Thursday, 19 June 2025

मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू- शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

 जळगाव दि. 19  जून (जिमाका वृत्तसेवा) :– प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी मृग बहार हंगामाकरिता पुर्नरचित हवामान आधारित फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत चिकू, डाळींब, पेरू, मोसंबी, लिंबू व सिताफळ या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई या संस्थेमार्फत महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबविली जाणार आहे.

                 जिल्ह्यातील हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांना वारंवार नुकसान सहन करावे लागते. अशा स्थितीत हवामानाशी संबंधित धोके , जास्त पाऊस, पावसाचा खंड, तापमानातील चढ-उतार आदी , यांपासून संरक्षण देणारी ही विमा योजना ठरणार आहे. शेतकऱ्यांनी फळपिकांच्या मृग बहारासाठी या योजनेत सहभागी होणे ऐच्छिक असून कर्जदार व बिगरकर्जदार दोघेही यात भाग घेऊ शकतात. 

              या योजनेत पिक कर्ज घेण-या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग होण्यासाठी ऐच्छिक राहील. अधिसुचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज (उदा. मोसंबी व डाळीब) करता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकाकरिता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस आधी पर्यंत संबंधित बँकेस त्याअनुषंगाने विमा हप्ता कपात न करणे बाबत कळविणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी संबंधित बँकेस कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येणार आहे.

            विमा संरक्षित रक्कम व हप्ता यांच्या तपशीलात पेरू पिकासाठी 70,000 रुपये प्रतिहेक्टर इतकी विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना 3,500 रुपये इतका हप्ता भरावा लागेल. या पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 असून वाढीव मुदत 30 जून 2025 पर्यंत आहे. मोसंबी पिकासाठी 100000  रुपये विमा संरक्षित रक्कम असून हप्ता 5000 रुपये आहे, अंतिम मुदत 30 जून 2025 आहे. चिकूसाठी 70000 रुपये रक्कम असून 6300 रुपये हप्ता आकारण्यात आला आहे, अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जून आहे. डाळींब पिकासाठी 160000 रुपये विमा संरक्षण असून हप्ता 8000 रुपये निश्चित करण्यात आला आहे. अंतिम मुदत 14 जुलै 2025.  सिताफळ पिकासाठी सर्वाधिक रुपये विमा संरक्षित रक्कम 70000 असून हप्ता 3500 रुपये आहे. या पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 निश्चित करण्यात आली आहे. लिंबू पिकासाठी सर्वाधिक रुपये विमा संरक्षित रक्कम 80000 असून हप्ता 4000 रुपये आहे. या पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 असून वाढीव मुदत 30 जून 2025 पर्यंत आहे.

         जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  कुरबान तडवी यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे तसेच ई-पिक पाहणी व Agristack नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

                                                                    0000000000000

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा जळगाव दौरा

      जळगाव दि. 19  जून (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा शुक्रवार दिनांक 20 जून, 2025 रोजी जळगाव जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.

रात्री 01.23 वाजता विदर्भ एक्सप्रेसने रेल्वे स्थानक, जळगाव येथे आगमन व मोटारीने खाजगी निवासस्थान, जामनेर, जि. जळगाव कडे प्रयाण.  रात्री 02.00 वाजता जामनेर येथे आगमन व राखीव.

                                                                    000000000

Tuesday, 17 June 2025

मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतिगृह भुसावळ येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भुसावळ जि. जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

             या वसतिगृहात इयत्ता ८ वी ते महाविद्यालयीन तसेच तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या आणि जळगाव शहरात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.-भ.ज., विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील गरजू विद्यार्थिनींना प्रवेश घेता येणार आहे.

              प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा आणि त्याची प्रत वसतिगृह कार्यालयात सादर करावी, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.

               वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य यांसह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी ₹४०००/- रोख रक्कम व दरमहा ₹५००/- निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, शासकीय वसतिगृह भुसावळ यांनी केले आहे.

                                                                 00000000000

शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

             जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा)  शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग समिश्र निवासी केंद्र , जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२५ आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश नोंदणी १५ जुलै २०२५ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात करावी, असे आवाहन केंद्राचे अधीक्षक यांनी केले आहे.

                   या केंद्रात शासनामार्फत मोफत भोजन, निवास, गणवेश, अंथरूण-पांघरूण, पाठ्यपुस्तके, शालेय साहित्य, औषधोपचार, तसेच शालेय व कलाशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. उमेदवार अंध, कर्णबधिर किंवा अस्थिव्यंग पैकी एका प्रकारच्या अपंगत्वाचा असावा. एकापेक्षा अधिक प्रकारचे अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही. उमेदवार संसर्गजन्य आजारमुक्त असावा

                    अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांचे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र (मूकबधिरांसाठी श्रवणालेख आवश्यक), जन्म दाखला, आधार कार्ड, UDIID कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, दिव्यांगत्व स्पष्ट दिसणारे उमेदवाराचे ५ फोटो, बँक पासबुकची झेरॉक्स यांचा सामावेश आहे.  योग्य पात्रता असलेल्या इच्छुकांनी वरील सर्व कागदपत्रांसह लिहून दिलेला अर्ज कार्यालयात सादर करावा, असे आवाहन केंद्राच्या अधीक्षकांनी केले आहे.

