Monday, 31 July 2023

खडके येथील मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द सखोल चौकशीसाठी पाच सदस्यीय विशेष तपासणी समिती तीन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

             जळगाव, दि.31 जुलै (जिमाका) - एरंडोल तालुक्यातील खडके येथील कै.य.ब.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आली आहे.  राज्याचे महिला व बाल विकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. तसेच या बालगृहातील बाल लैंगिक अत्याचाराची सखोल चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीला ३ ऑगस्ट पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

खडके येथील बालगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणी बालगृहाचे काळजीवाहक गणेश पंडीत,  अधीक्षिका अरुणा पंडीत आणि संस्थेचे सचिव भिवाजी दिपचंद पाटील यांचे विरुध्द २६ जुलै २०२३ रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी सादर केलेला अहवालानुसार संस्थेमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे ‌. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारीत अधिनियम २०२१ आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ मधील नियम आणि तरतूदींचे उल्लंघन करणारी आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी प्रेमा घाडगे (बाल विकास प्रकल्प अधिकारी,खार सांताक्रुझ नागरी प्रकल्प, मुंबई उपनगर) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय विशेष तपासणी समिती (Special Investigation Team) गठित करण्यात आली आहे . या समितीने तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश महिला व बाल विकास उपायुक्त राहूल मोरे यांनी दिले आहेत.

०००००००

 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी संपर्क क्रमांक जाहीर एक रूपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

         जळगाव, दि. 31 जुलै (जिमाका)- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीच्या निराकरणासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. एक रूपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुदतीत अर्ज नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३- २४ योजना जिल्ह्यात ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनी (पुणे) या विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे.  पीक विमाधारक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मनुष्यबळ नियुक्ती व सर्व सुविधायुक्त कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. कंपनीच्या जिल्हा व तालुका स्तरावरील प्रतिनिधींचे संपर्क क्रमांक असे आहेत. जळगाव जिल्हा- समाधान लक्ष्मण पाटील - ९९२१५७५९४०,  जळगाव तालुका- विजय संतोष अस्वार - ९८३४८८८२१०, भुसावळ - अविनाश ताराचंद बारी- ७४९९३९३४६०, बोदवड - पंकज लक्ष्मण सपकाळे-  ९९२३३५७०६१, यावल- विकास विश्वनाथ शिंदे - ७७०९७३७६०७, रावेर- राजेंद्र पाटील- ८२०८३५७२२१, मुक्ताईनगर- भूषण संतोष सपकाळे- ८६२४१५२४०३, अमळनेर- किरण रघुनाथ पाटील- ८९७५१८७४२३, चोपडा- जितेंद्र सुभाष वानखेडे - ७६५०२५५०७१, एरंडोल - राहूल उगमसिंग पाटील- ८८३००३७४२९, धरणगांव- योगेश्वर जगन पाटोल- ७७७३९१३४५३, पारोळा- ज्ञानेश्वर शिवाजी रामोशी- ९८३४४३६१८७, चाळीसगांव- राहुल रविंद्र पाटील- ८८३००३७४२९, जामनेर - योगीराज अशोक महाजन- ८८३०५७४१९९,  पाचोरा-समाधान बारकु मोरे- ९६२३४२०६७०, भडगांव- पंकज मधुकर चौधरी- ८४५९१८५९८२ असे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०१३ पर्यंत होती. मात्र शासनाने ३ दिवसाची मुदतवाढ दिली असल्याने ३ ऑगस्ट २०२३ पर्यंत अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल. त्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणात अर्ज करून विमा योजनेत व्हावे. असे आवाहनही श्री.ठाकूर यांनी केले आहे.

००००००

जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन

             जळगाव, दि.31 जुलै (जिमाका) - महसूल विभागामार्फत जिल्ह्यात 1 ऑगस्ट हा महसूल दिन साजरा करण्याबरोबरच  1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

महसूल दिन दि.1 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसूलीच्या नोटीस पाठवणे, मोजणी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण करणारे अधिकारी - कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दि. 2 ऑगस्ट रोजी 'युवा संवाद' उपक्रमात जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तात्काळ निर्गमित करण्यासाठी महाविद्यालयनिहाय शिबीराचे आयोजन केले जाणार आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली जाणार आहे‌. अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. दि. 3 ऑगस्ट रोजी 'एक हात मदतीचा' उपक्रमांतर्गत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे बाधित शेतकरी व नागरिकांना मदतनिधीचे वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागात महसूल अदालतीचे आयोजन केले जाणार आहे. दि. 4 ऑगस्ट रोजी 'जनसंवाद' उपक्रमात महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. सलोखा योजनेत गावा-गावातील शेत रस्त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येणार आहे. आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे.

'सैनिक हो तुमच्यासाठी' हा उपक्रम दि.5 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यात भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या व शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या महसूलविषयक अर्ज तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे.  दि.6 ऑगस्ट  रोजी  महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबी निकाली काढण्यासाठी ‘महसूल संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दि.7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहा दरम्यान केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेण्यासाठी ‘महसूल सप्ताह सांगता समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे.

याशिवाय जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये हेल्पडेस्क, हेल्पलाईन तयार करून मदत करण्याकरिता यंत्रणा कक्ष करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहादरम्यान शासनाचे महत्त्वाचे कायदे, विकास योजना, उपक्रमांना प्रसिध्दी देण्यात येणार आहे.  महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांबाबतची माहितीपत्रके तयार करून नागरिकांना देण्यात येणार आहेत. या महसूल सप्ताहात महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन ही श्री.प्रसाद यांनी केले आहे.

