Friday, 31 December 2021

'ओमिक्रॉन' संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू

           जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) :- कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ‘‘ओमिक्रॉन’’ ही नवीन विषाणु प्रजाती आढळुन आल्यामुळे संसर्गाचा अधिक धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये /रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने दिनांक 31 डिसेंबर, 2021 पासून पुढील आदेश होईपर्यंत खालील निर्बध लागू करण्यात आले आहे.

                लग्न समारंभ : बंदिस्त जागेमध्ये किंवा मोकळया जागेत साजरा होणारे लग्न समारंभ हे केवळ 50 लोकांच्या मर्यादेत साजरा करता येतील

                कार्यक्रम / मेळावे:-  सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मोठया प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम हे केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत बंदिस्त जागेमध्ये किंवा मोकळया जागेत साजरा करता येतील

अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना उपस्थित राहता येईल.

                वरील प्रमाणे जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तीकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.

                तसेच शासन आदेश दिनांक 27 नोव्हेंबर, 2021 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार कोविड अनुरुप वर्तनाचे (Covid Appropriate Behaviour ) उल्लंघन करण्याऱ्या व्यक्ती / संस्था / घटक यांच्यावर पोलीस विभाग व संबधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करावी व सदरची रक्कम शासनाच्या दिनांक 26 ऑक्टोंबर, 2021 रोजीच्या आदेशात नमूद केल्यानुसार  Revenus  Receipt,  (c) Other non – Tax Revenue, (1) General Service, ००७०-Other Administrative Services, 800 Other Receipt  या लेखाशिर्षाखाली शासन जमा करावी.

                सदर आदेशाचे उल्लघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

Thursday, 30 December 2021

31 डिसेंबर, 2021 वर्ष अखेर व नुतन वर्षारंभ 2022 मार्गदर्शक सुचना

       जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ‘‘ओमिक्रॉन’’ ही नवीन विषाणु प्रजाती आढळुन आल्यामुळे संसर्गाचा अधिक धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये /रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे.

            या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणुन मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी 31 डिसेबर, 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे.

            कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31 डिसेंबर, 2021 रोजी व दि. 1 जानेवारी, 2022 रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे. मदत व पुनर्वसन विभाग, मुंबई यांच्या उपरोक्त दि. 24 डिसेंबर, 2021 रोचीच्या आदेशान्वये राज्यात दि. 25 डिसेंबर, 2021 पासून रात्री 9.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तीनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेशांचे पालन करण्यात यावे.

            कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्र. DMU/2020/CR.92/DisM-1, दि. 27 नोव्हेंबर, 2021 अन्वये देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच शासन आदेश मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्र. DMU/2020/CR.92/DisM-1, दि. 24 डिसेंबर, 2021 अन्वये देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे.

            31 डिसेंबर, 2021 व नूतन वर्ष 2022 चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलबध्‍ आसनक्षमतेच्या 50 % पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25% च्या मर्यादत उपस्थित राहण्यास परवानगी असेल. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व Social Distancing राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जुतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.

            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

            नव वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांना आरोग्य व स्वच्छेतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

            फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदीचे काटेकोर पालन करण्यात यावे. कोविड-19 विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकांनतर व 31 डिसेंबर, 2021 व नूतन वर्ष 2022 सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सुचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

            वरील सुचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. असे आवाहन अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका परिपत्रकानुसार कळविले आहे.

00000

Wednesday, 29 December 2021

स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणीचे इच्छुक संस्थांना आवाहन

           जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नोंदणीकृत व विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविणाऱ्या व्हीटीपी-व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, व्हीटीआय-व्होकेशनल ट्रेनिंग इन्टि  ट्यूट आणि नोंदणीच्या प्रतीक्षेत, इच्छुक असणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थां स्कील इंडिया पोर्टलवर (TP-Training Provider & TC – Training Centre) नोंदणी  करणे आवश्यक  आहे.

