Thursday, 26 September 2024

सुधारित _सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर- ▪ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ



                   जळगाव दि. 26 ( जिमाका ) - सामाजिक न्याय विभागाच्या सर्व गरीब गरजू आणि मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या योजना ग्रामिण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान निश्चित उपयोगी पडेल, अशी आशा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. समाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना गावागावात पोहचाव्या यासाठी जिल्ह्यात 26 सप्टेंबर पासून गावोगावी एलईडी चित्ररथ फिरणार असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या चित्ररथाला झेंडा दाखवून प्रारंभ केला.

      यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य घनश्याम अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील,  उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विजय गायकवाड आदी उपस्थित होते.

          जिल्हा माहिती कार्यालयाकडून एलईडी चित्ररथ जिल्ह्यात फिरणार आहे. या चित्ररथातून सामाजिक न्याय विभागांच्या महत्वाच्या योजनांची माहिती असलेले व्हिडीओ, यश कथा, योजनांचा अर्ज कसा करायचा, त्याला लागणारे कागदपत्र ही माहिती या एलईडी च्या माध्यमातून दाखविली जाणार आहे .हा दृकश्राव्य रथ ज्या - ज्या गावात जाईल तिथल्या लोकांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजना बघून समजून घ्याव्यात आणि त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

००००००००

उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीनी सज्ज रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होतेय - पालकमंत्री गुलाबराव पाटील जळीत वॉर्डात पालकमंत्री यांची भेट ; इतर जिल्ह्यातील रुग्णही आहेत भरती

 




            जळगाव दि. 26 ( जिमाका) - आपण ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य दिले आहे. मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाचे लोकार्पण हे आरोग्य सेवेत एक महत्त्वपूर्ण पावले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी मागच्या चार वर्षात जिल्हा वार्षिक नियोजन मधून अत्याधुनिक करणासाठी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज असलेले यंत्र सामुग्री दिले आहेत. आज त्यात अत्याधुनिक जळीत उपचार वॉर्डची भर पडली. उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होत आहे. डीपीडीसीतून  दिलेल्या मोठ्या निधीमुळे सिव्हील हॉस्पिटल व महाविद्यालयाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला असल्याने सर्वसामान्यांना आपल्या हक्काचे हॉस्पिटल वाटत असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सिव्हिल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय येथे मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. स्मिताताई वाघ होत्या

 सुसज्ज असे जळीत कक्ष व अतिदक्षता विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील अत्याधुनिक जळीत उपचार वॉर्डचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व आणि खा. स्मिता वाघ यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत  झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा 20 खाटांच्या जळीत कक्षात ( बर्न वार्ड)  5 खाटांचे आयसीयू,  5 विशेष जळीत खाटा  आणि उर्वरित 10 जनरल जळीत खाटांचा  समावेश असून येथील सर्व खाटा  जळालेल्या रुग्णांसाठी राखीव आहेत.  या अत्याधुनिक वार्डामध्ये  वातानुकूलित (ए.सी.)  सोयीसह रुग्णांना अधिक आरामदायी उपचार मिळत असून  याशिवाय स्क्रीन ग्राफ्टिंगसारख्या जटिल शस्त्रक्रिया आणि हायड्रोशन सारख्या आधुनिक उपचार पद्धती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.  तसेच सदर कक्षामध्ये एक सुसज्ज असे लहान शस्त्रक्रिया गृह देखील उपलब्ध आहे ज्यामुळे जळालेल्या रुग्णांच्या उपचाराची गुणवत्ता अधिक वाढेल. जंतुसंसर्ग कमी होणे,  मृत्यूचे प्रमाण कमी होणे व रुग्ण बरा झाल्या व नंतरचे व्यंग/ विद्रूपपणा हे सर्व कमी होण्यास मदत होईल. डीपीडीसीच्या माध्यमातून एकूण 03 कोटी 60 लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे.

यांची होती उपस्थिती

            याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा नियोजन समिती सदस्य राधेश्याम अग्रवाल,  महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, सिव्हील सर्जन डॉ किरण पाटील, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. अक्षय सरोदे डॉ., डॉ. सुरेखा चव्हाण डॉ. राजेश जांभुळकर वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विजय गायकवाड, योगिता बावस्कर , विश्वनाथ पुजारी दीपक शेजवळ, राजेश जांभूळकर, डॉ. चंद्रमोहन हरणे तसेच अधिसेविका प्रणीता गायकवाड, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी  तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व त्या विभागातील डॉक्टर्स मेट्रन मॅडम व इतर नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.

            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी DPDC मार्फत देण्यात आलेल्या मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागासाठी यंत्रसामुग्री बाबत  सविस्तर माहिती विषद करून यामुळे रुग्णांना होणारे फायदे याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांनी केले. आभार  वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विजय गायकवाड यांनी मानले.

००००००००


Wednesday, 25 September 2024

_मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली कार्यवाही जळगावच्या ज्येष्ठांची वारी, जातेय आयोध्या नगरी...!! ▪️ 30 सप्टेंबर रोजी जळगाव वरून 9.15 वाजता निघणार

  जळगाव दि. 25 ( जिमाका ) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंर्गत जळगाव जिल्ह्यातून निवड झालेल्या यात्रेकरूंची अयोध्येसाठी जळगाव येथून 30 सप्टेंबर रोजी सकाळी 9.25 वाजता पालकमंत्री, जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत अयोध्येसाठी रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. 

       महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना भारतातील तीर्थ क्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार आहे.