०००००

दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार अर्ज सादर करण्यास १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 जळगांव, दि.३१ जुलै (जिमाका) - केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार सन २०२३ करिता नामांकन व अर्जासाठी १५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या https://awards.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी केले आहे. 

राष्ट्रीय पुरस्काराकरीता अर्ज, नामांकने केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या संकेतस्थळावर सादर करावेत. या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्तर वर्णनासह भरण्यात यावी. समक्ष अथवा टपालाद्वारे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्जदारांसाठी पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील https://disabilityaffairs.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पुरस्कारांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विचारात घेण्यात येणार आहेत, असे ही श्री.रायसिंग यांनी कळविले आहे. 

00000000000

Friday, 28 July 2023

महसूल सप्ताहात शासन आपल्या दारी अभियानाची होणार प्रभावी अंमलबजावणी ! जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यता कक्षांची स्थापना

             जळगांव, दि.२८ जुलै (जिमाका) -  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल सप्ताहात ‘शासन आपल्या दारी’ अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांना विविध महसूल विषयक सेवांचा लाभ देण्यासाठी महसूल यंत्रणा गावपातळीवर काम करणार आहे. नागरिकांना महसूल विषयक सेवा देण्यासाठी व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे.

            शासन आपल्या दारी अभियानात शून्य वयोगटापासून ते ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरूष व दिव्यांग व्यक्ती असे सर्वच लाभार्थी या अभियानाचे घटक राहणार आहेत. अभियानात संजय गांधी निराधार योजनेत २६ जुलै ते २८ जुलै या कालावधीत गावनिहाय लाभार्थी यादी तयार करण्यात येणार आहे. २९ जुलै ते ३१ कालावधीत लाभार्थी यादी संबंधित गावातील इंडिया पोस्ट पेमेंटस बँकच्या कर्मचारी, प्रतिनिधीस देण्यात येईल. १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या कालावधीत आपली पेंशन आपल्या दारी अंतर्गत गावनिहाय व योजनानिहाय लाभार्थ्यांना घरपोच निवृत्तीवेतन वाटप करण्यात येणार आहे.

१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल प्रशासन विविध मोहीमा राबविणार आहे. यात अनधिकृत अकृषिक वापराची प्रकरणे शोधून कार्यवाही करण्याबाबत मोहीम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गंत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी शासकीय जमिन उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गंत घरकुलासाठी पात्र भूमिहिन लाभार्थ्यांना तसेच ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्प राबविणेसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांमध्ये ॲपद्वारे ई-पीक पाहणी करण्यासाठी प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे. ई-फेरफार मध्ये एक महिन्यावरील अनोंदणीकृत किंवा नोंदणीकृत नोंदी तसेच तीन महिन्यांवरील नोंदीची निर्गती करण्यात येणार आहे. पोटखराब क्षेत्र लागवडीलायक करण्याची मोहीम राबविण्यात येईल. तलाठी किंवा पोलीस पाटील यांच्या मदतीने गावातील मयत व्यक्तीची वारसनोंदी घ्याव्यात तसेच मतदार यादी मधून देखील मयतांची नावे कमी करणेबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत कामकाज करण्यात येणार आहे. विविध महसूलविषयक कागदपत्रे विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य शाखेमार्फत सेवानिवृत्ती प्रकरणांमध्ये संबंधित सेवानिवृत्त कर्मचारी यांना प्रकरणानुसार पेन्शन सुरू करण्याबाबतची मोहीम १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे.

            या अभियानाच्या या पहिल्या टप्प्यात गाव, मंडळ व तालुकास्तरावर शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना महसूलविषयक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अशी माहिती श्री.गायकवाड यांनी दिली आहे.

00000

समानसंधी केंद्रांतून सारथीच्या योजनांची विद्यार्थ्यांना माहिती मिळणार - उपव्यवस्थापकीय संचालक सीमा अहिरे मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

             जळगाव, दि. २८ जुलै (जिमाका) -   सारथी संस्थेमार्फत राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी - मराठा व मराठा - कुणबी यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती महाविद्यालयांमधील समानसंधी केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अशी माहिती सारथीच्या नाशिक विभागीय उपव्यवस्थापकीय संचालक सीमा अहिरे यांनी आज येथे दिली.

            पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्या अधिनस्त नाशिक विभागीय कार्यालयाच्या वतीने 'शासन आपल्या दारी' उपक्रमांतर्गत सारथी संस्थेच्या विविध योजना व उपक्रमाबाबतची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जळगाव समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयात मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती अहिरे बोलत होत्या.

            श्रीमती अहिरे म्हणाल्या, शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी समानसंधी केंद्राची स्थापना जळगाव जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये करण्यात आलेली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना सारथीच्या रोजगार, स्वयंरोजगाराच्या व शैक्षणिक योजनांची माहिती मिळणार आहे. अर्ज प्रकियेबाबत मार्गदर्शन ही करण्यात येणार आहे.

            या कार्यशाळेत सारथीच्या विविध योजना व उपक्रमांबाबत सहायक लेखा अधिकारी मनिषा पाटील यांनी ही माहिती दिली . यावेळी सर्व जिल्हा समानसंधी केंद्र समन्वयक, तालुका समानसंधी केंद्र समन्वयक उपस्थित होते.

            कार्यशाळेला जळगाव जिल्हयातील सर्व समानसंधी केंद्र समन्वयकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.

०००००

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने समन्वयाने काम करावे - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्ह्यातील कायदा-सुव्यस्था व विविध प्रश्नांचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा

            जळगाव, दि.२७ जुलै (जिमाका) - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस व  महसूल प्रशासनाने एकमेकांमध्ये समन्वय ठेवत काम करावे. संघभावनेने काम करत नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल आत्मीयता निर्माण करा. असा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला दिल्या.

            जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड , जिल्ह्यातील सर्व उपविभागीय महसूल अधिकारी, उप विभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख व क्षेत्रीय अधिकारी या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते.

            आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर  पोलीस बंदोबस्त वाढविण्यात यावा. मोहरम मिरवणूकीत वाहतूक अडथळा निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात याव्यात. असा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी पोलीस विभागाला केल्या.

            वाळू उत्खननाचा आढावा घेतांना श्री‌.प्रसाद म्हणाले की, अवैध वाळू उत्खननात सहभागी नियमित गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. वाळू उत्खननाचे छायाचित्रे मिळाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. जप्त करण्यात आलेल्या वाळूची विक्री करण्यात यावी.

            स्थानिक वादांमुळे विकासकामे थांबली असतील तर तंटामुक्ती समितीच्या सहकार्याने सुसंवाद ठेवत वाद मिटवत विकासकामांना गती देण्याचे काम प्रशासनाने करावे. तंटामुक्ती व शांतता समितींची पुनर्रचना करण्यात यावी. असा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

            समाजकल्याण, आदिवासी विकास, महिला व बालकल्याण तसेच मुलींचे वसतिगृह चालविणाऱ्या शासकीय व अनुदानित संस्थांनी मुलींच्या वसतिगृहासाठी महिला अधीक्षकांचीच नियुक्ती करावी. अशा सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

            जिल्ह्यातील पोलीस पाटीलांची पदे रिक्त राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी‌. पोलीस पाटलांसाठी ग्रामपंचायत मध्ये बसण्यासाठी व त्यांचे दप्तर ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा देण्यात यावी. पोलीस पाटलांना सक्रीय करा. महामार्गालगत असलेल्या हॉटेल, ढाब्यावर अवैध दारू विक्री व पेयास बंदी घालण्याचे काम उत्पादन शुल्क विभागाने तातडीने करावे. बालविवाह रोखण्यासाठी पथके तयार करावीत. वनक्षेत्रातील दुर्मिळ लाकडाची तस्करी रोखण्याचे काम पोलीस व वनविभागाने संयुक्तपणे करावे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाने सतर्क राहून काम करावे. यासाठी आपदामित्रांना तयार ठेवावे. असा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी यावेळी दिल्या. पोलीस अधीक्षक एम.राजकुमाय यांनी ही पोलीस प्रशासनाल सूचना केल्या.

०००००

Thursday, 27 July 2023

कापसावरील लाल्या रोगांवर कृषी विभागाचे मार्गदर्शन योग्य व्यवस्थापन करण्याचा कृषी विभागाचा सल्ला

          जळगाव, दि. २७ जुलै (जिमाका):-   कापसामध्ये पाने लाल होणे याला लाल्या रोग असे म्हणतात. या रोगांवर मात करण्यासाठी योग्य वेळी पेरणी (४० डिग्री पेक्षा कमी तापमान झाल्यावर) योग्य वेळी युरियाच्या एक किंवा दोन फवारण्या (१%).  मॅग्रेशियम सल्फेटचा वापर (०.५%), शेतात पाणी साचू नये. म्हणून पुरेसा निचरा ठेवणे,  फुले आणि बोंड वाढीदरम्यान पुरेशा पोषक द्रव्यांचा पुरवठा, वेळेवर आंतरमशागत, तण काढणी व पुरेसे सिंचन उपलब्ध करणे जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी पीक फेरपालट व आंतरपीक लागवड करून व्यवस्थापन करावे. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

             लक्षणे  - पाने लालसर होणे सुरुवातीला परिपक्व पानामध्ये दिसून येते आणि हळूहळू संपूर्ण पानांमध्ये पसरते. सुरवातीला पानांचे कडा पिवळे पडते आणि नंतर लाल रंगद्रव्य तयार होते. कालांतराने संपूर्ण पाने कोरडी होतात आणि नंतर गळून जातात

कारणे - जमिनीत नत्राची कमी उपलब्धता, पाण्याची कमतरता किंवा पाणी साचण्याची परिस्थिती तसेच विकसनशील बोंडाकरिता नत्राची अधिक गरज यामुळे पानांमध्ये नायट्रोजनची पातळी कमी होते (क्रिटिकल मर्यादेच्या खाली) रात्रीच्या तापमानात अचानक बदल किंवा घट (१५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी), मॅग्रेशियमची  कमतरता, पानातील हरीतद्रव्याचा नाश ई. मुळे अँथोसायनिन (लाल) पिग्मेटेशन वाढते.

व्यवस्थापन - लाल झालेल्या पानांमध्ये नायट्रोजन आणि  मॅग्रॅशियमचे प्रमाणे कमी होते. तसेच पानांमध्ये नत्र कमी झाल्यामुळे कार्बोहायड्रेट अधिक जमा होतात परिणामी सी/एन गुणोत्तरात वाढ होते व अँथोसायनिन रंगद्रव्य संचय झाल्याने हा विकार होतो. पान लालसर होणे कोणात्याही वाढीच्या टप्प्यावर  उद्भभवू शकते. परंतु सुरुवातीच्या अवस्थेत अधिक नुकसान दिसून येते. पीकावरील रस शोषणाऱ्या किडीमुळे पाले लाल होण्याबद्दल बऱ्याचदा गोधळ होतो. पिकाची गरज व उपलब्ध अन्नद्रव्य संबंधांवर परिणाम करणारे घटक पाने लालसर होण्यास प्रोत्साहन देतात. आणि अति पाऊस किंवा  पाऊसाचा खंड पडल्यास अधिक लक्षणे दिसून येतात. त्यानुसार योग्य ते व्यवस्थापन करावे. असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केले आहे.

