Thursday, 31 December 2020

जळगावला जिल्हा पुरवठा विभागातर्फे केवायसी पडताळणीसाठी विशेष मोहीम

             जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व आधार क्रमांकाचे सीडिंग  100 टक्के पूर्ण करण्याच्या सूचना केंद्र सरकरारकडून प्राप्त झाल्या आहेत. शिधापत्रिकेतील ज्या लाभार्थ्यांचे आधार सीडिंग आणि मोबाईल सिडींग अद्याप झालेले नाही अशा लाभार्थ्यांना सदर कार्यवाही करता यावी यासाठी शासनाने ३१ जानेवारी,२०२१ पर्यंत विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली आहे.

           जळगाव जिल्ह्यात या अनुषंगाने तालुक्यातील पुरवठा अधिकारी – कर्मचारी यांचे प्रशिक्षण संपन्न  झाले. या पुढील टप्प्यात तालुका पुरवठा अधिकारी यांचयामार्फत रास्त भाव दुकानदारांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक अद्याप सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांचे मोबाईल व आधार क्रमांकाचे सिडींगची कार्यवाही  रास्त भाव दुकानदार करणार  आहेत. सदर कार्यवाही  दि. १ जानेवारी पासुन सुरू होत आहे.

          आधार सीडिंग :  जळगाव जिल्ह्यात  अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या एकूण ६,०९,९२२  शिधापत्रिका असून यापैकी  १२,७६०  शिधापत्रिकांमध्ये एकाही लाभार्थ्याचा आधार क्रमांक सीड झालेला नाही. तसेच जिल्ह्यातील ६,०९,९२२ शिधापत्रिकेत एकूण  २८,११,२५२ लाभार्थी असुन त्यापैकी   २३,६८,०७६ लाभार्थ्यांचे आधार सीड असुन  ४,४३,१७६  लाभार्थ्याचे आधार क्रमांक सीड झालेले नाहीत.

           मोबाईल सीडिंग: जळगाव जिल्ह्यात  अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या एकूण ६,०९,९२२  शिधापत्रिका असून यापैकी  ३,९२,५९३  शिधापत्रिकांमध्ये  एकाही लाभार्थ्याचा मोबाईल  क्रमांक सीड झालेला नाही. तसेच जिल्ह्यातील ६,०९,९२२ शिधापत्रिकेत एकूण  २८,११,२५२ लाभार्थी असुन त्यापैकी   ६,०२,०८१  लाभार्थ्यांचे मोबाईल सीड असुन २२,०९,१७१  लाभार्थ्याचे मोबाईल  क्रमांक सीडींग झालेले नाही.

१ जानेवारी पासुन जळगाव जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानात त्या दुकानाशी संलग्न  असलेल्या ज्या लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांची यादी उपलब्ध करून देणेत येत आहे. रास्त भाव दुकानाशी संलग्न लाभार्थ्यांनी  दुकानास भेट देऊन सदर यादी तपासून घ्यावी. त्यांचे आधार किंवा मोबाईल सिडींग झाले आहे किंवा नाही हे तपासून घेण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची आहे. या यादीत ज्या लाभार्थ्यांचे आधार / मोबाईल क्रमांक सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांनी संबंधित दुकानदारांकडे असलेल्या ई-पॅास मशिनद्वारे त्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक सीड करून घ्यायचे आहेत. सदर प्रक्रीया अत्यंत सोपी असून त्वरीत पूर्ण होणारी आहे.               

                 शासनाच्या २२ डिसेंबर, 2020 च्या सूचनापत्रानुसार सदर कार्यवाही  ३१ जानेवारी, २०२१ पर्यंत पूर्ण करावयाची आहे. दि. ३१ जानेवारी पावेतो आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे देय धान्य जोपर्यंत आधार सिडींग होत नाही तोपर्यंत मिळणार नाही  व यामुळे लाभार्थी अन्नधान्यापासुन वंचित राहिल्यास संबंधित लाभार्थ्यांची  जबाबदारी  रहाणार आहे.

                  जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल  अद्याप सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांनी त्यांचे रास्त भाव दुकानात जाऊन यादी तपासुन घ्यावी आणि आधार आणि मोबाईल  क्रमांकाचे सिडींग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी केले आहे.

