Tuesday, 31 March 2020

केळी वाहतुक करणाऱ्या वाहनांना सायंकाळी 7 वाजेनंतरही इंधन मिळणार – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे


            


          जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 30 - जिल्ह्यात सध्या केळीचा हंगाम सुरु आहे. जिल्ह्याच्या रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर व इतर भागातून मोठ्या प्रमाणात परराज्यात केळी पाठविण्यात येते. त्यांना इंधनाची अडचण येवू नये. याकरीता अशा वाहनांना पेट्रोलपंप चालकांनी सांयकाळी 7 वाजेनंतरही इंधन उपलब्ध करुन द्यावे. अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्यात.
            कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, पोलीस उप अधिक्षक दिलीप पाटील, महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. 
            जिल्ह्यात सध्या इतर जिल्ह्यातून पायी येणाऱ्या नागरीकांची संख्या वाढली आहे. अशा नागरीकांची  एकाच ठिकाणी गर्दी होवू नये याकरीता त्यांना एकाच ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात यावे. त्यांना चहा, पिण्याचे पाणी, नाश्ता, जेवण व आंघोळीची व्यवस्था करावी. अशा नागरीकांची संख्या अमळनेर, मुक्ताईनगर व चाळीसगाव तालुक्यात मोठ्या संख्येने असल्याने याची संबंधित नोडल अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
            जिल्ह्यातील काही खाजगी डॉक्टर ओपीडी करत नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या नागरीकांची संख्या वाढली आहे. याबाबत आयमाला पत्र द्यावे तसेच नर्सिग स्टॉफ कामावर येत नसल्याने तसे नर्सिंग फेडरेशनला कळवावे. त्याचबरोबर निमालाही कळविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्यात.
            शहरी व ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर वितरणाच्या वेळा ठरविण्यात आल्या आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात सर्वांना पेट्रोल देण्याचे तर शहरी भागात अत्यावश्यक सेवांनाच पेट्रोल वितरण करण्याचे आदेश आहे. असे असूनही काही ठिकाणी नागरीकांची अडवणूक केली जात आहे. तर शहरी भागात अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली काही नागरीक पेट्रोल मिळण्यासाठी आग्रही असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची दक्षता पुरवठा विभागाने घ्यावी.
            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी डॉक्टरांना सेवा करण्याची इच्छा असल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व जिल्हा रुग्णालयात आपली सेवा देता येईल. शहरात अनेक भागात सकाळी व संध्याकाळी नागरीक फिरण्यास जातात. अशा नागरीकांनी मुख्य रस्त्यांवर एकत्रित फिरु नये. सध्या अनेक भागात आंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्यामार्फत सर्व्हेक्षण सुरु आहे. सर्व्हेक्षण करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाने मास्क व सॅनेटायझर पुरविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
            जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असून एका संशयिताचा मृत्यु झाला आहे. याच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करुन घराबाहेर पडू नये. आपली व कुटूंबाची काळजी घ्यावी. असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरीकांना केले आहे.
00000


जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार


            जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 31 - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 142 (1) अन्वये संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील सीएल-2, सीएल-3, सीएल/एफएल/टीओडी-3,  एफएल-1, एफलएल-2, एफएलबीआर-2, टीडी-1, इत्यादी देशी/ विदेशी मद्य/बीअर/ताडी विक्री अनुज्ञप्त्या 1 एप्रिल ते 14 एप्रिल, 2020 अखेर पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
            या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्र दारुबंदी कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र असतील. या आदेशाचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती तात्काळ रद्द करण्यात येईल. असेही डॉ. ढाकणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
00000

कोरोना संशयिताच्या मृत्युचे कारण अद्याप निश्चित नाही - डॉ भास्कर खैरे


            जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 31 :- कोरोना संशयित म्हणून काल जिल्हा सामन्य रुग्णालयातील कोविड-19 वार्डमध्ये दाखल झालेल्या व्यक्तींचा रात्री 11 वाजेच्या सुमारास मृत्यु झाला आहे. सदर व्यक्तीच्या मृत्युचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जावू नये. असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी केले आहे.
            सोमवार, दि. 30 मार्च, 2020 रोजी सायंकाळी 6.30 वाजता जिल्हा सामन्य रुग्णालयातील कोविड-19 वार्डमध्ये 52 वर्षाच्या पुरुष रुग्णाला कोविड-19 संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. हा रुग्ण उपचारादरम्यान रात्री 11.00 वाजता मृत्यू पावला आहे. या रुग्णाचे स्वॅबचे नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत कोविड-19 च्या तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या नमुन्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला आहे हे निश्चित करता येत नाही. असे  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने निगेटिव्ह नागरीकांनी घाबरुन न जाता जागरुक राहणे गरजेचे


            जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 31:- दोन दिवसापूर्वी जळगावमध्ये कोरोना पॉझिटिव्ह एक रुग्ण आढळून आला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाच्यावतीन या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण 26 संशयितांचे नमुने घेतले होते. सदरचे नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत कोविड-19 च्या तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या नमुन्यांचाही समावेश होता.
            या नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून आज प्राप्त झाला असून त्यामध्ये सर्व संशयितांच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी घाबरुन न जाता जागरुक राहणे गरजेचे आहे. असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

Monday, 30 March 2020

होम क्वारंटाईन नागरीक बाहेर फिरताना दिसल्यास पोलीसांना कळविण्याचे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांचे आवाहन


            जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 30 - परदेशातून अथवा मुंबई व पुण्यातून अनेक नागरीक जिल्ह्यात आले आहे. यापैकी काही नागरीकांना होम क्वारंटाईनच्या सुचना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या आहे. या नागरीकांनी घराबाहेर पडू नये अशा सुचना दिलेल्या असूनही असे कोणी नागरीक घराबाहेर फिरताना आढळल्यास नागरीकांनी त्याची माहिती नजिकच्या पोलीस स्टेशनला द्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.
            कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, पोलीस उप अधिक्षक दिलीप पाटील, उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. 
            जिल्ह्यात एक कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यात परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी झाली आहे का याबाबतची खात्री करावी. तसेच मुंबई व पुण्याहून आलेल्या नागरीकांमध्ये कोरोना सदृश काही लक्षणे आढळून येत असल्यास त्यांचीही तातडीने तपासणी करावी. ज्या नागरीकांना होम क्वांरटाईन ठेवण्यात आले आहे त्यांनी बाहेर फिरु नये. परदेशातून आलेल्या सर्व नागरीकांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी नागरी व ग्रामीण भागासाठी नोडल अधिकारी नेमले आहे. त्यांनी याबाबतची खात्री करावी. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात पायी व वाहनांनी आलेल्या नागरीक जिल्ह्याबाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यांची राहणे, खाणे, औषधे व इतर व्यवस्था संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांनी सामाजिक संस्थाच्या मदतीन शासनाच्यावतीने करावी.
            पाल येथील चेकपोस्टच्या बाहेरील गावांतून काही नागरीक ये-जा करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्याठिकाणी  कडक तपासणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी पोलीस व परिवहन विभागास दिल्यात. त्याचबरोबर एमआयडीसी मध्ये राजस्थानचे तर चोपडा तालुक्यात बडवाणी येथील काही नागरीक कामानिमित्त आलेले असून ते अडकून पडले आहे त्यांचीही व्यवस्था करावी. कोणीही गरीब व गरजू नागरीक उपाशी पोटी राहू नये यासाठी त्यांना आटा व तांदूळ उपलब्ध करुन द्यावे. भुसावळ मध्य रेल्वेच्यावतीने एक हजार फुड पॉकेट देण्याची तयारी दर्शविली असल्याने सामाजिक संस्थाऐवजी त्यांचेकडून जेवण उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन करावे.
            जळगाव येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सकाळी होणारी गर्दी रोखण्यासाठी बाजार समितीस पंधरा खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे तेथे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. नागरीकांना आवश्यक ते अन्न तातडीने उपलब्ध व्हावे याकरीता डॉमिनोज पिझ्झा या दुकानाला फक्त होम डिलीव्हरी देण्यासाठी परवागनी देण्यात यावी. रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या नागरीकांची तपासणी तातडीने करण्यात यावी. त्यांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही याची दक्षता आरोग्य यंत्रणेने घ्यावी. यासाठी तीनपाळीत वैद्यकीय अधिकारी नेमावे. ग्रामीण भागातील पेशंट उपजिल्हा रुगणालय, ग्रामीण रुग्णालयातच क्वारंटाईन ठेवण्यात यावे. आवश्यकता भासली तरच जिल्हा रुग्णालयात आणण्यात यावेत अशा सुचनाही जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिल्यात.
ग्राहकानी बीलाची मागणी करावी
            कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही जीवनावश्यक वस्तुंचे दुकानदार मालाची साठेबाजी करीत असून वाढीव भावाने माल विकत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनातर्फे पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तथापि, नागरीकांनीही वस्तु घेतल्यानंतर बीलाची मागणी करावी. जेणेकरुन मुळ किंमतीपेक्षा जादा रक्कम घेणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करणे सोईचे होईल. तसेच अशा दुकानदारांवर गुन्हा दाखल करता यावा याकरीता प्रशासनातर्फे बनावट ग्राहक पाठविण्याचेही नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले.
            लॉकडाऊनच्या काळात नागरीकांनी घराबाहेर पडू नये.  नियमांचे तंतोतंत पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी जावू नये. आपली व कुटूंबाची काळजी घ्यावी. असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरीकांना केले आहे.
0000