सदर योजनेतंर्गत जळगाव जिल्हयातील इच्छूक ज्येष्ठ नागरिकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तीर्थ दर्शनासाठी मोठया प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते. सदर अर्जांची छाननी करुन 796 लाभार्थी व 12 सहायक यांची  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना समन्वय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री 

गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत निवड करून शासनास शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार जळगाव येथून तीर्थदर्शनासाठी जाणाऱ्या विशेष रेल्वेला परवानगी मिळाली असून दि.30.9.2024 रोजी,सकाळी 9.15 वाजता जळगाव येथून श्रीराम मंदिर अयोध्या येथे तीर्थदर्शनासाठी रवाना होणार आहे.तीर्थयात्रेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, सहायक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय जळगाव व जिल्हयातील सर्व तालुक्यांचे तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व नगरपालिका/नगरपरिषद कार्यालये येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

000000000

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील 211 घरकुलांसाठी मिळाला भूखंड_ जळगाव जिल्ह्यातला पहिला नावीन्यपूर्ण प्रकल्प, पालकमंत्र्यांनी केला आनंद व्यक्त

      जळगाव दि. 25 ( जिमाका ) जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील 211 घरकुलांना शक्ती समितीची बैठक घेवून भूखंड देण्याबाबतचा निर्णय आज 25 सप्टेंबर रोजी घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक गरिबांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळणारा आहे. या गोष्टीचे आपल्याला आत्मिक समाधान असल्याची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. त्यांच्या समक्ष भूखंडाचे आदेश गरजुना पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या हस्ते देण्यात आले. 

यावेळी जळगाव उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, जळगाव तहसीलदार शितल राजपूत यांच्यासह विविध  विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

घरकुल मंजूर होऊनही बेघर गरजुना हक्काची जागा नव्हती. अशा बेघरांना हक्काचा निवारा उपलब्ध होणार असल्यामुळे आपल्याला समाधान असल्याचे सांगून  जळगाव मध्ये अशी पहिली कार्यवाही होत असल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. 

 यावेळी धरणगाव येथील 178 अतिक्रमित घरकुलांना नियमित करण्यात बाबत चर्चा झाली. त्यावरही लवकरच कार्यवाही करू असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी अमोल पाटील, ग्रा. प. सदस्य कैलास कोळी अंकुश मोरे, आकाश पाटील, फिरोज तडवी, ग्राम विकास अधिकारी जयपाल चिंचोरे यांच्यासह कुसुंबा व धरणगाव येथिल पदाधिकारी उपस्थित होते.

                                                                    0000000000

_मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली कार्यवाही जळगावच्या ज्येष्ठांची वारी, जातेय आयोध्या नगरी...!! ▪ 30 सप्टेंबर रोजी सकाळी 9.15 ला भुसावळ वरून निघणार ट्रेन

       जळगाव दि. 25 ( जिमाका )  - मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंर्गत जळगाव जिल्ह्यातून निवड झालेल्या यात्रेकरूंची अयोध्येसाठी भुसावळ स्टेशन वरून 30 सप्टेंबर रोजी सकाळी 9.15 वाजता पालकमंत्री, जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत अयोध्येसाठी रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

       महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना भारतातील तीर्थ क्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार आहे.

      सदर योजनेतंर्गत जळगाव जिल्हयातील इच्छूक ज्येष्ठ नागरिकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तीर्थ दर्शनासाठी मोठया प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते. सदर अर्जांची छाननी करुन 796 लाभार्थी व 12 सहायक यांची  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना समन्वय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री

गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत निवड करून शासनास शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार जळगाव येथून तीर्थदर्शनासाठी जाणाऱ्या विशेष रेल्वेला परवानगी मिळाली असून दि.30.9.2024 रोजी, सकाळी 9.15  वाजता विशेष रेल्वे जळगाव रेल्वे स्थानकावरुन श्रीराम मंदिर अयोध्या येथे तीर्थदर्शनासाठी रवाना होणार आहे.तीर्थयात्रेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, सहायक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय जळगाव व जिल्हयातील सर्व तालुक्यांचे तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व नगरपालिका/नगरपरिषद कार्यालये येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

0000000000

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांना 30 सप्टेंबर पर्यंत मिळणार तिसरा हप्ता - पालकमंत्री गुलाबराव पाटील पात्र लाभार्थी केवळ केवायसी, आधार सिडींग नसल्यामुळे वंचीत ; ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 26 सप्टेंबर रोजी तालुका स्तरावर होणार बैठक



      जळगाव दि. 25,( जिमाका )  - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र लाभार्थी यांच्या खात्यात 30 सप्टेंबर पर्यंत येणार असून जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 222 पात्र लाभार्थी बहिणींचे केवायसी, आधार सिडींग नाही त्यामुळे त्या या लाभापासून वंचित आहेत. सर्व बँकाच्या प्रतिनिधीची बैठक प्रांत आणि तहसीलदार 26 सप्टेंबर रोजी घेतील. त्यात ज्या पात्र बहिणींचे केवायसी आणि आधार सिडींग नाही ते युद्ध पातळीवर पूर्ण करावेत असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

  जिल्हा नियोजन भवन मध्ये आयोजित बैठकीत हा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अंकुश, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, महिला आणि बाल कल्याण अधिकारी वनिता सोनगत यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात 9 लाख 74 हजार 950 एवढे अर्ज दाखल झाले. त्यातील 9 लाख 61 हजार 8 एवढ्या बहिणी पात्र झाल्या आहेत. त्यांना 1500 रुपयाचे दोन हप्ते प्रदान करण्यात आले आहेत. त्यातील 1 लाख 7 हजार 222 एवढ्या बहिणीच्या खात्यावर केवळ केवायसी आणि आधार सिडींग नसल्यामुळे पैसे पडले नाहीत. ती प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहितीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

   सर्व प्रांत, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी यात लक्ष घालून ग्राम स्तरावरची यंत्रणेकडून येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.तसेच आधार सिडींग नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनाही पीकविमा सह विविध योजनांचे पैसे मिळाले नाहीत, या विशेष मोहिमेत त्यांचेही आधार सिडींग करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

   यावेळी तालुकास्तरावरील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे समिती सदस्य यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर योग्य ते कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी तालुका प्रशासनाला दिली.