00000

नववर्षाच्या स्वागतानिमित्त मिरवणुका काढू नयेत ! : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : नवीन वर्षाच्या आगमनास अवघ्या काही तासांचा कालावधी राहिला आहे. मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करावे. कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, जळगाव महानगरपालिका क्षेत्रात 5 जानेवारी 2021 पर्यंत पूर्णत: संचारबंदी लागू केली आहे. तसेच जळगाव महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त घराबाहेर न पडता घरीच साधेपणाने साजरे करावे. जिल्ह्यातील रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येवून गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंग राहील याची काळजी घ्यावी. तसेच मास्क व सॅनेटायझरचा वापर करावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील 60 वर्षांवरील आणि दहा वर्षांखालील मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागतानिमित्त कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. तसेच मिरवणुका काढण्यात येवू नये. नववर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिकस्थळी जाताना गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग पाळावे. संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून खबरदारीच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतषबाजी करू नये. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोविड - 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिस, स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

00000

Wednesday, 30 December 2020

जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी 31 जानेवारीपर्यंत वाढविला

             जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कळविले आहे.

            जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या 14 मार्च, 2020 रोजीच्या आदेशान्वये कोरोना विषाणूचा (COVID 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 13 मार्च 2020 पासून लागू आहे. त्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत.

            जिल्ह्यात 22 डिसेंबर 2020 च्या आदेशान्वये जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात 5 जानेवारी 2021 पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपावेतो, तर जळगाव महानगरपालिका, सर्व नगरपालिका, सर्व नगरपरिषद क्षेत्रात 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्याकरीता लॉकडाऊनचा कालावधी 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

            कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील.  या  आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार  शिक्षेस  संबंधित पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.     

                                                                           00000

Tuesday, 29 December 2020

जिल्हास्तरीय युवा संसदमध्ये हर्षल पाटील,गिरीष पाटील यांनी मारली बाजी! केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडून आयोजन : जळगाव, बुलढाणाच्या ६४ स्पर्धकांचा होता सहभाग

 


             जळगाव (जिमाका), दि.२९ - तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे केंद्र शासनाकडून यासाठी केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडून आयोजित जिल्हास्तरीय युवा संसदचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव, बुलढाणा विभागासाठी ऑनलाईन पद्धतीने युवा संसद पार पडली. जळगाव जिल्ह्यातून हर्षल पाटील, गिरीष पाटील तर बुलढाणा विभागातून अभिजीत खोडके आणि सलोनी त्रिवेदी यांनी बाजी मारली.

            तरुण, तरुणी, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसीत व्हावे, देशाच्या समाजकारणाचे महत्व त्यांना कळावे यासाठी केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्रामार्फत राष्ट्रीय युवा संसदचे आयोजन करण्यात येत असते. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी अगोदर जिल्हास्तर आणि राज्यस्तर आपली निवड होणे आवश्यक असते. जळगाव, बुलढाणा जिल्ह्याची युवा संसद दि.२८ रोजी ऑनलाईन पध्दतीने पार पडली.

विद्यार्थ्यांनी केले उत्कृष्ट सादरीकरण

            जिल्हास्तर युवा संसदमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी ४ मिनीटे वेळ देण्यात आला होता. स्पर्धेसाठी सुचविलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० भारतातील शिक्षणाचे परिवर्तन करेल, उन्नत भारत अभियान - समुदायांची शक्ती मुक्त करणे आणि त्यांच्या उन्नतीसाठी तंत्रज्ञान वापरणे, नवीन सामान्य स्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्था अनलॉक करणे, शेतकर्‍यांसाठी वरदान - शून्य बजेट नैसर्गिक शेती या विषयावर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सादरीकरण केले.