नोंदणीच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपले (TP- TC) हे Fully Accrediated – मान्यता & Fully Affiliated – संलग्नता होईल याची दक्षता घ्यावी. संस्थेची / सेंटरची स्कील इंडिया पोर्टलवर Fully Accrediated -  मान्यता & Fully Accrediated संलग्नता प्राप्त झाल्यानंतर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण उमेदवारांना देणे शक्य होईल.  स्कील इंडिया पोर्टलवरील नोंदणी व इतर अनुषंगिक माहितीसाठी पुढील लिंकचा उपयोग करावा.  Link :-  https://skillindia.gov.in  कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रशिक्षण कार्यक्रम राबविणाऱ्या संस्था/सेंटर यांनी स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन  वि.जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत 0257-2959790 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

Tuesday, 28 December 2021

मुलींच्या जळगाव येथील शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

                  जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : समाजकल्याण विभागांतर्गत कार्यरत जळगाव येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सिंधी कॉलनी जळगाव येथे सन 2021-22 करीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यालय विभागात एकूण 28, कनिष्ठ महाविद्यालय विभागात 12, बिगर व्यावसायिक विभागात 13, तर व्यावसायिक विभागात एकूण तीन जागा रिक्त आहेत. या वसतिगृहात आठवी, अकरावी, पदवी व अन्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासून प्रवेश देण्यात येतो. अधिक माहितीसाठी विद्यार्थिनींनी शासकीय मुलींचे वसतिगृह, सिंधी कॉलनी, जळगाव येथे संपर्क साधावा, असे गृहपाल, मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

00000

शिशुगृहातील कंत्राटी पदांसाठी जळगाव येथे आज मुलाखती

           जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित विशेष दत्तकगृह/ शिशुगृह, जळगाव येथील कंत्राटी पदभरतीकरीता उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आल्यानंतर पात्र उमेदवारांची निवड करुन अध्यक्ष, निवड समिती तथा जिल्हाधिकारी जळगाव  यांच्या आदेशानुसार प्राप्त झालेल्या उमेदवारांमधून निवड झालेल्या उमेदवारांची प्राथमिक गुणवत्ता यादी यापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेली होती.  तसेच त्यातील मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी ही शासनाच्या www.Jalgaon.nic.in या संकेतस्थळावर व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील दर्शनीय भागात देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती बुधवार 29 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे होणार आहेत. मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखत पत्र हे त्यांच्या अर्जात नमूद मेल आयडीवर पाठविण्यात आलेले आहे. व सदर मेल प्राप्त न झाल्यास संबधितांना या कार्यालयास संपर्क साधावा. सदर भरती प्रक्रिया ही प्राप्त गुणांकनाच्या आधारे व पारदर्शक पध्दतीने पार पडणार आहे. कुणीही कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. असा प्रकार निदर्शनास आल्यास संबधितांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव, दूरध्वनी क्रमांक  0257 – 2228828 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

00000

महिला व बालविकास विभागातर्फे पाच जानेवारी रोजी मुलाखती

           जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे व मुलींचे बालगृह/ निरीक्षणगृह, जळगाव येथील कंत्राटी पदभरतीकरीता उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जाची छाननी करण्यात आली. त्यानंतर पात्र उमेदवारांची निवड करुन अध्यक्ष, निवड समिती तथा जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशानुसार प्राप्त झालेल्या उमेदवारांमधून निवड झालेल्या उमेदवारांची प्राथमिक गुणवत्ता यादी यापूर्वी प्रसिध्द करून हरकती मागविण्यात आलेल्या होत्या, प्राप्त हरकतींनुसार यादी दुरुस्ती करुन दुरुस्त यादी व मुलाखतीस पात्र उमेदवारांची अंतिम यादी ही जिल्हा प्रशासनाच्या www.Jalgaon.nic.in या संकेतस्थळावर व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील दर्शनीय भागात देखील 27 डिसेंबर 2021 रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे. संबंधित पात्र उमेदवारांच्या मुलाखती 5 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे होतील. पात्र उमेदवारांना मुलाखत पत्र हे त्यांच्या अर्जात नमूद ई- मेल आयडीवर पाठविण्यात आले आहे. सदर मेल प्राप्त न झाल्यास संबधितांना या कार्यालयास संपर्क साधावा. सदर भरती प्रक्रिया ही प्राप्त गुणांकनाच्या आधारे व पारदर्शक पध्दतीने पार पडणार आहे. कुणीही कुठल्याही आमिषाला बळी पडू नये असे. असा प्रकार निदर्शनास आल्यास संबधितांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव, दूरध्वनी क्रमांक 0257 – 2228828 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

00000

Monday, 27 December 2021

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


                                       

      जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : कृषी क्रांतीचे प्रणेते आणि शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख  यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसीलदार सुरेश थोरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

                                                               0000

Friday, 24 December 2021

पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

           जळगाव, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील शनिवार 25 डिसेंबर 2021 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

                पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : शनिवार 25 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 6.18 वाजता जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन, सकाळी 6.20 वाजता जळगाव रेल्वेस्थानक येथून पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण, सकाळी 7 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.

                रविवार 26 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव, सकाळी 10.30 वाजता पाळधी येथून जळगावकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व राखीव, सकाळी 11.40 वाजता जळगाव येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.

