पन्न मिळेल याची खात्री देता येत नाही. यावर स्थानिक स्तरावर विचार विनिमय  करुन मार्गदर्शन होणेसाठी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत स्तरावर लोकप्रतिनिधी, कर्मचारी व कृषि तज्ञ यांचा सहभाग असलेली ग्राम कृषि विकास समितीची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय 9 सप्टेंबर, 2020 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

            ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वागीण विकासासाठी  गावामधील नैसर्गिक साधन संपतींचा महत्तम  वापर करणे, विविध योजना व प्रकल्प यामधुन हाती घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 49 (4) नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषि विकास समिती स्थापन करण्यास या शासन निर्णयाव्दारे मान्यता दिली आहे. या समितीमध्ये गावातील कृषि व संलग्न क्षेत्राशी संबधित असलेल्या किमान 12 व्यक्तीचा समावेश असणार आहे.  या समितीमध्ये सरपंच हे पदसिध्द अध्यक्ष व उपसरपंच हे पदसिध्द सदस्य राहतील, तसेच कृषि सहाय्यक हे सह सचिव तर ग्राम सेवक/ग्राम विकास अधिकारी हे सदस्य सचिव राहतील.

            या समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, प्रगतीशील शेतकरी (तीन पैकी किमान एक महिला सदस्य) विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी/ शेतकरी गट यांचे प्रतिनिधी, महिला बचतगट प्रतिनिधी, कृषि पुरक व्यवसायिक शेतकरी, तलाठी यांचा समावशे राहील. या समितीची मुदत ही ग्रामपंचायतीच्या मुदती इतकीच राहील. ग्रामसेवक हे कृषि सहाय्यकांच्या समन्वयाने समितीच्या बैठकीचे आयोजन करतील, या समितीची सभा ही प्रत्येक महिन्यातुन किमान एकदा घेण्यात येईल. शासनाच्या कृषि विषयक  सर्व योजना ( कृषि यांत्रिकीकरण उप अभियान, राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान, जमिन आरोग्य पत्रिका अभियान, सुक्ष्म सिंचन योजना) ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रसार व प्रचार करण्यात येईल. तसेच योजनांचा नियमितपणे आढावा घेवुन योजना शेतक-यांपर्यत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे कार्यवाही करतील. पिक उत्पादन आराखडा निश्चित झाल्यानंतर लागणा-या निविष्ठा जसे बियाणे, खते, पिक संरक्षण औषधे यांचे उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात येईल. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानामुळे जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटण्यास होतेय मदत गेल्या दहा दिवसात उपचार घेत असलेल्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 3 हजारने घटली जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 83 टक्क्यांवर जिल्ह्यात 40 हजार बाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले कोरोना संशयितांच्या दोन लाखांपेक्षा अधिक चाचण्या पूर्ण

            जळगाव, (जिमाका) दि. 30 - जिल्ह्यात आज (29 सप्टेंबर) रोजी 878 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 39 हजार 631 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.72 टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या 7 हजार 101 ॲक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून पैकी 2 हजार 405 रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आतापर्यंत 2 लाख 2 हजार 546 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याने गेल्या बारा दिवसांपासून सलगपणे बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 3 हजारने कमी झाली आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

            जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपापयोजना राबविण्यात येत आहे. पालकमंत्र्यांच्या आवाहनाला लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी उत्सफुर्तेपणे प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. शिवाय जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून लक्षणे जाणवताच नागरीकांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने या मोहिमेद्वारे करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे 93 हजार 511 तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे 1 लाख 9 हजार 35 अशा एकूण 2 लाख 2 हजार 546 तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 1 लाख 52 हजार 655 चाचण्या निगेटिव्ह तर 47 हजार 907 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून इतर अहवालांची संख्या 1 हजार 114 असून 870 अहवाल प्रलंबित आहेत.

            जिल्ह्यात सध्या 7 हजार 101 बाधित रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 3 हजार 513 रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 651, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 532 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 2 हजार 405 रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. शिवाय विलगीकरण कक्षातही 328 रुग्ण आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले 5 हजार 918 रुग्ण असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 183 इतकी आहे. यापैकी 631 रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून 208 रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल आहे.

           जिल्ह्यात आज एका दिवसात 261 पॉझिव्टिह रुग्ण आढळल्याने आतापर्यतच्या बाधित रुग्णांची संख्या 47 हजार 907 इतकी झाली आहे. यापैकी 39 हजार 631 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात  एका दिवसात 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत 1 हजार 175 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा 2.45 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सीसीसी व इतर रुग्णालयांमध्ये 12 हजार 854 इतके बेड आहेत. यात 322 आयसीयू बेड तर 2 हजार 19 ऑक्सिजनयुक्त बेडचा समावेश आहे.