चौघे विद्यार्थी जाणार राज्यस्तरावर

            स्पर्धेत जळगाव जिल्हयातून ४२ तर बुलढाणा जिल्ह्यातील २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.पंकजकुमार नन्नवरे, डॉ.राधेश्याम चौधरी, कॅप्टन मोहन कुलकर्णी, डॉ.दिनेश पाटील, विनोद ढगे, दीपक सपकाळे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समन्वयक जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर होते. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी अजिंक्य गवळी यांनी मानले तर कार्यक्रमासाठी चेतन वाणी, आकाश धनगर, शाहरुख पिंजारी, रोहन अवचारे यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेतून जळगाव जिल्ह्यातून हर्षल प्रवीण पाटील व गिरीष घनश्याम पाटील आणि बुलढाणा जिल्ह्यातून अभिजीत अनिल खोडके व सलोनी संजय त्रिवेदी यांची निवड करण्यात आली असून ते राज्यस्तरीय स्पर्धेत ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.

राष्ट्रीयस्तरावर लाखोंची बक्षीसे मिळणार

            राज्यस्तरीय युवा संसदमधून ३ विद्यार्थी देशस्तरावर सहभागी होण्यासाठी निवडले जातील. राज्यस्तरीय स्पर्धा दि.१ ते ५ जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. राष्ट्रीय युवा संसद दि.१२ आणि १३ जानेवारी रोजी संसद भवनाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवण, प्रवास भत्ता दिला जाणार असून विजेत्यांना प्रथम बक्षीस २ लाख, द्वितीय १.५ लाख, तृतीय बक्षीस १ लाख असणार आहे. असे नेहरू युवा केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन

                जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर पीक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केली असून त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित  करण्यात आलेला आहे, असे विकास पाटील, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषी आयुक्तालय, पुणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भूईमूग, सूर्यफुल या 11 पिकांचा, तर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या सहा पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पीकस्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतक-यांकडे पिकाखालील किमान 10 आर. (0.10 हेक्टर) सलग क्षेत्र असणे आवश्यक आहे.

            पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक निश्चित केला आला असून  ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र 1000 हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे, अशा सर्व पिकांकरीता पिकस्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतक-यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरीता भाग घेण्यासाठी रु.300 प्रति शेतकरी प्रति पिक याप्रमाणे प्रवेश शुल्क राहील. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरुन पुढे जिल्हा, विभाग व राज्यपातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार.  

            एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पुर्वी जिल्हा व राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्यपातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार असून त्यासाठी एकदाच रु.300 प्रति शेतकरी प्रति पिक प्रवेश शुल्क भरुन पिककापणी वरुन आलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर निवड केली जाणार आहे.

            याशिवाय पारितोषिकाच्या रकमेमध्ये भरीव वाढ करण्याणत आली आहे. रब्बी हंगामासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख  31 डिसेंबर 2020 असून जास्तीत जास्त शेतक-यांनी पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हायवे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

00000

लोकशाही दिन ऑनलाइन होणार

             जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात 4 जानेवारी 2020 रोजी लोकशाही दिन व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी नागरिकांनी संबंधित तहसील कार्यालयात उपस्थित राहून तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

00000

Monday, 28 December 2020

शेतकऱ्यांना सुलभ पध्दतीने वित्त पुरवठा करावा जिल्हाधिकारी अभिजित राऊत ‘नाबार्ड’तर्फे संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याचे प्रकाशन

 

            जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीयकृत बँकांनी सकारात्मक भूमिका घेत शेतकऱ्यांना सुलभ वित्त पुरवठा करीत त्यांच्या विकासात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

            जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या हस्ते नाबार्डच्या संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले.  नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंकधक श्रीकांत झांबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक प्रवीण सिंदकर, अग्रणी बँकेचे प्रबंधक अरुण प्रकाश, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी संभाजी ठाकूर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख बँकांचे क्षेत्रीय प्रबंधक, सर्व बँक समन्वयक अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, जळगाव जिल्ह्याचा सन 2021- 2022 या वर्षाचा 8708.70 कोटी रुपयांचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी तत्पर वित्त पुरवठा उपलब्ध करून द्यावा. एकूण 8708.70 कोटी रुपयांचा आराखडा असून यामध्ये प्रामुख्याने शेती, शेतीपूरक क्षेत्रासाठी 5017.17 कोटी रुपये सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी 3082.75 कोटी रुपये आणि इतर प्राथमिक क्षेत्रासाठी 608.78 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