                                         00000

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची थेट कर्ज योजना एक लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार ३० सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत

             जळगाव, दि.२७ जुलै (जिमाका) - मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील दारिद्रयरेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबविली जाणार आहे. या योजनेंतर्गत  एक लाख रूपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. २०२३-२४ साठी जिल्ह्यासाठी ३० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या योजनेसाठी कर्ज मागणी अर्ज वितरण १ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे यांनी केले‌ आहे.‌

            कर्जविषयक माहिती : कर्जामध्ये महामंडळाचा हिस्सा रु. ८५ हजार (८५%), अनुदान रक्कम रु. १० हजार (१०%), अर्जदाराचा सहभाग रु.५ हजार (५%) असे एकूण १ लाख रुपये कर्ज (१००%) देण्यात येते. तीन वर्ष (३६ महिने) कालावधीसाठी दर साल दर शेकडा ४ टक्के व्याजदराप्रमाणे कर्ज दिले जाते.

            उद्दिष्ट वितरण : या योजनेत साधारणपणे पुरुष ५० टक्के व महिला ५० टक्के आरक्षण राहील. ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील. राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कारप्राप्त व्यक्तिंना प्राधान्य राहील. सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसाच्या घरातील एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

पात्रता व निकष : अर्जदार मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा जातीतील असावा. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने अर्जासोबत आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षीत असावा. अर्जदाराचा Cibil Credit Score ५०० च्या वर असावा.

आवश्यक कागदपत्रे : सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला जातीचा दाखला, अर्जदाराच्या कुटुंबाचा तीन लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला, नुकतेच काढलेले दोन फोटो, अर्जदाराचा शैक्षणिक पुरावा/शाळेचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे, त्या जागा उपलब्धतेचा पुरावा ( भाडे पावती, करारपत्र), व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभव दाखला, यापूर्वी शासकीय कर्ज योजनेचा व अनुदानाचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, शॉप ॲक्ट/ग्रामसेवकाचे व्यवसाय करण्यास ना हरकत दाखला. व्यवसायासंदर्भात साहित्य/माल खरेदीचे दरपत्रक/कोटेशन, अर्जदारास महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे प्रमाणपत्रे/करारपत्रे कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

कर्ज प्रक्रिया : कर्ज प्रकरण कार्यालयाकडे प्राप्त झाल्यास, परिपूर्ण असे कर्ज प्रस्ताव लाभार्थींच्या निवडीसाठी, प्रथम लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेसाठी व मंजूरीस्तव सादर करण्यात येतील. प्राप्त झालेल्या कर्ज प्रस्तावाची संख्या उद्दिष्टांपेक्षा जास्त असल्यास, लाभार्थींची निवड चिठ्ठीव्दारे (लॉटरी पध्दतीने) करण्यात येईल. अर्जदाराच्या Cibil Credit Score‍ ५०० च्या वर आहे किंवा कसे याबाबत कर्ज मंजूर झाल्यानंतर अहवाल सादर करावा लागेल. कर्ज मंजुरीची प्रक्रिया झाल्यानंतर कर्ज प्रकरणी कर्ज वसुलीसाठी दोन सक्षम जामिनदार घेण्यात येतील. सहभाग रक्कमेपोटी ५ हजार रूपयांचा धनाकर्ष महामंडळाच्या नावे जमा करावा लागेल. कर्ज वितरणापूर्वी लाभार्थीकडून वसुलीपोटी २० उत्तर दिनांकित धनादेश घेण्यात येतील. कर्जदाराच्या वारसाचे १०० रूपयांच्या बाँडवर वारसदार म्हणून प्रतिज्ञापत्र, इतर वैधानिक दस्ताऐवजांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. ३ वर्ष (३६ महिने) कालावधीसाठी दर साल दर शेकडा ४ टक्के व्याजदराने कर्ज रक्कम वितरीत केली जाईल.

00000

Wednesday, 26 July 2023

मधमाशापालन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

            जळगाव, २६ जुलै (जिमाका ) - उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १८ जुन, २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. या उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणुक, शासनाच्या हमीभावाने खरेदी, छंद व विशेष प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. योजनेतील प्रमुख घटक  आणि त्यांची पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

           वैयक्तिक मधपाळ योजेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदार साक्षर असावा, स्वताची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षापेक्षा जास्त व १० दिवसाचे प्रशिक्षण अनिवार्य आहे. १० मधपेट्याचे मधपेट्या व इतर साहित्य घेणे अनिवार्य आहे.

      केंद्रचालक प्रगतिशिल मधपाळ योजनेत सहभागी होण्यासाठी व्यक्ति किमान १० वी पास, वय वर्ष २१ पेक्षा जास्त, अशा व्यक्तिच्या किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याहि व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेती, जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत नागरिकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. यासाठी २० दिवसाचे प्रशिक्षण अनिवार्य असून १० मधपेटया व इतर साहित्य घेणे अनिवार्य आहे.

           केंद्रचालक संस्था योजनेत सहभागी होण्यासाठी संस्था नंदणीकृत असावी, संस्थेच्या नांवे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फुट सुयोग्य इमारत असावी. शास्त्रीय पद्धतीने आग्या मध संकलन प्रशिक्षणात पारंपारिक आग्या मध संकलन करणाऱ्या कारागिरांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. छंद व विशेष प्रशिक्षणासाठी शेतकरी, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, ज्‍येष्‍ठ नागरीक, शासकिय सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांना सहभागी होता येईल.

           अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, आयटीआय जवळ, जळगाव  मोबाईल क्र. ९६२३५७८७४० अथवा संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. ५, मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा ४१२८०६, दूरध्वनी-०२९६८ २६०२६४ येथे संपर्क साधावा. असे जळगाव जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                        00000

मान्यताप्राप्त शाळांमध्ये स्थापन होणार युवा पर्यटन मंडळ शाळा व महाविद्यालयांनी उपक्रमात सहभागी होण्याचे पर्यटन विभागाचे आवाहन

 जळगाव,दि.२६ जुलै (जिमाका)- देशातील पर्यटन, समृद्ध वारसा व संस्कृती यांचे माहितीगार म्हणून जागतिक स्तरावर देशातील पर्यटनाचा प्रचार-प्रसार करतील, असे भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडविण्यासाठी युवा पर्यटन मंडळांची स्थापना करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. नाशिक विभागातील सर्व शाळा व  महाविद्यालयांनी युवा पर्यटन क्लब स्थापन करावेत. असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे नाशिक विभागीय उपसंचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून 'युवा पर्यटन मंडळे' स्थापना करण्यात येत आहेत. स्वातत्र्यांचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यालयांमध्ये ७ वीपासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी युवा पर्यटन मंडळाची स्थापना करावयाची आहे. युवा पर्यटनमंडळ स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन स्वरुप अनुदान म्हणून सन २०२३-२४ या वित्तीय वर्षांमध्ये शाळांमध्ये स्थापन केलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी १० हजार व महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी २५ हजार असे अनुदान 'प्रथम येईल त्यास प्राधान्य' या तत्त्वावर पर्यटन संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना देण्यात येईल.

युवा पर्यटन मंडळामध्ये २५ विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रत्येक शाळेतील शिक्षक मंडळाचे समन्वयक म्हणून काम पाहतील. पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीसाठी सर्व सहभागी विद्यार्थी सदस्यांचे आधार क्रमांक, शिक्षक व विद्यार्थी समन्वयकांचे आधार क्रमांक, मुख्याध्यापक व  प्राचार्यांच्या स्वाक्षरीचा प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. युवा पर्यटन क्लब स्थापनेनंतर पर्यटन स्थळांना भेटी देण्याबाबत छायाचित्रांसह अहवाल मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.

अधिक माहिती उपसंचालक कार्यालय पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदान, नाशिक ४२२००१ दूरध्वनी क्रमांक  (०२५३) २९९५४६४/२९७००४९  यावर संपर्क साधावा किंवा www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. असे आवाहन ही पर्यटन उपसंचालक यांनी केले आहे‌. 

                                                            ०००००००००

शेतात तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकवा अन् शासनाकडून बक्षीसही मिळवा राज्यांतर्गत पीक स्पर्धेत भाग घेण्याकरिता शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

  जळगाव, दिनांक २६ जुलै (जिमाका) :-  राज्यातील कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची स्पर्धा आयोजित केली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगांव जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पिकांसाठी ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रयोगशिल शेतकऱ्यांना मार्गदर्शन, इतर शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात वाढ करणे, शेतकऱ्यांचे मनोबल वाढविणे, पिकांच्या क्षेत्रात उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे व वाढ करणे हा या योजनेचा उद्देश आहे. 

या पीक स्पर्धेत खरीप हंगामामधील भात, ज्वारी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग सूर्यफुल या पिकांचा अंर्तभाव केला आहे. मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै,  भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकासाठी ३१ ऑगस्ट अंतिम दिनांक आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पिकनिहाय प्रत्येकी ३०० रूपये फी आहे. स्वतःच्या नावावर जमिनीचा ७/१२ व ८- अ  उतारा सहभागासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत. आदिवासी शेतकऱ्यांकरिता जातीचा दाखला आवश्यक आहे. 

तालुका पातळी  प्रथम बक्षिस ५ हजार रूपये,  व्दितीय- ३ हजार रूपये , तृतीय – २ हजार रूपये बक्षिस आहे. जिल्हा पातळी प्रथम बक्षिस – १० हजार रूपये, व्दितीय- ७ हजार रूपये, तृतीय – 3 हजार रूपये, राज्य पातळी  प्रथम बक्षिस -५०  हजार रूपये,  व्दितीय- ४० हजार तृतीय –३० हजार रूपये आहे. खरीप हंगाम पीक स्पर्धेत सहभागी होणेसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांना संपर्क साधावा. असे आवाहन श्री.वाघ यांनी  प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.                                              

                                                                             000000

Tuesday, 25 July 2023

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित

             जळगाव, दि. २५ जुलै (जिमाका) -  बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून व्हाट्सॲप संदेशाद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

            कृषी आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला असून हा कक्ष २४ X ७ कार्यरत आहे. तसेच शेतकरी आपली तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या इमेल पत्त्यावर देखील करु शकतात. तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.

            राज्याचे सरासरी पर्जन्यमान ४६३.८ मिमी असून या खरीप हंगामात २४ जुलै २०२३ पर्यंत प्रत्यक्षात ४५७.८   मिमी म्हणजे सरासरीच्या ९९ टक्के एवढा पाऊस पडला आहे. खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून २४ जुलै २०२३ अखेर प्रत्यक्षात ११४.६४ लाख  हेक्टर क्षेत्रावर ८१ टक्के पेरणी झाली आहे. राज्यात पेरणीच्या कामाला वेग आला असून प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. २४ जुलै पर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची ४४.०८ लाख हे. क्षेत्रावर, कापूस पिकाची ३९.८८ लाख हे. क्षेत्रावर, तूर पिकाची ९.६६ लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची ६.६९ लाख हे. क्षेत्रावर पुर्नलागवड झाली आहे.