00000

जळगाव येथे सोमवारी लोकशाही दिन होणार लसीकरण प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांच्याच स्वीकारणार तक्रारी

                 जळगाव, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा) :-जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सोमवार ३ जानेवारी, २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ऑफलाइन पध्दतीने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने या दिवशी नागरिक प्रत्यक्ष येवून वैयक्तिक स्वरूपाचे तक्रारी अर्ज सादर करू शकतील. तसेच लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत असलेल्या नागरिकांचेच तक्रारी अर्ज स्वीकारण्यात येतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

00000

जिल्हा परिषद वार्षिक अहवाल, सर्वसाधारण सभेची मंजुरी

           जळगाव, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा) :-  जळगाव जिल्हा परिषदेचा २०२०-२१ या वित्तीय वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली  आहे. या अहवालास स्वीकृतीसंबंधी अधिसूचना प्रसिध्द करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे

०००००

‘स्वाधार’ योजनेचे अर्ज भरण्याचे आवाहन

         जळगाव, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय विभाग व विशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. कोविड- १९ च्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात राज्यातील शैक्षणिक प्रत्यक्ष बंद असल्या, तरी या कालावधीत ऑनलाइन प्रणालीव्दारे शिक्षण सुरू असल्याने या दोन वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना लाभ देण्याबाबत शासनाने २२ डिसेंबर, २०२१ रोजीच्या पत्रानुसार मान्यता दिलेली आहे. सन २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील ज्या पात्र विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज सादर केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांच्या कार्यालयात सादर करावेत. या योजनेंतर्गत अर्ज भरण्यास देण्यात आलेल्या मुदतवाढी बाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी  संबंधित विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. दिलेल्या विहित मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

00000

ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी दक्ष रहावे! पूनम मलिक : जळगावला राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम

           जळगाव, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा) : ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकांसाठीच आहे. ग्राहकांनी आपल्या हक्कांप्रती जागरूक रहावे. ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरणासाठी जिल्हा ग्राहक आयोग, राज्य ग्राहक आयोग आणि केंद्रीय आयोग कार्यरत आहे. जिल्हा आयोगात एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे दाखल करता येतात. ग्राहकांनी फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घ्यावी आणि फसवणूक झाल्यास ग्राहक आयोगाकडे दाद मागावी, असे प्रतिपादन  जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्षा पूनम मलिक यांनी केले.

                राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, विजय मोहरीर, डॅा. अनिल देशमुख, राजस कोतवाल यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे  प्रमुख,  ग्राहक संरक्षण परिषदेचे जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. ग्राहकांना यापुढे ग्राहक आयोगाकडे तक्रार करावयाची असल्यास  ई-फायलिंग तंत्राचा अवलंब करता येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून केंद्र सरकारने  विकसित केलेल्या  ‘ई-दाखिल’ या विशेष संगणकीय प्रणालीवर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून फोर्टिफाइड अन्न, विविध ऑनलाइन परवाने,  सेंद्रिय अन्न आदी विषयांवर जनजागृतीपर फलक प्रदर्शित करण्यात आले होते.

                अप्पर जिल्हाधिकारी श्री. महाजन म्हणाले, ग्राहक संरक्षणाचे महत्व सांगून ग्राहकांनी आपली फसवणूक होवू नये म्हणून दक्ष रहावे. फसवणूक झाल्यास ग्राहक आयोगाकडे दाद मागावी. ग्राहक संरक्षणाचे कार्य पथनाट्यासारख्या कार्यक्रमातून ग्रामीण भागात देखील जनजागृती करावी, असे सांगितले. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले, या वर्षी साजरा करावयाच्या ग्राहक दिनासाठी केंद्र सरकारकडून Consumer - Know Your Rights अशी संकल्पना देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा शाखेने  तयार केलेले पॅावर पॅाइंट प्रेझेंटेशन श्री. सूर्यवंशी यांनी सादर केले.

                ग्राहक संरक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते श्री. मोहरीर, डॅा. देशमुख, श्री. कोतवाल यांनी ग्राहकांचे हक्क, ग्राहक संरक्षण क्षेत्रातील अनुभव, ग्राहकांच्या तक्रारींची केलेली सोडवणूक, ग्राहक संरक्षणाची चळवळ, ग्राहकांमधील जनजागृती याविषयी मार्गदर्शन केले. नयना महाजन यांनी सूत्रसंचालन केले.  सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुमती मनोरे, रेखा सावत, अतुल जोशी, भागवत गायकवाड, पाराजी बोबडे, श्रीमती येवले, श्री. रणदिवे, श्री. चौधरी, श्री. पवार, जनार्दन सपकाळे यांनी  परिश्रम घेतले. ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्ये याबाबत तुळजाई संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधनात्मक पथनाट्य सादरीकरण केले. या पथनाट्यातून ग्राहक प्रबोधन, कोरोना प्रतिबंधक लसीकरण बाबत विशेष संदेश देण्या आला.