            शेतीसह शेतीपूरक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पीक कर्जासाठी 3343.90 कोटी रुपये, सिंचनासाठी 182.63कोटी रुपये, शेती यांत्रिकीकरणासाठी 150.63 रुपये, पशु-पालन (दुग्ध) 265.40 कोटी रुपये, कुक्कुटपालन 163.30 कोटी रुपये, शेळी-मेंढीपालन228  कोटी रुपये, गोदाम- शीतगृहांसाठी 78.56 कोटी रुपये, भुविकास/जमीन सुधारणा 82.68 कोटी रुपये, शेती माल प्रक्रिया उद्योगांसाठी 188.37 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. इतर प्राथमिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने गृह कर्ज 422.20  कोटी रुपये, शैक्षणिक कर्ज रु 31.88 कोटी इतका वित्त पुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे, तसेच महिला बचत गट इतर साठी रु 107.68  कोटी रकमेचा विशेष वित्त पुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे.

            नाबार्डद्वारे प्रतिवर्षी देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी तयार केला जाणारा संभाव्य वित्त आराखडा (पी एल पी) हा एक महत्वाचा दस्तावेज़ असून याचा वापर केंद्र सरकार, विविध शासकीय/निमशासकीय कार्यालय, देशातील सर्व बँकाकडून संदर्भासाठी केला जातो. तसेच रिज़र्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार नाबार्ड द्वारा प्रकाशित संभाव्य वित्त आराखडा आधारभूत मानून जिल्हा अग्रणी बँक जिल्ह्याची वार्षिक पत-पुरवठा योजना (District Credit Plan) तयार करते आणि तद्नुसार जिल्ह्यातील सर्व  बँकांना विविध क्षेत्राना कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश जारी केले जातात. नाबार्ड द्वारा प्रकाशित संभाव्य वित्त आराखडा बँकिंग  प्रणाली द्वारे प्राधान्य क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा करण्याचे नियोजन करून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे महत्वपूर्ण कार्य पार पाडते, असे महाप्रबंधक श्री. झांबरे यांनी सांगितले.

00000

Thursday, 24 December 2020

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीचे आयोजन

             जळगाव, (जिमाका) दि. 24 - औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव या संस्थेची प्रवेश प्रक्रिया 1 डिसेंबर, 2020 पासून सुरु झालेली आहे. या प्रवेश प्रक्रीयेच्या 23 डिसेंबरपर्यंत एकूण चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. पुढील जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी 29 व 30 डिसेंबर, 2020 रोजी होणार आहे.   

            तरी सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थानिहाय रिक्त जागांसाठी प्रवेशइच्छूक उमेदवारांना व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करुन जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश Login करुन कोणत्याही एका जिल्ह्याच्या समुपदेशन फेरीकरीता 25 व 26 डिसेंबर, 2020 सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत नोंदणी करता येईल. 27 डिसेंबर, 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारांची जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संगणक प्रणालीव्दारे गुणवत्ता यादी प्रकाशीत केली जाईल व तशी माहिती त्यांना SMS प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे.

            दिलेल्या वेळेस व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुदपदेशन फेरीकरीता बोलविण्यात येईल व प्रवेशाकरीता उपलब्ध जागा, उमेदवारांची मागणी, उमेदवारांची आर्हता या आधारावर दि. 29 व 30 डिसेंबर, 2020 रोजी सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रीयेच्यावेळी जागांचे वाटप केले जाईल. या प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांना सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर संबधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची कार्यवाही करण्यात येईल. असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी जात पडताळणी समितीचे कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार

            जळगाव, (जिमाका) दि. 24 - राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 14,234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषीत केला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

            ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती जोडणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात मोठया प्रमाणात निवडणुकीस उभे राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडुन अर्ज दाखल होत आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होवू नये, याकरीता 25 ते 27 डिसेंबर, 2020 या शासकीय सुटीच्या दिवशी सकाळी 9.45 ते 6.15 या कार्यालयीन वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव येथील कार्यालय उमेदवारांचे अर्ज स्वीकारणेसाठी नियमीत सुरु राहील. असे सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागातर्फे वेबिनार संपन्न ग्राहकांनी वस्तुंची खरेदी करतांना सजग राहणे आवश्यक - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

       



        जळगाव, (जिमाका) दि. 24 - ऑनलाईन खरेदीच्या जमान्यात ग्राहकांनी वस्तुची किंमत, दर्जा, उपयोगिता आदिंबाबत सजग राहूनच वस्तुची खरेदी करावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.  

            अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखेमार्फत आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. राऊत बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. संजय बोरवाल, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, पोलीस उप अधीक्षक अरुण धनावडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त य. को. बेंडकुळे, वैधमापन शास्त्र विभागाचे सहायक आयुक्त बी. जी. जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेबिनारमध्ये जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी ऑनलाइन सहभागी झाले होते. याशिवाय या कार्यक्रमाचे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेसबुक पेजवरुन लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले.

            जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांनी ऑनलाईन वस्तुंची विक्री करणाऱ्या संस्थांबाबत अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. आपणास आवश्यक असलेल्या वस्तुबाबत परिपूर्ण माहिती करुन घेतल्याशिवाय वस्तुची खरेदी करु नये. विशेषत: आर्थिक व्यवहार करतांना ग्राहकांनी खुप काळजी घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन खरेदीत आपल्या एटीएमचा पीन गोपनीय राहील, ओटीपी कोणालाही देवू नये, रक्कमेची नोंद करतांना काळजी घ्यावी, अनावश्यक ॲप डाऊनलोड करु नये, लॉटरी लागल्याचा इमेल प्राप्त झाला असल्यास त्याबाबत खात्री करावी. जेणेकरुन स्वत:ची व इतरांचीही फसवणूक आपण टाळू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

            न्या. बोरवाल म्हणाले, ग्राहकांच्या संरक्षणासाठी 1986 मध्ये केलेल्या कायद्यात 2019 मध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. नवीन कायदा हा ग्राहकांना वरदान ठरणार असून ग्राहकांचे सहा हक्क आहेत त्याची माहिती ग्राहकांनी करुन घेणे आवश्यक आहे. ग्राहकाने वस्तुची खरेदी करतांना जागरुक राहून त्याचे बील घेणे आवश्यक आहे. ग्राहक आयोगाची जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशी त्रिस्तरीय रचना असून जिल्हा आयोगाकडे एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे चालविण्यात येतात. बि-बियाणेविषयी तक्रारी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व तपशील जपून ठेवणे आवश्यक आहे. 5 लाख रुपये किंमतीच्या वस्तुबाबत तक्रार करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही असे सांगून आयोगाकडे तक्रार कशी करावी? याविषयीची माहिती जाणून घेतली पाहिजे. फसव्या जाहिरातींविरोधात सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॅरिटीकडे (सीसीपीए) दाद मागता येते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            श्री. बेंडकुळे यांनी अन्न पदार्थांविषयीच्या तर डॉ माणिकराव यांनी औषधांविषयीच्या कायद्यांची माहिती दिली तसेच अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे वेळोवेळी करण्यात आलेल्या तपासणी मोहीमची व दोषींविरुध्द केलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती दिली. श्री. जाधव यांनी वैधमापन शास्त्र विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या ग्राहक हिताच्या कायद्यांची माहिती दिली.

            जिल्हा पुरवठा अधिकारी अधिकारी श्री. सुर्यवंशी यांनी ग्राहकाला माहिती मिळविण्याचा, सुरक्षिततेचा व वस्तु निवडण्याचा हक्क असल्याचे सांगून नागरिकांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन केले. सहाय्यक पुरवठा अधिकारी श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय ग्राहक दिनाची माहिती दिली. उपस्थितांचे आभार ए. जी. जोशी यांनी मानले.