 जिल्ह्यात तालुकानिहाय आतापर्यंत आढळून आलेले बाधित रुग्ण           

            जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47 हजार 907 इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर 10835, जळगाव ग्रामीण 2373, भुसावळ 3281, अमळनेर 4118, चोपडा 4025, पाचोरा 1813, भडगाव 1786, धरणगाव 2103, यावल 1597, एरंडोल 2738, जामनेर 3290, रावेर 1992, पारोळा 2405, चाळीसगाव 3121, मुक्ताईनगर 1286, बोदवड 771, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या 374 रुग्णांचा समावेश आहे.

 जिल्ह्यात तालुकानिहाय आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या    

            जळगाव शहर 8719, जळगाव ग्रामीण 1613, भुसावळ 2323, अमळनेर 3750, चोपडा 3231, पाचोरा 1660, भडगाव 1620, धरणगाव 1864, यावल 1401, एरंडोल 2054, जामनेर 2834, रावेर 1487, पारोळा 2059, चाळीसगाव 2905, मुक्ताईनगर 1210, बोदवड 626, इतर जिल्ह्यातील 275 याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 32 हजार 941 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

 जिल्ह्यात तालुकानिहाय उपचार घेत असलेल्या (ॲक्टिव्ह) रुग्णांची संख्या            

            जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले 7 हजार 101 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये जळगाव शहर 1870, जळगाव ग्रामीण 682, भुसावळ 823, अमळनेर 271, चोपडा 722, पाचोरा 83, भडगाव 125, धरणगाव 190, यावल 137, एरंडोल 639, जामनेर 387, रावेर 417, पारोळा 328, चाळीसगाव 146, मुक्ताईनगर 47, बोदवड 135, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 99 रुग्णांचा समावेश आहे.

 जिल्ह्यात तालुकानिहाय उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या

            जिल्ह्यात आतापर्यत उपचारादरम्यान 1 हजार 175 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये जळगाव शहर 246, जळगाव ग्रामीण 78, भुसावळ 135, अमळनेर 97, चोपडा 72, पाचोरा 70, भडगाव 40, धरणगाव 49, यावल 59, एरंडोल 45, जामनेर 69, रावेर 88, पारोळा 18, चाळीसगाव 70, मुक्ताईनगर 29, बोदवड 10 मृतांचा समावेश आहे. उपचारादरम्यान एकूण मृत्यु झालेल्या 1 हजार 175 रुग्णांपैकी 1029 मृत्यु हे 50 पेक्षा जास्त वयोगटातील असून 530 मृत्यु हे आजारपण असलेले आहेत.

 जिल्ह्यातील 5 हजार 204 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

            कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 204 ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 2 हजार 418, शहरी भागातील 1 हजार 312 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 1 हजार 474 ठिकाणांचा समावेश आहे. या क्षेत्रांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी 6 हजार 502 टिम कार्यरत आहे. या क्षेत्रात 2 लाख 56 हजार 350 घरांचा समावेश असून यात 11 लाख 18 हजार 37 इतकी लोकसंख्येचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल ऑफिसर कोविड-19, जळगाव यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

00000

Tuesday, 29 September 2020

पाटचारीत पोहताना मृत्यु पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना केली प्रत्येकी दहा हजार रुपयांची वैयक्तिक मदत



           जळगाव (जिमाका) दि. 29 - नशिराबाद येथील पाटचारीत पोहतांना बुडून मृत्यु पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांची राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज नशिराबाद येथे जाऊन भेट घेतली. घडलेल्या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन कुटूंबियांचे सात्वंन केले.

        यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार वैशाली हिंगे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, पंचायत समिती सदस्या श्रीमती यमुनाबाई रोटे, गटशिक्षणाधिकारी श्री. चौधरी, केंद्र प्रमुख प्रकश तिडके, सरपंच विकास पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप साळी, चेतन बऱ्हाटे, चंदु भोळे, मोहन कोलते, नितीन बेंडवाल, तुषार सोनवणे, भुषण कोल्हे, किरण सोनवणे आदिंसह ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे आई, वडिल व नातेवाईक उपस्थित होते.

            सोमवार (28 सप्टेंबर) रोजी दुपारी नशिराबाद गावानजीकच्या पाटचारीत विद्याथी पोहण्यासाठी गेले होते. यात मोहित शिंदे, आकाश जाधव व ओम महाजन या तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला होता. पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली व त्यांचे सात्वंन केले. तसेच या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी दहा रुपयांची वैयक्तिक मदत केली. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी शिक्षण विभागास दिले. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना शासनाच्या ज्या योजनांचा लाभ मिळू शकेल त्या योजनांचा लाभ देण्याच्याही सुचना यंत्रणेला दिल्यात.

