Thursday, 5 March 2020

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी मास्कऐवजी रुमाल वापरावा -जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे


      नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही.
      समाजमाध्यमांवर कोणीही चुकीचे संदेश पसरवू नये.

            जळगाव, (जिमाका) दि. 5 : कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे सर्वसामान्यांनी प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा. या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यशासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळला नाही.  त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. तसेच समाजमाध्यमांवर कोणीही चुकीचे संदेश पसरवू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले.
            कोरोना विषाणूबाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांची व्हीडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी उपस्थितांना सूचना केल्यात. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांचेसह जिल्हा परिषद व आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
            केंद्र शासनाच्या सुचनेनुसार चीनसह 12 देशांमधून येणाऱ्या विमानातील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. तसेच सर्व बंदरांवर येणाऱ्या जहाजांमधील प्रवाशांची देखील तपासणी केली जात आहे. एकाच ठिकाणी जास्त व्यक्ती जमा होणार नाही याची दक्षता घेतानाच खबरदारी म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक वार्ड तातडीच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याची सूचनाही मुख्य सचिव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
            शिंकणे, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे आवश्यक असून खोकतांना, शिंकताना नाका तोंडावर रुमाल ठेवावा, दिवसातून किमान चार ते पाच वेळा हात साबणाने स्वच्छ धुवावेत. यात्रा, जत्रा व गर्दीच्या ठिकाणी नागरीकांनी जाण्याचे टाळावे, एकमेकांशी बोलतांना अंतर ठेवून बोलावे, तसेच आयोजकांनी गर्दीच्या कार्यक्रमांचे आयोजन शक्यतो करु नये. कोरोनाच्या सर्दी, ताप, खोकला या लक्षणांनुसार खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेणारे रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवावे. त्याचबरोबर रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
            कोरोनामुळे कोणीही घाबरुन जाण्याची आवश्यकता नसल्याचे सांगतानाच रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण लक्षात घेता मास्क नाही तर दुचाकी चालविताना हेल्मेट वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी नागरीकांना केले.
00000

No comments:

Post a Comment