00000


Thursday, 23 December 2021

जळगाव जिल्ह्यात ६ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

         जळगाव, दि. २३ (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ६ जानेवारी, २०२२ पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे.

                 या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

                                                        0000       

Wednesday, 22 December 2021

जळगाव जिल्ह्याचा 8862 कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते प्रकाशन

 

        जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : ‘नाबार्ड’ने जळगाव जिल्ह्याचा सन 2022-23 करीता 8862.81 कोटी रुपयांचा  संभाव्य वित्त पुरवठा आराखडा (पीएलपी- 2022-23) तयार केला आहे. या संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले.

            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक विश्वजित करंजकर, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक अरुण प्रकाश, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक श्रीकांत झांबरे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शशिकांत पाटील, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सदाशिव शिसोदे आदी उपस्थित होते.

             ‘नाबार्ड’तर्फे प्रतिवर्षी देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी तयार केला जाणारा संभाव्य वित्त आराखडा (पी एल पी) हा एक महत्वाचा दस्तऐवज असून याचा वापर केंद्र सरकार, विविध शासकीय/निमशासकीय कार्यालय, देशातील सर्व बँकाकडून संदर्भासाठी केला जातो. तसेच रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार ‘नाबार्ड’ द्वारा प्रकाशित संभाव्य वित्त आराखडा आधारभूत मानून जिल्हा अग्रणी बँक जिल्ह्याची वार्षिक पत-पुरवठा योजना (District Credit Plan) तयार करते आणि त्यानुसार जिल्ह्यातील सर्व  बँकांना विविध क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश जारी केले जातात. नाबार्डतर्फे प्रकाशित संभाव्य वित्त आराखडा बँकिंग प्रणालीद्वारे प्राधान्य क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा करण्याचे नियोजन करून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे महत्वपूर्ण कार्य पार पाडते.

            या आराखड्यात सन 2022-23 करीता जळगाव जिल्ह्याचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा (पीएलपी- 2022-23) एकूण 8862.81 कोटी रुपयांचा आहे. यामध्ये प्रामुख्याने शेती, शेतीपूरक क्षेत्रासाठी रुपये 5090.13 कोटी, सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांसाठी रुपये 3032.00 कोटी आणि इतर प्राथमिक  क्षेत्रासाठी रुपये 740.88 कोटी प्रस्तावित केले आहेत.

            शेती, शेतीपूरक क्षेत्रात प्रामुख्याने पीक कर्जासाठी रुपये 3268.60 कोटी, सिंचनासाठी रुपये 218.56 कोटी, शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी रुपये 159.07 कोटी,  पशुपालन (दुग्ध) रुपये 219.48 कोटी, कुक्कुटपालन रुपये 146.61,  शेळी मेंढीपालनासाठी रुपये 207.24 कोटी, गोदाम/शीतगृहासाठी रुपये 145.48 कोटी, भूविकास, जमीन सुधारणा रुपये 113.24 कोटी, शेतीमाल प्रक्रिया उद्योगांसाठी रुपये 213.09 कोटी प्रस्तावित केले आहेत. इतर प्राथमिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने गृह कर्ज रुपये 442.60  कोटी, शैक्षणिक कर्ज रुपये 32.73 कोटी इतका वित्त पुरवठा प्रस्तावित केला आहे. महिला बचत गट इतरसाठी रुपये 199.75  कोटी रकमेचा विशेष वित्त पुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे.

            जळगाव जिल्ह्यात बँकांनी पात्र पशुपालक व मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना प्राधान्याने वित्त पुरवठा करावा. त्यांना किसान क्रेडिट कार्ड चा लाभ द्यावा. असे निर्देश जिल्हाधिकारी

अभिजित राऊत यांनी दिले.