0000000000

 

Tuesday, 24 September 2024

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ.निलेश हेलोंडे पाटील यांच्या २५ सप्टेंबरला जिल्हा दौरा

             जळगाव दि. 24 ( जिमाका )  -वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ.निलेश हेलोंडे पाटील

  हे दिनांक २५ सप्टेंबर  २०२४ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-

            दिनांक २५ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी ५.०० वाजता जळगाव कडे रवाना, संध्या ७.०० वाजता विश्राम भवन जळगाव येथे आगमन व कृषि अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांचेसमवेत चर्चा व मुक्काम,

            दिनांक २६ सप्टेंबर  रोजी सकाळी १०.०० वाजता जैन इरीकेशन येथे भेट चर्चा व पाहणी,  दुपारी १.३० वाजता विश्राम भवन जळगाव येथे राखीव, दुपारी २.०० वाजता अमरावती कडे रवाना .

00000000

जिल्ह्यात अटल भूजल योजना अंतर्गत डीएलआय -3 साठी होणार अभिसरण सप्ताह

 

जळगाव दि. 24 ( जिमाका )  -भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जळगाव अंतर्गत अटल भूजल योजनेमध्ये डी एल आय #3  अभिसरणांतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी माहे-एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत अभिसरणांतर्गत झालेल्या मागणी व पुरवठा आधारित उपाययोजनांचे विविध संलग्न विभागांकडुन माहिती गोळा करण्याकामी दिनांक २०  ते २७ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत डीएल आय #३ अभिसरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. 

            सदर सप्ताहबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, अटल भूजल योजना जिल्हा नियोजन व समन्वय समिती, जळगांव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे 24 सप्टेंबर, 2024  रोजी 3.00 वा. पुरवठा व मागणी आधारित उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर बैठक घेण्यात आली. त्यानुसार दर दिवशीp राबवायच्या उपक्रमाचे वेळापत्रक खालील प्रमाणे,

            पहिला दिवस – सप्ताहाचे उदघाटन व संलग्न विभागांची जिल्हास्तरावर बैठक, दुसरा दिवस – संलग्न विभागांना भेट देणे, तिसरा दिवस संलग्न विभागाना भेट देणे, चौथा दिवस – पुरवठा व मागणी आधारित उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर बैठक घेणे, पाचवा दिवस – पुरवठा व मागणी आधारित कामांचा माहिती तयार करुन सादर करणे, असे वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                        0000000000

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2025 इयत्ता 6 वी साठी मुदतवाढ

   जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) :- दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जवाहर नवोदय विद्यालयातील इयता 6 वी च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात जुलै 2024 पासून झालेली आहे. प्रवेश परिक्षा अर्ज हे पूर्वी प्रमाणे फक्त ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख  वाढली असून ती 7 ऑक्टोबर, 2024 झाली असून ही परीक्षा (शनिवार) दिनांक 18 जानेवारी 2025  ला  निर्धारित केलेल्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर वेळ 11.30 ते 1.30  या कालावधीत होईल, सदर परीक्षेचे माहिती पत्रक व प्रवेश अर्ज  लिंक www.navodaya.gov.in वर उपलब्ध आहे. सर्व संबंधितांनी माहिती पत्रक काळजीपूर्वक वाचून चालू वर्षी इयत्ता 5 वी मधे शिकत असलेले सर्व विद्यार्थी ( अटी पूर्ण करणारे ह्या प्रवेश परीक्षेस ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत. सदर माहिती जिल्ह्यातील सर्व इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी व संबंधीत पालक शिक्षक, मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकारी यांना आपल्या मार्फत अवगत करावी असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. खंडारे यांनी केले आहे. अधिक माहितीमाठी  बी. आर. द्विवेदी  9४२२७९७११०, हर्षद पवार ९९२१२९७९५१ यांच्याशी संपर्क साधावा. 

  करेक्शन विंडो पंजीकृत विदयार्थ्यांसाठी दिनांक 8 व 9 ऑक्टोंबर, 2024 ला खुली राहील ज्यामध्ये लिंग (मुलगा / मुलगी ) प्रवर्ग (सामान्य इतर मागास, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती) क्षेत्र ( ग्रामीण / शहरी) दिव्यंगता, परीक्षा माध्यम मध्ये पुन: सुधारणा केली जाऊ शकते   असे आवाहन प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय साकेगाव भुसावळ यानी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                          000000000

विशेष मोहिमेअंतर्गत प्रलंबित असलेले कामकाज विहीत मुदतीत पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

             जळगाव दि. 23 ( जिमाका )  - नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षेतखाली नुकतीच विभागीय बैठक झाली. त्या बैठकीतील निर्देशाचे अनुषंगाने जिल्ह्यातील प्रलंबित विषयाच्या संदर्भात जिल्ह्यातील महसूल अधिकारी यांची बैठक घेवून प्रलंबित कामाची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुदत ठरवून दिली. त्या संदर्भातील लेखी आदेशही देण्यात आले आहेत. यात जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत संबधित शाखा प्रमुख, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख व उपअधिक्षक भूमि अभिलेख यांनी हे प्रलंबित काम पूर्ण करायचे आहे. असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशात नमुद केले आहे.

    या मोहिमेचे पर्यवेक्षण अपर जिल्हाधिकारी करणार असून त्यात प्रलंबित अर्धन्यायीक कामकाज असणार आहे, त्याची अंमल बजावणी करणारे अधिकारी जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी व तहसिलदार आहेत. याचे कामकाज पूर्ण करावयाचा कालावधी 5 ऑक्टोबर, 2024 असा देण्यात आला आहे. 

  निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या समन्वयात शेतकरी आत्महत्या प्रंलबित प्रकरणे निर्गत करणे, नैसर्गिक बाधीत लाभार्थी यांची डीबीटी वितरणासाठी ई – केवासी पूर्ण करणे  अंमलबजावणी करणारे अधिकारी जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी व तहसिलदार आहेत. याचे कामकाज पूर्ण करावयाचा कालावधी 5 ऑक्टोबर, 2024 असा देण्यात आला आहे. 

  निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव  व नायब तहसिलदार (गृह) यांच्याकडे एन सी  प्रकरणांमध्ये शून्य प्रलंबितता साध्य तसा पूर्णतेचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याच बरोबर 

सर्व प्रलंबित बंदुकीच्या परवान्यांची प्रकरणे प्रक्रिया करुन शून्य प्रलंबित साध्य करावीत तसा अहवाल सादर करावा. यात नवीन अर्ज आणि नूतनीकरण दोन्ही गोष्टी समाविष्ट आहेत. तसेच ज्येष्ठ नागरीक कायदयाअंतर्गत प्राप्त प्रस्ताव अंतिमत: निर्गमित करणे, सरफेसी कायदयाअंतर्गत प्राप्त प्रस्ताव अंतिमत: निर्गमित करणे या कामाचे नियंत्रण करायचे असून यासाठी सर्व उप विभागीय अधिकारी,  नायब तहसिलदार (गृह) , सरफेसी प्रकरण सर्व तहसीलदार हे अंमलबजावणी अधिकार आहेत. हे कामकाज पूर्ण करावयाचा कालावधी 5 ऑक्टोबर, 2024 असा देण्यात आला आहे. 

    जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे कब्जा हक्क रक्कम वसूली पूर्ण करणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत काही गावांचे प्रस्ताव सादर करणे,प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पुर्णत: निर्गमित करणे या कामाचे नियोजन असून संबधित तहसिलदार हे अंमलबजावणी अधिकारी असतील. हे कामकाज  5 ऑक्टोबर, 2024, पर्यंत पूर्ण करायचे आहे.

  उपजिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी भुसंपादन यांच्याकडे सोनॉशियम दिलासा रक्कम प्रारंभिक मूल्यांकन  हा विषय असून यात दाव्यांच्या सत्यापन आणि मूल्यांकन प्रक्रियेची सुरुवात करून सर्व दस्तऐवज आणि नोंदी अचूकपणे पुनरावलोकित करुन अंतिम करायचे आहे. तसेच भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरण करणेबाबत प्रकरणामध्ये प्रलंबित ना-हरकत दाखले तपासून निर्गमित करणे आणि अंतिम आदेशाकामी बंद करण्यात आलेले लवाद प्रकरणामध्ये अंतिम आदेश पारित करायचे असून हे काम  30 सप्टेंबर, 2024 अखेर पूर्ण करायचे आहे.

  जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आधार सिंडींग व मोबाईल क्रमांक सिडींगचे कामकाज 100 टक्के पूर्ण करणे, प्रलंबित इंष्टाक 100 टक्के पूर्ण करणे, रेशन कार्ड डुप्लिकेशन आणि रद्द करण्यासाठी शिफारस  हे काम करायचे असून जिल्ह्यातील सर्व तहसिलदार,  सहा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून 7 ऑक्टोबर, 2024,पर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे.

     उपजिल्हाधिकारी रोहयो  यांनी रोहयो अपुर्ण कामे पूर्ण करणे , आधार सिंडींगकामकाज 100 टक्के पूर्ण करणे, यातील डेमोग्राफिक विसंगती आणि अयशस्वी एनपीसीआय बाबतचे कामकाज 100 टक्के पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्व रोहयो चे कामकाज बघणारे नायब तहसीलदार यांच्याकडून 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत हे काम करून घ्यायचे आहे. 

    जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख यांनी संयुक्त मापन रेकॉर्ड अहवाल प्रलंबित प्रकरणे निर्गत करणे, दरखास्त प्रस्ताव प्रलंबित मोजणी पूर्ण करणे, व अहवाल सादर करणे, नवीन सजा पुर्नरचनामध्ये संबधित गावांचे गांव नकाशे व आकारबंद तयार करण्याचे काम त्यांनी 7 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करायचे असून जिल्ह्यातील सर्व उप अधिक्षक भुमि अभिलेख यांच्याकडून हे काम पूर्ण करून घ्यायचे आहे.

    उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) व तहसीलदार महसूल / आस्थापना  यांनी भोगवटादार वर्ग 2 चे 1 मध्ये रुपांतरण प्रकरणे निकाली काढण्याचे काम 7 ऑक्टोबर पर्यंत, पदोन्नतीचे प्रलंबित प्रस्ताव अंतिम करणे 5 ऑक्टोबर पर्यंत, वसूलीचे निरीक्षण – सुक्ष्म नियोजन तयार करून 30 सप्टेंबर, 2024 पर्यत 50 टक्के वसूली करण्याचे नियोजन करायचे आहे.

  उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) व तहसीलदार कूळकायदा यांनी ई-चावडी ऑनलाईन वसुलीचे 100% कामकाज पूर्ण करणे, यामध्ये अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व टप्पे, वेळापत्रक आणि संसाधने समाविष्ट करावीत हे काम 1 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करायचे आहे तसेच ई-  फेरफार प्रणालीतील 23 सप्टेंबर, 2024 पर्यंत 15 दिवस पूर्ण होणारे फेरफार नोंदी निर्गत करणे हे काम 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करायचे आहे. याबरोबरच  मुख्यालयातील दस्तऐवज सकॅनिंग प्रकल्पासाठी डीपीआर आणि खर्चाचा अंदाज याला अंतिम रुप देवून सादर करावा. यामध्ये सर्व तांत्रिक आणि आर्थिक बाबी अचूकपणे दस्ताऐवजीकरण कराव्यात. तसेच नविन सजा पुर्नरचनामध्ये संबधित गावांचे गांव नकाशे व आकारबंद तयार करणे, 7/12 आधार सिंडीगकामी डाटाबेस तयार करणे, शासकीय जागा मागणी प्रस्ताव अतिम करणे, प्रलंबित दरखास्त प्रस्ताव अंतिम करणे ही कामं 7 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करायची असून उपविभागीय अधिकारी (सर्व) तहसीलदार कुळकायदा व तहसिलदार (सर्व) ङिबीए.(सर्व) यांच्याकडून हे कामकाज करून घ्यायचे आहे.

  उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी पर्यावरण समितीकडे सादर करण्यात आलेले 28 वाळूघाटाचे प्रस्ताव अंतिम करणे, वाळूघाट लिलाव प्रक्रिया कार्यवाही पूर्ण करणे, खाणपट्टा प्रस्ताव पर्यावरण समितीकडे सादर करणे, मंडळ निहाय प्रत्येकी एक खाणपट्टा प्रस्ताव सादर करणे, जप्त अवैध गौणखनिज वाहनाचे लिलाव प्रक्रिया पूर्ण करायचे असून उप विभागीय अधिकारी (सर्व) जिल्हा खनिकर्म अधिकारी जळगाव व तहसिलदार (सर्व) निवासी नायब तहसिलदार (सर्व) यांच्याकडील कामकाजही कालावधी 07 ऑक्टोबर, 2024 पर्यंत पूर्ण करून घ्यायचे आहे. 

    तहसिलदार (संगायो  )  जिल्हाधिकारी कार्यालय, उप विभागीय अधिकारी,  तहसीलदार कार्यालयाच्या दुरुस्तीचे प्रारंभिक मूल्यांकन करणे व या मूल्यांकनात आवश्यक दुरुस्तीचे सविस्तर यादी आणि खर्चाचा अंदाज सादर करणे , राजीव गांधी गतिमान प्रशासन योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे काम  30 सप्टेंबर, 2024,अखेर पूर्ण करायचे आहे. तसेच तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त करुन 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम करणे,  जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख शाखा हे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारातील धान्य गोडावून येथे स्थलांस्तरीत करणेबाबत प्रस्ताव 30 सप्टेंबर पर्यंत सादर करणे, आपले सरकार पोर्टल वरील सर्व तक्रारी 30 सप्टेंबर पर्यंत निर्गमित करणे,तालुका स्तरावरील संगायो शाखेतील विविध योजना अंतर्गत प्रलंबित प्रकरणाबाबत बैठक घेवून 5 सप्टेंबर पर्यंत निर्गत करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

 जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार सर्वसाधारण  सेवा  यांनी 5 ऑक्टोबर पर्यंत पुस्तक अदयावत करावीत तर 

 जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा करमणुक कर अधिकारी यांनी प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणे 5 ऑक्टोबर पर्यंत अंतिम करणे, विभागीय चौकशी प्रकरणे 7 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करणे, ई- ऑफीस प्रणाली  जिल्हाधिकारी कार्यालय / उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय येथे 100 टक्के अंमलबजावणी करण्याचे काम 7 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

  जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या या आदेशाचे तसेच दिलेल्या सूचनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.  त्याबाबतचा आढावा जिल्हाधिकार हे दूरदृश्य प्रणालीव्दारे घेणार असून याबाबत संबधित शाखा प्रमुख यांची शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        ०००००००

Monday, 23 September 2024

“ मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थी लॉटरी सोडत ; 761 जणांची निवड

     जळगाव दि. 23 ( जिमाका ) - मुख्यमंत्री  तीर्थ दर्शन यात्रेसाठी जिल्ह्यातून ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज मागविले  होते. त्यात एकूण 1177 पात्र अर्ज होते. त्यातून लॉटरी सोडतीतून 761 जणांची निवड करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी दिली.

     महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे,त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार आहे.

    सदर योजनेअंतर्गत जळगाव जिल्हयासाठी इच्छूक ज्येष्ठ नागरिकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तीर्थ दर्शनासाठी मोठया प्रमाणात अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांचेकडे प्राप्त झाल्याने, प्रवाशांची निवड करण्यासाठी दि.22.09.2024 रोजी सकाळी 9.00 वाजता सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे लॉटरी (ड्रॉ) आयोजीत करण्यात आला होता. सदर लॉटरी (ड्रॉ) साठी जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना समन्वय सनियंत्रण समिती जळगाव यांच्यामार्फत श्रीम.शितल राजपूत, तहसिलदार, जळगाव व श्री.प्रमोद ब-हाटे, संपादक व सामाजिक कार्यकर्ता यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. जळगांव जिल्हयातून एकुण 1177 अर्ज पात्र ठरले होते, सदर पात्र ठरलेल्या अर्जामधून लॉटरी सोडती व्दारे निरीक्षकांच्या उपस्थित इन-कॅमेरा 761 लाभार्थ्याची निवड करण्यात आली. सदर निवड झालेल्या लाभार्थ्याचे जोडीदार (पती / पत्नी) असे 35 लाभार्थी व 12 सहायक असे एकुण 808 लाभार्थ्याची श्रीराम मंदिर, अयोध्या येथे जाण्यासाठी निवड करण्यात आली आहे.     

     सदर निवड केलेल्या प्रवाशांची निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय जळगाव, येथे प्रसिध्द करण्यात आली आहे.

                                                                  0000000000

जळगाव येथे 27 सप्टेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन

         जळगाव, दिनांक 23 (जिमाका) :  पोस्टाच्या ज्या कामांसंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव येथे दि. 27 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी चार वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

            तरी नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण माहितीसह दोन प्रतित अधिक्षक डाकघर कार्यालय, पहिला मजला, हेड पोस्ट ऑफिस बिल्डींग, जळगाव-425001 या पत्त्यावर दि. 24 सप्टेंबर, 2024 पुर्वी पोहोचेल अशाबेताने पाठवावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा निपटारा केला जाईल, परंतु डाक अदालतीत समावेश केला जाणार नाही. असे अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००००००

Friday, 20 September 2024

पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपुर्ती सोहळा उत्साहात अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्गाटन, यातील 36 केंद्रे जळगाव जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनास प्रारंभ.










             वर्धा, दि.20 (जिमाका) : पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागिदारी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजसमुहाची आहे. या समुहातील कारागिर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक शेतकरीच राहणार असून त्याच्या समृध्दीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याचीही ग्वाही प्रधानमंत्र्यांनी येथे दिली.

            पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात आज पार पडला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

            अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला.