00000000000

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह भुसावळ येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

             जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संचलित मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह भुसावळ जि. जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

             या वसतिगृहात इयत्ता ८ वी ते महाविद्यालयीन तसेच तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या आणि जळगाव शहरात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.-भ.ज., विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील गरजू विद्यार्थिनींना प्रवेश घेता येणार आहे.

              प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा आणि त्याची प्रत वसतिगृह कार्यालयात सादर करावी, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.

               वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य यांसह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी ₹४०००/- रोख रक्कम व दरमहा ₹६००/- निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.

त्यामुळे विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, शासकीय वसतिगृह भुसावळ यांनी केले आहे.

00000000000

मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतिगृह बोदवड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

         जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) –  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बोदवड (जळगाव) येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

             या वसतिगृहात इयत्ता ८ वी ते महाविद्यालयीन तसेच तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या आणि जळगाव शहरात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.-भ.ज., विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील गरजू विद्यार्थिनींना प्रवेश घेता येणार आहे.

              प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा आणि त्याची प्रत वसतिगृह कार्यालयात सादर करावी, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.

               वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य यांसह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी ₹४०००/- रोख रक्कम व दरमहा ₹५००/- निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.

त्यामुळे विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, शासकीय वसतिगृह बोदवड यांनी केले आहे.

0000000000

शाळा प्रवेश उत्सव: आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणास नवीन चालना

 



            जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय अशोक उईके यांच्या ‘शिक्षणाद्वारे सक्षमीकरण’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना, आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत दिनांक १६ जून रोजी भव्य शाळा प्रवेश उत्सव आयोजित करण्यात आला. हा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नव्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.

५१ आश्रमशाळांमध्ये एकाच दिवशी उत्सवाचे आयोजन

                  यावल प्रकल्पाअंतर्गत एकूण १७ शासकीय व ३४ अनुदानित आश्रमशाळांमध्ये एकाच दिवशी हा उत्सव साजरा करण्यात आला. एकूण २६,६४० विद्यार्थ्यांपैकी १४,६३६ विद्यार्थी (५४.९४%) शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित राहिले. यामध्ये शाळांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

                 उत्सवाच्या दिवशी चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी शासकीय आश्रमशाळा, विष्णपूर (ता. चोपडा) येथे भेट दिली. तसेच रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी डोंगरकठोरा (ता. यावल) येथील आश्रमशाळेला भेट देत पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत पालकांना मुलांना सतत शाळेत उपस्थित ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

  प्रधानमंत्री  धरती अबा जनजाती उन्नतग्राम अभियानाचा शुभारंभ

            याच दिवशी प्रधानमंत्री धरती आबा जनजाती उन्नतग्राम अभियान योजनेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने प्रत्येक शाळेत लोकप्रतिनिधी व पालकांच्या उपस्थितीत माहिती व प्रचार-प्रसाराचे कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच 'मुलांच्या शिक्षणात पालकांची सहभागिता' या विषयावर चर्चा सत्र घेण्यात आले. यामध्ये पालकांना विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

 विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

            शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे फुलांचा हार, मिठाई, भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पाठ्यपुस्तक, गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शाळेचा परिसर फुलांनी सजवून रंगीत पताका, रांगोळ्या व स्वागत फलकांनी सजविण्यात आला होता. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक गाणी, स्वागत गीत यांचीही रंगतदार मेजवानी अनुभवायला मिळाली.

प्रशासकीय यंत्रणेचा काटेकोर समन्वय

            प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी या कार्यक्रमाचे नेतृत्व करताना सांगितले की, "हा उत्सव केवळ एक औपचारिक उपक्रम नसून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षणाची ग्वाही देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे." यावेळी विशेष उपस्थिती वाढवण्यासाठी पुढील काळात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची घोषणा करण्यात आली.

             या शाळा प्रवेश उत्सवाच्या यशामध्ये प्रत्येक स्तरावरील कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडली, तर शिक्षण विस्तार अधिकारी यांनी विविध शाळांमध्ये समन्वय साधून आवश्यक बाबींची पूर्तता केली. मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांतील कार्यक्रमांचे नेतृत्व करत संपूर्ण आयोजनाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली. याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व पालकांशी संवाद साधण्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छता, शैक्षणिक साहित्य वितरण व व्यवस्थापनाची शिस्तबद्ध जबाबदारी अत्यंत कौशल्याने पार पाडली. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हा उत्सव प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्वच्छता, साहित्य वाटप व शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे कार्य उत्तमरीत्या पार पाडले.

आगामी नियोजन

            शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी विशेष प्रवेश अभियान, नियमित पालक-शिक्षक संवाद, आणि शैक्षणिक साधनांची उपलब्धता वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळा प्रवेश उत्सवाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दिशेने एक सकारात्मक आणि शक्तिशाली सुरुवात झाली आहे.

                                                                         00000000000