            या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, कृषि विभागाचे एस. आर. पाटील, भारत पेट्रोलियमचे क्षेत्रीय अधिकारी स्वप्नील श्रीवास्तव, विद्युत विभागाचे व्ही. डी. पाटील यांच्यासह पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

00000

Wednesday, 23 December 2020

केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्रामार्फत राष्ट्रीय युवा संसदचे आयोजन जळगाव जिल्ह्याची युवा संसद 28 आणि 29 डिसेंबर रोजी होणार

 जळगाव, (जिमाका) दि. 23 - तरुण आणि  विद्यार्थ्यांमध्ये  नेतृत्वगुण  विकसित व्हावे केंद्र शासनाकडून  यासाठी  केंद्र शासनाच्या  नेहरू  युवा  केंद्राकडून  राष्ट्रीय  युवा  संसदचे  आयोजन करण्यात  येत असते.  युवा संसदसाठी जिल्हास्तरावर  ऑनलाईन  पद्धतीने  संसद  घेण्यात  येणार असून,  जास्तीत  जास्त  विद्यार्थ्यांनी  सहभाग  नोंदवावा असे  आवाहन  नेहरू  युवा  केंद्राचे  जिल्हा  युवा  अधिकारी  नरेंद्र डागर यांनी केले आहे.

तरुण,  तरुणी,  विद्यार्थ्यांमध्ये  नेतृत्वगुण  विकसीत  व्हावे,  देशाच्या  समाजकारणाचे  महत्व  त्यांना  कळावे यासाठी  केंद्र  सरकारच्या  नेहरू  युवा  केंद्रामार्फत  राष्ट्रीय  युवा  संसदचे  आयोजन  करण्यात  येत असते.  राष्ट्रीय  स्तरावर  सहभागी  होण्यासाठी  अगोदर जिल्हास्तर आणि राज्यस्तर आपली निवड होणे आवश्यक असते. जळगाव जिल्ह्याची युवा संसद दि. 28 आणि 29  डिसेंबर रोजी होणार आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आवाहन

जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तर युवा संसदमध्ये सहभागी होण्यासाठी वयाचा पुरावा, रहिवासाचा पुरावा, पासपोर्ट फोटोसह आपले अर्ज नेहरू युवा केंद्र, प्लॉट क्र.60, गट क्र.40, द्रौपदी नगर, मानराज पार्कजवळ, जळगाव या ठिकाणी कार्यक्रम सहाय्यक अजिंक्य गवळी यांच्याकडे दि.27 डिसेंबरपर्यंत जमा करायचे आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी फोन क्र.  0257- 2951754 किंवा qnykjal@gmail.com यावर संपर्क साधावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा  18 ते 25 वर्ष राहणार असून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र मिळणार आहे. जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत आपला मुद्दा मांडता येणार असून  राष्ट्रीय स्तरावर हिंदी आणि इंग्रजी भाषाच आवश्यक आहे.

महत्वपूर्ण विषयावर विद्यार्थी मांडणार मत

               जिल्हास्तर युवा संसदमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी 4 मिनीटे वेळ मिळणार आहे. स्पर्धेसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020  भारतातील शिक्षणाचे परिवर्तन करेल, उन्नत भारत अभियान - समुदायांची शक्ती मुक्त करणे आणि त्यांच्या उन्नतीसाठी तंत्रज्ञान वापरणे, नवीन सामान्य स्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्था अनलॉक करणे, शेतकऱ्यासाठी वरदान - शून्य बजेट नैसर्गिक शेती या विषयावर विद्यार्थ्यांना आपले वक्तृत्व सादर करायचे आहे. 

 राष्ट्रीय स्तरावर लाखोंची बक्षीसे मिळणार

राज्यस्तरीय युवा संसदसाठी जळगाव जिल्ह्यात आयोजित स्पर्धेतून 2 विद्यार्थी निवडले जाणार असून राज्यातून 3 विद्यार्थी देशस्तरावर सहभागी होण्यासाठी निवडले जातील. राज्यस्तरीय स्पर्धा दि.1 ते 5 जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. राष्ट्रीय युवा संसद दि.12 आणि 13 जानेवारी रोजी संसद भवनाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता दिला जाणार असून विजेत्यांना प्रथम बक्षीस 2 लाख, द्वितीय 1.5 लाख, तृतीय बक्षीस 1 लाख असणार आहे. असे जिल्हा युवा अधिकारी नेहरु युवा केद्र जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये  कळविले आह.

