Friday, 8 May 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाक्यावर कडक उपाययोजना राबवा - * पालकमंत्री गुलाबराव पाटील* मुक्ताईनगरातील आढावा बैठकीत उपाययोजनांचा घेतला आढावा








    जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 8- कोरोना विषाणू संसर्ग जगभर थैमान घालत असताना बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) च्या सीमेवरील रावेर, बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात अद्यापपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही याबद्दल सर्व तालुक्यांच्या यंत्रणांचे कौतुक करतांनाच यापुढेही या तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होता कामा नये. याकरीता जिल्हा व राज्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर कडक तपासणी करावी. अशा सुचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्यात.
     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयात रावेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्याच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, नगराध्यक्षा नजमा तडवी, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव, मुक्ताईनगर तहसीलदार शाम वाडकर, बोदवड तहसीलदार रवींद्र जोगी, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे,  मुक्ताईनगर मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, बोदवड मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, तालुका कृषि अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ योगेश राणे, गटविकास अधिकारी सुभाष मावळे यांचेसह मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील महसूल, आरोग्य विभाग, कृषी विभाग, नगरपंचायत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .
     यावेळी पालकमंत्री म्हणाले की, नागरीकांनी स्वत:ची व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी. कोणीही लॉकडाऊनमध्ये विनाकारण रस्त्यांवर फिरु नये. जे नागरीक मास्क वापरणार नाही त्यांना दंड करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्यात. कोरोनावर मात करण्यासाठी निधीची कमतरता नाही. त्यामुळे यंत्रणेला आवश्यक असणाऱ्या बाबी तातडीने उपलब्ध करुन देवू. परंतु या तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून घ्यावी. या तालुक्यांमधील दवाखान्यांमध्ये लागणारे साहित्य तातडीने उपलब्ध करुन देण्यात येईल. पोलीसांच्या मदतीला होमगार्ड उपलब्ध करुन देण्याबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्याला  जे होमगार्ड उपलब्ध झाले आहे. त्यामधून या तालुक्यांसाठी पाठविण्यात येतील. यावेळी पालकमंत्री यांनी पाणीटंचाई, खरीप हंगामासाठी लागणारी बीयाणे, खते, किटकनाशकांची उपलब्धता याबात कृषि अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. बीयाणे खरेदीसाठी गर्दी होवू नये याकरीता शेतकऱ्यांना बीयाणे बांधावर देण्याबाबतचे नियोजन करा. पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव तातडीने सादर करा. जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील नागरीक अडकून पडलेले आहे. त्यांचेसाठी बसेस सोडण्याचे नियोजन शासन करीत असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.
     यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी रेशनवरील धान्य वाटपात कोणीही वंचित राहू नये, केळी वाहतुक करणाऱ्या वाहनांना पासेस उपलबध करुन मिळावे, डॉक्टरांना आवश्यक सुविधा मिळण्याची तर आमदार चंद्रकांत पाटील  यांनी तालुक्याच्या काही भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास विहिर अधिग्रहण व्हावे, जुन्या पाणीपुरवठा योजनांची कामे सुरु व्हावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्याबाबत सुचना केल्यात.
     यावेळी कृषि विभागाच्यावतीने शेतकरी गटांमार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना बीयाणे, खते शेतकऱ्यांच्या बांधावर पुरविण्यात येत आहे. याचा शुभारंभ पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
0000

No comments:

Post a Comment