00000

राज्य सेवा पूर्व परीक्षा केंद्र परिसरात फक्त परीक्षार्थींनाच मिळणार प्रवेश जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश

                जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 जळगाव  शहरातील एकूण 19 उपकेंद्रावर 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12  व दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फक्त परीक्षार्थींनाच प्रवेश राहील, अशा आशयाचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

                जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, की  या परीक्षेच्या वेळी गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

या परीक्षा केंद्राचे ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये, खबरदारीचे उपाय म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (1) व (3) नुसार मिळालेल्या अधिकारानुसार पुढील प्रमाणे आदेश देत आहे. त्यानुसार दोन जानेवारी 2021 रोजी पेपर सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जळगाव शहरातील एकूण 19 उपकेंद्राचे 100 मीटर परिसरात कोणी ही प्रवेश करु नये. सदर आदेश परीक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासाठी लागू होणार नाही. परीक्षा केंद्राजवळच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन / एस.टी.डी/ आय.एस.डी/ फॅक्स केंद्र/ झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनिक्षेपक पेपर सुरु असलेल्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत, असेही जिल्हाधिकारी           श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

०००००

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उद्या चाळीसगाव येथे कार्यक्रम

                 जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : चाळीसगाव येथील तहसील कार्यालयात शुक्रवार 24 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम होणार आहे. उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर हे अध्यक्षस्थानी असतील.  खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहील. राष्ट्रीय ग्राहक दिन 2021 या दिनानिमित्त केंद्र सरकारने Consumer –Know Your Rights ही संकल्पना निश्चित केलेली आहे. या निमित्ताने  ग्राहकांचे प्रबोधन व्हावे, या दृष्टिकोनातून ग्राहक संरक्षण कायदा 1986 यावर प्रबोधनपर कार्यक्रम व ग्राहक जागृती विषयक प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालय, चाळीसगाव येथे करण्यात येणार आहे. चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. विशेषत: ग्राहकांना तक्रार करावयाची असल्यास त्यांनी ई- फायलिंग तंत्राचा अवलंब करावा, यासाठी सीएससी केंद्रानी ग्राहकांना साहाय्य करावे, असे तहसीलदार अमोल मोरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

0000

Tuesday, 21 December 2021

अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे ‘जंकफूड’ बाबत जनजागृती

           जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे जंकफूड टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयात जंकफूडची विक्री होणार नाही याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच मुलांची प्रत्यक्ष भेट घेवून भविष्यात जंकफूडचे सेवन करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांच्याकडून घेण्यात आली, अशी माहिती अन्न व प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.

श्री. पाटील यांनी म्हटले आहे, की मुले ही भावी नागरिक बनणार आहेत. देशाचे भवितव्य त्यांच्या हाती असणार आहे.  या मुलांचे आरोग्य हे लहानपणापासूनच उत्तम असणे गरजेचे आहे.  याविषयी सर्वेक्षण करुन एक निरीक्षण नोंदविण्यात आले. त्यात मुले जंकफूडच्या आहारी गेलेली आहेत. मुलांना  घरचा पोळी- भाजीचा डबा त्यातून आवश्यक पोषण तत्वे मिळतात. मात्र,  शाळा, कॉलेज, कँटीन येथे जंकफुड सहज उपलब्ध होते. मुले ते खातात. त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे चार- पाच वर्षांच्या मुलांना चष्मे लागतात.  त्यांना मधुमेह होतो. त्यांच्यात लठठपणा येतो. त्यामुळे ते सुस्तावतात. खेळत नाहीत, परिणामी त्यांची शारीरिक वाढ खुंटते. मुले निरोगी असतील, तरच त्यांचे अभ्यासात लक्ष लागते. आकलनशक्ती वाढून अभ्यासात प्रगती होते. नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड वाढते. तब्येतीच्या कुरबुरी चालू असतील, तर साहजिकच एकूण शारीरिक व मानसिक वाढीवर लगाम लागतो.

                जंकफुड म्हणजेच शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषणतत्त्वांचा अभाव व भरपूर मीठ, साखर व फॅटसचा अंतर्भाव असलेला आहार होय. उदा. केक, बिस्किटस, चॉकलेट, चीप्स्, सॉफ्ट ड्रिंक्स, बर्गर, पिझ्झा इ.  परंतु, या जंकफूडचे आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होतात.  विशेषत: लहान मुले जंकफूडचे सेवन जास्त प्रमाणात करतात.  त्यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक वाढीवर परिणाम होतो.  मुलांचा स्वभाव हा लहरी बनतो. त्यांना थकवा येवून सुस्ती येते.  मुलांमध्ये कमी  एकाग्रता, कमी आकलनशक्ती  असे परिणाम दिसून येतात.  त्याचप्रमाणे, शारीरिक विकासातदेखील अडथळे येतात.  मुलांमध्ये लठ्ठपणा, मेदवृद्धी तसेच टाइप-2 मधूमेह, मूत्रपिंड विकार हेदेखील उद्भवण्याचा धोका वाढतो.

