जळगाव, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा) : ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकांसाठीच आहे. ग्राहकांनी आपल्या हक्कांप्रती जागरूक रहावे. ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरणासाठी जिल्हा ग्राहक आयोग, राज्य ग्राहक आयोग आणि केंद्रीय आयोग कार्यरत आहे. जिल्हा आयोगात एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे दाखल करता येतात. ग्राहकांनी फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घ्यावी आणि फसवणूक झाल्यास ग्राहक आयोगाकडे दाद मागावी, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्षा पूनम मलिक यांनी केले.
राष्ट्रीय
ग्राहक दिनानिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अपर
जिल्हाधिकारी प्रवीण महाजन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, विजय
मोहरीर, डॅा. अनिल देशमुख, राजस कोतवाल यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख,
ग्राहक संरक्षण परिषदेचे जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. ग्राहकांना
यापुढे ग्राहक आयोगाकडे तक्रार करावयाची असल्यास
ई-फायलिंग तंत्राचा अवलंब करता येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून केंद्र
सरकारने विकसित केलेल्या ‘ई-दाखिल’ या विशेष संगणकीय प्रणालीवर आधारित
माहितीपट दाखविण्यात आला. सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून
फोर्टिफाइड अन्न, विविध ऑनलाइन परवाने,
सेंद्रिय अन्न आदी विषयांवर जनजागृतीपर फलक प्रदर्शित करण्यात आले होते.
अप्पर
जिल्हाधिकारी श्री. महाजन म्हणाले, ग्राहक संरक्षणाचे महत्व सांगून ग्राहकांनी
आपली फसवणूक होवू नये म्हणून दक्ष रहावे. फसवणूक झाल्यास ग्राहक आयोगाकडे दाद
मागावी. ग्राहक संरक्षणाचे कार्य पथनाट्यासारख्या कार्यक्रमातून ग्रामीण भागात
देखील जनजागृती करावी, असे सांगितले. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी
सांगितले, या वर्षी साजरा करावयाच्या ग्राहक दिनासाठी केंद्र सरकारकडून Consumer -
Know Your Rights अशी संकल्पना देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा
शाखेने तयार केलेले पॅावर पॅाइंट
प्रेझेंटेशन श्री. सूर्यवंशी यांनी सादर केले.
ग्राहक
संरक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते श्री. मोहरीर, डॅा. देशमुख, श्री. कोतवाल यांनी
ग्राहकांचे हक्क, ग्राहक संरक्षण क्षेत्रातील अनुभव, ग्राहकांच्या तक्रारींची
केलेली सोडवणूक, ग्राहक संरक्षणाची चळवळ, ग्राहकांमधील जनजागृती याविषयी
मार्गदर्शन केले. नयना महाजन यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत
कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुमती मनोरे, रेखा सावत,
अतुल जोशी, भागवत गायकवाड, पाराजी बोबडे, श्रीमती येवले, श्री. रणदिवे, श्री.
चौधरी, श्री. पवार, जनार्दन सपकाळे यांनी
परिश्रम घेतले. ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्ये याबाबत तुळजाई संस्थेच्या
कार्यकर्त्यांनी प्रबोधनात्मक पथनाट्य सादरीकरण केले. या पथनाट्यातून ग्राहक
प्रबोधन, कोरोना प्रतिबंधक लसीकरण बाबत विशेष संदेश देण्या आला.
00000
No comments:
Post a Comment