Tuesday, 30 June 2020

लिपीक रामकृष्ण वना कोळी सेवानिवृत्त





            जळगाव, दि. 30 - जिल्हा माहिती कार्यालयातील लिपीक नि टंकलेखक श्री. रामकृष्ण वना कोळी आज 26 वर्षाच्या प्रदिर्घ शासकीय सेवेनंतर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्ताने              श्री. कोळी यांना जिल्हा माहिती कार्यालयातर्फे स्नेहपुर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी श्री. विलास बोडके यांनी श्री. कोळी यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्यात.
            यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी विनोद पाटील, दिलीप खैरनार, श्रीमती उषा लोखंडे, पंकज ठाकूर व उपसंचालक (माहिती) नाशिक यांचे प्रतिनिधी राजेंद्र येवले तसेच सहनिबंधक मुद्रांक श्री. सुनिल पाटील हे उपस्थित होते.
            श्री. रामकृष्ण कोळी यांनी सप्टेंबर, 1994 मध्ये जळगाव येथे आपल्या शासकीय सेवेस प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक येथे काम केले. श्री. कोळी हे जिल्हा माहिती कार्यालय, जळगावच्या अधिनस्त उप माहिती कार्यालय, चाळीसगाव येथे लिपीक नि टंकलेखक या पदावर कार्यरत होते. 
                                                                             0000

जळगाव जिल्ह्यात 1 लाख 41 हजार शेतकऱ्यांना 569 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप


            जळगाव, दि. 30 (जिमाका) - खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध बँकामार्फत पीक कर्जाचे वाटप करण्यात येते. राज्य शासनाच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बॅका, ग्रामीण बँका, खाजगी बँकांच्या व इतर बँकांच्या माध्यमातून चालू खरीप हंगामासाठी आतापर्यंत 1 लाख 41 हजार 44 शेतकऱ्यांना 569 कोटी 13 लाख 43 हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांनी दिली आहे.
            शेतकऱ्यांना खरीप हंगामात आवश्यक असणारी बी-बीयाणे व खते खरेदी करता यावी तसेच मशागतीची कामे करता यावी याकरीता महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या व इतर शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी पीक कर्ज उपलब्ध होण्याबाबत नियोजन करण्याच्या सुचना राज्य शासनातर्फे सहकार विभागास दिल्या होत्या. त्यानुसार राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तसेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबत जिल्हा उपनिबंधक श्री. राठोड यांचेशी चर्चा करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज उपलब्ध होईल याबाबत नियोजन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सहकार विभागाने जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती मिळालेले शेतकरी तसेच पीक कर्ज मिळण्यास असणारे शेतकरी यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्ह्यातील बँकर्सची बैठक घेऊन सुचित केले होते.
            जिल्ह्यास सन 2020-2021 साठी खरीप कर्ज वाटपाचा 2892 कोटी 68 लाख 23 हजार रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. तर रब्बी हंगामासाठी 447 कोटी 22 लाख 36 रुपयांचा लक्षांक असा खरीप व रब्बी हंगामासाठी एकूण 3339 कोटी 90 लाख 59 हजार रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत खरीप हंगामासाठी 569 कोटी 13 लाख 43 हजार रुपयांचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे.
            या पीक कर्ज वाटपात सर्वाधिक वाटा हा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचा असून या बँकेने 1 लाख 35 हजार 43 शेतकऱ्यांना 442 कोटी 16 लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांनी 4 हजार 335 शेतकऱ्यांना 69 कोटी 1 लाख 77 हजार रुपये, ग्रामीण बँकांमार्फत 161 शेतकऱ्यांना 1 कोटी 80 लाख 39 हजार रुपये, खाजगी बॅकांमार्फत 1 हजार 505 शेतकऱ्यांना 56 कोटी 15 लाख 27 हजार रुपये याप्रमाणे सर्व बँकामिळून जून, 2020 अखेर 569 कोटी 13 लाख 43 हजार  रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केलेल्या 1 लाख 35 हजार 43 शेतकऱ्यांपैकी 86 हजार 213 कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना 269 कोटी 28 लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे.
            जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जुन, 2020 अखेर अपलोड केलेली कर्ज खाती 1 लाख 74 हजार 107 असून विशिष्ट क्रमांकासह कर्ज खाती 1 लाख 59 लाख 837 इतकी आहेत. आधार प्रमाणीकरण झालेली एकूण खाती 1 लाख 50 हजार 673 एवढी आहेत. तर आधार प्रमाणीकरण शिल्लक असलेली खाती 9 हजार 164 एवढी आहेत. तक्रार असलेली एकूण खाती 7 हजार 200 आहेत. जिल्हा तक्रार निवारण समितीद्वारे तक्रार निवारण झालेल्या खात्यांची संख्या 1 हजार 246 असून तहसिलदारांद्वारे तक्रार निवारण झालेली खाती 2 हजार 668, तहसिलदारांकडे तक्रार निवारणासाठी प्रलंबित खाती 1 हजार 36 एवढी  आहे.
            जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत आतापर्यंत एकूण 1 लाख 27 हजार 683 लाभार्थ्यांना 729 कोटी 87 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला असल्याची माहितीही श्री. राठोड यांनी दिली आहे.
0000