००००

जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान पूर्णत: संचारबंदी घोषित

 

         राष्ट्रीय महामार्गावरील सर्व हॉटेल्स/रेस्टॉरंट/ढाबे, दुकाने, बाजार तसेच सिनेमागृह/ नाट्यगृहे/ सभागृह/ मंगल कार्यालये/लॉन्स रात्री 10.30 वाजेपर्यतच सुरु राहणार.

            जळगाव, (जिमाका) दि. 23 - राज्य शासनाकडील 21 डिसेंबरच्या आदेशान्वये महानगरपालिका क्षेत्रात 22 डिसेंबर, 2020 ते 5 जानेवारी, 2021 या कालावधीत रात्री 11.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी (Night curfew) घोषित करण्यात आलेला आहे.

            त्यानुसार जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात 22 डिसेंबर, 2020 ते 5 जानेवारी, 2021 पावेतो रात्री 11.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी (Night curfew) घोषित करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

           जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगरपरिषद क्षेत्रात दिनांक 31 डिसेंबर, 2020 रोजी रात्री 11.00 वाजेपासून सकाळी 6.00 वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी (Night curfew) घोषित करण्यात आली आहे.

            या क्षेत्रातील व राष्ट्रीय महामार्गावरील सर्व हॉटेल्स/रेस्टॉरंट/ढाबे, दुकाने, बाजार रात्री 10.30 वाजेपर्यत सुरु राहतील, जेणेकरुन निर्बधीत कालावधीत नागरिकांची वर्दळ/गर्दी राहणार नाही.

            तसेच या क्षेत्रातील सिनेमागृह/नाट्यगृहे/सभागृह/मंगल कार्यालये/लॉन्स व तत्सम ठिकाणी रात्री 10.30 पर्यंत सुरु राहतील. या कालावधीत आयोजित करण्यात येणारे लग्न समारंभ, कार्यक्रम, स्पर्धा व इतर अनुषंगिक कार्यक्रम रात्री 10 वाजेपूर्वी समाप्त करण्यात यावेत.

            कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी  निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली (SOPs) नुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील. तसेच महाराष्ट्र शासनाकडून लॉकडाऊन कालावधीत लागू केलेले निर्बंध शिथील करण्याबाबत वेळोवेळी दिलेले निर्देश पुढील आदेश होईपावेतो लागू राहतील.

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव श्री. अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

 

ख्रिसमस व नववर्षे स्वागतासाठी जळगाव महापालिका हद्दीत रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी

            जळगाव, (जिमाका) दि. 23 - राष्ट्रीय हरीत लवाद, नवी दिल्ली यांचेकडील 9 नोव्हेंबर, 2020 रोजीच्या आदेशात दिलेल्या निर्देशानुसार कोविड-19 विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 25 डिसेंबर, 2020 रोजी ख्रिसमस व नववर्ष स्वागत दिनांक 31 डिसेंबर, 2020 या उत्सवांच्या कालावधीत जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत केवळ रात्री 8.00 ते रात्री 10.00 या वेळेतच फटाके वाजवणे, फोडण्यास परवानगी असेल. असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

            या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार पोलीस विभाग व जळगाव महानगरपालिकेतील अधिकारी/कर्मचारी यांना प्रदान करण्यात येत आहे.  या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने वेबिनारचे आयोजन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेसबुकवरुन होणार प्रसारण

जळगाव, (जिमाका) दि. 23 - ग्राहक हितासाठी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यात ग्राहक संरक्षण अधिनियम-2019, दि 20जुलै, 2020 पासून लागू करण्यात आला आहे.  केंद्र शासनाने यावर्षी साजरा करावयाच्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त New Features Of consumer protection Act, 2019 ही संकल्पना निश्चित केली आहे. या संकल्पनेचे महत्व विषद करणारे विशेष सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम वेबिनारव्दारे 24 डिसेंबर, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्याक्रमाव्दारे जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, जळगाव आणि जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव हे ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. तसेच वैधमापन विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 या कार्यक्रमास वेबिनार माध्यमाव्दारे तालुका तहसिल कार्यालयही ऑनलाईन जोडले जाणार आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकांची आचारसंहिता लागू असल्याने आचारसंहितेच्या निर्देशांचे अधीन राहूनच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका कार्यक्रमास तालुक्यातील प्रमुख शासकीय अधिकारी/खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत. तालुका कार्यक्रम आयोजित करतांना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतच्या सूचना सर्व तहसिल कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमाचे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://www.facebook.com/Collectorate-Jalgaon या फेसबुक पेजवरुन लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनतेने या कार्यक्रमाचा लाभ घेऊन ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या नवीन तरतुदींची माहिती करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