                मुलांना जंकफूड खाण्यापासून परावृत्त करणेसाठी त्यांना सकाळी व सायंकाळी त्यांच्या भुकेच्या  वेळी ताजी फळे, सुकामेवा, बटर मिल्क, नारळ पाणी, लिंबूपाणी इ.  असे पदार्थ उपलब्ध करुन द्यावेत. जेणेकरुन भूकही भागेल व शरीराला आवश्यक पोषणतत्वे देखील मिळतील.  मुलांच्या आहारात मैदा, मीठ, साखर, तेल यांचे अनावश्यक सेवन होणार नाही, याबाबत कटाक्ष ठेवावा.

                अन्न व औषध प्रशासनातर्फे जंकफुड टाळणेविषयी जनजागृती करण्याच्या उददेशाने शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्यांशी भेटून त्यांच्या शैक्षणिक आवारात जंकफुडची विक्री होणार नाही याविषयी दक्षता घेणेबाबत जागरुकता केली आहे.  तसेच, प्रत्यक्षात मुलांच्या भेटी घेवून

भविष्यात जंकफूडचे सेवन करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांच्याकडून घेण्यात आली व जनजागृती करण्यात आली आहे, असेही श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

0000

अटल वयो अभ्युदय योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

                 जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) :-  : आई-वडील, ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना एका छत्राखाली राबविण्यासाठी अटल वयो अभ्युदय (AVYAY) योजना कार्यान्वित केली आहे. त्यानुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम (IPSrC) व ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य कृती आराखडा (SAPSrC) या योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत.  ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम (IPSrC) व ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य कृती आराखडा (SAPSrC) या योजनांचे (https://grants-msje.gov.in) या संकेतस्थळावर Schemes या टॅबवर जावून प्रस्ताव सादर करण्याबाबत दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे. त्यानुसार इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी विहीत केलेल्या अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करून परिपूर्ण प्रस्ताव संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले

00000

Monday, 20 December 2021

व्हेंटिलेटर्स, कॉन्सनट्रेटर प्रक्रिया नियमानुसारच, कुठलीही अनियमितता नाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांची पत्रपरिषदेत माहिती

             जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन काँसनट्रेटर, मॅमोग्राफीमध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ झाला नसल्याची माहिती पत्रपरिषदेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली. दोन महिन्यांपासून घोटाळ्याबाबत होत असलेल्या चर्चांना त्यांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला. 

            जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी जिल्हा रुग्णालय व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयविषयी विविध खोटे आरोप करून जनमानसात जिल्हा रुग्णालयाची  प्रतिमा दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सोमवार दि. २० डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची सत्यता मांडली.

            व्हेंटिलेटर खरेदी घोटाळा, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बोगस, मॅमोग्राफी मशीन धूळखात अशा प्रमुख मुद्द्यांवर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केले होते. हे सर्व आरोप जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी खोडून काढले. यावेळी पत्रपरिषदेला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत सुपे,  कार्यालयीन अधिक्षक हरपाल वाणी उपस्थित होते.

            कुठल्याही व्यक्तीने आरोप करण्यापूर्वी त्यातील शासकीय प्रक्रिया जाणून घेत सत्यता पडताळावी. त्यानंतर आरोप केले पाहिजेत. रुग्णसेवेत आणि आरोग्य विकासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे प्रत्येक खरेदी प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे. यात जनतेचेच नुकसान झाले आहे, असेही डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले.

व्हेंटिलेटर खरेदी झाली आणि परतही गेले

            कोरोना महामारीच्या काळामध्ये रुग्णांना व्हेंटिलेटरची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन राज्य शासनाच्या 'गव्हर्नमेंट इ मार्केटिंग' म्हणजेच जीएम पोर्टलवर ३० व्हेंटिलेटरची मागणी नोंदवण्यात आली होती. तत्पूर्वी त्यातील घटक (स्पेसिफिकेशन) कसे असावेत तेवढेच जीएम पोर्टलवर भरावे लागतात. ते भरल्यानंतर न्यूनतम दर भरणाऱ्या संबंधित पुरवठादाराला निविदा देण्यात आली होती.

            व्हेंटिलेटर कोणत्या कंपनीचे असावेत तसेच त्याची अंतिम किंमत काय असावी हे जिल्हा रुग्णालय प्रशासन ठरवत नाही  तर जीएम पोर्टल त्याचे निर्णय घेत असते. कोणतीही निविदा प्रक्रिया ही above किंवा below जात असते. पुरवठादाराने व्हेंटिलेटर मशिनिंचा पुरवठा करताना त्यात १५ बालरोग विभागासाठी व १५ प्रौढ  रुग्णांसाठी असे ३० व्हेंटिलेटर पुरविले. त्याची तपासणी जिल्हा रुग्णालयातील समितीने तसेच पुरवठादार कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली होती.