            चालू खरीप हंगामाकरीता १९.२१ लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. राज्यात १९.३० लाख क्विंटल (१०० टक्के) बियाणे पुरवठा झाला आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावे तसेच पावती व टॅग जपून ठेवावेत, असेही कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

            प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे.

            खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते, कीटकनाशके किंवा बियाणे याबाबत तक्रार असल्यास ८४४६११७५००, ८४४६२२१७५० किंवा ८४४६३३१७५९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कृषिविषयक योजनांच्या माहितीसाठी १८००२३३४००० हा कृषी विभागाचा हेल्पलाईन क्रमांक असून शेतकरी बांधवांनी आवश्यकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

सारथी देणार जिल्ह्यातील ५०० तरूणांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

             जळगाव,दि.२५ जुलै (जिमाका) - छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी) मार्फत जिल्ह्यातील मराठा, कुणबी, मराठा - कुणबी व कुणबी - मराठा समाजाच्या ५०० तरूणांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्यात  येणार आहे. यासाठी तरूणांनी ऑनलाईन नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

             कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे‌. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी तरूणांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

            नोंदणी करतांना तरूणांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विदयालय परीसर, जी.एस.ग्राऊंड जवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत (सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत) शक्य असल्यास प्रत्यक्ष अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक- ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. असे आवाहनही श्री.मुकणे यांनी केले आहे.

00000

अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड तलाठ्याकडे जमा करण्याचे आवाहन पारोळ्यात जून ते ऑगस्ट २०२२ मधील अतिवृष्टी अनुदान मंजूर

             जळगाव,दि.२५ जुलै (जिमाका) - पारोळा तालुक्यात जून ते ऑगस्ट २०२२ कालावधीत झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, भ्रमणध्वनी क्रमांक व गट नंबर ची माहिती गावातील तलाठी किंवा कोतवाल यांच्याकडे जमा करावी. असे आवाहन पारोळा तहसीलदार डॉ.उल्हास देवरे यांनी केले आहे.

            पारोळा तालुक्यातील ५८ हजार ६७५ शेतकरी अनुदानासाठी पात्र आहेत‌. अनुदानाची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी कागदपत्रे तात्काळ सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रणालीवर माहिती भरावयाची असल्याने विलंब टाळावा. माहिती लवकरात लवकर उपलब्ध झाली तर अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर जमा करणे प्रशासनाला सोयीचे होईल. असे‌ ही श्री. देवरे यांनी सांगितले आहे.

०००००

Monday, 24 July 2023

नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार प्रशासन पारदर्शक व गतिमान करणार - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

 






            जळगाव, दि. २४ जुलै (जिमाका):- जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज (दि.२४ जुलै) पदभार स्वीकारला. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले.श्री. आयुष प्रसाद यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते.   भारतीय प्रशासकीय सेवा २०१५ बॅचचे ते अधिकारी आहे‌त‌. धाराशिव (उस्मानाबाद) व खेड (पुणे) येथे परीक्षाविधीन म्हणून प्रांताधिकारी  पदावर कामकाज तसेच अकोला येथे जिल्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर त्यांनी यापूर्वी काम केले आहे.  त्यांच्या आजपर्यंतच्या प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी या पदावर ते प्रथमच जळगाव येथे कामकाज सांभाळणार आहेत‌.

जिल्हधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री.प्रसाद यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती, अतिवृष्टी आदी बाबींचा आढावा घेतला. जळगाव जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पन्नू , पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते .

यावेळी श्री.प्रसाद यांनी जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, माहिती -तंत्रज्ञानाच्या सोबतीला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ई-गव्हर्नस द्वारे कारभार करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर राहणार आहे. जिल्हा प्रशासनाचे कामकाज पारदर्शक व गतिमान पद्धतीने चालवण्यात येईल. भूसंपादनाअभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात येतील. वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. सण-उत्सवाच्या काळात जिल्ह्यात शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यावर प्रशासनाचा भर राहील. एक गाव-एक गणेशोत्सव ची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणार येईल. जिल्ह्यात मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नव मतदारांनी मतदार म्हणून नोंदणी करावी‌.असे आवाहन ही श्री.प्रसाद यांनी यावेळी केले.

००००००


Saturday, 22 July 2023

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क रहावे. -पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश ! कृषीसह विविध खात्यांच्या आढावा बैठकीत तिन्ही मंत्र्यांनी दिलेत निर्देश

 




            जळगाव, दि.२२ जुलै (जिमाका वृत्तसेवा) - शासन शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ही भावना सर्वसामान्यांमध्ये रूजविण्यासाठी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत सर्तक रहावे. अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.

            शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत कृषी विभाग आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजीत बैठकीत पालकमंत्री बोलत होते. या बैठकीला ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. यात पालकमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन सर्वतोपरी खंबीरपणे उभे असल्याचे नमूद केले. तर सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आपत्कालीन उपाययोजनांसाठी प्रशासनाने सज्ज राहण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या.

            जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर तसेच इतर तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवैध, बोगस खतांमुळे ही शेती पिकांचे नुकसान झाले आहे. कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच अलीकडे होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यांमध्ये मोठी हानी झाली असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाचा पालकमंत्र्यांसोबत ग्रामविकास मंत्री व मदत, पुनर्वसन मंत्र्यांनी व्यापक आढावा घेतला. आणि प्रशासनाला सूचना केल्या.