            आजच्याच दिवशी 1932 मध्ये महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता निर्मूलनसाठी सुरू केलेल्या अभियानाची आठवण करुन देतानांच बापूजींची कर्मभूमी आणि विनोबांची साधनाभूमी असलेल्या वर्ध्यातून विकसित भारताची निर्मिती करण्याच्या आमच्या संकल्पास ऊर्जा मिळते, असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले, विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या सोहळ्यासाठी आम्ही यामुळेच वर्ध्याची निवड केली. ही योजना केवळ एक सरकारी कार्यक्रम नसून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशात हजारो वर्षापासून असलेल्या कौशल्याचा वापर करण्याचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. इतिहासात आपल्या देशातील समृध्दीचा मोठा आधार पारंपरिक कौशल्य हाच होता. येथील वस्त्रोद्योग, शिल्पकला, धातूविज्ञान, अभियांत्रिकी अशा साऱ्याच बाबी जगात वैशिष्टपूर्ण होत्या. जगातील सर्वात मोठा वस्त्रनिर्माता भारतच होता. मात्र पारतंत्र्याच्या कालखंडात इंग्रजांनी स्वदेशी कौशल्य नष्ट केले. या पार्श्वभूमीवर गांधीजींनी वर्ध्यातूनच ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात बलुतेदारी समुहाची सातत्याने उपेक्षा झाली. त्यामुळेच प्रगती आणि आधुनिकतेत देशाची पिछेहाट झाल्याची खंत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.

            कारागिरांच्या पारंपरिक कौशल्याचा सन्मान, सामर्थ्य आणि या समाजसमूहाची समृध्दी ही या योजनेमागची मूळ भूमिका असल्याचे स्पष्ट करुन श्री. मोदी म्हणाले, देशातील सातशेहून अधिक जिल्हे, अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायती तसेच हजारो स्थानिक नागरी संस्था या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत. दहा लाखांहून अधिक लोक या योजनेशी जोडले गेले असून आठ लाख शिल्पकारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यात केवळ महाराष्ट्रातीलच साठ हजारांहून कारागिर समाविष्ट आहेत. त्यांच्या कामाला आधुनिक आणि डिजिटल तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. साडेसहा लाख बलुतेदारांना आधुनिक साधने दिली गेली आहेत. या योजनेचा सर्वाधिक फायदा याच समाजसमूहांना होत आहे. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात मोठ्या औद्योगिक विकासाची क्षमता असून त्यात वस्त्रोद्योग हा अग्रणी आहे. विदर्भात कापसाचे क्षेत्र मोठे असुनही येथील शेतकऱ्यांची यापूर्वी उपेक्षा झाल्याची खंत व्यक्त करुन प्रधानमंत्री मोदी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर नांदगाव खंडेश्वर येथे टेक्सटाइल पार्कची निर्मिती झाली. आता अमरावती येथे होत असलेले पीएम मित्रा पार्क हे वस्त्रोद्योगास नवी झळाळी प्राप्त करुन देण्याच्या प्रयत्नातील पुढचे पाऊल आहे. फार्म टू फायबर, फायबर टू फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन अशा सुत्रातून आमचे प्रयत्न सुरू असून विदर्भातील उच्च दर्जाच्या सूतापासून तयार होणारे कपडे परदेशात निर्यात होऊन येथील शेतकरी समृध्द होतील. अमरावतीच्या पार्कमध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून 1 लाखाचा रोजगार उपलब्ध होईल. औद्योगिक विकासासाठी पुरक असणाऱ्या विविध पायाभूत सुविधांचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. विदर्भातील सिंचन विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या वैनगंगा-नळगंगा योजनेच्या अंमलबजावणीतून 10 लाख एकर क्षेत्र सिंचित होणार आहे. याशिवाय कांदा, सोयाबीन उत्पादकांनाही विविध निर्णयाच्या माध्यमातून सरकार मदत करत आहे, असे प्रधानमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            देशातील गरीब, वंचित तसेच परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा ही योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या खंबीर पाठबळामुळे राज्याची प्रगती गतिमानतेने होत आहे. अमरावती येथे पीएम मित्रा पार्क हा देशातील वस्त्रोद्योगाच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसावर प्रक्रिया करून कापड निर्यातीला चालना मिळणार आहे. या पार्कमध्ये 10 हजार कोटीची गुंतवणुक होणार असून सुमारे 1 लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांमुळे राज्यातील महिला व इतर घटकांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला पोषक ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी

            केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यावेळी म्हणाले, पीएम विश्वकर्मा ही योजना पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारी आहे. त्यांना उच्च गुणवत्ता व प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेला माल जागतिक बाजारपेठेत पाठवण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात 1 लाख 46 हजार कारागिरांची नोंदणी झाली आहे. कारागिरांना अत्याधुनिक साधनांसाठी 5 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून त्यांच्या उत्पादीत वस्तुंना मोठी बाजारपेठ निर्माण करण्यात आली आहे. भारतातील कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तुंच्या उत्पादनांचे प्रदर्शन वर्धा येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामिण कारागिरांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे श्री.मांझी यांनी यावेळी सांगितले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            देशातील सात पीएम मित्रा पार्कपैकी अमरावती येथे होत असलेल्या पार्कच्या माध्यमातून  कापसापासून कापडापर्यंत व कापडापासून फॅशनपर्यंतच्या सर्व प्रकारच्या एकत्र सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे मोठ्या गुंतवणुकीसह रोजगार उपलब्ध होईल. पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारांच्या विकासाचा विचार अद्यापपर्यंत कोणीही केला नाही, परंतू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा सारख्या योजनेच्या माध्यमातून बाजारपेठेला अनुकूल असलेल्या वस्तुंची निर्मिती करण्यासाठी प्रशिक्षणासह आर्थिक सहाय्य कारागिरांना उपलब्ध करून दिले आहे. याचा लाभ समाजातील शेवटच्या कारागिरापर्यंत पोहोचत आहे. बलुतेदार समाजसमुहाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची मोठी संधी या योजनेमधून उपलब्ध झाले असल्याचे सांगून शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

उपमुख्यमंत्री अजित पवार

            पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या पार्कमुळे पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार असून येथे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये मोठे प्रकल्प गतिमानतेने पुर्ण केल्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा विक्रम केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणुक करण्यास उत्सुक आहेत. गडचिरोली येथे स्टील उद्योग तसेच महापे येथे सेमी कंडक्टर या उद्योगांचा यामध्ये समावेश आहे. प्रधानमंत्र्यांच्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सरकार संपुर्ण योगदान देईल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कारागिरांना प्रमाणपत्र, धनादेशाचे वितरण

            प्रधानमंत्र्यांनी कळ दाबून अमरावती येथील पीएम मित्र पार्क, राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्रांचे उद्घाटन केले तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या 1 लाख कारागिरांना ओळखपत्र व प्रमाणपत्र तसेच 1 लाख कारागिरांना डिजिटल कौशल्य प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. देशभरातील 75 हजार कारागिरांना कर्जाचे वितरण देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपुर्तीनिमित्त भारतीय डाक विभागाने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरण प्रधानमंत्र्यांनी केले.

            सुरुवातीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चरख्याची प्रतिकृती तर केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृती भेट देऊन प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले. लघु, सुक्ष्म व मध्यम विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या परंपरागत ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या विविध आकर्षक कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले.    कार्यक्रमास आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ.पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस, प्रभारी विभागीय आयुक्त डॅा.विपीन ईटनकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती.

जळगाव जिल्ह्यातील 36 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचेही झाले उदघाटन

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून राज्यातील एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे दूरदृश्यप्रणालीद्वारे 20 सप्टेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले. कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक-युवतींना व्हावा या दृष्टीकोनातून नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी अशा एकूण 36 महाविद्यालयांमधील केंद्रांचा समावेश आहे.

    या नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच, युवक- युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.           

                                                                           00000000000

भारत सरकारच्या मार्गदर्शकानुसार स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाचे 2 ऑक्टेंबर पर्यंत आयोजन

             जळगाव दि. 20 ( जिमाका ) - भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नेहरू युवा केंद्र, जळगाव MYBharat.gov.in पोर्टलद्वारे आणि मुली/युवा गटांच्या मदतीने दिनांक 02 ऑक्टोबर, 2024  पर्यंत स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            या कार्यक्रमाचे उद्दिष्ट: स्वच्छता, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती: एकेरी वापराच्या प्लास्टिकच्या पर्यावरणावर आणि आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती: एकेरी-वापरणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी समुदायाला प्रोत्साहन देणे, स्वच्छ भारत अभियानाचे जीवन सहभागातून जीवन चळवळीत रूपांतर करावे लागेल. अशा इच्छूक युवक गट/संस्थेने ऑनलाईनव्दारे (लिंक https://forms.gle/bqn6ADvBxupaVy9Z9) अर्ज करावा. स्वच्छता भारत अंतर्गत कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावून गावाचे सुशोभीकरण करणे,  अमृत सरोवराची स्वच्छता : ऐतिहासिक ठिकाणी स्वच्छता मोहीम; प्रतिकात्मक उपक्रम इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी तुमचा प्रस्ताव पाठविला जाईल, त्यानंतर नेहरू युवा केंद्र, जळगाव MYBharat.gov.in पोर्टलवर कार्यक्रम प्रकाशित केला जाईल.

            या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या तरुणांना पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. प्रत्येक कार्यक्रमात किमान 30 तरुण सहभागी होतील. तरुणांना टोपी, पेन आणि डायरी दिली जाईल. अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र, जळगाव, गट क्र. 38/39/42/1, प्लॉट क्रमांक-२४, प्रेम नगर, जळगाव, फोन क्रमांक व संपर्क 0257-2951754, इमेल आयडी nykjalgaon@gmail.com. असे आवाहन, जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000000000000

सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतीगृहात महिला आयोगाच्या अध्यक्ष जातात तेंव्हा....!!








             जळगाव दि. 20 ( जिमाका ) -  शालेय जीवन हे रोपटे आहे, त्याला अभ्यासरुपी संस्कार देऊन त्याचे वृक्षात रूपांतर करण्याचे काम दुसरे कोणी नाही तर स्वतः करायचे असते याची जाणीव होण्यासाठी आयुष्याचं निश्चित करायचे असते. ते ध्येय मग तुम्हाला कोणतेही प्रलोभन आले तरी विचलित करत नाही. हे सगळं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सांगत होत्या, मध्येच त्या आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगत होत्या. त्यात त्याही तल्लीन झाल्या होत्या आणि ऐकणाऱ्या मुलीही समरस झाल्या होत्या.

               सामाजिक न्याय न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात त्यांचा कोणताही पूर्व नियोजित दौरा नसताना आल्या. जळगाव जिल्ह्यात त्यांचा 18 आणि 19 सप्टेंबर या दोन दिवसाचा दौरा होता. तो नियोजित दौरा पूर्ण करून त्या 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी मुलींच्या वसतीगृहात आल्या.

   मुलींशी मनसोक्त गप्पा

             यावेळी त्यांनी मुलींशी मनसोक्त गप्पा मारल्या, सुरुवातीला अवघडलेल्या मुली नंतर  त्यांच्या संवादात एकरूप झाल्या. यावेळी मुलींनी मनात असलेल्या अनेक प्रश्नांना वाट मोकळी करून दिली. यावेळी श्रीमती चाकणकर यांनी आईच्या ममतेनी मुलींना वाढते सायबर गुन्हे, त्यात होणारी मुलींची फसवणूक याबाबत सविस्तर माहिती दिली. या सायबरच्या मायाजाळात न अडकता आपल्याला जीवनात कसे यशस्वी होता येईल, जेणे करून आपल्या माता - पित्याची मान अभिमानाने उंचावेल हे पहा.

             यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षितते विषयीचे कायदे, महिला आयोगाचे कामकाज, महिलांच्या सबलीकरणासाठीच्या शासनाच्या योजना याची सविस्तर माहिती दिली.

            या वेळी त्यांनी वसतीगृहातील स्वयंपाक घरात जाऊन जे मुलींना रोज जेवण दिले जाते. त्या जेवणाचा आस्वादही घेतला. वसतीगृहातील सोयीसुविधांची पाहणी केली.

            यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. महिला आणि मुलीसाठी सामाजिक न्याय विभाग जिल्ह्यात काय काय करत आहे हे पण विशद केले. याप्रसंगी महिला व बालकल्याण अधिकारी विनिता सोनगत, अधिक्षक वैशाली पाटील उपस्थिती होत्या.