Monday, 29 June 2020

जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या बघूनच डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोविड रुग्णांसाठी अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेणार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील




            जळगाव, (जिमाका) दि. 29 - जिल्ह्यात सुरु असलेल्या कोरोना संशयित रुग्ण शोध मोहिमेत आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या लक्षात आल्यानंतर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील संपूर्ण खाटा या कोविड रुग्णांसाठी अधिग्रहीत करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
            येथील नियोजन भवनात जळगाव जिल्हा कोरोना विषाणू संसर्गास प्रतिबंध, उपचार व उपाययोजनांची आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, खासदार उन्मेश पाटील, माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, जिल्ह्यात सध्या संशयित रुगण शोध मोहिम सुरु आहे. या मोहिमेतंर्गत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण सापडत आहे. येत्या पंधरवड्यात जिल्ह्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास त्यांचेवर तातडीने उपचार करण्यासाठी येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुगणालयातील सर्व खाटा या अधिग्रहीत करण्यात येऊन बाधित रुग्णांवर उपचार करावे लागतील. तर या कालावधीत नॉन कोविड रुग्णांची गैरसोय होवू नये याकरीता त्यांचेवर उपचारासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय हे नॉन कोविड रुग्णालय म्हणून घोषित करावे लागेल. लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन यांचे जिल्ह्यातील मृत्युदर कमी करण्यास प्राधान्य आहे. याकरीता येथील कोविड रुग्णालयात 300 बेड ऑक्सिजनयुक्त करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. सध्या 40 बेड आयसीयुचे तयार आहे, 60 खाटांचे ऑक्सिजन बेडचे काम सुरु आहे. 180 ऑक्सिजन पाईपलाईनचे बेड तयार होत आहे. जिल्ह्यातील अनेक आमदारांनी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिल्या आहे. या निधीतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्याठिकाणी 50 ऑक्सीजनयुक्त बेड तयार करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर अनेक नागरीक कोविड सेंटर अथवा सामाजिक विलगीकरणाच्या ठिकाणी येण्यास घाबरतात. अशा नागरीकांसाठी तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध असल्यास रुग्णांच्या खर्चाने खाजगी हॉटेलमध्ये राहून त्यांचेवर उपचार करण्याचे नियोजन असून त्यासाठी हॉटेल निश्चित करण्यात येणार आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त नागरीक तपासणी करुन घेण्यास पुढे येतील. त्याशिवाय आरोग्य यंत्रणेतील अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवूनही फारसा प्रतिसाद न लाभल्याने पदे रिक्त आहे. ही पदे तातडीने भरण्यासाठी दर मंगळवारी भरती प्रक्रिया राबविण्यात येऊन पदे भरण्यात येतील. तसेच आमदार निधीतून सुचविलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी यंत्रणेला केल्यात. तसेच नागरीकांनी घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले.
            बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची माहिती देतांना ट्रेसिंग, टेस्टींग, आणि ट्रिटमेंट या थ्री टी चा वापर करुन संशयित रुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत असून टेस्टिंग वाढल्या तर रुग्ण वाढतील. परंतु लवकर निदान, लवकर उपचार यामुळे जास्तीत जास्त रुग्ण बरे होतील. जेणेकरुन जिल्ह्याचा मृत्युदर कमी होण्यास मदत होईल. सध्या जिल्ह्याचा मृत्युदर हा 8.4 % वरुन 6.8% आला आहे. शिवाय नॉनकोविड रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वॅब तपासणी प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्याबरोबरच खाजगी प्रयोगशाळेकडेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तपासण्या होऊन कोरोना आटोक्यात आणण्यास मदत होईल. जिल्ह्यातील 225 पैकी 170 मृत्यु हे 50 वर्षावरील व्यक्तींचे झाले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींची तपासणी घरोघरी जाऊन करण्यात येत आहे.
            जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यांनी जिल्ह्यात सध्या 3403 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 1913 रुग्ण बरे झाल्याची माहिती दिली. जिल्ह्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 16 दिवसांवर गेला असून जिल्ह्यात कंटेन्मेंट झोन 684 असल्याची व बेड व्यवस्थापन प्रणाली सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ रामानंद यांनी कोरोनाचा कोणत्याही रुगणांस व्हेटीलेटरची आवश्यकता भासू नये याकरीता प्रयत्न सुरु असून जुलै अखेर जिल्ह्यात 68 व्हेटीलेटर उपलब्ध राहतील यासोबतच महाविद्यालयाकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाची व साधनसामुग्रीची माहिती दिली.   
            महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी जळगाव शहरात सध्या 670 रुग्ण आहे. त्यापैकी 292 रुग्ण बरे झाले असून 37 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 351 रुगण उपचार घेत आहे. यापैकी 11 रुग्ण गंभीर असल्याचे माहिती दिली.
            जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासदार उन्मेश पाटील, माजीमंत्री गिरीश महाजन यांच्यासह उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींना महत्वपूर्ण सुचना केल्यात. तसेच प्रत्येक आमदाराने त्यांच्या तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये करावयाच्या उपाययोजना, आवश्यक साधनसामुग्री, रुग्णांच्या अडीअडचणी मांडतानाचा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनासोबत असून याकरीता सर्वातोपरी मदत करतील असेही सांगितले.
            या बैठकीस आमदार सर्वश्री. चंदुलाल पटेल, संजय सावकारे, सुरेश भोळे, शिरीष चौधरी, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, मंगेश चव्हाण, श्रीमती लताताई सोनवणे यांच्यासह जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा इंसिडंन्ट कमांडर गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, यांचेसह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
            बैठकीचे सुत्रसंचलन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी केले.
00000