            या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार आदींसह विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

            पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,  कपाशीवरील लाल्या रोगाच्या प्रादुर्भावापासून  संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍यांसाठी जनजागृती करावी. टोल फ्री क्रमांक जाहीर करावा. नॅनो युरियाची फवारणी केली पाहिजे यावर शेतकर्‍यांमध्ये जागृती करावी. अवैध खत विक्रेते व कंपन्यांवर कारवाई करावी्. सततचा पाच दिवस पडणारा पाऊस अतिवृष्टी म्हणून ग्राह्य धरावा.

            या बैठकीत विविध महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने आधी पाऊस पडला नसला तरी अलीकडच्या काळात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ९१ टक्के पेरण्या आटोपल्या असल्याची माहिती देण्यात आली. तर कपाशीची लागवड ही उद्दीष्टापेक्षा जास्त म्हणजे १०८ टक्के झाल्याचे नमूद करण्यात आले. जिल्ह्यात दोन महिन्यातील पावसाचा आढावा देखील याप्रसंगी घेण्यात आला. यात जुलैमध्ये आजवर होत असलेल्या सरासरी पावसापेक्षा १३६ टक्के पाऊस जास्त झाला असून जिल्ह्यातील ८६ पैकी ८२ मंडळांमध्ये एकूण सरासरीच्या पन्नास टक्कयांपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जूनपासून आजवर पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यांना प्रत्येकी चार लाख रूपये याप्रमाणे शासकीय मदत प्रदान करण्यात आली आहे. तर ३६ गुरांचा मृत्यू झाला असून यासाठी ७ लक्ष २२ हजार रूपये दिलेले आहेत. यावल आणि रावेर तालुक्यातील ३३ गावांमध्ये सुमारे साडेतीनशे घरांची अंशत: हानी झाली असून यासाठी अंदाजे चौदा लक्ष रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तर अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता आपत्कालीन पथक तयार करण्यात आले असून त्यांना बचावाचे साहित्य प्रदान करण्यात आल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले.

            जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सरदार कंपनीच्या खते आणि बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची हानी झाली असून या कंपनीवर कारवाई करण्यात आलेली आहे. बोगस बियाणे आणि खतांची विक्री खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला. शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तातडीने मदत देण्यात यावी. ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा प्रदान करण्यात यावा असे निर्देश देखील त्यांनी दिलेत. तर ना. गिरीश महाजन यांनी ग्रामविकासमधील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मुख्यालयात थांबण्याचे निर्देश दिलेत.

            एक रूपयात पीक विमा योजनेचे अर्ज  भरून घेण्यासाठी जिल्ह्यात गावनिहाय मोहीम राबविण्यात यावी. दररोज किमान ४० हजार शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्याचे काम कृषी विभागाने करावे. शेतकऱ्यांकडून अवास्तव पैसे आकारणार्‍या सेतू सेवा केंद्रांवर कारवाई करा. अशा सक्त सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

            जिल्ह्यात जरी मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असला तरी धरणातील पाणी पातळी कमी आहे. तेव्हा पाण्याचे काटकसरीने वापर करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे. जिल्ह्यात राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू आहे. याला प्रतिबंध घालण्याचे काम उत्पादन शुल्क विभागाने करावे. जळगाव शहरातील अंतर्गत रस्ते व गटारींचे कामे करण्यात यावेत. अशा सूचना ही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिल्या.

            ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, अतिवृष्टीमुळे जसे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे तसाच प्रकारे बोगस खते व बियाणे यामुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. याला आळा घालण्यासाठी शासन लवकरच कायदा करणार आहे्. पोलीस विभागाने ही अशा उत्पादकांवर कडक कारवाई करावी्.  खतांची गुणवत्ता विभागाने तपासणी करावी.  केळी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी लवकरच केळी विकास महामंडळाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील. गळके छत असलेल्या शाळांची दुरूस्ती करण्यात यावी. महावितरण विभागाने यंत्रणा सक्षम ठेवत अखंडीत वीज पूरवठा करण्याचे काम करावे्. ग्रामविकास यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. अशा सूचनाही ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिल्या.

            मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले, जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रस्ताव तयार करावेत. या प्रस्तावांना मान्यता व निधी पुरविण्याचे काम केले जाईल् .

            यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार मंगेश चव्हाण व आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

00000

विद्यापीठात कवयित्री बहिणाबाईंचा पुतळा उभारण्यात येईल- पालकमंत्री गुलाबराव पाटील

 










 

तरूणांनी व्यसनांपासून दूर रहावे - ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

जी-२० युवा संवाद - भारत @२०४७ संमेलना'चे उद्घाटन

 

            जळगाव, दि.२२ जुलै (जिमाका) - कवयित्री बहिणाबाई चौधरी पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन मधून एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच पुतळाही उभारण्यात येणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. जी-२० संमेलनाच्या रूपाने तरूणांसाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. देशाला शिखरावर पोहचविण्याचे काम तरूणच करू शकतात. अशी आशा ही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

            कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित 'जी-२० युवा संवाद - भारत @२०४७ संमेलना'चे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रिय संचालक डी‌. कार्तिगेन, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश मोरखाडे , नितीन झाल्टे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील म्हणाले की, तरूणांनी प्रगती करण्यासाठी शिस्त अंगिकारण्याची‌ गरज आहे. आजचा तरूण सोशल मिडियात अडकला आहे‌. भारतातील तरूणाची आता जगाला कौशल्य रूपी मनुष्यबळाच्या रूपाने गरज आहे.

            आज तरूणांमध्ये प्रतिभा आहे. तरूणांना दिलेले उद्दिष्ट तरूण निश्चित पूर्ण करणार आहेत.  केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शिक्षणाकरिता आज भरपूर निधी दिला जात आहे.  तरूण देशाचे भवितव्य आहे. तरूणांनी संधीचे सोने करावे. असे ही पाटील यांनी सांगितले.