            त्यामध्ये पुरवठा करताना अनुक्रमांक,  कंपनीचे नाव यामध्ये तफावत असल्याने त्याबाबतचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता.  तफावत आढळल्यामुळे खरेदीची  प्रशासकीय मान्यता आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला होता.  पुरवठादाराने सांगितल्याप्रमाणे श्रेयस कंपनीचे व्हेंटिलेटर आले होते. ते मशीनही चांगले होते. सांगितलेले स्पेसिफिकेशन देखील बरोबर होते.  फक्त जीएम पोर्टलवर 'श्रेयस' ऐवजी 'प्रोटान' असे नाव आले आहे. ही  ऑनलाइन तांत्रिक चुक आहे हे जीएम पोर्टलने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला कळविले आहे. याचा अर्थ असा की एका प्रकारच्या व्हेंटिलेटर ची निविदा केली असताना दुसऱ्या प्रकारचे व्हेंटिलेटर प्राप्त झाले. ते सुद्धा चांगल्या प्रतीचे होते, बोगस नव्हते. मात्र  त्यावेळी तातडीची गरज नसल्याने प्रशासनाने ती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.

            प्रशासकीय मान्यता रद्द झाल्याने पुरवठादार त्याच्या मशिनी परत घेऊन गेला आहे. त्याबाबतचा कुठलाही पैसा पुरवठादाराला देण्यात आलेला नाही. त्यामुळे या खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार झालेला नाही. खरेदीची प्रक्रिया कशी चालते याची व्यवस्थित अधिकृत माहिती न घेता जनतेची दिशाभूल करणारे आरोप या प्रकरणी झालेत.

ऑक्सिजन कॉन्सट्रेटर योग्यच, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू

            जिल्हा रुग्णालयाने खरेदी केलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बोगस असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामागील वस्तुस्थिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी मांडली. खा. रक्षाताई खडसे यांच्या खासदार निधीमधून दीड कोटी रुपये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला प्राप्त झाले होते. १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याबाबत तांत्रिक समितीने तांत्रिक मान्यता व नियोजन समिती मार्फत प्रशासकीय मान्यताला मंजुरी दिली होती.याबाबतची निविदा जीएम पोर्टलवर टाकण्यात आली होती. त्यानुसार न्यूनतम दर भरणाऱ्या पुरवठादाराला ऑर्डर देण्यात आली.

पाच लिटर पर मिनिट ऑक्सिजन देणाऱ्या मशीनमुळे  रुग्णाला फायदा होत नसल्यामुळे दहा लिटर पर मिनिट ऑक्सिजन देणारे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मागवण्यात आले होते. या मशिनी बोगस असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी समिती नेमली. मात्र परदेशी भाषा असल्याने समितीने हे मशीन सरकारी पॅनलवर असलेल्या यवतमाळच्या  अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञांना तपासणीसाठी पाठवले होते. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार,  "ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे योग्य" असल्याबाबत लेखी कळविले आहे.

            त्यानुसार १२० ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर खरेदी करून ५०% बिल पुरवठादाराला अदा करण्यात आले आहे. या सर्व मशिनी रावेर मतदार संघातील उपजिल्हा रुग्णालयात वाटप करण्यात आले आहे. मशीनचे इंस्टॉलेशन करण्याचे काम सुरू असून तेथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे या मशिनी बोगस नाहीत, हे सिद्ध झाले आहे.

चोपड्याला मॅमोग्राफी सुरु ; जळगावात लवकरच

            जिल्ह्यात दोन मेमोग्राफी मशीन आलेल्या आहेत. कोरोना महामारीपूर्वी या मशीन खरेदी झाले आहेत. त्याची तांत्रिक मान्यता नाशिकचे आरोग्य विभागाचे उपसंचालक यांच्याकडून झाल्यानंतर प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली होती. या मशीन धरणगाव, चोपडा येथे दिलेल्या आहेत. खरेदी झाल्यानंतर कोरोना महामारी सुरू झाल्यामुळे धरणगाव, चोपडा हे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित झाले होते.  त्यामुळे मशीन तेथेच होत्या.