00000

Monday, 28 September 2020

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :-  राष्ट्रीय कृषी विकास योजना 2020-21 अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबविण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेतंर्गत रोपवाटिकेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक शेतक-यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

             या योजनेत टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिकेची उभारणी करायची असून यामध्ये 3.25 मी. उंचीचे Flat type  शेडनेटगृह  उभारणी, प्लॉस्टिक टनेल, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर व प्लॉस्टिक क्रेटस इत्यादी घटकांतर्गत मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 50 टक्के प्रमाणे रु.2,30,000/- अनुदान देय राहील.

            पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असलेल्या शेतक-यांनी दिनांक 2 ते 19 ऑक्टोबर, 2020 या कालावधीमध्ये Maha DBT  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेकडे ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत.

लाभार्थी निवडीचे निकष

            अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे, रोपवाटीका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करतांना अर्जासोबत स्वत: 7/12 उतारा, 8-अ उतारा, आधारकार्ड, बॅक पासबुक, इत्यादी कागदपत्रे सादर करावीत, प्राप्त लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थी निवडीच्या प्राधान्यक्रमानुसार तालुकास्तरावर सोडत पध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येईल.

            महिला कृषी पदविकाधारकांना प्रथम प्राधान्य राहिल, महिला गट/महिला शेतकरी व्दितीय प्राधान्य राहिल, भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्पभुधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहिल,  

            या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी सहाय्यक /कृषी पर्यवेक्षक/ मंडळ कृषी अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

०००००

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांच्या एकजुटीने जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील ‘ऑक्सीजनयुक्त’ बेडच्या वाढीव वॉर्डाचे लोकार्पण

 



            जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन, प्रशासन, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अत्याधुनिक सोयीसुविधा तयार होत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपल्याला लवकरच यश मिळेल. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी केले.

            सदा ग्यान फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कोविड रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या ऑक्सीजनयुक्त बेडच्या वाढीव वॉर्डाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन    पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, इंन्सिडंट कमांडर गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, नगरसेवक विष्णू भंगाळे, रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या अध्यक्षा अपर्णा भट, सचिव जितेंद्र बरडे, चेअरमन महेंद्र रायसोनी आदि उपस्थित होते.

            पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की,  जिल्ह्यात पूर्वी कोरोनाचे स्वॅब तपासणीसाठी लॅब नव्हती. राज्य शासनाकडे याचा मी सतत पाठपुरावा केल्याने टेस्टीग लॅब जिल्ह्याला मिळाली. अन्यथा पूर्वी चार ते आठ दिवसानंतर येणारे अहवालाच्या तक्रारी, रुग्णांच्या तक्रारी, आरोग्य सुविधांची वानवा असे अनेक प्रश्‍न होते. ते प्रश्‍न या लॅबमुळे निकाली निघाले. आता जिल्ह्यात आपली स्वतःची टेस्टींग लॅब आहे, जिल्ह्यात आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड, व्हेटींलेटर याची उपलब्धता आहे. यामुळे कोरोना बाधीतांवर त्वरीत अत्याधूनिक प्रकारचे उपचार होत आहे. आता कोरोना बाधीतांचा मृत्यूदरही खाली आला आहे. यामुळे जिल्हा सुविधांबाबत राज्यातील प्रमुख शहरांतील रुग्णालयाचाही पुढे गेला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. त्यास जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी राबविलेल्या ‘बेड साईड असिस्टंट’ पॅटर्नची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत कौतुक केले आहे. सोबतच सर्व विभागाच्या यंत्रणेने रात्रंदिवस घेतलेल्या मेहनतीमुळे जिल्ह्यात कोरेाना बाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे, मृत्यूदरही खाली येत आहे. जिल्ह्यास प्राप्त झालेल्या विविध निधीच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेने अत्याधुनिक सुविधा उभारण्यावर भर दिल्याने मुंबईच्या रुग्णालयांबरोबरीच्या सुविधा जळगावला मिळत आहे. सामाजीक संघटनांनी केलेल्या सहकार्य व अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेमुळे हे शक्य झाले आहे. यापुढील काळातही सामाजिक संस्थांनी आपले योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. पालकमंत्री म्हणाले की, आगामी काळासाठी आमची आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी पुढील काळातील दुर्गात्सवासह येणारे सण, उत्सव  भाविकांनी, नागरिकांनी सोशल डिस्टनींगचे पालन करीत साधेपणाने साजरे करावेत. सर्वांनी कोरोनाबाबत काळजी घेताना तोंडाला मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले.  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असून आता जिल्ह्यात अगदी दर २५ किमीवर ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध होत असल्याचे सांगत आगामी नवरात्रोत्सव व दिवाळीत काळजी घ्या, नियम पाळा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले़. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एऩ एस़. चव्हाण यांनी जिल्हाभराचा ऑक्सिजन बेडचा आढावा मांडला़. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी कोविड रुग्णालयात झालेल्या बदलांची माहिती दिली.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख महेंद्र रायसोनी यांनी केले़

000000

Sunday, 27 September 2020

1 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात होणा-या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहिर परीक्षार्थींनी सुचनांचे पालन करणे बंधनकारक

             जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) :-  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेमार्फत घेण्यात येणारी  MHT-CET  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, 2020 ही ऑनलाईन पध्दतीने दिनांक 1 ते 9 ऑक्टोबर, 2020  या कालावधीत फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) व दिनांक 12 ते 20 ऑक्टोंबर, 2020 या कालावधीत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स (PCM) ची परीक्षा जळगाव जिल्ह्यातील पाच परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे.