0000

जिल्ह्यात 6 जानेवारीपर्यंत 37 (1) व (3) कलम जारी

             जळगाव, (जिमाका) दि. 23 - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 6 जानेवारी, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे.

            या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव श्री. राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अनुयायांनी घरातूनच अभिवादन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 जळगाव, (जिमाका) दि. 23 - राज्यात तसेच जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. यावर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेता गेल्य सात-आठ महिन्यात आलेले सर्वधर्मीय सण/उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केलेले आहेत. त्यामुळे कोविडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दिनांक 1 जानेवारी, 2021 रोजी जयस्तंभ पेरणेफाटा येथे होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व अनुयायांनी दिनांक 1 जानेवारी, 2021 रोजी जयस्तंभ पेरणेफाटा येथे न जाता घरातूनच जयस्तंभास अभिवादन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 1 जानेवारी, 1818 रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या युध्दामध्ये कामी आलेल्या व जखमी झालेल्या योध्यांच्या स्मरणार्थ सन 1822 साली पेरणे, ता. हवेली, जि. पुणे येथील भिमा नदीच्या तीराजवळ जयस्तंभ उभारण्यात आलेला आहे. जिल्ह्यात कोविड संसर्गाचा विचार करता सर्व अनुयायांनी विचारपूर्वक व धैर्याने वागून जयस्तंभ पेरणे येथे न जाता साध्या पध्दतीने प्रतिकात्मक स्वरुपात अभिवादन करण्याचा कार्यक्रम गर्दी न करता घरी राहूनच करावा. असे श्री. राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000


 

Tuesday, 22 December 2020

जळगाव मनपा क्षेत्रात 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी लागू - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत



             जळगाव (जिमाका) दि. 22 - युकेमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिली.

            राज्य शासनाने राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्री. राऊत बोलत होते. या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते.  

            जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आलेला असताना युकेमध्ये आता कोरोनाच्या नवीन विषाणूचे रुग्ण आढळून येत आहे. त्यातच सध्या जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढत असल्याने निमोनियासारखे आजार बळावतात. याबाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याने मनपा क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात येत आहे. संचारबंदीच्या काळात वैद्यकीय सेवेसारख्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात येत आहे. मात्र यासाठी पुरेसे पुरावे सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच रात्री बाहेरगावावरुन येणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही. मात्र नागरीकांनी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम रात्री 11 पूर्वीच उरकणे आवश्यक आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार वर्गास कोणतीही अडचण येवू नये याकरीता या कालावधीत त्यांच्या कामाच्या वेळा या रात्री 11 पूर्वी व सकाळी 6 नंतर ठेवण्याबाबत आस्थापनांना सुचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी केलेली आहे. याकरीता 33 ऑक्सिजन सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही परिस्थितीस प्रशासन सज्ज असले तरी नागरीकांनीही सतत मास्कचा वापर करावा, विनाकारण बाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाताना आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

31 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात राहणार संचारबंदी

            31 डिसेंबर रोजी होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता 31 डिसेंबरच्या रात्री 11 ते 1 जानेवारीच्या सकाळी 6 या वेळेत जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातही संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई - डॉ मुंढे

            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचे जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी तंतोतंत पालन करावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी केले आहे. जे नागरीक या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांचेवर दंडात्मक कारवाई बरोबरच आवश्यकता भासल्यास गुन्हेही दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना पोलीस स्टेशनच्या प्रभारी यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील प्रमुख पॉईट तसेच पेट्रोलिंग करणाऱ्यांमार्फतही तपासणी करण्यात येणार आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर पोलीस व महापालिकेचे संयुक्त पथक कारवाई करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

00000