0000000000

Thursday, 19 September 2024

नाशिक विभागीय लेखा व कोषागारे विभागातर्फे लेखा लिपीक प्रशिक्षण सत्राचे आयोजन

             जळगाव दि. 19 ( जिमाका ) -:- लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत लेखा लिपीक प्रशिक्षण दिनांक 7 ऑक्टोबर ते 18 डिसेंबर 2024 (एकूण 50 दिवसांचे) सत्र क्रमांक 104 आयोजित करण्यात आले असून सदर प्रशिक्षणासाठी अनुक्रमे 1 व 7 मोड्यूलप्रमाणे निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार यांच्या कोषागार कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे.

           सदर प्रशिक्षण सत्रासाठी कोणत्याही इच्छुक कर्मचाऱ्यास प्रवेश देण्यात येईल. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाच्या 26 नोव्हेंबर 2009 च्या  शासन निर्णयानुसार सर्व शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचारी यांना प्रशिक्षण सक्तीचे केले आहे. प्रशिक्षणाचा कालावधी एकूण 50 दिवसांचा आहे. या 50 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. तथापि पूर्णवेळ पाठविणे शक्य नसल्यास विशिष्ट मोड्युलसाठी प्रवेश घेण्याची अनुमती कर्मचारी यांना दिली जाईल. त्या अनुषंगाने नाशिक विभागातील नाशिक , धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांनी त्यांच्याकडील लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवावे, असे आवाहन महेश बच्छाव, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

00000000000

 

Wednesday, 18 September 2024

लग्नपूर्व समुपदेशन काळाची गरज

 








लग्नपूर्व समुपदेशन काळाची गरज ; प्रत्येक जिल्ह्यात समुपदेशन कक्ष होण्यासाठी करणार प्रयत्न

  - राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर

 

▪️ स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी मिशन मोडवर काम करावे

 

▪️ बालविवाह, विधवा प्रथा रोखण्यासाठी ग्रामसभेत ठराव होणे गरजेचे

 

▪️मुख्यमंत्री योजनादूता मार्फत योजना पोहचवणार घरोघरी

 

 

जळगाव दि.18 ( जिमाका ) लग्न झाल्यानंतर थोडया थोड्या गोष्टीतून भांडणे होऊन त्याचे रूपांतर घटस्फ़ोटात होते. घटस्फ़ोट होणे दोघांसाठीही क्लेशदायक असतो. हे टाळण्यासाठी लग्नपूर्व समुपदेशन होणे अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळे असे समुपदेशन कक्ष जिल्हा स्तरावर होण्यासाठी आपले शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.

      जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हा नियोजन भवनच्या बैठक कक्षात आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी वनिता सोनगत, विविध विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

बालविवाह, विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्नाची गरज

  आजही बालविवाह सारख्या प्रथा दुर्देवांनी सुरु आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मोठे प्रयत्न करूनही असे विवाह होत आहेत. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे हे माहिती आहे. पण बालविवाह का करू नये याची माहिती अधिक व्यापक प्रमाणात होणे गरजेचे आहे. तसेच महिला विधवा झाली की तिच्यावर अनेक सामाजिक बंधणे लादली जातात. ती बंद व्हावीत, तिच्यात आत्मविश्वास निर्माण करून तिच्या मुलांना वाढविण्यासाठी तिला स्वतःच्या पायावर उभं करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी समाज शिक्षणाची मोठी गरज आहे. प्रत्येक गावामध्ये या दोन्ही गोष्टीसाठी ग्रामसभेत ठराव होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा श्रीमती चाकणकर यांनी व्यक्त केली.

स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी मिशन मोडवर काम व्हावे

स्त्री आणि पुरुष यांच्या जन्माचे प्रमाण असमान असण्या मागे स्त्री लिंगाची गर्भातच हत्या करण्याचे अत्यंत दुर्देवी प्रकार होत आहेत. यासाठी पीसीएनडीटी हा अत्यंत कडक कायदा असून चोरून असे प्रकार होतात. त्यावर निर्बंध आणण्यासाठी लोकचळवळ होणे गरजेचे आहे. शासनाने स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी आता विविध योजना सुरु केल्या आहेत. त्यातून आत्मसन्मान आणि त्यांच्यात आत्मविश्वास येतो आहे. त्यासाठी या योजना लोकांपर्यंत जाण्यासाठी जागृती करणे गरजेचे आहे. असे कायदा विरोधी कृत्य करणाऱ्यांविरुद्ध प्रत्येक जिल्ह्यात कडक कारवाई होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्रीमती चाकणकर यांनी केले.

सखी सावित्री समिती, शिक्षक पालक संघटना, तक्रार पेटी

राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून विविध स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात येत आहे. शाळास्तर सखी सावित्री समिती स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना, समितीची रचा, कार्ये याविषयीचा नुकताच एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने या समिती प्रत्येक शाळेत स्थापन होतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक शाळेत शिक्षक पालक संघटना स्थापन होणे गरजेचे आहे. त्याच्या नियमित बैठक होणे गरजेचे आहे. त्याच बरोबर प्रत्येक शाळेत तक्रार पेटी असायलाच हवी याच्या अंमलाबजवणी बाबतही जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज श्रीमती चाकणकर यांनी अधोरेखित केली.

 मुख्यमंत्री योजनादूता मार्फत योजना पोहचवू घरोघरी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर, शहरात प्रभाग स्तरावर मुख्यमंत्री योजनादूत नेमले जात आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी शासनाच्या विविध योजना, कायदे यांची माहिती दिली जाणार आहे. त्यात आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने विविध योजना, कायदे केले आहेत.ते या योजनादूतांना योग्य ते प्रशिक्षण देऊन ते प्रत्येक घरा पर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध विभागाचे सादरीकरण केले. त्या त्या विभागाच्या प्रमुखांनी त्याचे सविस्तर विवेचन  केले.

000000