            जिल्हयातील आयओएन डिजिटल झोन, आयडीझेड, श्री. गुलाबराव देवकर कॉलेज कॅम्पस शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव, इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड रिसर्च, आयएमआर कॅम्पस, नॅ. हायवे 6, जळगाव, श्री. गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव, जी.एच.रायसोनी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ॲड मॅनेजमेंट, शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव आणि श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲड टेक्नोलॉजी झेडटीसी जवळ, भुसावळ जि. जळगाव या पाच उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच परीक्षेचे प्रथम सत्र सकाळी 7.30 ते दुपारी 12.00 व व्दितीय सत्र दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.45 याप्रमाणे राहील. 

उमेदवारानी परीक्षेस येतांना परीक्षेसाठीचे ऑनलाईन मुळ प्रवेशपत्र व इतर मुळ ओळखपत्र (पॅनकार्ड/आधार कार्ड/वाहन चालविण्याचा परवाना इत्यादी) सोबत आणावे. उमेदवारांनी पारदर्शक पाणी बॉटल, छोटी सॅनिटायझर बॉटल (50 ML), मास्क, काळा/निळा बॉलपेन ई. गोष्टी वगळता अन्य कोणत्याही वस्तू सोबत आणू नये. सकाळ सत्रासाठी उमेदवारांना सकाळी 7.30 ते 8.30 पर्यंत व दुपार सत्रासाठी दुपारी 12.30 ते 2.00 वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाईल. सदर वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा केंद्रावर प्रवेशाच्या आधी प्रत्येक उमेदवाराची थर्मल गनव्दारे तापमान तपासणी घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात परीक्षा केंद्रावर आवश्यक ती खबरदारी घेऊन त्यासंदर्भातील नियम पाळणे बंधनकारक आहे. 

 या परीक्षेदरम्यान उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

Saturday, 26 September 2020

‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेतून वाढणार आरोग्य साक्षरता : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

  







              
जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेतून प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आरोग्याची स्थिती समजण्यास मदत होईल. या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य साक्षरता वाढवायची आहे. त्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी नाशिक विभागातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

            या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, तुकाराम हुलवळे आदी सहभागी झाले होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान कळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाचे पथक प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून त्यांची तपासणी करेल, असे नियोजन करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक विभागाचे काम योग्य दिशेने सुरू आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना शारीरिक अंतर ठेवावे. हात नियमितपणे साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ करावेत. या गोष्टी आता प्रत्येकाने अंगवळणी पाडून घ्याव्यात. कोरोना बाधित काही रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवण्यात येते. अशा व्यक्तींवर आरोग्य प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे. जेणेकरून कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर पडणार नाही. त्यामुळे कोरोना विषाणूच्या प्रसारास आळा बसण्यास मदत होईल. नागरिकांनीही कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसून आली, तर तत्काळ रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. 

 जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी दहा कोटी रुपयांची मागणी

             पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिक सहभागी होत असून ही मोहीम आता लोकचळवळ झाली आहे. ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे कोरोना विरोधातील लढ्याला बळ मिळाले आहे.  तसेच कोरोना बाधित रुग्ण वेळेत शोधला जात असून त्यांच्यावर तत्काळ उपचार करणे शक्य झाले आहे. ग्रामपातळीवर ग्रामपंचायतीसह वेगवेगळ्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये स्थानिक बोलीभाषेतून जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत. 

            जिल्हा प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. ती पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, नगरपालिका प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे.  त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 79 टक्क्यांपर्यत वाढले असून मृत्यूदर 2.5% पर्यंत कमी झाला आहे. कोरोना विरोधातील लढाईत लोकसहभाग वाढविण्यासाठी पूर्वीपासून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तालुकास्तरावर ऑक्सिजनयुक्त बेड तयार करण्यात आले आहेत. तसेच रुग्णांच्या मदतीसाठी बेड साइड असिस्टंट नियुक्त करण्यात आले आहेत. हा जिल्ह्यातील अभिनव उपक्रम आहे. त्याचे सकारात्मक परिणाम पाहावयास मिळत असून नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. स्वॅब तपासणीचे अहवाल वेळेत उपलब्ध होवू लागले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बळकटीकरणासह आरोग्य विभागाच्या बळकटीकरणासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणीही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली.

            जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले, ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेचे पालकमंत्री महोदयांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य तपासणीसाठी 3 हजारापेक्षा अधिक  पथके गठित करण्यात आली आहेत. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी 154 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 859 बाधित रूग्ण शोधण्यात यश आले आहे. ऑडिओ, व्हीडिओ जिंगल्सच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यापासून रुग्ण पॉझिटिव्हीटीचा दर कमी झाला असून मृत्यूदरही कमी झाला आहे  तो अजून कमी करण्यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी यावेळी दिली. 

00000

Friday, 25 September 2020

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन आयोजन

           जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयातर्फे 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पध्दतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा व जिल्ह्याबाहेरील आस्थापना/कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदांव्दारे मोठी सुवर्णसंधी जिल्हयातील युवक, युवतींसाठी देऊ केलेली आहे. या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपेार्टलवर विविध शैक्षणिक पात्रतेची एकूण 265 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आलेली आहेत. यासाठी विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणा-या किंवा ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती उद्योजकांच्या सोईनुसार शक्य असेल तेथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने घेतल्या जातील. 

            उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. किंवा प्लेस्टोअरमधून महास्वयंम ॲप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे. Employment पेजवरील Job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी/आधारक्रमांक व पासवर्डने साईनइन/लॉगईन करावे. आपल्या होमपेज वरील Job Fair  हा पर्याय निवडावा. त्यानंतर जळगाव जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी Jalgaon Online Job Fair (Dt. २८.०९.२०२०२ to ३०.०९.२०२०२) या ओळीतील ॲक्शन मेनूतील दुस-या बटनावर क्लिक करावे.  I Agree  हा पर्याय निवडा, पात्रतेनुसार मॅचींग झालेल्या विविध कंपन्यांच्या रिक्त पदांसाठी Apply  बटनावर क्लिक करावे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत 0257-2239605 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.  या सुवर्णसंधीचा  जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

पंडित दीनदयाळ यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



            जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) :  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रमाचा संपन्न झाला. याप्रंगी  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पंडित दीनदयाळ  यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी महसुल रविंद्र भारदे आदिंसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

                                                                               00000

Thursday, 24 September 2020

कापूस पिकावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

             जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) - जिल्ह्यात सद्य:स्थितीस कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तर काही ठिकाणी मका व ज्वारी पिकावर अमेरीकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या दुष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबत कापुस लागवडीच्या 45 दिवसांपासुन पुढे हेक्टरी 5 फेरोमन सापळे (मोठया प्रमाणावर पतंग पकडण्यासाठी  25 फेरोमन सापळे प्रति हेक्टर लावण्यात येउन त्यांची उंची पिकाच्या वाढीनुसार कापुस/मका/ज्वारी झाडापेक्षा एक फुट उंच राहील याप्रमाणे वाढवावी. तसेच  फेरोमन  सापळ्यातील ल्युर त्याच्या क्रियाशिलतेनुसार वेळेवर बदलावे, फेरोमन सापळयामध्ये सरासरी आठ ते दहा पतंग सलग 2 ते 3 दिवस आढळून आल्यास  सुरुवातीस 5 टक्के निबोंळी अर्काची फवारणी करावी.  त्यानंतर प्रति सापळा दहापेक्षा जास्त पतंग आढळल्यास क्विनॉलफॉस 25 %  ईसी या रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

            पिकावरील किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) सन 2020-21 अंतर्गत  महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महमंडळ यांचे अधिकृत डीलरमार्फत 50 टक्के अनुदानावर रु. 56.50/250 मिली पँकींग साईज आपत्कालीन परिस्थितीत कापुस, मका व ज्वारी या पिकांवरील विविध किडीसाठी क्विनॉलफॉस 25% ईसी या किटकनाशकांचा पुरवठा करण्यात आला आहे. बी.टी. वाणामध्ये 90 दिवसानंतर किडींना प्रतिकार शक्ति कमी झाल्यामुळे किटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे.

            तरी सर्वदूर झालेला पाउस व सध्याचे हवामान कीड रोगाच्या वाढीस पोषक ठरत असल्याने किड रोगाचे वेळीच व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने सर्व शेतक-यांनी वरील प्रमाणे उपाययोजना कराव्यात. असे आवाहन श्री संभाजी ठाकूर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000

जिल्ह्यातील ऑक्सिजन व आयसीयु बेडची संख्या पोहोचली 2341 वर बाधित रुग्णांना अद्यावत सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

             जळगाव, (जिमाका) दि. 24 - कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. बाधित रुग्णांना त्वरीत उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यात 376 ऑक्सिजनयुक्त तर 59 आयसीयु बेड असे एकूण 435 बेड नव्याने तयार करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड केविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व अधिग्रहीत केलेल्या रुग्णालयातील ऑक्सिजनयुक्त बेडची संख्या 2019 तर आयसीयु बेडची संख्या 322 इतकी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

            जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत जिल्ह्यात आरोग्य पथकांच्या माध्यमातून नागरीकांची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीमध्ये संशयित म्हणून आढळून येणाऱ्या व्यक्ती बाधित आढळून आल्यास त्यांचेवर त्वरीत उपचार व्हावे यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सर्व सुविधांनीयुक्त असे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर त्वरीत उपचार व्हावेत याकरीता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून शासनामार्फत प्राप्त झालेल्या विविध निधीतून तसेच जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संसथा व लोकप्रतिनिधींच्या निधीतून मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

            सुरवातीस जिल्ह्यात 1643 ऑक्सिजनयुक्त बेड तर 322 आयसीयू बेडस उपलब्ध होते. जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांचेवर उपचारासाठी अडचण येवू नये याकरीता प्रशासनाच्यावतीने बेडस वाढविण्याचा निर्णय घेतला होता. आता यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सद्य: परिस्थितीत जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये 2019 ऑक्सिजनयुक्त बेड तर 322 आयसीयु व 234 व्हेटीलेटर बेडस उपलब्ध असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.

            जिल्ह्यात सर्वाधिक ऑक्सिजनयुक्त बेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 365, गोदावरी हॉस्पिटलमध्ये 300, इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयात 100, सिव्हिल हॉस्पिटल, चोपडा येथे 80, रेल्वे हॉस्पिटल, भुसवाळ 64, ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव 50 तर इतर शासकीय व खाजगी रुग्णालयात प्रत्येकी 5 ते 30 याप्रमाणे बेडची व्यवस्था आहे.  

            कोराना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत नागरीकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथके घरोघरी जाऊन तपासणी करीत आहे. या पथकांना नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले.

000000

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे निर्देश आगामी काही दिवस शेतकरी, नागरिक व प्रशासनाने दक्ष राहण्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आवाहन

             जळगाव, दि. 24 (जिमाका) - मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे. अनेक तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरीप पिकांचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे, शेतजमिनीचे व इतर नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा व जनतेला दिलासा द्यावा. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.

            गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो झाली आहेत. मोठ्या धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी मुंबई येथून संपर्क करून आढावा घेतला. अवेळी झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावांबरोबरच जिल्ह्यातील इतर ठिकाणीही खरीपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन, मुग, कापूस व इतर पिकांची नासाडी झाली आहे. तर रावेर, यावल भागात केळीबागांचेही नुकसान झाले आहे. याशिवाय काही ठिकाणी नदी, नाल्यांना पाणी आल्याने शेतजमिनीचे तसेच नागरीकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन पालकमंत्री ना. पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्यात यावा असे निर्देशही त्यांनी यावेळी सर्व संबंधितांना दिले. 

            हवामान खात्याने जिल्ह्यात शनिवारपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने पुढचे काही दिवस पाटबंधारे विभाग तसेच नागरीक, शेतकरी व प्रशासनानेही या काळात दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

00000

माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाची फलनिष्पती जळगाव जिल्ह्यात आरोग्य पथकांना 530 कोरोना बाधित रुग्ण शोधण्यात यश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची माहिती जिल्हाभरात आढळून आले 60 हजार 787 कोमॉर्बिड रुग्ण. 2 हजार 730 संशयित रुग्णांचे घेण्यात आले स्वॅब

            जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) - कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानातंर्गत जळगाव जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात 3 हजार पथकांमार्फत जिल्ह्यातील 20 लाख नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्या नागरीकांमधील 530 व्यक्ती या कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. या व्यक्तींचा वेळेत शोध लागल्याने जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनास निश्चितपणे यश मिळेल. असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला आहे.

            कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान 15 सप्टेंबर, 2020 पासून सुरू केली आहे. या मोहिमेचा शुभारंभ जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी, ता. जळगाव येथे करण्यात आला. जिल्ह्यातील नागरीकांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरात 3 हजार आरोग्य पथकांची नियुक्ती केली आहे. यात महानगरपालिकेच्या 134, जिल्ह्यातील 18 नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील 337 तर जिल्हा परिषदेच्या 2533 पथकांचा समावेश आहे.  या पथकात आरोग्य सेवकांसह स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व संघटनांनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान 50 घरांना भेटी देत असून ही पथके घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेण्यात येत आहे. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येत आहे. तेथे कोविड 19 च्या तपासणीसाठी स्वॅब चाचणी घेण्यात येवून पुढील उपचार केले जात आहेत. जळगाव जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने दोन टप्प्यात 25 ऑक्टोबर 2020 पर्यंत सुरू राहणार आहे. यात पहिली फेरी 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून दुसरी फेरी 14 ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत होणार आहे. पहिल्या फेरीचा कालावधी 15 दिवसांचा असून दुसऱ्या फेरीचा कालावधी हा 10 दिवसांचा राहणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.