            ग्रामविकास मंत्री श्री.महाजन म्हणाले की, भारत तरूणांचा देश आहे. जगाला कौशल्ययुक्त तरुणांची गरज आहे. ही गरज भारताचे तरूण पूर्ण करू शकतात. यासाठी तरूणांनी कौशल्य आत्मसात केले पाहिजेत. गाव सोडण्याचे धाडस केले पाहिजे. तरूणांनी कामात प्रामाणिकपणाना अंगिकारला पाहिजे. मनामध्ये जिद्द ठेवून काम केले पाहिजे‌. संकटाला न घाबरता धाडस करून तरूणांनी काम केले पाहिजे. 

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या काळात तरूणांच्या शैक्षणिक व सर्वांगिण हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. तरूण देशाचे भविष्य आहे. तरूणांनी स्वत:ला ओळखावे. तरूणांनी व्यसनांपासून दूर रहावे. अशी अपेक्षाही श्री.महाजन यांनी यावेळी व्यक्त केली‌.

            कुलगुरू श्री‌ माहेश्वरी यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पंचप्रण संकल्पनेवर तरूणांनी काम करावे. युवकांमधील उर्जेचा वापर करण्याचे आपल्यापुढे आवाहन आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सक्षमपणे करत आहे.

            तासिका नियमित करा, कॉपी न करता परीक्षा द्या. जीवनात शिस्तपणा असला पाहिजे. चांगल्या मित्रांचा गोतावळा तयार करा, प्रमाणिकपणा जपा, ज्ञान, कौशल्य व प्रतिभेचा वापर करून देशाला विकासाकडे घेऊन जाण्याचे काम तरूणांनी करावे. अशा शब्दात कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

            राजेश पांडे यांनी बीज भाषण केले. श्री.पांडे म्हणाले की, २०४७ पर्यंत जगातील सर्वात जास्त तरूणांचा देश भारत असणार आहे. नरेंद्र मोदींनी दिलेल्या पंचप्रण संकल्पनेवर तरूणांनी काम करायचे आहे. भारताची युवाशक्ती आपल्या कौशल्यावर जगाचं नेतृत्व करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात युवकांचे कौशल्य व कल्पनाशक्तीला वाव देणारा अभ्यासक्रम असणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुण्याहून महाराष्ट्रातील ५ लाख तरूणांशी संवाद साधणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत या संमेलनाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील अडीच लाख तरूणांपर्यंत विकसित भारताचा संकल्प पोहोचला पाहिजे. अशी अपेक्षा श्री.पांडे यांनी यावेळी व्यक्त केली.

            भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या उद्घाटनपूर्वी विद्यापीठ आवारात तिरंगा रॅली काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना दिलेल्या अमृत काळातील पंचप्रण संकल्पनेवर हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

            यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण यांनीही युवकांशी संवाद साधला.

00000

Friday, 21 July 2023

जिल्ह्यात मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रमास‌ आजपासून सुरुवात

 जळगाव,दि.२१ जुलै (जिमाका) - निवडणूक आयोगाने निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर एका बाजूने मतदार यादी पुनरीक्षण, तर दुसरीकडे जिल्हा पातळीवर मतदान यंत्र तपासणीचे काम सुरू केले आहे. मतदार यादी पुनरीक्षणासाठी बीएलओ (केंद्रस्तरीय मतदान अधिकारी) आता आज , २१ जुलैपासून 'होम टू होम' जाणार आहेत. या मोहिमेत मतदार यादी दुरुस्तीशी संबंधित कामे पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली आहे. 

एक जूनपासून मतदार यादी पुनरीक्षणपूर्व कार्यक्रम सुरू झाला आहे. तो १६ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. मतदार यादीसाठी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. आजपासून जिल्ह्यातील साडेचार हजार बीएलओ हे मतदारसंघातील प्रत्येक घराघरात जाणार आहेत. ८० वर्षांवरील मतदारांची यादी तयार करणे, मृत मतदारांचा मृत्यू दाखला घेऊन त्यांचे नाव यादीतून वगळणे, स्थलांतरीत कुटुंबाकडून फॉर्म भरून घेणे, १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलामुलींचे नवीन मतदार नोंदीसाठी कागदपत्र स्वीकारणे आणि मतदार यादीशी आधार लिंक करण्यासाठी आधार कार्डची माहिती घेणे आदी कामे करण्यात येणार आहेत. २१ जुलै ते २१ ऑगस्ट ही मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान, १६ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष नवीन मतदार नोंदणीची कार्यवाही सुरू होणार आहे.

१ जानेवारी २०२४ वर आधारीत ही नोंदणी होणार आहे. ५ जानेवारी २०२४ रोजी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. नवमतदार नोंदणीची विशेष मोहिमही राबविण्यात येणार आहे. विशेष करून दिव्यांग, तृतीयपंथी, महिला मतदारांच्या नोंदणीवर भर देण्याच्या सूचना आहेत. प्रत्येक महाविद्यालयांमध्येही १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक व युवतींचे प्रबोधन करून मतदार नोंदणीचे आवाहन करण्यात येणार आहे.

२१ जुलैपासून बीएलओ घरोघरी येणार असून, त्यांना माहिती संकलित करण्याच्या सूचना आहेत. आयोगाकडून हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करून मतदार यादीतील आपल्या नाव तपासणी, दुबार नाव वगळणे याकरिता सहकार्य करावे‌. असे आवाहन ही श्री.चिंचकर यांनी केले आहे.

                                                                           00000