जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा):- पिकस्पर्धेबाबत यापुर्वीचा दि.5
ऑक्टोबर 2020 चा शासन निर्णय अधिक्रमीत करून सन 2022-23 पासुन पिकस्पर्धेमध्ये आवश्यक
बदल करुन शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. रब्बी हंगाम -2022 पासून पिकस्पर्धा
तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे.
राज्यामध्ये
पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग
करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात
येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव
केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत
तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे
योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या
एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना
राबविण्यात येत आहे.
1) पीकस्पर्धेतील पीके :
● रब्बी पीके- ज्वारी, गहू, हरभरा,करडई व जवस (एकूण
05 पिके)
पीकस्पर्धेतील पिकाची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र
किमान 1000 हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र 1000 हेक्टर पेक्षा कमी
असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण)
यांची विहीत मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.
2) स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग घ्यावयाची संख्या -
पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्यापीकाखाली भात
पिकासाठी किमान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
3) स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क :
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम
रु.300 राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व
आदिवासी गटासाठी किमान 05 यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पिकस्पर्धा रद्द करण्यात येऊन
प्रवेश शुल्क परत देण्यांत येईल.
4) अर्ज दाखल करण्याची तारीख:
रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे
राहिल.
ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस - 31 डिसेंबर अर्ज दाखल करण्याच्या
तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास , त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख
गृहीत धरण्यात यावी. तालुकास्तर,जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल
- प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.
या पद्धतीने पिकस्पर्धा घ्यावयाचे हे प्रथम वर्ष असल्याने प्रथम फक्त
तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पीकस्पर्धा घेण्यात येईल.
राज्यपातळीवरील पिकस्पर्धा चालुवर्षी होणार नाहीत. मागील वर्षाच्या
तालुकास्तरीय स्पर्धेतील पिकनिहाय पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या
शेतक-यांनी जिल्हास्तरीय पिकस्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा.
5) बक्षिस स्वरुप - सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये
1) स्पर्धा - तालुका
पातळी - पहिले बक्षिस पाच हजार रुपये ,
दुसरे बक्षिस तीन हजार रुपये, तिसरे बक्षिस –दोन हजार रुपये,
2) जिल्हा पातळी - पहिले बक्षिस – दहा हजार रुपये, दुसरे बक्षिस - सात हजार रुपये, तिसरे बक्षिस - पाच हजार रुपये ,
3) राज्य पातळी - पहिले बक्षिस - पन्नास हजार रुपये, दुसरे बक्षिस - चाळीस हजार रुपये,
तिसरे बक्षिस – तीस हजार रुपये ,
रब्बी हंगाम - दुय्यम तसेच पौष्टिक
तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे, ही बाब विचारात
घेऊन पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन कृषि आयुक्तालयामार्फत
करण्यात येत आहे. कृषि संचालक (विस्तार व
प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य,पुणे विकास पाटील यांनी एका
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
00000