            मॅमोग्राफी मशीन रुग्णहितासाठी खूप गरजेची आहे. यासाठी ई-टेंडर काढण्यात आले होते. जे न्यूनतम दर आले त्यानुसार पुरवठादारांना आदेश देण्यात आले. त्यानुसार मशीन खरेदी झाल्या होत्या. कोरोना महामारीनंतर आता सप्टेंबर महिन्यापासून चोपडा येथे मॅमोग्राफी मशीन सुरू झाली आहे. १० रुग्णांवर उपचार झाले असून २ जणांना बायोप्सीसाठी पाठविण्यात आले आहे.तेथे तज्ज्ञ  डॉक्टर सोनाली जैन उपचार करीत असतात. त्यासाठी येथील परिचारिका वर्गांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

            धरणगाव येथील मशीन जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगावात आणण्यात येणार असून मोहाडी येथील रुग्णालयात ठेवण्यात येईल. पुढील महिन्यात त्याद्वारे रुग्णांवर उपचार सुरू होणार आहेत.  या मशीनमुळे स्तनाच्या गाठीचे निदान लवकर करता येते. निदान लवकर झाल्यामुळे उपचार करण्यामध्ये वैद्यकीय पथकाला सुलभता प्राप्त होते. रुग्णाचे आयुष्य सुधारते. एकूण कर्करोग रुग्णांमध्ये स्तनाचा कर्करोग असण्याचे प्रमाण २८ टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. त्यामुळे रुग्णांच्या हितासाठी हे मॅमोग्राफी मशीन खूप महत्त्वाचे आहे. गरीब व गरजू रुग्णांना याचा लाभ होण्यासाठी या मशिनची मागणी नोंदवण्यात आली होती, अशीही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली.

00000

नागरिकांच्या समस्या सोडविण्यास पोलिसांनी प्राधान्य द्यावे - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

 












·         252  पोलीस अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाचे वितरण.

             जळगाव,  दि 20 ( जिमाका वृत्तसेवा ) राज्यात पोलिस यंत्रणा समाधानकारक काम करत आहे. नागरिक पोलिसांकडे आपल्या अडी-अडीचणी, समस्या घेऊन येत असतात. त्यांच्या समस्या सोडविणे हे पोलिसांचे कर्तव्य असल्याने त्या सोडविण्यास पोलिसांनी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन  राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

            महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या. मुंबई यांच्याकडून बांधण्यात आलेल्या जळगाव येथील 252 पोलीस कर्मचारी निवासस्थान इमारती तसेच राखीव पोलीस निरिक्षक कार्यालय इमारतीचे उदघाटन समारंभाप्रसंगी गृहमंत्री बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर श्रीमती जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार किशोर पाटील, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहारनिरीक्षक डॉ बी जी शेखर- पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्यासह नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक उपस्थित होते .

            गृहमंत्री म्हणाले की, आज २५२ सदनिकांचे वितरण करतांना मला खुप आनंद होत आहे. ह्या सदनिका सुसज्ज असून बांधकामाचा दर्जा देखील चांगला आहे. घर चांगले असेल तर कुटुंब आनंदी राहते आणि सहाजिकच याचा सकारात्मक परिणाम पोलिसांच्या कामावर होणार आहे. टप्पा २ चे काम पूर्ण करण्यासाठी निधींची कमतरता भासू देणार नाही. जिल्ह्यातील पोलिस स्टेशनच्या विकासाला प्राधान्य देताना प्राधान्याक्रमानुसार पोलिस स्टेशनचा दर्जा वाढविण्या बाबतही विचार करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था राखणे ही सर्वांची एकत्रित जबाबदारी असल्याचे सांगून पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तक्रारीची दखल घेऊन त्यावर कार्यवाही होणे आवश्यक असल्याचेही गृहमंत्री म्हणाले. 

            यावेळी गृहमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पाच पोलीस कर्मचाऱ्यांना घराची चावी प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

            पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, कोरोना काळात जळगाव जिल्हा पोलीस दलाने चांगली भूमिका बजावली आहे. यापुढेही जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आबादित ठेवण्यासाठी जळगाव आणि भुसावळ शहरात सीसीटीव्ही बसविणे आवश्यक असून यासाठी १० कोटीच्या निधीची आवश्यकता आहे. पोलिस दलाला 36 चारचाकी तसेच 30 दुचाकी वाहने  जिल्हा वार्षिक योजनेतून दिली आहेत आणखी वाहनांची आवश्यकता असल्याने वाहन खरेदीसाठी २ कोटी निधींची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

            या कार्यक्रमात राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर हे ऑनलाईन सहभागी झाले होते.

            या कार्यक्रमास जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटूंबिय उपस्थित होते.

00000