            या पथकांमार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 20 लाख 23 हजार 742 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत आतापर्यंत जिल्हाभरात 60 हजार 787 इतके कोमॉर्बिड रुग्ण आढळून आले आहे.  यापैकी 5 हजार 211 रुग्णांना उपचारासाठी, संदर्भ सेवाकरीता पाठविण्यात आले होते. यापैकी 2 हजार 730 रुग्णांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी 530 रुग्ण हे कोरोना बाधित आढळून आले आहे. हे रुगण विहित वेळेत आढळून आल्याने त्यांचेवर वेळेत उपचार होणार असल्याने त्यांच्या जिविताचा धोका टळणार असून त्यांचेपासून इतरांना होणारा संसर्ग रोखण्यासही मदत होणार आहे.

            नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकांना सहकार्य करावे. बाहेर पडताना सतत मास्क वापरणे आवश्यक आहे. मास्क शिवाय घराबाहेर पडू नये. हात साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नयेत. कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्यास त्वरीत रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी, जेणेकरुन जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

00000

Wednesday, 23 September 2020

माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानातंर्गत जळगाव शहर महानगर पालिकेच्यावतीने एक लाख 35 हजार नागरिकांची तपासणी पूर्ण महापालिका आयुक्त सुतीश कुलकर्णी यांची माहिती

            जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) - कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानातंर्गत जळगाव शहर महानगरपालिकेच्या आतापर्यंत 134 आरोग्य पथकांमार्फत शहरातील 39 हजार 27 घरातील एक लाख 35 हजार 317 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे.

            कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम 15 सप्टेंबर, 2020 पासून सुरू केली आहे. या मोहिमेचा शुभारंभ जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी, ता. जळगाव येथे करण्यात आला. जळगाव शहरातील नागरीकांच्या आरोग्य तपासणीसाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने 134 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व संघटनांनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान 50 घरांना भेटी देत असून ही पथके घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेण्यात येत आहे. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येत असून तेथे कोविड 19 च्या तपासणीसाठी स्वॅब चाचणी घेण्यात येवून पुढील उपचार केले जात आहेत. जळगाव शहरात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम महानगरपालिकेचे पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक यांच्या सहकार्याने दोन टप्प्यात 25 ऑक्टोबर 2020 पर्यंत सुरू राहणार आहे. यात पहिली फेरी 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून दुसरी फेरी 14 ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत होणार आहे. पहिल्या फेरीचा कालावधी 15 दिवसांचा असून दुसऱ्या फेरीचा कालावधी हा 10 दिवसांचा राहणार असल्याचे आयुक्त श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

            जळगाव शहरात नवीपेठ, शिवाजीनगर, सुभाषचौक, जुनेगाव, इंडिया गॅरेज, तांबापूरा, गावठाण, पिंप्राळा, हरी विठ्ठल नगर आणि सुप्रीम कॉलनी असे दहा आरोग्य विभाग कार्यरत आहेत. या दहा विभागात महापालिका प्रशासनाच्यावतीने 134 आरोग्य पथके कार्यरत करण्यात आली आहे. या पथकांमार्फत शहरात आतापर्यंत 39 हजार 27 घरांना भेटी दिल्या असून 1 लाख 35 हजार 317 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत 50 वर्षे वयावरील व्यक्तींची संख्या 24 हजार 826 इतकी आहे. यापैकी 3 हजार 943 व्यक्ती या कोमार्बिड, सर्दी, ताप, खोकला (ILI) चे 47 तर सारीचे 10 रुग्ण आढळून आले आहे. यापैकी 49 संशयितांना तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले होते. त्यापैकी 19 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 50 वर्षाखालील व्यक्तींपैकी 606 व्यक्ती कोमॉर्बिड, सर्दी, ताप, खोकला (ILI) चे 37 तर सारीचा 1 रुग्ण आढळून आले आहे. यापैकी 27 संशयितांना तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले होते. त्यापैकी 6 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ रावलानी यांनी दिली.

            नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क वापरणे आवश्यक आहे. मास्क शिवाय घराबाहेर पडू नये. हात साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नयेत. कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्यास त्वरीत रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

00000

शासनाने निर्धारित केलेल्या पॅकेजमध्ये डॉक्टरांची व्हिजीट समाविष्ट असल्याने कोणत्याही रुग्णांसाठी हॉस्पिटलने व्हिजीट फी आकारू नये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

             जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) - खाजगी रुग्णालयात असलेल्या एकूण बेड क्षमतेपैकी 80 टक्के खाटा कोव्हिड-19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखीव बेडस म्हणून ठेवण्याचे शासन निर्देश आहेत. त्यानुसार हॉस्पिटलच्या एकूण बेड संख्येपैकी राखीव 80% बेडकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाकडील दिनांक 31 ऑगस्ट, 2020 मधील तरतुदीस अधीन राहून अनुसूची क प्रमाणे लागू राहतील. उर्वरित 20 टक्के खाटांना खाजगी रुग्णालयाने प्रमाणित केलेल्या दरानुसार रक्कम देय राहील. याबाबतची प्रसिद्धी  शासनाच्या निर्देशानुसार संबंधित खाजगी रुग्णालयांनी 80-20 याप्रमाणे खाटांची रूम क्रमांकांबाबतची माहिती दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी खाजगी रुग्णालयांना दिले आहेत.