Sunday, 28 June 2020

कोविड केअर सेंटरमधील चांगल्या सुविधांमुळे एरंडोल उपविभागात रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्के उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांची माहिती


            जळगाव, दि. 28 - एरंडोल उपविभागात कोवीड केअर सेंटरमध्ये चांगल्या सुविधा दिल्या जात असल्याने कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्के झाला आहे ही समाधानाची बाब आहे. अशी माहिती एरंडोल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे.
            या उपविभागात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची प्राधान्याने ट्रेसिंग झाल्याने संभाव्य रुग्णांना लवकर केअर सेंटरमध्ये आणून उपचार केले गेले, यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
            देशात, राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर एरंडोल उपविभागात तिस-या लॉकडाऊनपर्यंत एकही रुग्ण नव्हता. मात्र परराज्यातून, परजिल्ह्यातून नागरिक येण्यास सुरूवात झाल्यानंतर कोरोना रुग्ण येथे आढळला.
            उपविभागातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकिय अधिकारी, आरोग्य व पोलिस यंत्रणा यांच्या सहकार्याने पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचे ट्रेसिंग वाढविण्यात आले. यामुळे संशयितांची लागलीच तपासणी व उपचार करता आले. कोविड केअर सेंटरमध्येही डॉक्‍टर, इतर स्टाफने चांगल्या सुविधा दिल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले.
            एरंडोल विभागातील एरंडोल, पारोळा, धरणगाव या तालुक्यातील कोविड रुग्णालयात सध्या 533 पैकी 141 रुग्ण आता दाखल आहेत. एकूण पॉझिटीव्ह रूग्णांपैकी 70% पॉझिटीव्ह कॉन्टॅक्ट टेसिंग मध्ये आढळले म्हणून रुग्ण संख्या वाढली, पण कॉन्टॅक्ट ट्सिंगमध्ये रुग्ण वाढल्याने योग्यवेळी हे रुग्ण समाजापासून विलगीकरण झाले. तर प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील केवळ 10 टक्के रूग्ण  आढळले आहे.
            पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि उपविभागातील नागरिकांनी तसेच इतर सर्व लोकप्रतिनिधी यांनी केलेले सहकार्य यामुळे एरंडोल उपविभागातील रूग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांपर्यत पोहोचला असून याबाबत नागरिकांमध्येही समाधान असल्याचेही श्री. गोसावी यांनी कळविले आहे.
000000

Saturday, 27 June 2020

मानसी पाटीलचे पालकमंत्र्यांकडून अभिनंदन


            जळगाव, दिनांक 27- राज्यसेवेच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या जळगाव येथील मानसी सुरेश पाटील हिचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  गुलाबराव पाटील यांनी तिच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
            येथील निवृत्ती नगरात राहणारी मानसी सुरेश पाटील ही राज्यसेवा 2019 च्या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून तीने राज्यात मुलींमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे.
            मानसीची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे
            मानसी ही विद्यानिकेतन शाळेचे  सुरेश पाटील यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तीच्या घरी जाऊन कौतुक केले. जळगाववासियांना तुझा अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढले, त्याचबरोबर तिला पुढील सेवेसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी तीचे वडिल सुरेश पाटील, आई, भाऊ व नातेवाईक उपस्थित होते.
                                                                          00000