             दिनांक 21 मे, 2020 च्या अध्यादेशाच्या अनुषंगाने आदेश क्रमांक 410, दि. 11 ऑगस्ट, 2020 व 461, दि. 9 सप्टेंबर, 2020 समवेतचे विहित खाजगी रुग्णालयाचे पॅकेज व्यतिरीक्त दरपत्रक रद्द करण्यात येत आहे. दि. 31 ऑगस्ट, 2020 चे अध्यादेश अनुसूचीनुसार खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून विहित दरापेक्षा जादा आकारणी केल्यास ती लेखापरीक्षण पथकाने वसूल पात्र ठरवावी. व त्या रुग्णालयास अध्यादेशामधील संदर्भ (Referance) एक ते सात अन्वये शल्य चिकित्सक, जळगाव यांनी  लेखापरीक्षण पथकाने सुचवलेली वसुलपात्र रक्कम पडताळणी करावी. वसुलपात्र रक्कम संबंधित रुग्णालयाने रुग्णास परत करणेबाबत शल्य चिकीत्सक यांनी नियमित आदेश प्रस्तुत करावे. असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

            याबाबत नियंत्रण ठेवून दैनंदिन विहित कार्यवाही अवलंबावी व दैनिक अहवाल विहित कार्य प्रणालीस सादर करावा. शासन अधिसूचना दिनांक 31 ऑगस्ट, 2020 मधील परीच्छेद क्रमांक 12 नुसार शासनाने निर्धारित केलेल्या पॅकेजमध्ये डॉक्टर यांची  व्हिजीट समाविष्ट असल्यामुळे कोणत्याही रुग्णांसाठी हॉस्पिटलने व्हिजीट फी आकारू नये. डेडीकेट कोव्हिड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलेल्या प्रत्येक खाजगी दवाखान्यात शासनाचे लेखा विभागाचे अधिकारी देयकाचे ऑडिट करण्यासाठी नियुक्त केलेले आहेत.

            अधिक माहितीसाठी अथवा तक्रारीसाठी या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. अथवा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव यांच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2226611 यावर संपर्क साधावा. रुग्णालयाच्या स्वागत कक्षाने रुग्णालयाकडे दैनंदिन उपलब्ध असलेल्या खाटा (Bed Management System) व्यवस्थापन  समिती साठी व दाखल होणाऱ्या रुग्णांकरिता वेळोवेळी माहिती उपलब्ध करून द्यावी. असेही अभिजीत राऊत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळवून देतो सांगणाऱ्यांच्या अमिषाला बळी पडू नका आदिवासी विकास विभागाचे लाभार्थ्यांना आवाहन

          जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) - आदिवासी विभागाच्या खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळवून देतो असे सांगून काही व्यक्ती, संघटना लाभार्थ्याकंडून पैसे घेऊन अर्जाचे वितरण करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. परंतु लाभार्थ्यांनी अर्ज प्राप्त करण्यासाठी अशा कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. असे आवाहन श्रीमती विनिता सोनवणे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांनी केले आहे.

            कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटूंबांना सहाय्य करण्यासाठी  खावटी अनुदान योजनेचे पुर्नजीवन राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या  दि. 9 सप्टेंबर, 2020 च्या शासन निर्णयाने केले आहे. खावटी अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटूंबीयांना लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी करावयाचे अर्ज, पोचपावती, नोंदवह्या आदी बाबीचे नमुने तयार करण्याचे काम शासन रावर सुरु आहे. तथापी, असे निर्दशनास आले आहे की, काही संघटना, व्यक्ती आदिवासी बांधवांकडून पैसे घेऊन अर्जाचे वितरण लाभार्थ्यांना करत आहे. सदर बाब बेकायदेशीर असल्याने अशा तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी अर्ज प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या खाजगी अमिषाला अथवा गैरप्रकाराला बळी न पडता खावटी अनुदान योजनेबाबत अधिकची माहिती प्राप्त करण्यासाठी उपप्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. उपप्रादेशिक कार्यालय, यावल आणि प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल येथे संपर्क साधावा. असे आवाहन  श्रीमती  सोनवणे, प्रकल्प अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                                 00000